वेढा जिंजीला - शिकस्त मोगलांना
ह्या नंतरची २-४ वर्ष झुल्फीकाराने थेट जिंजीच्या किल्ल्याला वेढा न घालता आपला मोर्चा सभोवतालच्या प्रदेशाकडे वळवला. मराठा फौजेनी त्याच्या फौजेची रसद वेळोवेळी मारून व खजिन्याचा पुरवठा अधून मधून रोखून त्याला हे करण्यास भाग पाडलं. त्याने २ वेळा तंजावर वर हल्ला केला - ह्या पैकी दुसऱ्या हल्ल्यात ४० लाख "चक्री"च्या मोबदल्यात त्याने सला केला. वेल्लोरला ही त्याच्या सैन्याचा वेढा पडला पण तिथे हि अपयश - धनाजींनी स्वतः जाऊन वेल्लोर ला पडलेला वेढा उठवला. परंतु असे दिसते की १६९४ च्या अखेरीपर्यंत जिंजीच्या आसपासचा बराचसा मुलुख झुल्फिकार खानाने काबीज केला होता. असे करून जिंजीच्या मराठा प्रशासनाला जेरीस आणण्याचा त्याचा प्रयत्न होता. शेवटी १६९७ मध्ये औरंजेबाने झुल्फिकार खानाला पत्र पाठवून जिंजी वरचा हल्ला आणखीन तीव्र आणि निर्वाणीचा करायचा फर्मान दिला. साधारण ऑगस्ट १६९७ मध्ये राजाराम महाराजांनी झुल्फिकार खानाशी तहाची बोलणी करण्यासाठी आपला पुत्र कर्ण बरोबर एक शिष्टमंडळ पाठवले.असे वाटते की अशी बोलणी करून मोगलांना गुंतवून ठेऊन हा वेळ तिथून निसटायची योजना पक्की करण्यात घालवण्यात आला. शेवटी ३० जानेवारी १६९८ ला महत्प्रयासानंतर एकदाचा जिंजी किल्ला घेण्यात झुल्फिकार खानाला यश आले. पण यशानंतर ही त्याच्या हातात आलं ते धुपाटणंच - राजाराम महाराज तर कधीच जिंजीहुन निसटून २६ जानेवारी १६९८ ला वेल्लोर ला पोचले होते. तिथून धनाजींनी त्यांना परत महाराष्ट्र्र भूमीत आणलं आणि राजे २२ फेब्रुवारी १६९८ ला खेळणा(विशाळगड) ला पोचले. झुल्फिकार खानाने १६८९ ला रायगड घेतला पण राजाराम राजे सापडले नाहीत , १६९८ ला जिंजी किल्ला घेतला पण राजाराम राजे सापडले नाहीत !! मध्ये त्याचं सैन्य ८ वर्ष मराठ्यांचा मार खात नुसतंच झुरत होतं.

No comments:
Post a Comment