विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 June 2021

सरदार विठ्ठल शिवदेव यांची विंचूर येथील गढी :

 






सरदार विठ्ठल शिवदेव यांची विंचूर येथील गढी :

🚩
विठ्ठल शिवदेव हे महाराष्ट्राच्या इतिहासातील मानाचे पान, त्यांच्या तलवारीचे पाणी खर्या अर्थाने पेशवाईत दिसुन आले. पानिपताच्या लढाईत जे मातब्बर सरदार सदाशिवराव भाऊ यांच्यासमवेत होते, त्यापैकी हे एक महत्वाचे सरदार.
अशा या मातब्बर सरदाराची गढी किंवा वाडा, कांद्याची बाजारपेठ समजल्या जाणार्या लासलगांवजवळ विंचूर या गावात नासिक-औरंगाबाद मार्गावर आहे. याला विंचूरकरांचा वाडा असेही संबोधले जाते.
वाड्याचे प्रवेशद्वार भरभक्कम असुन त्यावरिल कोरीव नक्षीकाम लक्ष वेधून घेते. द्वाराच्या वर दोन्ही बाजुला सहसा न आढळणारे गोम सदृश शिल्प आहे, तर शिल्पाच्या वरच्या अंगाला मयुरशिल्प आहे.
वाड्याला तीन बुरुज असुन, ऐसपैस अशा २० पेक्षा जास्त खोल्या आहेत. वाडा दुमजली असुन दोन भागात त्याचा विस्तार आहे. एका भागातून दुसर्या भागात जाण्यासाठी गैलरी रस्ता केलेला आहे.
वाड्याचे प्रथमदर्शनी रुप पाहुन आपसुकच आपण वाड्याच्या प्रेमात पडतो. बाहेरुन दिसणारे नक्षीदार सज्जे, त्याखालील मर्कटशिल्प. सगळचं मोहात पाडतात. ह्या परिसरात विंचूरकरांना मोठा मान, नव्हे त्यांना येथील प्रजा, राजाचे संबोधन लावी.
ह्या भागात अनेक मंदिरे ह्या सरदाराने उभारली.
💧 *अभिनव पाणी व्यवस्थापन पद्धती* 💧
विंचूरमधील पाणी व्यवस्थापन हा खरे तर वेगळा विषय होवू शकेल. जवळपास २ कि.मी. अंतरावरून गावामध्ये पाणी आणलेले आहे. दगडाने बांधलेली ही रचना म्हणजे पाण्याचे भुयारच जणू, एक माणुस ह्या पाणी योजनेतून वाकुन चालू शकतो, विशिष्ट अंतरानंतर कारंजे, चेंबर्स, पाण्याचा वेग कमी-जास्त करण्यासाठी केलेली रचना केवळ अप्रतीम. यावरुन तिनशे वर्षांपूर्वी आपले स्थापत्यशास्त्र किती पुढारलेले होते याची कल्पना येते.
गावाबाहेर सरदार विठ्ठल शिवदेव यांची समाधी आहे.
या घराण्याला ब्रिटिशांनी सुद्धा मोठा मान दिला होता.
आजमितीला जरा बर्या स्थितीत असलेला हा वाडा दुर्देवाने त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे नामशेष तर होणार नाही ना अशी शंका निर्माण करतो.
जायचे कसे - नासिक औरंगाबाद महामार्गावर विंचूर हे गाव आहे. अंतर नासिक ते विंचूर 50 किमी. अंदाजे.

छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील *वेंगुर्ला* हे बंदर ताब्यात घेतले


 छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील *वेंगुर्ला* हे बंदर ताब्यात घेतले

वेंगुर्ला :- वेंगुर्ले प्राचीन काळी एक प्रसिध्द व्यापारी बंदर असल्याने, सोळाव्या शतकात हिंदुस्थानात आलेल्या डच व्यापार्यांचे साहजिकच वेंगुर्ले येथे आगमन झाले. वेंगुर्ले येथे हे प्रमुख व्यापारी बंदर असल्याने या ठिकाणी सत्ताधारी असलेल्या विजापूरच्या आदिलशाहाच्या परवानगीने डच व्यापारी प्रमुख 'लिटर्ड' जान्सझून्स याने इ.स. १६५५ साली ही वखार बांधली होती. परंतू ती कोसळली म्हणून नवीन मजबूत किल्ला पध्दतीची तटबंदीयुक्त वखार बांधण्यात आली.
त्यासाठी त्याकाळी तीन हजार गिल्डर (तीन हजार तोळे) एवढा खर्च आला. या वखारीचे बांधकाम किल्ला पध्दतीचे, तटबंदीयुक्त मुद्दाम बांधण्यात आले. माल साठविण्याचे गोदाम तसेच गढी म्हणूनही याचा उपयोग व्हावा अशी तिची मजबूत बांधणी करण्यात आली होती. त्याठिकाणी दहा तोफा व दोनशे बंदुकीचा पहारा ठेवण्यात आला होता. वखारीवरील तोफांवर आफ्रिकेतील गुलामांची नेमणूक करण्यात आली होती. तर संरक्षणासाठी भारतीय सरंक्षक गार्ड होते. डच वखारीची इमारत पोर्तुगीज पध्दतीची आहे.

शून्यातून स्वराज्य निर्मिती. [ भाग २ रा. ]

 जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवराय.

--------------------------------------------

शून्यातून स्वराज्य निर्मिती.
[ भाग २ रा. ]
---------------------------
त्यांना वाटेत एखादा किल्ला आढळला तर ते संवगडी याना विचारीत , ' हा किल्ला कोणाचा ?' उत्तर ' आदिलशहाचा ' असे मिळाल्यावर ते म्हणत असत - ' किल्ला आपल्या मुलुखातला आणि सत्ता आदिलशहाची ! ' हे त्यांच्या मनाला पटत नसे. हे किल्ले आपल्या ताब्यात असायला पाहिजेत. असे विचार वारंवार करीत असतानाच सवंगड्यायांची व बारा मावळातील मावळ्यांची जमवाजमव करून एके दिवशी शिवरायांनी आपल्या सहकार्याबरोबर रोहीडेश्वराच्या साक्षीने स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली व ती पूर्ण केली.
शिवरायांनी वेगवेगळी युध्दतंत्रे वापरून आदिलशहा व मोगलशहा यांचे एका पाठोपाठ एक असे किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली. किल्ले ताब्यात घेत असताना त्याना बलाढ्य अशा मोगलशहा व आदिलशहा या शत्रूबरोबर झुंज द्यावी लागत होती. शिवरायावर मरणप्राय संकटे ओढवत होती. या महाण संकटातून बाहेर पडण्याची दिव्ये त्यांना करावी लागत होती. असे करता करता शिवरायांनी आपले पिता शहाजीराजांच्या कल्पनेला स्वराज्याची , माता जिजाबाईयांच्या मनातील स्वराज्याची आणि स्वतःच्या विचारातील स्वराज्यातील निर्मिती करून रायगड या राजधानीवर स्वराज्याचा राज्याभिषेक करून महाराष्ट्र धर्माची स्थापना केल्याचे जगाला दाखवून दिले.
शिवरायांनी स्वराज्यनिर्मितीसाठी ज्यावेळी बंड पुकारले त्यावेळी मोगलशहा व आदिलशहा यांच्या बलाढ्य सत्ता वाभव शिखरावर होत्या. त्यांच्याकडे अफाट युध्द साहित्य व अमाप संपत्ती होती. त्यातील एकही शत्रू सामान्य नव्हता. त्यातभर म्हणजे अनेक स्वकीय मंडळीही विरोधात. पण याही परिस्थितीत , शिवरायांनी या महासत्ताना जागीजाग पोखरून अक्षरशः शून्यातून आपले स्वतंत्र , सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले.
शिवरायांनी आपल्या प्रचंड धामधुमीच्या आयुष्यात अल्पश्या काळात मुलकी कारभार व सैनिक व्यवस्था या शासकीय कार्याबरोबर वतनदारीची पुनर्रचना , शेती ,सुधारणा , सामाजिक व सांस्कृतिक सुधारणा करून त्यांत शिस्त लावली. आपले स्वतंत्र ' स्वराज्य ' निर्माण केले.
स्वराज्य निर्मितीची शपथ घेऊन रयतेला दिलेल्या वचनांचे पालन करून . शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे शिवराय असे एकमेव राजे होते. [ पूर्ण.]

शून्यातून स्वराज्य निर्मिती . [ भाग १ ला.]

 जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवराय.

-------------------------------------------

शून्यातून स्वराज्य निर्मिती .
[ भाग १ ला.]
-----------------------------
शिवरायांच्या बालपणीच्या काळात त्यांचे वडील शहाजीराजे हे निजामशाही सोडून विजापूरच्या आदिलशहाकडे सरदार म्हणून गेले होते. त्यावेळी शहाजीराजना महाराष्ट्रातील केवळ उध्वस्त अशा पुण्याची जहागिरी मिळालेली होती. आधीच मोठ्या दुष्काळाने होरपळून निघालेल्या पुण्याला मुरारजी पंडिताने जाळपोळ करून बेचिराख करून ठेवले होते. म्हणजे पुण्याच्या पांढरीवर अक्षरशः गाढवांचा नांगर फिरविला होता. शिवराय लहानपणी ह्या शहाजीराज्यांच्या पुण्याच्या जहागिरीवर देखरेख करीत होते. पुण्याच्या जहागिरीतला शेती व्यवसाय अत्यंत हलाखीचा होता. मोठ्या दुष्काळामुळे माणसे . गुरेढोरे, मेलेली होती. जी गुरेढोरे शिल्लक होती त्यांच्या चोऱ्या होत होत्या. बैल विकत घेण्यास लोकांकडे पैसे नव्हते. त्यांत पावसाची अनिश्चितता ,आर्थिक टंचाई, आर्थिक मदततिचा अभाव इत्यादी कारणामुळे शेती व्यवसाय मोडकळीस आला होता. अशा परगण्यातील पुण्याच्या जहागिरीवर देखरेख करीत होते. पुण्याच्या जहागिरीतील ३६ गावांच्या मोकाशाचा कारभार शिवराय पहात होते.
मोठ्या दुष्काळामुळे अगणितमाणसे मृत्यूमुखी पडलेली असल्यामुळे शिवरायांच्या बंडाच्या उठावासाठी पुण्याच्या परगण्यातून हवे तेवढे मनुष्यबळही उपलब्ध होण्यासारखे नव्हते, जी माणसे होती त्यांचे मनोधैर्य दुष्काळामुळे व युध्दहानीने ओढवलेल्या गरिबीमुळे खचलेले होते. म्हणजे मनुष्यबळ - सैन्यबळ याबाबतीतसुद्धा उठवासाठी शून्यताच होती.
बलाढ्य अशा मोगलशहा किंवा आदिलशहाबरोबर लढा देण्यासाठी शिवरायांना कोणाचेही पाठबळ नव्हते. निजामशाही तर बुडालेली होती , आणि टोपीकरसुद्धा शिवरायांना मदत न करता मोगलशहा व आदिलशहाला मदत करीत होते. महाराष्ट्रातील जहागीरदार व वतनदार यांचासुद्धा शिवरायांकडे पाहण्याचा दृष्टीकोन केवळ एक जहागीरदराचा मुलगा म्हणून होता. शिवरायांकडे भोवतालच्या सत्ताधीशांच्या पाठबळाचाही अभाव होता.
शिवरायाना धीरोदत्त पाठींबा होता तो माता जिजाऊ व पिता शहाजीराजे यांचा. त्यातल्या त्यांत शहाजीराजांचा जो पाठींबा होता त्या पाठिंब्याच्या जोरावर शिवरायाना शत्रूबरोबर लढण्याची प्रेरणा व शक्ती मिळालेली होती.
पण तसे पाहता शिवरायासमोर एकूणच शून्यवत स्थिती होती आणि या स्थितीतून शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. शिवराय आपल्या बाल सवंगडी यांचे बरोबर बारा मावळात हिंडु फिरू लागले. तिथे त्यांना जिवलगमित्र मिळत होते. ते आपल्या सवंगडीबरोबर सह्याद्रीच्या दर्याखोर्यात ,डोंगरदर्यात ,कडे-कपाऱ्यात फिरून त्यांची माहिती करून घेत होते. [अपूर्ण.]

Tuesday 29 June 2021

शूर ,विरांगना बायजाबाई शिंदे

 


शूर ,विरांगना बायजाबाई शिंदे

🚩
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
संदर्भ
आगामी पुस्तकं बायजाबाई शिंदे यांच्या पुस्तकातून साभार

मराठेशाहीमधे राजमाता जिजाऊ, येसूबाई राणीसाहेब, महाराणी ताराराणी ,सरसेनापती ऊमाबाई साहेब दाबाडे यांच्यानंतर जे नाव इतिहासामध्ये आदराने घेतले जाते ते सर्वात सुंदर दक्षिण लावण्यवती व धुरंदर राजकारणी गाल्हेरच्या राणी बायजाबाई शिंदे यांचे.. या राणीने मराठेशाहीच्या राजकारणात जो धुमाकूळ घातला त्याचा इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला. पण मराठ्यांनी या बायजाबाई शिंदे साहेब यांची साधी दखलही घेतली नाही.
बायजाबाई शिंदे या गाॅल्हेरच्या राणीसाहेब . यांचा जन्म कागलकर घाडगे घराण्यातील . त्यांच्या वडिलांचे नाव सखाराम घाटगे सर्जेराव. बायजाबाई साहेब याा अत्यंत सुंदर व देखण्या होत्या. घोड्यावर बसण्यात त्या अत्यंत पटाईत होत्या. बायजाबाई शिंदे यांना कित्येक इतिहासकारांनी "दक्षिणची सौंदर्यलतिका 'अशी संज्ञा दिली आहे. इंग्रज लेखकांनी बायजा बाईंना( ब्युटी ऑफ डेक्कन ) असे म्हटलेले आहे. राजस्थानातील कृष्णकुमारी इत्यादी लोकप्रसिद्ध लावण्यवतीच्या लग्नाचे प्रसंग ज्याप्रमाणे मोठमोठी राज्यकारस्थाने घडविण्यास कारणीभूत झाले, त्याच प्रमाणे बायजाबाईंचे लग्नसुद्धा महाराष्ट्रातील एक राजकारस्थान घडवून आणण्यास कारणीभूत झाले .
अनेक सरदारांनी सर्जेरावांचे मन वळवून बायजाबाईंचे लग्न दौलतराव शिंदे यांच्याशी लावून दिले. हे लग्न पुणे मुक्कामी मोठ्या थाटामाटात पार पडले होते. लग्न झाल्यानंतर बायजाबाई आपल्या पतीबरोबर लष्करात असत. त्या सर्व राजकारण जातीने पाहात होत्या.
दौलतराव शिंदे यांचा १८२७ साली मृत्यू झाला. तत्पूर्वी आपला राज्यकारभार बायजाबाई यांनीच सांभाळावा अशी दौलतराव शिंदे यांची इच्छा होती. त्यामुळे बायजाबाई यांच्याकडे गाल्हेरच्या सर्व कारभाराची सूत्रे आली.
दौलतराव यांच्या मृत्यूनंतर बायजाबांईनी दत्तक न घेता सर्व कारभार आपल्या हातात घेतला .परंतु त्यांनी संस्थानचा कारभार पाहण्यासाठी दत्तक पुत्र घ्यावा अशी सर्व नागरिकांची इच्छा होती . तशी इच्छा ब्रिटिश रेसिडेंट यांनीही व्यक्त केली होती. नागरिकांच्या ईच्छेखातर बायजाबाई यांनी पाटलोजी शिंदे यांचे पुत्र मुगुटराव यांना १२ व्या वर्षी दत्तक घेतले. बायजाबाई यांची राजकीय कारकीर्द फक्त ६ वर्षे पर्यंत होती.
.सरासरी सहा वर्ष त्यांची राजकीय कारकीर्द गाजली होती .परंतु तेवढ्या अवधीमध्ये त्यांनी मोठ्या दक्षतेने व शहाणपणाने राज्यकारभार चालवला. बायजाबाई शिंदे या अतिशय तेजस्वी सत्वशील आणि कडक स्वभावाच्या होत्या असे म्हटले आहे. मुंबई गॅझेटच्या पत्रकारांनी "बायजाबाई शिंदे यांचा कारभार पाहता त्यांनी उत्तराधिकारी व्हावं हा दौलतरावांचा विचार किती बरोबर होता हे समजते.
बायजाबाई या शांतता राखण्याच्या बाजूच्या होत्या ,अशा आशयाचे वर्णन १८३३ साली प्रसिद्ध केले होते. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही ज्ञानकोशात विशेष स्थान देऊन त्यांचे वर्णन लिहिले आहे.
बायजा बाईंच्या नशिबी पुढे पुढे वनवासच आला. १८३३ साली बायजाबाई यांना अटक करण्याच्या हालचाली होत असतानाच बायजाबाई राजवाड्यातून निसटल्या आणि त्या हिंदुराव यांच्या वाड्यात आश्रयाला गेल्या .तेथून त्यांनी ब्रिटिश रेसिडेंट कॅव्हेंडिश यांच्याकडे मदत मागितली. परंतु या सर्व खटाटोपात जनकोजी शिंदे यांचे पारडे जड ठरले. आणि बाईजाबाईना गाॅल्हेर सोडावे लागले.
१८४० ते १८४५ अशी पाच वर्ष बायजा बाईंना नाशिकमध्ये काढावी लागली. १८४४ साली जनकोजी शिंदे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी जयाजीराव शिंदे यांना दत्तक घेऊन राज्यकारभार सुरू केला. त्यानंतर बायजाबाई पुन्हा ग्वाल्हेरला आल्या.
दुसऱ्या बाजीराव यांना जी मुलगी बहात्तराव्या वर्षी झाली तिचे नाव बयाबाई साहेब उर्फ सरस्वती साहेब. पेशव्यांच्या मृत्यू बरोबर पेशवे घराण्याचे औरस पुरुष समाप्त झाले. मागे उरली ती एकमेव निशाणी दुर्दैवी बयाबाई साहेब .वडिलांच्या मागे ती ६६ वर्षे जिवंत होती .बायजाबाई शिंदे यांनी मोठ्या कौतुकाने या लहान मुलीचे लग्न त्यांच्याच एका सरदार पुत्राबरोबर ठरवले. व आपल्या राजवाड्यात मोठ्या थाटामाटात हे लग्न लावून दिले.
पंढरपूर येथे महाद्वार घाटावर शिंदे सरकारचा मोठा भव्य असा वाडा आहे. या वाड्याच्या आत द्वारकाधिशाचे मंदिर बायजाबाई शिंदे या ग्वाल्हेरच्या राणीसाहेबांनी बांधलेले आहे .
१८५७ च्या युद्धापूर्वी अनेक गावांमध्ये काही माणसे चपात्या किंवा पोळ्या घेऊन जायची व गावकऱ्यांना एकत्र करून या चपात्या खाण्याची पद्धत होती. हजारो गावांमधून अशा चपात्या युद्धापूर्वी पोहोचवल्या गेल्या .प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले तर सैन्याला रसद पुरवठा कसा करायचा याची योजना चपात्यांचा वाटपातूनच बायजाबाई यांच्या विचारातूनच साकारली गेली .
बायजाबाई यांनी १८५७ च्या युद्धाचा वेळी खुप मोठा यज्ञ केला होता. यज्ञाच्या निमित्ताने गोपनीय माहितीची देवाण-घेवाण सुकर झाली . अनेक राजांचे राजगुरू संदेश घेऊन सगळीकडे संचार करु लागले. या यज्ञाचा हेतूच गोपनीय माहिती गोळा करण्याचा होता.१८५७ चे स्वातंत्र्यसमर फसले पण या राणीसाहेबांचा दबदबा मात्र चोहीकडे टिकून राहिला.
.पुढे राज्यात जनकोजी शिंदे व बायजाबाई यांचा बेबनाव होऊन राज्यात बंड झाले. बंडाची परिसमाप्ती होऊन सर्वत्र शांतता झाल्यावर बायजाबाई जाऊन गाॅल्हेरमधे राहिल्या .तेथेच त्याचे निधन झाले .
काही विद्वानांनी यांच्याबद्दल जे उद्गार काढले आहेत,ते त्यांची खरी योग्यता व्यक्त करतात .तत्कालीन 'मुंबई गॅझेटमध्ये,बायजाबाई यांचे जे मृत्यू वृत्त आले त्यात असे म्हटले होते की ," बेगम सुमरू ,नागपुरची राणी, झाशीची राणी ,लाहोरची चंदाराणी आणि भोपाळची बेगम या सुप्रसिद्ध स्त्रियांमध्ये ही राजस्त्रीहि आपल्या परीने प्रख्यात असून हिने अनेक वेळा आपल्या देशाच्या शत्रूशी घोड्यावर बसून टक्कर दिली होती"
अशा या शूर व तेजस्वी सौदामिनीचा वृद्धापकाळामुळे २७ जून १८६३ साली ग्वाल्हेर मध्ये मृत्यू झाला. ग्वाल्हेर संस्थानाच्या कारभाराच्या वाटचालीत त्या सहा दशकांहून अधिक काळ साक्षीदार राहिला.
🙏अशा या शूर व धाडसी बायजाबाई साहेब यांना आमचा मानाचा मुजरा 🙏
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
संदर्भ
आगामी पुस्तकं बायजाबाई शिंदे यांच्या पुस्तकातून साभार

कोंडाजी फर्जंद

 


कोंडाजी फर्जंदने ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत फितूर झाल्याचे नाटक केले. ते जंजिऱ्याचा त्यावेळचा किल्लेदार सिद्दी याला जाऊन भेटला. पण कोंडाजी बाबा हे कारस्थान करताना त्याच्या १२ मावळ्यांसह तो पकडले गेले. त्यांचा गळा चिरून त्यांना मारले गेले.

मुरुड जंजिरा वरील आक्रमण
ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता.
जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.
त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.
याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद याला.संभाजी राजांनी कोंडोजी च्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेवून निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धी ला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धी ला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची सेवा करू लागला. पण त्या कोंडाजी च्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजी चे मन मात्र शंभू राज्यांकडे होते.
War with Siddhis of Murud Janjira
संभाजी महाराजांनी कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते.
दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.
कोन्डोजीकडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही समान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.
पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता छत्रपती संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, डागा तोफा किल्ल्यावर.
मग मात्र किनाऱ्यावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच.
पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता.
त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले..!!

जिवा महाला

 Post By..

Webdunia

जिवा महाला "
उमरठ हे गाव तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा.
आज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.
राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची. मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.
आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची, त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.
आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे. हा हिरडस मावळातला.वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.
वास्तविक सर्व जण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार ??
लेकीसुना, संत सज्जन ,गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे. स्वराज्य आणले होते ..!
मैदान खचाखच भरले होते. लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला.
आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
राजीयांनी पांढरा अंगरखा घातला होता.
कृष्णा घोडीवर स्वार होते आणि कमरेला तलवार बांधली होती. जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते.
राजे खाली उतरले ..
तानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले होते. राजांनी तानाजीरावांना मिठी मारली.
तितक्यात खबर आली की, बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता. त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .
वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली.
मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने.
हे ऐकून मैदान शांत झाले. खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन् मैल आले होते.
आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते
'' मंडळी, लखू बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. म्हणून तो आज लढू शकत नाही.
या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल ?असेल तर समोर या.''
ही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरु झाली.
एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता. सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
राजे सर्व पाहत होते.
तितक्यात कोणीतरी किंचाळला...
''आरं आला रं जिवा आला ''
राजांनी चौकशी केली तानाजीरावांपाशी ..
तानाजी म्हणाले, ''राजं, ह्यो जिवाजी, आपल्या हिकडचाच हाय, कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होतं..
निजामशाहीचा दंगा झाला तवा ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला..तेनच याला तयार केलाय."
राजांच्या चेहर्यावर एक तेज आले होते.
कुस्तीची सलामी झडली .
भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जिवाला नमवण्याचा प्रयत्न केला, पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता. डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.
भिकाजीने उसन्या अवसानाने पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला, पण सावध जिवाने फिरवून बाहेरची टांग लावली...भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.
सगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले. जिवाला अक्षरशः डोक्यावर घेवून नाचू लागले.
तितक्यात शिंगे-करणे गरजू लागली. खुद्द राजे येत होते.
पटापटा सर्व बाजूला झाले.
राजीयांनी हासत हासत जिवाला मिठीच मारली. मनात काय राजकारण होते माहीत नव्हते; मात्र राजे जाम खुश झाले होते.
राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जिवाला बक्षीस दिले..आणि विचारले..
"जिवा काय करतोस ??"
जिवा उद्गारला, '' काय नाय, वरातीत पट्टा फिरवतो, दंगलीत कुस्त्या खेळतो.''
राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ?....
पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमांच्यासोबत..!!
आहे कबूल ..??"
जिवा हसला...होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला.
आणि
हाच तो जिवा महाला ज्याने अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला
आज जिवाजी यांची ३०६ वी पुण्यतिथी
जिवाजी महाला यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा
म्हणतात ना
होता जिवा, म्हणून वाचला शिवा

रत्नागिरी व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील चांदोली अभ्यारण्यामधील “किल्ले प्रचितगड”.

 ती झुंज व्हती ती कर्तुत्वशील व्हती, आणि ती मराठ्यांची रूढ़ी व्हती ती रयतेस जाणीव करुन देण्याची व्हती....


रत्नागिरी व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील चांदोली अभ्यारण्यामधील “किल्ले प्रचितगड”....🚩
कोकणातून घाटावर जाणाऱ्या रेडे घाटावर नजर ठेवण्यासाठी बनवण्यात आला होता काही वर्षापूर्वी पर्यंत प्रचितगडला जाण्यासाठी घाटावरुन पाथरपुंज, भैरवगड, चांदोली मार्गे वाटा होत्या तर कोकणातून रेडेघाट आणि शृंगारपूर मार्गे वाटा होत्या पण आता या वाटा चांदोली आणि कोयनानगर अभयारण्याच्या कोअर/बफर झोन मध्ये गेलेल्या असल्यामुळे प्रचितगड किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट उरली आहे ती आहे शृगांरपूर या कोकणातल्या गावातून संभाजी महाराजांच या गावात काही महिने वास्तव्य होतं त्या वास्तव्यात त्यानी बुधभूषण हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला होता...
आदिलशहाचे शृंगारपुरचे सरदार सुर्वेंच्या ताब्यात १६६१ साली मंडणगड, पालगड हे किल्ले होते उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर शिवाजी महाराज दाभोळकडे निघाले वाटेत मंडणगड किल्ला होता शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच सुर्वेंची तारांबळ उडाली व मंडणगड सोडून आपली जहागिरी असलेल्या शृंगारपूरला पळून गेला महाराजांनी श्रृंगारपुरवर हल्ला केला त्यावेळी दळवींचे कारभारी (दिवाण) पिलाजी शिर्के यांची योग्यता पाहून महाराजांनी त्यांना स्वराज्यात सामिल करुन घेतले पुढे पिलाजीची मुलगी जिऊबाई उर्फ़ राजसबाई (येसुबाई) यांच्यांशी संभाजी महाराजांचा विवाह झाला तसेच शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई हिचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी यांच्याशी झाला...
शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेंव्हा त्यांनी संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सुभेदार म्हणुन नेमणुक केली शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजी महाराजांमधील लेखक, कवी जागा झाला त्यांनी “बुधभूषणम” हा संस्कृत ग्रंथ लिहिला नायिकाभेद, नखशिक, सातसतक हे ब्रज भाषेतील तीन ग्रंथ लिहिले...
➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : Avinash Gaykar...👌🏼♥️

Monday 28 June 2021

संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर – व्यक्तिवेध भाग २

 


संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर – व्यक्तिवेध

भाग २
पोस्तसांभार :: श्री. नागेश सावंत
कावजी कोंढाळकर :-
कान्होजी जेधे व बांदल देशमुख यांच्यातील वैरातून झालेल्या युद्धात कावजी कोंढाळकर यांचे भाऊ पोसाजी ठार झाले. कान्होजी जेधे यांनी कावजी कोंढाळकर यांना आश्रय दिला.
कावजी कोंढाळकर यांणा अफझलखान वधानंतर शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांच्याकडून मागून घेतले. कावजी कोंढाळकर देखील प्रतापगड युद्धात असावेत. जेधे शकावितील नोंदीनुसार “ कान्होजी जेधे यांजपासून कावजी कोंढाळकर , वाघोजी तुपे यास मागोन घेऊन हशमाच्या हजारीया सांगितल्या.”
शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला त्यावेळी मोगलांचा सरदार बुलाखी देइरी किल्याला वेढा घालून बसला होता . शिवाजी महाराजांच्या आज्ञानुसार कावजी कोंढाळकर यांनी त्याच्यावर हल्ला केला व वेढा मोडून काढला . जेधे शकावितील नोंदीनुसार “ देइरी गडास बुलाखीने येऊन वेढा घातला तेथे कावजी कोंढाळकर जावून चारशे लोक मारून वेढा काढला. “
संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर ह्या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. संभाजी कावजी यांच्या नावापुढे कोंढाळकर असे लावले जाते संभाजी कावजी कोंढाळकर परंतु त्यास काही संदर्भ नाही.
श्री. नागेश सावंत
संदर्भ :- इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १
सभासद बखर , ९१ कलमी बखर , जेधे शकावली

संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर – व्यक्तिवेध भाग १

 


संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर – व्यक्तिवेध

भाग १
पोस्तसांभार :: श्री. नागेश सावंत
संभाजी कावजी :-
संभाजी कावजी हा शिवाजी महाराजांचा भालदार होता. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली चंद्रराव मोरे मारला गेला. परंतु चंद्रराव मोरे याचा भाऊ हणमंतराव मोरे हा जावळीच्या खोऱ्यात चतुर्बेट येथे मुक्कामी होता त्यास मारल्याशिवाय जावळीवर असलेला धोका संपणार न्हवता. याकरिता संभाजी कावजी यास हणमंतराव मोरेकडे पाठवले असता संभाजी कावजीनी त्यास ठार मारले. सभासद बखरीतील नोंदीनुसार “ हणमंतराव म्हणवून चंद्रररायचा भाऊ चतुर्बेट म्हणून जागा जावळीचा होता. तेथे बल धरून राहिला. त्यास मारल्याविना जावळीचे शैल्य तुटत नाही . असे जाणून संभाजी कावजी म्हणून महालदार राजियाचा होता. त्यास हणमंतराव याजकडे राजकारणास पाठवून , सोयरिकीचे नाते लावून . एकांती बोलाचालीस जावून , संभाजी कावजी याने हणमंतरायासी कट्यारीचे वार चालवून जीवे मारिले. जावळी काबीज केली.
अफझलखान स्वराज्यावर चाल करून आला अश्या बिकट प्रसंगी शिवाजी महाराजांना त्याची भेट घ्यावी लागली. अफझलखान दगा करणार याची खात्री शिवाजी महाराजांना होती . शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत विश्वासू मावळे घेतले. संभाजी कावजी हे देखील त्यामध्ये शिवाजी महाराजांचे अंगरक्षक म्हणून प्रतापगडास गेले. खानाने दगा करताच शिवाजी महराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. जखमी झालेल्या खानास पालखीतून नेण्यात येऊ लागले. संभाजी कावजी यांनी पालखी वाहणाऱ्या भोयांच्या पायावर वार केले व खानाचे डोके कापून शिवाजी महाराजांकडे आला. सभासद बखरीतील नोंदीनुसार “ इतक्यात संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारिले आणि पालखीवाले भोयास पाडिले. खानाचे डोचके कापीले . हाती घेऊन राजीयाजवळ आला.
शिवाजी महाराजांनी त्याच्या धाडसाचे कौतुक करत त्यास चाकण येथील पागेवर अधिकारी म्हणून नेमले. शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी संभाजी कावजी याचा मित्र बाबाजी राम हा शाहिस्तेखानास जावून मिळाला. त्यामुळे शिवाजी महाराज संभाजी कावजीवर रागावले. त्यामुळे संभाजी कावजी नाराज झाला व तो देखील शाहिस्तेखानास जावून मिळाला. शाहिस्तेखानाने त्याचे बळ व शौर्य पाहून त्यास पाचशे स्वरांनसह तैनातीस ठेवले. शिवाजी महराजांनी प्रतापराव गुजराना आज्ञा केली त्यानुसार त्यांनी इ.स. १६६१ मध्ये त्यास ठार केले. ९१ कलमी बखरीतील नोंदीनुसार “ बाबाजी राम याजवर मेहरबानी होती. ते राज्याचार सांगत होते. बुऱ्हाननजीक भेटले होते. त्याउपर संभाजी कावजी बांदा त्यावरी इतराजी झाली. पारखा होऊन शाहीस्तेखानास भेटला जोरावर होता. घोडा चहू पाई धरून उचलिला. त्याजवरून मेहरबान जाले. मनसफ जाली मौजे मलकर त्या स्थळी गाव बळकट करून ठाणे तेथे घालोन पाचशे स्वरानिसी होता. त्याउपर राजे स्वामिनी प्रतापराव गुजर सरनौबत फौज पाठवून ठाणे मारून संभाजी कावजी युद्ध करता पडला. शके १५७९ मन्मथ नाम संवत्सरे वैशाख वद्य दशमी सोमवार मुक्काम ठाणे मंलकर.
संभाजी कावजी यांची संभाव्य समाधी पुण्यातील चीखलवडे या गावी परंपरेनुसार दाखवली जाते
श्री. नागेश सावंत
संदर्भ :- इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १
सभासद बखर , ९१ कलमी बखर , जेधे शकावली

सेनापती संताजी घोरपडे

 


सेनापती संताजी घोरपडे

पोस्तसांभार :: श्री . नागेश सावंत
“ सेनापती संताजी घोरपडे “ यांचे नाव ऐकताच शत्रूच्या हृदयात धडकी भरत असे त्यांचे घोडेही पाणी पीत नसत. संताजी घोरपडे यांचा जन्म अंदाजे १६४२ - ४५ च्या सुमारास झाला . छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली त्यावेळी धारातीर्थी पडलेल्या म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे सुपुत्र संताजी घोरपडे . सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या सोबत मोहिमेवर संताजी होते. सप्तप्रकरणात्मक चरीत्रनोंदीनुसार इ.स. १६७४ साली मराठा सैन्यात जुमलेदाराचा हुद्दा मिळाला. “ संताजी घोरपडे यांनी कामे बहुत केली .शिपाई मर्द जाणोन हंबीरराव यांणी विनंती केलियावरून तैनात जाजती करून जुम्लेदारी दिल्ही “. शिवाजी महाराजांनी इ.स. १६७९ जालनावर स्वारी केली त्यावेळी संताजी या मोहिमेत सहभागी होते. मोहिमेत त्यांच्याकडून उतावीळपणा झाला त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मुजऱ्यास येण्यास मनाई केली. ९१ कलमी बखरीनुसार “ संताजी घोरपडे यांनी युद्ध समयी उतावळी केली म्हणोन इतराजी होऊन मुजरेयासी येऊ दिले नाही. “ सभासद त्याच्या बखरीत लिहितो शिवाजी महाराजांनी “ संताजी घोरपडे व बहिरजी घोरपडे व धनाजी जाधव हे जरी वाचले तरी मोठा पराक्रम करतील “ असे उदगार काढले. म्हणजे खुद्द शिवाजी महराजांना देखील त्यांच्याबद्दल विश्वास होता .
संभाजी महाराजांच्या काळात संताजींच्या प्रराक्रमाच्या विशेष नोंदी आढळून येत नाहीत . औरंजगजेबाने संभाजी महाराजांची केलेली क्रूर हत्या व रायगडास मोगलांचा वेढा पडल्यामुळे छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजीस जाण्याचा निर्णय घेतला. अशा बिकट प्रसंगी रणमार्तंड संताजी घोरपडे यांच्या प्रराक्रमाचा उदय झाला. औरंगजेबाची छावणी तुळापुर येथे होती. औरंगजेबाच्या छावणीवर छापा घालून त्याच्या तंबूचे तणावे ( दोर ) व डेऱ्याचे सोन्याचे कळस कापून ते सिंहगडाच्या पायथ्याशी आले. तेथे दोन दिवस मुक्काम करून रायगडास वेढा देवून बसलेला मोगल सरदार जुल्फकार याच्या फौजेवर छापा घातला. मोगली सैन्याचे हानी करत त्यांचे पाच हत्ती पकडून आणले. छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्यावर वास्तव्यास होते त्यांच्यासमोर बादशाहच्या डेऱ्याचे कळस व पाच हत्ती नजर केले. राजाराम महाराजांनी खुश होऊन त्यांना वस्त्रे , आभूषणे व किताब दिले. राजराम महाराजांच्या चरित्रात याविषयी माहित येते “ प्रथम लढाई शिवाजी महाराजांचे नावावर केली , यश आले, आणि पाद्शाहाच्या डेऱ्याचे कळस हस्तगत झाले, पाच हत्ती मिळाले, हा संतोष मानून संताजी घोरपडे यांस “ ममलकतमदार “ किताब दिला.
संताजी घोरपडे यांस सेनापतीपदाची प्राप्ती :- चिटणीस बखरीनुसार बादशाहाच्या डेऱ्याचे कळस काप्नून आणल्याने त्यांना रामचंद्र अमात्य यांच्या विनंतीनुसार सेनापतीची वस्त्रे शके १६१० , विभवनाम संवत्सरे , श्रावण शुद्ध ५ स दिली ( इ.स. १६८९ ). परंतु याविषयी मतमतांतरे आहेत संताजी घोरपडे यांना सेनापतीची वस्त्रे इ.स. १६९१ च्या सुरवातीस दिली गेली असावीत .
राजाराम महाराज जिंजीस जाण्यास निघाले त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा कारभार रामचंद्र अमात्य यांच्याकडे सोपवला व त्यांच्या मदतीस शंकराजी नारायण, संताजी घोरपडे व धनाजी जाधव दिले. राजाराम महाराज बिद्नुरची राणी चेनम्मा हिच्या मुलकातून जात असताना तिने त्यांना आश्रय दिला व आपल्या राज्यातून सुखरूप जाण्यास मदत केली म्हणून औरंगजेबाने जाननिसारखान सरदारास कर्नाटकात रवाना केले. “ मासिरे आलमगिरीतील नोंदीनुसार “ जाननिसार खानाला मोठ्या तुकडीनिशी त्या अस्वलणीवर ( राणी चेनम्मा ) चालून जायचा आदेश झाला. तेंव्हा त्या सैतानी संताने ( संताजी घोरपडे ) यशस्वीपणे खान , मतलबखान व सारजा खानाला थोपवले. शेवटी त्या राणीने दंड म्हणून थोडी रक्कम देवून ते प्रकरण मिटवले.
संभाजी महाराजांना कैद करणारा शेख निजाम याचे पारपत्य करण्यासाठी रामचंद्र अमात्यांनी संताजीस धाडले त्याचे वर्णन राजारामचरित्रंम ( जिंजीचा प्रवास ) या संस्कृत साधनांत आढळून येते. :- इकडे निजामाला जिंकण्यासाठी पाठविलेल्या संताजी घोरपड्यादिकांनी प्रथम निजामाचा पराभव करून त्याचे हत्ती, घोडे , व पुष्कळ द्रव्य हरण केले. तेंव्हा अंगावर जखमा झालेला निजाम कसाबसा जीव बचावून करवीरास पळून गेला . नंतर घोरपड्यादि मंडळी रामचंद्रपंताला जाऊन मिळाली.
ताराबाई कालीन कागदपत्रे :- “ राजश्री संताजी बिन मालोजी घोरपडे सेनापती – राजश्री छत्रपती स्वामी कर्नाटकात जाते समई तुम्हास या प्रांते ( महाराष्ट्रात ) ठेवून गेले . त्या समई इकडे गनिमाची धामधूम बहुत कुल देश व दुर्गे हस्तगत केली होती. राज्यामध्ये काही अर्थ उरला नाही . कुल मऱ्हाठी यांनी इमान खता करून गनीमाकडे गेले. परंतु तुम्ही इनाम ( संताजीने ) खता न करिता राजश्रीच्या पायाशी बहुतच येकनिष्ठा धरून जमाव करून सेख निजाम व सर्ज्याखान व रणमस्तान व ज्यानसरखान येसे उमदे वजीर बुडविले ! जागा जागा गनिमास कोठ्या घालून नेस्तनाबूद केले आणि देश सोडविला . राज्य संवरक्षणाचे प्रसंगास असाधारण श्रम केले. औरंगजेबास दहशत लावली . पुढेही कितेक स्वामी कार्याचे ठायी हीमत धरिता .
संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची धास्ती :-
( चिटणीस बखर ) :- “ मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत . त्यांस मोगली लोकांनी म्हणावे जे पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो कि काय ? रात्री दिवसा कोणीकडून येतील, काय करतील असे केले.
औरंगजेबाचा समकालीन चरीत्रकार खाफीखान लिहितो :- “ समृद्ग शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संतांजीची खूपच प्रसिद्धी झाली होती . ज्याला ज्याला म्हणून संतांजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला, त्याच्या त्याच्या नशिबी खालील तीनपैकी एक परिणाम ठेवलेला असे. एकतर तो मारला जाई. किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याच्या सपाटून पराजय होई आणि त्याचे सैन्य व बाजारबुणगे गारद होत . आपण जीवानिशी सुटलो हाच आपला पुनर्जन्म झाला , असे त्यास वाटे.
खाफीखान सेनापती संताजीस “ नालायक , हलकट , कुत्रा ” अशी शिव्यांची लाखोली वाहतो. डॉ. जयसिंगराव पवार लिहितात खाफीखानाने संताजींच्या मृत्यू नंतर आपला ग्रंथ तयार केला. असला तरी , संताजीने मोगली फौजांवर केलेले आघातच एवढे जबरदस्त होते की त्याच्या जखमा खाफिखानाच्या मनात त्यावेळीही ओल्या होत्या . म्हणूनच संताजीविषयी लिहिताना त्याच्या लेखणीस संयम राहत नाही. खाफीखान लिहितो “ युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून तो नालायक आणि हलकट कुत्रा ( संताजी ) तयार होऊन जाई तिकडे तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशहाच्या प्रतीष्टीत सरदारांनपैकी एकही तयार होत नसे ! जगाला धडकी भरून सोडणारी फौज घेऊन तो कोठेही पोहचला की नरव्याघ्राप्रमाणे असलेल्या अनुभवी योध्यांची ह्रदये कंपायमान होत. “
संताजी घोरपडे आणी धनाजी जाधव व राजाराम महाराज यांच्यात वितुष्ट :- जदुनाथ सरकार लिहितात “संताजी व धनाजी हे उच्च दर्जाचे लष्करी लोक होते, मात्र आयुष्यभर एकमेकांशी शत्रुत्व बाळगून राहिले .”
जिंजीतील मोगल सरदार जुल्फीकारखान हा मराठा फौजांच्या कचाट्यात सापडला असता त्याचा नायनाट करावा असे संताजींचे मत होते परंतु राजाराम महाराजानी जुल्फीकारखानास सुखरूप जाऊ दिले यामागे राजराम महाराज व जुल्फीकारखान यांचे अंत:स्थ राजकारण होते. परंतु यामुळे संताजी घोरपडे नाराज होऊन दुखावले गेले. जेधे शकावलीनुसार “ वैशाख मासी संताजी घोरपडे राजारामसीही बिघाड करून देशास गेले. त्यावरी धनाजीस नामजाद केले. परंतु हुकुमतपनाह रामचंद्र अमात्य यांनी मध्यस्थी करून समेट घडवून आणला.
कासीम खान व हिंम्मत खान अशा अनेक मोगली सरदारांना संताजी यांनी युद्धात धूळ चारली परंतु छत्रपती राजाराम महाराजांनी याबाबत संताजींचे कौतुक केले नाही व धनाजी जाधवांचा गौरव केला . त्यामुळे संताजी व धनाजी यांच्या दुरावा निर्माण होऊन आयवारकुटी येथे संताजी व धनाजी यांच्यात युद्ध होऊन त्यात धनाजी जाधव यांचा पराभव झाला व या युद्धात अमृतराव निंबाळकर मारला गेला.
जेधे शकावलीनुसार :- जेष्ठ वद्य ४ भोम वासर घटिका ४ पले ९ धनिष्ठा ४३ विश्यंकयोग २९/९ रात्रो घटी १८/१० राजा चैत्र मासी राजारामाच्या दर्षनास संताजी घोरपडे चंदीस गेले. जेष्ठ मासी बिघडोन कची अलीकडेस भांडण जाले. धनाजी जाधव पलोन देशास आला . अमृतराव निंबाळकर पडीला . संताजीची फत्ते जाली.
भीमसेन सक्सेना तारीखे दिलकुशा म्हध्ये लिहितो :- धनाजीने राजारामाचे मनात मनात असे भरवून दिले कि, संताजी आता कोणाचेच हुकुम मानीत नसून त्याचा इरादा स्वतंत्र होण्याचा आहे. त्याला मृत्युचीच शिक्षा दिली पाहिजे . असा बेत ठरवून राजाराम व धनाजी अमृतराव निंबाळकरास आघाडीवर ठेवून संताजीवर चालून गेले . लढाई होऊन अमृतराव मारला गेला .
साकी मुस्तेदखान मासिरे आलमगीरीत लिहितो :- राजारामला घेऊन जाणाऱ्या धना जाधव याच्याशी त्याचे जुने वैर होते. त्यामुळे जिंजीला जाताना त्याची धनाशी झटापट झाली. संताचा विजय झाला व त्याने धनाचा साहाय्यक व नागोजीचा मेहुणा अमृतराव , याला पकडून हत्तीच्या पायी दिले. त्याने राजा रामाला पण पकडले. पण धना ( धनाजी ) निसटला. दुसऱ्या दिवशी संता ( संताजी ) हात बांधून राजा रामाच्या समोर आला व म्हणाला की , “ मी पुर्विचाच सेवक आहे. तुम्ही धनाला माझ्या बरोबरीचा मान दिलात व जिंजीला त्याच्या मदतीने जायचे ठरवलेत म्हणून मला राग अनावर झाला. आता तुम्ही सांगाल ती सेवा मी करायला तयार आहे. त्याने राजारामाला सोडले व जिंजीला घेऊन गेला.
संताजी घोरपडे सेनापती पदावरून निलंबित :-
ऑक्टोंबर १६९६ रोजी संताजी घोरपडे यांना सेनापती पदावरून दूर करण्यात आले व त्यांच्याकडील फौज छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या बाजूने करून घेतली.
पेशवे दफ्तर ३१/ ६८ : - संताजी घोरपडे याणी स्वामीच्या पायाशी हरामखोरी केली. याकरिता त्यास सेनापतीचा कार्यभार होता. तो दूर करून फौज हुजूर आणविली.
संताजी घोरपडे यांचा खून :- सेनापती पदावरून संताजी यांना काढल्यानंतर त्यांना विशेष अशी कोणतीही कामगिरी न देता त्यांच्या जवळील फौज काढण्यात आली त्यामुळे त्यांची लष्करी ताकद कमी झाली. राजाराम महाराजांच्या आज्ञेने धनाजी जाधव संताजीवर चालून आले. विजापूरला त्यांच्यात युद्ध झाले. त्यात संताजींचा पराभव झाला व त्यांनी या युद्धातून माघार घेतली.
मोगल सरदार गाजीउद्दीनखान फिरोजजंग बाद्शहाच्या आदेशाने संताजीवर चालून आला. त्यामुळे एकीकडे मोगली फौजा व दुसरीकडे धनाजी जाधव यांच्या फौजा यांच्या कचाट्यात संताजी घोरपडे सापडले.
जेधे शकावलीनुसार :- चैत्र मासी संताजी सातारा प्रदेशात आला आणि त्याचा पाठलाग करीत गाजीऊद्दीन मागून गेला.
धनाजींच्या सैन्यातील हणमंतराव निंबाळकर संताजीचा पाठलाग करत राहिला त्यामुळे संताजी घोरपडे यांना शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या डोंगरात आश्रयास जावे लागले. तेथे नागोजी माने याने आपला मेव्हणा अमृतराव निंबाळकर ज्यास संताजीने हत्तीच्या पायी दिले होते त्याचा सूड घेण्यासाठी नागोजी माने याने बायकोच्या सांगण्यावरून संताजी घोरपडे एका ओढ्यावर अंघोळ करत असताना अचानक हल्ला करून संतांजीस ठार केले . संतांजीचे मस्तक धडावेगळे करून ते तोबऱ्यात भरून घोड्यावरून जात असताना तोबऱ्यातून त्यांचे मस्तक जमनीवर पडले. मोगली सरदार फिरोजजंग यास हे मस्तक सापडले ते त्याने बादशहास पाठवले . बादशाहने खुश होऊन त्यास बक्षिसी दिली.
जेधेशाकावली :- “ आषाढ मासी संताजी घोरपडे यांसी नागोजी माने याणी महादेवाजवळ दगा देवून मारिले “
संताजी घोरपडे समाधी :- १८ जून १६९७ रोजी मराठ्यांच्या आपसातील वादामुळे संताजी घोरपडे मारले गेले. संताजी घोरपडे यांची समाधी कण्हेर , कापशी व कारखेल या ठिकाणी आहे . संतांजीची हत्या कण्हेर येथे झाली . त्यांचे शीर कारखेल येथे पडले . अस्थीकलश कापशी येथिल समाधीत असल्याने मुख्य समाधी कापशी येथील मानली जाते .
संताजी घोरपडे यांची मुद्रा :-
( १ ) श्री राजारामचरणी तत्पर /
संताजी घोरपडे निरंतर //
( २ ) श्री राजारामभूपाल भक्तसेनापते शुभा /
संताजी घोरपडे तस्य मुद्रा भाती जयप्रदा //
श्री . नागेश सावंत
संदर्भ :- राजाराम महाराज चरित्र ( जिंजीचा प्रवास ), पेशवे दफ्तर ३१ ,चिटणीस बखर , ९१ कलमी बखर , ताराबाईकालीन कागदपत्रे , जेधे शकावली
मासिरे आलमगिरी : -रोहित सहस्तबुद्धे
सेनापती संताजी घोरपडे :- जयसिंग पवार
सेनापती धनाजी जाधव :- सदाशिव शिवदे
छायाचित्र साभार गुगल

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...