विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 29 July 2020

यावनी आक्रमण: भाग - ५







यावनी आक्रमण: भाग - ५
____________________

POSTSAAMBHAR :Prashant Babanrao Lavate-Patil

जर आपण भाग- ४ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग- ५ वाचण्या आगोदर भाग- ४ नक्की वाचून घ्यावा. भाग- ४ ची लिंक खाली दिलेली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मागील भागात आपण गझनीच्या सबुक्तगीनच्या वंशाचा शेवट कसा झाला आणि गझनीवर घोरींची सत्ता कशी आली ते थोडक्यात पहिले. घोरी मंडळींनी ११५७ च्या आसपास गझनी जिंकून घोरी सुलतानांचे राज्य स्थापन केले. यांनी भारतावर जवळ-जवळ ५ ते प्रमुख स्वाऱ्या केल्या. "महंमद घोरी" उर्फ "शहाबुद्दीन घोरी" हा म्हणजे या भारताला पडलेले एक अत्यंत भयंकर स्वप्न. याने भारतावर ज्या स्वाऱ्या केल्या त्या भयानक होत्या. अरब व तुर्क सुलतानांच्या पूर्वीच्या आक्रमणाप्रमाणेच याचीही आक्रमणे होती. ज्यामध्ये हिंदूंच्या कत्तली, मंदिरांची जाळपोळ, मंदिरातील मूर्ती फोडणे, स्त्रियांवर अत्याचार असे प्रकार होते. इथे नावामध्ये घोळ निर्माण होऊ शकतो. गझनीचा 'महमूद' आणि त्याच्यानंतर 'महंमद घोरी' ज्याचे मूळ नाव 'शहाबुद्दीन' असे आहे. मागच्या भागात आपण गझनीच्या महमुदबद्दल पहिले जो सबुक्तगीनच्या वंशाचा होता. या भागात आपण शहाबुद्दीन म्हणजे महंमद घोरीबद्दल बोलत आहोत. या लेखामध्ये आपण त्याचे नाव शहाबुद्दीन घोरी असे घेऊ.
गझनीच्या महमूदाने ज्याप्रमाणे भारतावर ३० वर्षात १७ स्वाऱ्या केल्या आणि भारताची कंबर मोडून काढली त्याचप्रमाणे शहाबुद्दीन घोरीने सुद्धा भारतामध्ये धुमाकूळ घातला. काळ पहिला तर ११७६ ते १२०६ असा तो काळ होता. ज्यामध्ये संपूर्ण गझनीच्या सुलतान म्हणून तो १२०२ ते १२०६ जगला. आता त्याने ज्या स्वाऱ्या केल्या त्यापैकी आपणास दोनच स्वाऱ्या माहित आहेत ज्या मध्ये शहाबुद्दीन घोरी महाराजा पृथ्वीराज चौहान यांच्याशी लढला. आपण इथे आता त्याच्या सर्व स्वाऱ्यांचा तपशील थोडक्यात पाहू.
■ पहिली स्वारी 'मुलतान' (इ. स. ११७६):
हा पहिला हल्ला मुलतानवर होता. मुलतानवर हल्ला करून मुलतान ताब्यात घेतले आणि तिथून जवळच 'ऊच' नावाचा एक मजबूत किल्ला होता तो त्याने जिंकला. इथला जो राजा होता त्याचे नाव सापडत नाही परंतु त्याच्या बायकोने त्याला ठार मारले व महंमदाबरोबर तह केला असे म्हंटले जाते. परत जाताना शहाबुद्दीन घोरीने त्या राजाच्या मुलीशी लग्न करून तिला सोबत घेऊन गेला. हा राजा मुस्लिम होता असे सांगितले जाते.
■ दुसरी स्वारी 'गुजरात व पंजाब भाग' (इ. स. ११७८):
हा शहाबुद्दीन घोरीचा दुसरा हल्ला होता. इथे शहाबुद्दीनचा सामना सुलतान खुश्रू मलिकशी होता. काही इतिहासकार म्हणतात कि इथे शहाबुद्दीन घोरीचा पराभव झाला. आणि रियासतकार सरदेसाई म्हणतात की युद्ध झाले आणू शहाबुद्दीनने मलिकचा पाडाव करून त्याच्या मुलास बळजबरीने ओलीस धरून गझनीला परत गेला.
■ तिसरी स्वारी 'सिंध' ( इ. स. ११७९):
दुसऱ्या स्वारीनंतर लगेच पुढच्याच वर्षी शहाबुद्दीन घोरीने सिंध प्रांतावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याने सिंध प्रांताची समुद्रकिनारपट्टी लुटली. या हल्ल्यामध्ये शहाबुद्दीन घोरी हा किती कपटी होता हे दिसून येते. झाले असे, सिंधची समुद्रकिनारपट्टी लुटून झाल्यावर तो गझनीला परत जात होता. परत जात असताना त्याने खुश्रू मलिकवर पुन्हा हल्ला करण्याचे ठरवले. पण यावेळी मलिक तयारीत होता. यावेळी मलिकने पंजाब प्रांताच्या पलीकडे गकर जमातीतील लोक राहत होते त्यांच्याशी सलोखा केला होता त्यामुळे मलिकची ताकद वाढली होती. यामुळे मलिकने शहाबुद्दीन घोरीला एकही किल्ला जिंकून दिला नव्हता वा राज्यात घुसायला संधी दिली नव्हती. ज्यावेळी घोरीला कळून चुकले की लढून मलिकला हरवणे कठीण आहे त्यावेळी त्याने एक डाव खेळला. ".... पश्चिमेकडून आपल्यावर शत्रू चालून येत आहे आणि त्याचा पाडाव करण्यासाठी तो मलिकशी तह करू इच्छितो....". असा प्रस्ताव त्याने मालिकला पाठवला. इथे मलिक फसला. त्याने घोरीचा हा प्रस्ताव मान्य केला आणि या बदल्यात घोरीने त्याच्याकडे ओलीस असलेल्या मलिकच्या मुलाला सोडून देण्याचे मान्य केले होते. आपला मुलगा परत येणार म्हणून मलिक खुश होऊन अगदी बेसावधपणे घोरीला भेटायला गेला. तो भेटीसाठी जात असताना मलिकच्या एका मुक्कामी घोरीने त्याच्या छावणीवर हल्ला केला आणि मलिकला त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत अटक केले व गझनीला आपल्या भावाकडे म्हणजे 'ग्यास-उद्दीन'कडे पाठवून दिले.
■ चौथी आणि पाचवी स्वारी: (अनुक्रमे इ. स . ११९१ आणि ११९२):
या स्वारीमध्ये शहाबुद्दीनचा सामना महाराजा पृथ्वीराज चौहान यांच्याशी झाला. या दोन्ही स्वारींबद्दल आपण पुढे बोलणार आहोत.
■ सहावी स्वारी 'कनोज' ( इ. स. ११९४)
पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून परत गझनीला जाताना शहाबुद्दीनने त्याचा एक गुलाम सरदार 'कुतुबुद्दीन ऐबक' याला भारताचा कारभारी म्हणून नियुक्त केले होते आणि त्याला भारतातच ठेवले होते. कनोजचा राजा 'जयचंद राठोड' ज्याने पृथ्वीराजांचा पाडाव करण्यासाठी शहाबुद्दीन घोरीला मदत केली होती. त्याला वाटत होते की शहाबुद्दीन घोरी त्याचा मित्र आहे. परंतु तसे नव्हते पृथ्वीराजांचा पराभव केल्यानंतर दोनच वर्षात शहाबुद्दीनने कनोजवर आक्रमण करून संपूर्ण कनोज लुटून काढले आणि राजा जयचंदचा पाडाव केला. कनोज हे शहर अतिशय धनाढ्य व सुंदर होते. कनोज शहर अक्षरशः त्याने जाळून टाकले. पुढे तो तसाच काशीला गेला आणि तेथे अगणित हिंदूंच्या कत्तली केल्या आणि मंदिरातून मुर्त्या नाहीशा करून टाकल्या, अनेक मंदिरे फोडली. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी कनोज मधले अनेक राजपूत मंडळी कनोज सोडून मारवाडात पळून गेली. जोधपूरमध्ये नवीन राज्य स्थापन केले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ तत्कालीन राजपुतांची परिस्थिती:
एकंदरीत परिस्थिती व इतिहास पाहता असे दिसून येते की ज्यावेळी अरब व तुर्क वायव्य सरहद्दीवरून भारतात घुसले त्यावेळी उत्तरेत बऱ्यापैकी राजपूत राजे होते. ही यावनी आक्रमणे शक्यतो उत्तर भारतातच खूप झाली. यावनांना दक्षिण भारतात येण्यासाठी बराच काळ लागला. माझ्या अभ्यासानुसार अलाउद्दीन खल्जी (खिलजी) हा पहिला सुलतान जो दक्षिणेत आला. शहाबुद्दीन घोरीच्या वेळी भारतावर ज्या स्वाऱ्या झाल्या त्यावेळी उत्तर भारतात बरीच राजपूत राजे मंडळी होती. त्यापैकी काही मंडळी सलोख्याने राहत होती आणि काहींमध्ये कायमचे वैर होते. उत्तरेतील आणि मध्य भारतातील बहुतांशी भाग हा राजपुरतांकडे होता. यामध्ये, अजमीर येथे राजा सोमेश्वर (पृथ्वीराजांचे वडील), दिल्ली येथे अनंगपाळ (पृथ्वीराजांचे आजोबा), कनोज येथे जयचंद राठोड (पृथ्वीराजांचा मावस भाऊ) , मेवाड म्हणजे चित्तोडगडावर सामंतसिह, जेसलमीर (जसलमेर) येथे राजा भोजदेव, परमार, गुजरात भागात राजा भीमदेव असे काही महान राजे त्यावेळी होते जे आपापल्या प्रदेशावर राज्य करत होती. 'मेवाड' याचा मूळअर्थ 'मध्यवाड' म्हणजे 'राजपुताण्याचा मध्यभाग' असा होतो. ज्याची राजधानी चित्तोडगड होती आणि हल्लीची राजधानी उदयपूर आहे.
ही सर्व राज्ये अतिशय संपन्न व श्रीमंत होती. पराक्रमी होते. परंतु भोळेपणा, उन्मत्तपणा, अविचारीपणा, विलासमय जीवन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यावनांविषयी ते बेफिकीर राहिले. यावनांचे पराक्रम, महत्वकांक्षीपणा, त्यांचे विजय पाहून हे सर्व राजपूत राजे आश्चर्यचकित होत असत. यावनांवर ईश्वरी कृपा असल्याने त्यांना असे मोठे विजय अगदी सहजपणे मिळतात असे राजपुतांना वाटत असे. असे वाटणे साहिजकच आहे म्हणा, कारण हाती सापडलेल्या शत्रूवर दया दाखवून त्याला सोडून देणे, शरण आलेल्या शत्रूला जीवनदान देणे, शक्ती अपुरी पडत असेल तर मुत्सद्दीपणाने शत्रूस शिकस्त देणे, कपटीपणा या सर्व राजपुतांच्या डोक्याबाहेरील कप्ल्पना होत्या. आणि अगदी उलट म्हणजे हे सर्व यावनांकडे अगदी भरभरून होते. पुढे जाऊन, राजपुतांमध्ये आपापसातील भांडणे एवढी होती की एकवेळ शत्रू परवडला पण आपलीच माणसं नको असे यांचे विचार होते. एक परकीय आक्रमण येत आहे आणि ते नुसता लष्करी नसून धार्मिक सुद्धा आहे आणि याचा किती मोठा परिणाम या देशावर होणार आहे याची कल्पना त्यांना नव्हती आणि हे आक्रमन थांबविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे एवढी साधी बात एकाही राजपूत राजाला समजली नसावी याबद्दल आश्चर्य वाटते. यावर रियासतकार म्हणतात "भोळेपणा व अज्ञान हेच राजपुतांच्या नाशाला कारणीभूत पडले".
इकडे संपूर्ण देश यावनांच्या हाती जातोय असे चिन्ह दिसत असताना राजपुतांमधील तिढा काय सुटत नव्हता. गुजरातचा जो राजा भीमदेव होता तो तसा पराक्रमी राजा होता. यानेच पृथ्वीराज यांच्या वडिलांना म्हणजे 'सोमेश्वर' यांना एका लढाईत पकडून ठार मारले होते. हे पृथ्वीराज चांगलेच जाणून होते आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करत होते. भीमदेवाच्या समकालीन 'जैत परमार' राजा अबू येथे राज्य करत होता. जैत परमारला 'इच्छनीकुमारी' नावाची एक अतिशय रूपवान अशी मुलगी होती. राजा भीमदेवाने परमारला एक निरोप पाठवला, "आपली मुलगी आम्हास द्या अन्यथा युद्धास तयार रहा". परमारने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. यावेळी परमारने भीमदेवाचा पाडाव करण्यासाठी पृथ्वीराजाची मदत घेतली. इकडे पृथ्वीराज सुद्धा आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठीची संधी शोधत होते. या युद्धामध्ये भीमदेवाचा सपाटून पराभव झाला. हे युद्ध साबरमतीच्या काठी झाले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ राजा अनंगपाळ, राजा जयचंद आणि पृथ्वीराज:
दिल्लीच्या गादीवर राजा अनंगपाळ राज्य करीत होते (तुवर वंशीय विक्रमादित्याचा १९व वंशज). अनंगपाळला दोन मुली होत्या. पहिली 'कमलादेवी' जी अजमेरच्या सोमेश्वरला दिली होती. आणि 'सोमेश्वर-कमलादेवी' यांचा मुलगा म्हणजे पृथ्वीराज. म्हणजे अनंगपाळ हे पृथ्वीराजचे आजोबा. ज्यांचा पाडाव करून पृथ्वीराज यांनी दिल्लीचे राज्य जिंकले. आणि दुसरी मुलगी कनोजच्या राजा विजयपाळ याला दिली होती आणि त्यांचा मुलगा म्हणजे 'जयचंद'. म्हणजे 'पृथ्वीराज' आणि 'जयचंद' हे दोघे मावस भाऊ होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ पृथ्वीराज चौहान आणि राणी संयुक्ता (संयोगिता):
पृथ्वीराज आणि संयोगिता यांची प्रेम कहाणी खूप रंगवून सांगितली जाते. अनेक इतिहासकारांनी आपापली मते मांडली आहेत. हे प्रेमप्रकरण दोन प्रकारे सांगितले जाते.
१) पृथ्वीराज चौहान यांनी दिल्ली जिंकून घेतली होती आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जिंकला होता. त्यांच्या पराक्रमाचा डंका अगदी काबुल पर्यंत होता. जयचंद राठोडची मुलगी 'संयोगिता' जिने पृथ्वीराजांना कधी पहिलेही नव्हते पण त्यांच्या पराक्रमाचे गोडवे ऐकून ती त्यांच्या प्रेमात पडली होती. हे जयचंदला ज्यावेळी समजले त्यावेळी त्याने संयोगिताला बंदी बनवले. जयचंद हा पृथ्वीराजांवर नाराज असण्याचे कारण म्हणजे पृथ्वीराजांनी 'राजसूय यज्ञास' केलेला नकार. अनंगपाळ पडला आणि काही दिवसांनी जयचंदाने 'राजसूय यज्ञ'. करण्याचे मनात आणले होते त्यासाठी त्याने सर्व राजपूत राजांना आमंत्रित केले होते ज्यामध्ये पृथ्वीराज सुद्धा होते. परंतु पृथ्वीराजांनी यास नकार दिला होता. जो जयचंदला अपमान वाटला. संयोगिता आपल्यावर प्रेम करते आणि ती कैदेत आहे हे कळताच पृथ्वीराज वेषांतर करून कनोजला गेले आणि त्यांनी तिला कैदेतून सोडवून आणले. फक्त या प्रकरणामुळे जयचंद आणि पृथ्वीराज यांच्यात युद्ध झाले ज्यामध्ये जयचंदाचा पराभव झाला आणि नाईलाजाने जयचंदाने आपल्या मुलीचे पृथ्वीराजाशी लग्न लावून दिले.
२) जयचंदाने आपली मुलगी संयोगिता हिच्या लग्नासाठी स्वयंवर आयोजित केला होता. यासाठी त्याने 'अश्वमेधयज्ञ' घेण्याचे ठरवले होते आणि या यज्ञातून तो स्वतःला भारताचा महाराजा घोषित करणार होता. (आता इथे "अश्वमेधयज्ञ" आणि "राजसूय यज्ञ" यामध्ये गफलत आहे) आणि या यज्ञाला पृथ्वीराजांचा विरोध होता. ठरल्याप्रमाणे स्वयंवर जो अश्वमेधयज्ञाच्या समाप्तीच्या मुहूर्तावर होता तो दिवस उजेडला. पृथ्वीराजाचा अपमान करायचे म्हणून पृथ्वीराजाचा पुतळा बनवून तो द्वारपालाच्या ठिकाणी ठेवला. दुसऱ्या बाजूला संयोगिताने हा सर्व प्रकार गुप्तपणे पृथ्वीराजांना पत्राद्वारे कळविला होता. ज्यावेळी संयोगिता हातामध्ये हार घेऊन पुढे सरकली त्यावेळी तिने पृथ्वीराजांचा पुतळा पहिला आणि तिने त्या पुतळ्याला हार घातला. त्याचवेळी पृथ्वीराज तिथे पोहचले आणि संयोगितेला घेऊन 'इंद्रप्रस्ताकडे' रवाना झाले. (इंद्रप्रस्थ हा आज एक दिल्लीचा भाग आहे).
मला दुसरी कहाणी म्हणजे काव्यरूपी दंतकथा वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे. कारण इतिहासाचे उदात्तीकरण करण्याचा हा एक प्रकार इथे दिसतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ पृथ्वीराज चौहान आणि शहाबुद्दीन घोरी:
इतिहासातील हा एक वादाचा विषय. पृथ्वीराज चौहान आणि शहाबुद्दीन घोरी यांच्यामध्ये नेमक्या लढाया किती झाल्या हे आजही ठामपणे कोणी सांगत नाही. शहाबुद्दीन घोरीच्या दरबारी नियमितपणे इतिहास लिहिणारा कोणीही नव्हता आणि जे काही लिहिले आहे ते काव्य स्वरूपात आहे. पृथ्वीराजांचा इतिहास सुद्धा काव्यरुपात आहे. वेगवेगळ्या काव्यात वेगवेगळी माहिती मिळते. पण ११९१ आणि ११९२ सालची दोन युद्धे इतिहासात प्रसिद्ध झाली. वेगवेगळ्या काव्यांच्या आधारे खालील माहिती मिळते.
१) 'पृथ्वीराजरासो' काव्यामध्ये पृथ्वीराजांनी घोरीला तीन (३) वेळा हरवले व दंड देऊन सोडून दिले होते असे म्हंटले आहे.
२) 'हम्मीर' या महाकाव्यात पृथ्वीराजांनी घोरीला सात (७) वेळा कैद केले होते असे म्हंटले आहे.
३) 'प्रबन्धकोश' मध्ये पृथ्वीराजांनी घोरीला वीस (२०) वेळा कैद केले होते असे म्हंटले आहे
४) 'सुर्जनचरित' या महाकाव्यानुसार पृथ्वीराजांनी घोरीला एकवीस (२१) वेळा पकडून दंड दिला होता.
५) 'प्रबन्धचिन्तामणि' या ग्रंथानुसार पृथ्वीराजांनी घोरीला तेवीस (२३) वेळा पकडून दंड दिला होता.
वरील माहिती पहिली आणि एकंदरीत इतिहासाकडे आणि पृथ्वीराज चौहान यांच्याकडे पहिले तर घोरीला २३ वेळा पृथ्वीराज पकडून दंड घेऊन सोडून देतील असे मलातरी वाटत नाही. दुसरी गोष्ट जरी २३ लढाया झाल्या असतील तर पृथ्वीराज आणि घोरी आमने सामने सर्वच लढाईत असतील असे वाटत नाही. दोन्ही सैन्यांमध्ये वेगवेगळ्या सेनापतींच्या नेतृत्वाखाली अनेक युद्धे झाली असतील परंतु प्रत्येक लढाईत घोरी आणि पृथ्वीराज हे दोघेही उपस्थित असतील याची शक्यता कमी वाटते. ११८२-८३ च्या दरम्यान या दोन गटांमध्ये पहिले युद्ध सतलजच्या भागात झाले अशी नोंद हम्मीर या महाकाव्यात मिळते. पृथ्वीराजांनी घोरीला नेहमी हरवून त्याच्याकडून कर वसूल करून घेतला असे उल्लेख काही ठिकाणी मिळत असताना एकाही फारसी काव्यातून याला आधार मिळत नाही. परंतु राजस्थान राज्यातील 'फलवर्धिका' या शिलालेखांतून याला आधार मिळतो. फलवर्द्धिका या ठिकाणी फलौदीदेवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासमयी या शिलालेखाचे स्थापना १५५५ (११/१/१५५५) साली झाली होती. दरवर्षी पृथ्वीराजांचा मुलगा गझनीला कर वसूल करण्यासाठी जात असे आणि एकवेळ त्याच्यावर घोरीच्या सैन्याने आक्रमण केले आणि त्यामध्ये त्याचा अंत झाला.
असो, एकंदरीत वर्णनातून नेमके काय सत्य मानावे हे वाचकांनी ठरवावे. काव्यस्वरूपात जे लेखन झाले आहे ज्यामध्ये संस्कृत काव्ये आहेत आणि काही फारसी काव्ये आहेत ज्यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे नेमके कोणते खरे मानायचे हे समजणे कठीण आहे. परंतु पृथ्वीराज चौहान यांच्यासारखा राजा घोरीसारख्या शत्रूला २३ वेळा सोडून देतील हे नक्कीच पटण्यासारखे नाही. आणि त्यांचा मुलगा कर वसूल करण्यासाठी गझनीला जायचा हे तर अजिबात पटण्यासारखे नाही. कारण कर म्हणजे ‘खंडणी’ ही पोचवली जाते ती आणली जात नाही. आणि ज्या शिलालेखाचा उल्लेख वरती दिला आहे तो १५५५ सालचा आहे म्हणजे पृथ्वीराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ ३५० वर्षानंतरचा त्यामुळे यावर किती विश्वास ठेवायचा हे वाचकांनी ठरवावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ शहाबुद्दीन घोरी आणि पृथ्वीराज यांची शेवटची दोन युद्धे:
संस्कृत आणि फारसी काव्याच्या आधारे या दोन्ही युद्धात हे दोन्ही नेते (शहाबुद्दीन व पृथ्वीराज) हजर होते असे म्हणता येईल. पण या दोन्ही लढायांची वर्णने सुद्धा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडली आहेत. इथे आपण ती पाहू. ही वर्णने वाचताना वरती मी जे काही मांडले आहे ते ध्यानात ठेवा म्हणजे तर्क लावण्यास सोपे जाईल.
● पहिले वर्णन:
वरती <<पृथ्वीराज चौहान आणि राणी संयुक्ता (संयोगिता)>> या भागामध्ये पहिला मुद्दा, ज्यामध्ये पृथ्वीराज संयोगितेला पळवून घेऊन जातात आणि पुढे पृथ्वीराज आणि जयचंद यांच्यात युद्ध होते व जयचंद हरतो आणि नाईलाजाने तो आपल्या मुलीचा विवाह पृथ्वीराजांशी लावून देतो ..." हे सांगितले आहे. जयचंदाचा पाडाव करून पुढे लगेच घोरीशी युद्ध झाले असे सांगितले गेले आणि यामध्ये घोरीचाही पराभव करून त्याला कैद करून इंद्रप्रस्थला घेऊन गेले. हे युद्ध झाले ११९१ साली. इथे जर तर्कच लावायचा झाला तर, संयोगितेचा स्वयंवर ज्यावेळी होता त्यावेळी सगळे राजपूत राजे तिकडे असणार हे घोरीने ओळखले असणार आणि याचा फायदा म्हणून तो दिल्ली, कनोज किंवा अजमेर यापैकी कोणत्या तरी किंवा तिन्ही राज्यांवर हल्ला करण्यासाठी भारतात आला असणार. पण पृथ्वीराज चौहान यांनी ऐनवेळी घातलेला राडा आणि अचानक जयचंद आणि पृथ्वीराज यांच्यातले युद्ध यामुळे घोरीचा गोंधळ झाला असणार आणि अचानक त्याला पृथ्वीराजांचा सामना करावा लागला असेल. असो, हा एक तर्क आहे.
● दुसरे वर्णन:
जयचंद हा पृथ्वीराजांवर चिडून होताच त्यामुळे कनोज आणि त्याचबरोबर पट्टण हे दोन्ही राज्ये पृथ्वीराजांचा पाडाव करण्याच्या तयारीत होते. पृथ्वीराजांची ताकद पाहता त्यांच्याकडून ते शक्य नव्हते हे त्यांनाही माहित होते. यासाठी त्यांनी घोरीकडे वकील पाठवून घोरीची मदत मागितली. आपापसातील भांडणाचा सूड घेण्यासाठी आपण शत्रूला घरात बोलावत आहोत याचा जराही विचार येथे झाला नाही. चित्तोडचा राजा "समरसिह रावळ" हा पृथ्वीराजांचा मेहुणा होता. पृथ्वीराजांनी कनोज, पट्टण आणि घोरीचा पाडाव करण्यासाठी चित्तोडची मदत घेतली आणि त्यांनी या तिघांचा सपाटून पराभव केला. घोरीला कैद केले आणि त्याच्याकडून ८००० घोडे आणि खंडणी घेऊन सोडून दिले.
● तिसरे वर्णन:
वरती <<तत्कालीन राजपुतांची परिस्थिती>> या भागामध्ये भीमदेव आणि जैत परमार यांच्यातील युद्ध आणि पृथ्वीराजांनी परमारला मदत केली आणि भीमदेव हरला हे सांगितले आहे. भीमदेवला या अपमानाचा बदला घ्यायचा होता आणि पृथ्वीराजांना संपवण्यासाठी त्याने घोरीला आमंत्रण दिले. गंमत बघा, हे युद्ध परमार आणि भीमदेव यांच्यात होणे अपेक्षित होते, परंतु झाले शहाबुद्दीन घोरी आणि पृथ्वीराज यांच्यात. यामध्ये पृथ्वीराज जिंकले आणि शहाबुद्दीनला काही घोडे, हत्ती खंडणीच्या स्वरूपात पृथ्वीराजांना द्यावे लागले आणि हे देऊन त्याने स्वतःची सुटका करून घेतली.
वरती ११९१ च्या पहिल्या युद्धाची तीन विविध वर्णने मी सांगितली आहेत. नक्की कोणते खरे यावर इतिहासकारांचे एकमत नाही. परंतु ११९१ ला ही लढाई झाली ज्यामध्ये शहाबुद्दीन घोरीचा सपाटून पराभव झाला हे मात्र नक्की.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
११९२ ला दुसरे युद्ध झाले ज्यामध्ये पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाला. या लढाईची सुद्धा अनेक वर्णने आहेत. अर्थात, इतिहासकारांचे इथेही एकमत नाही. याबद्दल नक्की इतिहासकारांची काय मतं आहेत हे पाहू.
●पहिले वर्णन:
पहिले युद्ध (११९१ चे) हे तरायनच्या मैदानात झाले. जिथे घोरीचा पराभव झाला आणि खंडणी भरून तो गझनीच्या दिशेने परत फिरला. युद्ध नेमके ११९१ च्या कोणत्या महिन्यात झाले हे माहित नाही. हे युद्ध संपताच पृथ्वीराज आपल्या फौजेनिशी दिल्लीला पोहचलेही नव्हते तोवर पुन्हा घोरीने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यावेळी पृथ्वीराज कुरुक्षेत्र याठिकाणी पोहचले होते. आणि हे दुसरे युद्ध कुरुक्षेत्र येथे झाले. ज्यामध्ये पृथ्वीराजांचा पाडाव झाला आणि त्यांना कैद करून घोरी गझनीला घेऊन गेला आणि पुढे जाऊन त्यांचे डोळे फोडले आणि मग पृथ्वीराजांनी शेवटची इच्छा म्हणून धनुष्य बाण चालवण्याची इच्छा व्यक्त केली आणि आपण आवाजाच्या दिशेने बाण मारू शकतो हे घोरीला सांगितले. हे ऐकून घोरी चकित झाला आणि याला त्याने परवानगी दिली. आणि यातच एक बाण पृथ्वीराजांनी घोरीला मारून त्याचा वध केला व स्वतःलाही संपवले.
● दुसरे वर्णन:
पृथ्वीराजांनी संयोगितेला स्वयंवरातुन पळवून नेले होते आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी कनोजचा राजा जयचंद याने घोरीला भारतात बोलवले. पृथ्वीराजांची सर्व युद्धकौशल्ये आणि डावपेच त्याने घोरीला सांगितली. घोरी आणि पृथ्वीराज यांच्यात युद्ध झाले आणि यामध्ये पृथ्वीराजांना कैद केले गेले. यामध्ये जयचंद किंवा त्याची सेना नव्हती. या वर्णनाचा कोणताही निश्चित पुरावा उपलब्द नाही त्यामुळे अनेक अभ्यासकांचे हा एक तर्क आहे असे मतं आहे.
● तिसरे वर्णन:
११९१ च्या युद्धात प्रभाव झाल्यानंतर अतिशय नैराश्य अवस्थेत शहाबुद्दीन गझनीला पोहचला. पुढे कधीही भारतावर स्वारी करायची नाही असे ठरवून त्याने आपल्या प्रदेशावर लक्ष दिले. परंतु पृथ्वीराजासमोर झालेला अपमान तो विसरू शकला नाही. त्याने आपला विचार बदलून पराभवाचा बदला घेण्यासाठी तो पुन्हा भारतात आला. यावेळी त्याने कनोज आणि इतर काही राज्यांशी संधान बांधले होते. इकडे पृथ्वीराजांनी सुद्धा अनेक राजपूत राजे एकत्र केले होते आणि घोरीला पूर्णपणे संपवायचे असे ठरवले होते. यावेळी पृथ्वीराजांची फौज जास्त होती त्यामुळे घोरीने पृथ्वीराजांवर सरळ चालून जाण्याचा विचार केला नाही. युद्ध झाले आणि घोरीची पीछेहाट झाली. पृथ्वीराजांचे सैन्य आता घोरीच्या सैन्याचा पाठलाग करू लागले. यामुळे पृथ्वीराजांचे सैन्य विसकटले गेले. याचा फायदा घेत घोरीचे सैन्य पुन्हा उलटे फिरून आले आणि राजपुतांची दाणादाण उडाली. दिल्लीचा सेनापती चामुंडराय मारला गेला. अनेक इतर राजपूत राजे मारले गेले. पृथ्वीराज त्यांच्या हाती सापडले व त्यांना लगेच ठार मारण्यात आले. म्हणजे पृथ्वीराजांना कैद करून गझनीला नेण्यात आले नव्हते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अशाप्रकारे शहाबुद्दीन घोरीच्या प्रमुख सहा स्वाऱ्या मला इथे मांडाव्याशा वाटल्या. यापैकी चौथी आणि पाचवी स्वारी म्हणजे ११९१ आणि ११९२ ज्यामध्ये शहाबुद्दीन घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यात युद्ध झाले. शहाबुद्दीन घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यात नेमकी किती युद्धे झाली याबद्दल इतिहासात कसा वाद आहे हे मी वरती मांडलेच आहे. परंतु ११९१ आणि ११९२ ही दोन महत्वाची युद्धे आहेत जी इतिहासात प्रसिद्ध आहेत आणि त्यावरही इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत ती ही इथे मांडण्याचा प्रयत्न केला. पुराव्या अभावी नेमके मतं आपण मांडू शकत नाही पण एकंदरीत राजकीय व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून काही तर्क मांडता येतील जी वाचकांनी आपापल्या पद्धीतीने मांडायची आहेत. तर्क म्हणजे नक्कीच खरा इतिहास नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
■ शहाबुद्दीनचा शेवट:
शहाबुद्दीनची शेवटची काही वर्षे ही अतिशय भयानक गेली. खारिजम म्हणजे खिवाच्या शहांशी त्याच्या तक्रारी वाढू लागल्या आणि त्याचे रूपांतर युद्धात झाले ज्यामध्ये शहाबुद्दीनचा पराभव झाला. दंड भरून तो कसाबसा त्यातून सुटला. इकडे काश्मीर-पंजाब हद्दीवर 'गकर' लोकांनी जे रानटी होते त्यांनी पंजाबवर हल्ला करून लाहोर, मांडिला अशी महत्वाची शहरे जिंकली. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाबुद्दीन इकडे आला व त्यांचा पाडाव करून त्यांना मुसलमान केले. नंतर शहाबुद्दीन पुढे जात असताना त्याची छावणी सिंधू नदीच्या काठी 'रोहतक' या गावी पडली होती. हवा येण्यासाठी त्याने सर्व तंबू उघडे केले. याचा फायदा घेत 'गकर' लोक नदीतून पोहत येत छावणीच्या ठिकाणी गुपचूप आले आणि त्यांनी पहिला सर्व पहारेकऱ्यांना मारले आणि नंतर शहाबुद्दीनचा खून केला. साल होते इ. स. १२०६.
शहाबुद्दीनला मूळ-बाळ नव्हते म्हणून 'ग्यास-उद्दीन'चा मुलगा महंमूद हा गझनीच्या गादीवर बसला. पुढे शहाबुद्दीनचा पुतण्या महंमूद मरण पावल्यानंतर खारिजमच्या शहांनी गझनीचे राज्य घेतले. भारतातील मुस्लिमांचे राज्य 'कुतुबुद्दीन ऐबक' यांच्याकडे गेले. शहाबुद्दीन घोरी मरण पावल्यानंतरच कुतुबुद्दीन ऐबकने स्वतःला दिल्लीचा नवा सुलतान म्हणून जाहीर केले होते.
शहाबुद्दीन नक्कीच पराक्रमी होता परंतु प्रशासन व्यवस्थेत तो कमी पडला. त्याने भारतावर खूप आक्रमणे केली अनेक मुलुख जिंकला अगदी माळवा पर्यंत तो पोचला होता. भारताच्या कोणत्याही राजाला हे यावनी आपले राज्य हिसकावून घेतील अशी भीती फक्त शहाबुद्दीन घोरीच्या वेळेसच पडली. या आगोदर जी आक्रमणे झाली त्याचा मूळ हेतू लूट होता पण शहाबुद्दीन घोरीचा काळापासून हा हेतू बदलला गेला. स्वतःच्या राज्याची व राजधानीची प्रगती तो करू शकला नाही त्यामुळे त्याची कीर्ती त्याच्यानंतर फार दिवस राहिली नाही.
इकडे भारतात राजपूत राजांची अवस्था खूप दयनीय झाली होती. आपापसातील भांडणाचा सूड घेण्यासाठी जयचंद राठोड सारख्या अनेक राजपुतांनी देशाच्या शत्रूची मदत घेतली, कनोजच्या सेनेमध्ये अनेक मुसलमान भरती होते. पृथ्वीराजांच्या प्रत्येक हालचालींची बातमी घोरीपर्यंत पोहचत होती. पैशाच्या किंवा संपत्तीच्या लोभाने राष्ट्रद्रोह होऊ लागला. जातीवाद आणि शत्रूचा अभ्यास न करणे त्यामुळे शत्रूचा पराक्रम म्हणजे दैवी शक्ती अशा समजुती राजपुतांनामध्ये पसरू लागल्या. परिणामी, एवढी मोठी व जुनी राजघरान्यांचे राज्य अगदी पत्याच्या पानांच्या इमारतीसारखे ढासळून गेले आणि खऱ्या अर्थाने यावनी राजवट भारतावर सुरू झाली.
सोबत काही फोटो पोस्ट केले आहेत जी काल्पनिक आहेत. प्रत्येक फोटोची माहिती त्याच्या कप्शन मध्ये दिली आहे.
कुतुबुद्दीन ऐबक आणि त्याचा इतिहास आपण पुढच्या भागात पाहू.

गनिमीकावा - GanimiKava

गनिमीकावा - GanimiKava

*नरवीर तानाजी मालुसरे*

*तानाजी हे* शिवाजी महाराजांचे बालपणाचे सवंगडी होते. त्यांनी स्वराज्य *स्थापनेच्या जडणघडणीमध्ये* *त्यांचा* *अतिशय मोलाचा* *वाटा होता*

स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. जेव्हा तानाजींना *ही* जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम *प्राधान्याने* घेऊन ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. *आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे* हे त्यांचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत.

रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या *शत्रू सैन्याला* कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला.
दुसऱ्या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेव्हा त्यांना *तानाजीचा असामान्य पराक्रम समजला..* महाराज म्हणाले *"गड आला पण सिंह गेला".*

शूरवीर रामजी पांगेरा

गनिमीकावा - GanimiKava

शूरवीर रामजी पांगेरा

दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला.
या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला
मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.
कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता.
कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होते रामजी पांगेरा.
हा रामजी विलक्षण शूर होते. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. तेच हे रामजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होते.
एक दिवस दिवसाउजेडी त्यांना हेरांनी खबर दिली की, औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर
जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. ते आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभे राहीले. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला
समजलेच होते. रामजी आपल्या लोकांच्या पुढे उभे राहिले आणि मोठ्या आवेशात ते गरजले, "मर्दांनो , खानाशी झुंजायचंय, जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ) ते येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी, पळाल त्याला चोळी बांगडी"
असे बोलून रामजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले.
मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच. वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडे
आठवले. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामजी पांगेरा दाखवून दिले की,
मराठीयांची पोरे आम्ही,
भिणार नाही मरणाला.
चिमूटभरांनी पराभव
केला परातभरांचा
कण्हेरा गड सुरक्षित होता . दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती.
नमन या वाघाच काळीज असलेल्या आणि इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या शूरवीराला.

#ganimikava #JaiBhavani #JaiShivaji #RamjiPangera

!! *वीर शिवा काशिद* !!

!! *वीर शिवा काशिद* !!

हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करते वेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले.

हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत असत. त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता. त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशिदांना, शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले.

मात्र, हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खूपसली. ही घटना इ.स.१६६० मध्ये घडली.

शिवा काशिदांनी शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा जीव वाचविला. नेबापूर (चव्हाण) पाटील यांच्या कल्पनेचा सन्मान म्हणून शिवाजी महाराजांनी "मानाची पायरी" भेट दिली.

"मानाची पायरी" हा एक मोठा आयताकृती कोरीव दगड आहे. तो अजूनही नेबापुरात आहे.

!! जय शिवराय.. जय भवानी !!

!! वीर येसाजी कंक !!

!! वीर येसाजी कंक !!

महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली मोगल शाही संपवण्यासाठी त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी हात मिळवणी केली. गोवळकोंड्यात महाराजांचे जंगी स्वागत झालं. मुगल शाही, आदिलशाही, निजामशाही अश्या साऱ्या शह्यांच्या उरावर उभं राहून स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा आलाय म्हणून लोकांनी खूप गर्दी केली. महाराजांसोबत सरनोबत हंबीरराव मोहिते, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक इत्यादी निवडक मावळे होते या सगळ्यांनी महालात प्रवेश केला.

गोवळकोंड्याचा कुतुबशहा महाराजांना म्हणतोय 'महाराज आपकी फौज देखकरं हमे बडी खुशी हुई लेकीन ताजूब की बात ये हे की आपकी फौज मे हमने हाथी नही देखा" यावर महाराज उत्तरले "आमच्या कडे पन्नास हजार हत्ती आहेत, म्हणजे आमचा एक एक मावळा हत्तीच्या ताकतीचं आहे" यावर कुतुबशहा म्हणतोय हत्तीच्या ताकतीचां माणूस कसं काय शक्य आणि असेल एखादा असा मावळा तर काय तो माझ्या हत्तिशी झुंज देईल. महाराज म्हणतायत का नाही यातील कोणताही मावळा निवडा तो तुमच्या हत्तीशी झुंज देईल.

कुतुबशहा न प्रत्येक मावळ्यावर कुंचीतसी नजर फिरवली व येसाजी कडे बोट दाखवत विचारलं "क्या ये सिपाई लढेगा हाथी से?" महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं "का नाही?" येसाजी ने महाराजांना झुकून मुजरा केला आणि नंग्या तलवारी निशी मैदानात उतरला हत्तीला ही साखदंडांतून मोकळं करून मैदानात आणण्यात आले. युद्धाला सुरुवात झाली. येसाजीला पाहून हत्ती चवताळून येसाजीच्या अंगावर धावून गेला येसाजी न डाव्या अंगाला उडी मारून हत्तीला हुलकावणी दिली. दोन अडीच तास झुंज चालू होती. कधी येसाजी पुढे तर कधी येसाजी हत्तीच्या मागे आता हत्ती बेभान झाला होता त्याने येसाजीला आपल्या सोंडत पकडलं लोकांना वाटलं आता संपला येसाजी पण येसाजी न हत्तीच्या सोंडेवर तलवारीने असा घाव केला की जखमी झालेला हत्ती वेड्यासारखा पळत सुटला, तो पुन्हा आलाच नाही.

महाराजांचा एक एक मावळा हा हत्तीच्या ताकतीचां असतो हे सिद्ध झालं. कुतुबशहाने येसाजीला आपल्या गळ्यातील हार भेट देऊ केला पण येसाजीन तो हार न घेता "आमचं कौतुक करायला आमचा राजा समर्थ हाय माझा हा पराक्रम माझ्या राज्याच्या चरणी अर्पण करतो" अस सांगितलं.

जे स्वराज्य द्रोही होते ते हत्तीच्या पायाखाली गेले तर काही येसाजी कंक यांच्यासारखे स्वामिनिष्ठ होते त्यांनी हत्तीलाही नमवल.

#GanimiKava #Shivaji #Raje #YesajiKank

वीर राणोजी घोरपडे

वीर राणोजी घोरपडे

संताजी पुत्र राणोजी घोरपडे.
मुघल पन्हाळ्याला थोडीथोडकी नव्हे तर
तब्बल ९ वर्षे वेढा घालून बसले होते पण किल्ला आणि किल्लेदार त्यांना काही दाद देत नव्हते. औरंगजेबाने
आपले एकाहून एक सरस उमराव पन्हाळ्यावर रवाना केले होते पण या पैकी कुणीच पन्हाळा काबीज करू शकले नाहीत. किल्ल्यातून मराठे अनेक वेळेला मुघली छावणीवर रात्री-अपरात्री
गनिमी हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करून पुन्हा गडावर पसार होत असत. गडावरच्या मराठयांना बाहेरून सुद्धा मदत मिळत असे. धनाजी जाधवांच्या आणि हिंदुराव
घोरपडेंच्या सैन्याने सुद्धा पन्हाळ्याच्या आसमंतातील
मुघली फौजेला हैराण करून सोडले होते. पन्हाळ्याच्या आसमंतात अतुलनीय पराक्रम करणारा अजून एक वीर म्हणजे संताजी पुत्र राणोजी घोरपडे. या युद्धात राणोजी घोरपडेनवर
जबाबदारी होती ती मुघली रसद मारण्याची आणि त्यांनी ती चोख बजावली. राणोजी घोरपडे शिपाईगिरित आपल्या वडलांच्या पुढेच होते असे काही इतिहासकार लिहितात.
१७०२ च्या सुमारास
मुघली फौजेशी सामना करताना राणोजी घोरपडे
धारातीर्थी पडले. ताराराणीने राणोजी घोरपडेंच्या विधवा पत्नीला नंतर राणोजीच्या पराक्रमाची याद ठेवून कापशी सुभा इनाम म्हणून दिला.

!! वीर बाजी प्रभू देशपांडे !!

!! वीर बाजी प्रभू देशपांडे !!

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे सुरुवातीला शिवाजी महाराजांविरुद्ध कारवाया करणाऱ्या हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु कालांतराने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने घोडखिंड लढविली. पन्हाळगडाला शत्रूंने वेढा घातलेला असताना शिवाजी महाराजांची त्यातून सुटका करणे व महाराजांना विशालगडावर पोहोचवणे हे स्वराज्याचे मोठे कार्य बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देऊन पार पडले .
२१ तास चालून थकलेले शरीर व हाताशी केवळ ३०० मावळे अशा परिस्थितीतही बाजीप्रभूंनी सिद्धीच्या हजारोंच्या सैन्याला घोडखिंडीत मोठ्या हिमतीने रोखले . सलग ६ ते ७ तास खिंडीत बाजी प्रभू व त्यांच्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली . शत्रू सैन्याला खिंड ओलांडून दिली नाही .

शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले.

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींप्रभू देशपांडे सारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले.

#Ganimikava #BajiPrabhuDeshpande #JaiBhavani #JaiShivaji

!! वीर फिरंगोजी नरसाळा !!

!! वीर फिरंगोजी नरसाळा !!

हे आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार होते.

चाकणचा मराठी किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा. फिरंगोजींना खानाच्या या मोहिमेची आधीच माहिती मिळाली होती. त्यांनी चाकणच्या आसमंतातील शेतकऱ्यांना आधीच सावध केले आणि जमेल तेवढे धान्य घेऊन त्यांना सुरक्षित जागी हालविले. उरलेले धान्य मराठ्यांनी जाळून टाकले, जेणेकरून मोघली सैन्याला धान्याची चण-चण भासेल.

फिरंगोजींनी अचूक जागी बंदुकधारी आणि तिरंदाज बसविले होते, ज्यामुळे मुघली सैनिकांना किल्ल्याच्या जवळ येणेच कठीण होऊन बसले. खानाने धमधामे रचले त्यावर तोफा चढविल्या आणि किल्ल्यावर मारा केला पण त्याचा काही विशेष परिणाम झाला नाही. रात्री मराठे किल्ल्यातून बाहेर पडीत आणि झोपलेल्या मोघली छावणीवर हल्ला करून जमेल तेवढे नुकसान करून पुन्हा किल्ल्यात पसार होत. असे कित्येक दिवस चालू राहिले.

तोपर्यंत पन्हाळ्याहून महाराज सुद्धा सुखरूप निसटून पुन्हा राजगडावर पोचले. आता खानाला जास्त काळजी होती ती चाकणला बाहेरून मदत मिळण्याची. खानाने गुप्तपणे एक सुरुंग खणायला सुरुवात केली होती. वरती बुरुजावर लढणार्या मराठी सैनिकांस याचा काहीच अंदाज नव्हता आणि अखेर वेढ्याच्या पंचावनाव्या दिवशी मुघलांनी हा सुरुंग पेटवून दिला. चाकणचा बुरुज उडाला, कित्येक तोफा, सैनिक, बंदुका हवेत उडाल्या. सुरुंगामुळे पडलेल्या भगदाडातून किल्ल्यात घुसण्यासाठी मोघली सैन्य सरसावले पण त्यांचा मार्ग फिरंगोजी आणि त्यांच्या वीरांनी अडवला. मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि रात्रीपर्यंत शत्रूला किल्ल्याच्या आत येऊ दिले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा मोघलांनी हल्ला चढविला, मराठे पुन्हा लढू लागले. पण आता फिरंगोजींना कळले होते की, जास्त वेळ मराठे तग धरू शकणार नाहीत आणि त्यांनी किल्ला सोडला आणि उरलेल्या सैन्यासह ते राजांकडे निघून गेले.

फिरंगोजींच्या पराक्रमाची तारीफ खुद्द शाहिस्तेखानाने केली आणि त्यांना मोघलाईत येण्याचे सुद्धा सुचविले पण फिरंगोजींनी त्याला नकार दिला

#Ganimikava #JaiBhavani #JaiShivaji

सरखेल कान्होजी आंग्रे

गनिमीकावा - GanimiKava

सरखेल कान्होजी आंग्रे

आजही सागरी संरक्षण क्षेत्राचा तर विचार नौसेनाधिपती कान्होजी आंग्रे यांच्या आरमार नीतीचा अभ्यास न करता पुढे जाता येत नाही . एक आदर्श आरमार कसे असावे याचा वस्तूपाठच आंग्रेंनी जगाला दाखवून दिला आहे.
सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.

१७०२ – कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.

१७०६ – जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.

१७१० – ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (आताचे खांदेरी) कब्जा.

१७१२ – मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज पकडले. ३०००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.

१७१३ – ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.

१७१७ – ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल. ६०००० रुपयांची खंडणी वसूल केली.

१७१८ – मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.

१७२० – ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.

१७२१ – अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा हल्ला असफल.

१७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला.

१७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यावेळी सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते.

अशा या महान योध्याला मानाचा मुजरा .

#KanhojiAngre #Alibaug #JaiBhavani #JaiShivaji #GanimiKava

Tuesday 28 July 2020

राजमाता जिजाऊसाहेब भोसले (इ.स.१५९८-१६७४)

राजमाता जिजाऊसाहेब भोसले (इ.स.१५९८-१६७४)
स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजी जाधव यांच्या पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई हिच्या पोटी झाला. शिक्षण-तत्कालीन सुखवस्तू मराठा मुलीनप्रमाणे जिजाऊंचे योग्य संगोपन करण्यात आले.तिला दांडपट्टा, अश्वारोहण वैगरे युद्ध कलांचे शिक्षण देण्यात आले.राज्यकारभाराचेही प्रशिक्षण मिळू लागले.जिजाउं चा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांचेशी दौलताबाद येथे डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटाने संपन्न झाला जिजाउंना एकूण सहा अपत्ये झाली. त्यापैकि चार मृत्यू पावली. संभाजी व शिवाजी हे दोन होत. शहाजीं नी जिजाऊ ना शिवनेरीवर किल्ल्यात सुरक्षित ठेवले. येथेच १९ फेब्रुवारी १६३० साली जिजाउने शिवाजीस जन्म दिला.बाल शिवबाच्या लहानपणापासूनच जिजाऊ त्यांच्या गुरु बनल्या.जिजाऊ स्वतः राजकारण,युद्धकलेत पारंगत असल्याने त्यांनी बाल शिवबाला ते सर्व शिक्षण दिले.शहाजी राजांच्या गैरहजरीत बाल शिवबाच्या संगोपनापासून ते स्वराज्याचा कारभार जिजाऊनी मोठ्या कौशल्याने पार पडली.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली होती. शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट,आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ भोसले !!!
जिजाऊंनी स्वराज्याचे दोन छत्रपती घडविले, त्याचबरोबर महाराणी येसूबाई या देखील जिजाऊंच्या छत्रछायेत वाढल्या होत्या.

स्वराज्यसंकल्पक महाबली शहाजी महाराज.


स्वराज्यसंकल्पक महाबली शहाजी महाराज.
शहाजी महाराज यांची साऱ्या भारताला ओळख झाली,ती भातवडीच्या युद्धात गाजवलेल्या पराक्रमामुळे.केवळ भारतच नव्हे,तर अगदी परदेशामधूनही,म्हणजे पोर्तुगालवरूनही शहाजी महाराजांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे.निझाम मूर्तझाला मांडीवर घेऊन शहाजी महाराजांनी एकछत्री अंमल प्रस्थापित केला.तत्कालीन मुघल आणि आदिलशाही राज्यात शहाजी महाराज यांविषयी आणि त्यांच्या पराक्रमाविषयी कमालीचा आदर होता.
तसे पाहता,शहाजी महाराज हे कोण राजे नव्हते.पण त्यांची राहणी,त्यांची दिनचर्या ही पूर्णपणे स्वतंत्र राजासारखी होती. ‘राधामाधवविलासचंपू’ मधली शहाजी महाराजांची वर्णने वाचल्यास,एखाद्या स्वतंत्र राजासारखे त्यांचे सारे कामकाज चाले,हे लक्षात येईल. शहाजी महाराजांनी सर्वात जास्त प्रदेश जिंकला तो दख्खनेत,आदिलशाही कार्यकाळात.आणि या लढाई स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज हे विधान सार्थ करायला पुरेशा आहेत..!!
इ.स.1637 ला झक्केरी येथे भद्रप्पा नाईक याचा पुत्र वीरभद्र यासोबत शहाजी महाराजांचे युद्ध झाले.यामधे शहाजी महाराजांनी वीरभद्रचा पराभव केला.त्याकडून अर्धे राज्य आणि 18 लाख होण खंडणी वसुल केली.पण त्याचे राज्य खालसा केले नाही ना त्याला मृत्युदंड दिला. इ.स.1639 मधे बंगळूरवर आक्रमण करुन कैम्पागौडाला महाराजांनी परास्त केले आणि बंगळूरला महाराज स्थायिक झाले.तसेच,श्रीरंगपट्टनम येथील वोडियार घराण्यातील राजाला परास्त करुन मोठी खंडणी घेतली,पण राज्य खालसा केले नाही.बसवपट्टन येथेही मोठा विजय मिळवला. शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयात महाराजांना जिंकन्यास अवघड गेलेला एक किला म्हणजे वेल्लोरचा किल्ला..पण शहाजी महाराजांनी युद्ध करुन हा किल्ला जिंकला होता.
चिक्कनायकहल्ली,बेलूर,टुमकुर,कांदल,बाळापुर याही प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.पण हा सर्व भूभाग जिंकताना महाराजांनी कोणतेही राज्य आदिलशाही मधे विलीन केले नाही.उलट सर्वांना महाराजांनी आपले मांडलिक बनवले होते.यदाकदाचित दक्षिणेत उठाव करायचाच झाला,तर या सर्व राजांची मदत आपसूक महाराजांना मिळाली असती.हा फार मोठ्या राजकारणाचा भाग होता. शहाजी महाराज यांना बंगळूरचा प्रदेश फार आवडे आणि त्याच भागात शहाजी महाराज आणि थोरले संभाजी महाराज यांनी स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरुप देण्याचे ठरवले होते.ही सारी त्याचीच तयारी होती.एवढेच नव्हे,तर अफझलखानाने जेव्हा शिवरायांवर आक्रमण केले होते,तेव्हा स्वताः शहाजी महाराज विजापुर वर फौज घेऊन आक्रमण करण्यास सज्ज होते.काहीतरी गैरमेळ झाला आणि हे राजकारण तडिस गेले नाही.यावेळेस शहाजी महाराज यांच्यासोबत असलेली 17,000 फ़ौजेचे बळ आले कुठून? महाराजांनी बराच प्रदेश जिंकला,पण कुणालाही शिक्षा न देता आपले मांडलीकत्व मान्य करायला लावले,हेच यामागचे कारण..!!
शहाजी महाराज पराक्रमी होते,शूर होते,उत्तम प्रशासक होते.एका स्वतंत्र हिन्दू राजाप्रमाने त्यांची राहणी होती.आदिलशाही दरबातरातही त्यांना उच्च दर्जा होता आणि त्यांच्या पराक्रमाचा दरारा फार होता.स्वराज्याचे रोपटे लावन्याचे काम केले ते शहाजी महाराजांनीच..आणि स्वराज्य ही संकल्पना शिवरायांच्या मनात रुजवणारे होते ते शहाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेब..!!
घरात एवढी पराक्रमी माता-पिता असताना शिवरायांना बाहेरून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असेल,हे मलातरी शक्य वाटत नाही..!!
स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांना मानाचा मुजरा.. #महाराजसाहेब
केतन पुरी #आम्हीच_ते_वेडे

यावनी आक्रमण: भाग - ४

यावनी आक्रमण: भाग - ४
postsaambhar :Prashant Babanrao Lavate-Patil ____________________
जर आपण भाग-३ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग-४ वाचण्या आगोदर भाग-३ नक्की वाचून घ्यावा. भाग-३ ची लिंक खाली दिलेली आहे.
https://m.facebook.com/groups/1770059159878452?view=permalink&id=1999859963565036
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मागील भागात आपण पाहिले की गझनीच्या (गझनवी) महमुदाचा उदय कसा झाला आणि त्याने भारतावर किती आणि कशा स्वाऱ्या केल्या. लगातार २५ वर्षे भारतावर सतत आक्रमण करणारा हा पहिला यावनी माणूस ज्याने भारताला अक्षरशः हादरवून ठेवले. त्याला इथे राज्य नक्कीच करायचे नव्हते परंतु भारत म्हणजे त्याच्या तिजोरीची चावी होता. जरी भारतावर त्याने सत्ता प्रस्थापित केली नसली तरी त्याच्या स्वारींचे परिणाम भारताला भोगावे लागलेच. त्याच्यामुळे अरबी/तुर्कांना भारतात येण्याचे मार्ग तोंडपाठ झाले. पंजाब प्रांत त्यांच्या ताब्यात असल्याने भारताच्या डोक्यावर पाय देऊन घरात घुसायचा एक वेगळाच आत्मविश्वास त्यांना मिळाला आणि यामुळे हिंदु खचले आणि अरब किंवा तुर्कांविषयी एक जबरदस्त भीती भारतीयांच्या मनात बसली ज्याचा फायदा पुढच्या यावनी शासकांनी घेतला.
■ गझनींचा अंत व घोरींचा उदय
यावनांच्या प्रत्येक घराण्याला लागलेला एक शाप म्हणजे बापानंतर मुलांची सत्तेसाठी भांडणे आणि त्यातून एकमेकांची मुंडकी कापणे, सत्तेसाठी बापालाच कैद करणे किंवा ठार मारणे, किंवा एखाद्या सरदाराने संधीचा फायदा घेत स्वतःच्या हातात सत्ता घेणे. यातुन पराक्रमी गझनीचा महमूदसुद्धा सुटला नाही. महमूदाला दोन मुलं होती. "मसूद (मस्ऊद)" आणि "महंमद". हे दोघेही एकाच दिवशी जन्माला आलेले होते परंतु वेगळ्या मातेंच्या पोटी असे म्हंटले जाते. यापैकी, मसूद हा अतिशय क्रूर व बलशाली होता. त्याची वृत्ती ही खूप राक्षसी होती. महंमद मात्र खूप हुशार, संयमी व शांत वृत्तीचा होता, म्हणून महमूदाने महंमदला गादीवर बसवले. पण महमुदाच्या मृत्यूनंतर चित्र बदलले व मसूदने महंमदचे डोळे काढून त्याला कैद केले व स्वतः गादीवर बसला. पुढे त्याने १४ वर्षे राज्य केले. मसूद होता आडदांड पण पराक्रमीसुद्धा होता. अतिशय जिद्दी व रागीट स्वभावाचा असल्याने सेना नेहमी त्याला दचकून असायची. १०३३ साली त्याने काश्मीरमधील 'सरस्वती' नामक किल्ला जिंकला व त्यानंतर गझनीमध्ये त्यांने अतिशय सुंदर वाडा बांधून एक रत्नजडीत सिंहासन तयार करून घेतले. पुढे १०३९ त्याने भारतावर दुसरी स्वारी केली व कर्नाळ जिल्यातील 'हांसी' हा किल्ला त्याने जिंकला. आता राजकीय चित्र बदलत चालले होते. गझनीवर हल्ला करून त्यावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न तुर्कांनी सुरू केला होता. हे मध्य आशियातील तुर्क. अमुदर्या नदीच्या काठी हे तुर्क मेंढ्या राखण्याचे काम करत होते ते सोडून आता ते राज्यकारभारात शिरले व १०३८ साली 'खुरासान' प्रांतात त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले. यावेळी त्यांचा सरदार होता 'तुघ्रल बेग'. हे तुर्कांचे बंड मोडून काढण्यासाठी मसूदने खुरासन प्रांतावर हल्ला केला. तुघ्रल व मसूदमध्ये जबरदस्त लढाई झाली व यात मसूदचा पराभव झाला. इकडे गझनीमध्ये सुद्धा बंड सुरू झाला होता. भारतात असलेली मसूदची फौजसुद्धा त्याच्यावर उलटली होती (दुसऱ्या स्वारीच्या वेळी म्हणजे १०३९ साली त्याने त्याचा मुलगा मौदुद यास लाहोरमध्ये ठेवले होते). हे सर्व पाहून लोकांनी पुन्हा आंधळ्या महंमदला गादीवर बसवले आणि त्याचा मुलगा अहंमद राज्य कारभार पाहू लागला. याच अहंमदाने आपल्या बापावर झालेल्या अन्यायाचा बदला घेत मसूदला ठार केले. (सन १०४०). अशाप्रकारे मसूदने १०३० ते १०४०, म्हणजे १० वर्षे गझनीवर राज्य केले. पुढे जाऊन सुलतान मौदुद याने इ. स. १०४१ ते १०४९ राज्य केले. मग पुढे त्याचा मुलगा मसूद आला त्यालाही त्याच्या भावाने बाजूला केला आणि त्याचा भाऊ म्हणजे अबुल हसन गादीवर आला. मग अबुल हसनचा मुलगा अबुल रशीद गादीवर आला पण याला एकच वर्षे राज्य करता आले. मसूदचा मुलगा फारूकजाद याने त्याचा पाडाव केला व पुढे त्याने ६ वर्षे गझनीवर राज्य केले. १०५८ ला तो मेला व त्यानंतर त्याचा भाऊ इब्राहीम गादीवर आला व त्याने १०९८ पर्यंत गझनीवर शांतपणे राज्य केले. या वाघाला ४० मुलगे व ३६ मुली होत्या. यालापन एक आडदांड मुलगा होता तो म्हणजे मस-ऊद त्याने पुढे सत्ता हातात घेतली परंतु तो हिंदुस्तानात कधी आला नाही. पुढे मस-उदाच्या मुलाने म्हणजे असलॉर्न त्याच्या भावांना बाजूला करून गादीवर आला. याचवेळी तुर्क सुद्धा पुढे उभे होते आणि त्यांच्यापुढे हा टिकला नाही. आता याचेही त्याच्या भावांशी वाकडे होते आणि याला बाजूला करण्यासाठी त्याच्या भावांनी आपला मामा सुलतान संजर याची मदत घेतली परिणामी असलॉर्नला गझनी सोडून पळून जावे लागले. संजरने मग असलॉर्नचा भाऊ बहराम यास गादीवर बसवले.
बहरामने पुष्कळ वर्षे राज्य केले (इ. स. १११८ ते इ. स. ११५२). मग त्याचा मुलगा खुश्रू गादीवर आला.७ वर्षे राज्य करून हा ही ११६० ला मरण पावला. महमूदापासून म्हणजे इ. स. ९९७ पासून ते अगदी खुश्रू मलिक म्हणजे इ. स. ११८२ पर्यंत गादीसाठी फार मोठी गुंतागुंत आहे. स्वतःच्या बापाला, एकमेकांच्या भावांना मारणे आणि सत्ता काबीज करणे.
एकंदरीत गझनीच्या सुलतानांनी महंमुदाच्या नंतर जवळपास दीडशे वर्षे राज्य केले. यामध्ये बहुतेकजन धार्मिक होते. इब्राहिम व बहराम यांनी अनुक्रमे चाळीस व पस्तीस वर्षे राज्य केले. पुढे जी मुस्लिम राज्ये भारतामध्ये स्थापन झाली त्यातल्या बऱ्याच जणांनी यांची नक्कल केली. महमूदाच्या पुढच्या पिढीची वंशावळ मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टसोबतच्या फोटोमध्ये आपण पाहू शकता.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घोरी ....
गझनीच्या वायव्येला 'घुर' नावाचा एक डोंगरी मुलुख होता. या डोंगरी भागात फक्त अफगाण नावाचे लोक राहत होते जे मूळचे हिंदू होते. या सर्वांना गझनीच्या महमुदाने मुस्लिम केले होते. हा डोंगरी प्रदेश बराच काळ गझनीच्या सुलतानांकडे होता. महामुदाच्या मृत्यूनंतरचे बहुतांश सुलतान हे दुबळे निघाले. शेवटी-शेवटी हीच संधी साधून घोरी सरदार पुढे आले आणि त्यांनी गझनीचा पूर्ण पाडाव करून स्वतःची सत्ता स्थापन केली.
खर तर यांनी इ. स. ११५७ पासूनच गझनीविरुद्ध बंड पुकारला होता. इ. स. ११८२ ला शेवटचा गझनीचा सुलतान 'खुश्रू मलिक' मेला. त्याच्या आगोदर सुलतान खुश्रू जो गझनी सोडून लाहोरला आला होता आणि तिथे त्याने छोटेसे राज्य वसवले होते. सात वर्षे राज्य करून ११६० ला तो मेला. म्हणजे, 'खुश्रू मलिक' हा गझनीच्या सबुक्तगीनच्या वंशाचा शेवटचा सुलतान होय (वंशावळ पहावी). घोरी मंडळींनी ११५७ च्या आसपास गझनी जिंकून घोरी सुलतानांचे राज्य स्थापन केले. यांनी भारतावर अनेक (५ ते ६) स्वाऱ्या केल्या.
■ "महंमद घोरी" उर्फ "शहाबुद्दीन घोरी"
अला-उद्दीन ज्याने गझनी जिंकले, गझनी जिंकल्यावर तो परत गेला व गाफील राहिल्याने सुलतान संजर याच्या हातून तो कैद झाला. पण पुढे त्याची सुटका झाली व त्याचे राज्य त्याला परत मिळाले.
याला "सैफ-उद्दीन" म्हणून एक मुलगा होता व "ग्यास-उद्दीन" आणि "शहाबुद्दीन" असे दोन पुतणे होते. आपल्या मुलाला राज्य मिळावे म्हणून अला-उद्दीनने आपल्या दोन्ही पुतन्यांना कैद केले व मुलाला सुलतान बनवले. आता सैफ-उद्दीन सुलतान झाला होता. याने एक भयानक चूक केली ती म्हणजे आपल्या चुलत भावांना सोडवले. "ग्यास-उद्दीन" आणि "शहाबुद्दीन" यांनी सुटका होताच या दोघांनी "सैफ-उद्दीन"चा खून केला व राज्य स्वतःच्या हाती घेतले. विशेष म्हणजे या दोघांनी राज्याची वाटणी करून एकमताने राज्य केले. असे उदाहरण मुस्लिम राजवटीत एकमेव आहे. "ग्यास-उद्दीन" पश्चिमेकडील प्रांताचा कारभार पाहत होता तर "शहाबुद्दीन" पूर्वेकडील प्रांताचा भाग पाहत होता. "शहाबुद्दीन" पूर्वेकडे असल्याने त्याला भारतात यायचे होते. "ग्यास-उद्दीन" मात्र पश्चिम प्रांतात राहिला त्याने पूर्वेकडे कधीही लक्ष घातले नाही. पुढे इ. स. १२०२ साली "ग्यास-उद्दीन" मरण पावला आणि संपूर्ण राज्य "शहाबुद्दीन" कडे आले. शहाबुद्दीनने पुढे "महंमद" असे नाव धारण केले. आणि हाच तो "महंमद घोरी" उर्फ "शहाबुद्दीन घोरी" ज्याने इ. स. ११९२ च्या स्वारीत दिल्लीचा शेवटचा हिंदू राजा पृथ्वीराज चौहान यांचा अंत केला.
घोरींचा भारतावरच्या स्वाऱ्या नेमक्या कशा झाल्या आणि पृथ्वीराजांचा अंत कसा झाला हे आपण पुढच्या भागात पाहू.
#जागर_इतिहासाचा #यावनी_आक्रमण #अरब_तुर्क_आक्रमण #प्रबल

यावनी आक्रमण: भाग २





यावनी आक्रमण: भाग २

postsambhar :Prashant Babanrao Lavate-Patil... ___________________

जर आपण भाग-१ वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर आपणास तो वाचायला मिळेल.
भाग-२ वाचण्या आगोदर भाग-१ नक्की वाचून घ्यावा. भाग-१ ची लिंक खाली दिलेली आहे.
https://m.facebook.com/groups/1770059159878452?view=permalink&id=1993525404198492
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
यावनी आक्रमण भाग-१ मध्ये आपण पाहिले, की भारताच्या वायव्य सरहद्दीवर जी प्रामुख्याने तीन हिंदू राष्ट्रे होती त्यामध्ये काबुल आणि झाबुल यांनी अरबांना जवळ-जवळ अडीचशे वर्षे कडवी झुंज दिली. परंतु अंतर्गत कलह आणि दुबळे नेतृत्व यामुळे याकूब लायेथ या एका डाकूच्या हातून ही दोन्ही राष्ट्रे संपुष्टात आली. आता एकमेव हिंदू राष्ट्र उरले होते ते म्हणजे "सिंध".
काबुल आणि झाबुल जिंकल्यावर अरबांचे लक्ष सिंधकडे जाणे हे स्वाभाविक होते. सिंध म्हणजे भारताचे प्रवेशद्वार किंवा भारताचे नाकच म्हणा. सिंध भागात घुसण्यासाठी दोन मार्ग होते. एक जमिनीवरचा जो खैबरखिंडीतून खुष्कीचा मार्ग आणि दुसरा म्हणजे समुद्री मार्ग जो पश्चिमी समुद्रातून होता. अरबांनी सिंधवर दोन्ही मार्गांनी स्वाऱ्या केल्या.
सिंधची राजधानी त्यावेळी 'अलोर' येथे होती. राज्याचा विस्तार म्हणजे अवाढव्य होता. इथे साहसी नावाचा राजा होता जो मौर्यवंशीय होता असे सांगितले जाते. सातव्या शतकाच्या सुरुवातीला 'पहिला साहसी' राजा इराणच्या मिमरुज नावाच्या सरदारकडून मारला गेला. पुढे त्याचा मुलगा 'रायसाहसी दुसरा' हा गादीवर आला परंतु त्यावेळी सिंधमध्ये राज्यक्रांती झाली. चच नावाच्या प्रधानाने त्याला ठार मारून स्वतः गादीवर आला. त्याने बराच पराक्रम करून सिंधच्या सीमा चारीबाजूला वाढवल्या व अनेक बंडखोरांचा नायनाट केला. पुढे इ. स. ६७२ च्या सुमारास चच मरण पावला. गादी मिळवण्यासाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष झाला व शेवटी "दाहर" नावाचा मुलगा गादीवर आला.
अरबांनी ज्यावेळी काबुल- झाबुल नंतर आपला मोर्चा सिंधकडे वळवला त्यावेळी सिंधचा राजा होता "दाहर". अंतर्गत कलह, यादवी युद्धे यामुळे राज्याची परिस्तिथी कमकुवत झाली होती. अरबांचे आक्रमण थोपवण्याचे सामर्थ्य दाहर मध्ये उरले नव्हते. याचा फायदा अरबांनी घेण्याचे ठरवले. याकाळात बगदाद येथे खलिफा वालीद राज्य करत होता. त्याला भेटण्यासाठी काही मुसलमान यात्रेकरू बहुमोल खजाना घेऊन सिंधूसागरातून इराणकडे जात होती. वादळी वारे सुरू झाल्यामुळे त्यांची जहाजे सिंधू नदीच्या पश्चिमेस असलेल्या देबल बंदरात केवळ सुरक्षिततेसाठी थांबली होती. परंतु समुद्री लुटारूंनी ही जहाजे लुटली. देबल बंदरात त्यांना सुरक्षा मिळायला हवी होती जी तिथल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती पण तसे झाले नाही. ही गोष्ट ज्यावेळी खलिफाला समजली त्यावेळी इराणचा सुभेदार हज्जाज याने सिंध राजा दाहरकडे नुकसानभरपाई मागितली पण ती देण्यास दाहरने नकार दिला. हे कारण पुढे करून अरबांनी सिंधविरुद्ध मोहीम सुरू केली. काही ठिकाणी याला हिंदूविरुद्ध जिहाद पुकारला असे नमूद केले आहे. या मोहिमेची सूत्रे होती मुहम्मद बिन कासीम याच्याकडे जो हज्जाजचा भाचा व जावई होता.
६००० (काही ठिकाणी १५००० उल्लेख आहे जिथे दाहर राजाचे सैन्य १ लाख होते असे सांगितले जाते) अरब घेऊन त्याने देबलवर हल्ला केला. 'लोलगदा' व 'भडिमार' या यंत्रांच्या साह्याने त्याने किल्ल्याची तटबंदी पाडण्यास सुरवात केली तरीही दाहरने देबलच्या रक्षणासाठी मदत पाठविली नाही. परिणामी, देबल दाहरच्या हातून गेले. देबलवर कबजा मिळताच कासीमचे लोक शहरात घुसले. बघता बघता कासीमने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घालायला सुरवात केली आणि शेवटी तो राजधानीत घुसला. इथे मात्र हिंदू सैन्यांनी जबरदस्त प्रतिकार केला आणि अरब सैन्यांची दाणादाण उडवली. एकवेळ अशी आली की कासीमला माघार घेऊन पळून जावे लागेल. पण दुर्दैव होते ते दाहरच्या सैन्यांच्या मानसिकतेचे. दाहरला लढताना एक बाण लागला आणि तो खाली पडला आणि सैन्य सैरावैरा पळू लागले.
■ दाहरची राणी "महाराणी लाडी":
भारताच्या इतिहासात स्त्रियांनी तलवार हातात घेऊन राज्य राखण्यासाठी शत्रूला अंगावर घेतले हे बहुदा सिंधमध्ये पहिल्यांदाच घडले असावे. दाहर जखमी होऊन लढता-लढता मरण पावला. कासीमला विजय पुढे दिसत असतानाच एक रणरागिणी मैदानात उतरली आणि अरबांना तिने सळो की पळो करून सोडले. एक महाराणी आपल्या राजाच्या मृत्यूनंतर रणांगणात उतरली हे पाहून आणि तिचे रौद्ररूप पाहून एकवेळ कासीम सुद्धा आश्चर्यचकित झाला असावा. आपली महाराणी मैदानात लढते आहे हे पाहून सैन्य सुद्धा जिकरीने लढत होते परंतु अरबांच्या ताकदीपुढे महाराणी लाडीचे काही चालले नाही. पराजय पुढे दिसताच अरबांच्या अत्याचाराला बळी जायचं नाही आणि आपली निष्ठा व परंपरा या खातीर तिने शेवटी जोहार केला. आणि एका पराक्रमी महाराणीचा अंत झाला.
या युद्धामध्ये "महाराणी लाडी" सोबत राजा दाहरची बहीण "पद्मा" ही सुद्धा रणांगणात लढत होती असे काही ठिकाणी उल्लेख आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~
■ कासीमच्या आक्रमणाच्या अनुषंगाने दोन गोष्टी सांगितल्या जातात ज्या सिंधच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या.
१) देबलमध्ये एक मंदिर होते ज्याच्या कळसावर एक ध्वज होता. आणि त्या ध्वजात काही मंत्रसाधन केले होते आणि जोवर तो ध्वज शाबूत आहे तोवर देबल बंदर सुखरूप आहे असे मानले जाई. हे कळताच, कासीमने तो ध्वज कळसासकट पाडला आणि यामुळे तिथली जनता कासीमला स्वतःहून शरण गेली.
२) दाहरचे सैन्य कासीमला जोरदार प्रतिकार करत होत. मागे हटायचे नाव घेत नव्हत. ज्यावेळी कासीमला युद्ध जिंकणे अवघड वाटू लागले त्यावेळी एका मंदिराचा पुजारी फितूर झाला आणि त्याच्या मदतीमुळे कासीम युद्धामध्ये पून्हा वर्चस्व मिळवू शकला.
३) दाहरच्या सेनेपुढे कासीमच्या सेनेचे काहीच चालेना. दाहरच्या सेनेत आपले लोक घुसवण्यासाठी कासीमने आपले काही सैन्य हिंदू स्त्रियांच्या वेशभूषेत दाहरकडे पाठवले व त्यांनी दाहरला विनंती केली की अरबांपासून आमचे रक्षण करावे. हे पाहून, राजा दाहरने त्यांना आपल्या सैन्याच्या मध्यभागी ठेवले व त्यांच्या रक्षणाचे वचन दिले. स्त्रियांच्या रुपात लपलेले अरबांना सुरक्षित स्थळी घेऊन जात असताना त्यांनी राजा दाहरच्या सेनेवर अग्नीबानाचे हल्ले केले ज्यात दाहर जखमी होऊन खाली पडला आणि खाली पडताच राजा दाहरचे अरबांनी तुकडे तुकडे केले.
यानंतर कासीमने जो अत्याचार केला तो काळजाचा थरकाप उडवणारा होता. एखादा मनुष्य एवढाही क्रूर असू शकतो हे कदाचित या भारतीय जनतेने प्रथमच पाहिले असावे. या स्वारीची वर्णने जी उपलब्द आहेत त्यावरून कासीमने इथे आल्यावर नेमके काय केले याची माहिती मिळते.
• मंदिरांचा विध्वंस करणे • अगणित लोकांच्या कत्तली करणे • बायका व तरुण लोकांना गुलाम म्हणून कैद करणे • स्त्रियांवर शारीरिक अत्याचार करणे • स्त्रियांना गुलाम म्हणून पळवून नेण्यात आले • प्रजेवर जिझिया कर बसवणे • संपूर्ण राज्याची अक्षरशः राख रांगोळी केली
हे सर्व व त्याहून अधिक भयंकर प्रकार त्याने केले. सुदैवाने कासीम सिंध प्रांताअलीकडे आला नाही त्यामुळे त्याच्या स्वारीचे परिणाम व नुकसान भारताच्या इतर भागाला भोगावे लागले नाहीत. आणि ज्यांनी ज्यांनी कासीमला खंडणी देण्याचे मान्य केले त्यांचा छळ त्याने केला नाही. त्यामुळे कासीमची स्वारी इतर इस्लामी आक्रमानांच्या तुलनेत जास्त नुकसान न करणारी वाटते.
~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~
■ दाहरच्या मुलींचा मुत्सद्दीपणा
दाहरराजाच्या दोन मुली कासीमच्या हाती सापडल्या. कासीमने दाहर राजाचे डोके आणि त्याच्या दोन मुली 'सूर्यदेवी' आणि 'परमालदेवी' या दोघींना कैद करून कासीमने खलिफाला भेट म्हणून पाठवले. ज्यावेळी खलिफा या दोघींना जवळ घेण्यासाठी पुढे सरकला त्यावेळी या दोन्ही मुलींनी खलिफाला सांगितले की "कासीमने आम्हाला तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवण्या आगोदर आमचं पावित्र्य नष्ट केले आहे". हे ऐकून खलिफा भडकला आणि आपल्या दूतांना सांगून कासीमला चामड्याच्या पोत्यात घालून आपल्या पुढे हाजीर करण्याचा आदेश दिला. यात कासीमचा मृत्यू झाला. या डावपेचातुन या दोघींनी कासीमचा मृत्यू घडवून आणला आणि बापाच्या मृत्यूचा बदला घेतला. शेवटी, स्वतःला खलिफापासून वाचवण्यासाठी या दोघींनी एकमेकांना मारून टाकले.
~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~~~~~~~~
काबुल, झाबुल आणि सिंध ही हिंदू राष्ट्रे अरबांनी पूर्णतः संपवली. या दोन भागात हा इतिहास संक्षिप्तपणे मांडण्याचा प्रयत्न केला. जर यावर विचार केला तर हिंदूंनी प्रतिकार केला नाही असे अजिबात नाही. खूप कडवा प्रतिकार केला आणि अनेकवेळा अरबांना धूळसुद्धा चारली. पराक्रमात हिंदू कुठेच कमी पडले नाहीत. असे असूनही मग ही हिंदू राष्ट्रे का संपुष्टात आली हा विचार करण्यासारखा विषय आहे. या पराभवाची कारणमीमांसेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण लपले आहे असे मला इथे प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते.
अरबांना जेवढा कडवा प्रतिकार काबुल, झाबुल आणि सिंधने दिला तेवढा प्रतिकार कधीच कोणत्या राज्याने केलेला आढळत नाही. आशिया, युरोप व आफ्रिका खंडातील राज्ये अरबांना अगदी सहजपणे बळी पडले. अरबांच्या विरुद्ध काबुल-झाबुल सव्वा दोनशे ते अडीचशे वर्षे लढले. सिंध ७५ वर्षे लढले. पंजाब १५६ वर्षे लढले. याउलट सीरिया एका वर्षात कोसळले (इ. स. ६५६). इराणचे बलाढ्य साम्राज्य पाच वर्षात धुळीस मिळाले. इराक लढलेच नाही. विशेष म्हणजे अरबांनी जी जी राष्ट्रे जिंकली तिथली संस्कृती धुळीस मिळवली, धर्म पूर्णपणे नष्ट केला परंतु हे त्यांना भारतात जमले नाही.
क्रमशः
#यावनी_आक्रमण #अरब_तुर्क_आक्रमण #जागर_इतिहासाचा #प्रबल

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...