विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 19 June 2022

इंदुरीचा किल्ला(गढी)

 

इंदुरीचा किल्ला(गढी)
"येसपाटील बिन बाज पाटील हे दाभाडे घराण्याचे मुळपुरुष होय.
मौजे तळेगांव,तालुके-चाकण,सरकार-जुन्नर,सुभे-औरंगाबाद
येसाजी पाटील हे शिवरायांच्या पदरी सरकारात होते.त्यांनी निष्ठेने स्वराज्याची सेवा केली.पुढे महाराज कैलासवाशी झाल्याच्या नंतर पुढे संभाजीराजे गादीवर आले.त्यावेळी #येसाजी_पाटील_दाभाडे व त्यांचे पुत्र #खंडोजी#शिवाजी दाभाडे हे करत होते.संभाजी राजेंच्या मृत्युच्या अगोदर संभाजीराजेंनी #येसाजीराव_दाभाडे यांना #राजाराम महाराजांच्या तैनातीस दिले होते.संभाजीराजेंच्या मृत्युनंतर जेव्हा #इतिकादखानाचा रायगडास वेढा पडला तेव्हा येसाजीराव पाटील दाभाडे हे राजाराम महाराजांच्या सोबत रायगडावर होते व त्यांच्याबरोबरच ते जिंजीला कर्नाटक प्रांतात गेले.
यावेळी जिंजी मुक्कामी राजाराम महाराजांना पुत्ररत्न प्राप्त झाले.त्यावेळी राजाराम महाराजांनी येसाजी पाटील दाभाडे यांना '#इंदुरी' हे गाव वतन म्हणून करुन दिले.
त्याचे उल्लेख पुढिल प्रमाणे-
"राजशक २३ धातृनामसंवत्सरे सु।। सबांतिसैन आल्लफचे सालीं श्री.महाराज यांणी पुत्रोत्साह जहाला जाणोन कृपा करुन व यांची सेवा पाहून मौजे तळेगाव नजीक इंदुरी तालुके चाकण सरकार जुन्नर गांव दरोबस्त वंशपरंपरेने इनाम करुन दिल्हा.व मौजे ऊरसें तालुके पवनमावळ त्यांचे पत्नीस(दिला) व मौजे धामणें,प्रांत पुणे दरोबस्त पित्रपौत्रादी वंशपरंपरेने इनाम करुन दिलें."
-दाभाडे घराण्याची कैफियत
______#येसाजी_दाभाडे म्हणजे साधारण आसामी नव्हती.एक मोठे प्रस्थ होते व अगदी शिवाजी महाराजांपासून ते मराठेशाहीच्या अखेरीपर्यंत दाभाडे घराण्याचा त्याग व पराक्रम आफाट आहे.
एकदा चंदीला(जिंजी)ला मुघलांचा वेढा पडला होता व राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात होते.त्यावेळी येसाजी पाटील दाभाडेंना राजाराम महाराजांच्या कबिल्याच्या संरक्षणासाठी ठेवून येसाजीरावांचे पुत्र खंडोजी दाभाडे व शिवाजी दाभाडे दोघेही राजाराम महाराजांना घेऊन निघाले.गवतासाठी काही पोर जात होती त्यातच रुप पालटून राजाराम महाराजांना घेऊन तेथून निसटले.मागे येसाजीरावांनी राजाराम महाराजांच्या कबिल्यास घेऊन त्यांचाही वेश बदलून त्यांनाही किल्ल्याबाहेर काढले.राजाराम महाराजांना घेऊन २५ कोस लांब आले.(दाभाडे घराण्याच्या कैफियतीमध्ये राजाराम महाराजांना पाठीशी बांधून दौड घेतली असा उल्लेख आहे.)दुसर्या दिवशी येसाजी दाभाडेंचे कनिष्ठ बंधू शिवाजी दाभाडे यांचे काळीज फुटून रक्ताची गुळणी आली.तेव्हा राजाराम महाराज व खंडोजी उभे राहिले तेव्हा शिवाजीराव दाभाडे बोलले की,
"महाराज आपण जावे मी काही वाचत नाहीं,आपण येथे राहिले असतां मोगलांची दौड येऊ धरिले जाल.राज्य बुडेल."
इतके बोलताच रक्ताची पुन्हा गुळणी आली आणि शिवाजीराव दाभाडे गतप्राण झाले.तेथेच राजाराम महाराज व खंडेराव दाभाडेंनी ओढ्याची नळी पाहून त्यांत घालून वरुन माती लोटली.अर्थात हे मी नाही सांगत आहे.हि दाभाडे घराण्याची कैफियत सांगते आहे.
_______स्वराज्य रक्षिणार्या नरविरांचा असाही करुण अंत आहे त्यांच्या त्यागाच्या सिमा आज आपण नाही करुन शकत.पुढे येसाजी दाभाडे पन्हाळ्यावर मृत्यू पावले.मृत्यू पच्छात राजापाम महाराजांनी त्यांची सेवा पाहून काही वतने व सरपाटिलकी त्यांच्या कुटुंबास दिली.
"राजशक २५ बहुधान्यनाम संवत्सरे आश्विन शुद्ध ११स प्रांत जुन्नर व हरिचंद्र व प्रांत पुणे व परगणें आकोलें व पपगणे जावलीं तील या महालांची सरपाटिलकी,दरशेकडा रुपये दोन व भेट व बकरे एक वगैरे इनाम पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने करुन दिल्हे.खंडोजी बिन येसाजी दाभाडे यांस प्रांत बिडदेश कुळकर्णाेचे वतन दर सद्दे रुपये २ येकूण सद्दे रुपये ६ सहा प्रमाणे करुन दिल्हे.त्याजवर हिंदू होऊन खलेल करील त्यास श्री काशीस गोहत्येचे पातक असे,व मुसलमान होऊन खलेल करील त्यास त्यास त्याचे मजहबची शफत असे.याप्रमाणे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने चालावे असे करुन दिल्हे.व खंडेराव दाभाडे यास सेनाखासखेलीचें पद दिल्हे.वस्त्रे,शिरपेंच,हत्ती,घोडा व निशाण जरीपटका व चौघडा दिल्हा.व हुजरात तैनातीस देऊन सेवा घेत होते..........."
________पुढे शाहू महाराज मोंगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर दाभाडे घराण्याची मराठेशाहीच्या इतिहासात महत्वाची भुमिका राहिलेली आहे.खंडेराव दाभाडेंचा पराक्रम हा सर्वश्रुत आहेच.
पुढे हे वतन बरेच दिवस हे इंदुरीचे वतन वहिवाटीस दाभाडे घराण्याकडे नव्हते.जिंजिला वेढा पडला त्या काळात या सनदा गहाळ झाल्या होत्या त्या शाहू महाराजांनी पुन्हा पुर्ववत करुन दिल्या व सरसेनापदाची वस्त्रे व दिली.
त्याच प्रमाणे
"चाकण देहे ६३ व परगणें पारनेर देहे १०४ यांची सरदेशमुखी दर सद्दे दोहोत्रा व फडफर्मास....."
आदी वतनांच्या सनदाही दिल्या.
पुढे गुजरातची मोहिम वगैरे बर्याच घटना सदर कैफियतीमध्ये नमूद केलेल्या आहेत.अगदी इंग्रजी राजवटीपर्यंत.हि कैफियत नक्की कुणी लिहीली याबाबत माहीती उपलब्ध नाही.मात्र कैफियतीतील उल्लेख व बारकावे पाहता दाभाडे घराण्यातीलच अत्यंत माहितगार माणसाने सगर कैफियत लिहीली असावी.हि कैफियत 'हकीकत दाभाडे सेनापती' या नावाने आहे.हि कैफियत इतिहास संग्रहकर्त्यांनी इ.स.१८८७ मध्ये प्रसिद्ध केली.
अर्थात वरील सर्व लिखाण हे या कैफियतीच्या आधारेच मी केले आहे.इंटरनेटवर हिच माहीती अनुवादीतही आहे मी फक्त कैफियतीतील मुळ उल्लेख दिले आहेत.
_______इंदुरीचा भुईकोट किंवा गढी हि दाभाडे घराण्याच्याच वतनातील आहे.प्रशस्त महादरवाजा त्यावरील शरभशिल्पे हे सर्व आपल्याला गढीच्या वैभवाचे दर्शन आपल्याला घडवते.परंतु,सध्याची तटबंधी,बुरुजांवर वाढलेली झाडी यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.नाहीतर वाफगावच्या होळकरांच्या गढीसारखी याही गढीची तटबंधी कोसळेल व आपण एका पराक्रमी घराण्याच्या खाणाखुणांना पारखे होऊ...!
आपल्या ग्रुप चे #YouTube चॅनेल नक्की #SUBSCRIB करून #YOUTUBE च्या परिवारामध्ये सहभागी व्हा👇👇
धन्यवाद..!

Wednesday 15 June 2022

दारा शिकोह

 

वारसायुद्धात औरंगजेबाने केलेले दारा शुकोहचे हाल आणि हत्येचे ऐतिहासिक पुराव्यांतील वर्णन -
शाहजहान बादशहासमोर जेव्हा त्याच्या मुलाचं डोकं कापून ठेवलं गेलं...
रेहान फजल
बीबीसी प्रतिनिधी
22 जानेवारी 2021
=================================
या तख़्त या ताबूत' म्हणजे सिंहासन किंवा थडगं, ही फार्सी म्हण मुघल राजघराण्यांच्या संदर्भात वेळोवेळी वापरली जाते.
मुघलकालीन इतिहासाची पानं चाळताना आपल्याला दिसतं की, शाहजहान बादशहाने ख़ुस्रो व शहरयार या स्वतःच्या दोन भावांना मारून टाकण्याचे आदेश दिले होतेच, शिवाय 1628 साली सत्तेवर आल्यानंतर त्याने त्याच्या दोन पुतण्यांचा व चुलतभावांचाही काटा काढला.
शाहजहान बादशहाचेचे वडील जहांगीर यांनी त्यांचा छोटा भाऊ दान्यालाचं जीवन संपवलं होतं.
ही परंपरा शाहजहान बादशहानंतरही सुरू राहिली. त्यांचा मुलगा औरंगजेब याने स्वतःचा मोठा भाऊ दारा शिकोह याचं मुंडकं छाटून भारतातील सिंहासन काबीज केलं.
शाहजहान बादशहाचा सर्वांत लाडका व सर्वांत मोठा मुलगा असलेला








दारा शिकोह नक्की कसा होता?
'दारा शिकोह, द मॅन हू वूड बी किंग' या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक अविक चंदा यांना मी हाच प्रश्न विचारला.
त्यावर अविक म्हणाले, "दारा शिकोहचं व्यक्तिमत्व बहुआयामी आणि गुंतागुंतीचं होतं. एकीकडे तो अतिशय स्नेहशील, विचारवंत, प्रतिभावान कवी, अभ्यासक, उच्च दर्जाचा धर्मपंडित, सूफी पंथाबाबत व ललित कलांबाबत ज्ञान असलेला शहज़ादा होता, तर दुसऱ्या बाजूला प्रशासन आणि सैनिकी बाबींमध्ये त्याला काहीच रुची नव्हती. तो दुबळ्या स्वभावाचा होता; लोकांबाबतची त्याची समजूतही मर्यादित होती."
शाहजहानने दारा शिकोहला सैनिकी मोहिमांपासून दूर ठेवलं
शाहजहानचं दारावर इतकं प्रेम होतं की, तो आपल्या या मुलाला सैनिकी मोहिमांवर पाठवायला कायमच कचरायचा. दारा सतत आपल्या समोर दरबारात राहील, असा शाहजहानचा प्रयत्न असे.
अवीक चंदा म्हणतात, "जेमतेम सोळा वर्षं वय असलेल्या औरंगजेबाला सैनिकी मोहिमांवर पाठवण्यात शाहजहान यांना काहीच अडचण वाटत नसे. औरंगजेब दक्षिणेतील एका मोठ्या सैनिकी मोहिमेचं नेतृत्व करत होता. तसंच मुराद बख़्श याला गुजरातेत पाठवण्यात आलं आणि शाहशुजाला बंगालकडे पाठवण्यात आलं. पण शाहजहान यांनी आपला सर्वांत लाडका मुलगा दारा याला दरबारातच ठेवलं. तो आपल्या नजरेआड होऊ नये, अशी तजवीज शाहजहानने केली होती. याचा परिणाम असा झाला की, दारा शिकोहला युद्धाचाही अनुभव मिळाला नाही आणि राजकीय कारभाराचाही अनुभव मिळाला नाही. शाहजहान दारा शिकोहला स्वतःचा उत्तराधिकारी बनवण्यासाठी एका पायावर तयार होता. किंबहुना त्यासाठी त्याने दरबारामध्ये खास योजनाही आखली होती. दारा शिकोहला त्याने सिंहासनाजवळ बसवलं आणि 'शाह बुलंद इक़बाल' अशी उपाधी दिली. आपल्यानंतर तोच गादीवर बसेल, अशी घोषणा त्याने केली."
शहज़ादा म्हणून दारा शिकोहला शाही तिजोरीतून दोन लाख रूपये दिले गेले. त्याला रोज एक हजार रुपये इतका दैनंदिन भत्ता दिला जात असे.
हत्तींच्या लढतीमध्ये औरंगजेबाने दाखवलेलं शौर्य
28 मे 1633 रोजी एक अतिशय नाट्यमय घटना घडली. तिचा परिणाम पुढे अनेक वर्षांनी दिसून आला.
शाहजहानला हत्तींची लढत बघायचा नाद होता. सुधाकर आणि सुरत-सुंदर यांच्यातील लढत बघायला तो सज्जातून खाली आला होता.
लढतीदरम्यान सुरत-सुंदर हा हत्ती मैदान सोडून पळायला लागला, तेव्हा सुधाकर चिडून त्याच्या पाठीमागे धावायला लागला. हा सगळा गदारोळ बघणारे लोक इतस्ततः धावायला लागले.
हत्तीने औरंगजेबावर हल्ला केला. तेव्हा घोड्यावर स्वार असलेल्या 14 वर्षीय औरंगजेबाने स्वतःच्या घोड्याला पळण्यापासून थोपवलं, आणि हत्ती त्यांच्या जवळ आल्यानंतर भाल्याने त्याच्या माथ्यावर जोरदार वार केला.
दरम्यान काही सैनिक धावत तिथे पोचले आणि त्याने शाहजहानच्या चारही बाजूने कडं केलं. हत्तीला घाबरवण्यासाठी फटाके वाजवण्यात आले, पण हत्तीने सोंडेने औरंगजेबाच्या घोड्याला खाली पाडलं.
घोडा कोसळायच्या आधीच औरंगजेबाने त्याच्यावरून खाली उडी मारून हत्तीशी लढण्यासाठी स्वतःची तलवार बाहेर काढली होती. त्याच वेळी शहज़ादा शुज़ाने मागून येऊन हत्तीवर वार केला.
हत्तीने त्याच्या घोड्यावर इतक्या जोरात डोकं आदळलं की शुज़ासुद्धा घोड्यावरून खाली पडला. त्याच वेळी तिथे उपस्थित राजा जसवंत सिंह आणि इतर काही शाही सैनिक आपापल्या घोड्यांवरून घटनास्थळी पोचले. चारही बाजूंनी आरडाओरड सुरू झाल्यावर सुधाकर तिथून पळून गेला. त्यानंतर औरंगजेबाला बादशहासमोर आणण्यात आलं तेव्हा त्याने या मुलाला आलिंगन दिलं.
अवीक चंदा सांगतात त्यानुसार, या घटनेनंतर समारंभपूर्वक औरंगजेबाला 'बहादूर' अशी उपाधी बहाल करण्यात आली. त्याची सुवर्णतुला करून ते सोनं त्यालाच भेट देण्यात आलं. या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान दारा शिकोह तिथेच उभा होता, पण त्याने हत्ती काबूत आणण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. कालांतराने हिंदुस्थानची गादी कोण सांभाळणार आहे, याचा हा एक प्रारंभिक संकेतच होता. "दारा थोड्या वेळाने घटनास्थळी पोचला. इच्छा असूनही तत्काळ तिथे पोचणं त्याला शक्य नव्हतं. जाणीवपूर्वक तो मागेच राहिला, त्यामुळे औरंगजेबाला कौतुक कमवायची संधी मिळाली असं म्हणणं गैर होईल," असं इतिहासकार राना सफ़वी म्हणतात.
मुघल इतिहासातील सर्वांत महागडा विवाहसोहळा
नादिरा बानो आणि दारा शिकोह यांच्यातील विवाह मुघल इतिहासातील सर्वांत महागडा विवाहसोहळा असल्याचं म्हटलं जातं.
त्याच वेळी इंग्लंडहून भारतात फिरस्तीसाठी आलेल्या पीटर मँडीने नमूद केल्यानुसार, या विवाहासाठी त्या काळात 32 लाख रुपये खर्च झाले होते, त्यातील 16 लाख रुपये दाराची मोठी बहीण जहाँआरा बेगमने दिले होते.
अवीक चंदा म्हणतात, "बादशाह आणि मोठी बहीण जहाँआरा या दोघांचंही दारावर सर्वाधिक प्रेम होतं. त्या वेळी त्यांची आई मुमताज़ महलचं निधन झालेलं होतं आणि जहाँआरा बेगम बादशाह बेगम झालेली होती. पत्नीच्या निधनानंतर पहिल्यांदाच शाहजहान एखाद्या सार्वजनिक समारंभात सहभागी होणार होता. हे लग्न 1 फेब्रुवारी 1633 रोजी झालं आणि 8 फेब्रुवारीपर्यंत पंगती उठत राहिल्या. याच दरम्यान रात्री इतके फटाके उडवण्यात आले आणि इतकी रोषणाई करण्यात आली की रात्रीच उजाडल्यासारखा भास व्हायला लागला होता. लग्नाच्या दिवशी वधून घातलेल्या जोड्यांचीच किंमत आठ लाख रुपये होती, असंही सांगितलं जातं."
दाराने कंदाहारवर चढाई केली
दारा शिकोहची सार्वजनिक प्रतिमा दुर्बल योद्धा आणि अकार्यक्षम प्रशासक अशी होती. पण तो कधीच युद्धात सहभागी झाला नाही, असं नाही.
कंदाहार मोहिमेवर तो स्वतःच्या इच्छेने लढायला गेला होता, पण तिथे त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.
अवीक चंदा म्हणतात, "औरंगजेब कंदाहारहून अपयशी होऊन परतला, तेव्हा दारा शिकोहने स्वतःहून तिथल्या मोहिमेचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली. शाहजहानने त्यावरही सहमती दर्शवली. लाहोरला गेल्यानंतर दाराने 70 हजार लोकांचं एक दल तयार केलं, त्यात 110 मुस्लीम आणि 58 राजपूत सेनापती होते.
या फौजेत 230 हत्ती, 6000 जमीन खोदणारे, 500 भिश्ती आणि मोठ्या संख्येने तांत्रिक, जादूगार नि वेगवेगळ्या प्रकारचे मौलाना व साधू यांचा समावेश होता. दाराने सेनापत्तींचा सल्ला घेण्याऐवजी या तांत्रिकांचा व ज्योतिषींचा सल्ला घेऊन हल्ल्याचा दिवस निश्चित केला. या लोकांवर त्यांनी बराच पैसाही खर्च केला.
दुसरीकडे फार्सी सैनिकांनी बचावाची सक्षम योजना आखलेली होती. त्यामुळे कित्येक दिवस वेढा टाकूनही दाराच्या पदरी अपयशच पडलं, आणि रिकाम्या हातांनी त्याला दिल्लीकडे माघारी यावं लागलं."
औरंगजेबाकडून पराभव
शाहजहान आजारी पडल्यानंतर त्यांच्या पश्चात गादीवर कोण बसणार, यावरून झालेल्या लढाईमध्ये औरंगजेबाने दारा शिकोहचा पराभव केला.
पाकिस्तानातील नाटककार शाहिद नदीम यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबाने दाराला हरवलं तेव्हाच भारत व पाकिस्तान यांच्या फाळणीचं बी रोवलं गेलं. या लढाईमध्ये औरंगजेब एका मोठ्या हत्तीवर स्वार होता. त्याच्या पाठी धनुष्यबाण घेतलेले 15,000 घोडेस्वार होते.
औरंगजेबाच्या उजव्या बाजूला त्याचा मुलगा सुलतान मोहम्मद आणि सावत्रभाऊ मीर बाबा होता. सुलतान मोहम्मदच्या शेजारी नजाबत खाँ यांची तुकडी होती. या व्यतिरिक्त आणखी 15,000 सैनिक मुराद बख्शच्या नेतृत्वाखाली होते. मुरादसुद्धा हत्तीवर बसलेला होता. त्याच्या अगदी पाठीच त्याचा छोटा मुलगा बसलेला होता.
अवीक चंदा म्हणतात, "सुरुवातीला दोन्ही फौजांमध्ये तुल्यबळ लढाई जुंपली, किंबहुना दारा थोडा वरचढ होता. पण तेवढ्यात औरंगजेबाने स्वतःच्या नेतृत्वक्षमतेची चुणूक दाखवली. त्याने त्याच्या हत्तीचे चारही पाय साखळ्यांनी बांधून घेतले, जेणेकरून हत्ती मागेही जाणार नाही आणि पुढेही जाणार नाही. मग तो ओरडून म्हणाला, 'मरदानी, दिलावराँ-ए-बहादुर! वक्त अस्त!' म्हणजे 'शूरवीरांनो, आपली ताकद दाखवायची हीच वेळ आहे'. हात वर करून त्याने मोठ्या आवाजात 'या खुदा! या खुदा! माझी तुझ्यावर श्रद्धा आहे! हरण्यापेक्षा मेलो तरी बेहत्तर."
हत्तीपासून दूर होणं महागात पडलं...
अवीक चंदा पुढे सांगतात, "तेव्हाच खलीलउल्लाह खाँने दाराला सांगितलं की, 'आपण आता जिंकत आलेले आहेत. पण तुम्ही उंच हत्तीवर का बसलायंत? स्वतःचा जीव धोक्यात का घालताय?
एखादा बाण किंवा गोळी हौद्यातून पलीकडे जाऊन तुम्हाला लागली, तर त्यानंतर काय होईल याची कल्पना तुम्ही करू शकता. ख़ुदासाठी तुम्ही हत्तीवरून खाली उतरा आणि घोड्यावर स्वार होऊन लढा.' दाराने हा सल्ला मान्य केला. हत्तीवर दारा बसलेला हौदा आता रिकामा झाल्याचं बाकीच्या सैनिकांनी पाहिलं, तेव्हा त्यातून अफवांचं पेव फुटलं.
हौदा रिकामा होता आणि दारा कुठे दिसत नव्हता. म्हणजे दाराला शत्रूने पकडलं असेल किंवा लढाईत त्याचा मृत्यू झाला की काय, असं सैनिकांना वाटू लागलं. त्यामुळे सैनिकी एवढे घाबरले की ते माघारी फिरायला लागले, आणि थोड्याच वेळात औरंगजेबाच्या सैनिकांनी दाराच्या फौजेचा धुव्वा उडवला."
या लढाईचं अतिशय सूक्ष्म वर्णन इटालियन इतिहासकार निकोलाओ मनुची यांनी 'स्तोरिया दो मोगोर' या त्यांच्या पुस्तकात केलं आहे.
मनुची लिहितात, "दाराच्या फौजेत व्यावसायिक सैनिक नव्हते. त्यातले बरेच लोक न्हावी, खाटीक किंवा सर्वसाधारण मजूर होते. दाराने धुळीच्या लोटांमधून स्वतःचा घोडा पुढे दामटला. आपलं साहस दिसावं यासाठी त्याने नगारे वाजवणं सुरूच ठेवायचा आदेश दिला. शत्रू अजूनही थोडा दूर असल्याचं त्याने पाहिलं. तिकडून काही हल्ला होत नव्हता आणि गोळ्याही मारल्या जात नव्हत्या. म्हणून दारा त्याच्या सैनिकांसह पुढेच जात राहिला.
ते औरंगजेबाच्या सैनिकांच्या टप्प्यात आल्यावर तत्काळ त्यांच्यावर तोफांचा, बंदुकांचा आणि उंटांच्या पाठीवर लावलेल्या फिरत्या बंदुकांचा मारा सुरू झाला. या अचानक सुरू झालेल्या आक्रमक हल्ल्याला तोंड देण्यासाठी दारा व त्यांचे सैनिक तयार नव्हते."
मनुची पुढे लिहितात, "हळूहळू औरंगजेबाच्या सैन्याचे गोळे दाराच्या सैनिकांची मुंडकी नि धड उडवायला लागले, तेव्हा दाराने आपल्याही तोफा पुढे काढायचा आदेश दिला. पण पुढे कूच करण्याच्या नादात आपल्या सैनिकांनी तोफा मागेच ठेवून दिल्याचं त्याला सांगण्यात आलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली."
लपतछपत चोरासारखा आग्र्याच्या किल्ल्यात पोचला
या लढाईतील दाराच्या पराभवाचं तपशीलवार वर्णन विख्यात इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी औरंगजेबाच्या चरित्रात केलं आहे.
सरकार लिहितात, "घोड्यावरून चार ते पाच मैल धावून झाल्यानंतर दारा शिकोह आराम करण्यासाठी एका झाडाखाली बसला. औरंगजेबाचे सैनिक त्याचा पाठलाग करत नव्हते, पण दारा शिकोह मागे वळून पाहायचा तेव्हा प्रत्येक वेळी त्याला औरंगजेबाच्या सैनिकांच्या ढोलांचा आवाज ऐकू येत होता.
डोक्यावरचं कवच काढून ठेवायचा प्रयत्न त्याने केला, कवचामुळे त्याच्या डोक्याची सालपटं निघत होती. पण तो इतका थकून गेला होता की त्याला स्वतःचे हात डोक्यापर्यंतही घेऊन जाता येत नव्हते."
सरकार पुढे लिहितात, "शेवटी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान दारा काही घोडेस्वारांसह लपतछपत चोरासारखा आग्र्यातील किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोचला. त्यांचे घोडे पूर्णतः थकून गेले होते आणि सैनिकांच्या हातात मशाली नव्हत्या. सगळ्या शहरात स्मशानशांतता पसरलेली होती. मूकपणे दारा घोड्यावरून खाली उतरला आणि आपल्या घरात जाऊन त्याने दार बंद करून घेतलं. दारा शिकोह मुघल बादशाहीची लढाई हरला होता."
मलिक जीवनच्या कपटाने दारा शिकोह पकडला गेला
आग्र्याहून पळून गेल्यानंतर दारा आधी दिल्लीला गेला, तिथून तो पंजाबला आणि मग अफगाणिस्तानात गेला. तिथे मलिक जीवनने कपट करून त्याला पकडलं आणि औरंगजेबाच्या सैन्यातील सरदारांच्या हवाली केलं. मग त्याला दिल्लीला आणण्यात आलं आणि अतिशय मानहानीकारकरित्या दिल्लीच्या रस्त्यांवरून त्याची धिंड काढली गेली.
अवीक चंदा सांगतात, "रोमन सेनाधिकारी ज्यांचा पराभव करत त्यांना घेऊन येत आणि सर्वांसमोर त्यांची धिंड काढत, तसंच औरंगजेबाने दारा शिकोहला वागवलं. आग्रा व दिल्लीतील जनतेमध्ये दारा शिकोहची लोकप्रियता बरीच मोठी होती. त्यामुळे त्यांच्या समोर दाराला अपमानित करून औरंगजेब दाखवून देऊ पाहत होता की, केवळ लोकांचं प्रेम मिळाल्याने काही कोणी भारताचा बादशाह होण्याचं स्वप्न पाहू नये."
छोट्या हत्तिणीवर बसवून दिल्लीच्या रस्त्यांवरून धिंड काढली
दाराच्या या जाहीर अपमानाचं वर्णन फ्रेंच इतिहासकार फ्राँसुआ बर्नियर यांनी 'ट्रॅव्हल्स इन द मुघल इंडिया' या पुस्तकात केलं आहे.
बर्नियर लिहितात, "दाराला एका छोट्या हत्तिणीच्या पाठीवर, छप्पर नसलेल्या हौद्यामध्ये बसवण्यात आलं. त्याच्या पाठी दुसऱ्या एका हत्तीवर त्याचा 14 वर्षांचा मुलगा सिफीर शिकोह बसलेला होता. त्या पाठी औरंगजेबाचा गुलाम नजरबेग नंगी तलवार घेऊन चालत होता.
दाराने पळून जायचा प्रयत्न केला, किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला, तर तत्काळ त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करावं, असा आदेश नजरबेगला देण्यात आला होता. जगातील सर्वांत श्रीमंत राजघराण्याचा वारस फाटक्या कपड्यांमध्ये स्वतःच्याच प्रजेसमोर अपमानित होत होता. त्याच्या डोक्यावर बेरंगी पागोटं बांधलेलं होतं आणि त्याच्या गळ्यात कोणताही दागिना नव्हता.".
बर्नियर पुढे लिहितात, "दाराच्या पायांना साखळ्या बांधलेल्या होत्या, पण त्याचे हात मोकळे होते. ऑगस्टच्या तळपत्या उन्हात या वेषामध्ये त्याला दिल्लीतल्या रस्त्यांवरून फिरवलं जात होतं. इथे कोणे एकेकाळी त्याच्या नावाची तुतारी फुंकली जात होती.
धिंड काढली जात असताना एक क्षणभरही त्याने डोळे वर करून पाहिलं नाही. तुटलेल्या फांदीसारखा तो बसून राहिला. त्याची ही अवस्था बघून दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांचे डोळे भरून आले."
भिकाऱ्याच्या दिशेने शाल फेकली
दारा शुकोहची अशा तऱ्हेने धिंड काढली जात असताना त्याच्या कानावर एका भिकाऱ्याचा आवाज पडला.
अवीक चंदा सांगतात, "भिकारी जोरजोरात ओरडत होता, 'ऐ दारा, एके काळी तू या भूमीचा मालक होतास. तू या रस्त्यावरून जाताना मला काही ना काही देऊन पुढे जायचास. आज तुझ्याकडे मला देण्यासारखं काही नाही.'
हे ऐकल्यावर दाराने आपल्या खांद्यापाशी हात नेला, आणि त्यावर पांघरलेली शाल उचलून त्या भिकाऱ्याच्या दिशेने फेकली. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ही गोष्ट औरंगजेबाला सांगितली. धिंड संपल्यावर दारा आणि त्याचा मुलगा सिफीर यांना तुरुंगाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं."
मुंडकं छाटलं
त्यानंतर दुसऱ्या दिवशीच औरंगजेबाने दरबारात निर्णय घेतला की, दारा शिकोहला देहदंड दिला जावा. इस्लामविरोधी वागल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. औरंगजेबाने 4,000 घोडेस्वारांना दिल्लीबाहेर पिटाळलं आणि दाराला ग्वाल्हेरच्या तुरुंगात पाठवलं जातंय अशी अफवा पसरवली. त्याच संध्याकाळी औरंगजेबाने नजरबेगला बोलावून घेतलं आणि दारा शिकोहचं छाटलेलं मुंडकं पाहण्याची इच्छा बोलून दाखवली.
अवीक चंदा सांगतात, "नजरबेग आणि त्यांचे साथीदार मकबूला, महरम, मशहूर, फरात आणि फतह बहादूर चाकुसुरे घेऊन खिजराबादमधील महालात गेले. तिथे दारा आणि त्याचा मुलगा रात्रीच्या जेवणासाठी स्वतः डाळ शिजवत होते.
त्यांच्या खाण्यात विष घातलेलं असेल, अशी भीती असल्यामुळे ते स्वतः जेवण तयार करत होते. आपण सिफीरला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत, अशी घोषणा नजरबेगने केली. सिफीर रडायला लागला आणि दाराने आपल्या मुलाला छातीशी कवटाळून धरलं. नजरबेग नि त्याच्या साथीदारांनी जबरदस्तीने दारापासून मुलाला बाजूला खेचलं आणि दुसऱ्या खोलीत नेलं."
अवीक चंदा पुढे सांगतात, "दाराने आधीच एक छोटा चाकू स्वतःच्या उशीमध्ये लपवून ठेवलेला होता. तो चाकू काढून दारा शिकोहने नजरबेगच्या एका सहकाऱ्यावर पूर्ण ताकदीनिशी प्रहार केला. पण मारेकऱ्यांनी त्याचे दोन्ही हात वरच्यावर धरले आणि त्याला गुढग्यांवर बसायला लावलं, मग त्याचं शीर जमिनीला लावलं आणि नजरबेगने स्वतःच्या तलवारीने त्याचं मुंडकं धडापासून वेगळं केलं."
छाटलेलं मुंडकं औरंगजेबाला सादर
दारा शिकोहचं छाटलेलं मुंडकं औरंगजेबासमोर सादर करण्यात आलं. त्या वेळी तो त्याच्या किल्ल्याच्या बागेत बसला होता. मुंडकं पाहिल्यानंतर औरंगजेबाने आदेश दिला की, मुंडक्याला लागलेलं रक्त साफ करून एका तबकातून ते घेऊन यावं.
अवीक चंदा सांगतात, "तत्काळ तिथे मशाली आणि कंदील लावण्यात आले. ते मुंडकं आपल्या भावाचंच आहे, याची खातरजमा खुद्द औरंगजेबाला करता यावी, यासाठी प्रकाश पाडण्यात आला. औरंगजेब इथेच थांबला नाही. दुसऱ्या दिवशी, 31 ऑगस्ट 1659 रोजी त्याने आदेश दिला की, मुंडकं छाटून उरलेलं दारा शिकोहचं धड हत्तीवर ठेवावं आणि जिवंतपणी त्याची धिंड काढली त्याच रस्त्यांवरून त्या धडाची धिंड काढावी.
हे दृश्य पाहिल्यावर दिल्लीवासीयांच्या अंगावर काटा आला आणि बायका घरात जाऊन रडायला लागल्या. दाराचं हे मुंडकं छाटलेलं धड 'हुमायूं का मकबरा' परिसरामध्ये दफन करण्यात आलं."
औरंगजेबाने शाहजहानचं मन मोडलं
यानंतर औरंगजेबाने आग्र्यातील किल्ल्यात कैद असलेले त्याचे वडील शाहजहान याच्याकडे एक भेटवस्तू पाठवली.
इटालियन इतिहासकार निकोलाओ मनुची यांनी 'स्टोरिया दो मोगोर' या त्यांच्या पुस्तकात लिहिल्यानुसार, "आलमगीरने त्याचा सहायक ऐतबार खाँ याच्या हस्ते शाहजहानकडे एक पत्र पाठवलं.
त्या पत्राच्या लिफाफ्यावर लिहिलं होतं- 'औरंगजेब, तुमचा मुलगा, तुमच्या सेवेत हे तबक पाठवतो आहे, तुम्ही ही भेट कधीच विसरू शकणार नाही.' पत्र मिळाल्यावर वृद्ध शाहजहाँ म्हणाला, 'खुदा कृपेने माझा मुलगा अजून माझी आठवण काढतोय.' तेवढ्यात झाकलेलं तबक त्याच्या समोर ठेवण्यात आलं.
त्याचं झाकण शाहजहानने बाजूला केलं तेव्हा तो किंचाळला, कारण त्यात त्याचा सर्वांत थोरला मुलगा दारा शिकोहचं छाटलेलं मुंडकं ठेवलं होतं."
क्रौर्याची परिसीमा
मनुची पुढे लिहितात, "हे दृश्य पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या बायका मोठमोठ्याने शोक करायला लागल्या, ऊर बडवून घेऊ लागल्या आणि दागदागिने उतरवून टाकले. शाहजहानला इतकी जोरदार चक्कर आली की त्याला तिथून दुसरीकडे घेऊन जावं लागलं.
दाराचं बाकीचं धड 'हुमायूं का मकबरा' परिसरात दफन करण्यात आलं होतं, पण औरंगजेबाच्या हुकुमानुसार दाराचं शीर ताजमहालाच्या अंगणात गाडण्यात आलं. शाहजहान जेव्हा-जेव्हा त्याच्या बेगमच्या मकबऱ्याकडे बघेल, तेव्हा त्याच्या सर्वांत थोरल्या मुलाचं शीरही तिथेच जमिनीत सडत पडलंय याची जाणीव त्याला होईल, यासाठी औरंगजेबाने हा आदेश दिला होता."

सुभेदार "मल्हारराव होळकर" : मराठा साम्राज्याच्या उत्तरेचा अजिंक्य बुरुज

सुभेदार "मल्हारराव होळकर" : मराठा साम्राज्याच्या उत्तरेचा अजिंक्य बुरुज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इंदोरचे होळकर राजघराणे हे मराठेशाहीतील एक सुविख्यात राजघराणे. होळकर हे नामाभिधान सुभेदार मल्हारबांपासून पडले असावे. अर्थात हे वंशनाम "होळ" या ग्रामनामावरून पडले असावे असे सांगितले जाते. होळ नावाची महाराष्ट्रात तीन गावे आहेत. एक पुणे जिल्ह्याच्या भीमथडी तालुक्यात, दुसरे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात, आणि तिसरे सातारा जिल्हातील फलटण तालुक्यात. यापैकी पुणे जिल्ह्याच्या निराकाठजवळ जेजुरी जवळील "होळ" (मुरूम) येथे मल्हारबांचा जन्म झाल्याने या वंशास "होळकर" असे नाव पडले गेलायचे सांगितले जाते.
मल्हारबांचा जन्म १६९३ मध्ये रामनवमीला झाला. खंडूजी होळकर हे मल्हारी मार्तंडाचे अनन्यसाधारण भक्त होते म्हणून पुत्राचे नाव मल्हारी ठेवण्यात आले हा पुत्र मल्हारी पुढे जाऊन मल्हारराव व आपल्या शौर्याने माळव्याचा सुभेदार बनला.
माळव्यात मराठ्यांचा अंमल बसविण्याकरिता आणि त्याहून म्हत्वाचे कारण म्हणजे चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याकरिता पेशवे बाजीराव यांनी मल्हारबांना ऑक्टोबर १७२८ च्या सुमारास रवाना केले. मल्हारबांसोबत बाजी भीमराव, पिलाजीराव जाधव, राणोजी शिंदे व आनंदराव पवार ही मात्तबर सरदार मंडळी होती. ६ ऑगस्ट १७२७ रोजी पेशव्यांनी मल्हारबांच्या सरंजामासाठी ४ गुजरातेत, ६ माळव्यात व १ खानदेश असे दहा जिल्ह्यांचे उत्पन्न लावून दिले. मल्हारबा सरंजामदार बनल्यानंतर जेजुरीच्या खंडोबाची कृपा झाली असे त्यांना वाटू लागले, जेजुरी येथील शंकरभट तानभट खाडे यांची १० जुलै १७२९ रोजी त्यांनी तीर्थोपाध्ये म्हणून नेमणूक केली. जेजुरी येथील मल्हारी मार्तंडाच्या किल्याच्या बांधकामाची सुरवात मल्हारबांनी लागलीच केली. पुढे जाऊन २२ जुलै १७३२ मध्ये मल्हारबांना माळव्यातील बराचसा मुलुख नेमून दिला गेला.
खाजगी "जहागीर" (जागीर) मल्हारबांना बाजीरावांकडून फौजेच्या खर्चासाठी सरंजाम म्हणून माळव्यातील महाल मिळाल्याबरोबर मल्हारबांनी , "माझी सेवा लक्षात घेऊन माझ्या पत्नीला गौतमाबाईंना खाजगी जहागीर (जागीर) देण्यात यावी अशी विनंती केली. छत्रपती शौ महाराजांच्या आज्ञेने २० जानेवारी १७३४ मध्ये बाजीरावांनी मल्हारबांना लिहून कळिवले की यानंतर "खाजगी" व "दौलत" वेगळे राहतील. "खाजगी व दौलत असे दोन्ही पृथक पथक कायम करून तुमचे कुटुंब सौ. गौतमाबाई नावे इनाम घेऊन सनद व वरचे पाठविली आहेत" असे त्या पात्रात नमूद आहे.
या सनदेवरून २० जानेवारी १७३४ मध्ये होळकर घराण्यात "खाजगी" अस्तित्वात आली. त्यावेळी खाजगीमध्ये जवळ-जवळ १० ते १५ गावांचा समावेश होता जायचे उत्पन्न २,९९,०१० इतके होते ....... मल्हारबांचा दूरदृष्टीपणा इथे लोकधात घेणे महत्वाचे आहे, नियमाने घराण्यातील जो कोणी पुरुष असेल त्याची मुख्य पत्नीच खाजगीच वारस होत असे. यामुळे कुटुंबास राज्यकारभारात प्रवेश मिळावा, राज्यकारभाराचे शिक्षण सहज मिळावे हा यामागील हेतू होता. याहून महत्वाची बाब म्हणजे जर का दौलतीस पैशाची आवश्यकता भासली तर पत्नीच्या संमतीने खाजगीतला पैसा दौलतीच्या कामास वापरला जाता येत होता. अर्थात मल्हारबांनी "खाजगी" जहागीर प्राप्त करून राजकीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या बळकटी प्राप्त करून घेतली.
खाजगीच हा मान लाभला तो फक्त होळकरांना. यावरून बाजीराव पेशवे व शाहू महाराज हे मल्हारबांच्या कामगिरीवर बेहद खुश होते याची जाणीव होते. पुढे जाऊन निजामाविरुद्ध झालेल्या लढाईत मल्हारबांनी उत्तम कामगिरी केली व त्यांचा सरंजाम वाढवून त्यांचा गौरव करण्यात आला.
*****
मल्हारबा आणि प्रधान बाजीराव बल्लाळ :
===========================
होळकर उदयाला आले तो काळ अत्यंत अंधाधुंदीचा होता.परंतु काळाचा प्रभाव मोठा असूनसुद्धा त्या-त्या काळाला अनुरूप निर्णय घेऊन जे भविष्याची जडण-घडण करतात टाच असामान्य ठरतात.१६९७ च्या आसपास मल्हारबा आपल्या मामाकडे (भोजराज बारगळ) आले होते. बारगळ हे बंड्याचे सरदार होते आणि मल्हारबा बारगळांसोबत होते त्यामुळे वयाच्या १४-१५ वर्षापासूनच मल्हारबांचे सैनिकी जीवन सुरु झाले होते. बाजीरावांनी मल्हारबांना आपल्या सेवेत मागून घेतले ते बारगळांकडेच. मल्हारबांनीसुद्धा आपले शे-दीडशे स्वारांचे स्वतंत्र पथक बनवले होते. मल्हारबांच्या माळव्यावर १७१८ पूर्वीपासूनच स्वतंत्र स्वाऱ्या होत असत. बाजीरावांची भेट होण्याआधीपासून मल्हारबांचा डंका माळव्यात वाजत होता. मल्हारबांचा इंदोरच्या नंदलाल मंडलोई या जमीनदाराशी झालेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे ज्यावरून मल्हारबांचा त्या भागातील दरारा स्पष्ट होतो. जर भविष्यात उत्तरेत बस्तान मांडायचे असेल तर मल्हारबांसारखा दूरदृष्टी असणारा मुत्सद्दी सेनानी बरोबर असणे हे फायद्याचेच होईल अन्यथा मल्हारबा स्वतहा उत्तरेत स्वतंत्र बस्तान मांडतील हा विचार बाजीरावांसारख्या मात्तबर पेशव्यांच्या मनात न येणे हे अस्वाभाविक आहे. अत्रेंनी बालाजी विशवनाथ यांच्या उत्तरेतील स्वारीमध्ये मल्हारबा स्वतंत्र पथके म्हणून सामील झाले होते हे जे मांडले आहे तो बरोबर आहे असे येथे दिसते.
१७२० ते १७२१ च्या दरम्यान मल्हारबा आपल्या फौजेच्या उदरनिर्वाहासाठी बढवणीच्या संस्थानिकाकडे गेले व त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. पेशव्यांनी बढवणीला वेढा घातला असता दीड हजार सेनेनीशी मल्हारबांनी पेशव्यांच्या सैन्यांचा धुव्वा उडवला. शेवटी बाजीरावांनी मल्हारबांना पत्र पाठवून उभयपक्षी तहाची मुख्यतारी मल्हारबांना दिली. मल्हारबांनी तसा तह करून घेतला व पेशव्यांच्या फौजेची रवानगी केली. परंतु रियासतीत जी माहिती मिळते ती वेगळी आहे :- "कदम बांडे व बाजीराव यांच्या फौजांची एकदा कलागत लागली असता, ती मल्हारबांनी मिटवली. त्यावरून बाजीरावांनी त्यांना बांड्यांपासून १७२१ मध्ये आपणाकडे मागवून घेतले.परंतु याचा एकही संदर्भ रियासतकारांनी दिलेला नाही. पण याला छेद देणारे पत्र दिले आहे जायची तारीख उपलब्द नाही यावरून ज्याववेली बढवणीच्या संस्थानाबरोबर तह करून दिल्यानंतर पेशव्यांनी मल्हारबांना स्वराज्याचे सरदार व्हावे हे सुचवल्यानंतरचे हे पत्र असावे असे म्हणता येते. उभयपक्षी करारानंतर सुद्धा मल्हारबा १७२५ पर्यंत माळव्यात स्वतंत्रपणे आपल्या सैन्यासह वावरत होते व माळव्यातील अनेक प्रांत जिंकत होते. मल्हारबांच्या या मुत्सद्दीपणामुळे व किर्तीमुळे बाजीरावांना मल्हारबांना स्वराज्यात घेणेच फायद्याचे आहे असे वाटणे स्वाभाविक होते कारण असे नसते झाले तर पुढचा उत्तरेतला धोका त्यांना दिसत होता.
मल्हारबांनी त्यांच्या हयातीत एकूण ५२ लढाया केल्या ज्यामध्ये डभईचा संग्राम जो दाभाडे आणि मराठ्यांच्यात झाला जायचे नेतृत्व बाजीराव पेशवे करत होते. या लढाईमध्ये दाभाड्यांना निजाम आणि बंगश मदत करणार होते. हे पाहता बाजीरावांनी निजाम आणि बंगश यांना रोखण्याची जबाबदारी मल्हारबांकडे दिली. मल्हारबांनी बंगश आणि निजामाला तीन महिने बेजार करून सोडले त्यामुळे त्यांना दाभाडेंच्या मदतीला जाता आले नाही. आणि यामुळे डभईचे यश बाजीराव पेशव्यांच्या पदरी पडले. दयाबहादूर वरील स्वारी व विजय ही मल्हारबांच्या जीवनातील महत्वाची घटना होय या युद्धामध्ये मल्हारबांनी केलेला पराक्रम आणि राजकीय डावपेच यामुळे त्यांनी दयाबहादूरचा संपूर्ण पराभव केला ज्यामध्ये तो मारला गेला. या विजयामुळे मराठे मावळात शिरले आणि बाजीरावांची आणि शाहूंची मल्हारबांवरील मर्जी अजून वाढली.
इतिहासातील प्रसिद्ध अशी लढाई म्हणजे बुंदेलखंड वाचवण्यासाठीची लढाई महंमदखान बंगश हा बुंदेलखंडवर स्वारी करणार हे समजताच राजा छत्रसाल यांनी शाहू महाराजांकडे शिवाजी महाराजननी केलेल्या वाचनाची आठवण करून देत मदत मागितली. मदतीच्या विनंतीचे पत्र पोहचताच शाहूमहाराजांनी बाजीरावांना बुंदेलखंडाच्या मदतीस जाण्याची आज्ञा केली. बाजीराव माळव्यात दाखल झाले जिथे त्यांची भेट मल्हारबांसोबत झाली आणि संयुक्त फौजा बुंदेलखंडाकडे चालून गेल्या. या युद्धात मराठ्यांचा विजय झाला आणि बुंदेलखंड वाचले. मल्हारबा आणि बाजीराव यांच्यात खूप जिव्हाळ्याचा व आदरयुक्त मैत्रीचा संबंध होता. शिंदे-होळकर उत्तरेत धुमाकूळ घालून खंडणी मिळवत असता बाजीरावांनी त्यांना पत्र पाठवले व कळविले की छत्रपतींच्या आज्ञेवरून मी सिद्धीवर स्वारी करण्यास जात आहे. इकडे पैशाची फार अडचण आहे. तुम्ही उत्तरेत बादशाही मुलखात स्वाऱ्या करून खंडणी मिळवावी व आम्हास जरूर पैशाचा पुरवठा करावा. शिंदे-होळकरांच्या भीतीपोटी कित्येक वेळा अनेक बादशाही सरदारांनी तहाची बोलणी केली परंतु श्रीमंतांशी बोलणी केल्याविना ते कोणताही तह करत नसत जरी खाजगीतला फायदा कितीका असेना. लढाया चालू असताना मल्हारबा खंडणी गोळा करण्यात अजिबात आळस करत नव्हते व लुटीचा व खंडणीचा गडगंज ऐवज बाजीरावांकडे पाठवत असत.
मल्हारबांनी अनेक युद्धे पहिली. हजारोवेळा सेनेस इकडून तिकडे हालिवले आणि लाखोगणती रुपयांची दौलतीची व खाजगीची तिजोरी भरली आणि राजकारणाचे नाजूक धागेदोरे उकलीले. माल्कम त्यांच्याविषयी म्हणतो, "लौकिक मिळवून चाळीस वर्षे अधिक त्यांनी सैन्याच्या अधिपत्यात घालवली. ते आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस तर मराठ्यांच्या जुटीत अग्रगण्य संमेलनात होते यात संशय नाही. साध्या गृहस्थी चालीविषयी, धैर्याविषयी मराठे लोक त्याजहून दुसऱ्यास विशेष गणित नाही.
मल्हारबांच्या जीवनातील चढ-उतार, यश-अपयश पहिले तरी या सर्व गोष्टी खर्चाकडे टाकूनसुद्धा एक उत्तम शिपाई, युक्तीवान सेनापती, उत्कृष्ट राजसेवक व उदार प्रजापालक असेच शेवटी बेरजेत उत्तर येईल.
शेवटी मल्हारबांना मनाचा मुजरा !!!

 

Sunday 12 June 2022

श्रीमंत डफळे सरकार यांचा वाडा व समाधी

 


श्रीमंत डफळे सरकार यांचा वाडा व समाधी

#डफळापूर शहर सांगली शहरापासुन ७० कि.मी.वर असुन जत या तालुक्याच्या शहरापासून १७ कि.मी.अंतरावर आहे. जत #संस्थानातील डफळापूर हे एक महत्त्वाचे शहर असल्याने या संपूर्ण शहराभोवती #कोट होता. #सटवाजीराजे #चव्हाण यांच्या काळातच ही तटबंदी बांधली गेली असावी. आजही बहुतांशी डफळापूर हे या कोटातच वसले आहे. आज ही तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असली तरी काही ठिकाणी ही तटबंदी, बुरुज , कोटाचे मुख्य प्रवेशद्वार त्या शेजारील ढासळलेले बुरुज, कोटाचा लाकडी
डफळापूरचे #पाटील #सटवाजी #चव्हाण यांनी १६८० च्या सुमारास ३,००० मोहरा खंडणीच्या बदल्यात आदिलशाहीकडून #जत, #करजगी, #बार्डोल आणि #कणद यांची #देशमुखी मिळवल्यावर #डफळे #राजघराणे#जत #संस्थान उदयाला आले. सिद्दी खवासखानकडून आणखी वतने विकत घेऊन त्यांनी जत संस्थान वाढविले. या जत संस्थाना अंतर्गत जत व डफळापूर ही दोन मोठी शहरे आणि ११७ खेडी समाविष्ट होती.#छत्रपती #संभाजी #महाराजांच्या मृत्युनंतर #सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईच्या काळात आऊसाहेब डफळे (१७०१–५४) यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत संस्थानाचे स्वतंत्र कायम ठेवले
*पृथ्वीराज माने सरकार*
9146889612

भांबोरकर भोसले वाडा - भांबोरे

 

भांबोरकर भोसले वाडा - भांबोरे
पोस्तसांभार ::

Saurabh Madhuri Harihar Kulkarni













अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भांबोरे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत आजोबा विठोजीराजे भोसले यांच्या वंशजांचा वाडा आहे. भांबोरे हे गाव पुणे - सोलापूर महामार्गावरील भिगवणपासून २४ कि.मी अंतरावर आहे. काळाच्या ओघात वाड्याची पडझड झाली आहे. काही भाग शिल्लक आहे. जोत्याचे अवशेष पहायला मिळतात. त्यांचे वंशज प्रवीणजी भोसले यांच्याकडे भांबोरकर भोसले दफ्तर हे दुर्मिळ पुस्तक आहे व पुरातन तलवार आहे.
मालोजीराजे व विठोजीराजे हे दोघे बंधु वणगंपाळ निंबाळकरांकडे चाकरीत होते. वयाच्या १७-१८ व्यावर्षी दोघा बंधूंना चांगले घोडे देऊन १२०० होनांची आसामीस तैनात करून चाकरीस ठेवले. ते कोल्हापूर प्रांतात स्वारीसाठी १२००० फौजेसह गेले. मालोजी व विठोजी यांनी स्वारीत पराक्रम गाजविला. त्यांना १५०० मनसबदारी व जुन्नर परगणा मिळाला.
पुढे निजामशाहीत मालोजी व विठोजी यांनी मलिकअंबरची पाठराखण केली.
इ.स. ऑगस्ट १६०६ ते जून १६०७ या दरम्यान मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत धारातीर्थी पडले तेथे त्याची समाधी होती. विशेष म्हणजे मालोजीराजे व विठोजीराजे यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार
केला. त्या मंदिरात दास मालोजी बाबाजी व विठोजी बाबाजी भोसले असा शिलालेख आहे. शिखर शिंगणापूर येथे मालोजी राजांनी तळे बांधल्याचा उल्लेख छ. संभाजी महाराजांच्या दानपत्रात आहे.
विठोजीराजे यांना आठ पुत्र, व एक कन्या होती. मुलीचे नाव अंबिकाबाई. ती ज्येष्ठ होती. त्यांचा पहिला मुलगा संभाजी.मीरजुमल्याच्या लढाईत जाधवरावांकडून मारला गेला. त्यांस संतती नव्हती. दुसरा मुलगा खेलाजी. हा गर्दी होऊन एकाएकी मारला गेला. त्याचे वंशज शिखर शिंगणापूर, बावी (जि. नाशिक), कळस (जि. पुणे), मीरगाव (जि. नाशिक), निरगुडी (जि. अ. नगर) मनिरथ (जि. नाशिक) येथे आजही वास्तव्य करून आहेत. तिसरा मुलगा मालोजीराजे हे जेजुरीजवळील कोऱ्हाळे (जि. पुणे) येथे होते. चौथे कबाजी हे शहाजीराजांबरोबर तंजावरला गेला असावे असे मानले जाते. पाचवे नागोजीराजे ह्यांचे वंशज मुंगीपैठण व बनसेहूरी (अ. नगर). सहावे - परसोजीराजे हे नांदनन (मोगलाई आष्टे) व भांबोरे (अ. नगर) येथे वास्तव्य करीत होते. त्रिंबकजी हे सातवे पुत्र तंजावरला गेले. तेथे त्यांचे वंशज आहेत.
सहावे पुत्र परसोजी राजे यांचे वंशज नांदनज व भांबोरे या दोन ठिकाणी राहतात. शहाजीराजे विजापूरला गेले त्या वेळी आपले चुलतबंधू विठोजीराजे यांचा सहाही मुलांची व्यवस्था जागजागी लावली. त्यातूनच परसोजीराजे यांना निजामशाहीतील दौलताबादकरांकडून जागा तैनात लावून दिली. तेथे पराक्रम करून त्यांनी चांगला नावलौकिक प्राप्त केला. वऱ्हाड, खानदेश मधील बंडखोरांचा शिताफीने बंदोबस्त केला. त्यांना त्याबद्दल जळगाव जामोद येथील वतनाची सनद मिळाली.परसोर्जीचा मुलगा सयाजी निजामशाही बुडाल्यावर मोगली अंमलात दाखल झाले. सयाजींचे दोन पुत्र राजरूप व रुस्तुमजी. राजरुपराजे हे नांदनजच्या गढीत राहून बादशाही कामगिरी उत्तम प्रकारे निष्ठेने बजावीत होते. सावकारी देवघेव मोठ्या प्रमाणावर चाले. रुस्तुमजी मोठे कर्ते व इभ्रतदार होते.
रुस्तुमजींचे मोठे चिरंजीव खेलोजीराजे यांना बरोबर घेऊन नांदनज येथील वडिलार्जित जहागिरीवर ते राहिले. छत्रपती शाहूमहाराज मोगली कैदेतून सुटून साताऱ्यात आले. त्यांच्याबरोबर खेलोजी होते. त्यांना नांदवज व भांबोरे येथील मोकासा राजपत्रे करून दिली. तेव्हापासून खेलोजीराजे हे स्वराज्याच्या सेवेत आले. त्यांना सातारा मुक्कामी देवाज्ञा झाली.
खेलोजीराजांची चार मुले
१) शहाजी २) कक्काजी ३) रुस्तुमजी ४) सुभानजी.
सुभानजी व जानोजी हे भोसले नागपूरकर भोसले यांच्या लष्करात सेवा करीत होते. ते राक्षसभुवनच्या लढाईत (१७५३) होते.श्री कक्काजीराजे हे आपल्या कुटुंबासह भांबोऱ्यास राहिले. त्यांना दोन मुले होती- १) चिमणाजी राजे, २)अप्पाजीराजे. अप्पाजीराजे हे अतिशय रागीट, बलवान व धाडसी होते. गाईंची झुंज सोडविण्याच्या प्रसंगाची एक आख्यायिका त्यांचेसंबंधी सांगितली जाते.
भोसले घराणे विठोजीराजे शाखेची वंशावळ -
वरडाजी-नागोजी-व्यंकोजी-संभाजी बाबाजी
१) मालोजी ( छ. शिवाजीमहाराजांचे आजोबा.)
२) खेलोजी ऊर्फ विठोजी.
३) अंबिकाबाई, संभाजी, मालोजी
कक्काजी, मालोजी, परसोजी
४) मालोजी कवाजी-नागोजी-परसोजी-त्र्यंबकजी-कक्काजी-रुस्तुमजी -खेलोजी (२)- परसोजी (२)
५)शहाजी कक्काजी (२) रुस्तुमजी सुभानजी चिमणाजी,
६)अप्पासाहेब - चिमणाजी-राघोजी-आबासाहेब
७)लालाजी-शाहुजी-शंकराजी बाळाजी भिकाजी
८)लालाजी-शिवाजी-नाव्हाजी-जयसिंहजी विजयसिंह-प्रवीण
साभार - सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...