विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 May 2021

वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना भाग २

 वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना


भाग २
१६९२-९३ : संताजी-धनाजी आणि कामबक्ष !!!!
१६९० च्या अखेरीपासून पुढचे ८ वर्ष झुल्फिकार खान जिंजीच्या भोवतालच्या प्रदेशातच ठाण मांडून होता. १६९१-९२ मध्ये मराठा फौजेनी मोगल सैन्यावर असंख्य हल्ले केले होते. ह्यात कर्नाटक प्रांतात मोगलांची दाणादाण उडवल्यानी झुल्फिकार खानाला बादशाही छावणीतून मिळणाऱ्या मदती/रसदी वर परिणाम व्हायला लागला. ह्याचा परिणाम म्हणून झुल्फिकार खानाने जिंजीहुन १२ कोस मागे फिरून तळ ठोकला(मस्सीर-आलमगिरी). त्याचे सैन्य एक प्रलंबित वेढा देण्याच्या स्थितीत नव्हते. ह्याची दाखल घेत औरंगजेबाने तातडीने वजीर असदखान आणि शाहजादा कामबक्षला झुल्फिकार खानाच्या मदती साठी धाडले.
कामबक्ष आणि असदखान येताच जिंजीला पुन्हा एकदा वेढा पडला. ह्यावेळी परिस्थितीचे महत्व जाणून रामचंद्रपंत अमात्य (जे महाराष्ट्रात स्वराज्याचा मुलकी आणि सैनिकी कारभार बघत होते ) ह्यांनी सरनोबत संताजी आणि धनाजींना १५ आणि १० हजार फौज बरोबर देऊन राजाराम महाराजांच्या मदतीस पाठवले. हे २ विजेचे लोळ २ बाजूंनी जिंजीच्या मोगली फौजेवर कडाडले. त्यात संताजींनी तर कहरच केला. जिंजीच्या मोगली सैन्याला रसद पुरवायची जबाबदारी अलिमर्दा खान ह्या सरदारा वर होती. संताजींनी त्याच्या ध्यानी-मनी ही नसताना त्याला कांचीपुरम जवळ गाठून तुफान तडाखा दिला. अलिमर्दा खान व बरीचशी रसद पकडली गेली - शिवाय "१५०० घोडे आणि ६ हत्ती पाडाव केले" अशी नोंद आहे. रसदे अभावी आता मोगल सैन्याची परिस्थिती बिकट होणार होती. हे एक संकट आले असताना दुसरीकडे तितकेच मोठे संकट मोगल फौजेवर कोसळले. धनाजींनी जिंजीच्या वेढ्याच्या पश्चिमी चौक्यांवर हल्ला चढवला. ह्या चौक्यांची जबाबदारी ज्याच्याकडे होती त्या इस्माईल खान मका ला धनाजींनी धरले. ह्या छाप्यात "५०० घोडे आणि २ हत्ती पाडाव केले" अशी नोंद आहे.वेढ्यातल्या ज्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले तिथल्या काही मोठ्या तोफांना खिळे ठोकून निकामी करण्यात आले. ह्या २ हल्ल्यांमुळे वेढ्यातल्या सैन्याची अवस्था बिकट झाली असणार कारण तसे ही किल्ल्यातून त्यांच्या वर हल्ले होतच होते - आता बाहेरून ही २ तडाखे मिळाले.
हे सगळं चालू असताना मोगल छावणीत एक वेगळंच नाटक रंगलं होतं. झुल्फिकार खान व असद खान ह्या बाप-लेंकांना अशी खबर मिळाली की शाहजादा कामबक्ष ह्याने राजाराम महाराजांसोबत काही गोपनीय बोलणी चालू केली आहेत. असे वाटते की शत्रुसैन्यात फूट पडावी म्हणून मराठ्यांनी ही वावडी उठवली असावी - आणि खरंच तसे असेल तर ही खेळी प्रचंड यशस्वी झाली. ही बातमी खरी वाटायचं कारण पण होतं - काही असले तरी कामबक्ष एक डोळा नक्कीच मोगली तख्तावर ठेऊन असणार - राजाराम महाराजांविरुद्ध मोहिमेत थोडी ढील देऊन त्या बदल्यात त्यांच्याकडून बादशाह होण्याच्या स्वप्नात मदत मिळवायची अशी व्यवस्था असावी असे झुल्फिकार खानाला वाटले. त्या आशयाचे पत्र बाप-लेकाने लगेच औरंजेबाला पाठवलं - परिणामी मोगली निष्ठावंत सरदार दलपत बुंदेला ला कामबक्षच्या छावणीत ठेवण्यात आलं.अशी हूल उठवण्यात आली(बहुधा हूलच असावी) की कामबक्ष हा झुल्फिकार खान व असद खान ह्यांना अटक करायची योजना आखतोय.
संताजी-धनाजींचा झंझावात आणि त्यामुळे वेढ्यातल्या फौजेची झालेली बिकट अवस्था तसेच राजाराम महाराजांना पकडण्यात येत असलेलं अपयश - ह्या सर्वांचे खापर असद-झुल्फिकार ह्या पितापुत्रांनी सरळ काम्बक्षच्या डोक्यावर फोडलं. अशा परिस्थितीत त्यांनी एक कमालीचं पाऊल उचललं - त्यांनी जाऊन थेट कामबक्षला कैद केलं आणि औरंगजेबाकडे पाठवलं. फौजेची दयनीय अवस्था लक्षात घेऊन झुल्फिकार खानाने राजाराम महाराजांशी तहाची बोलणी उघडली. दोन्ही पक्षांमध्ये तह होऊन मोगल सैन्य परत माघारी तळावर वंदिवाश(सध्याचे वंदवासी, तमिळनाडू) ला निघून गेले. असे करून १६९२-९३ मध्ये झालेला हा वेढ्याचा प्रयत्न ही फसला.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...