विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 21 May 2021

वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना भाग १

 वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना


भाग १
२५ मार्च १६८९ ला रायगडाला वेढा पडल्यावर राजाराम महाराज अत्यंत शिताफीने मोगलांना चकवून वेढ्यातून निसटले. प्रतापगड, वासोटा, पन्हाळा आणि तिथून कर्नाटक मधून मोगलरूपी जिवाच्या धोक्याशी झुंज देत साधारण १५ नोव्हेंबर १६८९ ला राजे जिंजीला पोचले. जिंजीला त्यांनी स्वराज्याची प्रशासकीय आणि राजनैतिक राजधानी बनवले. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी बलिदानानंतर औरंगजेबाने लगेच रायगडाला वेढा घालायचे फर्मान काढले. शिवाजी महाराजांच्या सगळ्या कुटुंबाला अटक करून हे स्वराज्य कायमचे मिटवून टाकावे हा त्याचा हेतू. त्याच्या ह्या योजनेला राजाराम महाराज निसटून जिंजीला गेल्यामुळे एक सणसणीत चपराक मिळाली. रायगडाला ज्याने वेढा घातला त्याच झुल्फिकार खानाला औरंगजेबाने आता जिंजीला जाऊन राजाराम महाराजांना अटक करायची कामगिरी सोपवली. हा झुल्फिकार खान म्हणजे मोगली वजीर असद खानाचा मुलगा आणि औरंगजेबाने खास मर्जीतला सरदार.
१६९० - जिंजीला प्रथमच वेढा
जिंजीचा किल्ला हा सध्याच्या तमिळनाडू राज्यात आहे - चेन्नई पासून साधारण १५०-१६० कि.मी आणि वेल्लोर पासून साधारण १०० कि.मी. हा किल्ला ३ टेकड्यांवर मिळून वसला आहे - कृष्णगिरी, राजागिरी/अनंदगिरी आणि चांद्रयानदुर्ग. किल्ल्याचा एकूण पसारा खूप मोठा आणि तटबंदी मजबूत. शिवाजी महाराजांनी स्वतः जिंजीच्या किल्ल्याला हिंदुस्तानातील एक सर्वात अभेद्य किल्ला म्हणलं होतं. अशा हया जिंजीच्या किल्ल्याला पहिल्यांदी २९ ऑगस्ट १६९० ला झुल्फीकारखानानी वेढा घातला(मोगल इतिहासकारांच्या मते २३ नोव्हेंबरला झुल्फिकार खानाने जिंजी साठी प्रयाण केले - काही असो १६९० च्या अखेरीस तो जिंजीला येऊन वेढा घालायच्या कामाला लागला होता हे नक्की). ह्या वेढ्याची पूर्वसूचना राजाराम महाराजांना असावी कारण जसा वेढा पडायला लागला तसे महाराज स्वराज्याच्या कर्नाटक सुभ्यात निघून गेले. ह्याच वेळी जिंजीच्या मोगल छावणीतून काही मराठा सरदार(माणकोजी पांढरे, नागोजी माने आणि नेमाजी शिंदे) फुटून राजाराम राजेंना सामील झाले. ह्या घटनेमुळे वेढा पूर्ण करता आला नाही असे दिसते. राजाराम राजे फेब्रुवारी १६९१ ला जिंजीला परतल्याची नोंद आहे. १६९० ला चालू झालेला हा महाराजांना अटकेचा प्रयत्न - वेढा घालणे, वेढा उठवणे - हा थेट १६९८ पर्यंत चालू राहिला. ह्या काळात मोगल फौजेचे बरेच हाल झाले हे पुढच्या हकीकती वरून कळेल

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...