विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2026

महाराष्ट्र

 पौराणिक ग्रंथ अर्थात् वैदिक लोकांना पूजनीय असलेली मुख्य अशी १८ पुराणं आणि रामायण, महाभारतादि वंदनीय महाकाव्यांचा विचार केला असता त्यामध्ये आपल्याला


महाराष्ट्र असा शब्द आजच्या परिपेक्षात कुठेही आढळत नाही. पण याचा अर्थ आजच्या महाराष्ट्रामध्ये त्या काळात वस्ती नव्हती का? तर या काळात महाराष्ट्रात वैदिक लोकांची वस्ती होती पण वेगवेगळ्या काळामध्ये या भागाला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जात.

सर्वप्रथम रामायणाचा संदर्भ घेतला असता रामायणामध्ये दक्षिणापथात स्थित असलेले दंडकारण्य हे आजच्या महाराष्ट्रातील बहुतांश भूभागाला व्यापणारे होते असे निदर्शनास येते. हे दंडकारण्य सूर्यवंशातील दंडक नामक राजाचे राज्य असून गुरूंच्या शापामुळे त्याच्या राज्याचे अरण्य झाले होते असे उल्लेख आपल्याला पुराणांमध्ये बघायला मिळतात. याचा अर्थ असा की पूर्वी या भागामध्ये वस्ती होती पण पुढे त्याचे अरण्यात रूपांतरण झाले आणि पुनश्च वैदिक लोकांची वसाहत झाल्यावर अरण्य नामशेष होऊन येथे निरनिराळी जनपदं उदयाला आली.
आता महाभारत आणि पुराणांचा विचार केला असता आपल्याला या भागामध्ये विदर्भ, अपरांत, कोकण, अश्मक, मूलक, हृषिक, गोवर्धन, गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र, मल्लराष्ट्र, कुंतल इत्यादि वेगवेगळी जनपदं बघायला मिळतात ज्यांचा कमी-अधिक प्रमाणामध्ये भौगोलिक विस्तार आजच्या महाराष्ट्रात होता.
आता वळू महाराष्ट्र या शब्दाकडे, महाराष्ट्र हा शब्द ख्रिस्तपूर्व वाङ्मयांत कोठेही सापडलेला नाही. परंतु त्याचे प्राकृत स्वरूप महारठी हे मात्र आपल्याला सम्राट अशोक (ख्रिस्तपूर्व २ रे शतक) आणि सातवाहन राजांच्या शिलालेखांमध्ये आढळते. ज्या अर्थी प्राकृत स्वरूप उपलब्ध आहे त्या अर्थी त्याचे महाराष्ट्र हे संस्कृत रूप निश्चितच तितके मागे नेता येईल.
कात्यायनाच्या प्राकृतप्रकाशांत शेषं महाराष्ट्रवित् असा महाराष्ट्री भाषेचा निर्देश आढळतो. त्या सुमाराच्या वाङ्मयात महाराष्ट्र हा शब्द देशवाचक म्हणून येऊ लागला. पुढे भरतमुनींच्या नाट्यशास्त्र (२ रे शतक), वात्सायनकृत कामसूत्र (४ थे शतक), वराहमिहीराच्या बृहत्संहिता (४ ते शतक), दंडीकृत दशकुमारचरित (७ वे शतक) इत्यादि पुरातन ग्रंथांत महाराष्ट्र हे नाव स्पष्ट आढळते.
ख्रिस्ताब्द ३६५ मध्ये मध्यप्रदेशाचा राजा श्रीधरवर्म्याच्या सत्यनाग नामक प्रधानाने एरण (सागर जिल्हा) येथील सुप्रसिद्ध शिलालेखात स्वतःस महाराष्ट्रप्रमुख म्हणवले आहे. तसेच एहोळे येथील शिलालेखामध्ये चालुक्य राजा द्वितीय पुलकेशी ख्रिस्ताब्द ६३४ मध्ये स्वतःस त्रिमहाराष्ट्रक (विदर्भ, अश्मक आणि कुंतल हे एकत्रित त्रिमहाराष्ट्र देश होय) देशाचा स्वामी बनला असल्याचे सांगतो.
उपरोक्त उल्लेख बघता यापूर्वी महाराष्ट्र नाव अस्तित्वात असल्याचे सिद्ध करणारे पुरावे किमान आज तरी उपलब्ध नाहीत. पण महाराष्ट्रामध्ये वसाहत मात्र अति प्राचीन काळापासून आपल्याला आढळते.

मराठा साम्राज्याचे पंतप्रधान म्हणजे पेशवे.




 मराठा साम्राज्याचे पंतप्रधान म्हणजे पेशवे. छत्रपतींद्वारे पेशव्यांची नेमणूक व्हायची. पुण्यामध्ये पेशवे रहायचे हे आपण सगळे जाणतोच. पेशव्यांचा मोठा मुलगा (वारस) पुढील पेशवा व्हायचा.थोडक्यात पेशव्यांचे इतर भाऊ पेशवे बनू शकतील याची शक्यता तशी कमीच.

तर थोरल्या बाजीराव पेशवांच्या दोन बायका काशीबाई आणि मस्तानी आणि यांच्यापासून बाजीरावांचे तीन मुलगे नानासाहेब, रघुनाथराव आणि समशेर. थोरल्या बाजीरावांच्या मृत्युनंतर नानासाहेब पेशवे झाले. नानासाहेबांच्या काळात रघुनाथरावांनी अनेक लढाया केल्या, अगदी अटकेपार झेंडे रोवले. ते शूर होते यात शंका नाही, शूर माणसांच्या महत्वाकांक्षाही प्रबळ असतात. आपण पेशवा बनावं ही महत्वकांक्षा रघुनाथरावांचीदेखील होती. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की राघोबादादांमध्ये पेशवा बनण्याची लायकी होती पण ते सहजपणे पेशवा बनणं शक्य नव्हतं.
नानासाहेब पेशव्यांना तीन मुलगे, विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव. यापैकी विश्वासरावांचा पानिपतच्या लढाईत मत्यु झाला. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्युनंतर माधवराव पेशवे झाले. रघुनाथराव किंवा राघोबांची पेशवे व्हायची संधी यावेळेस हुकली.
माधवराव पेशवे उत्तमरीतीने कारभार करत होते पण राघोबांची महत्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.त्यात त्यांची महत्वाकांक्षी बायको आनंदीबाई आणि राघोबांचे सल्लागार यांच्या चूकीच्या सल्ल्यांमुळे राघोबादादा यांनी माधवराव पेशव्यांच्या विरोधात अनेक कुरापती केल्या. काका आणि पुतण्याचे संबंध बिघडत गेले आणि माधवरावांनी राघोबादादांना शनिवारवाड्यावर नजरकैदेत ठेवले. पुढे माधवरावांनी आपल्या शेवटच्या काळात काकांबरोबर संबंध सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.
माधवरावांना क्षय झाल्याने त्यांची राजवट फार काळ टिकू शकली नाही. वयाच्या २७व्या वर्षी त्यांचा मृत्यु झाला. त्यांना स्वतःला मुलबाळ नसल्याने त्यांचा लहान भाऊ नारायणराव याला पेशवा करण्यात आले. नारायणराव जेव्हा पेशवे झाले त्यावेळेस सज्ञान नसल्याने राघोबादादा हे त्यांच्यावतीने कारभार करत होते. माधवराव पेशव्यांइतकी कुशलता नारायणरावांमध्ये नव्हती. म्हणजे कारभार राघोबादादा बघत होते पण पेशवेपणाचा मान नारायणरावांना मिळत होता. अशी परीस्थिती वातावरण गढुळ करत जाते. नारायणराव आणि राघोबा या दोघांचे सल्लागार त्यांना चूकीचे सल्ले देत होते. त्यामुळे काका पुतण्याच्या संबधात तणाव निर्माण होऊ लागला आणि राघोबादादा आणि नारायणराव पेशव्यांचे खटके उडू लागले. नारायणराव पेशव्यांनी आपले काका राघोबादादांना नजरकैदेत ठेवलं.
असं म्हणतात रक्त हे पाण्यापेक्षा घट्ट असतं, पण सत्ता रक्ताला पातळ करु शकते. सत्ता हाती असल्यानेच नारायणराव राघोबांना कैद करु शकले आणि सत्ता हाती आल्याशिवाय आपण काही करु शकणार नाही याची जाणीव राघोबांना होऊ लागली. कैदेत असलेले राघोबा आणि आनंदीबाई त्यांचे कान भरणारे त्यांचे सहकारी यांच्यामुळे एकूणच वातावरण तंग होत गेलं. राघोबांनी कैदेतून बाहेर पडण्याचा विचार सुरु केला. शनिवारवाड्यात नारायणरावांच्या आई गोपिकाबाई मोठ्या प्रमाणावर दानधर्म करत. वेळेला पेशव्यांचे संरक्षक गारदी आणि इतर कारभार्यांना पगार वेळेवर मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. कोणत्याही सत्तेत सरकारी कर्मचारी संतुष्ट नसतील तर सत्ता पालटायला वेळ लागत नाही. नाराज गारद्यांमुळे एक संधी राघोबादादांना दिसू लागली.
१७७३चा ऑगस्ट महिना, गणपती उत्सवाचा काळ. राघोबा दादांनी गारद्यांच्या प्रमुखाशी चर्चा केली. गारद्यांच्या थकलेल्या पगारासंबंधी त्यांनी मध्यस्थी करायचं आश्वासन दिलं. याच्या बदल्यात त्यांनी नारायणराव पेशव्यांना धरुन त्यांच्यासमोर आणावे अशा आशयाचं पत्र त्यांनी गारद्यांचे प्रमुख सुमेरसिंग गारदी यांना पाठवले. असं म्हणतात की आनंदीबाईंनी राघोबादादांच्या पत्रात बदल करुन नारायणरावांना धरावे च्या ऐवजी मारावे असे लिहिले अर्थात ध चा मा केला.
३० ऑगस्ट १७७३, गणेश चतुर्थीचा शेवटचा दिवस. गारद्यांची दिशाभूल झालेली. त्या रात्री ते नारायणरावांच्या महालात धावून गेले. नारायणराव भितीने आपल्या काकांच्या महालात धावून गेले. काका आपल्याला वाचवतील ही त्यांची आशा. पण काकांच्या डोळ्यांदेखत नारायणरावांचे असंख्य तुकडे झाले. गुपचुपपणे रात्रीच्या अंधारात नारायणरावांचे मृत शरीर शनिवार वाड्याच्या एका दरवाज्यातून बाहेर नेण्यात आले आणि लकडीपुलाजवळ त्यांचा अंत्यसंस्कार झाला.
त्याकाळी पेशव्यांचे मुख्य न्यायाधीश रामशास्री प्रभुणे होते. त्यांनी राघोबादादा, आनंदीबाई, सुमेरसिंग गारदी आणि त्यांचे सहकारी यांना दोषी ठरवत त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. पण राघोबादादा पेशवे (नारायणरावांचा वारस जन्मला नसल्याने राघोबा पेशवे झाले) असल्याने त्यांना किंवा आनंदीबाई यांना कोणतीच शिक्षा झाली नाही.रामशास्री प्रभुण्यांनी नाराज होत आपल्या पदाचा त्याग केला.
राघोबा दादांचे शौर्य अशातर्हेने वाया गेले. अटकेपार झेंडा रोवणारा हा योद्धा पेशवेपदासाठी लायक असतानांदेखील पेशवा होऊ शकला नाही. महत्वाकांक्षी लोकांचे कान भरणारे कमी नसतात, राघोबादादांच्या भोवतीदेखील अशा लोकांची कमी नव्हती. या सर्वाचा शेवट एक कट रचण्यात झाली आणि त्यात एका कोवळ्या मुलाचा बळी गेला.
शनिवारवाड्याच्या ज्या दारातून नारायणराव पेशव्यांचा देह नेला त्याला नारायण दरवाजा म्हणतात. लकडी पुलाजवळ त्यांची समाधी आहे.
संदर्भः हिस्टरीफ्लेम.कॉम

टिपूला संपवून मराठ्यांना फायदा झाला कि तोटा

 टिपूला संपवण्यात मराठ्यांचा मोठा हात होता.


टिपूला संपवून मराठ्यांना फायदा झाला कि तोटा हे मात्र अजून कळात नाही. त्याचा फायदा ब्रिटिशांना झाला. त्यांनी आधी टिपू नंतर मराठे आणि नंतर शीख संपवत आणले.

टिपू सुलतानचे दोन यश वादातीत आहे पाहिले म्हणजे रॉकेटचा शोध आणि दुसरा दूरदृष्टी कोण त्याने नेपोलियन बोनपार्टशी संपर्क केला हित इंग्रज विरुद्ध (तसे महादजी नि पण केला हि प्रयत्न)
टिपू च्या विरुद्ध जसे बोलणारे आहेत तसेच त्याच्या बाजूने बोलणारे पण आहेत.आपल्याबसरख्या कन्नड न येणाऱ्या माणसाला हे खूप विचित्र वाटते आणि कोण बरोबर ते कळत नाही.म्हणून मोठ्या मोठ्या लोकांचे टिपू सुलतान विषयी मत किंवा दाखले दिले ते मी इथे मांडतो. पण टिपू कसा होता हे उमगने कठीण आहे.टिपू चे समर्थन करणार्यानि भरपूर आरोपाचे खंडन करण्याचे प्रयत्न केले.भरपूर ब्रिटिश दस्तावेज खोटे आहेत असे सांगत आहे.तर टिपूला विरोध करणाऱ्या नि सुद्धा आरोपांक्सही राळ उठलेली.त्यात दोन्ही कडूनखुप प्रचार झाला अन लोकांच्या मनात गोंधळ उडाला.
गिरीश कर्नाड यांनी "टिपू जर हिंदू असता तर त्याला आज कर्नाटकात ज्याप्रमाणे शिवाजीस महाराष्ट्रात मान मिळतो तसा मान मिळता" अशी प्रतिक्रिया दिल असे 2015 ला बोलले होते.( सन २०१५)
टिपूच्या समर्थ करणार्यांनी त्यांना शिवाजी महाराज यांच्या रांगेत आणून बसवले ही मोठी चूक आहे.शिवाजी महाराजांच्या विरोधात आता पर्यंत त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार्या चा एक ही पुरावा दस्तावेज ना इंग्रजांकडे लिहला गेला ना मुघल ना आदिलशाही ना कुतुबशाही.
टिपू च्या विरोधातील दस्तावेल किंवा कागदी पुरावे इंग्रजांकडे ढीगभर आहे मराठ्यांच्या कडे काही आहेत, पण त्याबवेळीच मराठे आणि इंग्रज हे टिपू चे शत्रू होत्र म्हणून त्यांनी बदनामी किंवा जनमत विरोधात राहील या भावनेने केले असे टिपू सुलतान चे समर्थक म्हणतात (मग ही बाब शिवाजी महाराजांच्या बाबतीत का लागू होत नाही? हा प्रश्न पडतो).
एक मान्य की टिपू च्या बाबतीत खूप इतिहासकार टोकाची आणि विरुद्ध बाजू घेतात.त्यामुळे मी इथे फक्त दोन्ही पक्षाची बाजू लिहीन.खरे काय खोटे काय कोणालाच नक्की उमजत नाही.
मुळात हा वाद आहे दोन पक्षाच्या समर्थक चा …एक पक्षाने आता पर्यंत धर्मनिरपेक्षततेच्या नावाखाली कित्येक ऐतिहासिक व्यक्तींची कट-कारस्थाने, नरसंहार आणि अत्याचार दडपून ठेवले हे जितकं खरं! तितकंच दुसऱ्या पक्षाने धर्म पुर्नस्थापनेच्या नावाखाली काही ऐतिहासिक व्यक्तींच्या शिरावर नसलेली कट-कारस्थाने, नरसंहार आणि अत्याचार चढवले हे देखील तितकंच खरं आहे.
मुळात टिपू सुलतान वर जे जे आरोप झाले म्हणजे खालील प्रमाणे यानि त्याला उत्तर दिले पण असे.खरे काय न खोटे काय देवाला माहीत.
१. आरोप
१० नोव्हेंबर रोजी टिपूने ७०० मेलकोट अय्यंगार ब्राह्मणांना फाशी दिली होती. १७८४ मध्ये ख्रिश्चन नेत्याने टिपूचा असहिष्णुतेचा उल्लेखही केला आहे. त्याने मंगलोरचे मिलीग्रेस चर्च पाडले. इंग्रजांचे खबरी असल्याच्या संशयावरून टिपूने ६० हून अधिक कॅथलिकांना ताब्यात घेतले होते आणि त्यांना म्हैसूरला चालत जाण्यास भाग पाडले होते .
खंडन
याचे खंडन करताना टिपू चे पाठीराखे म्हणतात की मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आणि इतिहाससंशोधक संजय सोनवणींनी नोंदलेली ही माहिती , सोनवणी लिहितात, ‘‘टिपूने ७०० अय्यंगारांना दिवाळीच्या दिवशी मारले असे मानले जाते. खरे तर इतिहासात कोठेही ही घटनेची नोंद नाही. डॉ. एम.ए.जयश्री व डॉ. एम.ए. नरसिंहन यांनी अलिकडेच एक पेपर प्रसिद्ध करून ज्याला इतिहासात कोठेही स्थान मिळालेले नाही. याबाबत इतिहासात कसलाही पुरावा नाही. हे प्रकरण दडवले गेले असाही आरोप आहे. आपण तरीही घटकाभर हे प्रकरण खरेमानू. टिपूचा जन्म १७५०सालचा, वरील घटना १७६० किंवा १७६१ ची. म्हणजे ही घटना घडली तेव्हा टिपू १०-११ वर्षांचा होता. हे हत्याकांड त्याने कसे केले?
२. आरोप
टिपू सुलतानने तामिळनाडू आणि केरळवर अनेक वेळा हल्ला केला आणि हल्ला करताना पकडलेल्या लोकांचे मोठ्या संख्येने धर्मांतर केले. १९ जानेवारी १७९० मध्ये, बुंदुजझन खान नावाच्या व्यक्तीला एक पत्र लिहिले. त्यात टिपू सुलतान म्हणतो, “तुम्हाला माहित आहे का? मी नुकताच मलबारवर विजय मिळवला आहे आणि जबरदस्तीने चार लाखाहून अधिक हिंदूंना इस्लाममध्ये धर्मांतरित केले आहे?”
१९ व्या शतकात ब्रिटीश अधिकारी लोगॉन याने ‘मालाबार मॅन्युएल’ मध्ये लिहिले आहे की कसा टिपू सुलतानने त्याच्या 30 हजार सैनिकांनिशी कालिकतमध्ये आतंक माजवला आणि १७८८ मध्ये टिपू सुलतानाच्या सैन्याने कूर्गवर आक्रमण करून परिसरातील सर्व गावे जाळून टाकली.
फ्रीडम स्ट्रगल ऑफ केरळ’मध्ये ५ लाख हिंदूंना मुसलमान बनवलयाचा उल्लेख आहे.
लेविस बी बाऊरी ने टिपू सुलतानाच्या हिंदूंवरील क्रौर्याची तुलना मुहम्मद गझनी आणि नादिरशहाच्या क्रौर्याशी केली.
खंडन
याचे खंडन करताना टिपू चे पाठीराखे म्हणतात की या वरील आरोपाची म्हैसूर गॅझेटियर’चा संदर्भ दिला जातो. पण संदर्भ ‘म्हैसूर गॅझेटियर’मध्ये कुठेही आढळत नाहीत. मग हे संदर्भ येतात कुठून ‘कर्नल माईल्स’च्या ‘हिस्ट्री ऑफ म्हैसूर’मधून(written by Meer Hussein Ali Khan, Kirmani. Translated from an original Persian manuscript, in the library of Her Most Gracious Majesty) कर्नल माईल्सचा दावा आहे, त्याने हे संदर्भ महाराणी व्हिक्टोरियाच्या व्यक्तिगत वाचनालयामधल्या प्राचीन फारशी साधनेतून मिळवले महारानी व्हिक्टोरियाच्या कोर्टात जेंव्हा हे आरोप गेला. तेंव्हा ही साधने उपलब्ध च नाहीत असं कळले,
टिपू एवढा धर्माणध होता तर टिपूची राजधानी श्रीरंगपट्टण येथे होती. ल्याच्या राजवाड्याच्या जवळच श्रीरंगनाथस्वामींचे खूप पुरातन देवालय आहे. या दोन्ही वास्तू आजसुद्धा पहायला मिळतात. सैतान टिपूला काफिरांच्या या देवालयाचा विध्वंस करण्याची सैतानी इच्छा का झाली नाही?
3. आरोप
सावरकर टिपूविषयी अनेक आक्षेप घेतात. टिपूची राजवट म्हणजे हिंदू-मुस्लीम महायुद्धातली, हजार वर्षातली शेवटची मुस्लीम राजवट असल्याचा दावा सावरकरांनी केला आहे.‘ सावरकर म्हणतात, ‘कोणत्याही मुस्लीम सुलतानांचे त्याच्या परंपरेनुसार जे पहिले कर्तव्य त्या काळी समजले गेले, त्याप्रमाणे टिपूने ‘सर्व काफरांना मी मुसलमान करून सोडीन’ अशी प्रतिज्ञा प्रकटपणे भरवलेल्या त्याच्या दरबारात केली आणि लगोलग त्याच्या राज्यातील सर्व हिंदूंना मुसलमान होण्याची आज्ञा केली. आपल्या गावोगावच्या मुस्लीम अधिकार्यांना लेखी कळवले की, ‘झाडून सार्या हिंदू पुरुषांना दीक्षा द्या. जे हिंदू स्वेच्छेने मुसलमान न होतील त्यांना बळाने मुसलमान करा, नाहीतर हिंदू पुरुषांना ठार करा आणि पकडून आणलेल्या हिंदू स्त्रियांना बटकी करून मुसलमानांना वाटून घ्या’. पांचजन्य’च्या लेख मध्ये असाच आरोप झालाय.
कर्नाटकमधील मराठ्यांच्या राज्यावर त्याने स्वारी केली. तेथील हिंदू स्त्री-पुरुषांना टिपूच्या अत्याचारी आक्रमणास तोंड देणे अशक्य असल्यामुळे, मुस्लिम सैन्याच्या तावडीत सापडण्या-आधीच, कृष्णा, तुनगभद्रेसारख्या नद्दांतून लहानग्या मुलांसोबत उडया घेउन जीव दिले. काही जण तर आगीत उडया टाकून भस्मसात झाले नि हा आरोप सावरकर यांनी भारतीय इतिहासाची सहा सुवर्णपणे मध्ये केली आहे.युद्धानंतर शत्रूंच्या स्त्रियांचं शोषण केल्याचाही आरोप सावरकर टिपूवर करतात.
खंडन
याचे खंडन करताना टिपू चे पाठीराखे म्हणतात -
1.नरगुंदमध्ये अशी कोणतीही घटना घडली नसताना याला भक्कम पुरावा नाही .
2.सावरकरांच्या या लेखनामुळेच त्यांच्या इतिहास-लेखनाला इतिहासकार ‘जदुनाथ सरकार’ यांनी ‘रोमँटिक इतिहासलेखन’ म्हटले होते. सावरकरांची रोमँटिक हिस्ट्री मनोरंजनापुरती मर्यादित राहिली असती, असा आरोप सरकार यांनी केला होता.ज्या दरबारात सावरकरांनी धर्मांतराचा आदेश देण्यात आल्याचं सांगितलं आहे, त्या पहिल्या दरबारात टिपूनं रयतेसाठी ‘आठ कलमी’ घोषणापत्र प्रसिद्ध केलं होतं. ‘राज्याविषयी आपण कोणती कर्तव्ये पार पाडणार आहोत’, ‘राज्य चालवण्याची आपली ध्येयधोरणं काय आहेत’, या विषयी टिपूनं आपली भूमिका त्यातून मांडली आहे
3. मोहम्मद इलियास नदवी या इतिहासकाराने खंडन करून संगीगलेला प्रसंग ‘‘रात्रीच्या वेळी झालेल्या युद्धात टिपूच्या फौजेनं आपलं रणशौर्य दाखवून दिलं. सैन्याच्या आक्रमक आघाडीपुढे पेशव्यांच्या लष्कराची वाईट अवस्था झाली. त्यांचं सैन्य जीवाच्या आकांतानं पळून गेलं. पेशव्यांच्या लष्करी छावणीतच कित्येक सैनिकांना कैद करण्यात आलं. सकाळी शत्रूंच्या सैनिकी छावणीतील स्त्रिया आणि लहान मुलांना वेगळं करून स्वतंत्र मंडपात ठेवण्यात आलं. काही दिवसांनी टिपू सुलतान यांनी युद्धात हाती आलेल्या स्त्रियांचा सन्मान देऊन कपड्यांचा आहेर केला. लहान मुलांना सोन्याचं कडं भेट दिलं. आपल्या सैनिकी तुकडीच्या संरक्षणात त्यांना स्वगृही पाठवलं. त्या स्त्रियांनी हरिपंत फडके यांस टिपू सुलताननं आपल्याला कशा रीतीनं वागवले याची हकीगत सांगितली.”
(मूळ मुद्दा त्यानंतर सावरकरांनी ‘ पुराव्यांसाठी खरे, पारसनीस, सरदेसाई आणि या इतिहासकारांच्या दाखल घेतलाय, ते इतिहासकार आता नाहीत ,त्याचा काय?.)
4. आरोप
मराठी रियासती’च्या सातव्या खंडात ते म्हणतात. ‘‘१७८४ च्या पावसाळ्यात नानाने महादजीस लिहिले. टिपूची चाल ठीक नाही. उजम (गर्व) भारी आहे. वर्तणूक मनस्वी क्षेत्र चांगले नाही. अलिकडे नूर महंमद खानास (सलतनत इ खुदादचा पुणे दरबारातील वकील) टिपूचे पत्र आले की, एके दिवशी पन्नास हजार हिंदू बायकामुले सुद्धा बाटवून मुसलमान केले, अशी गोष्ट ती म्हणे. पूर्वी पातशहा वजीर मोठमोठे झाले. परंतु जाली नाही ती खुदाचे फज्ले करून झाली. नवाबाच्या लष्करात टिपूचे वकील आहेत. त्यासही त्याने असेच लिहिले. सवंत्सर व महिने यांची नावे सोडून नवी केली. पुढेही गावचे गाव बाटवत चालला आहे. यास्तव हरीपंत त्यावर सुरापूर पावेतो गेले. इतक्यात मुंबईकरांचे पत्र टिपूचा तह झाला म्हणोन आले. त्यावरून मजबूद मनसुबा केल्याखेरीत टिपूचे तालुक्यात उपद्रव करू नये.” असे हरिपंतास नानाने लिहून ठेवले.
खंडन
याचे खंडन करताना टिपू चे पाठीराखे म्हणतात की या पत्राद्वारे महादजीला टिपू सुलतान यांच्याविरोधात भडकवण्याचा व लष्करी सहाय्य मिळवण्याचा नाना फडणवीसाचा हेतू दिसतो . त्यामुळे महादजीच्या धार्मिक पुळका येईल नि महादजी आपल्या मदतीला उभा राहील असे नानाला वाटले असेल. त्यामुळे नानानं अशी अवास्तव माहिती पत्रातून दिली होती.यानइ तो आपल्या वकिलाला पत्र पाठवून ही गोष्ट सांगत आहे याच्यावर विश्वास नाही .
(महादजी नाना फडणवीस च्या शब्दावर विश्वास ठेवून आले असते काय?)
5. टिपूच्या पाठीराखे म्हणतात की टिपू सुलतानने महिलांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार दिला होता.
पण दलित महिलांना कंबरेच्यावर कपडे घालण्याचा अधिकार टिपू सुलतानने नाही तर, ब्रिटिशांमुळे 1859 साली त्रावणकोर संस्थानाकडून मिळाला. टिपू सुलतान हा म्हैसुर साम्राज्याचा राजा होता. त्याचा मृत्यू 1799 सालीच झाला.
ब्रिटिश, मराठे आणि निझाम अशी सर्व मिळून एकूण ५०,००० ची फौज घेऊन हे एकत्रित सैन्य श्रीरंगपट्टणमला वेढा देऊन लढाईला सज्ज झाले. याउलट टिपू सुलतान यांचे सैन्य जवळपास ३०,००० इतकेच होते. पण इंग्रजांना भीती होती ती टिपू च्या रॉकेटची. टिपू सुलतानच्या सैन्याची हि रॉकेट्स साधारण २ किलोमीटर पर्यंत असलेले लक्ष्य सहज भेदू शकेल इतकी सक्षम होती.
टिपू सुलतानाची ही वैश्विक राजकारणाची जाण म्हणजे नेपोलियन बोनपार्टशी केलेले संधान आणि आधुनिकतेची कास म्हणजे रॉकेट चा शोध हे इंग्रजांना नेहमी खटकत असे. ब्रिटिशांना पुणे, हैदराबाद आणि म्हैसूर संपवायचे होते.

शीख संस्थानांनी मराठ्यांना खंडणी (Tribute) अदा केली होती.

 


शीख संस्थानांनी मराठ्यांना खंडणी (Tribute) अदा केली होती.

इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी अहमदशाह अब्दालीच्या अफगाण सैन्याचा पराभव करून संपूर्ण पंजाब जिंकला. जवळपास ७३८ वर्षांनंतर लाहोर पुन्हा हिंदू सत्तेखाली आला.
१९ एप्रिल १७५८ रोजी मराठा सरदार मानाजी पायगुडे यांनी सर्वप्रथम लाहोरमध्ये प्रवेश करून तेथील कारभार आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर पेशव्यांचे बंधू रघुनाथराव यांचे मुक्तिदाता म्हणून स्वागत करण्यात आले. या विजयाच्या आनंदात शालीमार बागेतील कारंज्यांतून गुलाबपाणी वाहण्यात आले, अशी नोंद समकालीन वर्णनांमध्ये आढळते.
तिसऱ्या पानिपतच्या युद्धानंतर दुर्रानींनी काही काळ पंजाबवरील सत्ता पुन्हा मिळवली. मात्र पुढे महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी उत्तर भारतात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि पंजाबातील राजकारणावर प्रभाव निर्माण केला.
शीख साम्राज्याची स्वतंत्र व प्रभावी उभारणी मुख्यतः इ.स. १८०१ मध्ये महाराजा रणजीतसिंह यांच्या राज्याभिषेकानंतर झाली. त्यापूर्वी सतलज नदीच्या दक्षिणेकडील अनेक शीख मिसल व संस्थाने मराठ्यांच्या प्रभावक्षेत्रात होती आणि त्यांपैकी काहींनी मराठ्यांना खंडणी किंवा नजराणा दिल्याचे ऐतिहासिक पुराव्यांत उल्लेख आढळतात. ही व्यवस्था दुसऱ्या इंग्रज–मराठा युद्धापर्यंत विविध प्रमाणात कायम होती.

मुघल साम्राज्याला संपूर्ण मराठा शक्तीशी लढताना अक्षरशः रक्तबंबाळ व्हावे लागले. परंतु ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने वेगळी रणनीती अवलंबली—

 


मुघल साम्राज्याला संपूर्ण मराठा शक्तीशी लढताना अक्षरशः रक्तबंबाळ व्हावे लागले. परंतु ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने वेगळी रणनीती अवलंबली—मराठा महासंघातील अंतर्गत मतभेदांचा फायदा घेत त्यांनी नेतृत्व आणि प्रमुख सरदार यांच्यात फूट पाडली.

या दोन संघर्षांतील फरक हा काळ, युद्धतंत्र आणि मराठा राज्याच्या बदललेल्या रचनेत होता.
१७व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १८व्या शतकाच्या सुरुवातीला मराठे तुलनेने एकसंघ होते. स्वराज्याची संकल्पना आणि समान ध्येय यामुळे ते एकत्र लढत होते. त्यांनी गनिमी कावा, वेगवान घोडदळ आणि पुरवठा मार्गांवर हल्ले करून मुघल सैन्याला सतत त्रास दिला. विशाल मुघल छावण्या आणि लांब पुरवठा मार्ग ही त्यांची मोठी कमजोरी ठरली.
मात्र १८व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिश हे प्रमुख लष्करी प्रतिस्पर्धी बनले, तेव्हा मराठा साम्राज्य एका महासंघात रूपांतरित झाले होते. पेशवे, शिंदे, होळकर, भोसले आणि गायकवाड या प्रमुख घराण्यांमध्ये मतभेद वाढले होते. ब्रिटिशांनी याच परिस्थितीचा कुशलतेने फायदा घेतला. १८०२ च्या वसईच्या तहानंतर त्यांनी प्रत्येक मराठा सत्ताकेंद्राला इतरांपासून वेगळे केले आणि एकेक करून त्यांचा पराभव केला.
ब्रिटिशांची युद्धपद्धतीही मुघलांपेक्षा वेगळी होती. मुघल सैन्य मोठ्या छावण्यांवर आणि जड लष्करावर अवलंबून होते, तर ब्रिटिशांकडे शिस्तबद्ध पायदळ, आधुनिक तोफखाना आणि मजबूत रसद व्यवस्था होती. मराठ्यांनी युरोपीय प्रशिक्षकांच्या मदतीने पायदळ आधुनिक करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांची मुख्य ताकद घोडदळच राहिली. ब्रिटिशांच्या संघटित बंदुकीच्या फैरी आणि तोफखान्यासमोर पारंपरिक घोडदळाला मोठे नुकसान सहन करावे लागले.
१८०३ मधील असईच्या लढाईत (Battle of Assaye) जनरल आर्थर वेलस्ली यांच्या तुलनेने लहान सैन्याने उत्कृष्ट शिस्त, प्रभावी तोफखाना आणि नियोजनबद्ध युद्धतंत्राच्या जोरावर संख्येने मोठ्या मराठा सैन्याचा पराभव केला.
आर्थिक बाबतीतही ब्रिटिशांना मोठा फायदा होता. बंगालसारख्या संपन्न प्रांतावरील नियंत्रणामुळे त्यांच्याकडे प्रचंड महसूल उपलब्ध होता, ज्यामुळे दीर्घकालीन युद्धे लढणे त्यांना शक्य झाले. मराठा राज्याचा महसूल विविध स्रोतांमधून—जमीन महसूल, चौथ, सरदेशमुखी आणि जिंकलेल्या प्रदेशांतील उत्पन्न—येत असला, तरी अंतर्गत संघर्ष आणि प्रशासकीय विस्कळीतपणामुळे त्याचा प्रभावी वापर करण्यात अडचणी निर्माण झाल्या.
थोडक्यात, मुघलांचा पराभव मोठ्या प्रमाणावर एकसंघ मराठा प्रतिकारामुळे झाला; तर ब्रिटिशांनी मराठा महासंघातील अंतर्गत फूट, आधुनिक लष्करी संघटना, आर्थिक सामर्थ्य आणि कुशल मुत्सद्देगिरी यांचा फायदा घेत अखेरीस मराठा सत्तेवर विजय मिळवला.

मराठा स्थापत्यकलेचा विकास : इतिहास, वैशिष्ट्ये आणि योगदान

 


मराठा स्थापत्यकलेचा विकास : इतिहास, वैशिष्ट्ये आणि योगदान

मराठा स्थापत्यकला समजून घेण्यासाठी तिच्या रचना, अलंकरण, बांधकाम तंत्र आणि त्या काळातील राजकीय-सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील यादव साम्राज्यानंतर जवळपास तीन शतकांच्या इस्लामी सत्ताकाळात स्थानिक स्थापत्य परंपरेला मोठा धक्का बसला. अनेक प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त झाली, त्यांची विटंबना झाली किंवा ती काळाच्या ओघात पडझडीत गेली. त्यामुळे १७व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू मंदिरे पुन्हा उभारण्याची वेळ आली, तेव्हा यादवकालीन स्थापत्याची अखंड परंपरा जिवंत स्वरूपात उपलब्ध नव्हती.
दुसरीकडे, मुघल स्थापत्यकला ही दिल्ली सल्तनतीच्या तुर्क-अफगाण स्थापत्यपरंपरेचा पुढील टप्पा होती. बाबर आणि हुमायून यांचा बहुतांश काळ युद्धांमध्ये गेला, त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत स्थापत्यकलेला फारसा वाव मिळाला नाही. शेरशाह सूरीपासून मुघल स्थापत्याचा विकास सुरू झाला आणि अकबर, जहांगीर व शाहजहान यांच्या राजवटीत राजकीय स्थैर्य, विपुल संपत्ती आणि सातत्यपूर्ण परंपरेमुळे त्याने सर्वोच्च शिखर गाठले. औरंगजेबाच्या काळात वाढत्या राजकीय अस्थिरतेमुळे या स्थापत्यकलेची गती मंदावली.
मराठा साम्राज्याचा कालावधी सुमारे दीडशे वर्षांचा होता. या काळात मराठ्यांना पोर्तुगीज, सिद्दी, मुघल, अफगाण आणि ब्रिटिश अशा अनेक शक्तींशी सतत संघर्ष करावा लागला. तरीही त्यांनी भव्य मंदिरे, घाट, किल्ले, नौदल तळ, आरमारी जहाजे आणि राजवाडे उभारले.
स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात मराठ्यांचे संपूर्ण लक्ष युद्धावर केंद्रित होते. त्यामुळे कला आणि स्थापत्यासाठी वेळ व साधने मर्यादित होती. प्रारंभी त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या यादवकालीन मंदिरांचे जीर्णोद्धार व पुनर्बांधणी केली. पुढे स्वराज्य स्थिर झाल्यानंतर राजघराणी, सरदार आणि श्रीमंत घराणी यांनी धार्मिक वास्तू उभारण्यास मोठा आश्रय दिला.
१७व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या आकाशरेषेवर नव्याने उभारलेली किंवा पुनर्बांधलेली मंदिरे, त्यांची शिखरे आणि त्यावरील भगवे ध्वज हे मराठा पुनरुत्थानाचे प्रतीक बनले.
मराठा मंदिर स्थापत्याचे तीन टप्पे
१. प्रारंभिक टप्पा (इ.स. १६२० ते पेशवाईचा उदय):
या काळात प्रामुख्याने मंदिरांचे पुनरुज्जीवन आणि साध्या स्वरूपातील नव्या मंदिरांची उभारणी झाली.
२. मध्य टप्पा:
स्थिर आणि समृद्ध मराठा राज्यामुळे मंदिर स्थापत्य अधिक विकसित झाले. रचना अधिक संतुलित आणि परिपक्व झाली.
३. उत्तर टप्पा:
मराठा साम्राज्याच्या उत्कर्षकाळात उभारलेली मंदिरे अत्यंत भव्य, समृद्ध अलंकरणयुक्त आणि उत्कृष्ट कारागिरीची उदाहरणे ठरली. तासगावचा गणपती मंदिर याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
समृद्ध सरदारवर्गाच्या उदयामुळे स्थापत्यकलेत अधिक भव्यता, नक्षीकाम आणि कलात्मकता आली. मंदिरांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध झाली.
मराठा स्थापत्याने मुघल, राजपूत आणि स्थानिक यादव परंपरेतील काही घटक स्वीकारले; मात्र त्यांचे स्वतंत्र मिश्रण करून स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण शैली विकसित केली. त्यामुळे भारतीय स्थापत्यकलेत मराठ्यांचे स्वतंत्र योगदान निर्माण झाले.
मराठा काळातील प्रमुख मंदिरे
- तासगाव गणपती मंदिर, महाराष्ट्र
- त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, नाशिक
- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, वेरूळ
- बृहदीश्वर मंदिरातील गणेश मंदिर, तामिळनाडू
- वटेश्वर मंदिर, सासवड
- शांतादुर्गा मंदिर, गोवा
- श्री मंगेश मंदिर, गोवा
- खंडोबा मंदिर, जेजुरी
- ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर
- महाकालेश्वर मंदिर, उज्जैन
- काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी
- संगमेश्वर मंदिर, सासवड
- नागेश्वर मंदिर, पुणे
- श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, नीरा नरसिंहपूर
- तुळशीबाग राम मंदिर, पुणे
- शिखर शिंगणापूर मंदिर
- सिद्धेश्वर मंदिर, टोके
- रामेश्वर मंदिर, टोके
- महालक्ष्मी मंदिर, वाई
- अहिल्येश्वर मंदिर, महेश्वर
- चिंचवड मोरया गोसावी मंदिर
- ओंकारेश्वर मंदिर, पुणे
- काशी विश्वेश्वर मंदिर, संगम माहुली
- नारोशंकर मंदिर, नाशिक
- गणपती मंदिर, सांगली
- काळाराम मंदिर, नाशिक
- लक्ष्मी नारायण मंदिर, नागपूर
- अतीबळेश्वर मंदिर, महाबळेश्वर
- भीमाशंकर ज्योतिर्लिंग
- वज्रेश्वरी मंदिर
- कनकेश्वर मंदिर, अलिबाग
- मोहिनीराज मंदिर, नेवासा
- सुंदर नारायण मंदिर
- हरसिद्धी मंदिर, उज्जैन
- खजराना गणेश मंदिर, मध्य प्रदेश
- गोपाल मंदिर, उज्जैन
- राम-जनार्दन मंदिर, उज्जैन
- सप्तकोटेश्वर मंदिर, गोवा
- पर्वती टेकडीवरील मंदिरे, पुणे
- रामटेक किल्ल्यातील मंदिरे
- कांती देऊळ, रतनपूर (छत्तीसगड)
मराठा राजवाडे
युरोपीय प्रभाव असलेले राजवाडे
- लक्ष्मी विलास पॅलेस, बडोदा
- जय विलास पॅलेस, ग्वाल्हेर
- न्यू शाहू पॅलेस, कोल्हापूर
- फलटण राजवाडा
- पटवर्धन पॅलेस, सांगली
- इचलकरंजी पॅलेस
- सावंतवाडी राजवाडे
- लालबाग पॅलेस, इंदूर
- कोठी पॅलेस, उज्जैन
स्थानिक मराठा शैलीतील राजवाडे
- बृजरामा पॅलेस, वाराणसी
- राजवाडा, इंदूर
- राणी महाल, झाशी
- भोर राजवाडा
- सातारा राजवाडा
- विश्रामबाग वाडा, पुणे
- अदालत वाडा, सातारा
- फोर्ट जाधवगड
इतर महत्त्वाची स्मारके
- अहिल्या किल्ला, महेश्वर
- शनिवार वाडा
- महादजी शिंदे छत्री
- होळकर छत्र्या
- शिंदे घराण्याच्या छत्र्या
- मोती महाल, ग्वाल्हेर
- जलविहार, ग्वाल्हेर
- महाराजा गंगाधरराव छत्री, झाशी
- बारा मोटाची विहीर, सातारा
- मेणवली घाट
- भोसले घाट, वाराणसी
- कीर्ती मंदिर, बडोदा
- टाऊन हॉल संग्रहालय, कोल्हापूर
- भवानी मंडप, कोल्हापूर
- सरस्वती महाल ग्रंथालय
- तंजावरचा मराठा दरबार
मराठा किल्ले
- रायगड
- नागरधन किल्ला
- मल्हारगड
- सिंधुदुर्ग
मराठ्यांचे ऐतिहासिक योगदान
१६४० च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत मर्यादित साधनसंपत्तीपासून स्वराज्याची सुरुवात केली. अवघ्या शंभर वर्षांत मराठा सैन्याने अटकपर्यंत भगवा फडकावला आणि पंजाबमध्ये अफगाण सत्तेचा पराभव करून भारतीय राजकीय पुनरुत्थानाला नवे रूप दिले.
औरंगजेबाने मराठ्यांविरुद्ध तब्बल २७ वर्षे युद्ध केले; परंतु शेवटी मराठा राज्य टिकून राहिले, तर औरंगजेब निराशेने मृत्यू पावला. त्याने आपल्या अखेरच्या काळात शिवाजी महाराजांच्या आग्र्यातून सुटकेमुळेच आयुष्यभर युद्धांत अडकून राहिल्याची खंत व्यक्त केली होती.
१८व्या शतकात मराठ्यांच्या उदयामुळे वाराणसीसह अनेक प्राचीन भारतीय शहरांमध्ये मंदिरे, घाट आणि धार्मिक वास्तूंचे मोठ्या प्रमाणावर पुनरुज्जीवन झाले. भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि स्थापत्य वारसा जतन करण्यात मराठ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले.
ब्रिटिश इतिहासकार लॉर्ड मॅकॉले यांनीही मराठ्यांच्या सामर्थ्याचे कौतुक करताना लिहिले की, "औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या विशाल साम्राज्याचा प्रत्येक भाग मराठ्यांच्या नावाने थरथर कापू लागला."
छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय युद्धकलेत मूलभूत बदल घडवून आणले. त्यांची रणनीती, गनिमी कावा आणि प्रशासनाने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नजरकैदेतून आग्रा येथून करून घेतलेली सुटका

 


छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नजरकैदेतून आग्रा येथून करून घेतलेली सुटका ही अफझलखानाच्या प्रसंगानंतर महाराजांवर आलेला दुसरा जीवघेणा प्रसंग असल्यामुळे ही घटना मराठ्यांच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहे. केवळ महाराजांच्या नव्हे तर संबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक व तितकीच महत्त्वाची घटना आहे.

मोगल बादशहाच्या राजधानीतून, त्याच्या नजरकैदेतून आजवर कोणीही सहीसलामत निसटू शकले नव्हते. प्रत्यक्ष औरंगजेबाच्या बापाला शहाजहानलाही ते जमले नव्हते, पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखवले. आणि असे केले की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला.
आग्र्याहून सुटका हे शिवचरित्रातील एक अत्यंत गूढ प्रकरण आहे. शिवजन्मतिथी निर्णयाबाबत अपुऱ्या पुराव्यामुळे अनेक पक्ष निर्माण झाले खरे, परंतु आग्र्याहून सुटकेचे संदर्भात ढीगभर पुरावे उपलब्ध असूनही इतिहासकारांत ठाम मत नाही.
आग्र्याच्या सुटकेवेळी शिवराय पेटा-यात बसून निसटले होते की वेषांतर करून निसटले यासंबंधी इतिहासकारांत अजूनही मतभेद आहेत.अशा या मतभेदांच्या गोंधळात उपलब्ध झाले तितके समकालीन पुरावे ग्राह्य धरत प्रस्तुत घटनेच शक्य तितक्या तपशीलवार वर्णन करण्याचा मानस आहे.
पेटाऱ्यात बसून राजे निघोन गेले यास परकालदासाचे पत्र, जेधे शकावली सभासद बखर, मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना तसेच अन्य काही इंग्रजी साधने दुजोरा देतात, ते खालीलप्रमाणे -
मग एके दिवशी राजे व राजपुत्र एकच पेटाऱ्यात बसले. पुढे मागे पेटारे करून मध्ये पेटीयांत बसून चालिले. ते वेळी आपला साज सर्व उतरुन हिरोजी फरजंद यास घालून, आपले पलंगावरी निजविला. हात मात्र त्याचा उघडा बाहेर दिसू दिला. अन् शेला पांघरून निजविला. आणि एक पोरगा रगडवयास ठेविला. जवळील कारकून होते त्यांस अगोदर दिल्लीपलीकडे तीन कोसांवर एक गाव होता तेथे ठिकाण करून पुढे रवाना केले होते. आणि आपण उभयता पेटाऱ्यात बसून निघोन चालिले.
- सभासद बखर
शके 1558 पराभव संवत्सरे
ज्येष्ठ शुद्ध द्वितीया राजश्री सिवाजी राजे अगरियास पाऊन अवरंगजबची भेटी घेतली बिघाड होऊन राजश्रीस चौकिया दिल्या. श्रावण वद्य द्वादसी अगरीयातून पेटारियांत बैसोन पळाले यावरी राजश्री संभाजी राजे सहवर्तमान मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस राजगडास आले.
- जेधे शकावली
तेंठा याछे मनसुबो कर और या लहरी छे भागवा की, यो वेंकी पट्यरा की आमगरफ्त भी सो पट्यारा में बैठ निकल्यो.
(मग शेवटी विचारविनिमय करून असा निष्कर्ष निघाला की पेटाऱ्यांची ये-जा होती त्यामुळे तो पेटाऱ्यात बसून निघाला असावा.)
- परकालदासचे 3 सप्टेंबर, 1666 चे राजस्थानी पत्र
देवाचा प्रसाद म्हणून शिवाजी दर गुरुवारी मिठाईचे मोठे मोठे पेटारे बाहेर वाटण्यासाठी म्हणून पाठवू लागला. हे पेटारे इतके मोठे असत की एकेक वाहून नेण्यासाठी काही माणसे लागत. मिठाई वाटण्याच्या वेळी शिवाजीच्या निवासस्थानाच्या दरवाजाबाहेर खूप गर्दी जमू लागली. पोलादखानाच्या माणसांबरोबर शिवाजीने अशी काही वागणूक ठेवली की ते लोक त्याच्या भजनी लागले. आणि एक दिवशी शिवाजीने एका माणसाला आपल्या पलंगावर झोपविले. मिठाईचे दोन पेटारे रिकामी केली आणि त्यात बसून तो आणि त्याचा मुलगा हे बाहेर पडले. त्यांनी तडक मथुरेची वाट धरली.
- मोगलांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना याच्या 'तारीखे दिलकुशा' या फारसी चरित्रातील उल्लेख
त्याचप्रमाणे ग्रँड डफ ने आपल्या मराठ्यांच्या बखरीत जेथे समकालीन ग्रंथांचा व कागदपत्राचा आधार दिला आहे, त्या मुद्या पुरते त्याचे लिहिणे ग्राह्य धरलेच पाहिजे.
मग एके दिवशी आपला पुत्र व आपण असे दोघे दोहो पेटाऱ्यात निजून माणसांकडून ते पेटारे शहराबाहेर एकीकडे आपले संकेतस्थळी नेवविले आणि तेथे बाहेर निघून दोघे एका घोड्यावर बसून पळाले. ते दुसऱ्या दिवशी मथुरेस जाऊन पोहोचले.
- ग्रँड डफ (मराठ्यांची बखर)
तसेच सुरतकर इंग्रजांचे दिनांक 25 सप्टेंबर 1666 रोजी कंपनीस गेलेल्या पत्रात शिवाजी संभाजी पेटाऱ्यात बसून निसटल्याचा उल्लेख आहे.
शिवाजी महाराज वेषांतर करून सुटले यास दुजोरा देणारे साधने -
औरंगजेबाच्या देखरेखीखाली लिहून पूर्ण झालेल्या मोहम्मद काजम या लेखकाच्या 'आलमगीर नामा' या ग्रंथात पेटाऱ्याचा उल्लेख येत नाही तर महाराज वेषांतर करून निघून गेले असा उल्लेख आढळतो.
तसेच कवी भूषणचे उदाहरण पाहण्यासारखे आहे -
कांधे धरि कांवर चल्योदी जबचाव सेती एकलिये
जात एक जात चले देवा की
भेषको उतारी डारी डंवर निवारी
दाऱ्यो धऱ्यौ भेष ओर
जब चल्यो साथ मेवा की
पौन हो की पंछी हो कि गुटका कि
गौन होकी देखो
कौन भांती गयो करामत सेवा की |
( वेश बदलून खांद्यावर कावड ठेवून महाराज मिठाईच्या पेटा-याबरोबर निघून गेले. महाराज काय तोंडात जादूची गोळी धरून गेले की पक्षी बनून गेले याचा पहारेकर्यांना पत्ताही लागला नाही.)
याचबरोबर सुप्रसिद्ध इतिहासकार सेतूमाधवराव पगडी यांनापण महाराज 'पेटाऱ्यात बसून गेले' हे मान्य नाही.त्यांच्या मते महाराजांनी सुटकेसाठी ॅॅॅॅॅॅॅ पेटार्यांची जरूर उपाययोजना केली असेल परंतु त्यांच्यासारखा मानी पुरुष असहाय बनून पेटाऱ्यात बसला असेल असे वाटत नाही. पेटारे वाहणाऱ्या नोकराचा वेष घेऊन ते बाहेर पडले असावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
पण शिवाजी महाराज फळांच्या/ मेव्याच्या मोठ्या पेटाऱ्यात बसून निसटले ही घटना कशी पसरली? यासंदर्भात माहिती देताना पगडी म्हणतात, चौकी, पाहाऱ्यावरचे लोक आणि त्यांचे अधिकारी यांना जाब- झडतीपासून वाचवावे यासाठी अशी कथा प्रचलित झालेली असावी.
ज्या राजस्थानी पत्रातून महाराज पेटार्यात बसून निसटले अशी माहिती मिळते. ते पत्र अग्राह्य ठरवताना ते म्हणतात,ही घटना घडल्यानंतर पुऱ्या २० दिवसांनी हे पत्र लिहिले आहे. शिवाजी महाराज कसे निसटून गेले यावर परस्पर विचारविनिमय करून ठरवलेला हा एक तर्क आहे.
तसेच ज्या आलमगीरनाम्यात महाराज वेषांतर करून निसटले असे वर्णन आहे त्यास दुजोरा देताना ते म्हणतात, कोणत्याही प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय हे प्रकरण अर्धवट सोडून देनाऱ्यापैकी औरंगजेब नव्हता.त्याचे सरकारी चरित्र आलमगीरनामा यात स्पष्ट म्हटले आहे की, शिवाजी हा वेषांतर करून निघून गेला. (तगय्युरे वजे दादे)
परंतु केवळ एवढ्यावरून पेटाऱ्यांची घटना मोडीत निघत नाही. कारण एकाच वेळी इंग्रजी, राजस्थानी, मराठी साधनांत पेटाऱ्यांचा उल्लेख येणे हा काही योगायोग वा पूर्वनियोजित प्रकार नाही.
वरील विविध नोंदी पाहता छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या मगरमिठीतून कसे निसटले, यापेक्षा एवढा प्रचंड पहारा असताना सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून महाराज कैदेतून अलगद बाहेर पडले हे महत्त्वाचे आहे.

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...