विनोद जाधव एक संग्राहक

Monday 29 May 2023

'फडणवीस’ आडनावाचा इतिहास

 


'फडणवीस’
आडनावाचा इतिहास
लेखन :सतीश राजगुरे
'फडणवीस’ हे मुळात आडनाव नाही. मूळचा फारसी भाषेतील शब्द ‘फर्द-नवीस’ असा आहे. ‘फर्द’ म्हणजे कागद आणि ‘नवीस’ म्हणजे लिहिणारा. पुढे ‘फर्द' पासून 'फड' शब्द तयार झाला आणि 'नवीस' प्रत्ययाचे 'नीस' झाले.
मुघल राजवटीत राज्यव्यवहार बाबींशी निगडित जे काही शब्द मराठीत आलेत त्यापैकी 'फड' हा एक शब्द आहे. 'फड' म्हणजे फडणीवीसाकडील कारकुनी खाते किंवा कचेरी. त्यात शेकडो कारकून/दिवाणजी/हिशेब लिहिणारे असत. एकप्रकारे ते त्या काळचे सचिवालयच होते.
फडणवीस (फड + नवीस)= फडाचे किंवा फडावरील लिहिणे करणारा. विशेषतः राज्यातील महसुलाचे जमाखर्च आणि हिशेब यांची नोंद करणारा कारकून. अशा सर्व कारकूनांवरील अधिकारी या अर्थाने हे पद पूर्वी अस्तित्वात होते.
पेशव्यांच्या दरबारी असणारे प्रसिद्ध नाना फडणवीस यांचे आडनाव 'भानू' (बाळाजी जनार्दन भानू) होते. नाना सुरुवातीला कारकुनाचे काम करीत. म्हणून ते 'फडणवीस'/'फडणीस' या नावानेच ओळखले जात. 'फडणवीस'चे अपभ्रंशित रूप म्हणजे 'फडणीस' होय.
माधवराव पेशव्यांच्या कार्यकाळामध्ये नाना फडणवीसांकडे 'फडणीशी' बरोबरच अनेक जबाबदाऱ्याही आल्या होत्या, असं 'नाना फडणवीस अँड द एक्स्टर्नल अफेअर्स ऑफ द मराठा एंपायर' या पुस्तकाचे लेखक वाय. एन. देवधर यांनी लिहून ठेवलं आहे. 'फडणीशी' म्हणजे बजेटची आखणी करणे, राज्याचे हिशेब-लेखे ठेवणे आणि पेशव्यांच्या राजधानीची जबाबदारी पाहाणे, हे काम नानांकडे आलं. त्याचप्रमाणे मोहिमांच्या वेळेचीही व्यवस्था त्यांच्याकडे आली.

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .भाग ४

 

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .
लेखन ::आशिष माळी


भाग ४
खानजदाखना या प्रकारची माहिती कळली.हातास मिळतील तेवढे स्वार घेऊन कासीम खानाच्या मदतीस धावला
समकालीन साकी मुस्तैदखान लिहितो " मराठ्यांच्याकडे अनेक घोडेस्वार होते "त्यांच्याकडे पायदळात अनेक बंदूक धारक होते . युद्ध तुंबळ झाले . पण मराठे एक पाऊलही हटले नाही . सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत युद्ध चालले.
हे चालू असताना मराठ्यांच्या तिसरी तुकडीने मुघलांच्या छावणी वर हल्ला केला . आता कासीम खान खान जादखान तहाच्या गोष्टी करू लागले . जवळच्या दोद्देरी मध्ये आश्रय घ्यायचा ठरला. पण मराठे त्यांच्या मागे धावू लागले पण इतक्या लोकांसाठी अन्न पाणी नव्हते म्हणून मुघल किल्लेदार नि कासीम खान ला किल्ल्यावर घ्यायला नकार दिला . तट जवळ येऊन मुघलांनी मराठ्या बरोबर युद्धची तयारी चालू केले . सरदारांना अन्न कसे बसे मिळाले पण सामान्य मुघल सैनिकांना अन्न पाणी मिळत नव्हते . मराठ्यांनी सुद्धा मुघलांना कोंडले पण युद्ध चालू नाही केले .
३ दिवस असा कोंडमारा केला . खाफी खानाने मुघलांच्या हालापेष्टाचे वर्णन केले आहे . यावेळी औरंग्याने हिमतखानाला पाठवले . पण संताजीने अर्धे सैनिक वेढ्यात ठेवून उरलेले अर्धे सैन्य घेऊन हिमतखानाकडे वळले . पण वाटेत राजाराम महाराजांनी हिमतखाना फौज पाठवली कळले मग संताजी पुन्हा दोद्देरी ला आले . चित्रदुर्ग चा बारमाप्पा नायक कासिमखानाचा शत्रू होता तो संताजीस फौज घेऊन मिळाला
त्याचवेळी मुघल प्रमुख सरदारांनी नि गढी मध्ये प्रवेश मिळवला त्यामुळे गढी बाहेर असलेल्या सैनिकांचे हाल झाले . कासीमखान आणि इतर सरदार च भांडण झाले ,आणि परिणाम कासीमखान ने आत्महत्या केली . मोठा पराजय आणि अफूचे व्यसन याने कासीमखान संपला. मराठ्यांनी त्वेषाने हल्ला चढवला . खानजादाखान ने सात लाख वसूल केले .
पण इथे दिलदार पनाचे कौतुक करताना खाफीखान ने लिहूं ठेवले आहे . शरणागती पत्करल्यावर कोणत्याही नाही . उलट मुघलांना अन्नदान केले .
संदर्भ
मराठ्यांचे स्वतंत्रयुद्ध (तारिखे खाफीखान पृष्ठ ६१पासून )
मराठे व औरंगझेब (मसूर आलामगिरी) पृष्ठ ६२, ३१

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई भाग ३

 

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .
लेखन ::आशिष माळी



भाग ३
आता उद्यापासून युद्धभूमी कडे प्रवास म्हणून मुघलांचे सैन्य झोपे गेले.पेशंखाना मध्ये संरक्षणासाठी दीड हजार सैनिक होते.
याचवेळी सावध सेनापती संताजीने व्यूह रचना आखली . त्याने फौजेचे ३ तुकडे केले .पहिल्या तुकडीने खजिन्यावर हल्ला करायचा . खजिना वाचवायला मेजवानी खाऊन झोपलेले कासीमखान , खानजादखान पुढे येतील . मग दुसऱ्या तुकडीने हल्ला करायचा . लढाई रंगात आली कि तिसऱ्या तुकडीने मागून हल्ला करायचा .
त्याच रात्री विठोजी चव्हाण आणि मकाजी देवकाते यांनी 5000 मावळ्यासाहित पेशंखाना वर हल्ला केला.साखरझोपेत असलेल्या मुघलांना मोठा तडाखा होता. मराठ्यांनी जाताना तंबू इतर गोष्टींना आग लावल्या.काही चीज वस्तू घेऊन फरार झाला.कासीम खान सुद्धा नावाजलेला सेनानी होता .औरंग्याने त्याला "गझनफर गाझी" उपाधी दिलेली.खानजादा खान ला खुश करून खिलाफत आणि मान मरातब ची स्वप्ने पाहणारा कासीम आता 6000 फौज घेऊन मराठ्यांच्या पाठीमागे दौडू लागला.त्यापाठोपाठ 2000 ची आणखी 1 तुकडी कासीम खान च्या मदतीस धावली.
पण मराठ्यांच्या एक मोठ्या व्यूह रचनेत आपण फसतोय याचा कोणालाच गंध नव्हता.एक डोंगरा जवळ मराठ्यांनी पळवून आणलेले तंबू जाळून आग निर्माण झालेली.पण अचानक डोंगर आडून संताजी हणमंतराव धोंड आणि हणमंतराव निंबाळकर सहित एक मोठी (दुसरी ) तुकडी घेऊन कासीम खान च्या दोन्ही बाजूने हल्ला केला.पहाटेचे युद्ध दुपार पर्याय चालले होते.

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .भाग २

 

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .
लेखन ::आशिष माळी



भाग २
१६८९-१६९५ मध्ये संताजी आणि धनाजी यांनी मुघलांना कर्नाटकात पळो की सळो करून ठेवले . स्वतः झुल्फिकारखान राजाराम महाराजांच्या हातातून वाचलेला . ह्याच काळात संताजी नि कर्नाटकातील बेरड लोकांना घेऊन मुघलांना अनेक तडाखे दिले . संताजी घोरपडे जिंजीकडे (औरंग्या सोलापूर दक्षिण बाजूला ब्रम्हपुरी मध्ये होता) त्याने त्यावेळी कर्नाटकातील नावाजलेला सरदार कासीम खानाला संताजी घोरपडे अडवण्यास सांगितले पण संताजीच दरारा होता म्हणून औरंग्याने खानजादा खान सफशिकन खान सय्यद असलात खान , मोहम्मद मोरादखान याना कासीम खान ला मदतीसाठी पाठवले कासीम खान त्यावेळी अधोनी किल्ल्याजवळ मोठा तोफखाना होता .मुघलांच्या दोन्ही फौज चित्रदुर्ग च्या उत्तरेस एकत्र आल्या. संताजी च्या फौजा सहा कोस पुढे होत्या .
दु सऱ्या दिवशी युद्धास तोंड फुटणार होते . त्यामुळे रात्री कासीम खानाने मोठा कार्यक्रम आयोजित केला. खानजादा खान हा नुसता सेनानी नव्हता तर औरंगाय जवळच नातेवाईक होता.
त्यामुळे समारंभात कासीम खानाने कोणतीच कुचराई केली नव्हती.अधोनी वरून निघताना मोठा खजिना कासिमखानाने घेतला होता . त्याने पेशखाना ( खजिना)पुढच्या मुक्कामाला पाठवून दिला.

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .भाग १

 

संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .
लेखन ::आशिष माळी


भाग १
मराठ्यांच्या इतिहासात अनेक गाजलेल्या लढाया झाल्या , जशी छत्रपती शिवाजी महाराजांची अफझलखान बरोबर प्रतापगड , कारतलबखान बरोबर उमरखिंड , संभाजी महाराजांची दक्षिण कोकण , बुऱ्हाणपूर पहिले बाजीराव यांची पालखेड . पण एकाच लढाई जी इतकीच महत्वाची आणि दुर्लक्षित ती म्हणजे संताजी घोरपडे यांनी कासीमखान आणि खानाजादखान ची दोद्देरी ची लढाई .
लढाईची कोरीव चित्रे
१६८९ मध्ये संभाजी महाराजांची मृत्यूनंतर राजाराम महाराज जिंजी ला गेले त्यामुळे ५-६ जिल्ह्यातील लढाई हजार किलोमीटर मध्ये पसरली. १६८९-१६९५ मध्ये संताजी आणि धनाजी यांनी मुघलांना कर्नाटकात पळो की सळो करून ठेवले . स्वतः झुल्फिकारखान राजाराम १६८९ मध्ये संभाजी महाराजांची मृत्यूनंतर राजाराम महाराज जिंजी ला गेले त्यामुळे ५-६ जिल्ह्यातील लढाई हजार किलोमीटर मध्ये पसरली.

Saturday 27 May 2023

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी भाग ४

 

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ
विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी
लेखन :प्रकाश लोणकर

भाग ४
सैनिकी बाण्यात उत्तम गती असलेल्या बाबुजींनी इ.स.१७५७ मध्ये निजामाकडून नळदुर्ग किल्ला काबीज केला,उदगीर मोहिमेत सदाशिवरावभाऊना उत्तम साथ दिली.त्यामुळे नानासाहेबांनी अहमदशहा अब्दाली विरुद्धच्या पानिपत मोहिमेत सदाशिवरावभाऊ बरोबर बाबूजी नाईकांना पण पाठविले होते.विश्वासराव आणि सदाशिवरावभाऊ युद्धात ठार झाल्याचे ऐकून अन्य काही मराठे सरदारांबरोबर बाबूजी नाईक पण दिल्लीच्या दिशेने पळते झाले.नानासाहेब पेशव्यांना पानिपत संग्रामाची हकीकत कळविण्याची कटू जबाबदारी बाबुजींनी घेतली होती.पानिपत युद्धानंतर अवघ्या सहा महिन्यांनी म्हणजे जून १७६१ मध्ये नानासाहेबांचे निधन झाले.नानासाहेबांच्या निधनानंतर पुण्यात उद्भवलेली दंगल काबूत आणण्यासाठी बाबूजी नाईकांनी सखारामबापू आणि राघोबा दादांस मदत करून दंगल नियंत्रणात आणली.ह्यावेळी त्यांनी पेशवे पदासाठी दावा न करता अवघ्या सोळा वर्षे वयोमान असलेल्या माधवराव ह्या नानासाहेबांच्या द्वितीय पुत्रास पाठींबा देऊन अनेक मान्यवर व्यक्तींना माधवरावांच्या बाजूस आणले.निजामाविरुद्ध्च्या संघर्षात बाबुजींनी माधवरावास बरीच मदत केली.पण युद्धानंतर निजामाकडून पेशव्यांना मिळालेल्या जहागीरीवरून पुन्हा त्यांचे पेशव्यांशी बिनसले आणि ते लष्कर सोडून निघून गेले.नंतर माधवरावांनी त्यांची समजूत घालून त्यांना हैदर विरुद्धच्या मोहिमेत सामील करून घेतले.पण ह्या मोहिमेत सुद्धा स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी त्यांनी माधवरावांच्या आज्ञा पाळण्यात चालढकल सुरु केली. हि बाब माधवरावांच्या लक्षात आल्यावर भीतीने बाबूजी नाईक पेशव्यांचा तळावरून काळोख्या रात्रीचा फायदा घेऊन पळून गेले.हि खबर माधवरावांस मिळताच त्यांनी बाबूजींची मुले,माणसे,कुटुंब कबिला कैद करून मंगळवेढ्याला रवाना केला.बाबूजी नाईकांना शरण येण्याशिवाय अन्य पर्याय माधवरावांनी ठेवला नव्हता.नोवेंबर १७७२ मध्ये माधवरावांच्या अकाली मृत्यूने बाबूजींच्या मनावर जबरदस्त आघात होऊन ते जहागिरीच्या गावी—बारामतीला जाऊन स्वस्थ बसले.
माधवरावांच्या मृत्यू नंतर त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव पेशवा झाला.राघोबा दादांच्या दुर्गा ह्या कन्येचा म्हणजे नारायणरावांच्या चुलत बहिणीचा विवाह फेब्रुवारी १७७३ रोजी बाबूजी नाईकांचा मुलगा पांडुरंगराव याच्याबरोबर शनिवारवाड्यात थाटामाटाने पार पडला.यासाठी नारायणराव पेशव्यांनी स्वतः महत्वाच्या व्यक्तींच्या घरी जाऊन आमंत्रणे दिली होती,तसेच अंबारीतून पुणेकर जनतेला ह्या विवाहाच्या अक्षदा वाटल्या होत्या.ह्या विवाहाने बाबूजी आणि राघोबादादा एकमेकांचे व्याही झाले.यापूर्वी थोरल्या बाजीरावांची बहिण भिउबाईचा विवाह बाबूजी नाईकांच्या बंधुशी झाला होता.अशा प्रकारे दुसर्यांदा नाईक आणि पेशवे घराण्यात विवाह संबंध घडून आला.
नारायणरावाच्या हत्ये नंतर बारभाईनी काही दिवस नारायणराव पत्नी गंगाबाईच्या नावाने कारभार चालविला.सवाई माधवरावांच्या जन्मानंतर त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.सवाई माधवरावांच्या जन्माच्या वेळी बाबुजींनी आपली सून दुर्गाबाई(राघोबादादांची मुलगी)गंगाबाईच्या सेवेसाठी पुरंदर किल्ल्यावर पाठवली होती. बारभाई मंडळींच्या विनंतीवरून ते काही काळ बारभाईनच्या राजकारणात सहभागी झाले होते.सवाई माधवरावांच्या जन्मा नंतर बाबूजी नाईक विशेष क्रियाशील राहिले नाहीत.बाबूजी नाईक वयाच्या ८२ व्या वर्षी ६ ऑक्टोबर १७७७ रोजी मृत्यू पावले.मृत्यूचे ठिकाण आणि कारण अजून तरी अज्ञात आहे.
बाबूजी नाईकांचे वास्तव्य असलेला बारामती येथील गढीवजा वाड्यात राज्य सरकारची विविध कार्यालये असून सध्या त्याचे मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीचे (conservation and restoration) काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
# प्रकाश लोणकर.
संदर्भ:१-मराठी रियासत खंड पाच-गो.स.सरदेसाई
२-पेशवाई:ले.कौस्तुभ कस्तुरे
३-पेशवे:ले.श्रीराम साठे
४- मराठ्यांचा इतिहास खंड दोन आणि तीन :संपादक ग.ह.खरे आणि अ.र.देशपांडे.

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी भाग ३

 

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ
विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी
लेखन :प्रकाश लोणकर

भाग ३
२--नानासाहेब पेशवे आणि बाबूजी नाईक: थोरल्या बाजीरावांचे रावेरखेडी इथे एप्रिल १७४० मध्ये अकस्मात निधन झाले.त्यांच्या जागी पेशवेपदी कुणाची निवड करावी असा प्रश्न छ.शाहू महाराजांपुढे उभा राहिला.नागपूरकर रघुजी भोसले(प्रथम)तसेच अन्य काही मातब्बर मराठा सरदारांनी बाबूजी नाईकांना पंतप्रधान(पेशवे)पद द्यावे म्हणून छ.शाहू महाराजांकडे खटपट सुरु केली.पण छ.शाहू महाराजांनी बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबांस पेशवा नियुक्त केले.पेशवेपदाची महत्वाकांक्षा फलद्रूप न झाल्याने बाबूजी नाईक बारामतीकर आणि भट पेशवे घराण्यातील संघर्षात तेल ओतले गेले.ह्यावेळी बाबूजी नाईक ४५ वर्षांचे तर नानासाहेब अवघ्या २० वर्षे वयाचे होते..मे १७४३ मध्ये छ.शाहू महाराजांनी बाबूजी नाईकांच्या गुजरातेतील पेशवे विरुद्ध गायकवाड वादातील कामगिरीबद्दल नानासाहेबांचा विरोध असून देखील पुणे परिसरातील २२ गावे आणि बारामती महालाची जहागीर बाबूजी नाईकांना इनाम दिली.बाबूजींचे वास्तव्य बारामती इथे सुरु झाल्याने त्यांना बारामतीकर नाईक जोशी संबोधले जाऊ लागले.पेशवे पद हुकल्याच्या रागातून बाबूजी नाईकांनी बाजीराव पेशव्यांच्या छत्तीस हजार रुपये थकीत कर्जाची नानासाहेबांकडे एक रकमी परतफेड करण्याचा तगादा सुरु केला.त्यासाठी त्यांनी शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर आमरण उपोषण करण्यासाठी एका ब्राह्मणाला पण बसविले.ब्राह्मण हत्तेचे पातक नको असेल तर संपूर्ण थकीत रक्कम एकरकमी देण्याची बाबुजींनी मागणी केली.नानासाहेबांचे मुतालिक असलेल्या महादजीपंत पुरंदऱ्यानी आपले सर्व जडजवाहीर,देवघरातील सोन्याचांदीचे देव,सोन्याचांदीची उपकरणी अगदी शंख ठेवण्याची अडणी सुद्धा,विकून रातोरात छत्तीस हजार रुपयांची रक्कम उभारून बाबूजी नाईकांचे थकीत कर्ज फेडून नानासाहेबांवरील नामुष्की टाळली!.
३--रघुजी भोसल्यांनी कर्नाटक मोहिमातून आणलेली संपत्ती पाहून नानासाहेबांसहित बऱ्याच सरदारांचे कर्नाटक मामला आपणास मिळावा म्हणून प्रयत्न चालले होते.बाबूजी नाईक पण त्यासाठी इच्छुक होते.छ.शाहू महाराजांनी बाबूजी नाईकांची मागणी मान्य केली पण त्यात त्यांना अपयश आल्याने इ.स.१७४६ मध्ये कर्नाटकचा मामला छ.शाहू महाराजांनी नानासाहेबांना सोपविला.सदाशिवराव भाऊनी कर्नाटकातून बरीच खंडणी वसूल केली.त्याने बाबूजी आणखीनच चवताळले.नानासाहेब मोहिमांमध्ये गुंतलेले पाहून सातारा दरबारातील त्यांच्या बाबूजी नाईक बारामतीकर,रघुजी भोसले,प्रतिनिधी,आनंदराव सुमंत,गायकवाड आदी परंपरागत विरोधकांनी छ.शाहू महाराजांकडे नानासाहेबान विरुद्ध तक्रारी केल्या.छ.शाहू महाराजांनी नानासाहेब विरोधकांच्या तक्रारींवर विश्वास ठेवून ९ मार्च १७४७ रोजी नानासाहेबांस पेशवे पदावरून बडतर्फ केले.पण नानासाहेबांची जागा घेयील असा दुसरा कुणीही लायक सरदार दिसून न आल्याने छ.शाहू महाराजांनी सव्वा महिन्याने म्हणजे १३ एप्रिलला पुन्हा नानासाहेबांस पेशवे पदी नियुक्त केले .इ.स.१७४० ते १७५३ अशी तेरा वर्षे बाबूजी नाईकांनी पेशव्यांशी स्पर्धा,संघर्ष करण्यात घालवली.पेशव्यांची जिरवण्यासाठी ते ताराराणी यांच्या गटात पण काही काळ सामील झाले होते.एप्रिल १७५३ मध्ये त्यांनी नानासाहेबांबरोबर समजोता केला.राघोबा दादांबरोबर ते उत्तरेकडील मोहिमात पण सामील झाले.तिथे दादांशी न पटल्याने त्यांनी पिढीजात सावकारीच्या व्यवसायात अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली.याच सुमारास त्यांनी मोरोपंत पराडकर ह्या आर्यांसाठी( काव्य रचनेचा एक प्रकार) प्रसिद्ध पावलेल्या कवीस आश्रय दिला.नाईकांनी मोरोपंतांची पुराणिक पदावर नियुक्ती केली.

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी भाग २

 

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ
विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी
लेखन :प्रकाश लोणकर

भाग २
पेशव्यांचे व्याही म्हणून बाबूजींना पेशव्यांकडून सतत पाठींबा मिळत गेल्याने त्यांच्यावर सोपवलेल्या अनेक कामगिऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या.सत्तेच्या उच्चतम वर्तुळात सदा वावर होत राहिल्याने त्यांचा विविध मान्यवर व्यक्तींशी संबंध येत गेला.यातून त्यांना अनौपचारिक असे ` बाबूजी ` नांव प्राप्त झाले.बाबूजी नाईकांचा सत्तेच्या वर्तुळात भरपूर वावर असल्याने त्यांच्या मनात मराठेशाहीचा पेशवा होण्याच्या आकांक्षेने अंकुर धरला.त्यातून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा धावता आढावा घेऊ या.
१--थोरल्या बाजीरावांशी वितुष्ठ:बाळाजी विश्वनाथ एप्रिल १७२० मध्ये मृत्यू पावले.त्यांच्या पश्चात पेशवेपदी कुणाची नियुक्ती करायची यावरून सातारा दरबारात मोठ्या खेळ्या सुरु झाल्या.देशस्थ आणि कोकणस्थ दोन्ही गट आपले आपले उमेदवार रेटू लागले.बाळाजी विश्वनाथांच्या पिलाजी जाधवराव,नाथाजी धुमाळ,उदाजी पवार,अंबाजीपंत पुरंदरे,संताजी भोसले,कान्होजी आंग्रे यांसारख्या निकटवर्तीय सहकाऱ्यांची बाळाजींचे थोरले पुत्र बाजीराव यांना छ.शाहू महाराजांनी पेशवेपदी नियुक्ती करावे अशी इच्छा होती.बाबूजी नाईकांची पण अशीच इच्छा होती.त्यासाठी सातारा दरबारातील बऱ्याच मुत्सद्दी,राजकारण्यांचा रोष पत्करून त्यांनी छत्रपतींकडे बाजीरावांसाठी पूर्ण ताकद लावली छ.शाहू महाराजांनी पण बाळाजी विश्वनाथांनी त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट,समर्पण,प्रामाणिकपणा इत्यादी बाबी ध्यानात घेऊन बाजीराव बाळाजी(थोरले बाजीराव) यांची १७ एप्रिल १७२० रोजी पेशवेपदी नियुक्ती करून बाबूजी नाईकांस नवनियुक्त पेशव्यास सर्वतोपरी साह्य करण्याची आज्ञा केली.
बाजीरावांनी दिलेल्या सर्व कामगिऱ्या बाबुजींनी चांगल्या प्रकारे पार पडल्या.परंतु पुढे पुढे बाजीराव आणि बाबूजी यांच्यात कर्ज फेडीवरून कुरबुरी सुरु झाल्या.प्रकरण शाहू महाराजांकडे गेल्यावर त्यांनी बाबूजींना,” बाजीराव स्वतःच्या चैनीसाठी कर्ज उचलत नाहीत..वादात गुंतण्यापेक्षा सबुरी धरा”असा सल्ला दिला.बाबूजी नाईकांनी वेळोवेळी लष्करी मोहिमांसाठी पुरविलेल्या कर्जापोटी कृतज्ञता भावनेने बाजीरावांनी त्यांना मराठ्यांचे वकील म्हणून इ.स.१७२७ मध्ये निजामाकडे पाठविले.तिथे त्यांनी निजाम,मराठे,मोगल,रजपूत यांच्यातील किचकट परस्पर संबंधांचे चांगले निरीक्षण केले.निजामाचे वैभव,लष्करी ताकद,कावेबाजपणा,तेथील सावकारांचे महत्व आदींनी ते खूपच प्रभावित झाले.तरी पण त्यांनी आपली निष्ठा मराठा साम्राज्याशीच कायम ठेवली.बाबूजींच्या उत्तम कामगिरीवर खुश होऊन बाजीरावांनी त्यांना माळव्याची सुभेदारी दिली.बाबूजी नाईकांनी माळव्यातुन पाठविलेल्या खंडणी,नजराणे आणि चौथाईमुळे बाजीरावांनी युद्ध मोहिमांसाठी त्यांच्याकडून उचललेल्या कर्जाची परतफेड होऊन गेली.इ.स.१७३३ मध्ये बाबूजींना पेशव्यांनी पुण्यात बोलावून तीन पेठांची चौधरकी दिली.बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई १७३५-३६ मध्ये उत्तरेत तीर्थयात्रेला गेल्या होत्या.त्यांचे व्यवस्थापक म्हणून बाबूजी नाईक त्यांच्या बरोबर होते.नोवेंबर १७३७ मध्ये भोपाळ मार्गे दिल्लीला बाजीरावांनी काढलेल्या मोहिमेत बाबूजी नाईक पण होते.ह्या मोहिमे नंतर बाबूजींच्या ऐश्वर्यात प्रचंड वृद्धी झाली.आपल्या पैशाच्या जोरावर पेशवे लष्करी मोहिमा आखतात,कर्ज वेळेवर फेडत नाहीत पण नांव मात्र त्यांचे होते,असे विचार बाबूजींच्या मनात येण्यास सुरुवात होऊन ते पेशव्यांबरोबर बरोबरी तसेच कर्ज परतफेडीसाठी तगादे करू लागले.बाबूजी नाईक बाजीरावांच्या विरुद्ध जाण्याचे अजून एक कारण होते.बुंदेलखंड मोहिमेत बाबूजी नाईकांचा सहभाग होता.तेथून येताना लुटीत मिळालेला एक हत्ती आवडल्यामुळे त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला.लुटीत मिळालेला यच्चयावत ऐवज प्रथम सरकारात दाखल केला पाहिजे,मग त्याची नियमानुसार वाटणी होईल असा बाजीरावांचा शिरस्ता होता.त्यानुसार त्यांनी आपल्या मेव्हण्याला,धनकोला-बाबूजी नाईकांना लुटीत मिळालेला हत्ती ताबडतोब सरकारजमा करण्याचे आदेश दिले.पण डोक्यात हवा गेलेल्या बाबुजींनी तसे करण्यास साफ नकार दिला.बाजीराव सरकारी हुकुम मोडणाऱ्याला कधीच सोडत नव्हते.त्यांनी बाबूजी नाईकांच्या वाड्यावर चौकी पहारे बसविले.चिमाजी अप्पांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटले गेले.असाच प्रकार बाबूजींचे चिरंजीव आबाजीपंत याने पण केला होता.दाभाडे सरदारांकडून मिळालेली लुट त्यांनी सरकारमध्ये जमा न करता परस्पर कर्ज वसुलीसाठी स्वतःकडे ठेवली होति.बाजीरावांचे धाकटे मेहुणे ( बहिण अनुबाईचे पती ) व्यंकटराव घोरपडे यांनी पण बाबूजी नाईकांकडून सैन्य उभारणीसाठी कर्ज घेतले होते,ज्याची परतफेड वेळेवर होत नव्हती.त्यामुळे बाजीरावांची नाईकांकडे दिलेली बहिण भिउबाईचे माहेरच्या लोकांबरोबर संबंध बिघडले.एप्रिल १७४० मध्ये बाजीरावांचे निधन झाले.

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी भाग १

 

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ
विश्वनाथ सदाशिव उर्फ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी
लेखन :प्रकाश लोणकर

भाग १
बाबूजी नाईक बारामती स्थित उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ होते.त्यांनी ८२ वर्षांच्या आयुष्यात श्रीवर्धनकर भट घराण्यातील आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ पासून सवाई माधवराव( औट घटकेपुरता पेशवे झालेल्या राघोबा दादांसह)-अशा सात पेशव्यांची जवळपास ६४ वर्षांची कारकीर्द नुसती बघितली नाही तर अंगभूत शौर्य,पराक्रम आणि पिढीजात धन बळावर त्यांनी उत्तर मराठेशाहीत स्वतःचे एक वेगळे स्थान पण निर्माण केले होते.पंतप्रधान(पेशवा) होण्याच्या महत्वाकांक्षेपायी त्यांच्या राजकीय भूमिकांत सातत्य राहिले नाही.वेळोवेळी ते सामर्थ्यशाली पेशव्यांबरोबर संघर्ष करत राहिले. त्यांची पेशवा पदाची आस कधीच फलद्रूप झाली नाही.
कोकणातील केळशी गावचे रहिवाशी असलेल्या सदाशिव केशव जोशी आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई यांच्या पोटी विश्वनाथ( बाबूजी नाईक) २३ मे १६९५ रोजी जन्मास आले.केशव जोशी हे काशी इथे सावकारीचा व्यवसाय करत असत.त्यामुळे सदाशिव जोशी सुद्धा पिढीजात सावकारीचा व्यवसाय चालविण्यासाठी सातारा इथे आले.सावकारी व्यवसायामुळे साताऱ्यात त्यांना ` नाईक (सावकार)जोशी ` म्हणून ओळखले जाऊ लागले.इ.स .१७०८ पासून म्हणजे छ.शाहू महाराज सातारा गादीवर तख्तनशीन झाल्यापासून सदाशिवराव जोशी महाराजांच्या लष्करी मोहिमा,फौज्फाट्यासाठी कर्जाऊ पैसा पुरवू लागले होते.त्यांचा मुलगा विश्वनाथ (जन्म २३ मे १६९५)यांनी तरुण वयात पिढीजात सावकारी व्यव्सायातिल खाचाखोचा माहित करून घेताना शस्त्रास्त्र,युद्ध कलेत पण प्राविण्य मिळविले.बाळाजी विश्वनाथ भट १७ नोव्हेंबर १७१३ रोजी छ.शाहू महाराजांचे पेशवे म्हणून नियुक्त झाले.त्यांनी नव्याने जन्मास आलेल्या मराठी राज्याला आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी खूप कष्ट घेतले.यातून त्यांचा आणि सावकार बाबूजी नाईकांचा स्नेह जुळला.राज्य चालविण्यासाठी कर्जाऊ रकमेची निरंतर व्यवस्था होण्याच्या दूरदृष्टीने बाळाजी विश्वनाथांनी आपल्या चारही अपत्यांचे विवाह सावकारी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात केले होते.बाळाजींची धाकटी कन्या ( थोरल्या बाजीराव पेशव्यांची धाकटी बहिण) भिउबाई हिचा विवाह इ.स.१७१२ मध्ये बाबुजींचा धाकटा भाऊ आबाजी पंत याच्याशी होऊन बाबूजी आणि बाळाजी एकमेकांचे सोयरे झाले.बाळाजी विश्वनाथ बाबूजी जोशींना आपल्या बरोबर विविध लष्करी मोहिमांत नेऊ लागले.नोवेंबर १७१८ रोजी औरंगाबादहून पन्नास हजार मराठी फौज सय्यद बंधूंच्या मदतीसाठी दिल्लीला रवाना झाली.सय्यद बंधूंच्या मदतीने मराठ्यांना चौथाई,सरदेशमुखी आणि स्वराज्याच्या अधिकृत सनदा मोगल बादशाह कडून मिळवायच्या होत्या.तसेच तीस वर्षे मोगलांच्या ताब्यात असलेल्या महाराणी येसूबाई आणि राजघराण्यातील अन्य सदस्यांची मुक्तता करून त्यांना स्वराज्यात आणायचे होते.बाळाजी विश्वनाथांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला कूच केलेल्या मराठी फौजेत अंबाजीपंत पुरंदरे,संताजी भोसले,परसोजी भोसले,पिलाजीराव जाधव,उदाजी पवार.बाळाजी महादेव फडणवीस,बाळाजी विश्वनाथांचे पुत्र बाजीराव,व्याही बाबूजी नाईक,शेख मीरा,नारो शंकर सचिव,चिमणाजी मोघे यासारखी विजीगिषु इराद्याची पराक्रमी मंडळी होती.महाराणी येसूबाई आणि राजघराण्यातील अन्य सदस्यांना घेऊन मराठी फौज २० मार्च १७१९ ला दिल्लीहून साताऱ्याच्या दिशेने निघाली.छ.शाहू महाराज आणि मातोश्रीं १२ वर्षांनी एकमेकांना भेटले!

प्रसंगी शत्रूची कबरही उद्ध्वस्त करणारे शिंदे*

 

प्रसंगी शत्रूची कबरही उद्ध्वस्त करणारे शिंदे*
मराठ्यांच्या शहान्नव कुळात मोडणार्या शिंदे घराण्याला प्राचीन इतिहास असून ते मुळचे सेंद्रक नावाने उदयास आले. सूर्यवंशी आणि नागवंशीय शिंदेचे देवक समुद्रवेल असल्याने त्यांचे सागरी परिसरातील साम्राज्य अधोरेखित होते. प्राचीन कालखंडात कर्नाटक, राजस्थान, खानदेश आणि देवगिरी परिसरात शिंदें घराण्याची सत्ता होती. शिवरायापासून स्वातंत्र्यापर्यंत शिंदे घराण्यातील अनेकांनी पराक्रमाची शर्थ करुन रुस्तूमराव, झुंजारराव, रविरावसारखे किताब मिळविले. शिंदें घराण्याचा झेंडा म्हणजे लाल रंगाच्या ध्वजावर सूर्यनारायण आणि बाजूला नागाचे चित्र होते. काळानुरुप शिंदेंच्या ताथवडकर, दसपटी, तोरगळकर, नेसरीकर, घेडवाडकर, म्हैसाळकर, कण्हेरखेडकर अशा अनेक शाखा तयार झाल्या. शिवरायांच्या प्रेमापोटी वेडात दौडलेल्या सात वीरांत विठोजी शिंदे अग्रभागी होते. तर छत्रपती शाहूंच्या पत्नी अंबिकाबाई शिंदेंच्या कन्या होत्या. आठराव्या शतकापासून कण्हेरखेडच्या वीरांनी शिंदे कुळाला वैभवाच्या शिखरावर नेले. राणोजीरुपाने कण्हेरखेडात उपजलेल्या वीराने स्वत:बरोबरच आपल्या जयाप्पा, दत्ताजी, जोतिबा, तुकोजी या पुत्रांना स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करायला प्रेरित केले. आपल्या डोळ्यादेखत बापासह चार भाऊ आणि पुतण्यांच्या मृत्यूनंतर महादजीबाबांनी शिंदे घराण्याला अजरामर केले. पानिपताच्या रणसंग्रामात शत्रूच्या घावाने कायमचे लंगडेपण आलेल्या महादजीने आपल्या घरातील आठ दहा विधवांचा सांभाळ करत जगाचाही संसार केला. पानिपत मैदानात देवदूत बनून आलेल्या राणेखानाला शिपायापासून थेट सेनापती बनवले. तर मूळचे रायमोहा येथील फकीर बीडचे शाहवली मन्सुरशाह महादजीपासून आजतागायत शिंदे घराण्याचे धार्मिक गुरु राहिलेले आहेत.
शिंदेंचे कण्हेरखेड म्हणजे वीरांची खाण, महादजीबाबांचे भाऊबंद साबाजी शिंदेंने राघोबासोबत पाकिस्तानच्या अटकेपार मराठ्यांचे झेंडे रोवले. त्यांचा नातू मानाजी म्हणजे तत्कालीन कालखंडातील भीम असून त्यांच्या अचाट पराक्रमाने मानाजीला फाकडा म्हटले गेले. पेशवेच नाहीतर इंग्रजही मानाजीला वचकून राहिले. नेमाजीही असेच पराक्रमी होते. महादाजीचे वारसदार दौलतराव शिंदे ग्वाल्हेरचा कारभार पहात असताना त्यांचे सासरे सर्जेराव घाडगेंनी किरकोळ कारणावरुन दौलतरावावर हात उचलताच मानाजीचा नातू आनंदरावाने भर दरबारात सर्जेरावाच्या खांडोळ्या केल्या होत्या. पानीपत युद्धात एकट्या कण्हेरखेडने आपले सोळा वीर खर्ची घातले, गावातील सोळखांबी स्मारक त्याची साक्ष आहे. पुण्यातील वानवडी, नगरजवळील श्रीगोंदा, जामगाव ही शिंदेंच्या जहागिरीची गावे आहेत.
दत्ताजी शिंदेंनी लग्नापूर्वीच हैद्राबाच्या निजामाला भिडून पराक्रम दाखविला होता. याशिवाय उत्तरेत मोहिम काढून राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश भागात मराठ्यांचा झेंडा फडकावत तेथील जाचक मुस्लिम शासकाला बाजूला सारून हिंदू जनतेला धीर दिला. रोहतकजवळील झज्जर गावात एकही मंदिर शिल्लक नसल्याचे दिसताच शिंदेंनी नव्याने मंदिराची उभारणी केली, त्याला आज बुढा शिवालय म्हटले जाते. या दत्ताजींनी उत्तरेतून परत येऊन नुकतेच लग्न केले होते. त्यावेळी बातमी समजली की, अफगाणिस्तानचा शासक अहमदशाह अब्दाली हिंदुस्थानवर चालून येतो आहे. हळदीच्या अंगाने दत्ताजी अब्दाली विरोधात लढत राहिले. ज्या बादशाहासाठी मराठे दिल्लीत गेले होते त्याचा कारभारी नजीबखान रोहिला अब्दालीला फितुर झाला होता. याच नजीबखानाने विश्वासघात केल्याने अब्दालीने दत्ताजीला बुरांडी घाटावर हालहाल करुन मारले. मृत्युशय्येवर असताना याच वाघाने शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून “ बचेंगे तो और भी लढेंगे” म्हणत दिल्ली परिसरात शिंदेकुळाचा उद्धार केला. याच दगाबाज नजीबखान रोहिल्यामुळे क्रूरकर्मा अहमदशाह अब्दाली हिंदुस्तानवर चालून आल्याने देशाच्या रक्षणासाठी मराठे पानिपतावर चालून गेले. 1761 साली पानिपत युद्धात महादजींच्या सख्या तीन भावासाह एकट्या कण्हेरखेड गावातील शिंदेंकुळातील 16 बहाद्दरांनी पानीपतवर बलिदान दिल्यानंतर महादजी हिंमतीने उभे राहिले.
दोनएक वर्षात वडीलासह चार भाऊ उत्तरेच्या राजकारणात बळी गेले. त्याचवेळी महादजीबाबा जबर जखमी होऊन मराठी मुलूखात परतले. पानिपत युद्धामुळे मराठी साम्राज्याला मोठा हादरा बसलेला होता. त्यामुळे स्वराज्याची घडी बसायला दहा वर्षाचा कालावधी गेला. यादरम्यान संपूर्ण हिंदुस्थानवर वेगळी छाप सोडणारे नेतृत्व म्हणून महादजी शिंदेंचा दबदबा निर्माण झाला. देशातील पहिली कवायती फौज उभी करुन त्यावर डी बॉयनसारख्या फ्रेंच सेनापतीची नियुक्ती केली. सोबत फ्रेंच, इंग्रज, जर्मन, डच, इटलीसारख्या प्रगत देशातील सैनिकांची भरती केली. याशिवाय रानेखान पठाणाच्या नेतृत्वात मराठी कुळातील सर्वांनाच त्यात सामील करुन घेतले. शिंदेच्या कारभाराचे ठिकाण आता ग्वाल्हेर झाल्याने उत्तरेच्या राजकरणात मराठ्यांचा टक्का वाढायला मदत झाली. याच डी बॉयनच्या फौजेचा मुक्काम आग्र्यात पडला असता त्याला ताजमहालच्या जतनाची कल्पना सुचली. त्यामुळे ताजमहालचे जतन अप्रत्यक्षरित्या महादजी शिंदेंनी केलेले आहे.
1771 ला दिल्लीच्या गादीवर शाहआलम दूसरा विराजमान असून नजीबखान रोहिल्यासह त्याच्या वंशजांनी बादशाहच्या नाकी नऊ आणले होते. नजीबखानाचा मुलगा झाबितखानाने दिल्लीत हैदोस घातल्याने शहाआलमने गादी सोडून इंग्रजांचा आश्रय घेऊन महादजीकडे मदतीची याचना करताच महादजीने दिल्लीत प्रवेश करुन शहाआलमला पुन्हा एकदा मोगलांच्या गादीवर बसवून 10 फेब्रुवारी 1771 ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचे भगवे निशाण फडकावून शिवरायांचे स्वप्न साकार केले. त्यानंतर झाबितखानाचा बंदोबस्त करण्यासाठी मराठे त्याच्या पाठलागावर गेले असता तो पत्थरगड किल्ल्यात जाऊन लपला. मधल्या काळात नजीबखान रोहिल्याचे निधन झाल्यानंतर याच किल्ल्यानजीक त्याची कबर बांधली होती. झाबीतखान महादजींना भिऊन पळून केल्यानंतर मराठ्यांची फौज नजीबखानाच्या कबरीकडे वळली. नजीबखानाच्या गद्दारीमुळेच दत्ताजीला वेदनादायक मृत्युला सामोरे जावे लागले होते. नजीबखानाची कबर दिसताच मराठ्यांचा राग अनावर होऊन त्यांनी त्याची कबर उद्धवस्त करत शिंदेंना भिडणार्या शत्रूला कबरीतून बाहेर काढून ते त्याला शिक्षा देतात हे जगाला दाखऊन दिले. दिल्ली आणि परिसराची नीट व्यवस्था लाऊन महादजी शिंदे मराठी मुलूखात परत आले.
पुढे दहा वर्षे दिल्लीचा बादशाह मराठ्यांच्या ओंजळीने पाणी पित होता. त्यानंतर नजीबखानाचा नातू गुलाम कादीर आजोबापेक्षा जास्त महत्वाकांक्षी निघून इसवी सन 1787 साली त्याने थेट शहाआलमवरच आक्रमण करुन त्याच्या छाताडावर बसून त्याचे डोळे काढून शाही परिवारातील बायकापोरांची बेअब्रू केली. तेव्हा पुन्हा एकदा महादजींच्या फौजेने दिल्लीवर धडक घेऊन बादशाहाला वाचविले. यावेळी बादशहाने खुश होऊन महादजीला अलिजाबहाद्दर आणि वकील ए मुतालिक या पदव्या दिल्या. गुलाम कादीरच्या बंदोबस्ताकरिता राणेखान गुलाम कादीरच्या पाठीमागे लागला, महादजींचा मुक्काम मथुरेत असता राणेखानाने गुलामला पकडून त्यांच्यासमोर उभे करण्यात आले. महादजीने गुलाम कादीरचे हातपाय काढून झाडाला उलटे टांगले. बादशाहाच्या विंनंतीवरुन नंतर त्याचे डोळे काढण्यात आले. यावेळी बादशाहने मराठ्यांचे विशेष आभारतर मानलेच शिवाय महादजींच्या सांगण्यावरून 4 सप्टेंबर 1789 रोजी संपूर्ण राज्यात गोहत्याबंदीचे फर्मानही काढले. अशारितीने शिंदे घराण्याने दिल्लीलाही आपल्या मर्जीप्रमाणे वागविले. मथुरा, वृंदावन सारखी हिंदूची पवित्र स्थाने आपल्या ताब्यात आणली. ग्वाल्हेरच्या रूपाने संपूर्ण उत्तर भारतात शिंदेंचा वचक बसला. एका बाजूला मुस्लिम फकिराला आपल्या गुरुस्थानी मानणार्या शिंदेंनी प्रसंगी उद्दाम वागणार्या मुस्लिम राज्यकर्त्यांना वठणीवरही आणले. त्यामुळे भाईचारा काय असतो हे शिंदे घराण्याकडे पाहून शिकावे.
Dr.satish kadam
With thanks
Satish Kadam sir
Tuljapur

मराठाशाहीतील पराक्रमी मराठा घराणे 'नागपूरकर भोसले' भाग ३




मराठाशाहीतील पराक्रमी मराठा घराणे
'नागपूरकर भोसले'
भाग ३
ओरिसा आणि मांडलिक संस्थाने- हा प्रांत सध्याचे बालासोर, कटक आणि जगन्नाथपुरी हे तीन जिल्हे मिळून होता. जगन्नाथाचे देऊळ या प्रांतात असल्यामुळे या भागाला विशेष महत्त्व होते. त्याकाळी ओरिसातील महानदीच्या काठाकाठाने कटकवरून रायपूर, रतनपूरास येऊन तेथून पश्चिमेस नागपुराला येण्याचा रस्ता होता. कटक प्रांत १८०३ पर्यंत भोसल्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर वऱ्हाडबरोबर हा प्रांत सुध्दा निजामाकडे व त्यानंतर इंग्रजांकडे आला.
चंद्रपूर- पूर्वी हा सुभा गोंडांच्या ताब्यात होता. पहिल्या रघुजीने तो मिळवला. या सुभ्यात चांदा जिल्हा, औंढी, अंबागड चौकी या जमिनदाऱ्या व माणिकदुर्गचा किल्ला येत असे. नागपूरच्या खालोखाल या प्रांताला किंमत होती. तेथे बरेच उद्योगधंदे आणि व्यापार चालत असत. त्याकाळी दक्षिणेकडून येणारा नारळ, सुपारी, मीठ इत्यादी माल प्रथम येथे येत असे. मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे वऱ्हाडातून कापूसही येत असे. चांदा येथे विणकर लोकांची मोठी वस्ती होती. येथील कापड देश-विदेशात पोहोचत असे.
छत्तीसगड सुभा- यामध्ये छत्तीस लहान-मोठे किल्ले व गढया येत होत्या. त्यात फक्त रायपूर आणि रतनपूर ही मोठी शहरे आणि भोवतालचा मुलूख हा खूप महत्वाचा आणि उत्पन्नाचा भाग होता. बाकीचा मुलूख जंगली व नापिकीचा असल्यामुळे त्यातून फारसे उत्पन्न येत नसे. राज्याच्या वाटणीत हा सुभा बिंबाजीला मिळाला होता. ते स्वतः रतनपूरला रहात असत. पण ते सगळ्यात नाराज होते. कारण हा भाग नुसता तांदूळ पिकवणारा असून दुसरे काही उत्पन्न नव्हते. १७९० मध्ये सिरगुजा हे डोंगरी संस्थान भोसल्यांच्या लष्कराने घेतले होते. यामध्ये सिरगुजा, जसपूर व उदेपूर यांचा समावेश होता. येथून भोसल्यांना तीन हजार रुपये खंडणी मिळत होती. काशी, गया, मिर्झापूर व बंगाल प्रांतातून नागपुरास येण्याचा रस्ता तेथून असल्यामुळे तो सांभाळून त्याची आवकजावक करण्याची जबाबदारी सिरगुजाच्या मांडलिकावर होती. कोरिया हे लहानसे संस्थानही छत्तीसगड सुभ्यात होते.
संबलपूर- हे संस्थान भोसल्यांचे मांडलिक म्हणून होते. आजूबाजूला दहा ते पंधरा लहान संस्थाने होती. याशिवाय बस्तर हे मोठे संस्थान व कांकर व कालाहंडी ही लहान संस्थानेही या सुभ्यात मोडत असत. १८०३ च्या देवगावच्या तहाने भोसल्यांना या सर्व संस्थानांवर पाणी सोडावे लागले.
रघूजीराजे भोसले प्रथम- नागपूर साम्राज्याचे मराठा शासक
📷
(चित्रस्रोत: विकिपीडिया)
विदर्भाचे आद्य इतिहासकार कै.यादव माधव काळे म्हणतात-
मराठी साम्राज्यात अगर हिंदुस्थानातील दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांच्या ताब्यात यावेळेस एवढ्या मोठ्या विस्ताराचा प्रदेश नव्हता. "रघुजी भोसल्यांच्या अंगी पहिला रघुजी अगर महादजी शिंद्यांप्रमाणे धडाडी, पराक्रम, बुद्धिबळ व संघटन चातुर्य असते तर तो संपूर्ण हिंदुस्थानातील अत्यंत प्रबळ असा संस्थानिक झाला असता व हिंदुस्थानच्या राजकारणात त्याचा शब्द निर्णायक ठरला असता!"
सामान्यपणे मध्य भारतातील तत्कालीन विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातील जबलपूर, शिवनी, गढा-मंडला, छपरा, रेवा, सिरगुजा, होशंगाबाद, बैतुल हा प्रमुख भूभाग, छत्तीसगडमधील रायपूर, रतनपूर व ओरिसा-कटक हे प्रांत नागपूरकर भोसल्यांच्या नियंत्रणाखाली होते. जो रेसिडेंटच्या माध्यमातून हळूहळू ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली जाऊन पुढे ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला.
संदर्भ/माहितीस्रोत:
नागपूर राज्याचा अर्वाचीन इतिहास-डॉ. श.गो.कोलारकर, गो.मा.पुरंदरे, विकासपीडिया, विकिपीडिया

 

मराठाशाहीतील पराक्रमी मराठा घराणे 'नागपूरकर भोसले' भाग २

 



मराठाशाहीतील पराक्रमी मराठा घराणे
'नागपूरकर भोसले'
भाग २
जॉर्ज फॉस्टर या इंग्रज वकिलाने भोसल्यांच्या राज्याचे सविस्तर वर्णन केले आहे. दुर्दैवाने मराठ्यांनी अशी माहिती कुठे लिहून ठेवल्याचे दिसत नाही. फॉस्टर म्हणतो-
"भोसल्यांचे मुलुखाची उत्तरेकडील सरहद लखनादौनच्या उत्तरेस चार कोसांवर शेरनदी ही आहे. पलिकडेस काल्पीचे बाळाजीचा म्हणजे गोविंदपंत बुंदेल्याचा मुलगा बाबाजी गोविंद खेर याचा मुलूख आहे. पूर्वेस रतनपूरच्या प्रदेशापर्यंत तसेच संबलपूर व इतर संस्थाने धरून कटकपर्यंत त्यांचा अंमल आहे. दक्षिणेस गोदावरीच्या उत्तरेस दहा कोसापर्यंत भोसल्यांचा अंमल चालतो. पश्चिमेस सर्व वऱ्हाड प्रांत भोसल्यांच्या अंमलाखाली आहे. एकंदरीत दक्षिणेस गोदावरीपासून उत्तरेस नर्मदेपर्यंत त्यांचा अंमल आहे."
इ.स. १८०० हा नागपूरकर भोसल्यांच्या वैभवाचा अत्युच्च काळ समजला जातो. याकाळात नागपूरच्या भोसल्यांची सत्ता उत्तरेस नर्मदेपासून ते दक्षिणेस गोदावरी पर्यंत आणि पश्चिमेस वऱ्हाडपासून ते पूर्व दिशेला पूर्व समुद्र किनाऱ्यापर्यंत कायम झाली.
भोसल्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्र इ.स.१८००👇
दुसऱ्या रघुजीच्या काळात झालेल्या इंग्रज-मराठा युद्धात भोसल्यांनी १७ डिसेंबर १८०३ चा 'देवगावचा तह' स्वीकारला. या तहानंतर मात्र कंपनीने भोसल्यांच्या मोठ्या भूभागावर नियंत्रण मिळवले होते. यात नर्मदेच्या उत्तरेकडील जबलपूर, धामोनी दक्षिणेकडील मंडला, शिवनी, होशंगाबाद, बैतुल, मूलताई तसेच विदर्भातील गाविलगड, नरनाळा तर पूर्वेस संबळपूर, सिरगुजा या भागांचा समावेश होता. भोसल्यांच्या अखत्यारीत फक्त नागपूर, चंद्रपूर, छत्तीसगड व वैनगंगेचा प्रदेश हा भूभाग राहिला.
त्याकाळातील रघुजी भोसल्यांचे राज्य आणि उत्पन्न असे होते.
१. देवगड प्रांत (नागपूरसह) - ३० लक्ष
२. गढा मंडला - १४ लक्ष
३. होशंगाबाद, शिवनी, माळवा, चौरागड - ७ लक्ष
४. मुलताई - २ लक्ष
५. वऱ्हाडचे निम्मे उत्पन्न, गाविलगड, नरनाळा - ३० लक्ष
६. ओरिसा व मांडलिक संस्थाने - १७ लक्ष
७. चंद्रपूर - ५ लक्ष
८. छत्तीसगड व मांडलिक संस्थाने - ६ लक्ष
देवगड- यामध्ये छिंदवाडा, बालाघाट हे घाटावरील मुलुख तसेच नागपूर, भंडारा वगैरे घाटाखालचा मुलुख यांचा समावेश होता. हा सर्व प्रदेश देवगडच्या 'बख्तबुलंद' या गोंड राजाचा होता. तो पहिल्या रघुजीने मिळवला होता. या सुभ्यात शिवनीचा पठाण जहागीरदार व खैरागड, राजनांदगाव, छुईखदान वगैरे मांडलिक येत होते.
गढा मंडला- हे गोंडांचे सर्वात जुने असलेले राज्य तेव्हा सागरच्या मराठ्यांच्या ताब्यात होते. या मुलुखाकरिता भोसल्यांचा आणि पेशव्यांचा अनेक दिवस झगडा सुरू होता. परंतु खर्ड्याच्या लढाईनंतर हा मुलूख भोसल्यांच्या ताब्यात आला.
होशंगाबाद, शिवनी, माळवा, चौरागड- होशंगाबाद हे नर्मदेच्या उतारास असलेले मोक्याचे ठाणे होते. ते भोपाळच्या नबाबाच्या मूळ पुरुषाने देवगडच्या राजापासून लष्करी मदत देण्याचे कबूल करून मिळवले होते. १७९६ मध्ये दुसरा रघुजी भोसले याने तेथील किल्ला लढून मिळवला होता. १७९९ मध्ये नर्मदा ही भोसल्यांची सरहद्द ठरली. इंग्रजांकडे आल्यानंतर मात्र तेथे लष्कराची छावणी कायमचीच झाली.
मुलताई, बैतुल, बदनूर - हा भाग मूळ 'देवगड' राजाचा भाग होता. मुलताई येथे भोसल्यांनी एक सुभेदार नेमला होता. या भागांत सावळीगड, भवरगड, खेरडा इत्यादी डोंगरी किल्ल्यांचा समावेश होता.
गाविलगड व नरनाळा- हे दोन्ही किल्ले पहिल्या रघुजीने १७५१ मध्ये जिंकून घेतले होते. याचे सर्व उत्पन्न भोसल्यांना मिळत असे. त्यावेळी साठ-चाळीस असा उत्पन्नाचा प्रकार नव्हता. नरनाळ्याचा किल्लेदार अकोट येथे राहत होता. १७७५ मध्ये निजामाने हे किल्ले मुधोजीकडून घेतले होते. पण मुधोजी एलिचपूरला गेल्यावर त्याने ते किल्ले परत मिळवले. गाविलगड येथे अडचणीच्या वेळी भोसले आपला खजिना ठेवत असत. १८०३ च्या तहाने बाकीचा वऱ्हाड निजामाच्या ताब्यात आला, पण गाविलगड भोसल्यांकडेच होता. पुढे १८१८ मध्ये झालेल्या तहानुसार तो आप्पासाहेबांकडून इंग्रजांकडे आला.

मराठाशाहीतील पराक्रमी मराठा घराणे 'नागपूरकर भोसले' भाग १

 



मराठाशाहीतील पराक्रमी मराठा घराणे
'नागपूरकर भोसले'
भाग १
'नागपूरकर भोसले' हे महाराष्ट्रातील मराठी अंमलातील एक पराक्रमी मराठा घराणे होते. असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी 'हिंदवी स्वराज्याची स्थापना' केली तर नागपूरकर भोसल्यांनी 'हिंदवी स्वराज्याचा विस्तार' केला. एके काळी थेट ओरिसापर्यंत नागपूर राज्याची सीमा पसरली होती.
तसं बघितलं तर भोसल्यांच्या काळात असलेला 'नागपूर प्रांत' कोणत्याही दृष्टीने एकजिनसी नव्हता. भौगोलिक रचना, भाषा आणि पूर्वेतिहास सर्व भिन्न होते. नागपूरकर भोसले व पुढे इंग्रजांच्या काळात वेगवेगळे प्रांत आणि मुलुख त्यांच्या वर्चस्वाखाली येत गेले व ते नागपूर प्रांताचा भाग बनले!
पहिला रघुजी
बंगाल आक्रमणानंतर पहिला रघुजी याने 'देवगड' हे गोंड संस्थान आपल्या नियंत्रणाखाली घेऊन खालसा केले. त्यानंतर चंद्रपूर, नरनाळा, गाविलगड, माणिकदुर्गही ताब्यात घेतले. तसेच नागपूर-बंगालला जोडणारा छत्तीसगड हा भागही आपल्या नियंत्रणाखाली आणला. इ.स. १७४५ च्या दरम्यान रायपूर, संबलपूर, रतनपूर या छोट्या राज्यांसह छत्तीसगडही घेतले. उत्तर हिंदुस्थानात स्वारी करून 'गढा-मंडला' या प्रांतावर देखील आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
याशिवाय बिहार व बंगालची चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा मिळून सुमारे ४०% उत्पन्नाचा भाग रघुजीस मिळत असे. रघुजी भोसल्यांनी आपले राज्य शून्यातून निर्माण केले होते. केवळ एका माणसाने इतका मोठा राज्यविस्तार क्वचित केलेला आढळतो. रघुजी भोसले यांना त्याकाळच्या मराठे सरदारात एका दृष्टीने सर्वात श्रेष्ठ सरदार म्हणावे लागेल.
नगरधन हा ‘भुईकोट’ प्रकारातील एक किल्ला आहे. भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यात असलेला हा किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे.रामटेकपासून वायव्येस सुमारे ७ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.इ.सनाच्या ४थ्या शतकात ही जागा ‘नंदीवर्धन’ म्हणुन ओळखल्या जात होती.नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे.
रघुजींनी बांधलेल्या वाकाटककालीन 'नगरधन' किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार.👇
(हा नागपूर जिल्ह्यात असलेला ‘भुईकोट’ प्रकारातील एक किल्ला असून रामटेकपासून वायव्येस ७ कि.मी. अंतरावर आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास प्राचीन इतिहास आहे. इ.स.च्या चौथ्या शतकात ही जागा ‘नंदीवर्धन’ म्हणून ओळखल्या जात होती. नगरधन हा नंदीवर्धनचा अपभ्रंश आहे.)

विठ्ठल सुंदर परशुरामी

 


विठ्ठल सुंदर परशुरामी
मूळचा संगमनेरचा विठ्ठल सुंदर परशुरामी. प्रचंड हुशार आणि पराक्रमी होता. हैद्राबादच्या निजामाच्या दरबारात रामदास पंतांच्या वशिल्याने याचा प्रवेश झाला होता. तिथे आपल्या कर्तबगारीने मोठे नाव कमावले. हिंदू ब्राम्हणसमाजातील असूनही मुस्लिमाचा वरचष्मा असलेल्या निजामाच्या दरबारात त्याला मोठे महत्व प्राप्त झाले.
जेव्हा राघोबादादा यांनी पेशवाई बळकवण्याचे प्रयत्न सुरु केले तेव्हा चुलत्या पुतण्यांतील भांडणाची ही संधि साधून पेशव्यांचे राज्य उलथून पाडण्याचा विठ्ठल सुंदरनें प्रयत्न केला. त्यासाठी सातारच्या राजाराम महाराजांच्या जागी नागपूरच्या जानोजी भोंसल्याच्या हस्तें मराठेशाहीचा राज्यकारभार चालवावा व पेशव्यांनां हांकलून द्यावें असा बेत त्यानी बनवला.
साडेतीन शहाण्यापैकीच एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांच्या मार्फत जानोजी भोसले यांना पेशव्यांच्या विरुद्ध तयार केले. रघुनाथरावांच्या कारस्थानामुळे असंतुष्ट असणारे मोरोबा फडणीस, सदाशिव रामचंद्र शेणवी, गोपाळराव पटवर्धन वगैरे सरदारही पेशव्यांविरुध्द फितूर झाले. त्यांच्या बळावर निजामानें पुण्यावर चाल करून पुणें लुटलें व जाळले…
विठ्ठल सुंदर हे पेशवाईचे शत्रू होते मात्र ते मोठे बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी होते. त्यांनीच निजामअल्लीला गादी मिळवून दिली होती. ते लष्करी डावपेंचांतहि निष्णात होते. हैद्राबादच्या मुस्लिम राजवटीत विठ्ठलपंताना मोठा मान होता. त्यांना राजाबहादुर प्रतापवंत हा किताब दिला असून निजामशाहींत त्याची जहागीर ”गणेश” या नांवानें ओळखली जात होती.

Thursday 25 May 2023

बेलसर-पुरंदरची लढाई

बेलसर-पुरंदरची लढाई.. स्वराज्यस्थापनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात झालेली मोठी लढाई.. फत्तेखानाने पुरंदरवर हल्ला केला. मराठ्यांची फौज निब्बर तडाखे देत होती. मुसेखानाला पाहून गोदाजीराजे जगताप यांनी त्याच्या छातीत भाला खुपसला, तरी तो लढण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून गोदाजीराजेंनी त्याला उभा चिरला.. खांद्यापासून कमरेपर्यंत..

अफजलखान वध झाल्यावर शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यापर्यंत मुलुख मारला. विजापूर अस्वस्थ होते. काहीतरी उपाय करावा म्हणून रुस्तुमेजमाला ससैन्य महाराजांवर हल्ला करण्यासाठी रवाना केले. कोल्हापूरनजीक लढाई झाली.. अफझलखानाला मातीत गाडल्याच्या महिन्याभरात झालेली लढाई.. मैदानात आदिलशाही सैन्य उर फुटेस्तोवर पळत होते. शिवछत्रपती स्वतः युद्धाचे नेतृत्व करत होते.

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला, मिर्झाराजे जयसिंह यांच्या छावणीत शिवाजी महाराजांची गाठ पडते निकोलाओ मनूची सोबत.. शिवाजी महाराज आणि मनूची एकमेकांसोबत गप्पा मारतात. त्याच्या वेशभूषेविषयी चौकशी करतात, मनूचीच्या धर्माविषयी शिवाजी महाराज जाणून घेतात. मनूची लिहितो, शिवरायांची अशी समजूत होती, की तत्कालीन युरोपात पोर्तुगालच्या राजशिवाय दुसरा कुणी श्रेष्ठ राजा नसावा.

सुरतेच्या दुसऱ्या स्वारीहून परत येताना कांचनबारीच्या आसपास मोगलांचे सैन्य आडवे आले. समोर पसरलेल्या विस्तीर्ण मैदानात आपण मराठयांना सहज मारू शकू, हा फाजील आत्मविश्वास मोगलांकडे होता. पण वीरश्री म्हणजे शिवछत्रपती.. दहा हजार सैनिकांचे नेतृत्व करत स्वतः शिवराय दोन्ही हातात पट्टे चढवून उभे होते.

 आता विचार करा, हे जे घडलंय ते तसंच दाखवायचंय.. म्हणजे कांचनबारीच्या युद्धात दहा हजार सैनिकांच्या समोर आपला राजा उभाय.. दोन्ही हातात पट्टे चढवले आहेत आणि थोड्याच वेळात महाराजांचा पांढरा अंगरखा रक्ताने भरलाय, चेहऱ्यावर रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत, पट्ट्याच्या पात्यावरून कित्येक जणांचे रक्त ओघळत आहे..

तिकडे पुरंदरच्या लढाईत वाघासारख्या काळजाच्या गोदाजीराजेंनी आपल्या हातातल्या तलवारीने मुसेखान उभा चिरलाय.. खांद्यापासून कमरेपर्यंत त्याचे दोन भाग केलेत.. छातीत घुसलेला भाला उरलेल्या शरीरासोबत तसाच लटकतोय.. आजूबाजूला लढत असलेल्या मोगल सैनिकांनी ते दृष्य बघितलंय आणि त्यांची परिस्थिती काय झाली असेल, याचा आपण फक्त विचार करायचा..

रुस्तुमेजमासोबतच्या लढाईत महाराज मैदानात उतरून युद्ध करतायत. महिन्याभराखाली आपल्या मालकाने असा माणूस फाडलाय, ज्याचं नाव घेतलं तरी दक्खनच्या पोटात भीतीचा गोळा येत असे. काय हिम्मत असेल त्यावेळी प्रत्येकात, काय जोश असेल.. काय मर्दानी तडाखे बसले असतील आदिलशाही सैन्याला..

निकोलाओ मनूची सोबत बोलताना एक जाणकार राजा म्हणून शिवराय दिसतात.
राज्याभिषेकाच्या धामधुमीत सुद्धा गडावर आलेल्या हेन्री ओक्झेंडनची राहण्याची-खाण्याची व्यवस्था करण्याकडे महाराज जातीने लक्ष देतात, तेव्हा एखादा राजा किती चौकस असावा हे लक्षात येते.
सोन्याचांदीच्या नाण्यांचा होत असलेला पाऊस आणि कुंकूम-केशराने भरलेल्या रस्त्यावरून जेव्हा महाराज गोळकोंड्यात प्रवेश करतात, तेव्हा दक्खनेच्या स्वामींचा रुबाब आपल्याला लक्षात येतो..
आपला मुलगा पालथा जन्माला आला म्हणून अपशकुन म्हणणाऱ्यांना 'एक दिवस दिल्लीची पातशाही पालथी घालेल' असे उत्तर देत महाराज केवळ शांत करत नाहीत, तर आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय आणि आपल्या पोराचे उत्तरदायित्वसुद्धा सांगून टाकतात. (विशेष म्हणजे राजाराम महाराज ते पूर्ण करण्यासाठी वयाच्या 19व्या वर्षांपासून मैदानात उतरतातसुद्धा..)

किती मोठा कॅनव्हास आहे हा.. शिवरायांच्या आयुष्यात कितीतरी रंग आहेत. कितीतरी काळीज पोखरणारे, उर्मी जागवणारे, रक्त सळसळ होण्यास मजबूर करणारे प्रसंग आहेत.. हे जे काही घडलंय ते इतकं रोमांचक आहे, की आहे तसंच दाखवलं तरी कोणत्याही एक्शन-मसाला चित्रपटाला सहज धूळ चारेल..
त्यासाठी उचलेगिरी करून, अनैतिहासिक प्रसंग दाखवण्याची काय गरज?
शिवाजी महाराजांविषयी असलेल्या आदरातून कोणत्याही गोष्टीची निर्मिती होते, हे मान्य.. पण ते करत असताना आपण नकळतपणे महाराजांचा अनादर तर करत नाही ना याची चाचपणी कधी करणार?

ज्या दरबारात साधे वर मान करून बघणे शक्य नव्हते, बोलणे तर लांबीची गोष्ट.. जागेवर गर्दन मारायला नंग्या तेगी घेऊन उलट्या काळजाचे हशम उभे असायचे.. त्या दरबारात मराठ्यांचा राजा डरकाळी फोडून आलाय, "तुम देखा, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारा पातशाह देख्या । मै तुम्हारी मनसीब छोड्या । मेरा सिर काटके ले जावो तो ले जावो, मै पातशाहकी हजुरी नहीं चलता ।"

पण हा स्वाभिमानी बाणा बाळगणारा राजा दाखवण्यासाठी नसलेल्या कुबड्या घेण्याची काय गरज?
खरा इतिहास दाखवणे होत नसेल तर चित्रपट नाही बनवले तरी चालतील. चित्रपट मनोरंजन म्हणून पाहावा, असं कितीही म्हणलं तरी त्याच चित्रपटांमध्ये दाखवलेली छबी कायमस्वरूपी मनावर उमटते. चारेक वर्षांखाली शिवरायांच्या इतिहासावर असे किती चित्रपट आले होते? तरी भारताच्या कानाकोपऱ्यात शिवछत्रपतींचे नाव माहीत होते.

आणि जे आजकाल छाती पुढे काढून सांगत आहेत, की महाराजांचा इतिहास जगात पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.. त्यांच्या माहितीसाठी,
सतराव्या शतकात जगात प्रसिद्ध होणारा पेपर म्हणजे 'लंडन गॅझेट'.. युरोप, उत्तर अमेरिका आणि आशिया खंडात ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांच्या वखारी होत्या, तेथे हे वृत्तपत्र प्रकाशित होत असे.. त्या गॅझेटमध्ये शिवाजी महाराजांचे नाव छापून आले होते, ज्यात महाराजांचा उल्लेख केला होता,
"Sivagee, the grand rebel, who defeated Moguls, in several battles, remains almost matter of that countrey.."
शिवछत्रपती जिवंत होते, तेव्हाच जगभर त्यांच्या पराक्रमाचा दरारा पोचला होता.

लेकहो, महाराजांच्या नावाचा वापर करून आपण स्वतःला जगभर पोचवतोय.. शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान इतिहासाला आपल्यासारख्या दुबळ्या कुबड्यांची गरज नाही.

केतन पुरी


Wednesday 24 May 2023

करवीर छत्रपती संभाजीराजे

 


करवीर छत्रपती संभाजीराजे
२३ मे १६९८ रोजी करवीर छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म छत्रपती राजाराम महाराज व राजसबाई याांच्या पोटी झाला.
शिवछत्रपती यांचे दोन पुत्र छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज .छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराज मराठ्यांचे छत्रपती बनले.याचवेळी सन १६८९ साली शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या राणी येसूबाई व पुत्र शाहू राजे रायगडावर मोगलांचे कैदी बनले. छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यु स.१७०० साली घडून आला.राजाराम महाराजांना चार पत्नी व दोन पुत्र होते.महाराणी ताराराणी यांच्या पोटी जन्मलेले शिवाजी राजे व तिसर्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी जन्मलेले संभाजी राजे .राजाराम. महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणीने आपले पुत्र शिवाजीराजे यांना गादीवर बसवले.आणि स.१७०० पासून १७१४ पर्यंत हिंदवी स्वराज्याचा कारभार केला. १७०७ मधे औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतर मोगलांच्या कैदेतून सुटून छत्रपती शाहू महाराज स्वराज्यात आले.त्यांचा व ताराराणी यांचा झगडा होऊन त्यांनी साताऱ्यात आपली गादी स्थापन केली. तिकडे पन्हाळ्यास तारांराणींनी राजधानी करून वारणेच्या दक्षिणेकडील प्रदेशात आपला अंमल जारी ठेवला. त्यांचे हे राज्य करवीरचे राज्य अथवा कोल्हापूरचे राज्य म्हणून प्रसिद्धीस आले.
या राज्याचा कारभार करीत असताना अचानक ताराराणीच्या मनोरथाना प्रचंड हादरा बसला. तो खुद्द राजघराण्यातील घटनांनी. या घटना अत्यंत वेगाने घडत होत्या. याची चाहूल मात्र ताराराणीना लागली नाही. या घटनांची परीनीती नाट्यपूर्ण सत्तांतरामुळे झाली .या सत्तांतरामुळे ताराराणी व त्यांचे पुत्र शिवाजी राजे यांना पन्हाळ्यावर राजकैदेत पडावे लागले.छत्रपती राजाराम महाराज व राजसबाई यांचे पुत्र संभाजीराजे स.१७१४ पासून कोल्हापूर राज्याच्या गादीवर बसले. आणि नवी राजवट सुरू झाली.
या संघर्षाच्या ठिणग्या राजघराण्याच्या बाहेर किंवा आत उडाल्याचे दिसत नाही. पन्हाळ्याच्या राजवाड्यात घडलेल्या घटनेला" रक्त शून्य सत्तांतर" असे म्हणता येईल. करवीर राज्याच्या संदर्भात हे सत्तांतर अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरले. ताराराणी सारख्या शूर स्त्रीच्या विरुद्ध जाऊन त्यांच्या हातातील सत्ता हस्तगत करणे सोपे काम नव्हते. सत्तांतराच्या संबंधी किंचित जरी शंका आली असती तरी ताराराणीने आपल्याविरुद्ध होणाऱ्या कारस्थानाचा संपूर्णपणे बिमोड केला असता .परंतु अचानक पणे सर्व पारडे फिरावे आणि एका पारड्यातील वजन दुसऱ्या पारड्यात जाऊन पडावे हे सारे केव्हा व कसे घडले यासंबंधी फक्त आश्चर्य वाटते .अशी ही सत्तांतराची घटना घडली .
छत्रपती संभाजीराजे यांनी १७१४ ते १७६० असे तब्बल ४६ वर्ष राज्य केले. एवढा प्रदीर्घ काळ राज्य करण्याची संधी यापूर्वी छत्रपती घराण्यात कोणालाच मिळाली नव्हती.या कालखंडात त्यांना त्यांच्या मातोश्री राजसबाई या कारभारात मदत करत होत्या. त्यांचा दरारा व शिस्त कोल्हापूर राज्याची अधिसत्ता बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरली.छत्रपती संभाजी महाराज यांची सर्वात ऊल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांनी छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्याशी केलेला वारणेचा तह .या तहात त्यांनी आपल्या राज्याची सीमा ठरवून घेतली. सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या एकत्र करण्या संबंधी स.१७१० साली केलेल्या करारात पुढच्या राजकीय घटना अतिशय दूरदर्शीपणाच्या व महत्त्वाच्या होत्या.छत्रपती संभाजी राजे स्वतःहा अनेक लढायात जातीने हजर रहात असत.
छत्रपती संभाजी महाराज यांचे एकंदरीत ७ विवाह झाले होते. यांच्या राज्यकारभारात त्यांच्या चौथ्या राणीसाहेब तोरगलकर शिंदे यांच्या घराण्यातील जिजाबाई यांचा अत्यंत महत्वाचा सहभाग होता.या जिजाबाई म्हणजे छत्रपती संभाजी राजांच्या महाराणी म्हणजे शिवछत्रपतींच्या नातसून व छत्रपती राजाराम महाराजांच्या धाकट्या सून होत्या.अत्यंत तेजस्वी, बुद्धीमान व विचारी अशा त्या राणी होत्या. शाहू महाराज निधन पावल्यानंतर छत्रपतीं संभाजीराजे यांनी साताऱ्याकडे फौजा वळवल्या होत्या. परंतु राणी जिजाबाईंच्या सल्ल्यावरून त्यांनी आपला मोर्चा मागे वळवला. ज्यावेळी संभाजीराजे साताऱ्यात जात त्या-त्या वेळी त्यांच्या पत्नी जिजाबाई त्यांच्याबरोबर असत. राज्य विस्तारासाठी आणि कारभारासाठी गुणी व्यक्तीचा संग्रह करण्याची दृष्टी छत्रपती संभाजीराजांकडे होती. छत्रपतीं संभाजी राजे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते .हे त्यांनी मंदिरांना व साधुसंतांना दिलेल्या सनदा पत्रावरून दिसून येते.सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीवर सन १७३२ साली छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्री बांधली होती .संभाजी राजेंनी एकूण सात लग्न केली होती . परंतु त्यांना पुत्रसंतती झाली नाही.
संभाजी महाराज यांनी १७१४
ते १७६० सालापर्यंत राज्य केले. ते करवीर संभाजी म्हणून इतिहासात प्रसिद्ध होते.सातारा व करवीर दोन पृथक मराठी राज्य स्थापन झाल्यापासून या दोन्ही राज्यात बरीच वर्ष सतत संघर्षाची भावना राहिली.
ताराराणीच्या कारकिर्दीतील वीरांचे संघर्षाचे धोरण सत्ताबदल होऊन छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले तरी बदलले नाही.शिवरायांनी ज्या हेतूने स्वराज्याची स्थापना केली, शंभूराजांनी, राजाराम महाराजांनी आणि ताराऊंनी ज्या हेतूने ते प्राणपणाने टिकवून ठेवले, तो हेतू , ती परंपरा, तो वारसा संभाजीराजांनी प्रभावीपणे जोपासला. शिवरायांनी सुरु केलेल्या प्रथा, राज्यकारभाराचे नियम, आदर्श हे संभाजीराजांनी पुर्णपणे अंगीकारले होते. "सार्वभौमत्व" हे मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याचे सर्वात मोठे मानचिन्ह होते. या सर्वभौमत्वासाठी लाखो वीरांनी आपले रक्त सांडले होते. स्वराज्याचे हे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचे काम राजारामपूत्र संभाजीराजे (दुसरे) यांनी केले.
२० डिसेंबर १७६० रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन झाले. निधनाची वार्ता समजताच नानासाहेब पेशवे यांनी राणी जिजाबाई यांच्या सांत्वनासाठी न येता राज्यावर फौजा पाठवून जप्तीचा हुकूम पाठवला.परंतु हुशार जिजाबाईंनी पेशव्यांच्या जप्तीचा डाव हाणून पाडला.जिजाबाई स्वतः फौजेचे नेतृत्व करत असत.जिजाबाई यांनी आपल्या अंगचे लष्करी नेतृत्वाचे गुण दाखवल्याचे इतिहासात अनेक ऊल्लेख आहेत.यथावकाश जिजाबाई यांनी शहाजी भोसले खानवटकर यांचे पुत्र मानकोजीस २२ सप्टेंबर १७६२ रोजी विधिपूर्वक दत्तक घेऊन त्यांचे नामरण छत्रपती शिवाजी असे ठेवून पुढील राज्यकारभार केला.
🙏अशा या थोर (करवीर) छत्रपती संभाजी महाराज यांना आमचा मानाचा मुजरा 🙏
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
( इतिहास अभ्यासक पुणे)

Tuesday 23 May 2023

#मोहिते आडनाव कसे पडले व त्यामागील इतिहास काय ?

 

#मोहिते आडनाव कसे पडले व त्यामागील इतिहास काय ?
  पोस्तसांभार :;धीरजराजे हंबीरराव
 





मुंबई व कोकणाचा अप्रसिद्ध शासक असणारा पौढप्रताप चक्रवर्ती हंबीरराव कोण?
मराठेशाहित #चव्हाणहंबीररावमोहिते लावण्याची परंपरा काय निर्देश करते?
सदरील लेख हा महाराष्ट्रातील इतिहास प्रेमींनसाठी व आभ्यासकांनसाठी समर्पित आहे स्वातंत्र्य पुर्व काळात 19व्या शतकाच्या सुरवातीस बर्याच अभ्यासकांनी मराठेशाहीचा आभ्यास करून आपले पुस्तक व त्याचे खंड प्रकाशित केलेले आहेत परंतु मोहीते घराण्यावर एकही पुस्तक नसुन बर्याच पुस्तकांत मोहित्यांचे लेख आलेले आहे त्यात सर्व आभ्यासकांनी ह्या घराण्याची साद्यंत्य हकिकत सापडत नाहि व ह्या घराण्याचा पुष्कळसा इतिहास उपलब्ध नाही अशी खंत व्यक्त केलेली आहे त्यात ग .ह खरे , वा. सी. बेंद्रे , द.ब.पारसनीस व अजुन ख्यातनाम आभ्यासकांनी मोहित्यांच्या संदर्भात खंत व्यक्त केलेली आहे.
1)मोहिते आडनाव कसे पडले व त्यामागील इतिहास काय ?
चौहाण राजवंशात थोर सम्राट पृथ्वीराज चौहाण महाराज होऊन गेले त्यांचा काहि शिलालेखांत महिपते अथवा महिपती असा उल्लेख मिळतो . त्यांच्या सातव्या पिढित राजस्थान मध्ये रणथंभौर येथे राजा जैत्रसिंह यांचे तिसरे पुत्र रावहम्मीरदेव झाले . उत्तर हिन्दुस्तानात व दक्षिणेत मुंबई व कोकण भागात त्यांचे बरेच शिलालेख उपलब्ध आहे त्यात त्यांना महिपते हा शब्द त्यांच्या नावासमोर आलेला दिसतो . शिलालेख बहोत असावे परंतु काळाच्या ओघात बरेच नष्टही झाले असावे . यात महत्वाचे असे आहे कि महिपते हे पद सम्राट पृथ्वीराजांनप्रमाणे त्यांचे वशंज हम्मीरदेखील लावत होते . महिपते ह्या शब्दाचा अर्थ महि+पते (पृथ्वीराजा) असा होतो . महिपते हे पद महाभारत काळानंर श्रीकृष्णांच्या नावपुढे लागलेले दिसते जे गुरू घराण्याचे प्रतिक आहे , रावहम्मीरदेव चौहाण यांच्या कालखंडात उत्तर हिन्दुस्तानातील महत्वाच्या सर्वच राजवंशाचे त्यांना राजकिय समर्थन प्राप्त होतेच त्यामुळे "हम्मीरमहिपती "असा उल्लेख त्या साधनांत व शिलालेखांत सापडतो. ह्याच महिपते शब्दाचा अपभ्रंश मुहिते व मोहिते असा होतो .इतिहासाचा आभ्यास करतांना विविध संभावणांच्या दिशा अनेक असतात पण त्यात अधिकृत दृष्टिने पुराव्यांचा आभ्यास केला असता महिपते ह्याच पदाचा मोहिते असा अपभ्रंश होणे पुर्ण संभाव्य आहे .
2)मुंबई व कोकणाचा अप्रसिद्ध शासक असणारा पौढप्रताप चक्रवर्ती हंबीरराव कोण?
मुंबई व कोकण भागात रावहम्मीरदेव यांच्या चौहाण साम्राज्याचा श्वेत ध्वज बुलंद होता असे समकालीन व उत्तर कालीन साधनांत व शिलालेखांत व इतर समकालीन राजांच्या साधनांतही मिळतो .हम्मीररायण ,हम्मीररासो,हम्मीरमहाकाव्य ,हम्मीरपुत्र आलाराज याचे रसरत्नप्रदिपिका हम्मीरहठ व महिकावतीची बखर असे अजुन बरेच ग्रंथ आहे त्यात महाराष्ट्र,कोकण माहिम असे उल्लेख सापडतात. त्याचे संदर्भ खाली दिलेले आहेत .रावहम्मीर यांच्या 16 प्रमुख युद्धांत कोकण देखील होतै हे स्पष्ट होते.
3)मराठेशाहित "चव्हाणहंबीररावमोहिते " लावण्याची परंपरा काय निर्देश करते?
शिवपुर्वकालापासुन ते आजपर्यंत मोहिते घराण्यात नावापुढे "चव्हाणहंबीररावमोहिते" आडनाव अथवा पद लावण्याची पद्धत आहे . बर्याच आभ्यासकांनी मोहिते हे हाडेचव्हाण असल्याचे नोंदवले आहे पण रावहम्मीरदेव यांचे चे वंशज निश्चित कुठे आहे हे बर्याच आभ्यासकांनी नोंदवले आहे ."चौहाणकुलकल्पद्रुम" या ग्रंथात रणथंभोरचे चौहाण प्रकरणात स्पष्ट लिहले कि पुढिल वंशज कुठे आहे हे ज्ञात नाही व हाडाचौहान प्रकर्णात हाडाचौहाण घराण्याचा संस्थापक राजाअस्थिपालचा वंशज देवीसिंह हाडा दर्शविला आहे त्यांच्या शाखा आज तारागढ बुंदी , कोटा , जत संस्थान इत्यादी आहेत त्यामुळे रावहम्मीरदेव हे हाडा चौहाण होते असे म्हणने इतिहासाची दिशाभुल ठरू शकते . जे आभ्यासक हाडा चौहाणांचा उल्लेख करतात त्याला आधार त्यांनी स्पष्ट केलेला नाही. रावहम्मीर यांच्या मृत्युनंतर अल्लाउद्दीन ने रणथंभोर व देवगिरी संपुष्टात आणली त्यामुळे ह्या घराण्यातील वंशज अर्थात राज्यकर्ते अस्थिर झाले असावे अथवा होते त्याकाळातील काही नोंदी व वंशावळ उपलब्ध आहे . रावहम्मीरदेव यांच्या वंशजांनी स्वतःस हंबीरराव अथवा हांबीरराव असे पद कायम केले .हेच हम्मीर महिपते होते अर्थात मोहिते हे पद व मुळ कुळी चव्हाण असल्यामुळे "चव्हाणहंबीररावमोहिते" हे पद वंशजांनी आपल्या नावापुढे लावल्याचे इतिहासात दिसुन येते . तालिकोटच्या लढाईत रंगराव चव्हाण मोहिते असे नाव बखर मध्ये येते निजामशाहि,बिरादशाहि, कुतुबशाहि, अदिलशाहि तयार होण्या पुर्वीपासुन ते पद लावण्याची परंपरा दिसुन येते . छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या सावत्र आई तुकाबाई साहेब ह्या हणगोजी चव्हाण मोहिते यांच्या कन्यका अशी नोंद काहि साधनांत उपलब्ध आहे व काहि आभ्यासकांनी तसे मांडले आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहलेला ग्रंथ "शिवभारत" ह्या ग्रंथात 13 वा श्लोकात भातवडिच्या लढाईत मोहिते घराण्यातील पुरूषास "चव्हाणहंबीरराव" व जाधवराव घराण्यातील लखुजीराव जाधवराव यांच्यासाठी "यादवराज " असे मुळ पद लावलेले दिसते .सरसेनापती हंसाजी मोहिते यांना राज्याभिषेकानंतर शिवाजीमहाराज यांनी हंबीरराव नावाने गौरव केला त्यामागे देखिल हि हकिकत होती तो किताब दिलेला नसावा तो गौरव असावा.
चव्हाण म्हणजे चौहाणवंशीय हंबीरराव म्हणजे हम्मीरचे वंशज मोहिते म्हणजे महिपते अर्थात राजे त्यामुळे ह्या पदास मराठेशाहित प्राचीन राजकुळाची समृद्ध वंशपरंपरा निर्देश करण्यासाठी लावल्याचे दिसते नावत इतिहास असतो ते यालाच म्हणतात असे "चव्हाणहंबीररावमोहिते" पदास म्हणणे वावगे ठरणार नाही .
टिप : सदरील घराण्यावर आभ्यास व पुस्तक लिखाण चालू आहे ह्या पोस्टचा उद्देश घराण्याची मुलभुत माहिती इतिहासप्रेमींनपर्यंत पोहचावी व त्यांना आभ्यासासाठी प्रेरीत करावे हा आहे .ह्या लेखात केलेले प्रश्न व त्याचे उत्तर स्पष्ट दिलेले आहे यापेक्षा अधिकृत माहिती हि पुस्तकरूपानेच पुढे येईल .

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...