विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 28 February 2019

तंजावर- मराठीचा दक्षिण भारतात सदैव फडकणारा झेंडा


तंजावर- मराठीचा दक्षिण भारतात सदैव फडकणारा झेंडा

स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेमुळे एक राज्य म्हणजे एक प्रमुख भाषा व संस्कृती असे समीकरण लोकांच्या मनात दृढ झाले. त्यामुळे भारतातील भाषांच्या भौगोलिक व सांस्कृतिक पसाऱ्याचीही त्या अनुषंगाने पुनर्मांडणी झाली

लेखक - निखिल बेल्लारीकर

स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेमुळे एक राज्य म्हणजे एक प्रमुख भाषा व संस्कृती असे समीकरण लोकांच्या मनात दृढ झाले. त्यामुळे भारतातील भाषांच्या भौगोलिक व सांस्कृतिक पसाऱ्याचीही त्या अनुषंगाने पुनर्मांडणी झाली. परिणामी फक्त दोनतीनशे वर्षांपूर्वी मराठी लोक महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेरही भारताच्या कानाकोपऱ्यात विखुरले होते याची कल्पनाही आज करणे खूप जणांना अवघड जाते कारण सध्याचीच स्थिती जुन्या काळीही होती असे अप्रत्यक्षपणे मानले जाते. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी समाज आणि भाषेचा इतिहास या काल्पनिक सीमारेषांना उधळून देणारा आहे याची थोडी जरी जाणीव झाली तरी पुष्कळ आहे.

इ.स. १६४० च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे महाराष्ट्रातून कर्नाटकातील बेंगळुरू येथे ते स्थायिक झाले ते इ.स. १६६४ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत ते कर्नाटक प्रांतीच होते. त्यांच्या आगमनामुळे तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील कन्नड व तमिळ मुलुखात मराठी लोकांचा ओघ यायला सुरुवात झाली. त्यातही हा ओघ पुढे सर्वांत जास्त होता तो तंजावर भागात. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांनी इ.स. १६७६ साली बेंगळूरूहून तंजावरावर स्वारी केली आणि तो प्रदेश ताब्यात घेतला. पुढे दक्षिणदिग्विजय मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनीही तंजावरच्या उत्तरेचा बराच मुलूख ताब्यात घेतला. पण काही दशकांत मराठ्यांना तो मुलूख सोडावा लागला. तुलनेने तंजावरचे राज्य मात्र पुढे इ.स. १८५६ पर्यंत, म्हणजे सुमारे १८० वर्षे टिकले.

व्यंकोजीराजांनी तंजावरच्या मराठी सत्तेचा पाया घातला. त्यांचे पुत्र शहाजीराजे हेही मोठे पराक्रमी निघाले. त्यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार सांभाळला आणि दक्षिणेत दबदबा निर्माण केला. काही थोडे अपवाद वगळता त्यांच्या पुढचे राजे तितके प्रभावी नव्हते. अर्काट, रामनाड, मदुरै, इ. जवळची राज्ये आणि चंदासाहेबासारखे हल्लेखोर यांना तोंड देण्यात तंजावरची खूप शक्ती खर्च पडली. राज्य वाचविण्यासाठी वेळप्रसंगी दुसऱ्याचे मांडलिकत्वही पत्करावे लागले. परिणामी ते राज्य महाराष्ट्रातील मराठी राज्यासारखे वर्धिष्णु राहिले नाही. पुढे इंग्रजांशी केलेल्या कराराने तंजावरचे उरलेसुरले स्वातंत्र्यही गेले आणि अखेरीस इ.स. १८५५ साली राजे दुसरे शिवाजी यांचा मृत्यू झाल्यानंतर ब्रिटिशांनी "दत्तक प्रतिबंधक कायद्या" अन्वये तंजावर राज्य खालसा केले. त्यासोबतच अतिदक्षिणेतील मराठी सत्तेचा अंत झाला.
मराठ्यांच्या इतिहासात राजकीय इतिहासावर सर्वांत जास्त भर दिल्यामुळे फक्त त्याच दृष्टिकोनातून पाहिल्यास तंजावरच्या राज्याबद्दल फारसे अनुकूल मत होत नाही. परंतु असे असले तरी या छोट्या राज्यात जे संस्कृतीसंवर्धन झाले त्याची बरोबरी क्वचितच अजून कुणाशी होऊ शकेल. सामाजिकदृष्ट्या पाहिल्यास यातील अनेक पदर दिसून येतात. व्यंकोजीराजांच्या अगोदरचे राजे तेलुगु होते. त्यामुळे तेलुगु भाषेला विशेष महत्त्व होते. मराठेशाहीत मराठीलाही तसेच महत्त्व आले. अगोदरच्या राजांची भाषा म्हणून तेलुगु, सध्याच्या राजांची भाषा म्हणून मराठी, आणि बहुसंख्य जनतेची भाषा म्हणून तमिळ अशा तीनही भाषा तंजावरच्या दरबारात एकत्र नांदत होत्या. स्वत: व्यंकोजीराजे हे उत्तम व्युत्पन्न होते आणि त्यांनी तेलुगु भाषेत रामायणही रचले होते. तंजावरचे बहुतेक मराठे राजे साहित्यप्रेमी होते. साहित्य, विविध कला, शास्त्रे, इ. सर्व पैलूंना तंजावर दरबारात मानाचे स्थान होते.

इ.स. १७९८ ते इ.स. १८३२ हा काळ सांस्कृतिकदृष्ट्या तंजावरचा सुवर्णकाळ होता. या काळात सर्फोजी दुसरे हे राजे होते. श्वार्झ नामक एका डॅनिश मिशनरींच्या प्रेरणेने त्यांना मद्रास इथे रेवरंड विल्हेल्म गेरिक यांनी शिक्षण दिले . युरोपीय शिक्षणाचा सर्फोजीराजांवरती खूप खोलवर परिणाम झाला. आपल्या राज्यात अनेक नवीन सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. त्यांना मराठी, तमिळ, तेलुगु, उर्दू, संस्कृत, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, डच, डॅनिश व ग्रीक आणि लॅटिन इतक्या विविध भाषांचे ज्ञान होते. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात तब्बल चार हजार पुस्तके होती. विलासात वेळ न घालवता ते युरोपहून प्रत्येक वर्षी विविध प्रकारची आधुनिक पुस्तके मागवीत असत.

सर्फोजीराजांनी इ.स. १८०७ मध्ये छापखाना सुरू केला आणि त्यात कैक पुस्तके छापली. त्यातच इसापच्या कथांचे सर्वांत जुने मराठी भाषांतरही आहे! अनेक ग्रंथांची त्यांनी मराठीत भाषांतरे करवून घेतली. स्वत:ही कैक ग्रंथ लिहिले. तत्कालीन भारतातील राजेमहाराजांपैकी छापखाना सुरू करून काही वर्षे चालवणारे ते पहिलेच होते. त्यांना वैद्यकशास्त्रातही तितकीच गती होती. ते स्वत: डोळ्यांची शस्त्रक्रिया करीत आणि त्याची निरीक्षणे नोंदवून ठेवत. त्यासंबंधीचे अनेक मोडी कागदपत्रही उपलब्ध आहेत. त्यांच्या या कार्याची दखल २०१२ सालच्या "इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी" या जर्नलमध्ये "ऑप्थॅल्मिक काँट्रिब्यूशन्स ऑफ राजा सर्फोजी" नामक शोधनिबंध लिहून घेतली गेली आहे.

कर्नाटक शास्त्रीय संगीताची मुख्य त्रिमूर्ती मानले जाणारे त्यागराज, मुत्तुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री हे तिघेही तंजावरच्या राज्यातील तिरुवारूर गावातले होते. यांपासून संगीत शिकून त्यात अनेक नवनवीन रचना करणाऱ्यांमध्ये "तंजावूर नाल्वर" अर्थात "तंजावर चौकडी" या नावाने ओळखले जाणारे चार भाऊ होते- चिन्नय्या, पोन्नय्या, शिवानंदम आणि वडिवेलु. हे चारही भाऊ सर्फोजीराजांच्या पदरी होते. यातील वडिवेलू यांनी प्रथम तंजावरला असताना दाक्षिणात्य संगीतसभांमध्ये व्हायोलिन वाजवण्याची प्रथा पाडली. आजही दाक्षिणात्य संगीतात व्हायोलिनला महत्त्वाचे स्थान आहे. भरतनाट्यमलाही तंजावरच्या राज्यात उत्तेजन दिले जात होते.

विद्या-कलांसोबत आपल्या घराण्याचा इतिहासही चिरस्थायी होईल याची सर्फोजीराजांनी काळजी घेतली होती. तंजावरमध्ये राजराजा चोळ याने इ.स. १०१५ साली अख्ख्या ग्रॅनाईटमध्ये बांधलेले एक शंकराचे देऊळ आहे - "बृहदीश्वरर कोईल" या नावाने ते ओळखले जाते. भव्यता ही या देवळाची खासियत आहे. देवळाची उंची दोनेकशे फूट, जवळपास कुतुब मिनार एवढी आहे. त्यावर शेकडो शिलालेख आहेत. त्या देवळाच्या भिंतीवर १८०३ साली डिसेंबर महिन्यात सर्फोजीराजांच्या प्रेरणेने एक अतिभव्य मराठी शिलालेख कोरण्यात आला. तो पुढे "भोसलवंशचरित्र" या नावाने प्रसिद्ध झाला. यात शहाजीराजांपासून ते सर्फोजीराजांपर्यंत एकूणच भोसले घराण्याचा इतिहास आलेला आहे. शिलालेखाची लांबी सहज दीडदोनशे मीटर असेल. अखिल भारतातील हा सर्वांत मोठा शिलालेख आहे.

तंजावरच्या राज्यात अनेक "कुरवंजी" अर्थात नाटकांची निर्मिती झाली. अनेक कुरवंजी मराठीत असत. मराठी नाटकांची निर्मिती विष्णुदास भाव्यांपासून झाली हे विधान महाराष्ट्रापुरते ठीकच आहे, परंतु तंजावरातील कुरवंजी पाहिले तर दिसून येते की हा उगमाचा काळ भाव्यांपेक्षा शंभरेक वर्षे तरी सहजच मागे जातो. देवेंद्र कुरवंजीसारख्या सर्फोजीकृत नाटकात भूगोलाचेही वर्णन येते. त्यातला सूत्रधार आपल्या बायकोला जगात किती खंड आणि त्यात किती देश आहेत ते सांगत असतो. युरोपात "इंग्ल्यांड स्काटल्यांड ऐसे देश" आहेत असे सांगतो तेव्हा ते वाचून मौज वाटल्याशिवाय रहात नाही.

सर्फोजीराजांनी सरस्वती महाल नामक ग्रंथालयाची स्थापना केली. यात प्रामुख्याने मराठी, तमिळ, तेलुगु व संस्कृत भाषांमधील हजारो ग्रंथ आहेत. त्या ग्रंथसूचीचेच पन्नासेक खंड आहेत. शिवाय मोडी लिपीतील लाखो कागद आहेत. तमिळ विद्यापीठ तंजावर व सरस्वती महाल या दोन्ही ठिकाणी मिळून कमीतकमी दहा लाख मोडी कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यांपैकी खूप थोड्या कागदपत्रांचा अभ्यास आजवर झालेला आहे. जुन्या पद्धतीने ग्रंथालयाची रचना केलेली असल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांचे हुद्दे "तमिळ पंडित", "मराठी पंडित", असे आहेत. तिथे अनेक संशोधक येऊन काम करतात. ग्रंथालयाची स्वत:ची प्रकाशनसंस्थाही असून त्याद्वारे अनेक ग्रंथ आजवर प्रकाशित करण्यात आलेले आहेत. तंजावर भागात रामदासी पंथाचेही अनेक मठ खूप अगोदरपासून आहेत. पैकी भीमस्वामींचा मठ तंजावर शहरातच आहे. शिवाय अन्य जवळपासच्या शहरांतही कैक मठ आहेत.

(तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयातील प्राचीन ग्रंथ)
तंजावरचे राज्य खालसा झाल्यावरही कैक वर्षे तिथे महाराष्ट्रीय मंडळींची संख्या काही लाखांपर्यंत होती. त्यांमधील काही लोक पुढे बडोदा इ. संस्थानांचे दिवाणही झाले. पुढे नोकरीधंद्यापायी खूप कुटुंबांनी स्थलांतर केल्यामुळे आजमितीस खुद्द तंजावर शहरात मराठी लोकांची संख्या कमी आहे- हैदराबादेतही कैक तंजावरी मराठी समाज आहे. तरी ते आपल्या प्रथापरंपरांना घट्ट धरून आहेत. विशेषत: शिवजयंती आणि गणेशोत्सव हे दोन सण मराठी समाज दणक्यात साजरे करतो. तमिळनाडू मराठा असोसिएशनसारख्या संस्थांच्या माध्यमातून समाजाकरिता अनेक कामे करण्यात येतात. विशेष उल्लेखनीय म्हणजे तंजावरी मराठी भाषा जपण्याकरिता त्यांनी "माजा गाव" नामक व्हिडिओ पॉडकास्ट काढलेले आहे. महाराष्ट्रातून खूप जुन्या काळी स्थलांतर केल्यामुळे तंजावरी मराठीचे रूप आजच्या मराठीपेक्षा अतिशय वेगळे आहे. बोलायचा लहेजा बऱ्यापैकी दाक्षिणात्य आहे, शब्दसंपदाही अंमळ जुन्या वळणाची आहे. ऐकायला ती भाषा फार गोड वाटते.

तंजावरच्या राजघराण्यानेही आपला सांस्कृतिक वारसा जपण्याकरिता प्रयत्न केलेले आहेत. बृहदीश्वरर मंदिराच्या व्यवस्थापनापासून त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. तंजावर मराठा पॅलेसमध्ये त्यांचे एक खाजगी संग्रहालयही आहे. सध्याचे युवराज प्रतापसिंह राजेभोसले यांनी "कॉट्रिब्यूशन्स ऑफ तंजावर मराठा किंग्ज" या नावाचे पुस्तकही लिहिले आहे. महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर, ऐन तमिळ मुलुखात शेकडो वर्षे राहून, स्थानिक भाषा व संस्कृतीशी जुळवून घेत आपली वेगळी ओळख कायम राखणाऱ्या आणि मराठीचा झेंडा आजही तिथे फडकत ठेवणाऱ्या सर्व तंजावर मराठी बंधुभगिनींचा अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हा जुना स्नेहबंध अजून दृढ व्हावा अशी अशा करायला हरकत नाही. अफाट तांत्रिक प्रगतीच्या या काळात ते सहज शक्यही आहे. गरज आहे ती खुल्या दिलाने आपला इतिहास जाणून घेऊन तो जपण्याची.

(लेखक इतिहास अभ्यासक असून पुण्यात टीसीएस कंपनीत नोकरी करतात).

नेताजी पालकरांचे पुढे काय झाले

नेताजी पालकरांचे पुढे काय झाले !
छत्रपती शिवरायांच्या कालखंडात घोडदलाचे प्रमुख म्हणून तुकोजी मराठा, माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पैकी प्रति शिवाजी म्हटले गेलेल्या नेताजींची कारकीर्द सर्वांत प्रदीर्घ असून शिवरायांनी नेमलेले स्वराज्याचे ते पहिले सरनोबत. शिवरायांच्या जीवनातील खडतर मोहिमा म्हणजे अफझलखान स्वारी, पन्हाळ्याचा वेढा, उंबरखिंडीतील कारतबलखान व रायबागनची केलेली फजिती, शाहिस्तेखानावरील छापा, सुरतेवरील पहिली स्वारी व पुरंदरचा तह या सर्वच मोहिमांत नेताजी पालकरांनी सेनापती म्हणून अद्वितीय अशीच कामगिरी केली आहे. उंबरखिंडीत गाठून फक्त दगडांचा वर्षाव करून त्याने मोगलांना शरण आणले होते तर शाहिस्तेखान पुण्यात ठाण मांडून बसलेला असताना नेताजींनी परंड्याच्या किल्ल्यावर आक्रमण करून मोगलांना गनिमी काव्याचा धडा दिला होता.
नेताजी पालकरांच्या मूळ गावाविषयी इतिहासकारांत एकवाक्यता नसली तरी काहींच्या मते कराडजवळील खंडोबाची पाली हे त्याचे मूळ गाव असून पालकर घराण्यातील विश्वासराव हे या परिसरातील पिढीजात देशमुख असून पुढे ते रत्नागिरी जिल्ह्यातील चौक या गावी राहण्यासाठी गेले. मात्र या दोन्ही ठिकाणी त्यांच्याविषयी कुठलीही माहिती उपलब्ध होत नाही. परंतु याच वेळी काष्टी (तांदळी), ता. शिरूर, जि. पुणे या ठिकाणी मात्र नेताजी पालकरांच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा आढळून येतात. त्यानुसार काष्टी गावामध्ये ३२ गुंठ्यांवर नेताजींचा भव्य वाडा होता. पालकरांची काही घराणी गावामध्ये आहेत. त्यांचा नेताजीशी थेट संंबंध लागतोच, असे ठामपणे सांगता येत नाही.
शिवरायांच्या स्वराज्य उभारणीतील पहिल्या प्रत्येक संकटात नेताजींनी प्रचंड पराक्रम गाजविला. म्हणूनच शत्रूंनी त्यांना प्रति-शिवाजी ही पदवी दिली. प्रत्येक मोहिमेत उत्तुंग यश मिळवीत असताना शिवरायांना मिर्झाराजा जयसिंहाने पुरंदरच्या युद्धात हार स्वीकारायला भाग पाडले. साहजिकच छत्रपती शिवाजी महाराज नेताजी पालकरांसह मोगलांच्या बाजूने आदिलशहाविरोधात लढत असताना दोघांमध्ये काही तरी गैरसमज निर्माण होऊन नेताजी पालकर निजामाला जाऊन मिळाले. या वेळी विजापूरच्या आदिलशहाने त्यांना खमम परगण्यातील जमकोरची जहागिरी बहाल केली; परंतु मोगलांचे दक्षिणेतील सुभेदार मिर्झाराजांनी लगेचच नेताजीला आपल्याकडे वळवून ५ हजारांची मनसब आणि तामसा (ता. हदगाव, जि. नांदेड) या परगण्यातील ५५ गावांची जहागिरी दिली.
नेताजी पालकर मोगलांच्या सेवेत गेले त्याच वेळी शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटले. त्यामुळे नेताजी पालकर पुन्हा एकदा शिवरायांना जाऊन मिळाले तर...! औरंगजेबाला याची धास्ती होती. नेताजीचा मुक्काम या वेळी धारूर (जि. बीड) येथील किल्ल्यात असताना भूम, जि. उस्मानाबाद गावात तळ देऊन असणा-या मिर्झाराजा जयसिंहाच्या आदेशावरून नेताजी पालकरला अटक करून दिल्लीला नेण्यात आले. १५ फेब्रुवारी १६६७ साली औरंगजेबाने त्याला जबरदस्ती मुस्लिम बनवून त्याचे नाव महम्मद कुलीखान ठेवले.
नेताजीला तीन बायका असून पैकी दोन त्याच्यासोबत राहिल्याने त्यांनाही धर्म बदलावा लागला. एक जण महाराष्ट्रातच राहिल्याने तिने आपला धर्म राखला. नेताजी आपल्या प्रांतात परत जाऊ नये म्हणून औरंगजेबाने नेताजीला काबूल-कंदहार प्रांतात स्वारीवर नेमले. दहा वर्षे तो मोगलांच्या सेवेत होता. ‘असे होते मोगल’ या ग्रंथाचा कर्ता व मोगलांच्या तोफखान्याचा प्रमुख जातीने इटालियन असणारा निकोलाव मनुचीने नेताजीवर लेखन करताना म्हटले आहे की, मी स्वतः नेताजीसोबत मोगलांच्या चाकरीत असून नेताजीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पकडला जाऊन त्याला जबर शिक्षा करण्यात आली. पुढे नेताजीने औरंगजेबाचा विश्वास संपादन केला. या दहा वर्षांच्या कालखंडात स्वराज्यात अनेक घडामोडी घडल्या होत्या. ६ जून १६७४ ला शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला होता. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता बादशहाने आपला सेनापती दिलेरखानाला मोठी फौज देऊन शिवरायांवर पाठविले तेव्हा मराठी मुलुखाचा माहीतगार म्हणून बादशहाने त्याच्यासोबत महम्मद कुलीखान म्हणजेच नेताजीला पाठविले.
दहा वर्षांनंतर नेताजीचे पाय स्वराज्याला लागले आणि त्यांच्या मनात आठवणींचे काहुर माजले. या वेळी त्यांचा मुक्काम गोवळकोंडा परिसरात होता. जिवाची पर्वा न करता नेताजी थेट स्वराज्याकडे निघाले. ते थेट रायगड गाठून शिवरायांसमोर उभा राहिले. पुरंदर तहात हरल्यामुळे नेताजीला आदिलशाही चाकरीत पाठविणे हा राजांचा कदाचित डाव असू शकतो. परंतु राजे आग््रयात अडकले तर नेताजी धर्मात अडकले. आता दोघांच्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या. दोघांना आधार देणा-या जिजाऊसाहेब जगात राहिल्या नव्हत्या.

Thursday 21 February 2019

#शिवशाहीच्या स्थापनेची सुरवात

#शिवशाहीच्या स्थापनेची सुरवात

हि कथा आहे शिवशाहीच्या स्थापनेच्या सुरवातीच्या काळातली.
बाल शिवाबाराजानी नुकतीच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती.आई साहेबानी पुणे परत चांगल्या रीतीने वसवले होते. रायगड जवळ कोंडावळे गावात आईसाहेबांच्या एका नातलगाचे लग्न होते.त्यामुळे आईसाहेब शिवबा राजांना घेऊन त्या लग्नाला गेलेल्या होत्या. रात्री लग्नाची वरात निघाली होती.राजे स्वत; एकटेच काही अंगरक्षकांना घेऊन ते पाहायला गेले होते .
वराती समोर झान्झ्पाथक ,लेझीम वाले खेळ करून दाखवत होते. पण एक दांडपट्टेबाज बहाद्दर असा काही पट्टा फिरवत होता जणू सुदर्शन फिरवावे असे.
चारी बाजूनी लोक त्याचावर लिंबू फेकत होते ..पण त्या लीम्बुचे तुकडे होऊन पडत होते ... चांगला दीड दोन तास झाला तरी हा बहाद्दर हसत हसत पट्टा फिरवत होता.....
बाल राजांच्या घारी नजरेतून हा हिरा कसा निसटेल?
...राजांनी तान्हाजीला सांगितले ..तान्हा ..बोलाव त्या पट्टेबाजाला..
क्षणात तान्हाजी त्याला घेऊन आले .
राजे बोलले ...काय नाव तुमचे धारकरी ? गाव कोणते ?करता काय ?
म्या जिवाजी महाले .... कोंडावळे गावातला न्हावी हाय म्या......
पट्टा कुठ चालवायला शिकलास ?
माझ्या बानं शिकवलंय ...त्यो शहाजीराजांच्या फौजत हुता ..दंगलीत पायावर वार बसला त्येच्या ..कायमचा अधू हून घरात बसलाय ...त्येनच शिकवलंय.. हौस म्हणून..
राजांनी क्षणभर विचार केला ..येणार आमच्याबरोबर पुण्यात ?
जिवाजी हसले अन म्हणाले..तिकड येऊन काय कारायाच ?
आम्ही सांगाल तेव्हा पट्टा फिरवायचा ...आणि लिंबू ऐवजी मुडकी उडवायची गानिमांची ..करशील ?
व्हाय व्हाय राजा..मी येणार ,माझ्या बा ची लय इच्छा हाय मी शिलेदार व्हावा म्हणून ..मी नक्की येणार....
राजे हसले ..त्यानी तान्हाजीरावना हुकुम दिला...
तान्हा याच्या घरी जा...त्यांच्या घरी सगळे समजावून संग..काय हवा नको ते बघ..घराची व्यवस्था लाव..आणि जीवाजीरावना सोबत घेऊन या......
जिवाजी महाले ..घरी जावा आणि सांगा तुमच्या वडिलांना..की मी स्वराज्याचा शेलेदार झालोय.....
अशा रीतीने राजांनी एक एक माणूस निरखून स्वराज्यात दाखल करून घेतले..पुढे याच जीव महालेने सय्यद बंद सारख्या निष्णात पट्टे बाजाचा हात वरचा वर उडवला.....अशी होती शिवबा राजांची पारखी नजर.....उगाच स्वराज्ये निर्माण होत नाहीत..त्याला राजा असा असावा लागतो

कोंडाजी फर्जंद

#कोंडाजी फर्जंद

मोहीम सांगितली की ती फत्ते व्हायची! मग यशाचा तुरा मिरवायला खोवायचा कोणाच्या डोक्यात? तर ज्याने फत्ते केली त्याच्याच ना! सोन्याचे कडे हाती घालायचे! कोणाच्या -तर, जो जिंकून आलाय् त्याच्या! पण, महाराजांना तशी संधी कोणीच दिली नाही! मोहीम फत्ते करणारे मोहिमेवरून परतलेच नाहीत!! गेले ते गेलेच गेले!! बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड पावन केली. परत आलेच नाहीत. महाराजांनी स्वत:च्या हाताने बाजींच्या चितेस अग्नी दिला. बाजी नव्हते हातात सोन्याचे कडे घालून घ्यायला. दुसरा देशपांडा तसाच धारातीर्थी पतन पावला. त्याचे शिर धडा वेगळे झाले पण, शरीर लढतच राहिले. हा आवेग होता! दिलेरखानाने त्याला लाच देऊन पाहिली होती; तेव्हा मुरारबाजी संतापाने लाल झाला! हा खान महाराजांची माणसे फितवायचा प्रयत्न करतो म्हणजे काय!! मुरारबाजी देशपांड्यांच्या हाती महाराजांना कडे चढवायचे होते. पण, ‘‘धनी जोहार अमुचा घ्यावा’’ म्हणून पुरंदरावरले तीनशे रामोशांचे सैन्य या देशपांड्यास घेऊन गडावर गेले. तिथेच अग्नी दिला. कडे राहिले; हातात घालायचे! कुटुंबकबिल्यास सोन्याचे कडे देऊन गौरव थोडाच होणार होता; ते तर सांत्वन होते! या झाल्या देशपांड्यांच्या हकिकती! पण, मालुसर्‍यांचा तान्ह्या सगळ्या सिंहांचा सिंह; ‘‘लेकराच्या लग्नाचे ते काय! हा काय; गेलोच आणि फत्ते करून आलोच!’’ कॉन्फिडन्सने तान्हाजीराव कोंढाण्यावरती गेले. किल्ला सर झाला पण ते गेले. धारातीर्थी शयन पावले!! सिंहांचा राजा गेला! अन् अशा एक-ना-अनेक; किती तरी गोष्टी आहेत. बेधडकपणे जटिल मोहीम यशस्वीपणे पार पाडून सुखरूप जिवंत परत येऊन दाखवायला ते शिवाजी महाराज थोडीच होते!! --हे आपण आज म्हणतो. पण, तेव्हा महाराजांना वाटले की, मोहिमेवर धाडण्यापूर्वीच हाती सोन्याचे कडे घालावे!
अरे, देवा! हा काय अघोरीपणा! तर, मोहीम सांगायची म्हणजे डेथ वॉरंटच जारी करण्यासारखे झाले!! सांगा मोहीम की मेलाच सहकारी!! कोंडाजी फर्जंदाच्या हाती महाराजांनी मोहिमेच्या आधीच कडे घातले! कोंडाजीसही कळले. आता आपण मेल्यात जमा म्हणून महाराज आपल्या हाती सोन्याचे कडे घालताहेत. हसला तो. कसासाच हसला. कसनुसा हसला!!
पन्हाळा घ्यायचा? घेतला जाईल, याची गॅरंटी काहीच नाही. पन्हाळा घ्यायच्या वेळी खुद्द महाराजांना तो जमला नाही. ‘‘समयास पावला नाही’’ म्हणून सरसेनापती नेताजी पालकरास महाराजांनी तडकाफडकी डिसमिसच करून टाकले त्यावेळी! नेताजी म्हणजे प्रतिशिवाजीच! त्याची हकालपट्टी. सर्वोच्च पदावरून! तीन हजार नेले होते. पैकी एक हजार मावळे या पन्हाळ्याशी झुंजताना मारले गेले. पळून जावे लागले महाराजांना सुसाट! पन्हाळगड ते विशाळगड हे पलायन दुसर्‍यांदा झाले होते. पहिल्याने सिद्दी जौहाराच्या वेढ्यातून महाराज सहाशे मावळ्याांनिशी निसटले होते. तेव्हा पन्हाळ्याच्या वीरांना सुखाचा श्‍वास घेता यावा म्हणून महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीस देऊन टाकला होता आणि आपल्या करारी कडव्या मावळ्यांची सुटका करवून घेतली होती. पन्हाळा असा सुखासुखी सुखावणारा किल्ला नाही; किंबहुना रडवणाराच आहे.
‘तेव्हा’पासून हा पन्हाळा पारतंत्र्यात होता. तो नसण्याचा सल चित्तांत होताच. कोणास भिडेस पाडावे पन्हाळ्याच्या! महाराजांना प्रश्‍नच होता. ते कोणताही ‘मोहरा’ गमवावयास तयार नव्हते. पण, पन्हाळा तर हवाच होता. पन्हाळ्याशिवाय चोखटपणे दक्षिणेचे रक्षण करता येणे मुष्कील होते. पन्हाळा म्हणजे तसल्ली होती! दिलासा होता इतर किल्ल्यांना!
कोंडाजी फर्जंद मुजर्‍याला आला. त्याच्या ध्यानात आले की, महाराज टेन्शनमध्ये आहेत. विचारात आहेत. कोंड्याला सांगायला काहीच हरकत नव्हती. तो थोडाच होता जाणार. किती कठीण मोहीम होती पन्हाळ्याची! तर हे राव म्हणाले, ‘‘हात्तेच्या, महाराज! येवढेच ना! मी जातो न् गड सर करून आणतो की, आपल्या स्वराज्याच्या कदमांत!!’’
‘‘कोंढ्या, तू!! अन् पन्हाळा घेतो म्हणतोस!!’’
‘‘जी, महाराज! आपल्या चित्तीच्या मुळाशी असलेलं दुखणं काढणं ह्येच तर आपल्या मावळ्यांचं काम!!’’
‘‘किती लागतील, सोबत? पाचशे पुरे होतील?’’
‘‘कसापायी येवढे?’’
‘‘तीनशे?
‘‘आं! येवढंच म्हंता तर द्या पन्नाससाठ! --येवढे बी नगत!!’’
कोंडाजी फर्जंद साठ मावळ्याांनिशी निघणार अन् पन्हाळा सर करणार. एवढी हास्यास्पद गोष्ट त्यावेळी तरी दुसरी नव्हती! डोळे टिचले नाहीत, पण महाराजांना भरून आले असले पाहिजे! त्यांनी आपल्या हातातले सोन्याचे एक रत्नजडित कडे काढले अन् कोंढ्याच्या हातात घातले! कोंडाजीने संकोच करून पाहिला. पण, त्यास उमगले. महाराज आपल्याला अखेरचा निरोप देत आहेत!! कडे घालून घेतले आणि कसनुसा हसला.
मी कॉलेजात असताना पहिला पोवाडा लिहिला तोच कोंढाजीचा!--
‘‘शिवराय मूर्त धैर्याची| कीर्त प्रतापाची| शर्थ शौर्याची|
जिवाचे जीव सौंगडी त्यास |३ जीऽजीऽजीऽऽऽऽ॥
आरं पन सवंगडी कसे?
कसे?-- कोंडाजी सारखे!!
कोंडाजी फर्जंद रणमर्द| दुष्मना सर्द| करी घनगर्द|
युद्ध पन्हाळ्यास|
घेतले फक्त साठ सैन्यास!!
फते केली अस्मानी खास जीऽजीऽजीऽऽऽ॥
--बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या जाणता राजा या मराठी नाटकात हा पोवाडा माझ्या नामनिर्देशासह घातला आहे! प्रतापराव गुजरांवरील ध्वनिफितीतही पहिली कहाणी रचली ती कोंडाजीचीच! पुढे हिंदी जाणता राजाची सगळी गाणी मजकडून लिहवून घेतली!
‘‘बाजुबंद चुभे बाजु में
नथनि बाल में...
...मेरी मैना तू आऽऽ
मेरी रानी तू आऽऽ
जान ए जान आ आजा ऽऽ’’
--हिंदी जाणता राजात मी लावणी रचली ती, किल्ल्यावरल्या रंगरलियांत कोंडाजी सामील होऊन गनिमी कावा खेळतो त्याची!
हा बहाद्दर असा की त्याने ते सोन्याचे कडे तर आपल्या अंगावरून उतरून ठेवलेच; पण, सोन्याची एकवीस फुले स्वतंत्रपणे तयार करून घेतली होती; आपल्या कमाईतून! का? नातवाच्या अंगावर मायच्या हाताने उधळायला? तर, मुळीच नाही! पन्हाळा सर केल्यावर महाराज व्हिजिट करतील... महाराज गडावर अश्‍ववेगाने शिरताच द्वारावरल्या कोंढ्याने त्यांच्या अंगावर ती सोन्याची फुले उधळलीच!!
ते सोन्याचे कडे हातात घालण्याचे नव्हतेच मुळी. शोकेसमध्ये ऑनर अवॉर्ड म्हणून ठेवण्याचे होते. स्वरायाच्या दुर्घट मोहिमेवर निघाले की स्वातंत्र्यवीर मरतातच असे नाही. जगतातही!!
--हो! कोंढाजीने अत्यंत अवघड पन्हाळा, पूर्ण कडा चढून, लीलया घेतला. तो मेला नाही म्हणून कोणाला तो माहीत नाही. मेला असता तर त्याचे डिंडिम वाजले असते!

छत्रपती शिवाजी महाराज एक भूगर्भ शाश्रज्ञ-


छत्रपती शिवाजी महाराज एक भूगर्भ शाश्रज्ञ-

आज आपण शेतीत 300 फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही परंतु आज 400 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्यावर गेलो तर 4000 फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते/दिसते. तीही कुठलीही मोटार किंवा पाईपलाईन नसतांना.
छत्रपती शिवाजी महाराज एक इंजिनिअर –
प्रत्येक किल्ल्यावर 2 प्रकारचे हौद/टाके- ओपन आणि भूगर्भात
किल्यावर पाण्याचे हौद/टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा/सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्या ऐवजी नैसर्गीक साधनांचा वापर करून खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम गुण्यात/आयताकृती आहे.
याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. ते पाणी स्वच ठेवण्यासाठी नैसर्गीक तंत्राचा वापर केला जायचा.
पाण्याचे टाके खडकाच्या कपारीला ५० ते १५० फुट पर्यंत खोल कोरलेले आहेत. त्यांना आतल्या बाजूला स्टेप दिलेल्या आहेत. एक स्टेप/टप्पा साधारण 25 फुट व जास्त लांब आहे.
छत्रपती शिवराय “स्वराज्य स्थापनेचा” विचाराशी सहमत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. स्वराज्यावर आक्रमण करणारे, फंदफितुरी करणारे मग ते शत्रू असतील, घरातील, स्वराज्यातील, कुठल्या जातीधर्माचे आहेत याचा विचार न करता त्यांना कठोर शासन केले.
जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री/नर्तकी नाचली नाही, स्वतःसाठी मोठमोठे महाल बांधले नाहीत, सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज “रयतेच स्वराज्य” असाच शब्द वापरत.
महाराज्यांच्या अष्टप्रधान मंडळात -
८ मंत्री
३० विभाग (12 महाल व १८ कारखाने)
३० विभागात ६०० कर्मचारी
महाराजांकडे येणाऱ्या केसेसचा समोरासमोर निकाल.
रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम.

युद्धाची पार्श्वभूमी आणि शिवरायांची धामधूम

युद्धाची पार्श्वभूमी आणि शिवरायांची धामधूम -

शिवरायांनी शके १५७७ पौष महिन्यात जावळी जिंकली.हाती लागतील तेवढे मोरे कापले.चंद्रराव,हणमंतराव,बाजीराव,कृष्णराव या मोरे बंधूंना मारण्यात आले.
पुढेमागे जावळीत गडबड होऊ नये म्हणून खबरदारी साठी जावळीच्या वरच्या अंगाला असलेल्या 'ढोपर्या ' डोंगरावर किल्ला बांधला,प्रतापगड ऎसे नाव दिले.
नंतर जुन्नर आणि नगर कडे शिवरायांनी मोर्चा वळवला,बरीच धुमाळी झाली पण फारसे यश लाभले नाही.
या भागात युवराज औरंगजेबाने नौसीर खान नावाचा सुभेदार ठेवला होता तसेच बंदोबस्तहि चोख होता त्यामुळे माघार घेऊन तहाची बोलणी करावी लागली.रघुनाथ बल्लाळ यांच्या हस्ते औरंगजेबाला पत्र पाठवले त्याचे उत्तर असे आले.
"तुमच्या पेश्जीच्या गोष्टी विसराव्याजोग्या नाहीत, तथापि तुम्ही तुमच्या कृतकृत्यांचा पश्चाताप केला असे समजोन पूर्वकृत्य मनात आणत नाही "
असे सांगून ५०० घोडेस्वार देत बादशाही नोकरीत आमंत्रित करत शिवरायांना ऑफर लेटर देऊन तो लगबगीने (शहाजहान आजारी असल्याने) उत्तरेस गेला .तरीसुद्धा जाताजाता त्याने मीर जुमला(शाही सरदार) व अली आदिलशाहास तंबी दिली कि "शिवाजीवर लक्ष ठेवा,तुमचे किल्ले त्याने बळकाविले आहेत ते सोडवा अथवा तुम्हास त्याच्या नोकरीची अपेक्षा असेल तर त्यास दक्षिणेस पाठवा".
बादशहाची करडी नजर राहू नये म्हणून शिवरायांनी १६५९ जून मध्ये औरंगजेब गादीवर बसला तेव्हा सोनोपन्तांबरोबर एक अर्जदास्त राज्यारोहण प्रसंगी पाठवली त्यास उत्तर म्हणोन उंची पोशाख आणि उत्तर पाठवले.
औरंगजेबाने दिलेली तंबी आदिलशहाने बरीच मनावर घेतली कारण बरेच सरदार दरबारात शिवरायांविषयी कागाळ्या करत यात अफझल आघाडीवर होता,वाई प्रांत आणि आसपासचा मुलुख सर्वात जास्त शिवरायांकडून प्रभावित होता...येथील वतनदार राजांच्या बाजूने फिरले त्यामुळे महसूल नीट येत नव्हता,तसेच राजांच्या सैन्याचा वारंवार त्रास होत असे.वळवाचा पाउस येतो तशी शिवाजीची माणसे येतात आणि जातात हाती कोणी लागत नाही त्यामुळे हे काम पत्करण्यास कोणीही तयार नव्हते.वाईचा सुभेदार म्हणून हि कामगिरी अफझलखानच्याच माथ्यावर आली तो कबूल हि झाला. मोहिमेला जाण्यापूर्वी तो आपल्या कोणी अवलिया फकिराला भेटायला गेला होता तेथे फकिराने त्यास अनिष्ट होईल असे सांगितले म्हणतात.
स्वारीवर जाण्यापूर्वी निर्वाणीचे उपाय म्हणून त्याने आपल्या ६३ बायकांना जीवे मारले...हाच आकडा काहीजण २०० हि सांगतात नक्की माहिती नाही. स्त्रियांना मारायचे कारण असे कि आपल्या नंतर त्यांनी काही बदमामल करू नये किंवा दुसर्या पुरुषास आपले सुखाचा वारीस करून आपल्या नावास बट्टा लावू नये.
या कबरी विजापूर जवळील अफजलपूर येथे पहावयास मिळतात.
अफझलखानाचा मोहीम मार्ग विजापूर -तोरवे-डोन-माणकेश्वर-करकंवभोस-शंभू महादेव-मलवडी-रहिमतपूर (भोसले बखर मध्ये खान भिमतीरी होता असा उल्लेख आहे, खानाने तुळजाभवानी ची मूर्ती जात्यात भरडली,पांडुरंगाची मूर्ती फोडली असे बखरकार सांगतात परंतु त्यास तत्कालीन पुरावे नाहीत)
अफझलखान हा १२-१५ वर्षे वाई चा सुभेदार होता,याने परगण्यातील कित्येत देवळांना,पुजार्यांना तसेच पूजेअर्चेसाठी सनदा दिल्याचे पुरावे आहेत.त्यातीलच एक पुरावा जोडला आहे.नरसोभट बिन रंगभट चीत्राऊ यास वडिलोपार्जित धर्मादाय सनद दिली...ती अफझलखानने पुन्हा नवी (renew) करून दिली !
युद्धानंतर कारागीर तुळजापूर ला पाठवून तुळजाभवानी प्रमाणेच मूर्ती प्रतापगडावर घडविण्यास महाराजांनी सांगितले होते,यावरून असे म्हणण्यास जागा आहे कि भवानीची मूर्तीला अपाय झाला नसावा.
शिवराय आणि खानाची सरदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी केलेली मुत्सद्देगिरी: पांढरे,घाटगे,घोरपडे,इंगळे हे लोक तर खानच्या बरोबर होतेच त्या बरोबरच खानाने मोठी गौरवाची पत्रे लिहून मावळातील लोक आपल्या बाजूने वळविण्यास सुरुवात केली.शिळीमकर,जेधे ,बांदल,जगदाळे,धुमाळ इ. लोकास आपल्या हस्तका मार्फत आपल्या बाजूने घेण्यास सुरुवात केली.शीळींमकरांचा तंटा शिवाजीने सोडवला होता त्यामुळे ते २ भाऊ शिवाजीच्या बाजूने आले तर विठोजी नाईक खानच्या बाजूला गेला.
तसेच मंबाजी भोसले ला खानाने ओढला तर बाबाजी भोसले ला चिठ्ठी लिहून शिवरायांनी बोलावून घेतले.अशी हि ओढाओढी दोन्ही बाजूने चालू होती पासलकर,ढोर (धुमाळ),मरळ,बांदल ,ढमाले यांना आपल्या बाजूने वळवून शिवाजीने त्यांस कडून शपथा घेतल्या !
या युद्धात २ मराठा महिलांनी हि प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे भाग घेतला,दीपाबाई बांदल आणि बबई खोपडे. दीपाबाई यांनी म्हसवडे या बांदल यांच्या कारभाऱ्या सोबत आपले सैन्य राजांच्या बाजूने लढायला पाठवले ,तर बबई खोपडेंनी आपले सैन्य खानाच्या बाजूने लढविले !
कान्होजी जेधे शिवरायांस मिळाले !
जेधे बाजी पासलकर यांचे जावई असल्याने जेधे आले कि पासलकर येतील असे खानाला वाटले, खानाने जेध्यांना आपल्या वाई प्रांत हवालदार त्र्यंबक कान्हो च्या कडून निरोप पाठवला.
"आपला जमाव घेऊन सिताबीने यावे,खर्चाची तरतूद स्थळी केली जाईल,आम्ही तायाघाट ओलांडून गेलो आहोत"
खान तोपर्यंत वाईहून निघोन कुसगाव,चिखली,तायाघाट ,गुव्हेघर,गुताड असे करत लिंगमळ्यापर्यंत पोचला.
खालील पत्र जेध्यांस खानकडून आलेले आहे, ते पत्र जोडून अजून एक पत्र जेध्यांनी शिवरायांना पाठवले व या कमी त्यांचा सल्ला विचारला.
जेध्यांना आलेले खानाचे पत्र जोडून जेध्यांनी शिवरायांना पाठवले
यावर महाराजांनी धूर्त उत्तर देत कळविले "तुमचा व खानाचा घरोबा आहे,तरी तुम्ही जावे अथवा पुत्रास पाठवावे,नीट कौलभाक घ्यावी...दगा होईल असे होऊ देऊ नये "
महाराजांवर विश्वास दाखवत जेध्यांनी शपथक्रिया आणि कौलफर्मान राजांना मागितले,कौल घेऊन जेधे आपल्या ५ मुलांसह राजगडी आले.
तेथेही राजांनी सुचविले "बादशाही हुकुम मोडून तुम्ही येईन राहिलेत,वतन आणि जीवास अपय होईल तिकडेच जाणे" ...राजांच्या शब्दातील खोच लक्षात येऊन
जेध्यांनी आपल्या वतनावर पाणी सोडले.
जेधे आपल्या बाजूने आल्यावर राजांनी खलबते करण्यास मोरोपंत,सोनोपंत,नेतोजी पालकर,निळोपंत,रघुनाथ बल्लाळ,गोमाजी नाईक पानसंबळ,सुभानराव नाईक इ. मातब्बर बोलावले.
नेतोजी पालकर यांना जावळी घाटमाथ्यावर व्यवस्था लावून दिली.
अशी दोहो बाजूस तयारी चालू असता, कृष्णाजी भास्कर पत्र घेऊन शिवाजीकडे आला...पत्राचा मतलब असा होता "सरकारातून मला तुमच्यावर मोहिमेसाठी धाडले आहे, परंतु तुमचा व माझं घरोबा लक्षात घेऊन तुमच्या सर्व कृत्यांची माफी विजापूर दरबारातून करून घेईन, तुम्ही म्हणाल तसं तुमचा बंदोबस्त लावेन, शहाजीराजांपेक्षा मोठा मरातब होईल "
पत्रातला छद्मीपणा राजांना कळला,त्यांनी कृष्णाजी भास्करास एक दिवस गडावर ठेऊन घेतले चांगली सरबराई केली.दुसर्या दिवशी जाताना बरोबर पंताजी गोपीनाथ (बोकील वकील) यांस पाठविले.
"खानाचे चित्त आमच्या बर्यावर आहे कि वाईटावर आहे याचा कसून शोध घ्या " असे बजावले व खानास निरोप धाडला "आपण जावळीला यावे...आमच्या मनात कपट नाही "
बोकीलांनी खानची एकांतात भेट घेतली "राजा कचदिल आहे,वाई ला येऊन भेट घेण्यास भितो " असे सांगून त्यास जावळी येण्यास राजी केले.भेट संपल्यावर बोकीलांनी खानाच्या लोकांस लाच-लुचपत देऊन खानाचा ठाव घेतला असता कळले कि खानाच्या मनात फार्मानाप्रमाणे काहीही करून शिवाजींस ठार मारणे आहे.पंतांनी लगोलग हि गोष्ट राजांना कळविली.
जिजाऊ मा साहेबांनी सुद्धा युद्धापूर्वी "मुसलमान बेईमान, खान राखीना तुम्हाला " असे बजावले होते.
अफझल खानाच्या गोटात राजांच्या हेरांचा सूळसुळाट होता,कोणी विश्वासराव नावाचा हेर रोज फकिराचा वेश घेऊन खानाच्या गोटात फिरत असे आणि ती खबर दरबारी पोचवत असे.
मजल दरमजल करत खान पार मुक्कामी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ला आला लगोलग राजांस त्याने भेटीचे वेळ आणि स्थळ ठरविण्यासाठी वकील पाठवला.
बुरुजाखालील माची भेटीचे ठिकाण ठरविले,शिवरायांनी त्या ठिकाणी सपाट जागेत उत्तम सदर तयार करण्यास अण्णाजी रंगनाथ तळेकर (कि मळेकर?) यांस सांगितले,
येण्याची वाट झाडे तोडून दगड हटवून सोपी करून दिली,पण जिथे जिथे वाट रुंद होती तिथली वाट जाणून बुजून अरुंद केली गेली कि जेणेकरून जास्त लोक एका वेळी येऊ शकणार नाहीत.
सदर - तयार केलेली सदर शाही इतमामास साजेशी होती. देरे,बिछाने, अस्मान्गिरी गिर्द्या ,तक्के ठेवून जागा सजविली होती.देर्यास चंद्रराई कळस सोन्याचे बसवले होते .मोत्याच्या झालरी लावल्या होत्या ,उंची मखमली पडदे होते.शामियान्यात एक चौथरा तयार करोन खाशांस बसण्याची व्यवस्था लावली होती.चौथरा ३३ फुट रुंद ,दक्षिणोत्तर ४० फुट असा होता. (१९२० सालापर्यंत चौथरा अस्तित्वात होता).
तयारी - सैन्य चौफेर पसरेल असे ठेवले होते,"चौकशीस हवालदार ,किल्लेदार,कारकून,कारखाननिस आदिकरून जातीने राहून चौकशी करावी,राखावी,यावे-जावे. वाड्यापर्यंत दरवाजाचे आत ठायी ठायी चौकी-पहारे असावे,दरवाज्यावरी-कचेरीनजीक तोफा ठेविल्या | बार होताच हुश्शार व्हावे " अशी ताकीद राजांनी दिली .
बुरुजाच्या आतल्या बाजूस पन्नास तोंडाशी शंभर, मोकळ जमिनीस शे-पन्नास अशी किल्ल्यावर व्यवस्था.तर किल्ल्याखाली व सभोवताली
व्यवस्था अशी होती. चंद्रगडावर जमाव ठेवला,हैबतराव व बालाजी शिलीम्कारास बोचेघोळ घाटी ठेवले, नेतोजी पालकर घाटमाथ्यावर थांबले,जावळीच्या अंगाला बांदल सैन्य थांबले.हिरोजी फर्जंद मंडपाजवळील दरडीत पन्नास माणसानिशी लपले.
"जाऊ जाणे येऊ नेणे ! अशी गत रदबदल्याची झाली " (चक्रव्युहात स्वताच अडकला)
त्या दिवशी ( मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी) ला सकाळी ब्राम्हण बोलावून द्रव्य,धर्म हस्तके,गोदाने दिली.केदारेश्वराची पूजा-प्रार्थना केली.
दुपारी दोनप्रहर सुमारास राजे सदरेस जायला निघाले- अंगात चिलखत वर जरीची कुडती,अस्तनीत नवटाकी पट्टा घातला.भवानी आईचे स्मरण केले.
मातोश्री जिजाउस भेटून जर दगाफटका झाला तर उमाजीस * राज्य द्यावे असा मानस केला.(उमाजी - शिवरायांचा वडिलभाऊ संभाजी यांचा पुत्र)
त्यावर जिजाउ साहेबांनी " काही वाकडे पडल्यास गर्दी जमवून शत्रूस बुडवावे राज्य रक्षावे" असा सल्ला दिला, जवळ जमलेल्या सर्व मातब्बरास नावाजून राजे म्हणतात "तुम्ही सर्व शूर-पराक्रमी आहा,आमची मदार तुमचेवरच,सर्वांनी शर्थ करावी राज्य तुमचेच आहे" .
इकडे खान दीड हजार बंदूकवाले घेऊन सदरेस निघाला त्याला असा येताना पाहून बोकीलांनी त्यास अडवले आणि "एव्हडा जमाव कशाला, राजा धाशात खाईल,वापस जाईल " असे सांगून सगळे हशम हटविले.
खान,कृष्णाजी भास्कर,सैद बंडा , कमलशा मुर्शेद आणि दोन हुद्देकारी सशस्त्र एवडेच सदरेपाशी आले. सैद बंडा ला सुद्धा बोकीलांना सांगून दूर करविले तो जाऊन सदरेबाहेर थांबला.खानाच्या पालखीचे ३२ भोई बाहेर थांबले .
इथे राजे जिऊ महाला आणि संभाजी कावजी सोबत सदरेपाशी आले.
(जीवा महाला - याचे पूर्ण नाव जीवा महाला सकपाळ जातीने न्हावी याच्या वंशजांना कोंडिवली गावी काही जमीन इनाम आहे.
संभाजी कावजी - याचे पूर्ण नाव संभाजी कावजी कोन्धालकर, धोम धरणापाशी कमळगडाजवळ पायाथ्यास यांचे गाव आहे , युद्धानंतर राजांकडे याने शिरवळ वा वाई च्या देशमुखीची आशा धरली त्यास नकार दिल्याने तो नंतर च्या काळात शास्ताखानास मिळाला )
प्रत्यक्ष भेट - उंच बळकट शरीराचा खान शामियान्यात आला खानासमवेत कृष्णाजी पंत व विठ्ठलपंत मरठेकर होते,तर महाराजानसोबत पंताजी बोकील होते.
खानाने कृष्णाजीला 'हाच शिवाजी काय' अशी पूस केली ,तसेच राजांनी बोकीलांना 'हाच खान काय ' विचारले.आगत स्वागत ओळख करून देण्यात आली.
दोघेही सामोरे गेले भेटीसाठी उभे ठाकले, खानाने शिवरायांची हि इतिहासप्रसिद्ध गळाभेट घेतली,तत्क्षणी खानाने राजांची मुंडी कवटाळून काखेखाली धरली ,राजीयास घेरी आल्यासारखे झाले.
खानाचे कमरेस भली मोठी जमदाड होती तिचे म्यान टाकून खानाने जमदाड राजांच्या कुशीस चालवली,आत चिलखत असल्याने खरखर आवाज झाला,वर अंगास लागला नाही.
वार झाल्याचे लक्षात येताच राजांनी चपळाईने पूर्ण बळ एकवटून बिचवा खानाचे पोटी मारला.एकांगी करून तडाख्याचा वार केला
(एकांगी - बगले कडून बाजूला सरून दुसर्या बाजूने जोर लावणे)
या तडाख्यामुळे खानाची आतडी बाहेर आली ,खान पंतास 'दगा केला दगा केला' म्हणू लागला.तेवढ्यात महाराजांनी खानवर दुसर्या हाताने पट्ट्याने वार केला त्यात खानाचे दोन भाग होऊन खान पडला.
कृष्णाजी पंताने फिरंग काढून राजांवर वार टाकला पण तो बसला नाही,तेव्हा कृष्णाजी पंताने भोयास आत बोलाविले,त्यानी खानास गोळा करून पालखीत भरला व पालखी पळवू लागले.या गोंधळात सैद बंडा आत आला आणि त्याने पट्ट्या चा वार राजांवर टाकला,तो अडवून राजांनी उलट पट्ट्याचा वार बंडा वर केला. तो चुकवून पुन्हा पट्ट्याचा वार करण्यास सैद बंडा ने जवळीक केली तसा जीवा महालाने पुढे सरसावत फिरांगीने बंडा चा हात कापला. तसच जीवा आणि संभाजी कावजी शामियान्याबाहेर गेले आणि खानाची पालखी घेऊन पळणाऱ्या भोयांचे पाय कापले,तसा तो डोलारा खाली कोसळला आणि कावजीने खानाला पालखीतून बाहेर काढत त्याचे मस्तक कापले.
इकडे शामियानात झालेल्या धुमाळीने पंताजी बोकीलांवर सुद्धा काही वार झाले,तर कृष्णाजीला राजांनी त्याच्या लष्करात बातमी सांगण्यास सोडून दिले,गड उतरताना झालेल्या कचाकचीच्या लढाईत त्यास अपय होऊन तो मारला गेलं असावा असे काही इतिहासकार सांगतात.
(बर्च्याच ठिकाणी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियान्यातच मारला गेल्याची नोंद आहे )
खान पडल्यापडल्या गडावरच्या मराठ्यांनी तोफेला बत्ती दिली.तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले, बाजी सर्जेरावाने जीवाची शर्थ केली.
कान्होजी जेधे,बांदल यांनी पारघाटाच्या सैन्यावर हल्ला केला,मोरोपंत कोकणच्या बाजूने घुसले.अशी सगळी रण-धुमाळी माजली,तोफेला बत्ती कुणी आणि का दिली हे खानाच्या सैन्याला समजलेच नाही.
सावध झाल्यावर खानाच्या सैन्यानेही नेटाने प्रतिहल्ला केला. शामराज पद्मनाभी व त्र्यंबक भास्कर हे मोठे सरदार कामी आले.
"कोणी हत्यार धरू असेल त्यास जीवे मारावे प्राणानिशी ठेऊ नये" असे आदेशच मिळाले होते.
'अलिशान अफझलखान महमदशाही' ची पार दुर्दश करून टाकली,महादिन पठाण,उज्दिन पठाण,रोहिले ,अरबी मुसलमान दुलीस मिळवले. झुंझारराव घाटगे,सुलतानजी जगदाळे हे मातब्बर आदिलशाही सरदार
पाडाव झाले,तसेच मंबाजी भोसले आणि जगताप हि पाडाव झाले. अफझुल्या चा पोरगा फाझल जीव वाचवायला कोयनाकाठाने कऱ्हाड च्या दिशेने पळत सुटला असता खंडोजी खोपड्याच्या हाती लागला,परंतु फाझल खानाने पैशाचे आमिष दाखविताच लोभापायी त्याने फाझल ला सोडून दिले, हि बातमी गडावर कळताक्षणी राजांनी खन्डोजीस धरून आणविला आणि त्याचे डोके उडवले.
कापड ,हत्यारे, वाई ला असलेला तोफखाना, बाराशे उंट,४-५ हजार घोडे, ४ लाखाहून जास्त जवाहीर, ७-८ लाख रोकड असा बराच मुद्दे माल सरकारात जमा झाला.
राजांनी सर्वात आधी युद्धात जायबंदी झालेल्यांची पूस केली,कोणाला २००,१००,५०,२५ होन अशी जखम पाहून दिले, कामी आलेल्यांच्या मुलास चाकरीस घेतले.
पुत्र नाही त्यांच्या बायकांस अर्धे वेतन चालू ठेवले.त्यांचे कार्य करून दिले.सांत्वन केले,
रण गाजवलेले मोठे धारकरी होते त्यांस कोणाला हत्ती,घोडे ,सोन्याचे कडे,माळा,तुरे चौकडे असे नावाजले.
पंताजी गोपिनाथांना हिवरे गाव वंश परंपरेने इनाम करू दिले तसेच १ लक्ष होन बक्षीस दिला.
देवीच्या समोरील बाजूस डोंगराचे टोक होते तिथे खानाचे मुंडके पुरल्याचे सांगण्यात येते, नंतर भोवती बुरुज उभारला 'अब्दुल्ला(अफझल) बुरुज ' , शरीर पडले तेथे कबर बांधली त्याच्या दिवा बत्तीची सोय भवानी मंदिरातर्फे करण्यात येते.कबरी पुढे उरुसात नारळ फोडण्याचा मन देवी संस्थानाला असतो,दसर्याला पालखी इथे सदरेजवळ थांबते पूजा अर्चा होऊन पुन्हा गडावर जाते.
(उत्तरेतील बर्याच इतिहास करांचे म्हणणे पडले कि शिवरायांनी दगा करोन खानाचा खून केला,कहर म्हणजे मुसलमान इतिहासकारांनी तर असे लिहिले कि राजांनी खानास एकट्यास जेवायला गडावर बोलाविले,
खान आल्यावर गडाचे दरवाजे लाऊन घेऊन राजांच्या माणसांनी खानाला मारिले.
सर जदुनाथ सरकारांनी सुद्द्धा अप्रत्यक्षपणे असेच सुचविले आहे.महम्मद खाफीखान ,साकी मुस्तैद खान,अडोल्फ बेंडसर,भीमसेन सक्सेना या मोगलांच्या तर्फेच्या लोकांनी सुद्धा शिवरायांनाच या प्रकरणी दोषी ठरवत ठपका ठेवला. परंतु खानाकडे राजांना मारायचे फर्मान होते हे माहित असताना शिवरायांनी जे केले ते योग्यच होते.
वरील लोकांचा मराठी साधनाचा अभ्यास कमी असल्याने स्थानिक राजकीय स्थितीचा आणि खानाच्या पूर्वीच्या दगाबाजीच्या इतिहासाचा विचार या लोकांनी केला नाही.
खानाचा वधच केला जाणे गरजेचे होते. )
प्रतापगडावर मोठा सोहळा केला,सगळे आनंदून गेले, भवानी आईची कृपा झाली समजून राजांनी चांगले कारागीर बोलावून त्यास तुळजापूर ला पाठविले
आणि मूर्तीचे तसेच ध्यान करून तशीच मूर्ती गंडकी शिळा आणून प्रतापगडावर घडविली.राजेश्री मोरोपंत पिंगळे आणि त्यांच्या पत्नी च्या हस्ते मूर्ती बसविली.
(देवीस रायगडात २ आणि सातार्यात ११ गाव इनाम होते, पेशवा कडूनही एक २०० व एक ३०० अशी मिळून पाचशे रु ची साडीचोळी सालीना होती,औरंगजेबाच्या आक्रमणा वेळी काही वर्षे मूर्ती काढून दुसरीकडे हलविण्यात आलेली, नंतर ती पुन्हा आणून बसविली गेली)
जिजाउंचा आनंद गगनात मावेना त्यांनी अनेक धर्म केले,दान केले. आपल्या पुत्राचा पराक्रम पुढील पिढ्यांच्या लक्षात राहावा म्हणून शाहीर बोलावण्यात आले.
अज्ञानदास शाहिराने हाती डफ आणि तुणतुणे घेऊन हे पादशाही सरदाराचे भांडण आणि शिवाजी सर्जाचे दलभंजन खड्या आवाजात गायले !
"शिवाजी सर्जानं इनाम घोडा बक्षीस दिला | शेरभर सोन्याचा तोडा हातात घातीला "
खान आपल्या सैन्यासकट जावळीत बुडाला हे ऐकून विजापूर दरबारात धरणीकंप झाला ,बडी बेगम शोक करू लागली
तर औरंग्या चे धाबे दणाणले, कारण याच अफझल खानाने एके काळी या औरंग्याला जिवंत पकडून नंतर मोठी खंडणी घेऊन बिनकपड्याचे सोडून दिले होते !
अफझलखान वध हि राजकीय दृष्ट्या फार मोठी गोष्ट घडली,कारण त्यानंतर विजापूरकर या धक्क्यातून सावरायच्या आतच शिवरायांनी स्वराज्य एकाच महिन्यात दुपटीने वाढविले,मराठा सैन्याने कोकणात राजापूर तर घाटावर पन्हाळा,विशालगडा पर्यंत धडका मारल्या !
आमच्या राजाला २० वर्षे आणखी आयुष्य लाभलं असतं तर त्यांनीच दिल्लीपर्यंत धडक मारली असती
अटकेपर्यंत धडक मारून भगवा रोवणाऱ्या मराठेशाहीची हि खरी सरुवात होती !
जय भवानी ,जय शिवाजी !

वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.

वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.

कारवार किनाऱ्यावरील बसनूर उर्फ बसिर्लोखर महाराजांचा आरमारी छापा पडला. पण या मोहिमेमागे किती पद्धतशीर योजना त्यांनी केली असेल याचा अभ्यासकांनी विचार करावा. आधी हेर पाठवून तेथील लष्करी आणि राजकीय स्थितीची पूर्ण माहिती मिळवून नंतरच ही सागरी मोहिम त्यांनी केली. त्यात यश चांगले मिळाले. पण अपेक्षेप्रमाणे पुरेपूर मिळाले नाही. जेथे यश मिळाले नाही त्याचाही त्यांनी नंतर पुरेपूर अभ्यास केलेला दिसतो. प्रत्येक विषयात ते अभ्यासाला आणि योजनाबद्ध आराखड्याला महत्त्व देत असत. आमचे आजचे थोर समाजसेवक बाबा आमटे तरुणांना उद्देशून एक गोष्ट निक्षून सांगतात , मलाही त्यांनी ती सांगितली. ती अशी ‘ भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन काम करा ‘ किती महत्त्वाचा इशारा आहे हा नाही ? अगदी हेच सूत्र महाराजांच्या कार्यपद्धतीत आढळते.
पण भान ठेवून केलेल्या योजनेत जर कुणी कार्यकर्ता अनुयायी चुकला किंवा त्याने जाणूनबुजून कुचराई केली , तर बेभान होऊन केलेले काम अपेक्षित होते. थोडाफार असाच प्रकार कारवार मोहिमेत कोणा तरी हेरगिरी करणाऱ्या गुप्तचराकडून घडला. आपला मराठी माणूस अचूक वागावा , अचूक चालावा आणि अचूक बोलावा ही महाराजांची अपेक्षा नेहमीच असे. पण त्यातूनही असा क्वचितच का होईना , पण चुकार गडी निघत असे. कारवार मोहिमेत अशी चुकीची वा अपुरी गुप्त बातमी आपल्याच हेरांनी दिल्यामुळे आपणांस थोडे अपयश आले हे महाराजांनी हेरले. पण त्यांनी कानाडोळा केला नाही. त्यांनी त्या संबंधित हेराला शासनही केले. करायलाच हवे होते. नाहीतर चुका करायची चटक लागते. कोणाची तरी चिठ्ठी आणली की , मोठमोठ्या गुन्ह्यातील प्रतिष्ठित आरोपी अलगद सुटतात , नंतर मानाने मिरवतातही. हे बरे नव्हे.
या कारवार मोहिमेच्या काळातच महाराजांचा वाढदिवस (फाल्गुन वद्य तृतीया) येऊन गेला. हा त्यांचा पस्तीसावा वाढदिवस. पण तो साजरा केल्याची नोंद नाही. इतकंच नव्हे त्यांनी आपला कोणताही वाढदिवस साजरा केला नाही.
आज मात्र आमच्या ‘ तरुण , तडफदार , तेजस्वी ‘ हिरोंना विसाव्या वर्षांपासून ‘ प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस जाहिरातबाजीने साजरा करण्याची चटक लागली आहे. सिद्धीच्या मागे लागावे , प्रसिद्धीच्या नव्हे. शिवरायांस आठवावे. जीवित तृणवत मानावे. महाराजांनी स्वराज्य साधनाची लगबग कैसी केली , ते स्मरावे. स्वत:चा आरोग्यसंपन्न शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची जरुर महत्त्वाकांक्षा ठेवावी. त्यासाठी निर्व्यसनी असावे. असो. बहुत काय लिहिणे ?
मोहिम संपवून महाराज भूमार्गाने परतले. मोहिमेवर येत असलेले मिर्झाराजे पुण्याच्या दिशेने सरकत होते. ते आणि दिलेरखान पुढच्या मोहिमांची चर्चा करीत असावीत असे दिसून येते. दोघांचेही हेतू एकच होते. शिवनाश! पण पद्धती वा मार्ग जरा भिन्नभिन्न होते. दिलेरचे म्हणणे असे की , ‘ या शिवाजीराजाचे किल्ले एकूण आहेत तरी किती ? फार फार तर चाळीस. ते सर्वच किल्ले आपण युद्धाने जिंकून घेऊ. हा विचार आपल्या प्रचंड सैन्यबळावर दिलेर मांडीत होता. हा विचार केवळ शिपाईगिरीचा होता. त्यात सरदारी नव्हती. डोके कमीच होते. मिर्झाराजांचा विचार वेगळा होता. त्यात अभ्यास दिसून येतो. मिर्झाराजांचे म्हणणे थोडक्यात असे शिवाजीराजाचे किल्ले घेणे वाटते तितके सोपे नाही. कारण त्या किल्ल्यातील मराठी माणसं अजिंक्य आहेत. ती फितवा फितुरीने विकत घेणे वा लढूनही जिंकून घेणे जवळजवळ अशक्य आहे. या माणसांचे म्हणजे लढाऊ सैनिकांचे घरसंसारच जर आपण तुडवून काढले आणि त्यांची बायकापोरे , शेतीवाडी आणि त्यांची खेडीपाडी पार मुरगाळून काढली तर गडागडांवर असलेले हे मराठी आपोआप भुईवर गुडघे आणि डोकं टेकतील. त्यामुळेच शिवाजीराजा हा आपोआप शरण येईल.
असा विचार आणि पुढे प्रत्यक्ष तो विचार कृतीत आणू पाहणारा मिर्झाराजा जयसिंग हा एकमेव शत्रू वा सेनापती ठरला. बाकीचे सगळे हाणामारी आणि जाळपोळ करणारे केवळ दंगेखोर. दिलेर आणि मिर्झा हे दोन सेनापती आपापले विचार घेऊन पुण्यात दाखल झाले.
महाराजांनी एक तिसराच प्रयत्न करून पाहिला. मोगलांचे बळ अफाट आहे आणि मिर्झाराजा हा सेनापतीही शहाण्या डोक्याचा आहे. जर हे प्रचंड मोगली वादळ आपल्या अंगावर न येऊ देता परस्पर विजापुरच्या आदिलशाहकडेच वळविता आले तर स्वराज्याला मोगली धक्का लागणार नाही , या हेतूने महाराजांनी मिर्झाराजाकडे अशी बोलणी वकिलामार्फत केली की , हा विजापूरचा बादशाह आदिलशाह दिल्लीचा शत्रू आहे. त्याचा तुम्ही पुरा मोड करा. आम्ही तुम्हांस मदत करू.
म्हणजे विजापूर खलास करून टाकायचं अन् त्यात आपणही चार ओंजळी कमवायच्या असा हा महाराजांचा डाव होता. तो डाव मिर्झाराजांनी अचूक ओळखला. आणि त्यांना दादच दिली नाही. मोगली फौज त्यांनी थेट पुण्यावर आणली. पुणे ही त्यांची केंद छावणी झाली. शाहिस्तेखानापासून पुणे मोगलांच्याच ताब्यात होते. आता आपण टाळू पाहात असलेले मोगली आक्रमण टळत नाही , हे महाराजांना कळून चुकले. संकट कितीही मोठे अंगावर आले तरीही आपला आब न सोडता ताठ उभे राहायचे हा महाराजांचा नेहमीचा स्वभाव.
मिर्झाराजा आणि दिलेरखान यांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे मराठ्यांविरुद्ध डाव खेळायचं ठरविलं. मराठी स्वराज्याची जाळपोळ , लूट जनतेवर अत्याचार ही मराठ्यांना शरण आणण्याकरिता मिर्झाराजाने ठरविलेली खेळी त्याने सुरू केली. पुण्यात कुबाहतखानास , कार्ला , मळवली , वडगांव या मावळ भागात कुतुबुद्दीनखान आणि पुण्याभोवतीच्या भागात इंदमणबुंदेला , रायसिंग सिसोदिया इत्यादी सरदारांना ही धूमाकूळ घालण्याची कामगिरी सांगून धामधुमीस प्रारंभही केला. (मार्च. १६६५ ) ब्रिटीश भूमीवर सतत बॉम्बवर्षाव करून ब्रिटीश सैन्याचे धैर्य खचविण्याचा हिटलरने असाच प्रयत्न दुसऱ्या महायुद्धात केला होता हे आपल्याला आठवतंय ना ? अशाच घनघोर प्रसंगी राष्ट्राचे चारित्र्य दिसून येते. ते खचते तरी किंवा धगधगते तरी.
परीक्षा होती स्वराज्यातील जनतेची. मराठी सैनिकांना हा मोगलाई वणवा दिसत होता. आपली घरेदारे आणि बायकापोरे पार चिरडून निघत आहेत , हे मराठ्यांना उघडउघड दिसत होते. समोरासमोर मोगलांशी झुंजायला मराठी माणूसबळ कमी पडत होते. तरीही प्रतिकार चालूच होता. स्वराज्यास आरंभ झाल्यापासून आत्तापर्यंत (१६४६ ते १६६५ ) मराठी सैनिक सतत लढतोच आहे. विश्रांती नाहीच अन् आता तर ढगफुटीसारखे मोगली हत्ती आपल्यावर तुटून पडले आहेत. हे मराठ्यांना दिसत होतं. महाराजांनाही दिसत होतं. नकाशा पाहिला तर हा मोगली धूमाकूळ मुख्यत: पुणे जिल्ह्याच्या मध्य आणि पश्चिम भागावर मिर्झाराजांनी केंदित केला होता.
पण इथेच शिवशाहीचा मावळा सैनिक आपलं प्रखर धैर्य , शौर्य , सहनशीलता , त्याग , निष्ठा आणि नेतृत्त्वावरील विश्वास अन् प्रेम अगदी नकळत , अगदी सहज , अगदी उत्स्फूर्त अन् अगदी हसतहसत जगून वागून दाखवित होता. यालाच राष्ट्रीय चारित्र्य म्हणतात. या काळातील या आक्रमक आगीच्या वर्षावात कोणत्याही किल्ल्यावरचा वा दऱ्याकपारातल्या ठाण्याछावणीतला मराठा सैनिक हताश , निराश , गर्भगळीत वा अगतिक झालेला दिसत नाही. हे कशावरून ? फितुरी नाही. आपापल्या कामात कसूर नाही अन् महाराजांकडे केविलवाण्या विनविण्याही नाहीत की महाराज आमचे संसार मातीला मिळताहेत. महाराज हे युद्ध थांबवा. शरण जा. तह करा. आम्हाला वाचवा.
मराठी स्वराज्याच्या पाठीचा कणा वज्रासारखा आणि गर्दन शेषासारखी ताठ दिसून आली ती या मिर्झा-दिलेर यांच्या आक्रमणाच्या काळातच. असा हा कणा होता की , वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.

*आदर्श छत्रपती शिवाजी महाराज; काल आज आणि उद्याही!*_

*आदर्श छत्रपती शिवाजी महाराज; काल आज आणि उद्याही!*_

आपल्या असामान्य गुणांमुळे जनमानसांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा जाणता राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. एक आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांचे नाव अगदी अगत्याने घेतले जाते आणि यापुढेही कायमच घेतले जाईल.
आज महाराजांच्या जयंती निमित्ताने महाराजांचे काही गुण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. महाराजांचा हा समृद्ध वारसा आपण पुढच्या पीढीपर्यंतही पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. चला तर जाणून घेऊया बहुगुणी महाराजांचे असे कोणते गुण आहेत जे पुढच्या पीढीसाठी नक्की मार्गदर्शक आहेत...
1) *सर्वधर्मसमभाव* : शिवाजी महाराजांच्या स्वधर्माविषयी प्रचंड निष्ठा आणि आदर होता. तरीही देखील त्यांनी कधीही इतर धर्मांचा तिरस्कार किंवा अनादर केला नाही. त्यांच्या सैन्यात हिंदूंप्रमाणे मुस्लिम मावळेही होते. आजच्या काळात लहानपणापासूनच मुलांमध्ये हा गुण रुजवणे, महत्त्वाचे झाले आहे.
2) *साहसी व धाडसी वृत्ती* : कोणत्याही संकटात, अडचणीत न डगमगणारे महाराज आणि त्यांच्या साहस कथा ऐकतच आपण लहानाचे मोठे झालोत. कधी शक्ती तर कधी युक्तीच्या जोरावर यशस्वीरित्या साहस कसे करावे, हे महाराजांकडून शिकण्यासारखे आहे.
3) *कमालीची निष्ठा* : देश, स्वराज्य आणि काम यांच्या प्रती कशी निष्ठा असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराज. महाराजांची हीच निष्ठा आज जर आपण आपल्या दैनंदिन कामात आणली तर यशाकडे होणारी आपली वाटचाल कोणीच रोखू शकणार नाही.
4) *स्त्रियांचा आदर* : आजकाल स्त्रियांवरील वाढते अत्याचार, शोषण हे पाहता आता स्त्री स्वातंत्र्यासोबत स्त्रीयांचा आदर करा हे सांगावे लागत आहे. अशा काळात महाराजांकडून शिकवण नक्कीच पुढील पीढीला देऊ शकतो. 'स्त्रियांची इज्जत कायम राखली पाहिजे मग ती कुणीही असो' अशी महाराजांची भूमिका होती. महिलांविरुद्ध अत्याचाराला महाराजांनी कधीही थारा दिला नाही.
5) *नेतृत्व गुण* : शिवाजी महाराजांचा अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे नेतृत्व. हातात अधिकार असताना सर्वसमावेषक विचार करणे, इतरांना सोबत घेऊन पुढे जाणे, कुठेही दुजाभाव होऊ न होणे असे आदर्श नेतृत्व पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
6) *संघ भावना* : महाराजांनी उभं केलेलं 'स्वराज्य' हे सांघिक भावनेचं (टीमवर्कच) बेस्ट उदाहरण आहे. कुठे, कधी कुणाची गरज आहे. कुणाला पुढं करायचं, सोबत घेऊन काम कसं करायचं. आहे त्या टीमच्या साहाय्याने विजयश्री कशी प्राप्त करायची हे महारांजी अनेकवेळा दाखवून दिलंय. कारण सांघिक भावनेमुळेच अनेक कामे सोपी होतात, लवकर होतात. आचार-विचारांची देवाण घेवाण होते.

प्रतिशिवाजी नेताजी पालकर

नेताजी पालकर यांचा इतिहासामध्ये ‘प्रतिशिवाजी’ म्हणजेच दुसरा शिवाजी असा उल्लेख आहे. नेताजी स्वराज्याचे दीर्घकाळ सरसेनापती होते. आपल्या कारकिर्दी मध्ये त्यांनी अनेक लढाया गाजवल्या, नेताजींचे मुळ गाव पुणे जिल्यातील शिरूर हे होय. अफझलखान आणि राजेंच्या भेटीच्या वेळी नेताजींनी मोठा पराक्रम गाजवला होता. प्रतापगड च्या लढाईच्या वेळेस छत्रपतींनी नेताजींना खास कामगिरी सांगितली होती.

सभासद म्हणतो राजे मातोश्रींचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडास निघाले. पालकर सरनोबत यास लष्कर घेऊन वर घाटावरी येणे म्हणोन सांगितले, आणि अफझलखानास जवलीस बोलवितो, सला करोन भेटतो, विश्वास लाऊन जवळ आणितो, ते समयी तुम्ही घाटमाथा येओन मार्ग धरीने, असे सांगितले. खानाचा वध झाल्यानंतर, राजे गडावरी जातांच एक भांड्याचा आवाज केला, तेच गडाखालील लोक व घाटावरील लोक व लष्कर व कोकणातून मोरोपंत व मावळे असे चौतर्फी चोहोंकडून चालोन खानाचे गोटावरती आले, मोठे घरोन्दर युद्ध जाहाले, रक्ताच्या नद्या चालल्या. रणकंदन जाले, प्रतापगडाचा या युद्धात नेताजीन्ने मोठा पराक्रम गाजवला.

पुढे मिर्झा राजेंबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले होते. पण आदिलशाही सेनापती सर्जाखान याच्यासमोर त्यांना अपयश आले. त्यामुळे विजापुर्कारांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी राजे विजापूरहून पन्हाळ्यास आले. राजेंनी रात्रीच गडावर छापा घातला. पण किल्लेदार सावध असल्याने मराठ्यांचा पराभव झाला, सुमारे १००० मावले मारले गेले.

सभासद म्हणतो, मग राजीयांनी नेताजी पालकर यास बोलावून आणिला आणि “समयास कैसा पावला नाहीस?” म्हणून शब्द लावून सरनोबती वरून दूर केले. मग नेताजी विजापुरकारांना जाऊन मिळाले. महाराज अगर्याच्या भेटिस गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.

महाराजांनी आग्र्याहून, सुटका केल्यानंतर शिवाजीराजे सुटले आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराणे औरंगजेबाने नाताजी पालकारांच्या अटकेविषयी फर्मान दि. १५ जून १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन त्यांचे चुलते कोंडाजी यांस अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवले, आग्र्यास त्यांचा अतोनात छळ करण्यात आला त्यामुळे दि. २७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे ‘मुहम्मद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले. औरंगजेबाच्या हुकामाप्रमाणे जून १६६७ मध्ये नेताजी काबुल कंदाहारच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. पुढे ९ वर्षे नाताजी काबुल कंदहार या मोहिमेवर होते.

अग्र्यातून सुटका झाल्यानंतर राजेंनी एकामागोमाग एक किल्ले घेण्याचा सपाटा लावला होता, शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, अश्यावेळी त्यास प्रतीशिवाजीची आठवण झाली व त्याने दिलेर्खानसोबत नेताजींस महाराष्ट्याच्या मोहिमेवर पाठवले. पश्चाताप झालेले नाताजी मी १६७६ मध्ये मोगली छावणीतून
पळून रायगडावर आले. शिवाजी महाराजांनी दि. १९ जून १६७६ रोजी त्यांना पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले. नेताजी पालकर यांची समाधी तामसा येथे जी. नांदेड येथे आहे.

शिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे!

शिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे!

तानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण! लहानपणापासून शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना आपल्याला तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेची ओळख होते आणि त्या नरवीराचे शौर्य आपल्या मनात कायमचे घर करून बसते. त्याच शौर्यगाथेला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी हा छोटासा लेख!
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. आपल्या काही निवडक सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते तानाजी मालुसरे! जून १६६५ रोजी मोघलांसोबत केलेल्या पुरंदर तहानुसार शिवाजी राजांना कोंढाणा किल्ल्यासह इतर २२ किल्ले मोघलांच्या हाती सोपवावे लागले. या तहामुळे मराठ्यांच्या स्वाभिमानाला कोठेतरी ठेच पोचली होती. राजमाता जिजाऊ आईसाहेब देखील या तहामुळे व्याकूळ झाल्या होत्या. जे किल्ले शिवाजी महाराजांनी इतक्या कष्टाने प्राण धोक्यात घालून मिळवले होते, जे किल्ले कित्येक मावळ्यांच्या रक्ताने पावन झाले होते असे स्वराज्याची संपत्ती असणारे किल्ले सहज शत्रूहाती जाऊ देणे त्यांना पटत नव्हते. मुख्य म्हणजे त्यातील कोंढाणा हा किल्ला पुण्याच्या तोंडाला व जेजुरीच्या बारीला असल्याने तेवढ्या प्रांतावर देखरेख राही. शिवाजी महाराजांना देखील जिजाऊ आईसाहेबांच्या मनातील सल कळत होती, परंतु त्यांचा देखिल नाईलाज होता. मोघलांच्या प्रचंड मोठ्या संरक्षण कवचामुळे कोंढाणा परत मिळवणे वाटत होते तितके सोप्पे नव्हते. परंतु मातेच्या हट्टासमोर राजे नमले आणि त्यांनी कोंढाणा परत मिळवण्याचा प्रण केला. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर होते जे कोंढाणा जिंकून आणण्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होते, परंतु या मोहिमेचा विचार करताना महाराजांच्या मनात एकाच वीराचे नाव आले- तानाजी मालुसरे! तानाजी मालुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि महाराजांच्या अतिशय विश्वासातील साथीदार. महाराजांच्या प्रत्येक संकटाच्या काळात तानाजींनी मोलाची साथ दिली होती. सुरुवातीला जेव्हा महाराजांनी किल्ले हाती घेण्याची मोहीम चालवली होती तेव्हा प्रत्येक मोहिमेत तानाजी आघाडीवर होते.

Tuesday 19 February 2019

छत्रपती शिवाजीराजे - न्यायदक्ष प्रजाहितवादी शासक.

छत्रपती शिवाजीराजे - न्यायदक्ष प्रजाहितवादी शासक.
लेखक : समीर गायकवाड


सोबतच्या पत्रात शिवाजी राजांनी एक अद्भुत निर्णय केला आहे.
सर्रास असं दृष्टीस पडत असतं की एखाद्या व्यक्तीने जीवापाड मेहनत करून आपल्यासाठी एखादी अजरामर कृती निर्मिली असेल तर त्याच्या समर्थनार्थ त्याच्या हातून कळत नकळत काही चुका त्रुटी झाल्या तर त्याकडे कुणीही कानाडोळाच करतो. ही वृत्ती सार्वत्रिक आणि सर्वकालीन आहे. इथं शिवाजीराजे त्याला अपवाद आहेत.

हिरोजी इदलकर आणि रायगड यांचे नाते मायलेकरासारखे आहे. हिरोजींनी आपलं सर्वस्व पणाला लावून जीवापाड मेहनत करून रायगड घडवला हे सर्वश्रुत आहेच. ६ जून १६७४ रोजी जेंव्हा शिवबांचा राज्याभिषेक झाला तेंव्हा छत्रपतींचा हिरोजींशी झालेला संवाद इतिहासात अजरामर झाला. त्याचीच फलश्रुती म्हणून रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरास असणाऱ्या पायरीवखाली ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इदलकर’ हा शिलालेख दिसतो.
तर त्या स्थापत्यप्रभू हिरोजींनी कीकवी (आताचे मु.पो.किकवी, तालुका भोर, जिल्हा पुणे) या गावची पाटीलकी मल्हार निगडे देशमुख यांच्याकडून विकत घेतली.
वस्तुतः ती पाटीलकी मंडाजी निगडे यांची होती. मल्हारजीने मंडाजीच्या परस्पर ही पाटीलकी हिरोजींना विकली होती.
ही माहिती मिळताच शिवाजीराजांनी हिरोजींना ती पाटीलकी परत करण्यास फर्मावले.
मल्हार निगडेने पाटीलकी विकून हिरोजींकडून घेतलेली रक्कम हिरोजींना परत द्यायला लावली.
शिवाय मंडाजी निगडे यास त्याची पाटीलकी पुन्हा बहाल केली.

याहीपुढे जाऊन महाराजांनी आणखी अचूक व संपूर्ण न्याय केला - हा व्यवहार केल्याबद्दल मल्हारजीची देशमुखी काढून घेतली, त्याला त्या जबाबदारीतून मोकळं केलं. देशमुखीच्या बदल्यात त्याने भरलेली अमानत रक्कम देखील जशीच्या तशी(बजिन्नस) दप्तरदखल करून घेतली. त्याचा करार रद्द केला.
हिरोजी आपल्याला खूप जवळचे आहेत त्यांनी विकत घेतलेली पाटीलकी आपण कशी काढून घ्यावी असा दुबळा विचार राजांनी केला नाही, मंडाजी निगडे यास त्याचा मूळ हक्क दिला, मल्हार निगडेवर कारवाई करताना त्याची देशमुखी काढून घेतली आणि रयतेच्या खजिन्यात अनामत जमा केली.

या पत्रातून शिवाजी राजांचा अचूक न्याय दिसतो, न्यायसमानता दिसते आणि न्यायासाठीची कठोरताही दिसते.

शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्मास या असं म्हणत आपल्या अंगावरची जबाबदारी ढकलून पुन्हा त्यांच्याकडूनच सगळ्या आशाअपेक्षा करण्यापेक्षा या शिवजयंतीला संकल्प करूयात की त्यांचा एक तरी गुण आपण सकल आत्मसात करूयात.

- समीर गायकवाड.

~~~~~~~~~\~~~~~~~
अवांतर -

९ सप्टेंबर १६७५ रोजीचे हे पत्र आहे. या पत्राच्या सुरुवातीस जी मुद्रा आहे तो शिक्का आहे कारण तो प्रारंभी आहे. पत्राच्या अखेरीस जी मुद्रा आहे त्यातून पत्राचा मजकूर इथंच संपत असल्याची ग्वाही दिली जात असल्याने त्याला मोर्तब म्हटलं जातं. आपल्या वापरात असलेल्या 'शिक्कामोर्तब' या शब्दाची पार्श्वभूमी ही अशी दोन शिक्क्यातली आहे.

या पत्रातील प्रारंभीचा शिक्का (Opening Seal) - "श्री शिवचरणी तत्पर त्र्यंबकसुत मोरेश्वर" असा आहे. अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख प्रधान मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे यांचा तो शिक्का आहे. त्यामुळे तो पत्राच्या डाव्या बाजूस दोन ओळी सोडून खाली आहे. इथे जर शिवराज्यमुद्रा ( प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुविश्व वंदिता। शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।) असती तर पत्रातील मजकुराच्या वरती तिचे स्थान असले असते. कारण राजमुद्रा, मजकूर, डाव्या बाजूस मंत्र्याचा/ प्रधानाचा / कोशागाराचा शिक्का, पुन्हा मजकूर आणि अखेरीस मोर्तब असा एक लेखनसंकेत होता.

या पत्रातील मोर्तब शिक्का - 'मर्यादेयंविराजते' असा आहे. 'विनम्रतापूर्वक (पत्र) संपन्न झाले' असा त्याचा अर्थ.

~~~~~~~ ~~~~~~~

पत्रातील मोडी भाषेतला मजकूर -
मशरहूल अनाम बालाजी कुकाजी प्रभू हवालदार कारकून पांl सिरवल
प्रति राजश्री शिवाजीराजे सुहुरसन सीत सबैन व अलफ मलारजी निगडे देसमुख पाI
( डाव्या बाजूस मुद्रा - श्री शिवचरणी तत्पर त्र्यंबकसुत मोरेश्वर)
मजकूर याणी कीकवीची पाटीलकी मंडाजी नीगडा याची असता हिरोजी इदलकरास वीकत दिल्ही साईबी देसमुखी याचा अमानत करून तुम्हास रोखी पाठवीला.
यैसीयास साईबी मनास आणुन मलारजीकडून हिरोजीचे पैके देवीले.
पाटीलकी मंडाजीची मंडाजीस दिल्ही
मलारजीवरही मेहरबानी करून देसमुखी मोकली केली आहे
तरी देसमुखी अमानत म्हणून तुम्हास रोखा पाठवीला असे तो रोखा बजींनस हुजूर पाठवणे.
हुजरून रोखाच रद करून जाणीजें
छ २८ जमादिलाखर परवानगी हुजूर मोर्तब सुद
(पत्राच्या अखेरीस मुद्रा - मर्यादेयंविराजते)

~~~~~ ~~~~~~~~ ~~~~~~~~

संदर्भ नोंदी -
पुराभिलेख प्रकाशनाच्यावतीने १९८८ मध्ये प्रकाशित केलेल्या 'शिवछत्रपतींच्या पत्रांचे प्रतिरूपदर्शन' या पुस्तकात या पत्रास प्रथम प्रसिद्धी देण्यात आली.
पुणे पुराभिलेखागार (पेशवे दप्तर) येथे हे पत्र उपलब्ध आहे.

यादवाडच्या शिल्पाआड दडलेला शिवबांचा जाज्वल्य इतिहास..

यादवाडच्या शिल्पाआड दडलेला शिवबांचा जाज्वल्य इतिहास..

शिवबांनी त्यांच्या सख्ख्या मेहुण्याचे डोळे काढण्याची सजा फर्मावली होती हे फार कमी लोकास ज्ञात असेल. अश्वारूढ शस्त्रसज्ज छत्रपती शिवरायांचे शिल्प वा जिजाऊ मांसाहेबासोबतचे शिल्प / चित्र आपण अनेक ठिकाणी पाहतो. मात्र शिवबा मांडी घालून बसलेले आहेत, त्यांच्या मांडीवर एक लहान मुल आहे, त्याच्याकडे ते प्रेमाने पाहत आहेत असंही एक शिल्प आहे. विशेष म्हणजे हे शिल्प शिवाजीराजे हयात असताना कोरलेलं आहे ! शिवबांनी मेहुण्यास दिलेली सजा आणि हे अनोखं शिल्प यांचा परस्पराशी संबंध आहे. या दोन्ही घटनामागे एक जाज्वल्य इतिहास आहे. शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकातून जाणीवपूर्वक गाळीव व ठोकळेबाज ठाशीव इतिहासाची पाने रचत गेल्यामुळे या गोष्टी ठळकपणे समोर आल्या नाहीत. (repost)
घटना आहे इ.स.१६७८ च्या सुमारासची. शिवाजीराजांची दक्षिण दिग्विजयाची मोहीम जवळपास संपत आली होती. प्रचंड यश संपादन करून ते आता स्वराज्याच्या परतीच्या मार्गावर होते. परतीच्या मार्गावरही येताना वाटेतील छोटे मोठे परगणे आणि बाजारपेठा, कसबे यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली ठाणी त्यांच्या नजरेतून सुटत नव्हती. अशाच एका कसब्यापैकी एक होतं, दक्षिणमध्य कर्नाटकातलं गदग प्रांतातलं बेलवडी हे गाव. अशा लहानमोठ्या कसब्यांना वेढा घालण्याचे काम झालं की त्यासंबंधीची जबाबदारी एखाद्या जाणत्या शिलेदाराकडे सोपवून राजे पुढे रवाना होत असत. बेलवडीच्या गढीला वेढा घालून त्याचे नेतृत्व राजांनी आपले मेहुणे सरदार सखोजी गायकवाड यांच्यावर सोपवले. त्यानंतर राजांनी पन्हाळ्याकडे कूच केले. हा वेढा काही आठवडे टिकला. यात बेलवडीचा ठाणेदार येसाजी प्रभू देसाई मराठ्यांकडून मारला गेला. मुख्य ठाणेदार मारला गेल्यावर गढी पडेल आणि आपल्या ताब्यात ठाणे येईल या विचारात मश्गुल असलेल्या सखोजीरावांच्या मनसुब्यांना येसाजी देसायाच्या पत्नीने मल्लाबाईने सुरुंग लावला. तिने हार मानली नाही. तिचं अर्ध्याहून अधिक सैन्य मारलं गेलं. तिनं आपल्या काळजावर पत्थर ठेवला, बेलवडीतल्या स्त्रिया एकत्र केल्या. त्यांच्यातल्या लढाऊ बाण्यास साद घातली. तिची योजना फळास आली. बेलवडीमधील स्त्रिया पुरुषवेश धारण करून लढाईत सामील झाल्या. मल्लाबाई इतक्यावरच थांबली नाही. तिनं स्वतः चिलखत घातलं, तलवार हाती धरली आणि पुरुषवेशात तीही मराठयांच्या सैन्यावर तुटून पडली. वेढयास वेळ लागत असल्याने बेलवडीसारख्या एका छोट्याशा ठाण्यातून होत असलेला तीव्र प्रतिकार पाहून शिवराय अचंबित झाले. कोण असा योद्धा आहे त्याला भेटावे आणि आपले स्वराज्याचे मनसुबे त्याच्यापर्यंत पोहोचवावेत आणि बेलवडीरवरही कब्जा करावा या हेतूने पन्हाळगडाहून ते पुन्हा बेलवडीकडे रवाना झाले. स्वतः शिवराय मराठ्यांच्या मुख्य छावणीत डेरेदाखल झाल्यावर मराठ्यांच्या अंगावरचे मांस वाढले, त्यांनी जोराचे प्रतिहल्ले करून देसायांच्या सैन्यास माघार घ्यायला भाग पाडले.
माघार घेतल्यानंतर मल्लाबाई देसाईने शिवबांकडे तहाची याचना केली. तिने कुठल्याही अटीशर्ती मांडल्या नाहीत पण एक तक्रार तिने केली. ती ऐकून शिवाजीराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, संतापाने त्यांचा चेहरा लालबुंद झाला. क्रोधाग्नीत डोळे भडकले. त्यांच्या तलवारीच्या मुठीकडे त्यांचे हात वळले. दोन्ही हातांनी त्यांनी तलवारीची मुठ आवळली. पुढच्याच क्षणाला त्यांनी आपल्या मेहुण्यास आपल्या समोर हजर होण्याचे आदेश दिले.
असे काय घडले होते की शिवबा राजे क्रोधाने बेभान झाले होते ? असे काय ऐकले त्यांनी की त्यांच्या मुठी वळल्या ? मल्लाबाईने तक्रारफिर्याद दिली होती की, 'सखोजी गायकवाड याने युद्ध जारी असताना आपल्या काही स्त्री सैन्यास कैद केले होते. इतकेच नव्हे तर कैदेत त्यांना रात्रभर मराठा छावणीत डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सर्व स्त्रियांना थपडा मारून सोडून दिले !"
साक्षात आपल्या मेहुण्याने असे लांच्छनास्पद कृत्य करावे यामुळे राजे व्यथितही झाले होते आणि क्रोधीतही झाले !
शिवबांची सैन्यास सक्त ताकीद होती की, 'सैनिकांनी स्त्रियांना डांबून ठेवू नये वा गिरफ्तारही करू नये. अशी गुस्ताखी करणाऱ्या सैनिकाविरुद्ध सक्त सजा फर्मावली जाईल'.
आजच्या सरकारप्रमाणे शिवाजीराजांचे नियम केवळ कागदोपत्री नव्हते. त्यांची तामिली व्हायची, कठोर अंमलबजावणी व्हायची. अपराधी कोणीही असो त्याच्याविरुद्ध तक्रार ऐकून घेतली जायची. त्यात तथ्य आढळले तर जागेवरच सजा दिली जायची. इथेही तसेच झाले. ज्यांच्या विरुद्ध तक्रार आली होती ते सखोजी गायकवाड शिवाजीराजांच्या पत्नी सकवारबाईसाहेब यांचे बंधू होते. राजांचे सख्खे मेहुणे होते ते !
शिवाजीराजांनी आपल्या मेहुण्यास हजर होण्यास फार्मावले आणि मल्लाबाई देसाई चकित झाली. तिला अश्रू आवरेनासे झाले. तिला विश्वास बसत नव्हता की केवळ एका महिलेच्या तक्रारीवरून एक सार्वभौम राजा आपल्या सख्ख्या मेहुण्याला जेरबंद करण्याचे फर्मान सोडतो ! हे काही तरी और आहे. हा राजा काही तरी वेगळा आहे. हा राजा अद्वितीय आहे, अलौकिक आहे, परमन्यायी आहे, रयतेचा हा खरा जाणता राजा आहे !
सखोजी गायकवाडांना हजर होण्याचा हुकुम झाला आणि सैन्यात चुळबुळ सूरु झाली, डेऱ्यात कुजबुज सुरु झाली. आता पुढे काय घडते याची सर्वाना उत्कंठा लागून राहिली. मल्लाबाई तर भान हरपून पाहतच राहिली होती. उपस्थित सरदार, शिपाई. मावळे दिग्मूढ होऊन पाहत राहिले. सखोजी गायकवाड शिवबांच्या पुढे हजर झाले. त्यांना मल्लाबाईची तक्रार ऐकवण्यात आली. त्यांना काय बोलावे सुचेनासे झाले. आपला मेहुणाच राजा आहे, तो दया दाखवेल असं त्यांना वाटले नाही. ते राजांना चांगले ओळखून होते. स्वारीच्या जोशात पुरुषसैन्य समजून त्यांनी स्त्रियांना कैद केले खरे पण त्यांची असलियत कळल्यावर त्यांना सोडून देण्याऐवजी त्याने डांबून ठेवले. त्यांच्याशी दुर्व्यवहार केला नाही हे खरे मात्र त्यांना रात्रभर डांबण्याचा गुन्हा त्याने केला. शिवाय सकाळी रिहाई करताना त्यांना थपडा लगावून आपल्या ताकदीचा एहसास देण्याची गुस्ताखी त्याने केली होती. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. शिवबांनी काय ओळखायचे ते ओळखले. आपल्या मेहुण्याची त्यांना दया आली नाही, आपल्या मेहुण्याच्या शोकाकुल अवस्थेने ते द्रवले नाहीत, त्याची माया दाटून आली नाही की त्यांना आपला नातलग असल्याने त्याची कड घ्यावीशी वाटली नाही. त्यांनी मनात आणले असते तर तंबी देऊन, माफीनामा घेऊन त्याला सोडले असते. पण आजकालच्या पुढाऱ्यासारखे किंवा सरकारसारखे ते नव्हते. ते शिवबा होते. अन्यायाच्या विरुद्ध एल्गार करणारा, प्रजाहितदक्ष असणारा, कर्तव्यसन्मुख आणि निस्पृह राजा होता तो ! शिवबांनी हुकुम दिला, "तापलेल्या सळईने आरोपीचे दोन्ही डोळे काढून टाकले जावेत, माझिया राज्यात मायभगिनीकडे वक्र नजरेने जो पाहील त्याची गय केली जाणार नाही, त्यासी सजा होणार म्हणजे होणार !"
लोक थक्क होऊन बघत राहिले. मल्लाबाई तर हैराण होऊन गेली. असे कसे घडू शकते याचे तिला आश्चर्य वाटत होते.
मंडळी, त्या आधीच्या काळातही आणि शिवाजीराजांच्या नंतरच्या काळातही असा पारदर्शी न्याय करणारा राजा झाला नाही. आजकालच्या फुटकळ लोकांची तर औकातही नाही की त्यांचे उल्लेख करावेत.
सखोजीचे डोळे काढले गेले. हे करताना शिवबांच्या दुसऱ्या मनास यातना निश्चित झाल्या असतील. आपल्या पत्नीचा सकवारबाईचा चेहरा त्यांच्या डोळ्यापुढे आला नसेल का ? आला असेल. त्यांना तिच्याबद्दल वाईट वाटले असणार. आपल्या मेहुण्याबरोबर जे काही आनंदाचे क्षण घालवले असतील ते ही आठवले असतील. त्याने स्वराज्याची चाकरी बजावताना दाखवलेले शौर्यही आठवले असेल. पण त्याहीपुढे जाऊन त्यांना आठवला तो राजधर्म. त्याचे पालन करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. आजचे चित्र याच्याविरुद्धचे आहे, राजधर्म पायदळी असतो आणि स्वाप्तधर्म मस्तकी असतो. पण शिवबांनी आपला राजधर्म पाळला. न्याय केला.
इतके करून राजे थांबले नाहीत. आपल्या पतीच्या निधनानंतर पुरुषवेशात आपली जिगर दाखवणाऱ्या मल्लाबाईचे मनोगत त्यांनी जाणले. तिला बोलते केले.
'आपल्या पतीचे हे ठाणे हेच आपले माहेर आहे हेच आपले आजोळ आहे हेच आपले सर्वस्व आहे इथले लोक हेच माझे आप्त आहेत हेच माझे जीवन आहे'
हे तिचे बोल ऐकून राजांचे मन द्रवले. त्यांनी जिंकलेले बेलवडी तिला परत दिले. इतिहासात याच्यासाठी एक मजेदार शब्द आलेला आहे. मल्लाबाईच्या मुलाच्या दुधभातासाठी हे राज्य राजांनी तिला परत दिले असा उल्लेख आहे. इतकेच नव्हे तर सत्यवानाच्या मृत्यूनंतर सावित्रीने त्याच्या प्राणासाठी तपश्चर्या केली होती, निग्रह केला होता त्याप्रमाणे मल्लाबाईनेही आपल्या पतीच्या पश्चात त्याचे राज्य टिकवण्यासाठी, त्याच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला म्हणून शिवाजीराजांनी तिला सावित्रीबाई म्हणून गौरवले. कानडी इतिहासात याच मल्लाबाईचे नाव मल्लवाबाई असे आढळते.
शिवाजीराजांनी दाखवलेल्या या प्रेमामुळे मल्लाबाईच्या डोळ्यांना धारा लागल्या. तिचा ऊर मायेने भरून आला. आपले जिंकलेले राज्य परत देणारा आणि शरणागताच्या तक्रारीवर विश्वास ठेवून आपल्या आप्ताचे डोळे काढणारा हा माणूस नव्हे हा महापुरुष आहे, हा युगपुरुष आहे याची तिला जाणीव झाली. त्यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या मायेपोटी मल्लाबाई उर्फ सावित्रीबाई प्रभू देसाई हिने आपल्या ताब्यातील बहुतेक गावांच्या दरवाज्यात व मंदिरासमोर शिवरायांची दगडी शिल्पे उभी केली.
या शिल्पांपैकीचे एक शिल्प कर्नाटकमधील धारवाडच्या उत्तरेस असणारया यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षिणाभिमुख देवळाच्या ओट्याच्या पश्चिमेस आहे. सुमारे तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद असणारया या शिल्पाचे दोन भाग आहेत. याच शिल्पाच्या खालच्या भागात शिवाजी राजे मांडी घालून बसलेले आहेत आणि त्यांच्या मांडीवर एक लहान मुल आहे. वरील घटनेचे संदर्भ माहिती असले की या शिल्पाचा अर्थ लागतो. शिवाजीराजांच्या मांडीवर असणारे ते मुल म्हणजे मल्लाबाईचे बाळ. आपल्या बाळाला त्यांनी मांडीवर घेतले, आपल्या राज्याला अभय दिले हे मल्लाबाईला यातून सूचित करायचे होते !
या शिल्पाच्या वरच्या भागात शृंगारलेल्या घोड्यावर स्वार झालेले शिवाजीराजे साकारण्यात आले आहेत. या प्रतिमेत त्यांच्यासोबत ज्या व्यक्ती दाखवण्यात आल्या आहेत त्यांच्या हातात राजचिन्हाचे सूचक असणारे छत्र, सूर्यपान, राजदंड आदी वस्तू आहेत. शिवबांच्या डाव्या हातात ढाल आणि उजव्या हातात मराठा पद्धतीच्या मुठीची तलवार दाखवण्यात आली आहे. याच शिल्पात खालच्या बाजूला एक कुत्राही आहे, काही इतिहासकार हा कुत्रा म्हणजे वाघ्या कुत्रा असल्याचे मत नोंदवतात. मात्र त्याचे नामाभिधान वा दखलअस्तित्व या घटनेच्या संदर्भातील दस्तऐवजात आढळत नाही.
इतिहासापासून अनभिज्ञ असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने हे शिल्प पाहिले की त्याला मांडीवर मुल घेऊन बसलेल्या शिवबांच्या शिल्पाचा उलगडा होत नाही. पण खरा इतिहास सामोरा येताच कोणत्याही शिवप्रेमी माणसाचा जीव आभाळाएव्हढा होतो ! मराठ्यांचा हा राजा एकमेवाद्वितीय होता याचे हे अत्यंत बोलके उदाहरण ! तरीही याचे उल्लेख कुठल्या पाठ्यपुस्तकात नाहीत. काही मोजक्या चरित्रात याचे त्रोटक दाखले आढळतात. आपल्या राजाची ही गौरवगाथा आपल्यालाच जगापुढे मांडायची आहे.
- समीर गायकवाड.
संदर्भ - शिवाजीमहाराज स्मृतीग्रंथ पृ. २४/२५,
शोध भवानी तलवारीचा पृ. ५०/५१
जिद्द, एक इतिहास (सप्टेबर २००३) - पृ. ३४/३५
https://sameerbapu.blogspot.com/2015/10/blog-post_22.html
https://sameerbapu.blogspot.com/2015/10/blog-post_22.html

Monday 11 February 2019

पेडगावची छावणी आणि मराठे

मराठी बुद्धीमत्तेचा एक खराखुरा नमुना महाराजांनी आलमगीराच्या दख्खनच्या सुभेदारास दाखवला. पुण्यापासून २४ कोसांवर भीमेच्या काठी, बादशहाचा दूधभाऊ बहादूरखान कोकलताश जफरजंग हा किल्ला बांधून रहात होता. त्याच्यापाशी बादशहाला भेट (नजर) करण्यासाठी म्हणून आणलेले २०० अरबी घोडे आणि १ कोटी रुपयांचा खजिना असल्याची बातमी महाराजांना मिळाली. हेरांनी आपले काम व्यवस्थित पूर्ण केले. आता डावपेच, लढाई आणि लूट असा कार्यभाग राहिला होता. महाराजांनी डावपेच आखले. नऊ सहस्रांची फौज घेऊन महाराजांचा सेनाधुरंधर पेडगावच्या दिशेने निघाला. याचे नाव अज्ञात आहे; पण बहुधा हंबीरराव मोहिते असावा. याने फारच गंमत उडवून दिली. आपल्या फौजेच्या २ टोळ्या केल्या. २ सहस्रांची एक टोळी बहादूरगडावर धावून गेली. काय करावयाचे हे आधीच ठरलेले होते. मराठी फौज छावणीवर चालून येत आहे, असे समजताच बहादूरखानने आपल्या फौजेला सिद्ध होण्याचा हुकूम सोडला. जय्यत तयार झालेली मोगल फौज किल्ल्याबाहेर येऊन मराठ्यांच्या दिशेने निघाली. मोगल फौज येत आहे, हे पाहिल्यावर मराठी तुकडी पळत सुटली. हुलकावण्या मारीत त्या मराठी फौजेने मोगल फौजेला फार दूर नेले. बहादूरखान चिडून मराठी फौजेचा पाठलाग करत राहिला. खान फार दूरवर गेला आहे, याची बातमी हेरांनी आणल्यावर ७ सहस्रांची दुसरी मराठी टोळी बहादूरगडावर चालून आली. तेथे असलेल्या मूठभर मोगलांना ही धडक सोसवलीच नाही. पाचोळा कोठल्या कोठे उडाला आणि मराठ्यांनी मुघली छावणीची मोठी लूट केली. एक कोटीचा खजिना आणि २०० अरबी घोडे अलगद हाती आले. एवढी मिळकत झाल्यावर मराठ्यांनी मोगली छावणी पेटवून दिली.
पेडगावची छावणी कापरासारखी जळून खाक झाली.
#jayshivaray
#shivajimaharajhistory

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...