सरकार शिक्का आणि राणोजी शिंदे
मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये पराक्रमासोबतच प्रशासकीय विश्वासाला किती महत्त्व होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राणोजी शिंदे. छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे बाजीराव यांनी ज्या सरदारांवर स्वराज्याची मोठी जबाबदारी सोपवली, त्यामध्ये राणोजींचे स्थान अग्रक्रमी होते. त्यांच्या कर्तृत्वावर आणि निष्ठेवर राज्यकर्त्यांचा किती गाढा विश्वास होता, हे एका ऐतिहासिक पत्रावरून स्पष्ट होते.
राज्याचा अधिकृत कारभार चालवण्यासाठी लागणारे सरकारी शिक्के थेट राणोजींच्या स्वाधीन करणे, ही त्यांच्या विश्वासार्हतेवर झालेली मोठी मोहोर होती.
पेशवे दप्तर नोंद-
"राजश्री राणोजी शिंदे यांजपाशी सरकारचे शिक्के देऊन रवाना केले आहेत. याणी आपले जवळ शिक्के ठेवून सरकारचा कारभार करावा. अथवा यांस योग्य वाटेल तर मल्हारजी होळकर यांजपाशी देऊन किंवा आपले जवळ ठेवून शिक्के मारण्याचे काम चालवावे."
याचा सरळ अर्थ असा की, सरकारी कामकाजाचे सर्वात महत्त्वाचे साधन असलेले शिक्के राणोजींकडे सोपवण्यात आले होते. ते स्वतःजवळ ठेवून कारभार करण्याची किंवा प्रसंगी मल्हारराव होळकर यांच्याकडे देण्याची पूर्ण मुभा त्यांना दिली होती.
कारभार सुरळीत चालणे हाच यामागचा मुख्य हेतू होता.
एखाद्या सरदाराकडे राज्याचे शिक्के असणे, याचा अर्थ त्यांना प्रशासकीय निर्णयांचे सर्वाधिकार देणे असा होतो. राणोजींनी केवळ तलवारीच्या जोरावर साम्राज्य वाढवले नाही, तर आपल्या चोख आणि प्रामाणिक वर्तनाने राज्याचा विश्वासही संपादन केला.त्यांच्यावर टाकलेली ही जबाबदारी त्यांच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे.
संदर्भ: पेशवे दप्तर, भाग ३०, पान २०६

No comments:
Post a Comment