विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 28 February 2023

चक्रधर स्वामीं

 


चक्रधर स्वामींनी महाराष्ट्राची व्याप्ती गोंदिया ते गोवा एवढी मानलेली होती. जेथे जेथे मराठी बोलली जाते तो सर्व महाराष्ट्र प्रदेश अशी त्यांची महाराष्ट्राची सोपी व्याख्या होती. महाराष्ट्राची महती सांगूनच स्वामी थांबले नाहीत तर मराठी भाषेलाही त्यांनी देववाणीचा सन्मान बहाल केला. आपली धर्मतत्त्वे त्यांनी मराठीतूनच सांगितली होती. त्यांच्या शिष्यांनीही धर्माच्या तत्त्वांची चर्चा मराठीतूनच करावी असा त्यांचा दंडक होता. सर्व सामान्य जनांना गीतेतील ब्रह्मविद्या सांगून त्यांनी मराठी भाषेला धर्मसिंहासनी विराजित केले. त्यामुळेच उत्तरकाळात पं. केसीराजासारख्या संस्कृत तज्ज्ञास स्वामींचा सूत्रपाठ संस्कृतातून तयार करण्यास प्रथम आचार्य श्रीनागदेव यांनी मनाई केली होती. नागदेवाचार्य म्हणाले होते, “ ना. गा. केशवदेया ! एणे माझीया स्वामींचा सामान्य परिवारू नागवेल कीं गा ” याचा अर्थ स्वामींचा सामान्य परिवार हा संस्कृत न जाणणारा होता. त्यासाठीच सामान्य जनांच्या बोलभाषेतूनच तत्त्वज्ञान सांगावे असा कटाक्ष पाळणारा एक धर्मपंथ श्री चक्रधरांनी महाराष्ट्रात स्थापन केला होता.
श्रीचक्रधर स्वामी यांचे महाराष्ट्र आणि मराठी भाषेवरचे प्रेम अप्रतिम आहे. यातूनच गेल्या सातशे वर्षात मराठी भाषेत, विविधांगी साहित्यनिर्मिती होऊ शकली. या साहित्यात विपुल काव्य प्रकार आहेत. तसेच नानाविध गद्य वाङ्मयाचे नमुने आहेत. व्याकरण आणि छंदशास्त्रावरचे ग्रंथ आहेत. तसेच असंख्य शब्दकोशही आहेत. तत्त्वज्ञानाला आवश्यक अशी पारिभाषिक शब्दावली मराठीत निर्माण करण्याचे श्रेयही महानुभावीय साहित्यिकांना द्यावे लागते. वाक्य-मीमांसा मराठीत निर्माण करण्याचे अजोड कर्तृत्वही महानुभावांकडेच जाते. अशी बरीचशी नवी आणि विपुल साहित्यसंस्कृती निर्माण करणाऱ्या महानुभाव साहित्यिकांचे प्रेरणास्थान श्रीचक्रधर स्वामी होते...
मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
(सर्वज्ञ श्रीचक्रधर, लेखक- प्रा. पुरुषोत्तम नागपुरे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई )

मराठ्यांच्या शौर्य खुणा:

 


मराठ्यांच्या शौर्य खुणा:
शिरवले (शिरोळे) बुरुज - रोहिडा किल्ला. किल्ल्यावरील शिरवले व वाघजाई बुरुज हे प्रेक्षणीय व चांगल्या स्थितीमध्ये आहेत. आग्नयेस शिरवले बुरुज, पश्चिमेस पाटणे बुरुज, उत्तरेस दामगुडे बुरुज, पूर्वेस फत्ते व सदरेचा बुरुज, तर ज्या बाजूला वाघजाई देवीचे मंदिर आहे त्यास वाघजाई बुरुज हे नाव आहे. पहिल्या तीन बुरुजांस तेथील रक्षणासाठी असलेल्या घराण्यांची आडनावे दिलेली आहेत. शिरवले व वाघजाई बुरुज भक्कम व लढाऊ आहेत. शिरोळे घराण्यातील सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाची साथ दिली. पन्हाळगड ते विशाळगड वाटेतील घोडखिंडीतील लढाईत आपल्या प्राणांची बाजी लावून त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले. बांदल सेना आणि इतर मराठा सेनेचे कौतुक करावे तेवढे थोडे. त्यानंतर शाहिस्तेखानाच्या लाल महालातील हल्ल्याच्या वेळेस सरदार शिरोळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याबरोबर होते व भांबुर्डा (सध्याचे शिवाजीनगर गावठाण - पुणे) येथे महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
संदर्भ: 1)भोर वेल्हे निसर्ग पर्यटन दिनदर्शिका २०२३, 2) ऐतिहासिक भोर एक दृष्टिक्षेप -सुरेश नारायण शिंदे

महार समाजाचा इतिहास

 


महार समाजाचा इतिहास
वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज.
1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते.
2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे.
3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते.
4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे.
5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता.
6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत.
7. महार हे लढवैय्ये (मार्शल रेस) आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करुन महार रेजिमेंटच बनवली. पेशवाईच्या अस्ताचा बहुमान महारांच्याच पराक्रमाकडे जातो.
8. पेशव्यांनीही अंगरक्षक, पहारेकरी म्हणून महारांनाच प्राधान्य दिले होते.
9. महार हे ग्राम, नगर, राज्यात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटील किंवा नगराध्यक्षाला देत. एवढेच नव्हे तर भटक्या जातींचे लोक, उदा. नंदीवाले, गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तव्यास आले तर त्यांची संपूर्ण माहिती घेणे आणि ती पाटलास देणे हे त्यांचे कर्तव्य होते.
10. महारांवर शेतसारा, खजिना योग्य ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी होती.
11. महार समाज अस्पृश्य गणला गेला होता.
थोडक्यात हा समाज आजच्या पोलीस, गुप्तचर आणि महसूल विभागाशी निगडीत कार्ये करत होता. महार या शब्दाची व्युत्पत्ती अनेकांनी शोधली आहे. डॉ. इरावती कर्वे म्हणतात, महार राहतात ते राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. मृताहारी (म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणून) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असेही इरावतीबाईंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही. बुद्ध धर्मात निसर्गतः मृत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे मृताहारी बुद्ध धर्माच्या ज्ञात इतिहासात अगणित झालेले असतील. त्या सर्वांनाच महार म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रात आणि आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे. म्हणजे महार शब्दाचे मूळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.
थोडक्यात हा समाज आजच्या पोलीस, गुप्तचर आणि महसूल विभागाशी निगडीत कार्ये करत होता. महार या शब्दाची व्युत्पत्ती अनेकांनी शोधली आहे. डॉ. इरावती कर्वे म्हणतात, महार राहतात ते राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. मृताहारी (म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणून) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असेही इरावतीबाईंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही. बुद्ध धर्मात निसर्गतः मृत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे मृताहारी बुद्ध धर्माच्या ज्ञात इतिहासात अगणित झालेले असतील. त्या सर्वांनाच महार म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रात आणि आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे. म्हणजे महार शब्दाचे मूळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.
महाआहारी (खूप खाणारे) असणार्या लोकांना महार म्हणू लागले अशी व्युत्पत्ती दि महार फोल्कमध्ये (रोबेर्टसन) दिलेली आहे. ती अर्थातच पटण्यासारखी नाही. दुसरे असे की महार एक जात म्हणून कोणत्याही स्मृती, पुराणांमध्ये उल्लेखिलेली नाही. अस्पृश्यांच्या यादीतही ही जात पुराणे आणि स्मृत्यांनी नोंदलेली नाही. मनुस्मृतीत निषाद, बेण, आयोमेद, आंध्र, चुंचू, धिग्वन या जातींचा उल्लेख आहे. त्यांनी गावाबाहेर राहावे असे म्हटलेले आहे. पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्पृश्य म्हटलेले नाही. तैत्तिरिय ब्राह्मणानुसार आणि विष्णुस्मृतीनुसार फक्त चांडळ ही जात अस्पृश्य आहे. त्यामुळे मुळात जन्मभूत अस्पृश्यता भारतात नेमकी कधी आणि का आली, ते सांगता येत नाही.
मग प्रश्न असा उद्भवतो की की महार ही मुळात जात होती काय? महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?
त्यासाठी आपण महार समाजातील प्रमुख आडनावांकडे एक दृष्टीक्षेप टाकूयात. महारांमध्ये आढाव, आडसुळे, अहिरे, अवचट, भेडे, भिलंग, भिंगार, भोसले, कांबळे, गायकवाड, पवार, कदम, शेळके, शिंदे आदी आडनावे आढळतात. या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीयांतही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते. व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा एकाच समाजघटकातून वेगवेगळ्या जाती विभक्त झाल्या. जाती जन्माधारीत बनत गेल्याने जातीधर्म आणि समाजधर्मात काही विभाजन झाले. हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे. (शिव, विष्णू, विठ्ठल, महलक्ष्मी इत्यादी) त्याचवेळी या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अस्पृश्यतेच्या काळात अन्य मंदिरांत स्थान आणि प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसीत होतात, हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहू शकतो
पहिल्या सहस्त्रांतापर्यंत प्रादेशिक व्यापार मोठय़ा प्रमाणात होत असे. परक्या मुलुखातून जाताना चोर-दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक-पथके व्यापारी सोबत बाळगत असत. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी, प्रामाणिक आणि लढवैय्या अशी राहिलेली आहे. म्हणजेच गावाचे, व्यापार्यांचे रक्षण हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते.
या दोन मुद्द्यांवरुन स्पष्ट दिसते की, महार हा शब्द महारक्षक (वा प्राकृत महारक्खित-महारक्ख) या शब्दाचा कालौघात झालेला संक्षेप आहे. हे विधान ठामपणे करण्याची दोन कारणे आहेत. महार ही जात फक्त महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशातच अस्तित्वात आहे. या भूभागावर सातवाहनांनी साडेचारशे वर्ष इतका प्रदीर्घकाळ राज्य केले. सातवाहनांनी महाराष्ट्री प्राकृत हीच आपली शेवटपर्यंत राजभाषा ठेवली. त्यामुळे जातीनामांवर महाराष्ट्री प्राकृताचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. रक्षणाचे कार्य करणारे रक्ख आणि त्यांचे प्रमुख ते महारक्ख ही उपपत्ती रठ्हांचे प्रमुख ते महारट्ठ (जे नंतर मराठे म्हणून ओळखले जावू लागले. त्यांचीही स्वतंत्र जात बनली.) या उपपत्तीशी सुसंगतपणे जुळते. पदे आलटून-पालटून असल्याने सर्वांनी महारक्ख हे नाव धारण करुन कालौघात क्ख चा लोप होऊन फक्त महार हा शब्द जातीनाम म्हणून कायम झाला असे म्हणता येते.
जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पार पाडत होता त्यावरुन त्यांना महारक्ख हेच पदाभिनाम होते हे अगदी महावंदमधील काही उल्लेखांवरुनही सिद्ध होते. जी कर्तव्ये तत्कालीन राजकीय अस्थिरता, धामधूम तर कधी पूर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती. त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जिवंत राहूच शकत नव्हती.
जात म्हणून उदय
महार समाजाचा जात म्हणून उदय कधी झाला याचे भौतिक, लिखित पुरावे आज आस्तित्वात नाहीत. परंतू समाजेतिहास असे सांगतो, जेव्हा नागरी व्यवस्था आकाराला येते तेव्हाच समाज आपल्यातूनच लढवैय्या व्यक्तींना नागर रक्षणासाठी नियुक्त करतो. युद्धातील सैनिक आणि नागर रक्षक यात मुलभूत फरक असतो. सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रू सैन्यावर तुटून पडण्याचे काम असते. परंतू ग्रामरक्षकाला तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते. शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव, शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधू काळापासून आहे. रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर, अगदी तटावरचे रक्षक असले तरी, लवकर लागावी म्हणून रक्षकांनी गाव, शहराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी. याचे कारण तत्कालीन अर्थव्यवस्था मुख्यतः कृषिप्रधान होती. शत्रू नगर, गावांवर आक्रमण करताना प्रथम शेते जाळतच येत असे. ही प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात अस्तित्वात होती, हे सर्वविदितच आहे. त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत होते. त्यामुळे वेशीबाहेर या बहाद्दर असणार्या रक्षकांची वसती केली गेली असावी. सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख महारक्षक (महारक्ख) पद भूषवत असणे स्वाभाविक आहे. परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तीत झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली. संक्षेपाने तीच जात महार म्हणून ओळखली जावू लागली असे दिसते
. त्या काळात प्रत्येक गावाभोवती तटबंदी, कोट असत. रात्री त्यांचा मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण सत्ता कोणाचीही असो, गावे सुरक्षित नसत. शिवाय गावात लुटालूट- जाळपोळ करत शिरणे हा आक्रमकांचा आणि दरोडेखोरांचाही प्रमुख धंदाच होता. गावाच्या आत राहून गाव रक्षिले जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार मात्र धोका पत्करुन, स्वतः आणि कुटुंबाला उघडय़ावर असुरक्षित ठेवत गावाचे रक्षण करत. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते. अशा वेळी त्यांना प्राणांचे बलिदानही द्यावे लागले आहे. गावोगावी जे भडखंबे सापडतात ते अशाच संरक्षक लढायांत मारल्या गेलेल्यांची स्मारके होत.
2. महार समाज प्राचीन काळी नसला तरी उत्तरकाळात प्रायः गरीबच राहिला आहे. उघडय़ावर राहत असल्याने संपत्तीसंचय करुनही त्यांना उपयोग नव्हताच. तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालून करत तेच गाव त्यांना स्वतः लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते. पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत इतिहासातही दिसत नाही.
3. जमिनींचे, हद्दींचे तंटे महाराच्याच साक्षीने निकाली निघत. एवढे त्यांच्या साक्षीचे महत्व होते. परंतु (अगदी पेशवेकालीन निवाडय़ांतही) महारांनी खोटी साक्ष दिल्याचे एकही उदाहरण नाही.
4. महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे. त्यात त्यांनी कधीही तो सारा मध्येच गायब केल्याचेही एकही उदाहरण नाही.
5. महार समाजावर अस्पृश्यता लादली गेली, अन्याय बंधने लादली गेली, पण हा समाज जात्याच लढवैय्या असूनही आपल्या गावाविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध त्याने शस्त्र उचलले नाही.
या काही मुद्द्यांवरुन अखिल समाजाने महार समाजाबाबत किती कृतज्ञ असले पाहिजे हे लक्षात येइल.
अवनती कशी आणि का झाली?
महार समाजाला नेमके कधी अस्पृश्य ठरवले गेले याबाबत इतिहास मूक आहे. या समाजाची आर्थिक आणि सामाजिक अवनती कशी आणि नेमकी कधी झाली, हे पुराव्यांअभावी ठरवता येणे अवघड आहे. परंतू तर्काने या प्रश्नांचा उलगडा होवू शकतो.
1. गावाचे रक्षण करणार्यांना आणि जे आधी सर्वच समाजघटकांतून आले होते त्यांना आरंभापासून अस्पृश्य मानले गेले असण्याची शक्यता नाही.
2. ज्या काळात भारतांतर्गत आणि विदेशी व्यापारही भरात होता तेव्हा त्या व्यापारी तांडय़ांचे रक्षण करणार्या महाराष्ट्रातील महारांना अस्पृश्य मानले जाण्याची शक्यता नाही. किंबहुना 8व्या शतकापर्यंतच्या स्मृतीही महारांचा अस्पृश्य म्हणून निर्देश करत नाहीत. असे असले तरी महार समाजाची हळुहळू सामाजिक पातळीवर अवनती होत गेली. त्यांच्या सर्व जबाबदार्या पूर्ववत तर ठेवल्याच. पण त्यात अमानुषपणे वाढ केली गेली. त्यामुळे महारांचे कंबरडे मोडले नसले तरच नवल. यामागील कारणांचा वेधही घेणे अत्यावश्यक आहे.
जाती नव्हत्याच
वर्णसंकरातून अस्पृश्य जातींचा विकास झाला हे मनुस्मृतीचे मत मानव वंशशास्त्राने खोटे ठरवले आहे. मनुस्मृतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार, मातंग, धेड, परिया, चिरुमा, नामशुद्र, मेघवाल इत्यादी भारतात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचा साधा उल्लेखही नाही. याचा अर्थ 10व्या शतकानंतर कधीतरी या जातींना अस्पृश्य बनवले गेले.
मार्शल रेस
महार ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदवून ठेवले असेल, याचे हेच कारण आहे की परंपरागतच मुख्यतः संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवय्येपणा, चिकाटी हे मुलभूत गुण त्यांच्यात होते. वेळोवेळी ज्ञात इतिहासातही त्यांनी त्या गुणांचे प्रदर्शन केले आहे. ग्रामव्यवस्थेचे रक्षण करुन त्यांनी हजारो वर्ष कसे अतुलनीय कार्य केले

Monday 27 February 2023

सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर भाग ७


सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012


भाग ७

मराठीतील ख्यातनाम कवी माधव ज्युलियन यांनी पुढील शब्दांत अहिल्याबाईंचा गौरव केला आहे.
“रहस्य दावी इतिहासाची कथा अहिल्याराणीची,
कांचनगंगा वाहवुनी, जी उभवी यशाचा धवलगिरी,
होळकर कुलप्रभा, कोण हो तत्स्मृतीला न धरील शिरी”
ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी म्हटले होते की,
“राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी,
अजुनि नर्मदा जळी, लहरती तिच्या यशाची गाणी.”
यावरुन अहिल्याबाई या थोर मुत्सद्दी, धोरणी राजकारणी, द्रष्ट्या प्रशासक, समाजहितैषि, अखिल भारतीय स्तरावर स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा लौकिक आणि दरारा प्रस्थापित करणाऱ्या महान राज्यकर्त्या होत्या, हे स्पष्ट होते. या लोकमातेचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी झाला. ‘पुण्यश्लोक’ असे सार्थ बिरुद 1907 सालापासून त्यांच्या नावामागे लावले जाऊ लागले असले तरी सर्वश्रेष्ठ प्रशासक ही अहिल्याबाईंची मोहोर आज आपल्या देशाला अधिक प्रेरणादायी आहे

सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर भाग ६

 सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012


भाग ६

इंग्रज कवयित्री जोना बेली यांनी सन 1849मध्ये अहिल्याबाईंचा गौरव करताना म्हटले होते-
“For Thirty years her reign of peace,
The land in blessing did increase,
And she was blessed by every tongue,
By stern and gentle, old and young,
Yea, even children children at their mother’s feet,
Are tought such homely rhyming to repeat,
Kind was her heart and tright her fame,
And Ahlya was her honoured name.”
अबराय मॅके हा प्रसिद्ध इंग्रज ग्रंथकार म्हणतो की, “त्यांचे वर्णन वर्डस्वर्थच्या पुढील शब्दांत करता येईल.
“A Perfect Woman, nobly planned to warm,
To comfort and command,
And yet a spirit still and bright
With something of an angel light.”

सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर भाग ५

 


सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012

भाग

समकालीन व त्यानंतरच्या काळात देशविदेशांतील अनेक कवी, साहित्यकारांनी अहिल्याबाईंचा गुणगौरव केल्याचे दिसते.
शाहीर प्रभाकर म्हणतात,
“धन्य धन्य अहिल्याबाई।
गेली कीर्ती करूनिया, भूमंडळाचे ठायी॥
महाराज अहिल्याबाई, पुण्यप्राणी।
संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्नखाणी॥
संसार चालवी दीनदुबळ्यांची आई।
जेविल्या सर्व, मगच आपण अन्न खाई॥
बांधिले घाट-मठ-पार। कुठे वनात पाणी गार॥”
हिंदी कवी श्रीधर चौबे यांनी सन 1789मध्ये लिहिले होते की,
“यावतचंद्रदिवाकर गंगाजल बहाई।
धनी धन्य अहिल्यामाई।
ध्रुव कैसो, अटल राज रहे।
प्रजा परिजन सुहाई॥”

सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर भाग ४

  सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012


भाग ४

ग्रंथप्रेमी :
अहिल्याबाई स्वतः ग्रंथप्रेमी होत्या. त्यांनी त्याकाळात स्वतःचे फार मोठे दर्जेदार ग्रंथालय उभे केले होते. त्यात शेकडो ग्रंथ आणि पोथ्या जमवल्या होत्या. विशेष म्हणजे दररोज रयतेसोबत स्वतः बसून त्या जाणकारांकडून सामूहिक ग्रंथवाचन करून घेत.
अहिल्याबाई मुत्सद्दी होत्या. अष्टावधानी होत्या. त्यांनी आपले वकील भारतभर नेमले होते. त्यामुळे प्रत्येक राज्यातल्या बातम्या त्यांना तात्काळ कळत असत आणि त्यानुसार त्या आपल्या राजकारणाची दिशा ठरवत असत.
त्यांच्या दानधर्माची कीर्ती देशभर पसरली होती. त्यांनी हिमालयाच्या केदारनाथपासून दक्षिणेच्या रामेश्वरपर्यंत आणि जगन्नाथ पुरी ते द्वारकेपर्यंत मंदिरे, घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे, पाणपोया उभारल्या.
बाईंनी खांद्यावर पेललेली होळकरशाही हा मराठा साम्राज्याचा मोठा आधारस्तंभ होता. सन 1780 साली त्यांचे भारतातील स्थान इतके वरचे होते की, दिल्लीचे पातशहा त्यांना वचकून असल्याचे अस्सल पत्रांवरुन दिसते.
पाश्चात्य इतिहासकार लॉरेन्स याने अहिल्याबाईंची तुलना अकबराशी केली असून, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, रशियाची राणी कॅथरिन आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्यापेक्षा त्या अनेक सद्गुणांनी श्रेष्ठ होत्या, असे म्हटले आहे.
अहिल्याबाई उत्तम हिंदी बोलत आणि लिहीत. एका पत्रात त्या म्हणतात, “अठाका समाचार भला छे। राज का सदा भला चाहिजे। कोई तरह की दिक्कत होने पावे नहीं।”
पेशव्यांनीही होळकरांच्या कारभाराची स्तुती केल्याचे आढळते. “मातब्बर सरदार मोठे दाबाचे होते. शिंद्यांची तो सरदारी मोडीस आली. होळकर तिकडे होते, तेणे करून राज्यात वचक होता.” हे पेशव्यांचे प्रमाणपत्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.

सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर भाग ३

 
सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012


भाग ३
प्रजाहितदक्षतेची उदाहरणे :
महेश्वरच्या रयतेकडून राघोबादादा पेशव्यांनी एकदा आठ बैल नेले. अहिल्याबाईंना हे कळताच त्यांनी त्या रयतेला प्रत्येकी आठ रुपये या प्रमाणे 64 रुपये स्वतःच्या तिजोरीतून भरपाई दिली.
कल्लू हवालदार या शिपायाची मोठी रक्कम भिकनगावी चोरी गेली होती. इतक्या छोट्या गोष्टीतही त्यांनी स्वतः लक्ष घातले आणि कल्लू हवालदाराला न्याय मिळवून दिला.
चांदवडच्या मामलेदाराने रयतेला त्रास दिल्याची अहिल्याबाईंकडे तक्रार आली. त्यांनी मामलेदाराला कडक शब्दांत ताकीद दिली. “कै. सुभेदार रयतेचे उत्तम संगोपन करीत होते. रयतेला तुम्ही कोणत्याही प्रकारे त्रास देता कामा नये. त्यांची मने सांभाळून त्यांच्याकडे लक्ष देणे. फिरून जर बोभाट कानावर आला तर, परिणाम फार वाईट होतील, हे समजावे.” यावरुन, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रसंगी फटकारण्याची त्यांची वृत्ती स्पष्ट व्हावी. राज्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई यशस्वी होत्या. पेशव्यांच्या दरबारात त्यांना सर्वोच्च मान होता. बाईंचा सगळ्या कारभाऱ्यांवर वचक होता. प्रशासनावर घट्ट मांड होती.
मकाजी गीते हे मराठ्यांचे मेवाडमधील वसुली अधिकारी होते. तेथील जनता त्यांना वसूल द्यायला तयार नव्हती. जनतेने लेखी मागणी केली की, “दख्खन्यांमध्ये आम्ही फक्त मातोश्री अहिल्याबाईंच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. त्यांच्याकडून आम्हाला पत्र आल्यास आम्ही तुमचा भरवसा धरू.”

सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर भाग २


सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012


भाग २

अहिल्याबाई- द्रष्ट्या प्रशासक :
अहिल्याबाईंची प्रतिज्ञा होती की, “माझे कार्य माझ्या प्रजेला सुखी करणे हे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे येथे मी जे जे काही करीत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब परमेश्वर मला विचारणार आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविल्या आहेत, त्या साऱ्या मला पार पाडावयाच्या आहेत.”
अहिल्याबाईंचा प्रत्येक लहानसहान व्यवहारही प्रजेचे हित बघून होत होता. त्याचे शेकडो कागदोपत्री पुरावे आज उपलब्ध आहेत. आपला प्रदेश मक्त्याने देताना त्या पुढीलप्रमाणे अटी घालत असत. 1) रयत राजी राखणे 2) राज्य समृद्ध करणे 3) नेमणुकी व खर्चाच्या मर्यादेतच खर्च करणे 4) लष्कराने पायमल्ली केल्यास कठोर दंड केला जाईल. 5) अफरातफर झाल्यास कडक शिक्षा केली जाईल.
अहिल्याबाई स्वतः न्यायनिवाडे करीत. प्रश्न सोडवित. पडीक जमिनी लागवडीखाली आणीत. शेतात विहीरी खोदून देत. सरकारी हिशोब स्वतः तपासून एकेक खाते सोलून बघत. अहिल्याबाईंनी प्रत्येक विभागाची आणि शाखेची नव्याने रचना केली. शेतसारा आणि करवसुलीची पद्धत बदलली. नवी घडी बसविली. नवे कायदे केले. त्या शेतकऱ्यांना वार्षिक 12 टक्के दराने शेतीसाठी कर्ज देत. व्यापार, वाहतूक, उद्योग वाढीला प्रोत्साहन देत. त्यामुळे महेश्वर हे विणकरांचे अखिल भारतीय केंद्र बनले. व्यापार आणि उद्योगाचे सुप्रसिद्ध ठिकाण बनले.

सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर भाग १

 
सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012


भाग १

महाराष्ट्राने आधुनिक काळात देशाला अनेक उत्तम प्रशासक दिले आहेत. ही परंपरा आपण इतिहासातून घेतलेली आहे. इंग्रज इतिहासकारांनी अहिल्याबाई होळकर या संपूर्ण भारतातील 18व्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासक होत्या, असे सार्थ वर्णन केले आहे.
होळकर घराणे मूळचे फलटणजवळच्या होळ गावचे, म्हणून ते होळकर. या घराण्यातील आद्य व थोर योद्धे मल्हारराव होळकर यांचा जन्म सन 1693च्या मार्चमध्ये झाला. मराठा राज्यामध्ये त्यांचा विशेष दरारा होता. मल्हारराव हे धूर्त व मुत्सद्दी राजकारणी होते. ‘भाऊसाहेबांची बखर’ या ग्रंथात त्यांच्या चरित्रातील एक मार्मिक प्रसंग वर्णिलेला आहे. पेशव्यांनी शिंद्यांना तातडीचा खलिता पाठवला, ज्यात होळकरांना सोबतीला घेऊन रोहिल्यांना खतम करण्याचा आदेश दिला होता. शिंदे मल्हाररावांना भेटले आणि त्यांनी तातडीने युद्धभूमीवर येण्यासाठी विनंती केली. मल्हारराव त्यांना म्हणाले, शिंदे, तुम्हाला राजकारण कळत नाही. रोहिले मेले तर, पुण्याचे पेशवे तुम्हा-आम्हांस धोतरे बडवावयास व भांडी घासावयास ठेवतील. लक्षात ठेवा, शत्रू जिवंत आहे, तोवरच धन्याला तुमची-आमची किंमत आहे.
सन 1723मध्ये मल्हाररावांना खंडेराव हा मुलगा झाला. चौंडी गावचे माणकोजी शिंदे यांचे पोटी 31 मे 1725 रोजी अहिल्याबाईंचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे खंडेरावांशी लग्न झाले आणि त्या मल्हाररावांच्या सून बनल्या. 17 मार्च 1754 रोजी कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांचा मृत्यू झाला. अहिल्याबाई विधवा झाल्या. खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी सूनेलाच मुलगा मानले. त्या मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. अहिल्याबाईंना मालेराव आणि मुक्ताबाई ही दोन मुले होती. मल्हारराव आणि अहिल्याबाई, हे नाते सासरा-सुनेचे असले तरी ते तिहेरी होते. 1) गुरू-शिष्य, 2) बाप-लेक, 3) स्वामी-सेवक.
लढवय्ये मल्हारराव 20 मे 1766 रोजी मृत्यू पावले. त्यानंतर राज्यकारभाराची सगळी सूत्रे अहिल्याबाईंकडे आली. त्यानंतर पुढे सुमारे 30 वर्षे अहिल्याबाईंनी राज्यकारभार केला. इंदूर ही मल्हाररावांची राजधानी होती. अहिल्याबाईंनी मात्र ती तेथून नर्मदाकाठच्या महेश्वरला हलविली.

कराडचे सरदार डुबल घराणे भाग ४



कराडचे सरदार डुबल घराणे भाग
अग्नोजींचे वंशज सध्या धुळगाव येथे वास्तव्यास आहेत. अग्नोजींना माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांनी दंडोबाच्या पायथ्याशी कपटाने मारले. त्यानंतर त्यांच्या पत्नी ताराबाई सती गेल्या. त्यांची समाधी मिरजेत आहे.चारशे वर्षांची लष्करी परंपरासाळोखे-डुबल घराण्याला चारशे वर्षांहून अधिक काळाची लष्करी परंपरा आहे. बाळोजी, शिदोजी, शिवाजी, अग्नोजी, नाथाजी, आनंदराव, हणमंतराव, अमृतराव या व्यक्तींनी मराठेशाहीत पराक्रम गाजवला. साळोखे-डुबल घराण्याची पराक्रमाची ही परंपरा मराठेशाहीच्या अस्तानंतर आजतागायत टिकून आहे. पहिल्या महायुध्दात धुळगांवच्या रामचंद्रराव बळवंतराव आणि ज्ञानोबा बळवंतराव यांनी मोठा पराक्रम गाजवला. रामचंद्र यांनी पहिल्या महायुध्दात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पदके मिळाली होती. दुसरे महायुध्द, भारत-चीन युध्द, भारत-पाकिस्तान युध्द, कारगील युध्द अशा विविध लढायांत डुबल घराण्यातील व्यक्तींनी पराक्रम गाजवला आहे. सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात धुळगांव येथील विश्वासराव डुबल हे शहीद झाले. आजही कराड, बांबवडे, नरवाड, चरेगाव, धुळगांव येथील 250 हून अधिक डुबल व्यक्ती लष्करात विविध पदांवर कार्यरत आहेत.स्वातंत्र्यलढय़ात सहभागडुबल घराण्याने मराठेशाहीत स्वराज्य रक्षणासाठी काम केले. ब्रिटीशकाळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी डुबल घराण्यातील व्यक्तींनी काम केले आहे. कराड, चरेगाव, धुळगांव येथील काही व्यक्तींनी चलेजाव चळवळीत सहभाग घेतला. भूमिगत देशभक्तांना डुबल मंडळींनी आश्रय दिला होता.

कराडचे सरदार डुबल घराणे भाग ३



कराडचे सरदार डुबल घराणे भाग
शिवाजी साळोखेही आपल्या पित्याप्रमाणे पराक्रमी होते. त्यांनी उदाजी चव्हाणासह, अन्य सरदारांचे हल्ले परतवून लावले. मिरज प्रांत आणि किल्ल्याचे संरक्षण केले. 1755 पर्यंत मिरजेचा किल्ला आणि प्रांत शिवाजी साळोखेंच्या ताब्यात होता. त्यानंतर पेशव्यांनी मिरज किल्ला माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांच्या ताब्यात दिला.शिवाजी साळोखे-डुबल यांनी त्यानंतर कर्नाटक प्रांतातील हैदरवरील स्वाऱयांत सहभाग घेतला. या स्वारीत असतानाच तुंगभद्रेनजीक त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सुपूत्र नाथाजीराव हेही पराक्रमी होते. त्यांनी कर्नाटकातील मोहिमांमध्ये सहभाग घेतला.सरदार अग्नोजी साळोखेशिवाजी साळोखेंचे धाकटे बंधू अग्नोजी साळोखे हेही पित्याप्रमाणे शूर होते. त्यांना धुळगाव येथे सरंजाम नेमून देण्यात आला होता. अग्नोजी साळोखेंना धुळगांवजवळील काही गावे मोकासा दिली होती. सोनीचे ठाणे काही काळ अग्नोजींकडे होते. उदाजी चव्हाणावरील लढायात अग्नोजी अग्रभागी होते.

कराडचे सरदार डुबल घराणे भाग २



कराडचे सरदार डुबल घराणे भाग
कराड पेठेचे महाजनपद आणि देशचौगुले वतनकराड हे प्राचीन काळापासून व्यापारासाठी प्रसिध्द होते. सातवाहनकालापासून येथे मोठा व्यापार होता. त्यामुळे कराडची पेठ त्याकाळात संपूर्ण देशभरात प्रसिध्द होती. या प्रसिध्द पेठेचे महाजनपद डुबल घराण्याकडे होते. सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीतझालेल्या पालीच्या महजर (निवाडा) मध्ये साक्षीदारांच्या यादीत शिवाजी बिन बाळोजी डुबल यांचे नाव आढळते. त्यामुळे शिवपूर्वकालापासून कराडचे महाजनपद या घराण्याकडे होते, असे अनुमान बांधता येते. बाळोजी साळोखे हे या घराण्याचे मुळपुरूष होत. महाजनपदाबरोबरच कराड प्रांतातील देशचौगुलेपणाचे वतनही या घराण्याकडे होते. सध्याच्या कराड, पाटण आणि सांगली जिल्हय़ातील काही गावे या देशचौगुले वतनासाठी डुबल घराण्याकडे असल्याचे आढळते.छत्रपती शाहूंचे आप्तबाळोजी डुबल (दुसरे) यांच्या पत्नी राणूबाई आणि साताराचे छ. शाहूंच्या पत्नी सकवारबाई या बहिणी होत. या आप्तसंबंधामुळे बाळोजींचा सातारच्या दरबारात प्रवेश झाला. तेथे त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि कामाने छ. शाहूंचा विश्वास संपादन केला. सेना पंचसहस्त्री हा किताब मिळवला. तत्कालीन अनेक लढय़ात बाळोजींनी सहभाग घेतला.मिरजेचे किल्लेदारपदछ. शाहूंनी 1739 साली मिरजेच्या किल्ल्यावर स्वारी करून हा किल्ला मोगलांच्या ताब्यातून जिंकून घेतला. यानंतर त्यांनी हा किल्ला आणि मिरज प्रांताचा कारभार बाळोजींकडे सोपवला. सन 1745 पर्यंत बाळोजींनी मिरज प्रांतांचा कारभार नेटाने केला. बंडखोर सरदार उदाजी चव्हाण याच्या स्वाऱया परतवून लावल्या. मिरज प्रांताची घडी नीटबसवली. मिरज किल्ला ताब्यात घेण्यापूर्वी बाळोजींना छ. शाहूंकडून तासगांव गाव मोकासा इनाममिळाले होते. तर, मिरज तालुक्यातील गुंडेवाडी हे गावही पूर्ण इनाम मिळाले. बाळोजींनी आपले कुलदैवत असणाऱया म्हसवड येथील सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोध्दार केला. बाळोजींचे बंधू शिदोजी हे उंबरच्या स्वारीत धारातीर्थी पडले. त्यांच्या या कामगिरीचे स्मरण म्हणून छ. शाहूंनीबाळोजींना चरेगाव इनाम दिले.सरदार शिवाजी साळोखेबाळोजींचा मृत्यू 1745-46 च्या सुमारास झाला. त्यानंतर त्यांचे सुपूत्र शिवाजी साळोखे (दुसरे) हे काम पाहू लागले

कराडचे सरदार डुबल घराणे भाग १


 कराडचे सरदार डुबल घराणे भाग १
स्वराज्य रक्षणासाठी दक्षिण महाराष्ट्रातील ज्या सरदार घराण्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यामध्ये कराडच्या साळोखे-डुबल घराण्याचा अग्रकमाने आहे. सातारा आणि सांगली जिल्हय़ात वास्तव्यास असणाऱया या घराण्याचा सुमारे 400 वर्षांहून अधिक कालखंडाचा इतिहास
स्वराज्याच्या उदयकाली महाराष्ट्रात अनेक लढवय्यी घराणी निर्माण झाली. त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्त्वाने मराठेशाहीत आगळा ठसा उमटवला. या घराण्यांमध्ये कराडच्या साळोखे-डुबल घराण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. साताराच्या छत्रपती शाहू महाराजांचे आप्त असणाऱया या घराण्यातील व्यक्तींनी प्रसंगीप्राणांची आहूती देऊन स्वराज्यरक्षण केले आहे. या घराण्याच्या शाखा कराड, धुळगाव, बांबवडे, चरेगाव, नरवाड येथे आहेत. या घराण्याला 400 वर्षांहून अधिक काळचा इतिहास आहे.साळोखे-डुबल घराणे हे गुजरातच्या चालुक्यांचेवंशज आहेत. शिवपूर्वकालात हे घराणे महाराष्ट्रात आले असावे. हे घराणे पहिल्यांचा कराड येथे स्थायिक झाले. त्यानंतर या घराण्यातीलव्यक्तींनी आपल्या कर्तृत्त्वाने विविध अधिकारपदे मिळवली. कराड पेठेचे महाजनपद, कराड प्रांताचे देशचौगुले वतन, मिरजेच्या भुईकोट किल्ल्याचे किल्लेदारपद, सांगली संस्थानचे सरंजामदार अशा अनेक पदावर डुबल घराण्यातील व्यक्ती कार्यरत होत्या. आजही हे घराणे राजकारण, समाजकारणात कार्यरत आहे

सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख ) भाग ८

 


सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग

विशेष नोंदी
१५ सप्टेंबर १९५१ रोजी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे नामकरण आय. एन. एस आंग्रे असे करण्यात आले. कान्होजी आंग्रे यांच्या निर्विवाद कर्तृत्वाचा हा मानबिन्दू होता. दक्षिण मुंबईतील ओल्ड बाँबे कॅसल येथील नौदलाच्या आवारात कान्होजी आंग्र्यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे.
एप्रिल १९९९ मध्ये भारतीय टपाल खात्याने कान्होजी आंग्रेंवर एक तीन रूपयांचे तिकीट जारी केले. त्यात कान्होजी आंग्र्यांच्या काळातील एका जंगी जहाजाचे चित्र आहे.
खांदेरी बेटावरील ओल्ड केनेरी दीपगृहाचे कान्होजी आंग्रे दीपगृह असे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्तिलायजर्सच्या निवासी कॉलनीचे नामकरण सरखेल कान्होजी आंग्रे नगर असे करण्यात आले आहे.
२००७ च्या “पायरेट्स ओफ द कॅरीबियन – अ‍ॅट द वर्ल्ड्‌स एन्ड” या इंग्रजी चित्रपटात “श्री संभाजी आंग्रिया” हे नऊ कुप्रसिद्ध सागरी चाच्यांपैकी एक दाखवले आहेत. कान्होजी आंग्रेवरूनच हे नाव त्यांनी उचलले असेल यात शंकाच नाही..[
ललित साहित्यातील उल्लेख
कान्होजी आंग्रे(कादंबरी) लेखिका देसाई मृणालिनी
कान्होजी आंग्रे (कादंबरी-भाषांतर) लेखक: पु. ल. देशपांडे Publisher: सन पब्लिकेशन्स
कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची श्री. मनोहर माळगावकर यांची इंग्रजी कादंबरी
सेना सरखेल कान्होजी आंग्रे (चरित्र) लेखक:नाईक कृष्णकांत विद्यार्थी प्रकाशन,
Photo: सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख ) भाग ८ विशेष नोंदी १५ सप्टेंबर

सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख ) भाग ७


सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग
वारसा

कान्होजींच्या काळात त्यांनी विदेशी सत्तांना सागरी कि

नाऱ्यावर मोठे आव्हान निर्माण केले होते. ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचे त्यांत प्रचंड नुकसान झाले. भारतातील त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर अंकुश लावग. दुर्दैवाने कान्होजींच्या मृत्यूंनंतर त्यांच्याएवढा शूर आणि यशस्वी दर्यावर्दी भारतात निर्माण झाला नाही आणि ब्रिटिशांनी हळूहळू पूर्ण भारताचा कब्जा घेतला
वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारताच्या सागरी सीमेचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे कान्होजी त्या काळीच ओळखून होते.
त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्याकडे ब्रिटिशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते. त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाची हिम्मत नव्हती. आपल्या आरमारात काही विदेशी सरदारांनाही त्यांनी बाळगले होते.
अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय एन एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे.

सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख ) भाग ६

 


सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग
मृत्यू

४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यावेळी सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. त्यांचे दोन पुत्र शेखोजी आणि संभाजी आणि तीन अनौरस पुत्र तुळाजी, मानाजी आणि येशाजी ह्यांच्याकडे त्यांच्या आरमाराची जबाबदारी आली, पण त्यांना कान्होजींची सर आली नाही. कान्होजी नंतर शेखोजीने १७३३ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत काही प्रमाणात आरमाराची धुरा सांभाळत पराक्रम गाजवला. शेखोजीच्या मृत्यूनंतर संभाजी आणि मानाजी या बंधूंत वाद होऊन आरमाराचे दोघांत विभाजन झाले. पुढच्या काळात या सागरी शक्तीकडे मराठ्यांचे दुर्लक्ष झाले आणि ब्रिटिशांनी संधी साधून हळूहळू आपले पाय कोकण किनारी पसरवण्यास सुरूवात केली. १७५६ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांच्या मदतीने घेरियावर (आताचा विजयदुर्ग) हल्ला करून कान्होजींचा शेवटचा वंशज तुळाजीला पकडले, आणि कान्होजींचे आरमार संपुष्टात आंअले.

सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख ) भाग ५



सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग

प्रमुख लढाया
१७०२ – कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
१७०६ – जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
१७१० – ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (आताचे खांदेरी) कब्जा.
१७१२ – मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज पकडले. ३०००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
१७१३ – ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
१७१७ – ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल. ६०००० रुपयांची खंडणी वसूल केली.
१७१८ – मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
१७२० – ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.
१७२१ – अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा हल्ला असफल.
१७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्

सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख ) भाग ४

 


सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग ४

मोहिमा
कान्होजींनी आपल्या कारकीर्दएत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.
२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.
१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले.साचा:अपूर्णवाक्य( नेमके कोण इंग्लंडला परतले ?) त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेऊन खटला चालविण्यात आला. याच दरम्यानसाचा:काल सापेक्षता गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली

सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख ) भाग ३

 


सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग ३
सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )

नाविक तळ
१६९८ मध्ये कान्होजींनी आपला पहिला नाविक तळ विजयदुर्ग या सागरी किल्यावर स्थापन केला. हा किल्ला मुंबईपासून केवळ ४२५ कि.मी. अंतरावर असल्याने त्या बंदरावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्याला घेरिया या नावानेही ओळखले जाई. अखंड जहाज किल्याच्या आत घेण्याची सुविधा या किल्यात होती.
मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसुल करायला आरंभ केला.
१७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली.
अंदमान बेटांवरही कान्होजींचा तळ असल्याचा उल्लेख आहे. ही बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते

सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख ) भाग २

 


सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग २
कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने ’तुझ्या अंगार्‍याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेऊ त्याप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बरेच बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्लाच पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणापासूनच समु सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.

१६९८ मध्ये साताराच्या भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन,मुंबई पासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहर च्या ताब्यातले जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिले. कान्होजींनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.
१७०७ मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणार्‍या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्याबाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हटले जाते.
कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली.

सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख ) भाग १



सरखेल कान्होजी आंग्रे ( मराठ्यांचे नौदल प्रमुख )
भाग

कान्होजी आंग्रे
जन्म इ.स. १६६९ हर्णे, जिल्हा - रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू जुलै ४, इ.स. १७२९ कुलाबा किल्ला, अलिबाग, महाराष्ट्र, भारत.
टोपणनावे सरखेल
पदवी हुद्दा आरमार प्रमुख
कार्यकाळ १६९८ - १७२९
सरखेल कान्होजी आंग्रे. (ऑगस्ट १६६९ ते ४ जुलै १७२९). सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते
कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला
परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. १६ व्या शतकात कुंजली मरक्कर यांनीही परकीय सत्तेविरुद्ध असाच पराक्रम गाजवला होता
इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.

मराठ्यांचे नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांची समाधी


 मराठ्यांचे नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांची समाधी

१७ व्या शतकात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवलेले अलिबाग हे जिल्ह्याचे प्रमुख स्थान असून हे समुद्रकाठचे उत्तम विश्रांती स्थळ आहे. अली नावाच्या धनिकाच्या बागांमुळे अलिबाग नाव पडले.
या स्थानी बऱ्याच समुद्री लढाया गाजल्या. १७०६ मध्ये वरसोली येथे कान्होजी आंग्रे आणि जंजिऱ्याचा सिद्दी यांचे युद्ध झाले. १७२२ मध्ये कुलाबा किल्ल्याच्या युद्धात इंग्रज आणि पोर्तुगीजांचा पराभव झाला. १७३० मध्ये चौल येथील युद्धात साखोजींनी ब्रिटीशांचा पराभव केला. कान्होजी आंग्रे यांनी स्वतःचे "अलीबागी रुपैय्या' असे चांदीच्या नाण्यांचे चलनही प्रचलित केले होते.
कुलाबा जलदुर्ग, चुंबकीय वेधशाळा, गणपती, मारुती व महादेवाची भव्य मंदिरे, मराठ्यांचे नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांची समाधी,

१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १६


  १४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १६
संजय सोनावणे
या चढाईने रोहिल्यांच्या पदरात काय पडले ? युद्धाच्या आरंभी रोहिल्यांची फौज अठरा ते वीस हजाराच्या दरम्यान होती. यातील हजार - पाचशे लोक आरंभी गारद्यांच्या तोफांमुळे निकामी झाले असावेत. पुढे काहीजण, मराठी स्वारांशी लढताना ठार वा घायाळ झाले तरी अशांची संख्या पाचशेपेक्षा कमी किंवा हजारपेक्षा जास्त असणे शक्य नाही. सारांश, जवळपास सतरा - अठरा हजार रोहिले गारद्यांवर चालून गेले असे म्हणता येईल. त्यापैकी तीन ते पाच हजाराच्या आसपास लोक, गारदी सैनिकांच्या बंदुकींना बळी पडले असतील. पुढे गारद्यांशी झालेल्या हातघाईच्या लढाईत देखील जवळपास पाच ते सहा हजार मनुष्य जखमी / मृत झाले असतील. याचा अर्थ असा होतो कि, दुपारी एकच्या सुमारास रोहिला सैन्य जेव्हा परत आपल्या मोर्च्यात येऊन उभे राहिले, त्यावेळी त्याची संख्या आठ - दहा हजारांच्या दरम्यान असावी. थोडक्यात, मोठ्या प्रमाणावर आपली माणसे मारून घेण्यापलीकडे, रोहिला सरदारांच्या पदरात फारसे यश पडले नाही असे प्रथमदर्शनी तरी दिसून येते. परंतु अधिक विचार करता, रोहिल्यांना या चढाईत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असावे असे वाटते.
पानिपत मोहिमेत सहभागी झालेल्या गारदी सैन्याची संख्या एकूण किती होती याविषयी विश्वसनीय अशी माहिती मिळत नाही. उदगीर मोहिमेत गारद्यांचे पथक पाच हजारांचे होते असा उल्लेख शेजवलकर करतात. पुढे उत्तर हिंदुस्थानात जायचे ठरल्यावर त्यात आणखी भर घालून ते आठ हजाराचे बनवण्यात आले. पुढे या सैन्यात आणखी भरती झाली असल्याची माहिती उपलब्ध नाही. त्याशिवाय या सैन्याचे स्वरूप देखील फारसे स्पष्ट होत नाही. कवायती पलटणे म्हटल्यावर त्यासोबत काही हजार स्वारांचा रिसाला असतो. इब्राहिमच्या पलटणींसोबत असा रिसाला होता का ? काशीराजच्या मते, इब्राहिमकडे दोन हजार स्वार होते. परंतु कैफियतीमध्ये असा उल्लेख आढळत नाही. पानिपत लढाईची उपलब्ध वर्णने पाहता, इब्राहिमजवळ दोन हजार स्वारांचा रिसाला असावा असे वाटत नाही. एखादवेळेस, त्याच्याकडे स्वारांचे लहानसे पथक असू शकते. जर काशीराजच्या मतानुसार, इब्राहिमकडे दोन हजार स्वारांचा रिसाला असता तर, रोहिला सैन्य सहजासहजी माघार घेऊ शकले नसते. गारद्यांच्या घोडदळ पथकाने त्यांची कत्तल उडवली असती. परंतु, असे काही झाल्याचा उल्लेख नसल्याने व रोहिला सैन्य देखील यशस्वीपणे माघार घेऊन आपल्या मोर्च्यात उभी राहिल्याने, गारदी पलटणींसोबत दोन हजार स्वारांचा रिसाला नसल्याचे सहज सिद्ध होते. पानिपत युद्धाच्या वेळी इब्राहिमकडे सामान्यतः आठ ते नऊ पलटणी असाव्यात. त्यातील दोन त्याने अफगाण सैन्याच्या समाचारासाठी डाव्या बाजूला ठेवल्या होत्या तर उर्वरीत सात पलटणींच्या मदतीने त्याने रोहिल्यांच्या सामना केला. रोहिला फौजेचा सामना करून त्यांना पळवून लावण्यात गारदी यशस्वी झाले. पण या संघर्षात त्यांच्या जवळपास पाच पलटणी निकालात निघाल्याने त्यांचे सामर्थ्य देखील खच्ची झाले. फिरून लढाईला उभे राहण्याचा प्रसंग उद्भवला तर अवघ्या तीन - चार पलटणी हाताशी असल्याने, त्यांना शत्रूचा मुकाबला करणे तितकेसे सोपे जाणार नव्हते. याचा अर्थ असाही होतो कि, मराठी सैन्याची डावी बाजू यावेळी निकालात निघाली नसली तरी पक्षाघात झाल्याप्रमाणे ती काहीशी लुळी पडू लागली होती. गारदी सैन्याची हि स्थिती पाहता, रोहिल्यांची चढाई पूर्णतः नसली तरी अंशतः यशस्वी झाल्याचे दिसून येते. जरी गारद्यांनी, रोहिला सैन्याला पळवून लावले असले तरी त्यांचा मोर्चा कायम होता. आपल्या मोर्च्याच्या आधाराने त्यांना फिरून फळी बांधून, गारद्यांवर चढाई करण्यास मोकळीक राहिली.

Sunday 26 February 2023

परशुराम मंदिरातील अवलादीविरुद्ध वीर मराठा कर्णधार नानाराव सुर्वे यांचा ऐतिहासिक सूड

 


परशुराम मंदिरातील अवलादीविरुद्ध वीर मराठा कर्णधार नानाराव सुर्वे यांचा ऐतिहासिक सूड
———————————————————————
मराठ्यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या अनेक साग आहेत जे देशाला प्रेरणा देईल. कोकणातील तुळसणी गावचे मराठा योद्धा नानाराव सुर्वे यांच्याबद्दल असे एक जेथे माझी आजी सुद्धा एक सुर्वे होती.
1726 साली शिवाजी महाराजांचा नातू छ. शाहू सातारा येथून राज्य करत असताना बाजीराव पेशवा होता. आदरणीय संत ब्रह्मेंद्र स्वामी परशुराम यांच्या तीर्थक्षेत्रावर जंजिरा नवाब सिदी सातच्या नेग्रो मुस्लिम जनरलच्या विजेच्या धाडाने लुटला होता. त्याने एका खऱ्या आयकॉलास्टप्रमाणे मंदिर नष्ट केले.
छ.शाहू पासून सकल मराठा आरक्षणाचा भक्त असणाऱ्या ब्रह्मेंद्र स्वामींनी सिदी सात विरुद्ध सूड सुनावले पण विविध कारणांमुळे सहा वर्षे काहीच करता आले नाही. पण या काळात बदला घेण्याची आग कधीच गेली नाही. अखेर 1732 साली एका धाडसी मराठा कमांडर नानाराव सुर्वे यांनी सिदी सातच्या आस्थापनेवर वेगवान धाड मारली,त्या लढाईत २७ जखमा भोगत असताना त्याचे शिर कापून घेतले. सुर्वेच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी सकल मराठा राष्ट्र उत्साहात छ.शाहू यांनी भेट दिली व तसेच जागीर येथील कुसगाव या गावात.
तुळसणी गावाच्या सुर्वे कुळीचा दर्जा मराठा समाजामध्ये नानारावच्या कामगिरीने वाढला आणि तुळसणीच्या सुरवेनंतर संपूर्ण भारतभरात उच्चवर्गीय मराठा कुटुंबांशी वैवाहिक संबंध जोडले गेले. महान कर्माचा परिणाम असा असतो.
खाली टिपलेल्या आणि हाताने बांधलेल्या सिडी सातच्या आधी नणाराव सुर्वे यांचा एक कलाकाराचा रुबाब आहे. पण हे स्केच चुकीचे ठेवले आहे आणि केवळ काल्पनिक आहे कारण प्रामाणिक इतिहास आपल्याला सांगतो की नेग्रो मुस्लिम जनरल खरोखर एका भयंकर लढाईत शिर कापून टाकण्यात आले होते.

Tuesday 21 February 2023

शनिवारवाड्याला लागलेल्या आगी आणि पेशव्यांचा अल्पवयीन वाडा

 


शनिवारवाड्याला लागलेल्या आगी आणि पेशव्यांचा अल्पवयीन वाडा
मराठा साम्राज्याच्या इतिहासात शनिवारवाडा ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने महत्वाची आणि नशीबवान वास्तू आहे. शनिवारवाड्याने विजयाचे आनंद अनुभवले तसेच काही दुर्दैवी प्रसंगही अनुभवले आहेत. शनिवारवाड्याच्या सुखदुखाच्या या घटना इतक्या भरमसाट आहेत कि विस्तारभयास्तव त्याची येथे नोंद घेणे शक्य नाही. एका किंवा काही घटनेची नोंद घ्यावी तर दुसऱ्या अनेक नोंदींवर अन्याय होईल.
१० जानेवारी १७३० रोजी पुण्यातील शनिवार वाड्याचा पाया घातला गेला आणि २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती झाली. त्यानंतरही अगदी पेशवे बाजीराव दुसरे यांच्या काळापर्यंतही शनिवार वाड्यात टप्प्याटप्याने बांधकामे होतच होती. पेशवे बाजीराव पहिले यांना त्या जागेवर एक ससा कुत्र्याचा पाठलाग करतांना दिसला म्हणून त्या जागेत काहीतरी विलक्षण आहे असे गृहीत धरुन त्यांनी ती जागा वाड्यासाठी निवडली अशी एक (दंत)कथा सांगितली जाते.
नोंदीनुसार ०७ जुन १७९१ रोजी शनिवारवाड्याला लागलेल्या पहिल्या आगीत कोठी आणि सातखणी बंगल्याचे वरचे पाच मजले जळाले. आग आणखी पसरु नये म्हणून यावेळी माजघर स्वयपाक घर असे काही भाग पाडण्यात आले.
१८०८ मध्ये शनिवारवाड्याला लागलेल्या दुसऱ्या आगीला वेळेतच आटोक्यात आणता आल्याने फारसे नुकसान झाले नाही.
२५/२६ फेब्रुवारी १८१२ रोजी शनिवारवाड्याला लागलेल्या आगीत उरलेले दोन मजले आणि अस्मानी महाल जळून खाक झाले.
१० सप्टेंबर १८१३ मध्ये शनिवार वाड्याला लागलेल्या आगीत दिवाणखाना जळून गेला.
२१ फेब्रुवारी १८२८ रोजी शनिवार वाड्याला लागलेल्या आगीत शिल्लक राहिलेला बहुतेक संपूर्ण शनिवारवाडा जळाला. ही आग तब्बल पंधरा दिवस धुमसत होती.
१७ नोव्हेंबर १८१७ च्या येरवड्याच्या लढाईनंतर शनिवार वाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला. १८२१ नंतर इंग्रजांनी शनिवारवाड्यात कैदी ठेवण्यास सुरुवात केली. १८२५ च्या आसपास तेथे तळमजल्यावर कैदी असत, दुसऱ्या मजल्यावर सामान्य दवाखाना आणि तिसऱ्या मजल्यावर वेड्यांसाठी हॉस्पिटल होते.
पेशवे बाजीराव दुसरे यांनी स्वतःसाठी म्हणून पुण्यात शुक्रवारवाडा नावाचा स्वतंत्र वाडा निर्माण केला. त्यासाठी त्यांनी पुण्यातच एक जुना वाडा शुक्रवार पेठेत विकत घेतला. त्या वाड्यामागे काही बांधकाम करून नंतर तो जुना वाडा पाडण्यात आला. आणि त्याच जागेवर पुन्हां बांधकाम केले गेले. १८०३ मध्ये पेशवे बाजीराव दुसरे शुक्रवार वाड्यात सहकुटुंब राहायला गेले. पुढे १८०८ च्या आसपास शुक्रवार वाड्याच्या आसपासची घरे विकत घेऊन वाड्याचा आणखी विस्तार करण्यात आला. हा वाड्याचे बांधकाम सहा मजली झाले होते. १८२० मध्ये शुक्रवार वाडा आग लागून जळाला. आगीतून वाचलेला वाडा पाडून त्यात निघालेले सामान इंग्रजांनी विकले. पेशव्यांनी बांधलेल्या वाड्यामध्ये शुक्रवार वाडा हा असा अल्पवयीन ठरला.
शुक्रवार वाड्याच्या समोरील बाजूला पेशवे बाजीराव दुसरे यांनी दरबार व इतर कार्यक्रमांसाठी तालीमखाना म्हणून स्वतंत्र इमारत निर्माण केली होती. शुक्रवार वाडा जळाल्यानंतर तालीमखान्यात इंग्रजांनी १८३० मध्ये शाळा चालू केली होती. १८८५ च्या आसपास तालीमखान्यात नगरपालिकेची कचेरी होती. १९२२ मध्ये तालीमखाना कंत्राटदाराच्या ताब्यात गेला.

Sunday 19 February 2023

#गोपाळआष्टीची_लढाई (२० फेब्रुवारी १८१८)

 

#गोपाळआष्टीची_लढाई (२० फेब्रुवारी १८१८)
मोहोळ तालुक्यातील गोपाळआष्टीची लढाई ही मराठेशाहीच्या अस्ताच्या संदर्भातील महत्वाच्या लढायांपैकी एक आहे. इंग्रज सेनानी कॅप्टन स्मिथच्या फौजेशी झालेल्या या लढाईत सेनापती बापु गोखले यांच्यासह गोविंदराव घोरपडे, बहिरजी शितोळे, आनंदराव पवार आणि बाबर यांना वीरमरण आले.
पेशवे बाजीराव दुसरे येथून वऱ्हाड चांद्याकडे निघुन गेले. पुढे आवढ्या नागनाथ येथे १० एप्रिल १८१८ रोजी इंग्रज सेनानी कॅप्टन ॲडम्सने पुन्हां एकदा पेशवे दुसरे बाजीराव यांचा पराभव केला. त्यानंतर ३ मे १८१८ रोजी पेशवे दुसरे बाजीराव यांनी धुळकोट येथे इंग्रज सेनानी माल्कमपुढे पुढे पूर्ण शरणागती पत्करली. माल्कमने पुढे सहाशे स्वार आणि दोनशे पायदळासह पेशवे दुसरे बाजीराव यांना कायमचे ब्रम्हावर्तास पाठवुन दिले.
छत्रपति प्रतापसिंह गोपाळ आष्टीच्या लढाईत पेशव्यांसह फौजेत होते. पेशवे दुसरे बाजीराव त्यावेळी वऱ्हाड चांद्याकडे गेले परंतु छत्रपति प्रतापसिंह कुटुंबासह इंग्रजांच्या ताब्यात गेले. इंग्रजांनी त्यांना घेऊन पुरंदर जवळ भिवडी येथे ९ मार्च १८१८ रोजी तळ दिला. दोन दिवसांत इंग्रजांनी दुर्ग पुरंदरला वेढा घातला आणि पुढे काही दिवसांत किल्लेदार आबा पुरंदरे यांच्याकडून दुर्ग पुरंदर लढून घेतला. इंग्रजांनी यावेळी सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि येथील जनतेच्या मनातील इंग्रजांच्या बद्दलचा द्वेष कमी होण्यासाठी धुर्त चाल खेळली. इंग्रजांनी छत्रपति प्रतापसिंह यांना पूर्ण सन्मानपूर्वक सातारा येथे नेले आणि त्यांनी तेथे छत्रपतींना गादीवर बसवले. पण लवकरच पुढील काळात इंग्रजांनी छत्रपति प्रतापसिंह यांना पदच्युत करून ( सप्टेंबर १८३९) ब्रम्हवर्तास पाठवले.
१६ नोव्हेंबर १८१७ च्या येरवड्याच्या लढाईपासून ते ३ मे १८१८ च्या पर्यंतच्या पेशवे बाजीराव दुसरे यांच्या धुळकोट येथील शरणागती पर्यंत पेशवे बाजीराव दुसरे पुढे आणि इंग्रज मागे असा लढाईचा एकुण रागरंग होता. या दरम्यान पेशव्यांकडील मराठा फौज आणि इंग्रज यांच्यात अनेक ठिकाणी चकमकी आणि लढाया झाल्या. यामध्ये गोपाळ आष्टीची लढाई सर्वात जास्त महत्वाची आहे. या लढाईत सेनापती बापु गोखले यांना वीर मरण आले. मराठा फौजेत असणारे छत्रपति इंग्रजांच्या ताब्यात गेले. या दरम्यानच इंग्रजांनी होळकर शिंदे भोसले यांना उत्तर बाजूला गुंतवुन ठेवले होते. त्यांचा आणि पेशव्यांकडील फौजेचा मेळ बसणार नाही याची इंग्रजांनी पूर्ण काळजी घेतली. याचदरम्यान इंग्रजांनी दुर्ग सिंहगड, दुर्ग अजिंक्यतारा (११ फेब्रुवारी १८१८) दुर्ग चाकण (२५ फेब्रुवारी १८१८) दुर्ग रायगड (०७ मे १८१८) हेही जिंकुन घेतले.
२० फेब्रुवारी १८१८ रोजी गोपाळ आष्टीच्या लढाईत वीर मरण आलेल्या सेनापती बापु गोखले यांच्यासह अन्य वीरांच्या समाध्या युध्द स्थळावर होत्या. इंग्रजांनी तेथे १८७६ ते १८८१ दरम्यान हजार एकरांचा तलाव निर्माण केला त्यात त्या सर्व समाध्या पाण्याखाली गेल्या.

Wednesday 15 February 2023

पहिल्या महिला सरसेनापती श्रीमंत उमाबाईसाहेब दाभाडे

 


पहिल्या महिला सरसेनापती श्रीमंत उमाबाईसाहेब दाभाडे
पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा स्मृतिदिन २८ नोव्हेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
..........
पराक्रमाची पराकाष्ठा करणारी इतिहासातील अनेक पात्रे अज्ञात असली, तरी त्या इतिहासाच्या पैलूंची चमक कधी कमी होत नसते. महिला सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाची झालर चढवली आणि इतिहासाला शौर्याचे अनोखे कोंदणही मिळाले.
भारताचा इतिहास लढवय्या रणरागिणींनी उजळवलेला आहे. महाराणी ताराराणी, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी अशी नावे घेता येतील. यात एक वेगळे नाव म्हणजे सरसेनापती श्रीमंत उमाबाई खंडेराव दाभाडे. इतिहासातील हा वेगळा पैलू अनेकदा नजरेआड झालेला दिसतो; मात्र हे एक वास्तव एका नव्या रणरागिणीची वेगळी ओळख करून देते. उमाबाईंचा आणि नाशिकचा संबंध काय हे पाहण्यासाठी सरदार दाभाड्यांची कारकीर्द जाणून घेणे गरजेचे आहे. इतिहासाला शौर्याचा रंग देण्यात त्या वेळच्या पराक्रमी सरदारांचे महत्त्वही तेवढेच आहे.
छत्रपतींच्या आदेशावर जीव ओवाळून टाकणाऱ्या अनेक सरदारांच्या पराक्रमाने मराठेशाहीचा इतिहास उजळून निघाला आहे. यात महाराष्ट्रातील सतराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे म्हणजे पुण्यातील तळेगावचे दाभाडे घराणे. या घराण्याचे मूळ पुरुष बजाजी व त्यांचा मुलगा येसाजी हे शिवाजी महाराजांच्या पदरी होते. छत्रपती संभाजीराजांनीही त्यांना रायगडाची धुरा दिली.
छत्रपती संभाजी महाराजांनंतर ते छत्रपती राजाराम महाराजांच्या सेवेत दाखल झाले. येसाजींना खंडेराव आणि शिवाजी ही दोन मुले होती, तर खंडेरावांना त्रिंबकराव व यशवंतराव ही दोन मुले होती. खंडेराव पराक्रमी निघाले. त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. छत्रपती शाहू महाराजांनी खंडेरावांना सेनाखासखेल अन्‌ नंतर १७१७मध्ये सेनापतीपदी नेमले. खंडेराव दाभाडेंनी उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वऱ्हाड व गुजरात या तीनही प्रांतांवर आपली पकड घट्ट केली.
डेरावांच्या मृत्यूनंतर छ. शाहूमहाराजांनी त्रिंबकरावास सेनापतिपद दिले. अंतर्गत वादातून झालेल्या डभईच्या लढाईत त्रिंबकराव मारले गेले अन्‌ येथूनच खंडेरावांची पत्नी अन्‌ त्रिंबकरावांची आई उमाबाईंचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. छ. शाहूमहाराजांनी तळेगावात जाऊन उमाबाईंची समजूत काढून त्रिंबकरावाचा भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपदाची वस्त्रे दिली. यशवंतराव अल्पवयीन असल्याने सरसेनापतिपदाचा कारभार उमाबाई पाहू लागल्या अन्‌ त्या इतिहासातील पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. उमाबाई म्हणजे अभोण्याच्या ठोके घराण्यातील कन्यारत्न. उमाबाई छत्रपती शाहूंचे सरसेनापती खंडेराव दाभाडेंच्या घरात सून म्हणून गेल्या.
खंडेरावांच्या निधनानंतर उमाबाईंचा मुलगा त्रिंबकरावांकडे सरसेनापतिपद सोपवले गेले. २५ नोव्हेंबर १७३० रोजी त्रिंबकरावांच्या मृत्यूमुळे उमाबाई दुखावल्या गेल्या. त्यानंतर छ. शाहूमहाराजांनी त्रिंबकरावांचा लहान भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपद, तर धाकट्या बाबुरावाकडे सेनाखासखेल ही पदे दिली; मात्र ते अल्पवयीन असल्याने सरसेनापती व सेनाखासखेल या दोन्ही पदांचा कारभार उमाबाईंच्या हाती आला. पती आणि मुलाच्या मृत्यूचे दु:ख उमाबाईंनी काळजात एकवटले आणि रणभूमीवर उतरल्या.
गुजरातचा बहुतेक भाग मराठ्यांच्या ताब्यात असला, तरी दिल्लीच्या बादशहाने आपली दहशत कायम ठेवली होती. दाभाडेंची पकड गुजरातवरून कमी झाल्याचे पाहून मारवाडचा राजा अभयसिंग याने दिल्ली बादशहाच्या मदतीने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने बडोदा हस्तगत करून डभईला वेढा घातला. पिलाजी गायकवाड उमाबाईंचा उजवा हात होता. हे ओळखून अभयसिंगने पिलाजींचा खून घडविला. उमाबाईंचा बाणेदारपणा त्यांच्या लष्करी नेतृत्वात होता. हेच दाखवत पिलाजींच्या हत्येनंतर उमाबाईंनी अभयसिंगवर स्वारी केली.
उमाबाईंच्या भीतीने हार पत्करून अभयसिंग गुजरातमधून पळाला; मात्र अहमदाबादमधील मुघलांचे ठाणे अजूनही कायम होते. १७३२मध्ये उमाबाईंनी गुजरातवर दुसरी स्वारी केली. या वेळी मुघलांच्या जोरावरखान बाबी नावाच्या सरदाराने ‘एक विधवा माझ्याशी काय लढणार, तुझा निभाव लागणार नाही,’ अशा आशयाचे पत्र उमाबाईंना पाठवले. याचे उत्तर रणांगणात हत्तीवर बसलेल्या पांढऱ्या शुभ्र वेशातील सरसेनापती उमाबाईंनी युद्धात अलौकिक शौर्य गाजवून दिले.
उमाबाईंचे रौद्ररूप पाहून जोरावरखान अहमदाबादच्या तटात लपला. मराठा सैन्याने मुघल पठाणांचे मृतदेह एकावर एक खच करून तटावर जाण्याचा मार्ग तयार केला, अशी नोंद इतिहासात मिळते. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू महाराज खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले.
उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालावली. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. सरसेनापती हा बहुमान मिळालेल्या व रणांगणावर शौर्य गाजवून, सोन्याचे तोडे पायात घालण्याचा सन्मान मिळालेल्या उमाबाई खंडेराव दाभाडे या इतिहासात एकमेव महिला सरसेनापती होऊन गेल्या.
पेशवा बाजीरावांमुळे उमाबाईंचा मोठा मुलगा मारला गेला होता. त्यामुळे साहजिकच उमाबाईंचा बाजीरावांवर राग होता. परंतु नाईलाजाने त्यांना बाजीरावांना साथ देणे भाग होते. छत्रपती राजाराम दुसरे यांच्या काळात पेशवा होते बाळाजी बाजीराव आणि याच काळात त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. म्हणून त्यांनी दाभाडे घराण्याशी करार करून त्यांच्या मिळकतीत हक्क दाखविला आणि दाभाड्यांना अडचणीत आणले. या कराराला विरोध करूनदेखील उमाबाईंचा प्रयत्न असफल झाला.
या लढ्यात उमाबाईंना साथ मिळाली ती म्हणजे छत्रपती ताराराणींची. ताराराणींनादेखील पेशव्यांबद्दल राग होता म्हणूनच त्यांनी उमाबाईंशी संधान बांधले आणि परस्परांना मदत करण्याचे आश्वासन दिले. उमाबाईंनी इतके वाद असूनही लढाई करण्याचे विचार बाजूला ठेवले होते व चर्चेवर भर देण्याकडे त्यांचा कल होता. त्यांचे समजूतदारीचे अनेक प्रयत्न फोल गेले. परंतु तरीही उमाबाईंनी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्यातर्फे महादेव निरगुडे यांना सलोख्याची बोलणी करण्यासाठी पेशवे दफ्तरी धाडले. परंतु पेशव्यांनी हीदेखील विनंती धुडकावून लावली.
याउपरही उमाबाईंनी स्वतः आळंदी येथे पेशव्यांची भेट घेतली व ‘हा करार आमच्यावर जबरदस्तीने लादला गेला असून आम्हाला तो मान्य नाही. त्यामुळे हा करार रद्द करण्यात यावा,’ असा दावा केला. परंतु, हा दावा झुगारून लावत पेशवा दाभाडे घराण्याच्या गुजरातमधील मिळकतीमधील अर्ध्या हिश्श्याच्या मागणीवर अडून राहिले. आता मात्र सलोख्याचे प्रयत्न करून भागण्यासारखे नव्हते. काही तरी ठोस कृती गरजेची होती.
पेशव्यांविरुद्ध उमाबाई
सलोख्याचे सर्व प्रयत्न व विनंत्या धुडकारून लावल्याने आता उमाबाईंनी लढाईचा मार्ग स्वीकारला. आधीच ठरलेल्या करारानुसार ताराराणीसाहे देखील त्यांच्या सोबत होत्या. १७५० साली पेशवा बाळाजी बाजीराव मुघल मोहिमेवर गेले असता अतिशय चलाखीने ताराराणींनी छत्रपती राजाराम (दुसरे) यांना कैद केले. ताराराणींच्या मदतीला पुढे उमाबाईंनी आपले मराठा व गुजरात असे दुहेरी सैन्य दमाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पाठविले. सुरुवातीला यश पदरी येत होते. परंतु, पुढे परिस्थिती उलटी झाली आणि दमाजी जाळ्यात अडकले आणि कृष्णा नदीच्या नजीक दरीत फसले गेले.
दमाजी गायकवाडांना ताब्यात घेतले गेले आणि पेशव्यांशी करार करण्यास त्यांना दबाव टाकण्यात आला. करारानुसार गुजरातेतील अर्धा वाटा व या केलेल्या हल्ल्याची नुकसानभरपाई म्हणून मोठी रक्कमदेखील मागितली. दमाजींनी या मागणीला विरोध केला. पेशव्यांनी दमाजींना त्यांच्या परिवारासकट कैद केले, पाठोपाठ उमाबाई व त्यांच्या परिवारातील काही सदस्यांनादेखील कैद केले गेले. परिणामस्वरूप दाभाडे घराण्याची जहागीर परत घेतली गेली व त्यांचे सेनापतिपददेखील हिरावले गेले.
२८ नोव्हेंबर १७५३ रोजी पुणे येथे उमाबाईंचा मृत्यू झाला. तळेगाव येथे त्यांची समाधी आहे. पेशव्यांशी लढण्यात त्यांना यश आले नाही; पण एक स्त्री म्हणून तेव्हाच्या काळात परिवारासोबत इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडणे खरेच कठीण काम होते. या सगळ्या विरोधांना, संकटांना मात देत आपल्या पतीच्या पश्चात उमाबाईंनी जवळजवळ २० वर्षे आपली सत्ता सांभाळली. स्त्री शक्तीला कमी लेखणाऱ्यांसाठी उमाबाई दाभाडे हे नेहमीच एक उत्तम उदाहरण राहील.
सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.
- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

स्त्री-शिक्षणासाठी झटलेल्या श्रीमंत इंदुमती राणीसाहेब

 


स्त्री-शिक्षणासाठी झटलेल्या श्रीमंत इंदुमती राणीसाहेब
राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांनी स्त्री-शिक्षणविषयक, तसेच अन्य सामाजिक कार्यातून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
........
राजर्षी शाहूमहाराजांचे धाकटे पुत्र प्रिन्स शिवाजी यांच्या पत्नी श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांचा जन्म सहा डिसेंबर १९०६ रोजी झाला. सासवडचे शंकरराव पांडुरंगराव जगताप यांच्या त्या कन्या. त्यांचे माहेरचे नाव जमना. त्यांचा विवाह सहा जून १९१७ रोजी राजपुत्र शिवाजी यांच्याशी झाला; पण दुर्दैवाने त्यांना वैवाहिक जीवन केवळ एक वर्ष लाभले. प्रिन्स शिवाजी १२ जून १९१८ रोजी शिकार करीत असता अपघाताने मृत्युमुखी पडले. प्रिन्स शिवाजी यांचे निधन झाल्यावर शाहू महाराजांवर दुःखाचा डोंगरच कोसळला.
त्यातून सावरून महाराजांनी आपल्या तरुण विधवा सुनेस आपल्या मुलीप्रमाणे वाढवले, शिक्षण दिले, संस्कार घडवले. एक सुसंस्कारित आदर्श स्त्री व स्वावलंबी, कणखर व्यक्ती म्हणून इंदुमतीदेवींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा म्हणून महाराजांनी जातीने प्रयत्न केले. आपण कोल्हापूरच्या बाहेर गेल्यावर मागे आपल्या सुनेने राजपरिवाराशी कसे वागावे याविषयी बारीकसारीक सूचना महाराज त्यांना देत असत. इंदुमती राणीसाहेब कोल्हापुरात राहत असताना महाराजांनी पुण्यावरून त्यांना एक पत्र लिहिले होते.
त्या पत्रात सोनतळी कँपवर राहणाऱ्या मुलींच्या सोबत आपण कसे वागावे याचे त्यांनी आपल्या सुनेस मार्दर्शन केले होते. छत्रपती शाहू महाराज सांगत - आपण जेवतेवेळी सर्व मुलींना बरोबर घेऊन जेवत जावा. सर्व मुलींनी चहा घेतल्यानंतर आपण चहा घ्यावा. पंगतीला बसल्यानंतर सर्व मुलींचा समाचार घ्यावा. सर्व मुलींनी, नोकर लोकांनी तुमच्यावर प्रेम करावे, अशा रीतीने त्यांना वागवीत जावा.
वाडवडिला सेवित जावे।
सवतीशी प्रेम धरावे ।
पतिकोपी नम्र असावे।
सेवकावरी सदय पहावे।
निज धर्मा दक्ष राहावे।
भाग्य येता मत्त न व्हावे।
ऐशीलाची गृहिणी म्हणती।
इतरा कुलव्याधीच होती।
कण्व ॠषींनी आपल्या मुलीस असा उपदेश केला आहे. तो ध्यानात ठेवून वागत जावे.
शाहूमहाराजांनी इंदुमती राणीसाहेबांना शिक्षण दिले आणि त्यांच्या मनावर उत्तम संस्कार व्हावेत असेच प्रयत्न केले. महाराजांच्या निधनानंतरही इंदुमती राणीसाहेबांनी आपले शिक्षण चालू ठेवले. १९२५मध्ये त्या मॅट्रिक पास झाल्या. त्या काळात मॅट्रिक उत्तीर्ण होणाऱ्या त्या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या. दिल्लीच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळूनही त्यांना त्या शिक्षणाचा लाभ घेता आला नाही.
इंदुमती राणीसाहेबांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य केले. नाशिक येथे भरलेल्या मराठा महिला शिक्षण परिषदेच्या सहाव्या अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा होत्या. कोल्हापुरात त्यांनी ‘ललित विहार’ (१९५४) संस्था स्थापून स्त्री शिक्षण प्रसाराच्या कामाला आरंभ केला. स्त्री-मुक्तीची चळवळ गतिमान करण्यासाठी व कार्यकर्त्यांची बौद्धिक जडणघडण करण्यासाठीच त्यांनी ललिता विहारची स्थापना केली. मुलींना केवळ पुस्तकी शिक्षण न देता समर्थ गृहिणी बनविण्याचा हा महाराष्ट्रातील पहिला शैक्षणिक प्रयोग होता. मुलींना उद्यमशील बनविण्यासाठी त्यांनी औद्योगिक कला भवन सुरू केले. इंदुमती राणीसाहेब यांनी महिला वसतिगृह सुरू करून शहरात शिक्षण व नोकरीसाठी आलेल्या स्त्रियांच्या निवासाचा प्रश्न सोडवला. १९६१ साली त्यांनी मॉडेल हायस्कूल फॉर गर्ल्स सुरू केले.
स्त्रियांनी घराचा उंबरा ओलांडून बाहेर यावे व स्वतःबरोबर समाजाचेही प्रश्न सोडवावेत, हाच ललिता विहारचा उद्देश होता. महाराणी शांतादेवी गायकवाड प्रशिक्षण संस्था (१९५४), महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय (१९५५), कमी शिकलेल्या मुलांसाठी औद्योगिक कला भवन, मॉडेल हायस्कूल फॉर गर्ल्स (१९६१) या संस्था त्यांनी काढल्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाची सोय केली. इंदुमतीदेवी कोल्हापूरच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनाच्या एक अभिन्न घटक होत्या. त्यांनी समाजकार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती, गरजू विद्यार्थी वगैरेंना सढळ हाताने मदत केली.
इंदुमती राणीसाहेब या धार्मिक वृत्तीच्या व परोपकारी स्वभावाच्या होत्या. त्यांना संगीत, नाट्य आणि तत्सम ललित कलांविषयी उत्तम अभिरुची होती. त्यांचे ग्रंथप्रेम आणि ज्ञानजिज्ञासा प्रसिद्ध आहे. त्यांचे स्वतःचे ग्रंथालय मराठी, संस्कृत, इंग्रजी आदी भाषांतील विविध विषयांतील ग्रंथांनी समृद्ध होते.
शिक्षण, संस्कार, रसिकता आणि सौंदर्य अशा विविध गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त, आकर्षक व प्रभावी झाले होते. इंदुमती राणीसाहेब यांचे निधन ३० नोव्हेंबर १९७१ रोजी कोल्हापूर येथे झाले.
आपल्या कार्यकर्तृत्वाने इंदुमती राणीसाहेब खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्नुषा शोभल्या. त्यांचे स्मरण आपल्याला कायम प्रेरणादायी ठरेल. त्यांना विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा.
- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...