विनोद जाधव एक संग्राहक

Friday 27 January 2023

मिर्झाराजे जयसिंगाच्या एकनिष्ठ सेवेचे फळ

 

मिर्झाराजे जयसिंगाच्या एकनिष्ठ सेवेचे फळ

लेखन ::श्री नागेश सावंत

  • मिर्झाराजे जयसिंग याचा मृत्यू ( २८ ऑगस्ट १६६७ )
इराणचा शहा मरण पावल्यामुळे औरंगजेबाला यापुढे ( इराणच्या मोहिमेकरता ) राजा जयसिंगाच्या साह्याची आवश्यकता वाटत न्हवती त्याला असा संशय आला होता कि , शिवाजीच्या पळून जाण्यात राजा जयसिंगाचा हात असावा . त्याने जयसिंगाला दरबारात परत येण्याचा हुकुम केला. जयसिंग हा आग्र्याच्या वाटेवर असताना औरंगजेबाने त्याच्यावर विषप्रयोग करविला. त्यामुळे जयसिंग हा बऱ्हाणपूर येथे मरण पावला. जयसिंगाच्या एकनिष्ठ सेवेचे हे फळ त्याला मिळाले.
जयसिंगाच्या मृत्यूची बातमी मोगल दरबारात पोहचली. औरंगजेबाने उघडपणे जाहीर केले कि त्या मोठ्या सरदाराच्या मृत्यूने आपल्याला आनंद झाला आहे. बातमी घेऊन येणाऱ्याला तो म्हणाला “ त्या जयसिंगाचा मृत्यू ही माझ्या अतिशय आनंदाची बाब होय “
( संदर्भ :- असे होते मोगल :- निकोलाव मनुची )
  • मिर्झाराजे जयसिंग याच्या नातवाचा मृत्यू ( १० एप्रिल १६८२ )
रामसिंहाचा पुत्र कृष्णसिंह म.जयसिंग मिर्झाराजेचा नातू , औरंगजेबाच्या फौजेत नोकरीवर होता. तो आपल्या पुत्रास अकबरासह आपल्या विरुद्ध होवून सहाय्य करतो अशा संशयाने त्यास म. कृष्णसिंहास परिंड्या जवळ औरंगजेबाने ठार केले.
( संदर्भ :- संभाजीकालीन पत्रसारसंग्रह पत्र क्र. ६८ )
  • मिर्झाराजे जयसिंग याच्या मुलाचा मृत्यू ( एप्रिल १६८८)
मिर्झाराजे जयसिंग याच्या मृत्युनंतर आसामच्या मोहिमेवर रामसिंगाची नेमणूक ६ जानेवारी १६६८ ला झाली. संण १६७५-७६ च्या सुमारास रामसिंग बंगालमधून परत आला आणि बादशहाच्या चाकरीत असताना काबुलमध्ये १६८७-८८ मध्ये मरण पावला.
( संदर्भ :- असे होते मोगल :- निकोलाव मनुची )
रामसिंग याने स्वतःच्या वडिलांचा व मुलाचा मृत्यू स्वतःच्या उघड्या डोळ्याने बघितला तरीदेखील शेवटपर्यंत मोगलांची औरंगजेबाची चाकरी करत राहिला. एक दुर्दैवी शेवट
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- असे होते मोगल :- निकोलाव मनुची
संभाजीकालीन पत्रसारसंग्रह पत्र क्र. ६८

औरंगजेबाने आदिलशाही व कुतुबशाही का बुडवली ?

 


औरंगजेबाने आदिलशाही व कुतुबशाही का बुडवली ?

सांभार ::श्री नागेश सावंत

छत्रपतींचे स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब अफाट सैन्य, दारुगोळा , तोफा व प्रचंड खजिना घेऊन १६८२ रोजी दक्षिणेत आला परंतु मराठ्यांच्या गनिमीकावा आणि गडांच्या अभेद्यतेमुळे औरंगजेबाचा स्वराज्य नामशेष करण्याचा मनसुबा धुळीस मिळाला. मराठा साम्राज्य बुडवणे शक्य नसल्याचे लक्षात येताच औरंगजेबाने आपला मोर्चा विजापूरच्या आदिलशाहीकडे आणि गोवळकोंड्याचा कुतुबशाहीकडे वळवला. औरंगजेब हा स्वतः मुसलमान बादशहा होता तसेच विजापूर आणि गोवळकोंड्याचे बादशहा देखील मुसलमान होते. असे असताना देखील औरंगजेबाने दोन्ही मुसलमानीशाह्या का बुडवल्या ?
या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी आपणास १६८४ व १६८५ मधील काश्मीर व गुजरात या दोन ठिकाणी झालेल्या शिया व सुन्नी मुसलमान तसेच खोजापंथीय व सुन्नी मुसलमान यांच्यात झालेल्या दंगलीचा आढावा घेणे गरजेचे आहे.
  • काश्मीरमधील शिया मुस्लीम व सुन्नी मुस्लीम दंगल
काश्मीरमधील शिया मुस्लीम अबदुस शकूर व सुन्नी मुस्लीम सादिक यांच्यातील वैय्यत्तिक भांडण विकोपाला जाऊन त्याचे रुपांतर शिया मुस्लीम व सुन्नी मुस्लीम अश्या जातीय दंगलीत झाले. अबदुस शकूरने मुस्लीम खलिफांनबद्दल अपशब्द वापरले त्याची तक्रार सादिक याने सुन्नी पंथीय काझी महमद युसुफ याच्याकडे केली . मोगल सुभेदार शिया पंथीय इब्राहीम खान याने अबदुस शकूर याची बाजू घेतली. त्यामुळे काझी महमद युसुफ याने सुन्नी पंथीय मुसलमानांना चिथावणी देऊन शिया मुस्लिमांच्या वस्तीत जाळपोळ घडवून आणली. शिया मुस्लिमांच्या मदितीसाठी मोगल सुभेदाराचा मुलगा फिदाईखान याने यात हस्तक्षेप केला . या दंगलीत अनेक शिया व सुन्नी मुस्लीम ठार व जायबंदी झाले. सुन्नी मुसलमानांच्या आक्रमतेमुळे मोगल सुभेदारास अबदुस शकूर यास काझी महमद युसुफ याच्याकडे शिक्षेसाठी सुपूर्त करावे लागले. मुस्लीम धर्मशास्त्राप्रमाणे त्यास दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा देण्यात येऊन त्याची अंमल बजावणी करण्यात आली . सुन्नी पंथीय जमावाने आणखीन आक्रमक होऊन शिया पंथीय धर्मगुरूस ठार मारले. सदर घटनेमुळे हि दंगल आणखीनच चिघळली . मोगल सुभेदाराच्या मुलाने सुन्नी पंथीय दंगलखोर मुस्लिमांची कत्तल केली. सुन्नी धर्मगुरूच्या चिथावणीने सुन्नी पंथीय मुस्लीम जमावाने मोगल सुभेदार इब्राहीम खान याचा वाडा जाळून टाकला. मोगल सुभेदार इब्राहीम खान याने सुन्नी धर्मगुरू व काझी तसेच इतर सुन्नी जमावातील लोकांना पकडून तुरुंगात टाकले. यामुळे दंगल आटोक्यात आली पण सुन्नी पंथीय मुसलमानांनी सुन्नी पंथीय मोगल बादशाह औरंगजेब याच्याकडे तक्रार केली . औरंगजेबाने मोगल सुभेदार शिया पंथीय मोगल सुभेदार इब्राहीम खान याची सुभेदार पदावरून हकालपट्टी केली . कैदेतील सर्व सुन्नी पंथीय लोकांची सुटका करण्यात आली.
  • गुजरातमधील खोजा पंथीय मुस्लीम व सुन्नी मुस्लीम दंगल
गुजरातमधील खोजापंथीय मुस्लीम मुर्तीपुजेप्रमाणे धर्मगुरूची पूजा करत असत व त्याच्या चरणी नजराणे अर्पण करत असत. सुन्नी पंथीय मोगल बादशाह औरंगजेब याच्या आदेशाने खोजा धर्मगुरू सय्यद शाह यास अटक करून औरंजेबाकडे आणत असताना खोजा धर्मगुरू सय्यद शाह याने विषपान करून जीव दिला. त्यामुळे धर्मगुरूच्या मुलास अटक करून औरंजेबाकडे आणण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या खोजापंथीय मुस्लीम जमावाने भरुच शहरावर हल्ला करून तेथील फौजदारास ठार करून शहर आपल्या ताब्यात घेतले . सदर घटनेची माहिती गुजरातच्या मोगल सुभेदारास मिळताच त्याने भरूच शहरावर हल्ला केला त्यामुळे खोजापंथीय मुस्लीम जमावास भरुचच्या किल्याच्या आश्रयास जावे लागले व थेथून त्यांनी आपला लढा चालू ठेवला. काही दिवसांनी गुजरातच्या मोगल सुभेदाराने भरूच किल्ला जिंकला व किल्यातील सर्व खोजापंथीय मुस्लीमांची कत्तल केली.
  • सेतूमाधवराव पगडी लिहितात :- “ औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णुतेची झळ हिंदूंना तर लागलीच पण त्याचबरोबर सुन्नी पंथीय नसलेले शिया मुसलमान , गुजरातेतील काही मुस्लीम पंथ , सुफी साधू आणि सत्पुरुष हेही त्याच्या तावडीतून सुटले नाही. “
म्हणजे सुन्नी मुस्लीम व्यतिरिक्त अन्य व्यक्ती हि सुन्नी पंथीय औरंगजेबासाठी काफर होती .
  • विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही बुडवली
मोगल न्यायाधीश शेख उल इस्लाम याने विजापूर व गोवळकोंडा शियापंथीय मुसलमानीशाही खालसा करू नये असा सल्ला औरंगजेबास दिला परंतु औरंगजेबाने त्याचा सल्ला नाकारल्याने त्याने न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला . मोगल न्यायाधीश म्हणून काझी अब्दुल्ला याने देखील मुसलमानीशाही राज्य खालसा करू नये असा सल्ला औरंगजेबास दिला परंतु त्याच्या सल्याकडेदेखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.
विजापूरला मोगली सैन्याचा वेढा पडला त्यावेळी विजापूरच्या मुस्लीम धर्मगुरुंचे एक शिष्टमंडळ औरंगजेबाची भेट घेण्यासाठी त्याच्या छावणीत आले. धर्मगुरुंच्या शिष्टमंडळाने औरंगजेबास निवेदन दिले “ तुम्ही सनातनी मुसलमान आहात . कुराणातील कायदा तुम्हाला पूर्णपणे अवगत आहे. धर्मगुरूंच्या अनुमतीशिवाय आणि कुराणाची संमती घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या जीवनात एकही पाऊल उचलत नाही. अशा परीस्थीतीत तुमच्याच मुसलमान बांधवानविरुद्ध तुम्ही हे जे अपवित्र युद्ध चालवले आहे त्याचे समर्थन कसे काय करता ते आम्हास सांगा. “
औरंगजेबाने या शिष्टमंडळास उत्तर दिले “ तुम्ही सांगता त्यातील एकही शब्द खोटा नाही. मला तुमच्या प्रदेशाची अभिलाषा नाही परंतु अत्यंत घातकी असा काफिर ( शिवाजी ) त्याचा काफिर मुलगा ( संभाजी ) हा तुमच्या शेजारी राहतो आणि त्याला तुम्ही आश्रय दिला आहे, तो येथल्या मुसलमानांपासून दिल्लीच्या मुसलमानांपर्यंत सर्वांनाच त्रास देत आहे आणि त्यांच्या तक्रारी मला रात्रदिवस पोहचत आहेत . तेंव्हा त्याला तुम्ही माझ्या स्वाधीन करा म्हणजे तुमचा वेढा मी ताबडतोब उठवतो . “
विजापूरच्या आदिलशाहीच्या पाडावानंतर औरंगजेबाने आपला रोख गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडे वळवला. मोगल सैन्यातील शिया सैनिकांना हे शेवटचे शिया पंथीय मुस्लीम राज्य बुडू नये असे वाटत होते. त्यामुळे शियापंथीयांचा विरोध होता . आलमगीर औरंगजेब गोवळकोंड्याच्या दरबारातील आपल्या मुगल वकिलास लिहितो “ ह्या कमनशिबी माणसाने ( अबुल कुतुबशहा ) आपल्या राज्यातील सर्वोच्च सत्तापद एका काफिराकडे ( हिंदू ब्राम्हण मादण्णा आणि आकण्णा ) सोपवली . कुतुबशाहाच्या या निर्णयामुळे सय्यद , शेख , काझी यांना त्याच्या आज्ञेत राहावे लागत असे . कुतुबशाहाने त्याच्या राज्यात दारूचे गुत्ते , वेश्याव्यवसाय , जुगाराचे अड्डे अशा सर्व प्रकारच्या इस्लामविरोधी पापाचरणाला राजरोसपणे उत्तेजन देऊन स्वतःसुद्धा या पापचरणाचा उपभोग घेत त्यात मग्न असतो . इस्लाम, न्याय आणि पाखंडीपणा यातील फरक देखील त्याला ओळखता येत नाही. इस्लाम व अल्लाने दिलेली धर्माज्ञा व नीषेधाज्ञा याचे पालन न करता काफिर संभाजीला १ लाख होनांची मदत करून त्याने अल्ला व प्रजा यांचा तीरस्कार व अवकृपा संपादन केली आहे.”
अफझलखान १६५९ साली स्वराज्यावर चालून आला त्यावेळची आदिलशाहीची लष्करी ताकद व १६८६ मधील आदिलशाही बुडाली त्यावेळची आदिलशाही यात फरक होता. विजापूरच्या गादीवरील सिकंदर आदिलशाह अठरा वर्षांचा अनअनुभवी सुलतान होता तसेच अंतर्गत बंडखोरीमुळे आदिलशाही मोडकळीस आली होती . गोवळकोंड्याचा सुलतान अबुल हसन हा विलासी व चैनीचे जीवन जगण्यात मग्न होता. औरंगजेब दक्षिणेत आल्यापासून मराठ्यांशी युद्ध करून विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत होता परंतु रामसेजसारखा किल्ला देखील त्यास जिंकता येत न्हवता. त्यामुळे खचलेल्या मोगल सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी आदिलशाही व कुतुबशाही जिंकून आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्याचे व आदिलशाही व कुतुबशाही पडल्याने मराठा सैन्याचे मनोबल खच्ची करून मराठा सैन्यावर मानसिक दबाव निर्माण करायचा असा औरंगजेबाचा हेतू होता . त्यानुसार सुन्नीपंथीय औरंगजेबाने कुराण व इस्लामचा आधार घेत दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची शियापंथीय कुतुबशाही बुडवली .
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- औरंगजेबाचा संक्षीप्त इतिहास :- डॉ . जदुनाथ सरकार
औरंगजेब शक्यता आणि शोकांतिका :- रवींद्र गोडबोले
छायाचित्र :- साभार गुगल

छत्रपती शिवरायांचे ७०० पठाणी सैन्य

 


छत्रपती शिवरायांचे ७०० पठाणी सैन्य

लेखन ::श्री नागेश सावंत

छत्रपती शिवाजी महराजांच्या सैन्यात ७०० पठाणाची तुकडी सेवेत असल्याचे काही स्वघोषित शीवव्याख्याते , कादंबरी , चित्रपट व मालिकांमधून दर्शविण्यात येते. सदर लेखात शिवाजी महाराजांच्या सैन्यातील ७०० पठाणांचे सत्य नक्की काय त्यासंबंधी संदर्भसाधनातून येणाऱ्या नोंदीचा आढावा घेऊ.
  • सदर ७०० पठाणांची नोंद चिटणीस बखर “ विजापूरचे पादशाहीतून सातशे पठाण बदलून चाकरीस राहावयास आले. त्यांस ठेवावे न ठेवावे , ऐसा विचार पडला. विजापुरकरांचा आपला द्वेष. हे मुसलमान यांचा भरवसा मानावा कसा? म्हणून विचार करिता. गोमाजी नाईक पानसंबळ हवालदार, जिजाबाईसाहेबांचे लग्न जाले ते समयी. जाधवराव यांनी त्यांचे सेवेसी दिल्हे होते. शाहाणे, वडिलांचे चाकरीचे विश्वासू जाणून त्यांजवरी इतबार ठेवून , त्यांची अब्रू वाढवून सेवा घेऊ लागले होते. त्यांनी उत्तर केले कि “ महाराज राज्य आक्रमण करणार. आले लोक न ठेवतील तरी परराज्यातील चांगले नामी माणूस कसे येईल ? “ ते सलाह फार चांगली जाणून ठेविले. त्यांची सरदारी राघो बल्ल्हाळ अत्रे यांसी सांगितली.”
सदर बखर हि उत्तरकालीन असून लेखनकाळ १८१० म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १३० वर्षांनी लिहिलेली बखर. सदर बखरीतील नोंद पाहता शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरवात केली त्या सुमारास विजापूर दरबारातील ७०० पठाण चाकरीस आले. शिवाजी महाराजांना मुसलमानांवर भरवसा नाही असे खुद्द बखरकार सांगत आहे. अश्यावेळी गोमाजी नाईक यांनी मध्यस्थी करून राज्यवाढीसाठी सैन्याची गरज लागणार त्यामुळे त्यांना ठेवून घ्यावे असा सल्ला दिला . त्यामुळे महाराजांनी त्यांना ठेवून घेतले परंतु त्यांना विशेष लष्करी पद न देता त्यांना सरदार राघो बल्ल्हाळ अत्रे यांच्या देखरेखीखाली ठेवले.
  • सदर ७०० पठाणांची शिवदिग्विजय बखरीतील नोंद “ सातशे पठाण स्वार दौलताबादकरांकडील दिल्लीहून बेरोजगार सर्व देश फिरोन , महाराजांचा प्रतापोदय ऐकून महाराजांच्या आश्रयास आले. गोमाजी नाईक यांच्या सल्यावरून शिवाजी महाराजांनी चाकरीस ठेविले.
सदर बखर हि उत्तरकालीन असून लेखनकाळ १८१८ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १३८ वर्षांनी लिहिलेली बखर. सदर बखरीतील नोंद पाहता ७०० पठाण हे सर्व देश फिरून बेरोजगार असल्याने कामासाठी ते शिवाजी महाराजांच्या आश्रयास आले. त्यांना स्वराज्याशी काही घेणे देणे न्हवते.
  • चिटणीस बखरीतील एक नोंद :- शिवाजी महाराजांनी विजापूर दरबारात बादशहाच्या भेटिस जावे असे शहाजी महाराजांना वाटे तशी सूचना त्यांनी बालवयातील शिवाजी महाराजांना केली. ( साधारण वय ८ ते १० ) तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या मनातील व्यथा बोलून दाखवली.
“आपण हिंदू व हे यवन परम नीच , यापरते नीच दुसरे नाही. अंत्यजादिकांचा संपर्क करितात. त्यांची सेवा करणे, त्यांचे अन्न भक्षणे, आर्जव करणे , त्यास नमस्कार करणे, हा माझे प्रकृतीस फार त्रास उत्पन्न होतो. यवन गोवधादी करितात. ब्राम्हणवध व निदा धर्माची हे पाहाणे परम अनुचित दिसते. आपण रस्त्यांनी जाता गोवध होतो. ते पाहताच त्याचा शिरच्छेद करावा ऐसे वाटते व श्रम वाटतात. गाईस पिडा करणाऱ्यांचा शिरच्छेद करावा असे मनात येते. परंतु वडील काय म्हणतील हे चित्तात वागते यास्तव उपाय नाही. नाहीपेंक्षा केलाच असता. अमीर- वजीर यांचे घरी जाणे हे माझे चित्तास योग्य वाटत नाही. एखादे समयी स्पर्श झाल्यास स्नान करावे, दुसरी वस्त्रे घ्यावी, ऐसे करू लागले. आणि याअन्वये सांगून पाठविले.
सदर नोंदीच्या आधारे आपणास शिवाजी महाराजांच्या मनात मुस्लीम बादशाह व मुस्लीम लोकांविषयी घृणा होती असे दिसते.
चिटणीस बखरीतील सदर नोंदीस समकालीन व विश्वसनीय शिवभारतातील नोंदीचा आधार मिळतो
(शिवभारत १७:२१) शिवाजी महाराज लहानपणापासून यवनांचा अपमान करत आले आहेत
चिटणीस बखर विजापूर दरबारातून तर शिवदिग्विजय बखर दिल्लीतून ही पठाणी तुकडी आल्याचे नमूद करते
सदर दोन्ही उत्तरकालीन बखरीतील नोंदीला कोणताही समकालीन संदर्भ आढळून येत नाही. सदर ७०० पठाणाच्या सैन्याच स्वराज्यातील योगदान काय कोणतीच लहानात लहान कामगिरीही आढळून येत नाही.
टीप :- चीटणीस व शिवदिग्विजय बखरीत इतरही प्रसंग वर्णन आलेले आहेत मग ते देखील मान्य करणार का ? त्यावेळी ही उत्तरकालीन बखर , कोणतीतरी नंतर त्यात हे लिहिलं आहे वैगरे बोंब ठोकणार
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- सप्तप्रकरणात्मक चरित्र
शिवभारत

छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या दोन सनदा

 

छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या दोन सनदा

लेखन ::श्री नागेश सावंत

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती थोरले शाहू महाराजांपर्यंत स्वराज्यात अनेक व्यक्ति पेशवे म्हणून मराठा साम्राज्यात पेशवे पदावर विराजमान झाल्या. बाळाजी विश्वनाथ भट हे शिवशाहीच्या प्रारंभापासून आठवे पेशवे म्हणून पेशवे पदावर विराजमान झाले.
पेशवे या फारसी शब्दाचा अर्थ प्रंतप्रधान असा असून पेशवाई या शब्दाचा अर्थ सामोर जाणे . पेशव्यांच्या शिक्यांमध्ये “ मुख्य प्रधान “ ही अक्षरे दिसून येतात. राज्याची मुलकी व लष्करी व्यवस्था पाहण्यासाठी नेमलेले हे पद.
विजयनाम संवत्सरे शके १६३५ मार्गशीर्ष शु. एकादशी , मंगळवार दिनांक १७ नोहेंबर १७१३ रोजी छत्रपती थोरले शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पुण्यातील “ मांजरी ” गावी पेशवेपदाची वस्त्रे दिली. बाळाजी पेशवे यांच्या पश्चात भट कुटुंबातील थोरले बाजीराव पेशवे (बाजीराव बल्लाळ ) व नानासाहेब पेशवे (बाळाजी बाजीराव) यांना छत्रपती थोरले शाहू महाराजांनी पेशवेपदाची वस्त्रे दिली.
१ ओक्टोंबर १७४९ रोजी छत्रपती थोरले शाहू महाराजांनी दोन याद्या ( सनदा ) तयार करवून घेतल्या व त्या नानासाहेब पेशव्यांना दिल्या .या दोन सनदा म्हणजे छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे मृत्यूपत्रच या दोन सनदा पुढीलप्रमाणे
शाहू महाराजांस पुत्रसंतान नव्हते म्हणून अंतसमयी त्यांस फार दुःख होऊन पुढे राज्यभार कोण चालविणार याबद्दल चिंता उत्त्पन्न झाली. पुष्कळ तपास व खल केला. पेशव्यांशिवाय इतरांच्या हातून राज्याचा निभाव लागणार नाही अशी खात्री पटून त्यांनी मरणापूर्वी दोन लेख स्वहस्ताने लिहून पेशव्यांचे स्वाधिन केले आणि त्यांस राज्यभार चालविण्याची आज्ञा केली. याच आधारावर पेशव्यांनी पुढील उद्योग केला. हे दोन लेख मृत्युपत्रासारखे महत्वाचे आहेत. ( ऐतिहासिक पत्रबोध :- गोविंद सखाराम सरदेसाई )
सनद पहिली :-
श्री
राजमान रा| बालाजी प्रधान पडित यास आज्ञा - तुम्ही फौज धरने सरवास आज्ञा केली त्याच्या दैव नाही महाराजास दुखने जाले नाही बर होत नाही राजभार चाला पाहिजे तर पुढे वंस बसवने. कोलापुरचे न करने. चिटणीसास सरव सागितले तसे करने वंस होईल त्याच्या आज्ञेत चालून राजमंडल चालवने. चिटणीस स्वामीचे इसवासू त्याच्या तुमच्या विचारे राज राखने वंस होईल तो तुमची घालमल करणार नाई
सुदन असा
सनद दुसरी :-
श्री
राजमान रा| बालाजी पडित प्रधान
आज्ञा जे - राजभार तुम्ही चालवाल हा भरवसा स्वामीस आहे. पहिले सागितले खातरजमा ती चिटणीसानी अढळ केली तुमचे मस्तकी हात ठेविला आहे. वस होईल तो तुमचे प्रधानपद चालवील करील अंतर त्यास सफत आसे त्याचे आज्ञेत चालून सेवा करने. राज राखने . बहुत काय लिहिने,
सुदन असा.
सनदांचा सारांश पुढीलप्रमाणे :- स्वराज्याचा राज्यकारभार चालावा यासाठी गादीवर वंश बसवावा परंतु कोल्हापूर गादीतील व्यक्तीस गादीवर घेऊ नये. राज्यकारभार नानासाहेब पेशवे चालवतील या बाबत शाहू महाराजांना विश्वास असून नानासाहेबांच्या वंशाला पेशवेपद वंशपरंपरागत छत्रपतींकडून देण्यात येईल. छत्रपतींच्या आज्ञेत राहून स्वराज्याचा कारभार करावा .
या दोन सनदांमुळे नानासाहेब पेशवे यांच्या पुढील वंशास पेशवेपद वंश परंपरागत मिळाले. छत्रपती थोरले शाहू महाराजांनी राज्यकारभाराची जबाबदारी नानासाहेबांकडे सोपवली त्यामुळे पेशवे मराठा साम्राज्याचे मुख्यातार झाले.
लेखन आणि संकलन :- श्री नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- ऐतिहासिक पत्रबोध :- गोविंद सखाराम सरदेसाई

वेडात मराठे वीर दौडले सात

 


वेडात मराठे वीर दौडले सात

लेखन ::श्री नागेश सावंत

वरील सदर वाक्य कानी पडताच आपणास आठवण होते ती सरनौबत प्रतापराव गुजर व त्यांच्यासह धारातीर्थी पडलेल्या ६ मावळ्यांची . २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरीच्या रणसंग्रामात नक्की काय घडले याविषयीच्या काही नोदी.
६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळा जिंकला . शिवाजी महाराज हि आनंदाची बातमी कळताच पन्हाळ्यास दाखल झाले. शिवाजी महाराजांची हि विजयी घोडदौड थांबण्यासाठी विजापूरहून सरदार अब्दुल करीम बहलोलखान याची नेमणूक करण्यात आली. सरदार बहलोलखान १२ हजार स्वारानिशी पन्हाळगडाच्या दिशेने निघाला.
सभासद बखरीनुसार शिवाजी महाराजांना हि माहिती मिळताच सरनौबत प्रतापराव गुजर यांना आज्ञा दिली “ विजापूरचा बहलोलखान येवढा वळवळ बहुत करीत आहे. त्यास मारून फत्ते करणे.
प्रणालपर्वतग्रहनाख्यान नोंदीनुसार शिवाजी महाराजांनि आज्ञा केली “ बहलोलखान हा थोड्या सैन्यासह आहे तोपर्यंत त्याला कैद करा. “
१५ एप्रिल १६७३ सरनौबत प्रतापराव गुजर आणि बहलोलखान यांच्यात उमराणी येथे तुंबळ युद्ध झाले. मराठा सैन्यातील सरदारांनी बहलोलखानाच्या छावणीस वेढा दिला. सिद्दी हिलाल हा सैन्याच्या आघाडीस होता. त्याच्यामागे एक कोस अंतरावर विठोजी शिंदे होते, कृष्णाजी भास्करविठ्ठल पिलदेव हे शत्रू सैन्याच्या दोन्ही बलंगावर ( बाजूस ) संपूर्ण तयारीनिशी उभे ठाकले. विसोजी बल्लाळ सैन्याच्या सभोवती घिरट्या घालू लागला . अश्या रीतीने बहलोलखानाच्या संपूर्ण सैन्यास घेरण्यात आले.
बहलोलखान याची लष्करी छावणी जेथे पडली होती तिथे पाण्याचा जलाशय ( तलाव ) होता. मराठ्यांनी तो जलाशय आपल्या ताब्यात घेतला. या युद्धात बहलोलखान याच्या सैन्याचा दारूण पराभव झाला. बहलोलखानचा सहकारी सिद्दी मुहमद्द बर्की यास दीपोजी राऊत यांनी ठार केले. सिद्दी मुहमद्द बर्की याच्या मृत्यूने बहलोलखान धास्तावला सूर्यास्त झाला होता. चोहोबाजूंनी बहलोलखान कोंडला गेला होता. त्याने प्रतापराव गुजरांकडे क्षमायाचना आर्जवे केली “ आपण तुम्हावरी येत नाही. पाद्शाहाच्या हुकुमाने आलो. याउपरी आपण तुमचा आहे. हरएक वक्ती आपण राजियांचा दावा न करी. “ अशी दिनयाचना करण्यास सुरवात केली. सरनौबत प्रतापराव गुजर त्याच्या या भूलथापांना भुलले व त्यांना त्याची दया आली व त्यांनी त्यास कैद न करता त्यास जिवंत सुखरूप जाऊ दिले .
शिवाजी महाराजांना प्रतापराव गुजरांनी बहलोलखान कैद न करता धर्मवाट देत जिवंत सोडल्याचे कळताच सभासद बखरीतील नोंदीनुसार शिवाजी महाराजांनी “ सला काय निमित्य केला ? असे बोल लावत प्रतापराव गुजरांवर रागावले.
सरनौबत प्रतापराव गुजर मुत्सद्देगिरीत कमी पडले शिवाजी महाराज रागावले त्यामुळे पन्हाळ्यास न येताच पुढील मोहिमेस अथणी हुबळीच्या दिशने गेले. सरदार बहलोलखान स्वराज्यावर पुन्हा चालून आला. १४ जून १६७३ इंग्रज पत्रातील नोंदीनुसार “ विजापुरी सेनापती बहलोलखान याच्या सैन्यापुढे शिवाजीचा टिकाव न लागून त्याचे सैन्य सर्व ठिकाणी माघार घेत आहे. बहलोलखानचे सैन्य कोल्हापूरच्या आसपास छावणी करुन आहे. ते पावसाळा संपताच राजापुरी येणार आहे. शिवाजीने भिऊन जाऊन तहाचे बोलणे लाविले आहे. परंतु बहलोलखान त्याच्या विरुद्ध ( शिवाजी महाराज ) पक्का निश्चय करून बसलेला दिसतो.
सरदार बहलोलखान सरनौबत प्रतापराव गुजरांकडून जीवदान मिळाल्यानंतर पुन्हा सैन्यासह स्वराज्यावर चालुन आला . शिवाजी महाराजांनी त्याचाशी तह करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने त्यास नकार दिला.
नोहेम्बर १६७३ रोजी शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवर गेले असता १७ डिसेंबर १६७३ इंग्रज पत्रातील नोंदिनुसार सरदार बहलोलखान याने बंकापुरला तर सर्जाखानाने चांदगडला शिवाजी महाराजांचा पराभव केला.
डिसेंबर १६७३ रोजी महाराज स्वराज्यात आले कर्नाटक मोहिमेत सरदार बहलोलखानामुळे अडचणी निर्माण झाल्या . सभासद बखरीनुसार बहलोलखान वारंवार स्वराज्यावर चालून येत होता त्यामुळे शिवाजी महाराजांनी सरनौबत प्रतापराव गुजर यांना महाराजांचा आदेश मिळाला “ हा घडोघडी येतो याकरिता मागती प्रतापराव यास पाठविले कि “ तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोलखान येतो . याशी गाठ घालून , बुडवून फत्ते करणे , नाहीतर तोंड न दाखविणे “. ऐसे प्रतापराव यास निक्षून सांगून पाठविले.
सरनौबत प्रतापराव गुजर यांना शिवाजी महाराजांचे बोलणे जिव्हारी लागले. सभासद बखरीनुसार “ त्यांनी बहलोलखानास नेसरी येथे गाठले दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. अवकाश होऊन प्रतापराव सरनौबत तलवारीच्या वाराने ठार झाले. रण बहुत पडिले. रक्ताच्या नद्या चालिल्या .त्याजवर बहलोलखाना विजापुरास गेला. आणि राजीयाचे लष्कर पन्हाळ्याखाले आले.”
जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ माघ वद्य १४ चतुर्दशीला ( २४ फेब्रुवारी १६७४ ) नेसरी येथे महाशिवरात्रीस बहलोलखाना आणि प्रतापराव गुजर यांच्यात झालेल्या लढाईत प्रतापरावाना मृत्यू आला.
सरनौबत प्रतापराव गुजर यांच्या मृत्यूची बातमी शिवाजी महाराजाना कळताच त्यांना अतीव दुख: झाले. “ प्रतापराव पडले हि खबर राजीयानी येकुन बहुत कष्टी झाले. आणि बोलिले कि आज एक बाजू पडली. प्रतापराव यास आपण लिहून पाठवले कि फत्ते न करिता तोंड दाखवू नये. त्यासारिखे करून बरे म्हणविले “
४ एप्रिल १६७४ च्या इंग्रज पत्रातील नोंदीनुसार “ प्रतापराव बहलोलखानाशी एका खिंडीत फक्त ६ घोडेस्वारानिशी लढताना बाकीचे सैन्याचे मदतीचे अभावी मारला गेला. “ सदर इंग्रज पत्रातील नोंदीच्या आधारे सरनौबत प्रतापराव गुजर हे ६ मावळ्यांना ( विसोजी बल्लाळ , दीपोजीराव राऊत , विठ्ठल पिलदेव , सिद्दी हिलाल , विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर ) सोबत घेऊन बहलोलखानावर चालून गेले व त्यांना वीर मरण आले असे दर्शविले जाते परंतु या नेसरीच्या युद्धात ज्या मावळ्यांना वीर मरण आले त्यांची नावे कोणत्याही साधनात आढळून येत नाहीत.
वरील येणाऱ्या नावातील विसोजी बल्लाळ , दीपोजीराव राऊत , विठ्ठल पिलदेव , सिद्दी हिलाल , विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर ही नावे १५ एप्रिल १६७३ रोजी झालेल्या सरनौबत प्रतापराव गुजर आणि बहलोलखान यांच्यात उमराणी येथे झालेल्या युद्धातील आहेत. त्याविषयीची नोंद आपणास जयराम पिंडे लिखित प्रणालपर्वतग्रह्मणाख्यान या ग्रंथात मिळते .
विठोजी शिंदे हे नोहेम्बर १६७३ साली विजापूर सरदार सर्जाखान याच्याशी झालेल्या युद्धात मृत्युमुखी पडले. जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ कार्तिक महिन्यात सर्जाखान व विठोजी शिंदे यांच्यात चकमक झाली. विठोजी शिंदे ठार झाले. “
लेखन आणि संकलन : - नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ : -सभासद बखर
प्रणालपर्वतग्रह्मणाख्यान :- जयराम पिंडे
जेधे शकावली
शिवकालीन पत्रसार खंड २

नेताजी पालकर व्यक्तिवेध

 


नेताजी पालकर व्यक्तिवेध

लेखन ::श्री नागेश सावंत

  • नेताजी पालकरांचे मूळ गाव कोणते ?
सरनौबत नेताजी पालकर त्यांना प्रती शिवाजी असे देखील संबोधले जाते. नेताजी पालकर यांचे मूळ गाव कोणते याविषयी याबाबत मतमतांतरे आहेत. विजयराव देशमुख शककर्ते शिवराय मध्ये लिहितात “ नेताजींचे मुळ घराणे नेमके कुठले ते कळत नाही. बहुदा ते चीपळूणकडील धावरी नदीकाठच्या चौक गावचे असावेत असे वाटते .” रियासतकार सरदेसाई ऐतिहासिक घराण्याच्या वंशावळी यात लिहितात “ नेताजी पालकर हा पालीचा प्रतिष्टीत देशमुख , प्रथमपासून मावळातला सहायक.” काही इतिहासकारांच्या मते कुलाब्याजवळील चौक हे नेतोजी पालकरांचे मूळ गाव असावे.
  • नेताजी पालकरांचे भोसले घराण्याशी नाते ?
कास्मा द गार्डा हा पौर्तुगीज प्रवासी लिहितो “ शिवाजी महाराज ३० वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना ३० घोड्यांचा अधिपती बनवले व शिवाजी महाराजांची जबाबदारी पालक म्हणून नेतोजी नावाच्या जवळच्या नातेवाईकाकडे सोपवली. शिवाजी महाराज त्यांना “ काका “ असे संबोधत असत.
औरंगजेब नेताजी पालकरना शिवाजींचा नातलग म्हणून संबोधतो. शिवाजी महाराजांची पत्नी पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या. त्या नेताजींच्या पुतणी असाव्यात. शिवाजी महाराजांची एक मुलगी कमळाबाई यांचा विवाह जानोजी पालकरानसोबत झाला. परंतु जानोजी हे नेताजींचे कोण पुत्र कि पुतण्या ? की काही संबंधच नाही.
  • सरनौबत नेताजी पालकर
नेताजी पालकरांना इ.स. १६५९ मध्ये स्वराज्याचे सरनौबत झाले. सभासद बखरीनुसार “ लष्कराचा सरनौबत नेताजी पालकर केला. नेताजी सरनोबती करोत असता सात हजार पागा व तीन हजार शिलेदार अशी दहा हजार फौज जाहली.”
अफझलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना वीजपुरात प्रांतात हल्ले करून ते प्रांत उद्वस्थ करण्याची जबाबदारी दिली . नेताजी पालकरांना मोहिमेवर असताना अफझलखानाने स्वराज्यात आक्रमण करून येथे अत्याचार केल्याची खबर मिळताच ते आपल्या सैन्यासह परत स्वराज्यात आले. शिवाजी महाराजांनी त्यांना दूतानकरवी निरोप पाठवून प्रतापगडावर न येता घाटावर राहण्याची आज्ञा केली. यावेळी नेताजींच्या असावधानतेमुळे मुसेदखान व इतर यवनी सरदार पळून गेले असा ठपका ठेवण्यात आला. अफझलखान वधामुळे विजापुरात गोंधळ माजला . त्याचा फायद घेत शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार नेताजी पालकरानी आदीलशाही मुलखात स्वाऱ्या करून आदिलशाहीतील मुलुख आपल्या ताब्यात आणला.
शिवाजी महाराज सिद्धी जोहरने दिलेल्या पन्हाळगड वेढ्यात अडकले असता सरनौबत नेताजी पालकर यांनी हि जबाबदारी स्वतः घेऊन सिद्धी हिलाल व त्याचा मुलगा सिद्धी वाहवाह याच्यासह पन्हाळगडावर हल्ला केला परंतु सिद्धी वाहवाह मारला गेल्याने सिद्धी हिलालने रणागणातून माघार घेतली व नेताजी पालकरांना हा वेढा फोडण्यात अपयश आले.
शिवाजी महाराजांनी शाहीस्तेखानास शास्त केली त्यावेळी नेताजी पालकर व मोरोपंत पेशवे या दोघांच्या नेतृत्वाखाली सैन्याची विभागणी केली. शिवाजी महाराजांनी शाहीस्तेखानाची बोटे छाटली व नेताजी पालकरांसह सिंहगडाकडे रवाना झाले.
  • नेताजी पालकर शत्रूस मिळाले
१३ जून १६६५ रोजी शिवाजी महाराजाना परिस्थितीवश मुघलांशी तह करावा लागला. शिवाजी महाराजांनी पन्हाळगड मुगलांसाठी जिंकण्याचे आश्वासन मिर्झाराजे जयसिंगाना दिले. आलमगीरनाम्यातील नोंदीनुसार शिवाजी मह्राराजांनी १६ जानेवारी १६६६ रोजी सकाळी गडावर हल्ला चढवला परंतु किल्यावरील शत्रू सावध असल्याने घनघोर लढाई होऊन त्यात अनेक मावले मारले गेले काही जखमी झाले. यात इंग्रजी पत्रानुसार ५०० मावले तर आलमगीरनाम्यातील नोंदीनुसार १००० मावळे मारले गेले. त्यामुळे शिवाजी महाराजाना खेळणाकिल्याच्या आश्रयास यावे लागले. येथे नेतोजी पालकर व शिवाजी महाराज यांच्यात भांडण झाले व नेतोजी पालकर विजापुर आदिलशाहास जावून मिळाले.
सभासद बखरीनुसार समयास कैसा पावला नाहीस ? म्हणून शब्द लावून सरनौबतीवरून दूर केले. बहुतेक पन्हाळा हल्यावेळी नेताजी पालकरांकडून काही चूक झाली असावी.
कारवारकर इंग्रज सुरतेतील इंग्रजांना कळवतातनेताजीचे आणि शिवाजीचे भांडण झाले असे म्हणतात. हे भांडण खरोखरच होते कि त्यात आणखी काही गोम आहे हे सांगता येत नाही. आदिलशहाने त्यांना दरसाल तीन लक्ष होणांची नेमणूक व मोगली सरहद्दीवरील काही मुलुख दिला.
२३ फेब्रुवारी १६६६ च्या राजस्थानी पत्रातील नोंदीनुसार “शिवाजीच्या पुतण्या नेताजी याला बादशहाने २ हजारी दोन हजार स्वरांची मनसब दिली होती. परंतु नेताजी पालकर नाराज झाले व योग्य संधी सापडतच आदिलशाहाला जावून मिळाले.
५ मार्च १६६६ रोजी शिवाजी महाराज आग्रा भेटीस गेल्यानंतर २० मार्च १६६६ मिर्झाराजे यांनी नेतोजी पालकर यास पंचहजारी मनसब व ३८ हजारांची रोकड जहागीर देऊन पुन्हा मोगलांच्या सेवेत दाखल केले.
  • नेताजी पालकर मोगली कैदेत
शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेब बादशहाच्या भेटीस गेले परंतु तेथे त्यांना कैद करण्यात आले. शिवाजी महाराज आग्रा कैदेतून पेटाऱ्यातून निसटले. आलमगीरनाम्यातील नोंदीनुसार औरंगजेबाला सदर बातमी मिळताच त्याने शिवाजी महाराजांचा नातलग नेताजी पालकर यांना कैद करण्याची आज्ञा मिर्झाराजे जयसिंग यांना दिली. मिर्झाराजे यांनी नेतोजीस कैद करून दिलेरखानाकडे सोपवले. नेताजी पालकरांनसोबत त्यांचा मुलगा देखील कैद झाला. २५ ऑक्टोंबर १६६६ रोजी दिलेरखान दिल्लीस रवाना झाला.
नेतोजी पालकर यांनी कैदेतील अत्याचाराच्यामुळे मुसलमान होण्याचा निर्णय घेतला. मासिरे आलमगिरीतील नोंदीनुसार सीवाचा नातलग नेतो , ज्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता , त्याची सुंता केल्यावर तीन हजारी मनसब देण्यात आली व महमद कुलीखान असे नामांतरण करण्यात आले.
औरंगजेबाच्या दरबाराच्या अखबारातील नोंदीनुसार ६ एप्रिल १६६७ रोजी नेताजी पालकर यांना पंजमिरची ठानेदारी देण्यात आली तसेच सरहद्दीची माहिती झाल्यानंतर एक वर्षाने गझनीची ठानेदारी देण्याचे आश्वासन औरंगजेबाने दिले. २१ एप्रिल १६६७ रोजी औरंगजेबाने नेताजी पालकर यांना सरंजाम दिला नसल्याने त्यांची नेमणूक स्थगित केली .
नेताजी पालकारांच्या तीन बायकांपैकी दोन बायकांना कैद करून दिल्लीत आणले गेले. एक पत्नी मात्र दक्षिणेत राहिली. त्यांना मुसलमान होण्याची आज्ञा झाली परंतु त्यांनी त्यास विरोध केल्याने नेताजी पालकरांना त्यांच्याकडे पाठवण्यात आले. २४ जुलै १६६७ मुहमद कुलीखान उर्फ नेताजी यास हुकुमाप्रमाणे त्याच्या बायकांकडे पाठवले होते. नेताजीने आपल्या बायकांचे मन वळविले व मुसलमान केले . बादशहा म्हणाला “ ठीक आहे त्यांचा निका लावून द्यावा “. औरंगजेबाने त्यांना ५००० रुपयांचे दागिने भेट दिले.
१९ ऑक्टोबर १६६७ रोजी नेतोजी पालकर उर्फ मुहमद कुलीखान यास सरोपा , सोन्याचा साजाचा घोडा , लाकडी हौदासह हत्तीण व झेंडा देऊन काबूलला पाठवण्यात आले.
मनुची लिहितो :- डिसेंबर १६७२ ते डिसेंबर १६७३ च्या दरम्यान नेतोजी पालकर मोगल सरदार महाबतखान याच्यासोबत काबुलच्या मोहिमेवर असताना यांनी मोगली कैदेतून सुटण्याचा निसटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.. नेताजीला पकडून लाहोरला आणण्यात आले. तेथे त्याला एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले. बादशाहने हुकुम पाठविला नेताजी मुसलमान होत नसेल तर त्याचा शिरच्छेद करण्यात यावा. नेताजीने धर्म बदलण्याचे सोंग केले. त्याला त्याचा जुना हुद्दा देण्यात आला आणि सिंधू नदीच्या पलीकडे जाण्याची त्याला आज्ञा करण्यात आली.
मनुची लिहितो :- काही महिन्यानंतर नेताजी पुन: नाहीसा झाला. आणि शिवाजीच्या मुलखात निघून गेला. तेथून तो मोगलांच्या विरुद्ध आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे लढू लागला.
शिवाजी महाराजानविरुद्धच्या मोहिमेत मोगली सरदाराना अपेक्षित यश मिळत न्हवते. मोगल सरदार बहादूरखान यास अपयश आल्याने मोगल सरदार दिलेरखान याला दक्षिणेत मोहिमेवर पाठवण्यात आले बहुदा त्यावेळी नेताजी पालकर यांना दिलेरखानसोबत दक्षिणेत पाठवण्यात आले असावे. किमान ९ वर्ष मोगली सेवेत राहिल्यानंतर नेताजी परत दक्षिणेत आले व एके दिवशी संधी साधून स्वराज्यात दाखल झाले.
  • नेताजी पालकरांचे शुद्धीकरण पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश
१९ जून १६७६ जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ शके १५९८ आषाढ वद्य ४ नेतोजी पालकर यांनी प्रायाचीत घेतले शुद्ध झाले”. नेताजी पालकर यांना हिंदुधर्मात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना विशेष कामगिरी सोपविल्याची नोंद आढळून येत नाही परंतु त्यान वाई परगण्यातील मौजे पसर्णीची मोकासदारी दिली असावी असे अनुमान शिवचरित्र साहित्य खंड ८ लेखांक ७१ मधील नोंदीनुसार वाटते. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी नेताजी पालकर यांना औरंगजेबाचा पुत्र अकबर हा औरंगजेबाविरुद्ध बंड करून संभाजी महाराजांच्या आश्रयास आला होता त्यावेळी त्याच्या रक्षणासाठी व व्यवस्थेसाठी नेताजी पालकर यांना ठेवल्याची नोंद औरंगजेबाच्या दरबाराच्या अखबारात आढळते २२ जुलै १६८१ “अकबर हा तळकोकणाकडे राहत आहे. सीवाचा मुलगा संभाजी याने त्यास वीस हजार होण दिले असून मुहमद कुली उर्फ शिवाजी ( नेतोजी ) व आपले इतर लोक त्याजपाशी ठेवले आहेत.
  • नेतोजी पालकर यांनी पुन्हा मुसलमान धर्म स्वीकारला का ?
शिवचरित्र साहित्य खंड ३ लेखांक ६६८ इ.१६६३ -१६६४ इंदापूर मशिदीचा काजी लिहितो “ शिवाजी राजे याचे कारकिर्दी भोगवाटा जाहला नाही “ म्हणजे सदर मशिदीचे इनाम शिवाजी महराजांनी बंद केले.
शिवचरित्र साहित्य खंड ३ लेखांक ६६९ ११ जानेवारी १६९० सदर पत्रानुसार इंदापूरचा मुलुख नेतोजी पालकरांकडे इनाम म्हणून आलेला असून व इंदापूरच्या सदर मशिदीचे इनाम नेतोजी पालकारांनी चालू केले. ( सदर शेवटची नोंद हि नेताजी पालकरांबाबत आढळून येते. यावरून ते इंदापूर कसब्याचे मोकासदार असावेत )
शिवाजी महाराजांच्या काळात इंदापुरातील सदर मशिदीचे बंद असेलेले इनाम सदर मुलुख मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर नेतोजी पालकर यांनी त्यांच्या अखत्यारीत आल्यानंतर सदर मशिदीचे इनाम चालू केले.
शिवचरित्र साहित्य खंड ५ ले. ८३० धनकवडीचे कुलकर्णी जिवाजी विठ्ठल याने १४ जानेवारी १७१९ रोजी लिहिलेली एक हकीगत आहे त्यात नेताजी पालकर यांचा उल्लेख येतो “ जुन्नर पा रा नेतोजी पालकर यास जहागिरी होती. “ सदर उल्लेखावरून संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर नेताजी पालकर हे मुगल मनसबदार होते असे दिसून येते.
शिवचरित्र साहित्य खंड ३ ले. ६४७ १५ मे १६९० रोजी मोगलांच्या अंमलातील इंदापूर येथून वेडसिंगे या गावाच्या पाटलास पाठवलेल्या कौलनाम्याच्या नोंदीनुसार “ जानोजीराजे पालकर यांच्याकडे तो परगणा जहागीर म्हणून होता असे दिसून येते.
राजवाडे खंड १५ लेखांक ३४७ ई.स. १६९० मधील अभयपत्रातील मजकुरानुसार “ अवरंगजेबाने मर्हाटे लोक आहेती त्यास मुसलमान करावे ऐसे केले आहे त्यापैकी मुसलमान केले मा। नेतोजी राजे व साबाजी घाटगे व जानोजी राजे व कितेक ब्राह्मण हि ए प्रांतीचे बाटविले “ यातील नेतोजी राजे व जानोजी राजे हे नेताजी पालकर व जानोजी पालकर असावेत .
  • सदर नोंदी पाहता नेतोजी पालकर हे मुघलांना जावून परत मिळाले असावेत परंतु त्यांनी पुन्हा मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा ठोस संदर्भ नाही.
  • नेताजी पालकरांचा मृत्यू
नेताजी पालकर वृद्धाव्स्थेत कोणत्या ठिकाणी वास्तव्यास होते तसेच त्यांचा मृत्यू कोठे व कोणत्या परिस्थितीत झाला या विषयीचे कोणतेही विश्वासाहार्य संदर्भ उपलब्ध नाहीत. नेताजी पालकर यांची संभाव्य समाधी नांदेड जिल्यातील तामसा येथे आहे. परंतु ते नांदेड येथे कधी आले याविषयी विश्वासाहार्य संदर्भ उपलब्ध नाहीत.
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- शिवचरित्र साहित्य खंड ३ व ८ , शिवकालीन पत्रसारसंग्रह , सभासद बखर , शिवभारत , राजवाडे खंड १५ , house of shivaji , shivaji visit to agra जेधे शकावली , शिवचरित्र साहित्य वृत्त संग्रह ३ , असे होते मोगल :- मनुची , छत्रपती शिवाजीराजे व शिवकाल , फारसी साहित्य खंड ६ औरंगजेबाच्या दरबाराच्या अखबार , मासिरे आलमगिरी
छायाचित्र साभार :- The Great Maratha Warriors

इतिहास कसा अभ्यासावा

 

इतिहास कसा अभ्यासावा

  • इतिहास म्हणजे काय :-
भूतकाळात घडलेल्या घटना म्हणजे इतिहास . चालू वर्तमानातील प्रत्येक घटना ही उद्याच्या इतिहास आहे. इतिहास हा एखाद्या देशाचा, प्रदेशाचा , व्यक्तींचा , भौगोलिक परिस्थिति , राहणीमान , सजीव प्राणी व निर्जीव वस्तूंचा असतो .
  • इतिहास आपणस आकर्षित करण्याची कारणे :-
मानवाला भूतकाळातील घटना , आपले पूर्वज व त्यांच्या विषयी जाणून घेण्याची सुप्त इच्छा असते. भूतकाळातील घडलेल्या चांगल्या वाईट घटना ज्या आपणास आपल्या वाडवडिलांकडून ऐकीव माहितीवर ज्ञात होतात त्या घटनांची सत्यता पडताळण्यासाठी इतिहास मनुष्यास आकर्षित करतो . तसेच त्या काळातील जीवन पद्धती , राहणीमान , संस्कृती , सणसमारंभ चालीरीती जाणण्यासाठी इतिहास संशोधनाची गरज भासते.
महाराष्टाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास हा प्रामूख्याने चर्चिला जातो . मराठा म्हणजे अठरापगड जाती स्वराज्यासाठी , भगव्यासाठी ज्या ज्ञात अज्ञात वीरांनी रक्त सांडले ते सर्व मराठाच .
इतिहासाची साधने :- समकालीन साधने व उत्तरकालीन साधने अश्या दोन विभागात साधनांची विभागणी केली जाते.
समकालीन साधने :- इतिहासात घडलेली घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या व्यक्ति किंवा त्या घटनेत सहभागी असणाऱ्या व्यक्ति किंवा या व्यक्तींशी संबंधित असणाऱ्या व्यक्ति किंवा तत्कालीन तटस्थ व्यक्ति यांनी केलेले लिखाण हे समकालीन लिखाण उदा. बखर , शिलालेख , पत्रव्यवहार , शकावल्या , सनद , ग्रंथ , पोवाडा , नाणी , तत्कालीन परकीय प्रवासी , परकीय व्यक्ति यांनी केलेल्या नोंदी , विरुद्ध पक्षातील लोकांनी केलेल्या नोंदी
उत्तरकलीन साधने :- भूतकाळात घडलेल्या घटनेबद्दल ऐकीव माहिती किंवा त्या वेळेच्या समकालीन साधनांचा आधार घेऊन केलेले लिखाण हे उत्तर कालीन लिखाण उदा. बखर , शिलालेख , ग्रंथ , पोवाडा , परकीय प्रवासी , परकीय व्यक्ति यांनी केलेल्या नोंदी , विरुद्ध पक्षातील लोकांनी केलेल्या नोंदी
समकालीन साधने ही प्रथम दर्जाची तर उत्तरकालीन साधने हे दुय्यम दर्जाची मानली जातात . इतिहास अभ्यासकास समकालीन व उत्तरकालीन साधनांनचा तुलनात्मक दृष्टीकोणातून अभ्यास करणे आवश्यक आहे
  • इतिहास अभ्यासकांनी इतिहास कसा अभ्यासावा
इतिहास अभ्यासकांनी आपणास ज्या विषयी अभ्यास करावयाचा आहे त्या विषयी प्रथम कोणतेही पुर्वदूषित किंवा अनुकूल दृष्टिकोन ठरवून अभ्यास करू नये . इतिहास अभ्यास पूर्ण झाल्यावर ती व्यक्ति किंवा ती घटना योग्य की अयोग्य ठरवावे. अगोदरच एखाद्या घटनेविषयी किंवा व्यक्ति विषयी अभिमान बाळगला तर अभ्यासात त्या विषयी एखादी चुकीची घटना किंवा संदर्भ आढल्यास आपले मत आधीच तयार केल्याने ते सत्य आपण स्वीकारण्याएवजी पळवाट शोधण्याचा किंवा त्या व्यक्तीची ती कृती योग्यच ठरवण्याचा प्रयत्न करतो.
अगोदरच एखाद्या घटनेविषयी किंवा व्यक्ति विषयी दूषितपुर्वग्रह बाळगला तर अभ्यासात त्या विषयी एखादी चांगली घटना किंवा संदर्भ आढल्यास आपले मत आधीच तयार केल्याने ते सत्य आपण स्वीकारण्याएवजी पळवाट शोधण्याचा किंवा त्या व्यक्तीची ती कृती अयोग्यच ठरवण्याचा प्रयत्न करतो.
एखादी घटना घडली त्यात त्या व्यक्तीचा वैयत्तीक किंवा राजकीय लाभ होता का ? कींवा रागाच्या भरात किंवा अनावधानाणे किंवा पूर्व वैमन्यासातून किंवा धार्मिकतेतून किंवा अन्यायाविरुद्ध लढण्यातून ती घटना घडली आहे का ह्या व इतर बाबींचा अभ्यास करूनच ती व्यक्ति किंवा ती घटना योग्य की अयोग्य ठरवावे.
मराठ्यांचा इतिहास लिहिणारे कृष्णराव अर्जुन केळुसकर , रियासतकर सरदेसाई , वी का राजवाडे , सेतु माधवराव पगडी , गणेश हरी खरे ,विजयराव देशमुख , वा. सी बेंद्रे , सदाशिव शिवदे , अ.रा. कुलकर्णी , गजानन मेहंदळे , जयसिंगराव पवार तसेच इतर अनेक इतिहासकारांनी इतिहासात घडलेल्या एका घटनेविषयी वेगवेगळी मत मतांतरे मांडलेली आढळून येतात
इतिहासात अनेक नवीन संदर्भ व शोध लागत असतात त्यामुळे वेळोवेळी इतिहासाची पुनर्मांडणी ही होत असते त्यामुळे १९०६ साली शिवचरित्र लिहिणारे कृष्णराव अर्जुन केळूस्कर व आज ११५ वर्षानी इतिहास लिहिणारे गजानन मेहंदळे यांच्या शिवचरित्रात आपणास तफावत किंवा त्रुटी आढल्यास कृष्णराव अर्जुन केळूस्कर यांनी लिखाण केलेला कालखंड , उपलब्ध संदर्भ , त्यावेळेची परिस्थिति पाहता त्यांनी केलेले विधान हे आता कालबाह्य ठरू शकेल परंतु तो दोष लेखकास देता येणार नाही .
इतिहासकार हा कितीही मोठा असो किंवा त्याचा त्या विषयातील अभ्यास व अनुभव कितीही दांडगा असो तरी इतिहास अभ्यासकाने त्यांनी लिहिलेला इतिहास हा संदर्भासाहित व समकालीन दाखले देऊन लिहिला आहे का , त्यांनी ज्या साधंनांचा आधार घेऊन इतिहास लिहिला आहे त्याची त्याने योग्य प्रकारे चिकित्सा केली आहे का हे तपासण्याची जबाबदारि इतिहास अभ्यासक व वाचक यांची आहे .
  • इतिहासात चंदन आणि कोळसा दोन्ही आहेत आपण काय उगाळायचे हे प्रत्येकाने ठरवावे
  • इतिहास हा सोयीनुसार लिहिला आहे का ?
१ ) इतिहास लेखन करणाऱ्यांची मानसिकता व लेखनकर्ता ज्याच्या आश्रयास आहे त्यानुसार इतिहास लेखन अवलंबून असते .
२ ) इतिहास लेखन करताना इतिहास लेखनकर्त्याकडून इतिहास लपवला जातो किंवा सोईस्कररीत्या मांडला जातो
३ ) एखाद्या व्यक्तीशी वैयतिक हेवेदावे असल्यास त्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी इतिहास लिहिला जातो . एखाद्या व्यक्तीशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यास त्या व्यक्तीचे अवास्तव गुणगौरव करण्यासाठी इतिहास लिहिला जातो.
४ ) उत्तरकालीन इतिहासातील काही लेखन हे ऐकीव माहितीवर अवलंबून असते किंवा समकालीन एखाद्या गोष्टीचा विपर्यास असू शकते
५ ) ऐतिहासिक साहित्यात कालांतराने जाणूनबुजून बदल करण्यात येऊन सोयिस्कर इतिहास मांडला जाऊ शकतो .
वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता इतिहास अभ्यासकाने इतिहास वाचन करून आपली मते ठरवावीत
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई

गुजर बंधूंचे धर्मांतरण

 



गुजर बंधूंचे धर्मांतरण

लेखन ::श्री नागेश सावंत

  • सदर लेख हा माहिती मिळावी याकरिता आहे.
छत्रपती शाहू महाराज यांचे धर्मांतर करून मुस्लीम करण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला परंतु शाहू महाराजांच्या नकारामुळे शाहू महाराजानऐवजी सरनौबत प्रतापराव गुजर यांच्या दोन मुलांनी खंडेराव व जगजीवन यांनी स्वतःचे धर्मांतरण करून घेतले. व शाहू महाराजांना या धर्म संकटातून वाचवले. गुजर बंधू अब्दुल करीम व अब्दुल रहिमान या नावाने मुसलमान झाले. असे वाचनात आले. त्यासंबंधी समकालीन किंवा उत्तरकालीन संदर्भ आहेत का ? ( पत्र, सनद किंवा बखर ) असल्यास कृपया इतिहास अभ्यासकांनी द्यावेत.
  • माझ्या वाचनात आलेल्या माहितनुसार
मोगल दरबाराची बातमीपत्रे खंड १ पान नंबर २६ :- काही मराठ्यानी मन्सबीसाठी किंवा कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केले. प्रतापराव गुजराच्या मुलांनी कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केले (१३ जुलै १७००).
गुजर बंधू औरंगजेबाच्या कैदेत कसे आले याबाबत काही माहिती आढळत नाही.
१३ जुलै १७०० च्या नोंदीनुसार :- नरकवासी रामा (राजाराम) याचे मेहुणे (बायकोचे भाऊ, प्रतापराव गुजराची मुले) खंडूराव व जगन्नाथ हे शहाजादा बेदारबख्त याच्या हुजुरात मुसलमान झाले. ते यावेळी इनायतूल्लाखानाच्या मध्यस्थीने बादशहाच्या हुजुरात आले. बादशहांनी खिलतीची वस्त्रे देऊन त्यांना अब्दु रहीम व अब्दू रहमान ही नावे दिली..
मोगल दरबाराची बातमीपत्रे खंड ३ :- मे १७०३ च्या नोंदीनुसार औरंगजेबाने शाहू महाराजांचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला परंतु शाहू महराजांनी त्यास नकार दिला त्यामुळे शाहू महाराजांवर कडक नजर ठेवण्याची आज्ञा औरंगजेबाने केली.
सदर बातमीपत्रातील माहिती पाहता गुजर बंधूंचे धर्मांतरण जुलै १७०० रोजी झाले. तर शाहू महाराजांना बाटवण्याचा प्रयत्न मे १७०३ रोजी झाला म्हणजे ३ वर्षानंतर झाला. मग तीन वर्षापूर्वी १७०० साली घडलेल्या घटनेचा संबंध १७०३ साली का जोडला जातो.
इतिहास संग्रह मधील नोंद :- रायगड मोगलांच्या ताब्यात आला त्यावेळी प्रतापराव गुजर यांची मुले देखील कैद झाली. शाहू महाराजा यांना बाटविण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला परंतु त्याच्या लाडक्या मुलीने शाहूस जबरदस्तीने मुसलमान केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली अशा बिकट प्रसंगी प्रतापराव गुजर यांचा मुलगा खंडेराव मुसलमान झाले व शाहू महाराजांच्यावरील धर्मांतराचा प्रसंग टळला.
औरंगजेबाच्या मृत्युनंतर शाहू महाराजांची मोगली कैदेतून सुटका झाल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना साताऱ्यास वतन दिले. सध्या यांच्या वंशजात मुसलमानाप्रमाणे नाव ठेवण्याची प्रथा नसून हिंदू धर्माप्रमाणे नाव ठेवण्याची प्रथा आहे. सध्याचे वंशज हिंदूंचे सण व नवरात्र उत्सव साजरा करतात. खंडेराव गुजर यांना परत हिंदू धर्मात घेत होते परंतु त्यांचे मुसलमान बायकोवर प्रेम होते. या मुस्लीम पत्नीने आपणास देखील हिंदूधर्मात घ्यावे असा आग्रह धरला त्यामुळे सदर पुन्हा हिंदुधर्म प्रवेश घटना तशीच राहील.
( ह्या ऐतिहासिक गोष्टी मराठ्यांच्या इतिहासाचे मार्मिक व शोधक भक्त रा.रा.कृष्णाजी विष्णू आचार्य यांनी संग्रहित केल्या आहेत. त्यांनी अशाच पुष्कळ आख्यायिका माजी भारतवर्ष , चालू शाळापत्रक ह्यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्याचे श्रेय घेतले आहे. )
सदर इतिहास संग्रहातील नोंदीस कोणताही संदर्भ नसून केवळ आख्यायिका आहे . आख्यायिकेत सत्याचा अंश काही प्रमाणात असतो. गुजर बंधूंचे धर्मांतर झाले यास मोगल दरबाराच्या बातमीपत्रात संदर्भ मिळतो. परंतु सदर घटनेत आणि शाहू महाराजांचे धर्मांतर यात ३ वर्षांचे अंतर आहे. सदर गुजर बंधूंच्या धर्मांतराचा संबंध शाहू महाराजांच्या प्रसंगाशी जोडला गेला.
कृपया कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही तर इतिहासातील सत्य जाणण्यासाठी हा लेखन प्रपंच
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- मोगल दरबाराची बातमीपत्रे खंड १ व ३
इतिहास संग्रह :- दतात्रय बळवंत पारसनीस

मोगली विळख्यात छत्रपती थोरले शाहू महाराज

 


मोगली विळख्यात छत्रपती थोरले शाहू महाराज

लेखन ::श्री नागेश सावंत

छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सरदार शेखनिजाम याने ३ फेब्रुवारी १६८९ रोजी अटक केली व त्यांची क्रूरपणे हत्या केली. १९ ऑक्टोंबर १६८९ रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाई आपला पुत्र शिवाजी व इतर लोकांसह मोगली विळख्यात कैद झाल्या. जेधे शकावलीनुसार महाराणी येसूबाई यांचा पुत्र शिवाजी याचे नाव औरंगजेबाने शाहू ठेवले. व त्यास मोगलांची सप्तहजारी मनसबदारी देण्यात आली. मासिरे आलमगिरीतील नोंदीनुसार “ औरंगजेबाने त्याच्या निवासस्थानाच्या जवळच सर्वांच्या राहण्यासाठी तंबू उभारले तसेच सर्वाना खर्चासाठी वार्षिक वेतन दिले.
औरंगजेबाने शाहू महाराज यांची हत्या न करता मोगली कैदेत का ठेवले. स्वतःच्या बापाची व भावांची हत्या करणारा औरंगजेब असा का वागला . औरंगजेबासमोर तीन पर्याय होते, १ ) शाहू महाराजांची हत्या २ ) शाहूं महाराजांचे धर्मांतरण ३ ) मराठा साम्राज्यात दुफळी निर्माण करण्यासाठी शाहू महाराजांचा वापर
  • १ ) शाहू महाराजांची हत्या :-
छत्रपती संभाजी महराजांची हत्या केल्याने मराठा साम्राज्य बुडवू असे औरंगजेबाला वाटत होते. परंतु राजराम महाराज यांना स्वराज्याचे छत्रपती घोषित करण्यात आले. राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडून जिंजीस गेले. व त्यांनी स्वराजरक्षणाचा लढा चालू ठेवला. त्यामुळे मोगलांचे सैन्य दुभागले गेले व त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर देखील हे युद्ध लढावे लागले. राजाराम महाराज यांच्या मृत्युनंतर महाराणी ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजीराजे यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले व हा लढा चालू ठेवला.
अश्या परिस्थितीत शाहू महाराजांची हत्या घडवून आणल्याने मराठा साम्राज्याचे सिंहासन रिक्त होणार नव्हते. संभाजी महाराजांच्या हत्येने मराठे सुडाच्या भावनेने पेटून उठले होते व त्यांनी औरंगजेबास शरण न जाता त्याच्याशी अविरत युद्ध चालू ठेवले . त्यामुळे शाहू महाराजांची हत्या करण्याची चूक औरंगजेबासारखा हुशार राजकारणी करणे शक्य न्हवते .
  • २ ) शाहूं महाराजांचे धर्मांतरण :-
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्तेच्या १३ वर्षानंतर देखील स्वराज्य संपत न्हवते त्यामुळे छत्रपती शाहू यांचे धर्मांतरकरून त्यांना मुस्लीम करणे जेणेकरून मराठ्यांचे धार्मिक खच्चीकरण करणे . औरंगजेबाने हा प्रयत्न करून पहिला. मोगल दरबाराच्या मे १७०३ रोजीच्या बातमीपत्रात याविषयीची नोंद आढळून येत. “ बादशहानी हमीदोद्दीनखान बहादूर यास आज्ञा केली संभाजीचा मुलगा राजा शाहू हा गुलालबागमध्ये कैद आहे. त्याला बोलवा आणि त्याला म्हणा कि तू मुसलमान हो. त्याप्रमाणे हमीदोद्दीनखान शाहूला बोलला. परंतु शाहूने ते मान्य केले नाही. हमीदोद्दीनखान याने हि बातमी बादशाहाला कळवली. बादशाहने आज्ञा केली कि शाहुवर कडक नजर ठेव.
औरंगजेबाची धर्मवेडाची मानसिकता इथेच थांबली नाही. त्याने संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्या मुलींचे मुस्लीम व्यक्तीशी निकाह ( लग्न ) लावून दिले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलींचे लग्न
१६ जून १७०३ च्या बातमीपत्रात औरंगजेबाने मुगलखान राहदार यास आज्ञा केली : नरकवासी संभा ( संभाजी राजे ) याच्या मुली बहादूरगडाच्या तळावर आहेत त्यांना हुजुरात आणावे.
५ मार्च १७०४ च्या बातमीपत्रातील नोंद “नरकवासी संभा ( संभाजी राजे ) याची मुलगी हिला बहादूरगडावरून आणण्यात आले होते. तिचे लग्न फकीर मुहमद शाहूर याच्या बरोबर करण्याचे ठरवले. फकीर मुहमदला बादशहाने खिलातीची वस्त्रे दिली.
२४ एप्रिल १७०४ च्या बातमीपत्रातील नोंद “नरकवासी संभा ( संभाजी राजे ) यांच्या मुलीचे लग्न फकीर मुहमद शाईर याच्याबरोबर ठरवण्यात आले होते. ते बदलण्यात आले. आता तिचे लग्न सिकंदरखान मरहुम ( विजापूरचा शेवटचा बादशहा सिकंदर आदिलशाह ) याचा मुलगा मोईयोद्दीन याजबरोबर ठरविण्यात आले. त्याला खिलातीची वस्त्रे देण्यात आली.
८ जून १७०४ च्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ सदर लग्न औरंगजेबाच्या उपस्थित हुकुमानुसार पार पडले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न
२० मे १७०४ च्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ खान जमान फत्तेजंग मरहूम ( संभाजी राजांना धरणारा मुकर्बखान ) याचा मुलगा अब्दुल कादर हा नरकवासी संभा ( संभाजी महाराज ) यांच्या मुलीशी लग्न करीत आहे. नौबती झडवण्याची त्याला परवानगी देण्यासंबंधी काय आज्ञा? बादशहा म्हणाले “ तीन दिवस “ नौबती वाजविल्या जाव्या अशी आज्ञा देण्यात आली.
छत्रपती राजाराम महाराजांच्या मुलींचे लग्न
६ ऑक्टोंबर १७०३ रोजीच्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ नरकवासी रामा ( राजाराम महाराज ) यांच्या मुली तळावर ( बहादूरगड ) येथे आल्या आहेत. मीर मुहमद याने राजारामाच्या मुलीना आपल्यारोबर आणावे.
२४ जानेवारी १७०४ रोजीच्या बातमीपत्रातील नोंदीनुसार ““ नरकवासी रामा ( राजाराम महाराज ) याच्या मुलीचे लग्न शमशीर बेग यांजबरोबर लावून देण्याचे बादशहाने ठरविले होते. बादशहाने काजी अकरमला म्हटले. “ तुम्ही शमशेरबेगचा निकाह पढावा आणि वधूसाठी दहा हजार रुपयेचा मिहर ठरवा. बादशहाच्या आज्ञाप्रमाणे करण्यात आले.
छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न
२४ जानेवारी १७०४ रोजीच्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ राजा नेकनाम ( नागपूरचा गौड राजा ) याने बादशाहाला विनंती केली कि “ नरकवासी रामा ( राजाराम महाराज ) याच्या मुलीशी माझे लग्न होत आहे. आज्ञा असल्यास माझ्या इथे दोन दिवस नौबती वाजविण्यात येतील. परवानगी द्यावी. विनंती मान्य करण्यात आली.
२७ जानेवारी १७०४ रोजीच्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ बादशहा हे हमीदुद्दीन खान यास म्हणाले. “ राजा नेकनामला मोत्याची मुंडावळ ( सेहरा ) बांधा. त्याप्रमाणे करण्यात आले. यानंतर बादशाहने काजी मुहमद अकरमखान आणि फाजिलखान यांना बोलावले आणि त्यांना म्हटले “ तुम्ही निकाह पढवा. “ बादशाहने आज्ञा केली कि “ नेकनाम आणि शमशीरबेग यांच्या बायका म्हणजे नरकवासी रामाच्या ( राजराम महाराज ) मुली यांना प्रत्येकी दोन दोन हजार रुपयांचे अलंकार देण्यात यावेत.
  • ३ ) मराठा साम्राज्यात दुफळी निर्माण करण्यासाठी शाहू महाराजांचा वापर
मराठ्यांच्या सततच्या हल्यामुळे वैतागून मराठ्यांच्या उल्लेख गनीम , शत्रू असा न करता चोर असा करावा . ३१ जुलै १७०० च्या बातमीपत्रातील नोंदीनुसार औरंगजेबाने आज्ञा केली कि “ यापुढे गनिमांचा ( मराठ्यांचा ) उल्लेख चोर ( दुज्दान ) असा करण्यात यावा.
मनुची लिहितो “ इ.स. १७०३ मध्ये औरंगजेबाने कोंढाणा किल्ला जिंकला व त्या नंतर त्याने पुण्याला तळ ठोकला”
आता आपले वय झाले आहे असे पाहून मराठ्यांचे किल्ले व प्रदेश जिंकण्याचे काही तरी उपाय शोधले पाहिजेत असे औरंगजेबास वाटले. मराठ्यांच्यात फुट पाडण्याचे कारस्थान करण्याचे त्याने ठरविले. संभाजीचा मुलगा त्याच्याकडे छावणीत होता. त्याला त्याने लहानपणापासून वाढविले होते. बादशहाने शाहूला आपल्यासमोर बोलावून घेतले. त्याची बंदीतून मुक्ती केली. त्याला उंची वस्त्रे दिली व आपला मुलगा कामबक्ष यास त्याच्यावर देखरेख करण्यास सांगितले. बादशाहने शाहूला मोकळीक दिली. त्याला ७ हजारी मनसब दिली. आणि त्याला दक्षिणेच्या सुभ्याचा चौथीईचा हक्क दिला. कामबक्षला विजापूर आणि गोवळकोंडा या दोन प्रांताचा सुभेदार करण्यात आले. औरंजेब कामबक्षला म्हणाला “ तुला मी दक्षिणेत सोडून दिल्लीत जाईन आणि तेथे परमेश्वरची करून भाकीत उरलेले आयुष्य घालविण” ही बातमी चौहोकडे पसरली पण या गोष्टीला एक वर्ष होऊन गेले तरी औरंगजेबाने हा निर्णय अमलात आणलेला नाही.
औरंगजेबाची अशी समजूत होती कि , या कारस्थानामुळे मराठे सरदार आपला मुलगा कामबक्ष आणि शाहू यांना येवून मिळतील आणि अशा रीतीने त्यांच्यातील एकी नाहीशी होईल. पण मराठ्यांना औरंगजेबाचा कावा माहित होता. त्यांनी त्यांच्या हुकुमाची मुळीच परवा केली नाही. साम्राज्यातील वेगवेगळ्या भागातून खजिने लुटणे हे त्यांना अधिक लाभदायक होते. शाहुच्या वाट्याला मात्र अधिक कडक नजरकैद आली.
बादशाही छावणीत हजर असलेला मोगलांचा इितहासकार भीमसेन सक्सेना पुढीलप्रमाणे लिहितो.
“या सुमारास बातमी पसरली की, बादशहाला काहीनी सल्ला दिला असून शहाजादा कामबक्ष याच्या मध्यस्थीने मराठ्यांच्याबरोबर तडजोड होण्याचे घाटत आहे. शहजादा कामबक्ष याने वीनंती केली यावरून बादशहाला भीड पडली. त्याने शाहूला आपल्या गुलालबार येथील निवास स्थानातून काढून शहजाद्याच्या हवाली केले. शहाजादा कामबक्ष यांनी आपली माणसे एकाहून अधीक वेळा धनाजी जाधवकडे पाठिवली. पण मोगलांनी मराठ्यांना थोडेच जिंकून घेतले होते. दख्खनचा तमाम सुभा काही कष्ट न करता शीऱ्याचा गोळा घशात घालण्यास मीळावा, तसा ताब्यात गेला होता. ते काय म्हणून तहाला प्रवृत्त होतील? रायभान नावाचा एक मराठा होता. तो आपल्याला शिवाजीच्या भाऊबंदापैकी म्हणवीत असे, त्याच्या मध्यस्थीने तडजोडीची बोलणी चालू होती. त्याच्याकडून हे काम होईल असे वाटत होते. तो बादशहाला येऊन भेटला. त्याला बादशहाने सहा हजारी मनसबदार बनिवले. बादशहाने मराठ्यांच्याकडे पाठवलेली माणसे नीराश होऊन परत फीरली. राजा शाहू यास गुलालबारेत परत नजरकैदेत ठेवण्यात आले.”
शहाजादा कामबक्षला अजून वेडी आशा वाटत होती की मराठ्यांशी तडजोड होऊ शकेल. तो धनाजी जाधवला पत्रावर पत्रे लीहीत होता. भीमसेन सक्सेना म्हणतो “शहाजादा कामबक्ष हा धनाजी जाधवाकडे तहासाठी म्हणून पुन्हा पुन्हा माणसे पाठवीत होता. तहाच्या वाटाघाटी होत होत्या; पण धनाजीने निरनिराळी निम्मिते काढून काळ काढूपणाचे धोरण अवलांबिले.
मोगल दरबाराची बातमीपत्रातील नोंदी
१० जुलै १७०३ रोजी तंजावरकर व्यंकोजी भोसले यांचे पुत्र रायभान आणि शाहूंची भेट घडवून आण्यात आली.
सेतू माधवराव पगडी लिहितात “ कुणीकडून कां होईना मराठ्यांशी तडजोड व्हावी आणि युद्धाची कटकट संपवावी असे मुगल सरदारांना वाटू लागले. औरंगजेबालाही असेच वाटे पण अभीमानाने तो बोलत नसे, मध्यस्त मात्र मराठ्यांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करीत. यासाठी मुगलांनी तंजावरहून रायभान भोसलेला आणले. शाहू आणी रायभान यांच्या मध्यस्थीने मराठ्यांशी काही तडजोड होणे शक्य आहे कां? याचा अंदाज औरंगजेब घेत होता.
  • औरंगजेबाच्या मृत्युनंतर
२० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला. मराठी रीयासत खंड ३ “ औरंगजेब बादशाह फार धोरणी होता. शाहुवर मेहरबानी करण्याचा त्याचा विचार कधीच न्हवता तशाच प्रसंगी उपयोगी पडणारा हातातला डाव एवढ्याच समजुतीने त्याने शाहूस जवळ ठेविले होते. मराठाशाहीची अंतःस्तिथी त्यास चांगली माहित होती. ताराबाईंचे व प्रमुख सरदारांचे विशिष्ठ स्वभाव व प्रत्येकाचे अंतस्थ हेतू त्यास अवगत होते. मराठ्यांनी आपल्याला घेरलेले पाहून शेवटचा उपाय म्हणून शाहूस मुक्त करून मराठामंडळात दुषी माजवण्याची युक्ती त्याने काढली व ती फलद्रूप झाली. मात्र आपल्या हयातीत त्याने ही गोष्ट अमलात आणली नाही. त्याच्या पश्चात झुलफिकरखानाने आजीमशहाकडून शाहूस सन १७०७ च्या एप्रिल महिन्यात मुक्त करून औरंगजेबाचा कावा सिद्धीस नेला.
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- मोगल दरबाराची बातमीपत्रे खंड १ व ३
. असे होते मोगल :- निकोलाय मनुची
मराठा रियासात :- गो स सरदेसाई
छायाचित्र साभार गुगल

कवी कलश :- व्यक्तिवेध

 



कवी कलश :- व्यक्तिवेध

लेखन ::श्री नागेश सावंत

मराठ्यांच्या इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांचा परममित्र कवी कलश म्हणजे एक रहस्यमयी न उलगडलेले कोडेच. कवी कलशविषयी मराठी साधनातून स्वराज्य बुडवल्याचा व मोगली साधनातून तो मोगलांचा हेर असल्याच्या नोंदी आढळून येतात . शाक्तपंथीय वामाचाराच्या साधनेतून सिधी प्राप्त झालेला कवी कलश मराठा इतिहासात अधिकार गाजवताना दिसतो. शाक्तपंथी मार्ग म्हणजे “ मद्य, मत्स्य, मांस, मुद्रा, मैथुन या विधीने अनुष्ठान करणे.” छत्रपतीसोबत अनन्वित हाल सोसून मरणाला समोर जाणारा कवी कलशाच्या आयुष्याचा मागोवा घेण्याचा एक प्रयत्न.
उत्तर भारतातून आलेंला शाक्तपंथीय तांत्रीक कनोजी ब्राम्हण म्हणजे कवी कलश .परंतु कवी कलशाचा स्वराज्याशी व छत्रपती घराण्याशी संबंध कधी आला हे निश्चितपणे कळत नाही.
मोगल इतिहासकार काफिखान लिहितो आग्र्याच्या कैदेतून महाराज निसटले त्यावेळी त्यांनी संभाजीराजेना भोसले घराण्याचे कुलोपाध्याय कब कलस नावाच्या ब्राम्हणास घरी काही द्रव्य देवून ठेवले. कब कलस याने संभाजीराजेंच्या मृत्युच्या अफवेनंतर संभाजीराजाना सुखरूप महाराष्ट्रात आणले .
परंतु सभासद बखर बखरीतील नोंदीनुसार मथुरेतील कृष्णाजीपंत व काशीराम व विसाजीपंत त्रीमल बंधू ब्राम्हण यांनी संभाजीराजांचा सांभाळ करून स्वराज्यात सुखरूप परत आणले. छत्रपती शिवाजी महाराजांनी याबद्दल ब्राम्हण कुटुंबास सनद दिलेली आहे उत्तरेत भोसले घराण्याचे कोणतेही कुलोपाध्याय असल्याची नोंद आढळून येत नाही. त्यामुळे काफिखानाची माहिती ही खोटी ठरते.
राजस्थानी पत्रातील पत्र क्रमांक ३३ परकलदास याने कल्याणदास यास लिहिलेल्या पत्रातील नोंदीनुसार “कवी कलश कविसुर सेवा को थौ व कईथ एक सकसोणा सेवा का चाकर मुसाहीन था / सुवौ दौणौ पकडी बेड्या भऱ्या थे / बदीवान दीयौ थौ / अर्थ :-“ शिवाजी महाराजांचा कवी कवी कलश व एक चाकर कायस्थ सक्सेना या दोघांना पकडले व बेड्या घातल्या. सदर पत्रावरून कवी कलश आग्रा भेटीत असल्याचे संकेत मिळतात
परंतु पत्र क्रमांक ६१ च्य नोंदीनुसार “ जो परमानंद कवी सूरइंद्र कविसुर महै ऐठे सेवाजी बाबती अटकनो थे / पाछै थी जी को लिखो आयो जो ईन छोडी दिजौ / अर्थ :- शिवाजींच्या बाबतीत परमानंद कवी सुरेंद कवीश्वर जे अटकेत होते त्यांना सोडण्याचा हुकुम देण्यात आला.
राजस्थानी इतर पत्रातुन शिवरायांचे कवी परमानंद यांचा उल्लेख कवीश्वर , कविसर , कविसुर या नावानी आदळतो त्यामुळे पत्र क्रमांक ३३ ,मधील नोंद हि कवी कलशाची नसून कवी परमानंद यांची आहे. कवी कलश हे नाव नसून ती पदवी असावी. (Shivaji’s visit to Aurangjeb at Agra )
केळदिनृपविजय या उत्तरकालीन इ.स. १७५० कानडी काव्यातील नोंदीनुसार कवी कलश हा औरंगजेबाच्या चाकरीत असून त्याला शिवाजी महाराजांकडे शिधा सामग्री इत्यादी सर्व प्रकारचा सांभार पाठवून त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी कब्जी असे प्रतीनाम असलेला कवी कलश याला नेमले व चौकी पहारे बसवले. शिवाजी महाराजांनी युक्तीने कवी कलशास वश करून घेतले. ( शिवचरित्र वृत्र संग्रह १ )
मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर लिहितो “ कब कलश औरंगजेबाच्या नोकरीत होता व त्याचे नाव कब कलस असल्याची नोंद करतो . १६५८ साली झालेल्या औरंगजेब व दाराशुकोह यांच्यातील युद्धात औरंगजेबाच्या बाजूने संदेश पोहचवण्याचे काम करत असल्याची नोंद करतो. ईश्वरदास नागर १६६६ साली शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या भेटीवेळी लिहितो महाराज गोकल नावाच्या ब्राम्हण पुरोहिताच्या घरी राहिले. या पुरोहितास महाराजांनी “ कवी कलश “ अशी पदवी दिली.
मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर कवी कलशाबद्दल परस्परविरोधी विधान करतो. १६५८ साली कब कलश अशी नोंद करतो परंतु कवी कलश हि पदवी १६६६ शिवाजी महाराजांनी दिल्याचे सांगतो.
चिटणीस बखरीतील नोंदीनुसार :- कवी कलुषा कबजी म्हणोन कनोजा ब्राम्हण बहुत विद्वान मंत्रशास्त्र विद्या आगम त्यास बहुत गम्य असे होते. त्याची स्त्रीही चतुर होती. त्यांनी महाराजांस वश करावे म्हणून वशीकरणमंत्र प्रयोग करून महाराजांची जवळीक व कृपा संपादून अगोदर समीप राज्याभिषेकापूर्वी होतेच
भट पेशवे घराण्याची हकीगत :- छत्रपती संभाजी महाराजांना केशवभट कबजी म्हणोन कोणी हिंदुस्थानी ब्राम्हण मांत्रिक होता त्याने वश केले त्याने सांगेल त्याप्रमाणे करावे असा प्रकार जाहला
वरील सर्व बाबींचा विचार करता कवी कलश हा औरंगजेबाच्या पदरी असावा. कवी कलश व संभाजीराजे यांची भेट ही आग्रा भेटी दरम्यान झाली असावी. कवी कलशाचे संपूर्ण नाव त्याचे मूळ ठिकाण याविषयी खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ च्या प्रस्थावनेत राजवाडे लिहितात “ फारशी व उर्दूत कलुशा म्हणजे कुंटण असा अर्थ आहे. कविकलश ह्या नांवांतील कवि हीं अक्षरें गाळून कलश ह्या शब्दाचा कळुशा असा उच्चार थट्टेखोर व मत्सरग्रस्त लोक करूं लागले. “
  • छत्रपती संभाजीराजे व कवी कलश मित्रता
छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेस निघाले त्यावेळी रायगडावर गृहकलह चालू होता. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना कर्नाटक मोहिमेत सोबत न घेता शृंगारपुरला पाठविले. जेधे शकावलीतील नोंदीनुसार :- कार्तिक शुद्ध षष्टी ६ रविवार १ नोव्हेंबर १६७६ संभाजीराजे शृंगारपुरास जाऊन राहिले. शृंगारपुरी शाक्तपंथिय कवी कलश यांच्याशी संभाजीराजांची घनिष्ठ मित्रता झाली . कवी कलशाने संभाजीराजांस २३ मार्च १६७८ रोजी कलशाभिषेख करविला. अनुपुराणाच्या मते शिवाजी महाराजांचे निधन , संभाजीराजांचा राज्याभिषेक या घटना कवी कलशास आधीपासून माहित होत्या. संभाजीराजांनी केलेला पुत्रकामेष्टी यज्ञ व यज्ञाची प्राप्ती म्हणून शाहू राजांचा झालेला जन्म या मागची प्रेरणा कवी कलश होता.
संभाजी महाराज दिलेरखानास मिळाले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या अथक प्रयत्नाने ते स्वराज्यात पन्हाळगडी दाखल झाले . ३ एप्रिल १६८० साली शिवाजी महाराजांचे निधन झाले त्यावेळी गृह्कलह व राजकीय घडामोडी घडून आल्या व संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. स्वराज्याचे मंत्री व छत्रपती संभाजीराजे यांच्यात अविश्वास दिसून येतो . त्यामुळे संभाजीराजे कवी कलश यांच्यातील जवळीक वाढली व त्यांची मैत्री दृढ झाली. २७ ऑगस्ट १६८० रोजी बाकरे शास्त्रींना दिलेल्या दानपत्रात कवी कलशचा उल्लेख आढळतो .” कवी कलशाच्या प्रोत्साहनामुळे ज्याच्या डोळ्यात लाली आली आहे. “
सोयराबाई , अण्णाजी दत्तो व इतर मंत्र्यांनी स्वराज्याविरोधात कारस्थान केले या आरोपाखाली मंत्र्याना हत्तीच्या पायी देण्यात आले. जेधे शकावलीत कवी कलशाच्या बोलण्यावरून मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिले अशी नोंद आहे “ भाद्रपद मासी संभाजी राजे यांनी कवी कलश्याच्या बोले मागती आणाजी दत्तो सचिव यांजवर इतराजी करून मार दिल्हा. त्या माराने राजश्री आनाजीपंत व बाळ प्रभू व सोमजी दत्तो व हिराजी फर्जंद परळीखाली कैद करून मारिले.
जेधे शाकावलितील नोंदीनुसार डिसेंबर १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कवी कलशास कुलएखत्यार नेमले. कुलएखत्यार झाल्यावर कवी कलशाची मुद्रा २२ मार्च १६८५ च्या पत्रात पुढीलप्रमाणे आढळते “विधीरर्थीमनीषीणामवधीर्नयामवर्तमना / वैशधी: कार्यसिद्धीना मुद्रा कलशहस्तगा // अर्थ – “सर्व याचकांची इच्छा पूर्ण करणारी, राज्यव्यवहाराचे नियंत्रण करणारी व कार्यसिद्धीचा ठेवा असणारी ही मुद्रा आता कलशाच्या हातात आहे “ ( पेशवे दफ्तर खंड ३१ )
कवी कलशाची मुद्रा देखील गर्विष्ठ व अचंबित करणारी आहे. कारण इतर मंत्रीगणाच्या मुद्रेत आपणास छत्रपतीविषयी आदर व छत्रपतींचे नाव आढळून येते.
कवी कलशाने त्याच्या नावामागे अनेक उपपद लावलेली आढळून येतात “ आज्ञापत्र धर्माभिमान , कर्मकांडपारायण , दैवतैकनिष्ठाग्राहीताभीमान ,सत्यसंघ , समस्तराजकार्यधुरंधर , विश्वासनिधी रा.रा. कविकलश “
  • कवी कलशाचे बलिदान
कवी कलश व शिर्के यांच्यात वाद निर्माण झाला यासबंधी आपणास चिटणीस बखर, मराठा साम्राज्याची छोटी बखर , पंतप्रतिनिधीची बखर , मासिरे आलमगिरी यात माहिती मिळते.
त्यावेळी संभाजीराजानी कवी कलशाची बाजू घेऊन शिर्क्यांचा पराभव केला. जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ शके १६१० कवी कलश याजवरी शिर्के पारखे जाले. कवी कलश हा पळोन खिलनियावर गेला तेच मासी संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदतीस आले. समागामे स्वारी सिरकीयांसी युद्ध करून त्यास पळवून खळणीयास आले. “
मोगली साधनातून कवी कलश मोगलांचा हेर असल्याच्या व फितुरीने संभाजी राजांस कैद केल्याच्या नोंदी आढळून येतात . केळदिनृपविजय काव्य ग्रंथात , निकोलाय मनुची , रॉबर्ट ऑम यांच्या लिखाणात “ कवी कलश हा औरंगजेबाचा हेर होता अश्या नोंदी आदळतात.
औरंगजेबाच्या दरबारातील इश्र्वरदास नागर फुतुहात –ए-आलमगिरी यात लिहितो “ कवी कलश हा औरंगजेबाचा हेर होता कवी कलशाने संभाजी विरुद्ध फितुरी केली”. “ औरंगजेबाने रायगडाची प्रतिमा कवी कलशाच्या मुलाच्या मदतीने बनवून घेतली” अशी नोंद करतो.
औरंगजेबाच्या दरबारातील खाफीखान लिहितो “मुकर्रबखानाने तीन हजार सैन्यासह अकस्मात हल्ला केला असता कवी कलश एकनिष्ठ म्हणून प्रख्यात होता. तो काही सैन्यासह मोगली सैन्याशी लढण्यास आला असता त्याच्या हाताला बाण लागून जखमी झाला. त्यावेळी संभाजीराजे पळून जाण्यासाठी घोड्यावर स्वार झाले होते. कवी कलशाने त्यांना आवाज दिला “ मी मागे राहिलो “ तो ऐकून संभाजीराजे घोड्यावरून खाली उतरले.
संभाजी महाराज व कवी कलश यांना साखळदंडामध्ये कैद करून औरंगजेबासमोर आणण्यात आले. औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरला व जमनीवर डोके ठेऊन अल्ल्हाची पार्थना करू लागला. त्यावेळी कवी कलश यांनी एक काव्य केले. ,"हे राजा (छत्रपती संभाजी महाराज) तूला पाहिल्यानंतर बादशाह आलमगीराला आपल्या दिमाखदार आणि ताकदवान असलेल्या त्याच्या सिंहासनावर बसणे अशक्य झाले आहे आणि तो तूला सलाम करण्यासाठी आपले सिंहासन सोडून खाली आला आहे !
सदर काव्य ऐकून औरंगजेबाने कवीकलशाची जीभ छाटण्याचा आदेश दिला. कवी कलशाने केलेले काव्य कलशाची संभाजी महाराजांविषयीची एकनिष्ठता दर्शवते.
  • कवी कलशाची समाधी
कवी कलशाची समाधी तुळापुर व वढूबुद्रुक येथे असून वढूबुद्रुक येथील समाधीवर खालील काव्यपंक्ती कोरण्यात आल्या आहेत.
यावन रावण कि सभा मे संभू बंध्यो बजरंग /
लहू लीसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग //
ज्यो रवी छबी देखतही खद्योत होत बदरंग /
त्यो तव तेज निःर्के तखत त्यजो अवरंग //
यवनरूपी ( औरंगजेब ) रावणाच्या सभेत बजरंगाप्रमाणेच संभाजीराजानाही
बंधनात आणण्यात आले आहे. रणरंग खेळल्यामुळे रक्ताळलेले संभाजीचे अंग
शेंदूर फसलेल्या हनुमंताप्रमाणेच दिसत आहे. आकाशात सुर्वोदय झाल्यावर
ज्याप्रमाणे काजवे निस्तेज होतात. त्याप्रमाणे हे संभाजीराजा
तुझ्या तेजामुळे औरंगजेबाने आपल्या तख्ताचा ( सिंहासन ) त्याग केला आहे.
सदर समाधी कोणी व कधी बांधली याविषयी तत्कालीन नोंदी आढळून येत नाहीत .
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- जेधे शकावली , चिटणीस बखर , सभासद बखर , परमानंद काव्य ,
शिवचरित्र वृत्र संग्रह १ , पेशवे दफ्तर खंड ३१, मराठी दफ्तर रुमाल २
छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ :- जयसिंग पवार
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा : -सदाशिव शिवदे
Shivaji’s visit to Aurangjeb at Agra
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८
छत्रपती संभाजी महाराज : -गोविंद सरदेसाई

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...