विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 August 2023

दिल्लीवर_ताबा_दरबाराची_नासधूस

 

मराठ्यांनी दिल्लीचा कब्जा मिळवला व बादशाही गादीवर वारस नेमून रोहल्यांचा पुढारी अहमदशहा अब्दालीच्या मागे लागले त्यावेळी सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी शिंदे, होळकर सरदारांचा विरोध असताना ही दिल्ली दरबारातील सोन्याचा व चांदीचा पत्रा काढून त्याची नाणी पाडली त्यामुळे जाट, शिख, रजपूत व इतर स्थानिक जहागीरदारांचा मराठ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला त्यांनी पुढील काळात मराठ्यांना कोणतेही सहकार्य न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली
सदाशिवराव भाऊ पेशव्यांना शिंदे, होळकर सरदारांचा उत्तरेकडच्या राजकारणात असलेला सहभाग व दरारा अजिबात पचला नव्हता त्यामुळे सदाशिवराव भाऊने शिंदे होळकरांचा कोणताही सल्ला न ऐकण्याचा जणू धडाकाच लावला होता मल्हारराव होळकर व जनकोजी शिंदे यांनी सदाशिवराव भाऊ पेशव्यांना सगळा कुटुंब कबिला माळव्यात एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवावा असा सल्ला दिला पण बळवंतराव मेहेंदळे याने भाऊंचे अगोदरच कान भरले होते मल्हारराव होळकरांचा हस्तक असलेल्या सुरजमल जाट यांना लुटून होळकरांचा उत्तरेकडचा दबदबा कमी करण्याचा कुटील डाव सदाशिवराव भाऊने आखला मल्हारराव होळकरांना समजताच त्यांनी सुरजमल जाटला निघून जाण्यास सांगितले त्याप्रमाणे पानिपतच्या लढाईच्या काही महिने अगोदर आपल्या १५ हजार फौजेसह सुरजमल जाट निघून गेला
यानंतर मराठ्यांनी कुंजपुऱ्याचा किल्ला ताब्यात घेतला यावेळी मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, दमाजी गायकवाड, समशेरबहाद्दर, इब्राहीमखान गार्दी, बळवंतराव मेहेंदळे, खिजरखान पठाण, पेशवा विश्वासराव यांनी मोठा पराक्रम गाजवला यात १५ हजार पठाणांचा धुव्वा उडला दत्ताजी शिंदेची हत्या करणारे नजिबखान व कुतुबशहा कैद झाले जनकोजी शिंदे यांनी कुतुबशहाचा वध केला आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण केली
संदर्भ_ पानिपतचा मुकाबला

मुलुखावेगळा राजा

 


मुलुखावेगळा राजा
छत्रपती शाहू महाराजांना थाटामाटात राहणे आवडायचे नाही. दरबारी कामकाज अथवा शाही समारंभ वगळता महाराज नेहमी साध्या पेहरावातच असायचे , तशीच महाराजांची जेवणाची पद्धतही अगदी साधीच होती. नवीन अथवा जुन्या राजवाड्यात जेवणाची पंगत असायची. प्रत्येक वेळी महाराजांबरोबर पन्नास ते शंभर लोक पंगतीमध्ये असायचे. पंगतीमध्ये सर्व लोक मांडी घालून बसायचे मात्र महाराजांना मांडी घालून बसता येत नसल्याने महाराजांसाठी लाकडी टेबल खुर्चीची सोय असायची. आठवड्यातील बहुतांश दिवस मांसाहारी जेवण असायचे मात्र ते सुद्धा मसाले न वापरता अत्यंत साध्या पद्धतीने केलेले असायचे. याबरोबर चार ते पाच भाकऱ्या असायच्या. जे जेवण महाराजांना तेच पंगतीमधील इतरांनाही असायचे. पंगतीमध्ये जेवण वाढण्यासाठी सोन्याची ट्रेन, चांदीची भांडी ताटाखाली मखमली कापड असा इतर राजांसारखा भपकेबाजपणा महाराजांना आवडायचा नाही.
हैद्राबादच्या निझामाने महाराजांना भेट म्हणून त्याचा शाही आचारी पाठवून दिला होता. महाराजांनी त्याला पदरी ठेवून घेतले मात्र हा आचारी निझामाच्या दरबारात असल्यासारखे जेवणामध्ये भरपूर प्रकारचे मसाले, काजू बदाम असा वेगवेगळ्या प्रकारचा मेवा घालून जेवण बनवू लागला. काही दिवसांनी महाराजांनी त्याला बोलावून घेतले व म्हणाले, " तु जेवण अत्यंत स्वादीष्ठ बनवतोस यात काही वाद नाही. पण मला इतक्या महागड्या जेवणाची सवय नाही शिवाय माझ्या रयतेचा पैसा मी माझ्या चैनीसाठी खर्च करावा हे छत्रपती म्हणून मला शोभणारेही नाही त्यामुळे तु तुझ्या धन्याकडे परत गेलेले बरे ! " निझामाचा शाही आचारी निझामाकडे परत गेला व पुन्हा एकदा राजाधिराज छत्रपतींच्या राजवाड्यामध्ये कोल्हापुरी जेवणाचा तडका सुरु झाला....
महाराजांना तो आचारी ठेवणे व दररोज चमचमीत भोजनाचा आस्वाद घेणे परवडणार नव्हते अशातला काही भाग नव्हता मात्र रयतेचा पैसा स्वतःसाठी वापरण्याची महाराजांची मानसिकता नव्हती. इतर राजा महाराजांच्या राजवाड्यात त्याकाळी व आजही शाही मेजवान्या असतात ज्याला Banquet म्हटले जाते. या मेजवान्यांसाठी खास भली मोठी दालने असायची. आजही आहेत! महागडे अन्नपदार्थ तर असायचेच मात्र जेवण वाढण्यासाठी सोन्या चांदीची भांडी वापरली जायची. अशा भपकेबाज थाटामाटाला महाराजांनी कधी थारा दिला नाही. आजपर्यंत छत्रपतींच्या दोन्ही राजवाड्यांमध्ये अशाप्रकारच्या खर्चिक शाही मेजवान्या झाल्या नाहीत. आजही छत्रपतींकडे कुणी खास पाहुणा आला तरी त्याच्यासाठीही अत्यंत साधे अस्सल कोल्हापूरी जेवणच बनविले जाते. स्वतःचे पुरेसे उत्पन्न असूनही जनतेच्या पैशांवर मिजास मारणाऱ्या आजच्या राज्यकर्त्यांनी महाराजांचा हा धडा गिरवणे खरंच खूप गरजेचे आहे.
Publish by -Kolhapur State

त्रिंबकराव मामा पेठे— भाग २

 


त्रिंबकराव मामा पेठे—
भाग २
त्याच्यावर भोंसले, फडके व मामा यांनां कारभार्यांनीं पाठविलें. त्यांची गांठ पंढरपुराजवळ कासेगांव येथें पडली. मामानें घाई व उतावीळ करुन दादावर हल्ला केला, त्यांत त्याचा मोड होऊन मामा फार जखमी होऊन पाडाव झाला (२६ मार्च १७७४). त्यावर बर्हाणपुराकडे शिंदे होळकरांची मदत घेण्यास दादा जात असतां वाटेंत पाडाव झाल्यावर दुसर्याच दिवशीं मामा वारला. आनंदीबाईनें मामाला पकडल्यावर त्याची फार निंदा केली; तेव्हांचें मामाचें सडेतोड उत्तर प्रसिद्ध आहे. मामाचा मुलगा विश्वासराव हा पुढें पेठ्यांच्या पथकाचा मुख्य झाला. त्याचा पुत्र अमृतराव हा पेशव्यांच्या दरबारीं कांही दिवस त्यांचा मुतालिक होता. त्याचा मुलगा त्रिंबकराव हा खडर्याच्या लढाईंत हजर होता. पेठ्यांनां मामांच्या कारकीर्दीतच ताराबाईनेंव पेशव्यानें सरंजामासाठी नेमणुका व जहागिरी दिल्या होत्या (१७४७,१७५७ इ.). मामाच्या वेळीं एकदंर सरंजाम मोठा होता. तो शेवटीं दुसर्या त्र्यंबकरावाच्या वेळीं १ लक्ष १५ हजारांपर्यंत राहिला. दोनशें स्वार बाळगण्याचा या त्र्यंबकरावाचा करार असे व त्याबद्दल सालिना ६० हजार रु. मिळत; ५० हजारांचें खासगत इनाम असे. रावबाजीनें पूर्वीचें वैर आठवून पेठ्यांचा सरंजाम सर्व जप्त केला (१८०३). इंग्रजी झाल्यावर इंग्रजांनींहि सरंजाम जप्तच करुन दुसर्या त्रिंबकरावास फक्त सालिना दोन हजारांचें पोलि. पेन्शन करुन दिलें. आपला सरंजाम परत मिळविण्याबद्दल या त्रिंबकरावानें केलेली खटपट इंग्रजांनीं चालू दिली नाहीं. पेशवाईंत पेठ्याकडे पुढील मान असत. छत्रपतीकडून जीं पेशवाईचीं वस्त्रें आणावयाचीं तीं यांनीं आणावीं. छत्रपती पुण्यास आल्यास त्यांची बरदास्त ठेवावी; दसर्याचीं ३०० रुपयांचीं मानाचीं वस्त्रें पेशव्यांकडून यास मिळत. सरकारांतून हत्ती, पालखीचा मान असे. पुणें येथें मामाचा वाडा कसबा पेठेंत तांबटाच्या हौदाजवळ होता. तो ७-८ वर्षांखालीं पडला. त्यांचा वंश सातारा जिल्ह्यांतील चिंधोली या त्यांच्या इनामगांवीं व नाशिक येथें असे. (वाड-कैफियती; भारतवर्ष शकावली; पेशव्यांची बखर; काव्य. इ.सं. शकावली; धाकटे राजारामचरित्र; राजवाडे खंड २,६; पत्रें यादी.).

त्रिंबकराव मामा पेठे— भाग १

 


त्रिंबकराव मामा पेठे—
भाग १
बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची मुलगी अनुबाई ही इचरलकरंजीकर व्यंकटराव नारायण यास दिली होती; त्यांची मुलगी वेणुताई ही त्र्यंबकराव मामाची बायको. या नात्यावरुन पेशवे घराण्यांत त्र्यंबकराव मामा असें टोपण नांव यास मिळालें व तेंच प्रख्यात झालें; शिवाय मामांची बहीण विमाजीआप्पा यांची पहिली बायको (रखमाबाई) होती, त्यामुळें यांचें पेशव्यांची तिकडूनहि हें नातें होतें. मामांचे वडील विसाजी कृष्ण पेठे हे नागरपूरकराच्या पदरीं होते, पुढें नागरपूरकरानें त्रिंबकराव विश्वनाथ यास आपला वकील म्हणून शाहूच्या दरबारीं ठेविलें होतें. नंतर पेशव्यांनीं त्यानां आपल्याकडे घेतलें.
शाहूच्या मृत्यूनंतर मामा हा पेशव्यांच्या कारभारांत त्यांचा मुख्य हस्तक होता. बाळाजी विश्वनाथाच्या नंतर बाजीरावास पेशवाई मिळवून देण्याच्या कामीं ज्यांनीं खटपटी केल्या त्यांत विसाजीपंत हेहि होते. पुरंदरे हे पेशव्यांचे पुण्याचे कारभारी असत. नानासाहेबांच्या वेळीं पुरंदरे (महादोबा) हा रुसला तेव्हां त्याच्या जागीं पेशव्यानें मामाला नेमिलें (१७५१ फेब्रु.); परंतु पुढें महादोबाजी समजूत झाल्यावर मामाला सातार्यास ताराबाईच्या बंदोबस्तास ठेविलें. मध्यंतरी ताराबाईचा व पेशव्यांचा समेट झाला. तरी पण ती आपला हेका (कारभार पहाण्याचा) सोडीना; ती पुण्यास आली असतां (आक्टोबर) मामा तिच्याबरोबर आला होता, परंतु बाईची समजूत पटली नाहीं म्हणून पुन्हां तिच्यावर देखरेख ठेवण्यास मामाला सातार्यास पाठविलें. दमाजी गायकवाडाचा सातार्यास गेंडेमाळावर पेशव्यांच्या सरदारांनीं जो पराभव केला, त्या सरदारांत मामा हे प्रमुख होते. थोरल्या माधवरावाच्या कारकीर्दीत मामानीं कर्नाटकावर स्वार्या केल्या होत्या. मामानें या स्वार्यांत (मुख्यतः मोती तलावाच्या) हैदराची खूप खोड मोडली. इतकी कीं पेशवे थेउरास फार अजारी असल्याचें ऐकून मामा परतले तरीहि हैदरानें २६ लक्ष खंडणी व १४ लक्ष स्वारीखर्च व कोल्हार वगैरे पांच प्रांत मामांच्या हवालीं केले. पेशव्यांच्या शेवटच्या दुखण्यांत मामा थेऊरासच होते. नारायणरांवाच्या खुनानंतर नदीवर ज्या मंडळींनीं (नाना, बापू, हरिपंत तात्या) नानासाहेबाचा वंश चालविण्याबद्दल गुप्तपणें शपथा घेतल्या त्यांत मामाहि होते. दादासाहेबांच्या कारकीर्दीत बारभाईच्या कारस्थानांत मामा प्रमुख होते. तेच यावेळीं सेनापति होते. दादानें त्याला घेऊन निजामावर स्वारी केली होती. पुढें कर्नाटकांत दादानें मोहीम केली, त्यावेळीं एक एक मंडळी त्याला सोडून पुण्यास आली. पुढें दादाला ही मसलत (बारभाईचें कारस्थान) समजल्यावर दादा परतला. मामाला भोंसल्यावर दादानें पाठविलें होतें. तो तिकडे न जातां दादावर स्वारी करण्याची वाट पहात बसला (१७७४ डिंसेंबर).

लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे भाग ३

 



लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे
भाग ३
कॅ. वासुदेव बेलवलकर यांनी लिहिले आहे, की खैबरखिंडीच्या पायथ्याशी असलेल्या जमरुड या किल्ल्यावर मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, केशवराव पानसे इत्यादींनी कबजा मिळविला. मराठी फौजा जवळजवळ काबूल नदीपर्यंत गेल्या होत्या, पलीकडून येणाऱ्या शत्रूच्या फौजांना हैराण करण्याचे काम या मराठी फौजेने केले. मानाजी पायगुडे यांची एकंदर कारकीर्द पाहता असे लक्षात येते, की मानाजी हे पेशव्यांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. त्यांचे आयुष्यातील आणखी एक प्रसंग म्हणजे त्यांच्या अपूर्व कामगिरीचा ‘कळस’ म्हणावा लागेल. पेशवे-पोर्तुगीज संबंधातील एक घटना. त्या वेळी गोव्यात मांडवीनदी काठावर मराठा पोर्तुगीज यांच्यात बोलणी चालू होती. नदीकाठी एका तंबूत दोन मराठा सरदार मराठय़ांचे वतीने बोलत होते. नारायण शेणवी नावाचा ब्राह्मण दुभाष्याचे काम करीत होता. मराठय़ांचे वकील म्हणून काम करणारे दोन सरदार होते. मानाजी पायगुडे व सयाजी गुजर! ही बाब सेतु माधवराव पगडी यांनी आपल्या ‘मराठे-पोर्तुगीज संबंध’ या आपल्या पुस्तकात दिलेली आहे. अशा या मानाजी पायगुडे व अन्य सर्वच मराठा सेनानींना मानाचा मुजरा!
अरुण पायगुडे

लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे भाग २

 


लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे
भाग २
अटके’ च्या विजयात सहभागी असलेले सरदार मानाजी पायगुडे यांची इतिहासातील कामगिरी खालील प्रसंगावरून आपल्या समोर येते.
१) सन १७३४ मधील दिल्लीच्या रणसंग्रामात राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार, गोविंद हरी पटवर्धन इत्यादी ज्येष्ठांबरोबर मानाजी पायगुडे सहभागी होते.
२) १६-२-१७५१ च्या पत्रात नारायणराव घोरपडे व मानाजी पायगुडे यांनी बेळगाव प्रश्नंतात शहापूरची पेठ मारली असा उल्लेख आहे. ३) ३०-११-१७३७ च्या पत्रात म्हटल्याप्रमाणे थोरले बाजीराव यांनी काही घोडे व बंदूकस्वार मानाजींकडे सुपूर्द केले होते. ४) २६-१-१७४८ च्या पत्रात जनार्दन गणेश भाऊसाहेब पेशव्यांना लिहितात, ‘मानाजी पायगुडे व आंग्रे यांची लढाई मसुऱ्यास झाली. आंग्रे भगवंतगडावर पळून गेले. मानाजी पायगुडे यांनी पारगड व शिवगड हस्तगत केला व पोर्तुगीजांना शह दिला.’ ५) २२-१-१७४९ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव पेशव्यांना आपली हकिकत कळवितात. त्यात मानाजी व त्यांचा पुत्र लालजी यांच्या पराक्रमाचा उल्लेख आहे. बुंदेलखंडात तेजगड किल्ला आहे. ह्य़ा किल्ल्यास तीन हजार सैन्याने वेढा घालून किल्ला मोठय़ा शर्थीने जिंकला. मानाजी व त्यांचा पुत्र लालजी याने पराक्रमाची परिसीमा गाठली. लालजीस वीरमरण आले परंतु किल्लय़ाचा पाडाव झाला. ६) फेब्रुवारी १७५१ च्या पत्रात त्रिंबकराव पेठे सातारा व कोल्हापूर प्रश्नंताची घटना पेशव्यांना कळवतात. त्यात म्हटले आहे, की ‘मानाजी पायगुडे कोल्हापूर प्रश्नंतात तळ ठोकून आहेत व छत्रपती रामराजे कोल्हापूरकर राजकारणावर लक्ष ठेवून आहेत.’ ७) १७५४ च्या पत्रात विठ्ठल शिवदेव लिहितात- राजेश्री मानाजी पायगुडे यांजकडे बाणाची कैची, बाणदार, पैसा सत्वर पाठवायची आज्ञा करावी. ८) १४-२-५६ (१७५६) च्या पत्रात गोविंद बल्लाळ यांनी बकरुल्लाखान याचे बरोबर केलेल्या लढाईचे वर्णन आहे. यातही मानाजींनी मोठा पराक्रम गाजवला. ९) जून १७५७ रोजी मानाजी पायगुडे यांनी दिल्लीहून पुण्यास कळवले आहे, की आम्ही लाल किल्ल्याचा काबूल दरवाजा व लाहोर दरवाजा ताब्यात घेतला आहे व त्यावर पहारे बसवले आहेत. आम्हाला मनुष्यबळ व पैसा पाठवावा, ही विनंती. पानिपत संबंधात मानाजी पायगुडे यांचा बऱ्याच पत्रात उल्लेख आहे. पानिपतच्या ऐतिहासिक पोवाडय़ात समशेरबहाद्दर व मानाजी शेजारीशेजारी उभे राहून लढत होते असा उल्लेख आहे.

लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे भाग १

 


लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे
भाग १
पानिपत संग्रामपूर्वी १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला ‘अटक’ चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात पानिपतवीर मानाजी पायगुडे आघाडीवर होते.
सन १७५८ मध्ये मराठय़ांनी सरहिंद, लाहोर जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमूर आणि सरदार जहाँनखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. जाताना त्यांनी अवजड तोफखाना आणि दिल्लीतील लुटीचा खजिना तेथेच सोडून दिला. त्या वेळी तैमूरने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले. तहमासखान मुक्त झाल्याने त्याने लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. लाहोरमध्ये पहिले पाऊल टाकणारे वीर होते मानाजी पायगुडे! तारीख होती १० एप्रिल १७५८. ही हकिकत ‘तहमासनामा’ या आपल्या आत्मचरित्रापर ग्रंथात तहमासखानाने लिहून ठेवली आहे. अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठय़ांनी चालूच ठेवला होता. त्यांनी चिनाब, झेलम अशा मोठय़ा नद्या ओलांडल्या. रावळपिंडीही मराठय़ांनी सर केली व मराठी फौजा सिंधु नदीच्या काठांवर आल्या. नदीच्या पलीकडील काठांवर अटक किल्ला आहे. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी १५८१ मध्ये अकबराने अटक किल्ला बांधला. मराठी सैन्याने नदीच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज घेतला व नदीवर होडीचा पूल तयार केला. होडीच्या पुलावरून मराठी फौजा सिंधूपार होऊन अटक किल्ल्यापर्यंत आल्या व किल्ल्यावर हल्ला करून तो हस्तगत केला. ‘अटके’ वर मराठी जरीपटका फडकला. ही गोष्ट १० ऑगस्ट १७५८ ची. मराठी फौजेत या वेळी मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर, गोपाळराव गणेश, तुकोजी खंडोजी कदम, नरसोजी पंडित, साबाजी शिंदे इत्यादी सेनानी आपापल्या पथकाबरोबर होते.
अटकेच्या मोहिमेचे नेतृत्व श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी केले. लाहोरहून श्रीमंत रघुनाथरावांचे पत्र पुण्यात आले. बिपाशा नदी तीरावरून सडय़ा फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव, गोपाळ गणेशसह पुढे रवाना केल्या. पेशवे दप्तर खंड २७/२१८ या मध्ये या बाबतचे पत्र उपलब्ध आहे.

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग ९

 











मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग ९
गुरुवर्य निनाद बेडेकरांच्या भाषणात कुसुमाग्रजांचे हे काव्य त्यांनी काही प्रमाणात बदल करून सादर केले होते. ते इथे प्रस्तुत करून आपली रजा घेतो.
यमुनेचे तट पेटुनि उठले मंदिर आमचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे रणांगणावर ओघळते
असुराचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते
रक्त आपुल्या प्रिय आईचे रणांगणावर ओघळते
सह्यगिरीतिल वनराजांनो, या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे
एक रणांगण राखावाया करा रणांगण लक्ष खडे
समरपुरीचे वारकरी हो, समरदेवता बोलविते
रक्त आपुल्या प्रिय आईचे रणांगणावर ओघळते
खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे रणांगणावर ओघळते
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहात आजला एक मनीषा जागतसे
हिरवे जहरी सर्प ठेचणे – अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते
रक्त आपुल्या प्रिय आईचे रणांगणावर ओघळते …
- इति -
प्रणव महाजन.
padmadurg@gmail.com
नोंद –
दुआब = अंतर्वेद = दोन नद्यांमधील भूप्रदेश.
संदर्भ
राजवाडे खंड १ (जुना) – वि.का.राजवाडे
पेशवा दफ्तर – रु.क्र.१,२,२१. – विविध अस्सल पत्रे.
मराठी रियासत खंड ६ (१९५३ आवृत्ती) – गो.स.सरदेसाई.
पानिपत – त्र्यं.शं. शेजवलकर.
सियार-उल-मुतक्खरीन – अनुवाद – जदुनाथ सरकार.
पानिपत व्याख्यानमाला – निनाद बेडेकर.
अटक नकाशे – श्री. समीर माने, श्री. उमेश जोशी.

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग ८

 










मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग ८
मराठी ताकदीचे हे शिखर होते. इराणच्या शाहचे पत्र मराठ्यांना यावे तसेच जम्मू काश्मीरच्या राज्यातील वकील मराठ्यांना भेटावयास येत आहेत, या गोष्टी मराठी ताकद किती वाढली होती त्याचे द्योतकच आहेत. राघोबादादाच्या पत्रात ज्याचा उल्लेख आला आहे, तो अब्दुल रेहमान हा अहमदशाह अब्दालीचा पुतण्या पुण्याला आला होता. त्याला हाताशी धरून काबुल कंदाहारचे राज्य करावे असा मराठी फौजेचा मनसुबा होता. सरहिंद पासून अटकेपर्यंतच्या पंजाब प्रांताचे या वेळी तीन सुभे लाहोर, मुलतान आणि काश्मीर असे होते. त्यांच्या रक्षणाची तजवीज रघुनाथरावांनी केली. अब्दालीचा जोर कमी झाला होता. शिखांचा जोर वाढला होता पण शिख मराठ्यांचे मित्र होते. अब्दुस्स्मदखान मराठ्यांना शरण आल्याने त्याच्यावर वायव्य नाक्याच्या जबाबदारीचे काम मराठ्यांनी सोपवले. अब्दुल रेहमान यास पेशावर येथे ठेऊन अब्दालीचा प्रतिकार करण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली.
मराठा ताकदीचा हा पराक्रम पाहिल्यावर आणि त्याचा अभ्यास केल्यावर आजच्या महाराष्ट्रावर कीव येते. एकमेकाला परका झालेला मराठी माणूस ह्या एकत्रित पराक्रमाच्या खुणा विसरला का ? आजही हा पराक्रम वाचताना आपण यात आपल्या जातीचा माणूस शोधणार आहोत का ? या जातीयवादातून मराठी माणूस कधी बाहेर येणार ?
गुरुवर्य निनाद बेडेकरांच्या भाषणात कुसुमाग्रजांचे हे काव्य त्यांनी काही प्रमाणात बदल करून सादर केले होते. ते इथे प्रस्तुत करून आपली रजा घेतो.

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग ७

 



मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग ७
मराठी फौजा पुढे पेशावरास आल्या. अटकेच्या पुढे ६० की.मी.वर पेशावर आहे. तेही ओलांडून मराठी फौज खैबर खिंडीत आली. मराठ्यांनी तिथून अफगाणिस्थान पाहिला. काबुल कंदाहारचा बिकट प्रदेश पाहताच तो जिंकण्याची उर्मी मराठी फौजेत उठली. हर हर महादेवच्या आरोळ्या अफगाणिस्थानात उठल्या. मग एक अतर्क्य घडले. मराठी फौजांनी पंजाब, सिंध मधून अब्दालीला पिटाळल्याच्या बातम्या पार इराण पर्यंत पोहोचल्या. आणि इराणच्या बादशाहने मराठ्यांना एक पत्र पाठवले! रघूनाथरावाने लाहोर हून पुण्यास एक पत्र पाठवले. त्यात इराणहून आलेल्या पत्राचा उल्लेख आहे. खुद्द राघोबादादाचे ४ मे ५८ चे पत्र पेशवे दफ्तरात उपलब्ध आहे.त्याचा मजकूर खालील प्रमाणे -
“… लाहोर, मुलतान, कश्मीर व अटके अलीकडील सुभ्यांचा बंदोबस्त करून अंमल वसवावा त्यास काही झाला व काही होणे तोही लवकरच करतो.तैमुर सुलतान व जहांखन तांची फौज लुटून घेतली. थोडी फौज झाडत पडत अटके पार पिशावरास पोचली. अब्दाली इराणवर चालोन जाता त्याची फौज इराणच्या बादशाहने लुटली. तसा तो परत कांदाहारास आला. पाठीवर इराणी फौज येऊन धामधूम करू पाहते. जबरदस्तखान व मुकर्रबखान या प्रांतीचे सरदार व जमीनदार जबरदस्तीने अब्दालीकडे रुजू होते तेही बदलून हंगामा करतात. हल्ली रफिक होवून सेवा करू, अब्दालीस तंबी करू अश्या त्यांच्या अर्ज्या आल्या आहेत. अब्दालीचा धर सुटला आहे. सारांश त्याचा जोर तिकडून होतो ऐसे नाही.तिकडून इराणचे पातशाहने जेरदस्त केले आणि इकडून जोर पोचून सरकारचा अंमल अटकेपार करावा. अब्दालीचा पुतण्या व दलातेचा वारस स्वामीपाशी देशास आला तो स्वामिनी आम्हापाशी पाठविला त्यास अटके पलीकडे थोडी जागा बसावयास देवून अटकेपार काबुल पिशावरचा सुभा देऊ. अब्दुस्समद खान व त्याची फौज सरकारात पाडाव आहे. तो त्याची व या प्रांतीची फौज, मोगल, इराणी सवे देऊन मशारनिल्हेची रवानगी करतो. हे तिकडे पैरवी करतील, स्वामींचे पुण्याप्रतापे अब्दालीस जोर पोचून तंबी करतील. पारिपत्य उत्तम प्रकारे करून अटकेपार अंमल वसवतील. लाहूर प्रांती रेणको अनाजी व रायाजी सचदेव ऐसे ठेविले. गोपाळराव गणेश यांचा हि पैगाम आहे तेही राहतील. इराणचे पातशाहचे स्वदस्तूरचे कागदही आम्हास व मल्हाररावास आले होते. की लवकर कंदाहारेस यावे आणि अब्दालीचे पारपत्य करून अटकेची हद्द करावी. परंतू आम्ही काबुलचा सुभा अब्दुल रेहमान स्वामीनी पाठवला त्यास देतो. फौज वगैरे थोडे बहुत साहित्यही करतो. काबुल व कंदाहार हे अटकेपारचे सुभे हिंदुस्थानकडे अकबरापासून आलमगिरा पर्यंत होते ते आम्ही विलायतेत का द्यावे ? तो इराणचा अम्मल करील. आम्ही कंदाहार पावेतो अम्मल बसवून तूर्त त्यास गोडच जबाब पाठविणार आहोत. जंबू काश्मीर वगैरे तमाम वकील आले आहेत. माम्लात थोडी बहुत अटके अलीकडील करीत आहोत. पलीकडील संपूर्ण तूर्त होत नाही खटपट मात्र होते. तूर्त तातादिमुळे होईल तेवढे करतो. पुढील स्वारीस सरदार जो कुणी मातबर येईल तो बंदोबस्त करील. मुलुख दो चौ करोदीचा, जमीनदार मावास मोठे मोठे आहेत. आम्ही नावास मात्र खंडणी करतो, जेथे २५ लक्षांचा मुलुख तेथे १-२ लक्षही येणे कठीण आहे. तूर्त माघारे फिरवायचा डौल स्वामींचे आज्ञेवरून धरिला आहे, यामुळे जे होईल ते करितो , तटी लावत नाही. तूर्त आदिनाबेगावर सारा एख्तीयार दिला आहे. त्यास कामावसीने लाहोर मुलतान दिले आहे. यंदा तर सारे शिबंदी खालीच जाईल, शिबंदी वारताच कठीण पडेल. २-३ वर्षांनी काही सोयिस पडेल. स्वामीस कळावे. र. छ.२५ शाबान.”

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग ६

 



मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग ६
चिनाब नदी पुढे जाऊ देत नव्हती. तरीही मराठ्यांनी काठावरच छावणी केली. चिनाब ओलांडण्याची तयारी ते करू लागेल. नावांचा पूल बांधण्यासाठी ते नावा जमवू लागले. तैमुरशाह हा सिंधू नदी ओलांडून अटक, पेशावर करत खैबरखिंडीत आला आणि पुढे तो काबूलला पोचला. अटक येथे अटक नदी सिंधूला मिळते. या दोन नद्यांच्या दुआबात अटक किल्ला आहे. तेथे पोहोचण्याअगोदर सतलज, रावी, चिनाब, झेलम आणि सिंधू या मोठ्या नद्या ओलांडाव्या लागतात. मराठी मनगटे शिवशिवली. मराठ्यांनी अटकेवर जाण्याचे निश्चित करून मोठे यत्न चालवले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात मराठ्यांनी सिंधू नदी ओलांडली आणि अटक गाठली. मराठी भगवा झेंडा अटकेच्या किल्ल्यावर फडफडू लागला. ‘अहत तंजावर ते तहत पेशावर’ श्रींचे राज्य ! शिवाजी महाराजांचे स्वप्न
साकार झाले. सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत मराठी हुकुमत पसरली. तंजावर पासून अटकपार पेशावर पर्यंत मराठी नौबत झडली. अटकेपार झेंडे लागल्याच्या बातम्या महाराष्ट्रात पोहोचल्या. कुठे आहे महाराष्ट्र आणि कुठे अटक ?
अटक ते पुणे अंतर अंदाजे २४०० कि.मी.
अटक ते पुणे अंतर अंदाजे २४०० कि.मी.

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग ५

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग ५
राघोबादादा लाहोरात आले. शहराबाहेर असणाऱ्या शालीमार बागेत राघोबादादांचा मुक्काम होता. आदिनाबेग ने या विजयाच्या प्रीत्यर्थ मराठ्यांच्यावर १ लाख रुपये खर्च केले व प्रचंड मोठा दीपोत्सव साजरा केला. तैमुर आणि जहानखान चिनाब नदीच्या तटी पोहोचले. चिनाबचे पाणी थंड व गहिरे होते. त्यांना आपले सर्व मौल्यवान सामान टाकून पळ काढावा लागला. मराठ्यांच्या तुकडीने सर्व सामान जप्त केले. नावा घेवून तैमुरचे सैन्य पळाले. मराठ्याकडे पूल बांधण्या इतक्या नावा नव्हत्या. चिनाबच्या काठचे वजीराबादचे ठाणे मात्र मराठ्यांनी साफ लुटले आणि ताब्यात घेतले. तेथून दि.२१ एप्रिल च्या पत्रात मराठा सरदार हरी रघुनाथ लिहितो -
“ मुक्काम ऐरावती (रावितीर) नदीतीरी अब्दुस्समदखान सरहिंदेत होता. त्याचे पारिपत्य श्रीमंतांनी करून सरहिंद आणि दुआब दोनही तालुके आदिनाबेग मोगलाचे स्वाधीन खंडणी ठरवून केले. तदुत्तर जहानखान व अब्दालीचा पुत्र २०,००० फौजेनिशी लाहोरात होता. त्याजवर चालोन गेले. बिपाशा (व्यास) नदीतून सड्या फौजा मानाजी पायगुडे, गंगाधर बाजी भिवराव, गोपाळराव गणेश रवाना केले. त्यांनी जाऊन गाठ घातली. घाबर होऊन बुणगे, तोफखाना, फौज मागे टाकून सडा तीन चार हजारानिशी चिनाब नदी उतरून जीवंरक्षणासाठी पळाला. आपल्या फौजेने नदीपर्यंत पाठलाग करून फौज व तोफखाना लुटून घेतला. चिनाब नदीवर उपाय चालला नाही म्हणून भगवंते रक्षिला. एरवी श्रीमंतांचा प्रत्ताप विस्तार पावला. प्रांती आपली सलाबत भारी पडली. दक्षिणी फौज पूर्वी दिल्ली पलीकडे आली नव्हती ते चिनाब पर्यंत पोहोचली. चिनाबेस पाणी थोडके असते तरी अटके पर्यंत जाती. पुढे पूल बांधोन फौजा जाण्यास अडचण भारी पडेल. छावणी इकडे करावी लागेल. इतक्या दूर छावणी करीता नये. त्यात लोकही कष्टी करून लाहूर प्रांताचा बंदोबस्त करून श्रीमंत मागे फिरणार. याहीवरी भगवत सत्ता प्रमाण.”

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग ४

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग ४
मार्च ५८ रोजी राघोबादादा आणि मल्हारबा सरहिंदेस पोचले. इथे आता निकराचे युद्ध जुंपले. मराठ्यांनी कडवी लढाई केली. त्यासोबत आला जाटाची शिख फौजही मराठांना सामील झाली. अब्दालीने केल्या सगळ्या अत्याचारांचा आणि कत्तलींचा मराठ्यांना बदल घ्यावयाचा होता. मराठ्यांना चेव चढला आणि त्यांनी जंगबाजखान आणि त्याची १०,००० फौज बुडविली. त्याच्या मदतीस आलेला अब्दुस्समदखान जबर जखमी होवून मराठ्यांच्या हाती सापडला. सरहिंदचे ठाणे शिखांनी हस्तगत केले. सरहिंदेस आदिनाबेग याने आता मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारले आणि सरहिंदचा अंमलदार झाला. हा मोठा खटपटी माणूस होता. त्याने ओळखले कि लाहोर अटक पावेतो प्रदेश काबीज करावयाचा हाच मोका म्हणून त्याने राघोबादादास व मराठ्यांना मदतीचा हात मागितला. त्याच्या मोबदल्यात तो दर दिवस चालीचे त्यांना एक लाख रुपये व बैठ्या मुक्कामाचे ५०,००० रुपये देऊ करीत होता. आदिनाबेगचा जावई ख्वाजा मिर्झा ह्याला त्याने दिल्लीहून फौज घेवून बोलावले आणि एकत्र फौज घेवून मराठ्यांच्या नेतृत्वाखाली लाहोरच्या दिशेने निघाला. मराठ्यांतर्फे सेनेचे नेतृत्व मानाजी पायगुडे करीत होते. मावळात लाल मातीत घुसळून तयार झालेला हा फाकडा मराठी गडी लाहोरच्या वेशीवर धडक द्यायला निघाला होता. कुठे मावळ आणि कुठे लाहोर ? मराठे लाहोरच्या किल्ल्याला वेध देऊ लागले तसे अब्दालीचा पुत्र तैमुरशाह आणि सेनापती जहानखान हे लढाईसाठी तयार होऊ लागले तसे समोर त्यांना मराठा आणि शीख सैन्य वाढताना दिसू लागले. त्यांना दहशत बसली आणि ते मौल्यावार सामान घेवून मोजक्या फौजेनिशी लाहोरहून अटकच्या दिशेने निघाले. लाहोरचा किल्ला पडला. मराठ्यांची एक तुकडी किल्ल्यात शिरली. किल्ल्यात पहिले मराठी पाऊल पडले. ते होते मानाजी पायगुडे यांचे. मराठ्यांची एक तुकडी तयमूरशाहच्या पाठीवर गेली.

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग ३

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग ३
२२ ऑक्टोबर १७५७ रोजी दसर्याच्या सुमुहूर्तावर दादासाहेब दिल्लीहून पंजाबच्या मोहिमेस निघाले. काही काळ दुआबात अंमल बसवून दादासाहेब गड्मुक्तेश्वरी तीर्थास गंगास्नानास गेले. महिना डिसेंबर ५७ दरम्यान नजीब मागे मागे हटत गेला व मराठे गंगेच्या प्रदेशात प्रबळ होत गेले. नजीबखानाचा गुरु कुतुबशहा सहारनपुर भागात पाळला व मराठ्यांशी लढताना जबर जखमी झाला व पळोन गेला. मराठे उत्तरेत पंजाबच्या दिशेने सरकू लागले. कर्नाल जिल्ह्यातील कुंजपुरा इथे मराठ्यांचा सामना नजीबच्या तोफ्खानाचा प्रमुख नजाबतखानशी झाला. त्याने ५ लाख भरून स्वतःचा बचाव केला. या सौदेबाजीतही मल्हाररावाने नजाबतला वाचवले व रोख रक्कमेवर शत्रूला अभय दिले असे हिंदी बातमीदाराच्या नोंदीत सापडते. एकंदरच काय तर उत्तरेच्या राजकारणात मुरब्बी असलेल्या ६३ वर्षीय मल्हारराव यांनी २३ वर्षीय तरुण दादासाहेबांना आपल्या मुठीत ठेवले होते.
तिकडे पंजाबात अब्दालीने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात बंडाळी उठली ज्याने मराठ्यांचे काम सोपे झाले. कपुरथळा संस्थानाचा मुल पुरुष जस्सासिंग अहलुवालिया, पतियाळा घराण्याचा संस्थापक आलासिंग जाट ज्याचा मराठी कागदपत्रात ‘आला जाठ’ असा उल्लेख येतो, आणि जस्सासिंग रामगडीया ह्या तिघांनी शीख सैन्य एकत्र करून पंजाबात अफगाणवरोधी मोहीम काढली आणि पठाणांची पंजाबातून हकालपट्टी सुरु केली. अमृतसर येथील सुवर्णमंदिर जे अब्दालीने एप्रिल ५७ मध्ये जाताना उध्वस्त केले होते व तेथील पवित्र तळ्यात माती भरून त्यावर शेती करायला लावली होती ते मंदिर ह्या तिघांनी पुन्हा उभे केले व तळे पुन्हा बांधले. पंजाब मोहिमेवर निघताना होळकरांचा जनाना व परीवार होता. त्यांना कुरुक्षेत्री पूजा-अर्चा करावयासाठी नेण्यात आले होते. कुंजपुरा हाती आल्यानंतर काही काल होळकर परिवार तेथे वास्तव्यास होता. सरहिंदेवर अब्दालीतर्फे अब्दुस्समदखान होता त्याने तिथून निघताना होळकरांचा परिवार पकडून नेला आणि शाहबाद येथे कैदेत ठेवला. हे नवीन प्रकरण उद्भवले परंतु लवकरच निकाली लागले. होळकरांच्या परिवाराच्या सुरक्षारक्षकांनी त्वरित शाहबादेवर निकराचा हल्ला चढवून त्यांना सोडवले आणि अब्दुस्समदखानाला तिथून पिटाळून लावले.

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग २

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग २
“…मुलुख श्रीमंतांचे हाती आला. पुढील तह निम्मे-निम्मेचा करार ठरला. २२ पैकी ६ सुभे दक्षण आपले आहेतच. लाहोर ते अटक पावेतो ६ सुभे अब्दालीकडे आहेत. प्रयागचा काराकुडा व अंतर्वेद आपल्या कडे आली तसेच अयोध्या, पटना, बंगाल व दिल्ली. तसेच दिल्ली खालील एक करोडीचा व सरहिंद पावेतो ९० लाखाचा प्रदेश काबीज करून वसुली आहे. बाकी जाट आग्रा सुभ्यात आहे. आता मेहनत केली तर लाहोरही सुटावयाजोगे आहे. स्वामींचे पुण्य थोर. काहेकरून सर्व होऊन जाईल. आमचे पदरी लेकुरपण आहे. वारंवार शिक्षायुक्त लेखन केलीयास उत्तम.”
परंतु नेमके यावेळी मराठा छावणीत काय निचर होते यासाठी आपल्याला आणखी एक पत्र मिळते. हे पत्र त्रिंबक मुकुंद हा सखारामबापूस लिहितो -
“दादासाहेबांचा कारभार सुस्त व व लटका. ओढा भलतीकडेच. नजीब पहिल्या दिवशी येताच आम्ही सत्वर कार्यभाग साधण्याची विनंती केली पण खावंद प्राक्तवान. बापू आपणच नेहमी म्हणता की नानासाहेबांचे प्राक्तनाचा गुण ऐसा की अवघड काम सोपे होऊन मार्गी लागते व दादासाहेबांचा गुण ऐसा कि सोपे काम दिसत ते अवघड होऊन नंतर आयास व विलंब होतो.”
यावरून स्वारीत दादासाहेबांबद्दल काय मनी होते ते स्पष्ट दिसते. आपले लेकुरपण(अजाणतेपण) तर वरील पत्रात दस्तुरखुद्द राघोबाच काबुल करतात. दिल्लीच्या दुरुस्तीत नजीब हातचा सुटला ह्या प्रकाराने ह्या सबंध यशावर गालबोट लागले. एकूणच या प्रकारावरून स्वतःचे मत बनविण्यात आणि ते फौजेवर अंमलात आणण्यात राघोबादादा कच्चे लिंबू पडत होते हे देखील दिसून येते.

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध भाग १



मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – उत्तरार्ध
भाग १
नजीब कली जिवंत सापडला होता. त्याला मारून टाका असे सर्व लोक सांगत होते. परंतु नजीबने मल्हाररावांकरवी पुन्हा बचावात्मक धोरण लावले. धर्मपुत्राचा आव आणत त्याने स्वतःचा बचाव करून घेतला. त्याला पाठीशी घालत स्वतः त्याची जबाबदारी घेत मल्हारराव होळकर पुढे आले. मराठी इतिहासातील ही घोडचूक ठरली आणि त्यामुळे पुढे पानिपत ओढवले. अखेरपर्यंत त्याला मारावे असेच ठरले असताना मल्हाररावच्या सांगण्यावरून त्याच्या कडून दिल्लीचे राजकारण सोडून निघून जातो असे लिहून घेवून त्याला सोडून देण्यात आले. ह्यासंबंधी सियार-उल-मुतख्खरीनचा करता सय्यद हुसैन तबा-तबाई लिहितो की ह्या करिता नजीबने होळकरांना भरपूर पैसे दिले. दिल्ली पूर्ववत केली. आलमगीर सानीला बादशहा, गाजीउद्दिन वजीर आणि अहमदखान बंगशला मीर बक्षी करून मराठे पुढे कुरुक्षेत्रच्या दिशेने निघाले. गंगेच्या प्रांतात दादासाहेबांनी रेणको अनाजी याला ज्वालापूर येथे नजीबच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगितले. मार खाल्लेला नजीब गंगा उतरून पलीकडे निघून गेला. त्याची सर्व ठाणी मोडून रेणको अनाजी यांनी स्वताची ठाणी वसवली. दिल्लीची मसलत आवरताच दादासाहेबांनी सर्व हकीगत नानासाहेबांना कळविली त्या पत्रातील हा काही सारांश

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध भाग १३

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग १३
एप्रिल संपता व मे सुरवातीला दादासाहेब आग्र्याच्या रोखाने निघाले. दादासाहेब येताना दिसताच सुरजमलने मैत्रीचा हात पुढे केला व आधीची सर्व बाकी खंडणी चुकती केली. यमुना उतरोन दुआबात उतरायला मराठ्यांना आणखी एक महिना लागला. जून दरम्यान मराठे अंतर्वेदीत पोचले.अंतर्वेदीत नजीबचे राज्य सुरु होते. दादासाहेबांनी आता नजीबवर मोर्चे बांधण्यास सुरुवात केली. सैन्यबळ पाठीशी येताच अंताजी माणकेश्वर हे पुन्हा सक्रीय झाले व त्यांनी सिकंदराबादेचा प्रदेश काबीज केला आणि दादासाहेबांच्या साथीला उतरले. मराठे मदतीला येताना पाहून दिल्लीचा वजीर इमादुल्मुल्काने निरोप पाठवून कळवले की “मनाजोगे राजकारण करणे परंतु रोहिल्यास दिल्लीतून घालविणे“. आता नजिबखानास धास्ती वाटू लागली. त्याने मल्हाररावकरवी राघोबादादाला सला करण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यात ४ कलमे होती.
१.मी तुमचा फर्जंद आहे तेव्हा मजवर तरवार धरू नये. मी दिल्ली व मुलुख स्वाधीन करून यमुनापार उतरून जाईन.
२.किंवा मी तुमचा वकील बनून अब्दालीकडे जाऊन तेथे राहीन. उभयतांची हद्द सांभाळीन.
३.माझ्याबद्दल संशय धरू नये म्हणून पुत्र झाबेताखानाला ७००० फौजेनिशी तुमच्याकडे ठेवीन.
४.सर्व अमान्य ठरून लढवयाचे असल्यास तसेही करू आणि ईश्वरास फैसला करू देऊ की राज्य कुणाचे.
त्याच्या या मागणीस अंताजी माणकेश्वर यांनी उत्तर दिले -
“अब्दाली व नजीब दोन नाहीत. एक चित्ती आहेत तेव्हा सर्व सोडून निघोन जावे”
अंतर्वेदेत उतरोन मराठ्यांनी सहारनपुरपासून इटाव्यापर्यंतचा प्रदेश काबिज केला.फक्त नजीबला हाकलून दिल्ली घेण्याचे बाकी राहिले होते. नजीबच्या त्रासाला दिल्लीकर आता वैतागले आणि वजीर गाजीउद्दिनने नजीबच्या हालचाली गुप्तपणे बापू हिंगणेकरवी राघोबादादाला कळवल्या. राघोबादादांनी सर्व बळ एकवटले आणि १५ जून रोजी तो दिल्लीवर निघाले. सैन्य विभागून यमुनेच्या दोन्ही काठावरून सैन्य दिल्लीच्या रोखाने निघाले. ११ ऑगस्ट रोजी मराठी सैन्याने दिल्लीला घेरले. दिल्लीच्या संरक्षणावर नजिबचा गुरु कुतुबशाह होता. मराठ्यांनी दिल्लीची रसद मारली त्यामुळे रोहील्यांची उपासमार होवू लागली. नाजीबखानाने या अखेरच्या काळात वजिराच्या परिवाराचे भरपूर हाल केले व त्यांना रस्त्यावर आणले. १५ दिवस लढून अखेर विठ्ठल शिवदेवने यांनी दिल्ली सर केली. थेट हल्ला चढवून नजीब व त्याच्या सर्व साथीदारांना जिवंत कैद केले. मराठी सैन्य दिल्लीत शिरले व त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला. बादशाहला पुन्हा स्थापित केले. विठ्ठल शिवदेव यांना बादशाहने चांदवड तालुक्यात जागीर व उम्देतुल्मुल्क किताब देवून सत्कार केला.
क्रमशः
प्रणव महाजन.
padmadurg@gmail.com
नोंद -
दुआब = अंतर्वेद = दोन नद्यांमधील भूप्रदेश.
सर्व संदर्भ उत्तरार्धाच्या अखेरीस दिले आहेत.

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध भाग १२

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग १२
उन्हाळाही वाढू लागला होता. यमुनेचे पाणी आटू लागले होते. जेवढे पाणी शिल्लक होते ते कत्तली आणि रोगराई मुळे दुषित झाले. अब्दालीच्या सैन्यात महामारी पसरू लागली. दिवसेंदिवस गोसाव्यांचा जोर वाढत होता, मराठे एकेक नदी ओलांडत आता उत्तरेकडे ससैन्य सरकत होते. तेव्हा त्याने आता काढता पाय घेतला. आतापावेतो त्याने १२ करोडची लूट केली होती. तो झपाट्याने दिल्लीकडे निघाला. १ एप्रिल रोजी त्याने दिल्लीतूनही स्वारी माघार फिरवली. दिल्ली सोडताना त्याने माजी वजीर इंतीजाम-उद-दौला याकडून ४ करोड, गाजीउद्दिन वाजीराकडून १ करोड व इतर सावकारांकडून ७ करोड असे एकूण १२ करोड आणखी जमविले. २४ करोडची संपत्ती घेवून अब्दाली त्वरेने निघाला. बादशाही जनान्यातील स्त्रियांचीही त्याने विल्हेवाट लावली. माजी बादशाह महम्मदशाहच्या मुलीशी त्याने स्वतः निकाह केला.
इतर १६ राजघराण्यातील बायका व ४०० मोलकरणी त्याने आपल्या सोबत घेतल्या व विद्युतवेगाने काबुलास निघाला. जाताना परतीच्या वाटेवर त्याने अमृतसरचे पवित्र मंदिर फोडले. त्यापाठोपाठ त्याचा पुत्र तैमुरशाह व जहानखान हे ही निघाले. सद्य बादशाह आलमगीर यास पुन्हा बादशाही देवून त्याची मुलगी मुहम्मदी बेगम हीचा निकाह तैमुरशाहशी करवला. तैमुरला लाहोरचा बंदोबस्त करण्याकरिता त्याने ठेवले आणि इथे घोटाळा झाला. लाहोर मुलुख मन्नूचा आणि तो मिळावा म्हणून मुघलांनी बेगमेने अब्दालीला पाचारण केले होते. तो गेल्यावर जम्मू व जालंधर चे लोक तिला थोडेच राज्य करू देणार होते. तिला लाहोर पुन्हा हवे होते. परंतु पुन्हा भारतात शिरण्याकरिता त्याला लाहोरचा मुलुख दरवाजा म्हणून हवा होता आणि म्हणून त्याने मुघलानी बेग्मेचा तिरस्कार करून तिला उडवून लावले. तिने लाहोर मिळावे यासाठी याचना करीत चिनाबपर्यंत अब्दालीच्या सैन्याचा पाठपुरावा केला. तिचे लटांबर अधिकच मागे येवू लागले तेव्हातर शाहवलीखानाने काठीने झोडपून तिला सैन्यातून हाकलून लावले. ज्या लाहोरात तिने एकतंत्री राज्य केले होते तिथेच तिजवर भिक्षा मागून खाण्याची पाळी आली. तिचे चरित्र पुढे तिच्या व मन्नुच्या पदरी असणारया त्यांच्या एका सेवकाने लिहून ठेवलेले आहे. ते वाचण्याजोगे आहे. त्याचे नाव आहे तहमासखान उर्फ मिस्कीन.

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध भाग ११ .

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ११ .
परंतु रियासतकारांच्या भाषेत सांगावे तर या विचाराच्या वीरश्रीला पुढारी मिळाला नाही आणि मराठी सैन्य जयनगरात काही काळ अडकून बसले. याला आणखी एक कारण आहे. यावेळी दादासाहेबांच्या सैन्यात फौज कमी होती व पैसा काहीच नव्हता. पेशव्यांचे आदेश मिळाले परंतु मोहिमेचा खर्च मात्र त्यांनी खंडणीमधून वसूल करावयास लावला होता. १४ फेब्रुवारी ५७ चे इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पाठविलेले हे पत्र पहा -
“आज इंदूरस पोचलो. होळकरांचे सैन्य मिळाले. दिल्लीच्या रोखे निघतो परंतु अब्दाली येवोन गेल्याने पैसा मिळणे सोय नाही. त्याचे पारपत्य करावे तर फौज नाही. तूर्त १५००० फौज आहे अधिक जमल्याविना जाणे अयोग्य. वार्ता मिळते की जाट झुंझू लागला आहे. शिपाई कजाख आहे. ईश्वरी दया व स्वामींचा प्रताप“
दादासाहेबांबरोबर असणारी या स्वरीतील तरुण मंडळी पुढे इतिहासात प्रसिद्धीस आली. यात सखारामबापू बोकील, बाबुराव हरी गुप्ते, बाबुराव फडणीस, हरिपंत भिडे, मानाजी पायगुडे, देवजी ताकपीर, कृष्णराव काळे,बापुजी बल्लाळ फडके ही काही नावे. पैसा मिळावा म्हणून दादासाहेब पुन्हा राजपुतान्याकडे वळले.थोडा पैसा मिळाला पण मुख्य कार्यभाग असा काही साधला गेला नाही. ह्या दर्म्यान राघोबाने पुन्हा एक पत्र पाठविले त्यातील काही ओळी पहा -
“अब्दाली दिल्लीहून माघारा फिरल्याची वार्ता मिळते. तेव्हाच आम्ही मल्हारबास म्हणत गेलो की दिल्ली व लाहोर पाठीवर जात एकदम जप्त करू पण यांनी लटकी लचांडे लावून ३ महिने खर्ची केलेत. मल्हारबाचा स्वभाव स्वामीस वाकीफ आहे. दोन महिने माधोसिंगाचे प्रकरण चालिले आहे. मल्हारबा न ऐकता तेव्हा आम्ही ही मसलत टाकून मामलती रगडू करतो. कष्टी जाले. दतबा आलियाने परस्पर वर्म निघते“
मल्हारराव कसे राजकारण बिघडवीत होते हे या पत्रात स्पष्ट दिसते. कदाचित नजीबखानाने त्यांची तोंडदाबी केली असावी का ?

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध भाग १०

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग १०
दिल्लीच्या खबरा वरचेवर दख्खनेत पोचत होत्याच परंतु दस्तुरखुद्द पेशवे हे यावेळी श्रीरंगपट्टणच्या स्वारीवर होते त्यामुळे बहुतांश सैन्य त्यांच्या सोबत होते. अंताजीची पत्रे मिळताच नोव्हेंबर ५६ मध्ये नानासाहेबांनी राघोबा आणि मल्हारराव यांना पुन्हा उत्तरेस जाण्यास सांगितले. दत्ताजी व जनकोजी शिंदे हे मार्वाद्ची मोहीम आटपून आले होते व त्यात जयाप्पा कामी आल्याने ते या सैन्या सोबत गेले नाही. अंताजी आता दादासाहेब व होळकरांची वाट पाहत फारीदाबादेस निष्क्रिय राहिले. १४ फेब्रुवारी दरम्यान दादासाहेब व फौज इंदुरापर्यंत पोचली. या दरम्यान अब्दाली दिल्ली लुटून पुढे मथुरेस निघाला होता. अंताजी माणकेश्वर आणि जाट सुरजमल यांनीच काय तो पुरुषार्थ दाखवीत अब्दालीच्या स्वारीत धिटाईने तोंड दिले. अंताजी यांनी दादासाहेब जयनगरास पोचताच त्यास निरोप धाडला होता की -
“सांप्रत जयनगरच्या गढ्यास न लागावे, पुढे शहास पारिपत्य करणे याकरिता धावून येणे. पंजाबातून आलासिंग जाट व व त्याचे शिख सैन्य उतरेतून व मराठे दक्षिणेतून अब्दालीस चेपतील तर त्याचे सैन्य दोहो कडून सापडून गारद होईल व अब्दालीची राळ उडेल”

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध भाग ९

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ९
इकडे अब्दाली गोकुळ मथुरेच्या दिशेने पुढे गेला. काही दिवसांपूर्वीच राघोबादादांनी येथील यात्रांसाठी करमाफी मिळवली होती. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च या दरम्यान गोकुळात होळीचा उत्सव सुरु असताना पठाणांची स्वारी आली आणि होळीच्या रंगात रक्ताचे पाट वाहू लागले. यमुनेचे पात्र लालीलाल करून सोडले. रस्त्यातून प्रेताचे ढीग इतके पडले की चालावयास वाट मिळेना. भरतपूर, दिग, कुंभेरी हे वास्तविक लुटण्याचा अब्दालीचा इरादा होता परंतु सुरजमल ने वकिली आणि युद्धाचीही तयारी दाखवून त्यास आपल्या प्रांतापासून दूर ठेवले. मथूराही प्रदेश जाटांचाच परंतु मोकळ्यावर असल्याने आणि अपुरी शिबंदी असल्याने तो पठाणांच्या तडाख्यात सापडला. आपल्या कृरतेचे प्रतीकच जणू म्हणून अब्दालीने खुलेआम आदेश दिला -“हे हिंदूंचे क्षेत्र आहे, लुट आणि कत्तल करा, जितकी मुंडकी आंत येतील तितकी आणोन राशी करा. प्रत्येक शिरास ५ रुपये बक्षीस” . पुढे ४ दिवस त्याच्या सैन्याने व त्यानंतर ३ दिवस नजीबच्या सैन्याने अमानुष कत्तल चालविली. गाई आणि माणसे मारून त्यांची तोंडे एकमेकांना लावून टांगून ठेवण्यात आली. जहानखानच्या एका तुकडीनेच केवळ ३००० मुंडकी मारल्याची नोंद मिळते. भयंकर कत्तली झाल्या. मूर्ती फोडून लाथांनी तुडविल्या गेल्या. सुंदर स्त्रिया बाटवून नेल्या. कित्येक स्त्रियांनी विषप्राशन करून तसेच जलप्रवेश करून प्राण त्यागिले. ह्याची बातमी सुरजमलला समजताच तो पठानांवर चालून आला व त्याच्या सैन्याने जोर चढवत ३ हजार पठाण कापले. अब्दाली गोकुलेच्या दिशेने निघाला होता तो माघार फिरून बल्लमगडावर सुरजमलावर चालून गेला. सुरजमल पुन्हा मागे फिरला व अब्दाली ने बल्लमगड घेतला. तिथे शिबंदी घेवून तो पुन्हा मथुरेहून गोकुळास निघाला. एव्हाना मथुरेची राखरांगोळी झाली होती. गोकुळात पोचताच मथुरेच्या बातमीने सावध झालेले आखाड्यातील नंगे गोसावी तयार होते. ४००० नंगे गोसावी तेग धरून अब्दालीचे पारीपत्यार्थ उतरले. हि तारीख होत २३ मार्च १७५७. एव्हाना अब्दालीस आणखी एक बातमी समजली… मराठे दख्खनेतून निघून जयनगर पावेतो पोचले होते.

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध भाग ८

 



मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ८
“… अब्दाली दिलीस दाखल झाला. नजीब, इतर खासे आसामी व बापुजी महादेव वकील वगैरे मिळोन सहा कोस दिल्लीस राहता. फौज त्याची भारी. नित्य तीस कोस घोडा धावतो. सारा पेंच आम्हावरी पडिला. आम्ही फारीदाबादेस येत बारा कोस अफगाण फौज पाठीवर आली. वजीर कैद. बादशाह कैद. दिल्लीतील फितुऱ्या (नजीब) धरिता एक लाख स्वर त्याकडे जमा झाले. एक सुरजमलाकडे नित्य पत्रे पाठवितो. बादशाहचे रात्रंदिस म्हणणे की पातशाही बाळाजी रायाची आहे. सरदारास सत्वर बोलावून कार्य सिद्धीस नेणे. घरात आता कवडी नाही. राहिला मुलुख तोही घेणे. समशेरबहादर व नारोशंकर मिलाफी झाले आहेत. वकील बापुजी कडे निराळा जाबसाल लाविला आहे. त्यांनी समशेरबहाद्दरास ग्वालेरीस गोवून आम्हावरी सत्यानाश करविला. त्यास आमच्या सहाय्यास येवो दिले नाही. नारोशंकरांनी नामर्दी करून जो घात करविला तो त्याची शिरच्छेदच करावासा केला. बापू वकील मात्रा गमनी. तो व त्याची कलावंतीण सडी दिल्लीत आहे. आता आशा दोन. नादिरप्रमाणे अब्दाली शाह हेच वजीर व बादशाह स्थापून माघार फिरला तरी आपला पाया कायम होईल अन्यथा काही तजवीज आपण व जाठ मिळोन करावी व ह्याच कामासाठी दिल्लीभोवती मरमर फिरतो. धरणीकंप झाला तेथे आमची काय कथा ?….याउपरी श्रीमंतांनी आमचे श्रमावरी काहीतरी दृष्टी द्यावी. बापू वकील सर्वथा लबाड आहे. सुरजमल्लाचे अवसान ठिकाणी नाही. नारोशंकर परम दुष्ट मिळोन अंतर्वेद राखील तर उत्तम अन्यथा बरे नाही !”

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध भाग ७

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ७
इकडे अंताजी माणकेश्वर फरीदाबादेस आले. त्यांच्या सैन्यात मनुष्यहानी फार झाली. त्यांनी त्वरित सर्व खबर पेशव्यांना रवाना केली. थोरले बाजीराव आणि मस्तानी यांचा पुत्र समशेरबहाद्दर ह्यावेळी ग्वाल्हेरच्या जवळ होता. तो हाताला येईल तितकी फौज जमवू लागला. या दरम्यानचे अंताजी माणकेश्वर यांनी पुण्याला धाडलेली ही २ पत्र त्याकाळच्या परिस्थितीचे उत्तम दर्शन घडवतात. त्या २ पत्रातील काही सारांश -
“… अब्दाली अटक उतरोन जुलूस बहुतसा करीत जात आहे. जमिदारही रोज येवून भेटतात. आदिनाबेग, शादिलबेग, जमालुद्दीनखान हे त्रिवर्गही आता त्यास सामील.सरहिंदेस नायब लक्ष्मीनारायण होता तोही माघार फिरला. जंबूचा राजाने झुन्झाची तयारी केली असता त्यावरीहि १०००० फौज रवाना केली. जलालाबाद, आदिनानगर, जालंधर, नुरमहाल येथे नवीन नेमणुका झाल्या. व्यास व सतलज यातील प्रदेश खोजा अब्दुल्ला यास दिला. येथे कुणी मर्द माणूस नाही हे त्यास कळो चुकले. मनुष्य मात्र आपले स्थळी चिंताक्रांत. दिलीवाले अनेक सरदार त्यास मिळो आले….विना आपली स्वारी या प्रांती येत नाही तो काल पर्यंत हिंदुस्थानचा बंदोबस्त होत नाही. अबरू व सल्तनत राहत नाही. समशेरबहाद्दरास पाचारिले आहे. मातबर दक्षिणेची फौज येताच बाहेर निघणार….. “

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध भाग ६

 


मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ६
मुघलानी बेगमेचे प्रताप त्याला समजले तसे तो तिच्या कडे हा प्रस्ताव घेवून गेला. तिकडे पळून जाणाऱ्या पैसेवाल्या जमीनदारांना दरोडेखोर आणि जाटांनी लुटले. जे वाचले ते काही मथुरेस पळाले तर काही दिल्लीस परतले. अंताजी माणकेश्वर यांना फौजेसह माघार घ्यावी लागली. इकडे दिल्लीत एक वेगळाच प्रकार घडला, इमादुल्मुल्काच्या सैन्याला गेल्या काही महिन्यांच्या धामधूमीमुळे पगार मिळाला नव्हता त्यामुळे त्यांनी बंडाळी केली आणि वजिराला त्याच्याच वाड्यात कैद केले. आता दिल्ली अनाथ झाली आणि हाच मोका साधून नजीब खानाने आपले रोहिला सैन्य दिल्लीत दाखल करीत अब्दालीच्या सैन्यात सामील केले. दि.२८ जानेवारी ५७ रोजी अब्दाली मोठ्या थाटात दिल्लीत प्रवेशला. त्याने आपल्या नावाने खुत्बा पढवला. बादशाहला राजवाड्यातून हाकलून दिले. त्याला २ कोट रुपये हवे होते परंतु वजीराकडे यावेळी एक लाख सुद्धा नव्हते. यावेळी कजाग मुघलांनी बेगम समोर आली व तिनी अब्दालीची कृपादृष्टी मागितली. या मोबदल्यात तिने अब्दालीला राजवाड्यातील सर्व संपत्ती, जनाना आणि दिल्लीतील इतर सर्व माहिती पुरविली. अब्दालीने खुश होवून तिला मुलगी म्हणून स्वीकारले आणि जम्मू-कश्मीर तसेच जालंधर दुआब प्रांत तिला नजर केले. तिने दिल्लीतील सर श्रीमंत लोकांची माहिती तसेच त्यांच्या संपत्ती ठेवण्याच्या जागा सांगितल्या. अफगाणी टोळ्यांनी पुढील काही दिवस दिल्लीत ज्या खाणत्या लावल्या आणि जी लुटमार लावली त्याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे. अब्दाली मुघलांनी बेगमेवर आणखी खुश झाला आणि त्याने तिला आता स्वतःचा मुलगा बनवून “सुलतान मीर्झा” खिताब दिला. आता अब्दाली पिसाळला. दिल्ली पाठोपाठ तो आग्रा आणि मथुरेच्या दिशेने लुट करीत निघाला.

मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध भाग ५

 



मराठेशाहीचा कळस ! अटकेपार भगवा झेंडा !! – पूर्वार्ध
भाग ५
कालचक्रच जणू फिरले ! आणि हिंदुस्थानच्या इतिहासातील सगळ्यात वाईट गोष्ट घडली की नजीब ने आपला भाऊ सुल्तानखान याला अब्दालीकडे रवाना केले आणि मदत मागितली. इमादुल्मुल्काने पंजाबवर असलेली आपली सत्ता उडवल्याचा राग अब्दालीच्या मनात होताच, त्यामुळे त्याने अधिक विलंब न करिता आपली फौज जमा केली व स्वारी करून प्रथम पंजाब ताब्यात घेतले. अब्दालीच्या सैन्याचे नेतृत्व त्याचा पुत्र तैमुरशाह आणि त्याचा मित्र जहानखान करीत होते. लाहोर नंतर सतलज नदी ओलांडून सरहिंद काबीज करताच सैन्याची दुसरी तुकडी घेवून आता अब्दाली थेट दिल्लीच्या रोखाने निघाला. यावेळी होळकर सावनुरास होते व जयाप्पाच्या मृत्यूमुळे शोकग्रस्त शिंदे मारवाडची मोहीम उरकून पुण्यास गेले होते. अब्दाली येतोय हे कळताच दिल्ली हादरली. नादिरशाह आणि खुद्द अब्दाली यांच्या आधीच्या स्वारया, त्यातील कत्तली आणि लुट ह्याशी दिल्लीकर परिचित होते. दिल्लीतील मवासदार आणि मोठे व्यापारी मथुरेच्या रोखाने निघाले. मराठ्यांचा एकच सेनापती यावेळी उत्तरेत ग्वाल्हेरपाशी होता. ते म्हणजे अंताजी माणकेश्वर. अंताजी वजिराचा निरोप मिळताच ते हाताशी असलेले मुठभर सैन्य घेवून दिल्लीला पोचले. अब्दालीचा सेनापती जहानखान हा पंजाबातून सतलज ओलांडून सरहिंद आणि तिथून पानिपत मार्गे दिल्लीत १२ जानेवारी १७५७ रोजी पोचला. त्याचे सैन्य मोठे होते. अंताजीचा निभाव लागू शकला नाही तेव्हा इमादुल्मुल्काने अंताजीना पळून जाणाऱ्या जमीनदारांना रोखण्यास सांगितले. त्याने ठरवले की जमीनदारांना थांबवून त्यांच्या करून रक्कम जमा करून अब्दालीस खंडणी दिल्यास तो परत निघून जाईल.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...