विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 30 March 2021

कर्नाटक स्वारी : भाग ५

 


कर्नाटक स्वारी : भाग ५
अशी सर्व तयारी झाल्यानंतर बिनीचे सरदार, खास अश्वदल, प्रभावी पायदळ बरोबर घेऊन इ. स. १६७७च्या प्रारंभी महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली. प्रथम भागानगरला जाऊन कुतुबशहाची भेट घेतली आणि आपल्या मोहिमेस त्याचा पाठिंबा मिळविला. कुतूबशहाचा सेनापती मिझ महंमद हाही ससैन्य महाराजांच्या मोहिमेत सामील झाला. कर्नाटककडे जाताना श्रीशैल याठिकाणी असलेल्या मल्लिकार्जुन या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे महाराजांनी दर्शन घेतले. त्यानंतर अनंतपूर, मंदियाळ, कडप्पा, तिरूपती या मार्गाने मे १६७७च्या पहिल्या आठवड्यात शिवाजी महाराज मद्रासजवळ पोहोचले. तेथून त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी सैन्याचे एक पथक पाठविले. वास्तविक पाहता जिंजीचा किल्ला अतिशय अभेद्य असून सहजासहजी जिंकण्यासारखा नाही.
परंतु जिंजीचा किल्लेदार नसीर महंमदखान याने ५०,००० रुपयांच्या जहागिरीच्या मोबदल्यात १३ मे १६७७ रोजी जिजीचा किल्ला मराठ्यांना देऊन टाकला. जिंजी जिंकल्यानंतर वेलोरचा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकण्याचे ठरविले. हा किल्लाही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता. किल्ल्याच्या खंदकात खोलवर पाणी असून त्या पाण्यात सुसरी आणि इतर जलचर प्राणी फिरत होते.'या तोडीचा गड पृथ्वीवर दुसरा नाही अशी याची ख्याती होती. अशा या अवघड किल्ल्याला मराठ्यांनी चिवटपणे वेढा घातला. परंतु किल्ला लवकर हाती येण्याची शक्यता वाटेना. तेव्हा या वेढ्याची जबाबदारी महाराजांनी रघुनाथराव व आनंदराव यांच्यावर सोपविली आणि स्वतः शेरखान लोदी या सरदाराच्या पाठलागावर निघाले. २६ जून १६७७ रोजी शेरखानाचा सर्व सरंजाम मराठ्यांच्या हाती लागला. स्वत: शेरखान शिवाजी महाराजांना शरण गेला. त्यानंतर महाराजांनी मदुरेपर्यंत जाऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
🚩व्यंकोजीचा प्रश्न 🚩
व्यंकोजीला आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याची शिवाजी महाराजांची इच्छा होती. परंतु महाराज कर्नाटक मोहिमेवर निघाल्यापासून व्यंकोजीला त्यांच्या हेतूविषयी शंका वाटत होती. मोहिमेत ज्यावेळी तंजावरपासून नऊ मैल अंतरावर कावेरीच्या काठी महाराजांचा मुक्काम होता, तेव्हा त्यांनी व्यंकोजीला मुद्दाम भेटीसाठी बोलावले. महाराजांच्या मुक्कामापासून तंजावर छत्रपती शिवाजी महाराज केवळ ८-९ मैल दूर होते. तेव्हा आपल्या राजधानीपासून सुरक्षित अंतर असलेल्या महाराजांच्या तळापर्यंत जाणे व्यंकोजीला अवघड नव्हते. व्यंकोजीने शिवाजी महाराजांची भेट घेतली. महाराजांनी त्याच्याशी दिलखुलासपणे बातचीत केली. शहाजीच्या कर्नाटक जहागिरीतील वाटाही मागितला. त्यापूर्वीही वकीलामार्फत व्यंकोजीशी महाराजांचे बोलणे झाले होते. ही सर्व बोलणी सामोपचारपद्धतीने झाली होती. बोलणी चालू असताना अचानकपणे महाराजांना न सांगताच व्यंकोजी पळून गेला, याचे फारच दु:ख महाराजांना झाले.
'व्यंकोजीला पकडण्याचा किंवा त्याची बिरूदे हिसकावून घेण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असे असताना न सांगता व्यंकोजी राजे का पळाले?"म्हणून महाराज व्यथित होऊन बोलले ,‘उगी उठून पळून गेले. अति धाकटे ते धाकटे, बुद्धीही धाकटेपणास योग्य केली.'
व्यंकोजी पळून गेल्याचे दु:ख शिवाजी महाराजांना अतोनात झाले. परंतु स्वतः व्यंकोजीने मात्र मराठ्यांविरुद्ध लढा देण्याची तयारी केली. कावेरीच्या परिसरात संताजी भोसले याचे लष्कर होते. त्याच्यावर १५ नोव्हेंबर १६७७ रोजी व्यंकोजीने हल्ला केला आणि त्याला पळवून लावले. संताजी त्यावेळी बेसावध होता. यशस्वी माघार घेतल्यानंतर त्याने पुन्हा तयारी केली आणि वलीगंडपूर येथे झालेल्या लढाईत व्यंकोजीचा पराभव केला. अशाप्रकारे व्यंकोजीचा पराभव झालेला असला तरी शिवाजी महाराजांना त्याचेबद्दल माया वाटत होती आणि म्हणून एक सविस्तर पत्र लिहून शिवाजीने व्यंकोजीला लिहिले, ‘दुर्योधनासारखी बुद्धी करून, तुम्ही युद्ध केले...... झाले ते झाले आता हट्ट न करणे' दरम्यान मराठ्यांनी व्यंकोजीची अनेक ठाणी जिंकून घेतली. शेवटी व्यंकोजीने रघुनाथपंत हणमंते याचेमार्फत शिवाजी महाराजां बरोबर तह केला.
ऐन पावसाळ्यातही शिवाजीची कर्नाटक मोहिम चालू होती. जुलै १६७७च्या सुमारास शिवाजी महाराज तिरूमलवाडीतून वृद्धाचलम् या मार्गाने पटनोव्हा या ठिकाणी आले. ते स्थळ काबीज करून दक्षिण अर्कटवर महाराजांनी प्रभुत्व संपादन केले. पावसाळा संपल्यावर म्हणजे ऑक्टोबर १६७७ मध्ये आरणी, होसकोट, शीरे, बाळापूर इत्यादी पश्चिम-दक्षिण जोडणारी स्थळे
ताब्यात घेऊन नोव्हेंबर १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहिमेची सांगता केली.
जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था ।
शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे एक खास वैशिष्ट्य दिसून येते. जो प्रदेश जिकला आहे किंवा जे किल्ले जिंकले आहे त्यांची उत्तम व्यवस्था लाऊन दिल्याशिवाय शिवाजी महाराज पुढे जात नसत. कर्नाटक मोहिमेवर असताना जो प्रदेश आपल्या ताब्यात आला त्याची चोख व्यवस्था लावण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी प्रथम केले.
संताजी भोसले याला कर्नाटकात जिंकलेल्या प्रदेशावर सुभेदार म्हणून नेमले आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी रघुनाथपंत हणमंते यांची निवड केली. जिंजी किल्ला जिंकताना काही बुरूज कोसळले होते, तटांना खिंडारे पडली होती, परंतु महाराजांनी कारागिर लावून किल्ल्याची उत्तम डागडुजी केली. एवढेच नव्हे तर पहिल्यापेक्षा किल्ला अधिक भक्कम केला. ‘अनेक, नवे भुईकोट व डोंगरी किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले. केवळ किल्ल्यांची डागडुजी आणि प्रशासन व्यवस्था एवढ्या कार्यावरच महाराज संतुष्ट राहत नसत. रयतेचा किंवा सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या अधिका-यांना, सैनिकांना ते सूचना देत असत, निष्पाप लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घेण्यास सांगत.
जानेवारी १६७८ मध्ये म्हैसूरमार्गे महाराष्ट्राकडे परत येताना बेळगाव जिल्ह्यात महाराजांनी प्रवेश केला. तेथून संपगावमार्गे पुढे जात असताना बेलवाडी येथील सावित्रीबाई देसाई हिने शिवाजी महाराजां विरूद्ध युद्ध पुकारले. ही देसाई स्त्री एवढी पराक्रमी होती की बेलवाडीचा छोटासा किल्ला तिने २७ दिवस लढविला. शेवटी शिवाजी महाराजां पुढे तिला माघार घ्यावी लागली.महाराजांनी या देसाई स्त्रीचे मोठे कौतुक केले. एप्रिल १६७८ मध्ये शिवाजी महाराज पन्हाळगडावर
आले आणि तेथून मे महिन्यात रायगडावर गेले. अशाप्रकारे शिवाजी महाराजांची कर्नाटक मोहीम जवळजवळ दीड वर्षे सुरू होती असे म्हणावे लागेल. ही मोहीम यशस्वी झाल्याने शिवाजी महाराजांचा दरारा दक्षिणेत सर्वदूर निर्माण झाला. पाश्चात्य वखारवाले अधिक सावध झाले. राज्याभिषेकानंतर दक्षिण हिंदुस्थानात मोठा विस्तार करून शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची इमारत पक्की केली.
🚩संभाजी महाराज मुघलांना मिळाले🚩
कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना संगमेश्वरास पाठविले होते. महाराज स्वारीहून परत येईपर्यंत ते संगमेश्वरलाच राहिले होते. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर निघण्यापूर्वीच दोघांमध्ये वितुष्ट आले असावे असे वाटते. युवराज संभाजी महाराजांवर शिवाजी महाराजांचा विश्वासहीं होता कारण कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी इंग्रज सरवखारवाल्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी महाराजांनी संभाजी महाराजांवर सोपविली होती. साधारणपणे असे दिसून येते की, कर्नाटक मोहिम आटोपून शिवाजी महाराज स्वराज्यात परत आले आणि तेव्हापासून त्यांचे मन संभाजीमहाराजां विषयी कलुषीत झाले. रायगडावर असताना प्रधानांचे आणि संभाजी महाराजांचे काही कारणामुळे बिनसले होते. कदाचित कर्नाटक मोहिमेवरून परत आल्यावर प्रधानांनी आणि इतर अधिका-यांनी महाराजांजवळ संभाजी महाराजांविषयी कागाळ्या केल्या असाव्यात. अर्थात अशा कागळ्यांमुळे गैरसमज करून घेण्याचा शिवाजी महाराजांचा स्वभाव नव्हता. स्वत: संभाजीमहाराजांच्याही काही तक्रारी होत्या. परंतु या तक्रारींना विशेष महत्त्व शिवाजी महाराजांनी दिले नाही. थोडक्यात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले होते, हे मात्र निश्चित.
कर्नाटक मोहिमेहून परत आल्यावर महाराजांनी संभाजीमहाराजांना सज्जनगडाकडे पाठविले तेथे समर्थ रामदासांच्या सहवासात संभाजीमहाराजांची चित्तवृत्ती शांत होईल असा शिवाजी महाराजांचा कयास असावा. परंतु संभाजीमहाराज जेव्हा सज्जनगडाकडे गेले तेव्हा समर्थ रामदास तेथे नव्हतेच. अगोदरच उद्दिग्न झालेल्या संभाजीमहाराजांचे सज्जनगडावर मन रमेना. संभाजीमहाराजांच्या या मन:स्थितीचा अंदाज मुघलसरदार दिलेरखान याला आला होता आणि म्हणून आपले हस्तक संभाजीमहाराजांकडे पाठवून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न दिलेरखानने चालू केला.
शिवाजी महाराज आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा समज झाल्यामुळे संभाजीमहाराजांनी मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिम आटोपून १६७८ च्या पावसाळ्यापूर्वी स्वराज्यात आले. संभाजीमहाराज १६७९च्या प्रारंभी केव्हातरी मुघलांना जाऊन मिळाले. संभाजीमहाराज आपल्याकडे आल्यानंतर दिलेरखानाला विलक्षण आनंद झाला. त्याने ताबडतोब मराठ्यांविरुद्ध मोहिम उघडण्याचा निर्णय घेतला. पण याच वेळेला मुघल आणि आदिलशहा यांच्यातही संघर्ष चालू होता. तरीपण आदिलशाहीविरूद्ध मोहीम चालू असताना मराठ्यांना डिवचण्यासाठी दिलेरखानाने १७ एप्रिल १६७९ रोजी भूपाळगड किल्ल्याला वेढा दिला. यावेळी भूपाळगडावर फिरंगोजी नरसाळा हा किल्लेदार होता. याच किल्लेदाराने चाकणचा किल्ला मोठ्या हिकमतीने लढवून शायिस्तेखानास जेरीस आणले होते. परंतु यावेळी दिलेरखान संभाजीमहाराजांना बरोबर घेऊन आल्यामुळे त्याने किल्ला खानाच्या स्वाधीन केला. भूपाळगड ताब्यात आल्यानंतर दिलेरखानाने आदिलशाहीविरूद्ध चाललेली मोहिम अधिक तीव्र केली. मंगळवेढा वगैरे प्रदेश जिंकून घेऊन ऑक्टोबर १६७९ पर्यंत दिलेरखानाने थेट विजापूरपर्यंत धडक मारली. या सर्व मोहिमेत संभाजीमहाराज दिलेरखानाबरोबर होते अथणी शहर लुटण्यामध्ये दिलेरखानास संभाजीमहाराजांनी मदत केली. या सर्व वार्ता शिवाजी महाराजांस समजत होत्या. संभाजीमहाराज आपणास सोडून गेले याचे त्यांना विलक्षण दु:ख झाले होते. परंतु संभाजीमहाराजांच्या मानी स्वभावास मुघलांची चाकरी परवडणार नाही याची महाराजांना पूर्ण खात्री होती. काही दिवसांनी दिलेरखानाचे उत्तान वागणे संभाजीमहाराजांना पटेनासे झाले.दिलेरखान आणि संभाजीमहाराज यांच्यात झगडा झाला. याच काळात औरंगजेबाने संभाजीमहाराजांना कैद करण्याचाही घाट घातला होता. मुघलांच्या या राजकारणात संभाजीमहाराज पूर्णपणे विटले. शिवाजी महाराजांनी काही माणसे संभाजीमहाराजांच्या मागावर ठेवलेली होती. गुपचूपपणे संभाजीमहाराजांना ती भेटतही होती. त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होती.अथणीजवळ छावणी असताना एके दिवशी संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या माणसांबरोबर गुपचूपपणे दिलेरखानास सोडून बाहेर पडले आणि पन्हाळ्यास परत आले. त्यांना भेटण्यासाठी शिवाजी राजे पुरंदरहून पन्हाळ्यास आले. १३ जानेवारी १६८० रोजी पिता-पुत्रांची भेट झाली. शिवाजी महाराजांनी पूर्वीप्रमाणे पाश्चात्य वखारवाल्यांशी बोलणी करण्याचा संभाजीमहाराजांना अधिकार दिला.
🚩मुघलांविरूद्ध आघाडी🚩
कर्नाटकाची मोहीम हाती घेण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी ‘दक्षिण देश दक्षिणेतील सत्ताधिशांच्याच स्वाधीन राहिला पाहिजे' असे धोरण निश्चित केले होते. “दक्षिण्यांची दक्षिण' हे त्यांच्या नव्या राजकारणाचे सूत्र होते. त्या अनुषंगाने मुघलांविरूद्ध कुतुबशहा आणि आदिलशहा यांना मदत करण्याचे धोरण महाराजांनी स्विकारले होते. संभाजी राजे मध्यंतरी मुघलांना जाऊन मिळाल्यामुळे विलक्षण पेच महाराजांपुढे निर्माण झाला होता. परंतु संभाजीमहाराज मुघलांकडे फार काळ राहू शकले नाही. ते परत येताच शिवाजी महाराजांनी मुघलांविरूद्ध नवी आघाडी उभारली. आदिलशहाला मदत करण्यासाठी थेट विजापूरपर्यंत जाऊन मुघली फौजांची दाणादाण उडवली. त्यानंतर मराठवाड्यात थेट जालन्यापर्यंत जाऊन तेथील पेठ लुटली. आणि मुघलांमध्ये दहशत निर्माण केली. याच काळात शिवाजीमहाराजांच्या आज्ञेप्रमाणे मोरोपंत पेशव्याने खानदेशात शिरून धरणगाव, चोपडा ही शहरे लुटली. मलकापूर पर्यंतचा प्रदेश काबीज करून बागलाणामध्ये मुघलांचा पुरता बिमोड केला. अहिवंतसारखे किल्ले जिंकून घेतले आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या या प्रदेशावर हुकूमत निर्माण केली. या नव्या मोहिमेमुळे दिलेरखान मोठ्या पेचात सापडला होता. कारण मराठ्यांनी त्याची रसद तोडून पूर्ण नाकेबंदी केलेली होती. औरंगजेबाच्या आदेशानुसार
रणमस्तखान हा सरदार मोठी फौज घेऊन दिलेरखानाच्या मदतीसाठी निघाला होता. परंतु वाटेतच मराठ्यांनी रणमस्तखानास गाठले आणि त्याच्या फौजेवर असा काही चौफेर हल्ला केली की त्यामुळे त्याला औरंगाबादकडे पळून जावे लागले अशाप्रकारे मुघलांच्या पदरात नामुष्की आली. शेवटी मुघलांनी आदिलशाहीविरूद्ध मोहिम थांबविली आणि फेब्रुवारी १६८० मध्ये विजापूरचा वेढा उठविला. मुघलांसारख्या जबरदस्त शत्रूचा बंदोबस्त केल्यानंतर शिवाजी महाराज रायगडकडे परतले. काही घरगुती मंगलकार्ये त्यांना उरकायची होती म्हणून राजधानी रायगडवरच थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्याशी तर महाराजांचे सख्य झाले होते. १६८० च्या प्रारंभी क्रमांक एकचा शत्रू मुघल नामोहरम झाला होता आणि १६८० च्या प्रारंभापर्यंत पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्त्य वखारवाले यांनाही शिवाजी महाराजांनी आपल्या वर्चस्वाखाली आणले होते.
समाप्त....
🚩जय जिजाऊ ,जय शिवराय, जय शंभूराजे🚩

कर्नाटक स्वारी : भाग ४

 


कर्नाटक स्वारी : भाग ४
दक्षिणेचे राजकारण करताना शिवाजी महाराजांनी कुतुबशहाशी मित्रत्वाचे संबंध राखले होते. विजापूर दरबाराची सूत्रे हाती आल्यावर बहलोलखानाने आक्रमक धोरण स्वीकारले. कुतुबशहाच्या प्रदेशात धुडगूस घालण्यासाठी पठाणांची तुकडी पाठविली. चंदीचंदावरकडे कुतुबशाही प्रदेशात पठाणांनी बंडखोरी सुरू केली होती तेव्हा दक्षिणेत आदिलशाहीबरोबर कुतुबशाहीलाही पठाणांच्या घुसखोरीचा धोका निर्माण झाला होता. अर्थात हा धोका शिवाजी महाराजांच्या स्वराज्यालाही निर्माण झाला होता. हा धोका नाहीसा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी एका नव्या राजकीय सूत्राची मांडणी केली. ते सूत्र म्हणजे दक्षिण देश दक्षिण्यांच्याच स्वामित्वाखाली असला पाहिजे. 'दक्षिण्यांची दक्षिण' हे सूत्र त्यांनी आपल्या भावी राजकारणासाठी निश्चित केले. 'दक्षिण पातशाही तो राखली पाहिजे' हे शिवाजी महाराजांच्या मुघलविषयक धोरणाचे आता मुख्य सुत्र झाले होते. मार्च १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपड्यास जे पत्र लिहिले त्या पत्रात या सूत्राचे स्पष्टीकरण महाराजांनी केलेले आहे. ‘दक्षणचे पादशाहीस पठाण जाला, ही गोष्ट बरी नव्हे! ...आपली पातशाही जितकी वाढवू ये तितकी वाढवणे, पठाणांची नेस्तनाबूद करणे; दक्षणची पादशाही आम्हा दक्षणियांच्या हाती आहे ते करावे.
शिवाजी महाराजांचे नेमके धोरण या पत्रावरून स्पष्ट होते आणि या धोरणाला अनुसरून मार्च १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी गोवळकोंड्यास जाऊन कुतुबशहाची भेट घेतली. प्रत्यक्ष भेटीमध्ये दक्षिण भागात पठाणांचा धोका कसा निर्माण झाला आहे याची जाणीव महाराजांनी कुतुबशहास आणि मादण्णा प्रधानास करून दिली. त्यानंतर कर्नाटक मोहिमेची कडेकोट तयारी करण्याचे त्यांनी ठरविले. तंजावरचा राजा व्यंकोजी भोसले हा आपला सावत्र भाऊ असून शक्य झाल्यास त्यालाही स्वराज्यकार्यात ओढून घ्यावयाचे; शक्य न झाल्यास आपल्या पित्याच्या कर्नाटकातील जहागिरीचा वाटा त्याच्याकडे मागावयाचा म्हणजे काहीतरी युक्तीप्रयुक्ती होऊन व्यंकोजीला आपल्याकडे वळवायचे असाही एक हेतु शिवाजी महाराजांनी मनात बाळगला होता. ।
कर्नाटकसारख्या दूरवरच्या प्रदेशात मोहीम काढावयाची असल्यामुळे समर्थ शत्रूना काहीकाळ तरी स्वस्थ बसवावे म्हणजे त्यांच्याकडून आक्रमण होणार नाही असा दूरगामी विचार शिवाजी महाराजांनी केला. विशेषतः मुघलांचा धोका उद्भवण्याची अधिक शक्यता होती. म्हणून डिसेंबर १६७६ मध्ये शिवाजी महाराजांनी मुघल सरदार बहादूरखान याचेबरोबर सलोख्याचा तह केला.
कर्नाटक मोहीम प्रदिर्घ काळ चालणार असल्यामुळे स्वराज्याची कडेकोट व्यवस्था महाराजांनी लावली. मोरोपंत पेशवे, अण्णाजी दत्तो, दत्ताजी त्रिंबक आणि युवराज संभाजी महाराज यांच्यावर स्वराज्यामध्ये सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोपविली. अशी सर्व तयारी झाल्यानंतर बिनीचे सरदार, खास अश्वदल, प्रभावी पायदळ बरोबर घेऊन इ. स. १६७७च्या प्रारंभी महाराजांनी कर्नाटक मोहीम हाती घेतली.
क्रमशः ....!!!

शुर सेनानी सेनापती संताजी घोरपडे यांच्या आयुष्यातील सुवर्ण पान

 


शुर सेनानी सेनापती संताजी घोरपडे यांच्या आयुष्यातील सुवर्ण पान
सेनापती संताजी घोरपडे यांच्या आयुष्यातील सुवर्ण पान.
इ स १६९४ मध्ये जिंजी ची परिस्थिती फारच नाजूक होती. यासाठी जिंजी च्या मदतीसाठी महाराष्ट्रातून धनाजी जाधव ससैन्य निघाला. हि बातमी समजताच संताजी सुद्धा हाताच सैन्य घेऊन त्या मागे रवाना झाला. यावेळी धनाजी ने वाटेत असलेल्या वेलूर किल्याचा जुल्फिकार खानाचा वेढा साधी लढाई करून उठवला आणि पुढं गेला. यांनंतर जुल्फिकार खान जिंजीच्या वेढ्यात जाऊन मिसळला. यांनंतर कर्नाटक मध्ये कासीमखान, खानाजादखान, सफशिकनखान वगैरे १०-१२ नामांकीत सेनापती आणि तिप्पट मोगल सैन्याला कोंडून सोळा दिवस उपाशी मारल्याची वार्ता सर्वदूर पसरली आणि दक्षिण राजकारणात एकच खळबळ उडाली. याचा सविस्तर वृत्तांत बघू.
संताजी कर्नाटक मध्ये -
संताजी कर्नाटक मध्ये शिरल्या शिरल्या त्याने बेळगाव पासून ५२ मैलावर असणाऱ्या रामदुर्ग किल्ल्याला वेढा दिला. बादशाह संताजी च्या हालचालीवर खास लक्ष ठेऊन होता, त्याने तातडीने विजापूर चा सुभेदार नसुल्लाखान यास रामदुर्ग च्या मदतीला पाठवला आणि विजापूर -कर्नाटकचा फौजदार हिंमतखान बहाद्दूर याला संताजीच्या पाठलागावर पाठवलं. पण त्या आधीच संताजी रामदुर्ग सोडून दक्षिणेकडे गदगच्या दिशेनं निघाला होता. ९ नोव्हेंबर च एक संताजी च पत्र उपलब्ध आहे. इथल्या देशमुख-देशपांड्यांना लिहलेला सेनापतीचा तो एक जाहिरनामाच होता. पुढे संताजी कोप्पल च्या प्रदेशातून तुंगभद्रा ओलांडून चित्रदुर्ग परिसरात आला. चित्रदुर्ग चा बरमाप्पा नायक मोगली फौजाशी लढत होता. मराठा सैन्य येताच त्यानं त्यांचं स्वागत केलं आणि सारी हकिहत संताजी ला सांगितली. संताजी ने पूर्ण प्रदेशाची माहिती गोळा केली, कर्नाटकी हरकारे मराठा गुप्तहेरांना सहकार्य देत होते. संताजी ला स्थानिक लोकांच फार सहकार्य लाभलं. यावेळी भीमेकाठी बादशाहाची छावणी होती, त्याने संताजी च्या मागावर सरदार पाठवले कारण त्याला भीती होती की एकदा संताजी जिंजी पर्यँत पोहोचला तर मोगलांना खूप मोठा फटका बसणार होता. बादशाह ने सीऱ्याचा फौजदार कासीमखान याला कळविले " पाहिजे तेवढी सर्व मदत पाठवत आहे पण संताजीला कैद करा किंवा ठार मारा, ताबडतोब संताजीची वाट अडवावी, कोणतीही हयगय करू नये."
बादशाहने कासीमखानच्या मदतीसाठी बरेच मातब्बर सरदार पाठवले. ख्वाज़ाखान, खानाजादखान उर्फ रहुल्लाखान, सफाशीकनखान, सय्यद असालतखान, महंमद मुरादखान, मिर्झा हसन, खाफी महंमदखान यांच्या बरोबर बादशाही छावणीतील व बादशाहाच्या निकट खास असलेल्या खास निवडक चौकीतील निवडक मनसबदार, हप्त चुकीतून निवडलेले मुबलक सैन्य, भारी तोफखाना सोबत शाहजादा कामबक्ष आणि त्याची फौज सोबत होती. दक्षिणेतील आणि कर्नाटकातील सरदार हिमांतखान, हिमुद्दीनखान आणि रुस्तमदिलखान यांना हि सक्त हुकूम गेले होते. सर्वजण मिळून संताजी विरुद्ध मोहीम काढणार होते.
सर्व सरदार एकत्र आल्यावर मोहिमेला सुरवात झाली. कासीमखानचा मुख्य तळ सिरा असला तरी तो चित्रदुर्ग पासून १२५ मैलावर ईशान्येस अघोनी येथे डेरा देऊन बसला होता. त्याची ताकद दहा हजारापेक्षा जास्त खडी फौज, तोफखाना, सोने-चांदी, मोहिमेचे खाण्याचं साहित्य तो मुबलक बाळगून होता. या लढाईला मोगलांचे १०-१२ कसलेले व शूर सरदार-सेनापती आणि ४५ हजार सैन्य होते तर या उलट संताजी कडे सगळी मिळून १२ हजार फौज होती, यात सुद्धा २ हजार सटवाजी डफळे यांचे कर्नाटकी बरकांदार होते.
ठिकाण-
प्रत्यक्ष लढाई हि चलकेरे-तलाखु-दोड्डेरी या त्रिकोणात लढली गेली. मोगलांचे नियोजन असे होते की कासीमखान पहिल्या दिवशी चलकेरे तळावर येणार, दुसऱ्या दिवशी बादशाही सैन्य घेऊन तलाखु ला जाऊन मोहीम सुरू करणार आणि शेवट दोड्डेरी च्या किल्ल्यात मेजवानी घालून विजयोत्सव होणार. विशेष म्हणजे या मोगली सैन्यात एकही हिंदू सरदार नव्हता.
संताजी चा आत्मविश्वास आणि रणनिती-
तत्कालीन संताजी चा आभ्यास करता इतिहासकार म्हणतात की संताजी म्हणजे एक चालत-फिरत वादळ होत. त्याचा वेग आणि हालचाली पाहून मोगलांच्या प्रत्येक सरदाराला तो मध्येच गाठून एक-एक करून संपवू शकत होता. पण या प्रकारात त्याचा वेळ तर गेला असता पण सैन्य सुद्धा दमले असते. त्याचा भाव असा होता की सगळे सैन्य एकत्र करावे आणि एकदाच सगळ्यांची गठडी वळून त्यांचा ठोक किंवा घाऊक पराभव करावा. या साठी तो चित्रदुर्ग परिसरात सगळे मोगल एकत्र येण्याची वाट बघत होता. या वेळी एक गोष्ट जास्त लक्ष वेधून घेते कि ना संताजी ला कुठून मदत आली होती. ना कोणी मराठा सरदार मदतीला आला होता.
संताजी ची व्यूह रचना अशी होती की, चलकेरीपासून तो १५-२० मैल आला. मोगलांच्या तळांची खडानखडा बातमी काढत होता. आपल्या हालचालींची बातमी त्यांना पोहोचवत होता. हा गनिमी काव्याचा एक भाग होता. रोज ५-१० मैल जंगलात लांब जाऊ लागला. यामुळे मोगल सैन्य बेफिकीर झाले, त्यांना वाटलं की संताजी आपल्याला भिऊन जंगलात पळत आहे आपण त्याचा पाठलाग करून त्याला मारू शकतो. आणि एवढ्या मोठ्या सैन्यावर तो पलट वार करणार नाही याची खात्री झाली. जिवंतपणी मेलेल्याचे ढोंग करून संताजी ने मोगली सरदार आणि फौजांना गाफील केले आणि गनिमी काव्याची पहिली लढाई जिंकली.
लढाई -
संताजी च्या नियोजनानुसार सैन्याच्या ३ तुकड्या झाल्या. पहिले सैन्य पेशखान्यावर(जेवण-खाण करणारी लोक) हल्ला करेल. त्यांना वाचविण्यासाठी कासीमखान, खानजादखान वगैरे सरदार छावणी सोडून येतील. त्यांना दूर अंतरावर जंगलात लपलेल्या तुकडीने घेरून लढाई करायला भाग पाडायचं आणि एवढ्या वेळात तिसऱ्या तुकडीने छावणी लुटायची आणि पेटवून द्यायची. यात संताजी चे १२ ते १५ हजार सैन्य होते तर मोगलांचे ४५ हजार निवडक.
संताजी चे सैन्य मुख्य छावणी पासून २०-२५ मैलावर होते. भल्या पाहाटे मराठा सैन्य ठरल्याप्रमाणे छावणी जवळ आणि पेशखान्याजवळ येऊन थांबले. बाकीची दुसरी तुकडी चलकेरी व तलाखु रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगलात हल्ल्याची वाट बघत होते. आणि काही मुख्य अधिकारी, गोफणवाले, बंदूकधारी आणि बाणवाले उंचवट्याच्या जागांवर बसले होते. प्रत्येक टोळी बरोबर एक शिंगवाला इशाऱ्यासाठी ठेवण्यात आला होता.
ठरल्याप्रमाणे पहिल्या तुकडीने पेशखान्यावर हल्ला केला आणि पेंगुळलेलें सैन्य गारद केले. अर्धे मेले, काही जखमी झाले तर काही मुख्य छावणी कडे पळाले. मुख्य छावणी कडे जाणाऱ्या सैन्याला मराठयांनी अडवले नाही कारण हा संताजीच्या युद्धाचा एक भाग होता. बाजार-बुणगे व स्वयंपाक करणारे रानोमाळ पळत सुटले. मराठयांनी मोकळ्या पडलेल्या पेश खान्यावर यथेच्छ हात साफ केला. जेवढ खाण्यायोग्य होत तेवढं सामान जंगलात नेऊन लपवून ठेवलं आणि जे उपयोगी नव्हतं ते घोड्यांच्या पायाखाली तुडवल आणि तंबूला आग लावून दिली.
पळून गेलेल्या सैन्याने कासीमखान ला बातमी दिली आणि कासीमखान आपल्या सैन्यानिशी मराठयांवर चालून आला. पण मध्येच जंगलात दडून बसलेल्या सैन्याने कासीमखान वर दोन्ही बाजूने हल्ला केला. तोपर्यंत पेशंखान्यावरील मराठ्यांची तुकडी आपलं काम संपवून यांना मिळाली आणि एकच हल्ला केला. कासीमखानची भांबेरी उडाली. कासीमखान ने शाहनपणा करून काही घोडेस्वार छावणी कडे मदतीसाठी पाठविले त्यांना हि मराठ्यांनी अडविले नाही. कारण ही बातमी छावणी वर जावी आणि मुख्य छावणी वरील सगळे मोगल लढाईच्या मैदानात यावेत आणि छावणी मोकळी पाडावी हा संताजींचा डाव होता. आणि तसंच झालं.
शाही फौज कासीमखान च्या मदतीला-
कासीमखान घेरला गेलाय हे समजल्यावर शाही सरदार-पाहुणे सगळे आपापली फौज घेऊन कासीम खान च्या मदतीला आले आणि संताजीच्या वेढ्यात सापडले. मराठयांनी एकच बोंब केली. मोगलांनी प्रतिकाराचा जोर केला पण तो दिवस मराठ्यांचा होता आणि जोर सुद्धा मराठयांचा होता.
पौष शु।। एकादशीचा दिवस भल्या पहाटे पर्यंत भरपूर चंद्र प्रकाश होता. या प्रकाशात मराठे आपल्या जागा अश्या बदलत होते जस काय पूर्ण सूर्य डोक्यावर होता. सरस मराठे उंचवटे, झाड अंधारात सुद्धा झटापट बदलत होते. यामुळे मोगलांना नक्की काय प्रकार आहे आणि कुठून हल्ला होतोय हे समजत नव्हतं. मराठयांनी चंद्रप्रकाशात निम्मी लढाई मारली, मराठ्यांचा मारा ९९ टक्के मारक होता. भरपूर दगड जमा करून ठेवले होते. एकच गोफणवाला अनेक ठिकाणी मोर्चे बांधून मारा करत होता. मराठयांनी एकही मशाल वापरली नव्हती उलट मोगल मशाली घेऊन लढत होते यामुळे त्यांना मराठे दिसतच नव्हते. शेवटी मोगल जीव वाचविण्यासाठी पळत होते. याच गडबडीत तिसऱ्या टोळीने जाऊन मुख्य छावणी लुटली. सोने-चांदी-हिरे, जडजवाहीर, पैसा, धान्य, भांडी जेवढ शक्य तेवढं लुटलं.
कासीमखान तर पक्का उघडा पडला, पेशखान्याची छावणी आणि मुख्य छावणी दोन्ही बरबाद झाल्याचं पण मोगलांचा दारुगोळा हि मराठ्यांच्या हाती आला. आता मराठ्यांच्या सगळ्या तुकड्या मुख्य रणांगणावर आल्या आणि बेभान होऊन मोगलांवर तुटून पडल्या. मोकळ्या मैदानावर मोगलांना पळायला सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी मराठयांनी मोगलांना कोंडण्याचा बेत आखला आणि त्यांना रेटीत दोन-अडीच मैल मागे दोड्डेरी च्या गढीत नेऊन कोंडले. मोगल तर पार संपून गेले होतेच पण त्यांचे मुख्य सरदार तर पळून गेले होते.
चित्रदुर्ग च्या बरमाप्पा नायकास कासीमखान ने खूप सतावले होते. त्यामुळे त्याने संताजीच्या मदतीला सूड उगविण्यासाठी मोहिमेच्या सातव्या आठव्या दिवशी ८ हजार कर्नाटकी सैन्य आणि बरकांदार खूप दारू-गोळ्यासह पाठवले. यामुळे मराठयांना आराम मिळाला आणि ताज्या दमाचे सैन्य मोगलांवर गोळीबार करू लागले. याचवेळी बादशाह ने कासीमखान च्या मदतीसाठी हिम्मतखान बहाद्दूर याला पाठविले. हिम्मतखान येत आहे असं समजताच संताजी ने मुख्य सरदारांना गढी भोवती ठेवून स्वतः मोजकी फौज घेऊन समाचाराला निघाला पण वाटेत त्याला समजलं की राजाराम महाराजांनी हिम्मतखानाचा परस्पर बंदोबस्त करून त्या पळवले व तो बसवापट्टणच्या गढीत जाऊन बसला. तेंव्हा संताजी पुन्हा मागे फिरला.( यावेळी धनाजी जिंजी किल्यातच होता. राजाराम महाराजांनी हिम्मतखानाचा बंदोबस्त केला हि गोष्ट राजाराम महाराज, संताजी आणि धनाजी यांच्या संबंधावर प्रकाश टाकण्यास फार महत्वाची आहे.)
नव्या दमाच्या कर्नाटकी सपट्यात ४-५ हजार मोगल ठार मेले. तेंव्हा मराठ्यांना दया आली आणि त्यांनी गोळीबार थांबवला. मैदानावर मोगलांवर लक्ष ठेवणे मराठयांना थोडं अवघड जात होत , मोगल गढीत सापडल्यान एकाच दरवाजावर लक्ष ठेवणे सोपं झालं.
गढीत फार वाईट अवस्था झाली. दोन दिवसात सगळं धान्य संपल, जनावरांचा चारा संपला. शेवटी मोगल दोरीने पिशव्या खाली सोडत आणि मराठे पैसे घेऊन त्यांना मूठ-मूठ धान्य देत होते. शेवटी पैसे हि संपले आणि मोगल एकामेकाच्या जीवावर उठले. हत्ती-गुर-उंट जे खाता येईल ते खाऊन दिवस काढू लागले. आपल्या सैन्याची दुर्दशा पाहून कासीमखानने विष खाऊन आत्महत्या केली.
शेवटी मोगलांच्या मोठ्या सरदारांनी एकत्र येऊन संताजीला शरण जाण्याची सूत्र हलवली आणि खानजादाखान चा दिवाण तहाचा प्रस्थाव घेऊन संताजी कडे गेला. तह संताजी जे म्हनेल तसा झाला.
' तुमच्याजवळ जे काही असेल, हत्ती-घोडे-उंट-हत्यारे-नगद याशिवाय सात लाख होन एवढी रक्कम घेईन. मग सोडीन ' अस म्हणून सरदारांच्या मुलांना ओलीस ठेऊन बाकीच्यांना सोडून दिले. गढीतून बाहेर येताना प्रत्येकाच्या हातावर २ भाकऱ्या आणि अरजन ची उसळ( हरभरा सारखे धान्य) दिले. सगळं मोगल सैन्य अधोनीच्या किल्ल्यात नेऊन सोडलं तिथे रुस्तुमदिल खान ने त्यांची व्यवस्था केली. १६ दिवस अंथरूण सोडाच पण साधी चादर पांघरायला नाही ते हि डिसेंबर च्या थंडीत.
खास बादशाहाच्या उमरावांना अशी वेळ यावी याशिवाय दुसरा अपमान कोणता असेल.? छत्रपतींच्या गनिमी काव्याने मोठं-मोठ्या मोगली फौजांना दाती तृण धारायला लावणारा संताजी कोणी साधारण सरदार नव्हता. नुसत्या संताजी च्या नावाने मोगली फौजा रस्ता वाकडा करायच्या किंवा मागे फिरायच्या. संताजी दक्षिणेत असे पर्यँत मोगलांनी मोहिमा रोखल्या होत्या. आज कर्नाटक मध्ये सुद्धा संताजींचा पराक्रम सांगितला जातो.
मोगल बातमीदार आणि इतिहास अभ्यासक म्हणतात की या लढाईत एकूण ७० लाखांची लूट मराठ्यांच्या हाती पडली होती.
चित्रदुर्ग भागात एक कानडी पोवाडा खूपच लोकप्रिय आहे. यामध्ये बरमाप्पा नायकाची लोकप्रियता सांगितली आहेत पण मराठयांनी केलेल्या मोगलांच्या हालाचे वर्णन मुद्देसूद केले आहे.
प्रवास वर्णन करणारे म्हणतात की , " शिवाजी महाराज यांनी गनिमीकावा शोधला असेल तर संताजी ने त्याचा जास्त वापर केला."
पराक्रमा तुझं दुसरं नावच संताजी

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 9

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 9
दि.२४-११-१६८३ रोजी सुमारे रात्री ८ वा. मराठा सैन्यांनी जुवे बेटात जाऊन तेथील किल्ला काबीज केला. विजरईचे तर धाबेच दणाणले. जुवे बेट मराठ्यांनी घेतल्याची नोंद जेधे शकवालीत मिळते – ” मार्गशीर्ष मासी फिरंगी याचे कुंभारजुवे घेतले, साष्टी व बारदेश मारिला “
मनुची लिहितो – ” संभाजीने ओहटीच्या वेळी आपले चार हजार सैन्य पाठवून सँटो एस्टेव्होचा किल्ला ताब्यात घेतला. संभाजीचे सैन्य किल्ल्यात घुसले आणी किल्ल्यातील सर्व शिबंदीची कत्तल केली. संभाजीच्या सैन्याची मुळीच हानी झाली नाही. किल्ला ताब्यात आला याचा इशारा म्हणून संभाजीच्या सैनिकांनी अनेक(तोफेचे)गोळे (गोव्याच्या दिशेने) सोडले. त्यावेळी गोव्यात विलक्षण गोंधळ उडाला. दि.२५-११-१६८३ या दिवशी सकाळी ७ वा. सुमारास विजरई कोंदि द आल्व्होर याने ४०० शिपायांसोबत जुवे बेटाकडे कूच केले. मराठ्यांचे सैन्य जणू वाटच बघत बसले होते. पोर्तुगीज सैन्याने माऱ्याच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी हल्ला चढवला व पोर्तुगीजांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. मराठ्यांच्या घोडदळास घाबरून पोर्तुगीजांचे शिपाई जीव वाचवण्यासाठी विजरईस एकटे सोडून डोंगरावरून खाली नदीच्या तीराकडे पळत गेले. या लढाई मधे विजरई घायाळ झाला. केवळ सुदैवाने तो बचावला. जुवे बेट मराठ्यांच्या ताब्यात गेल्यामुळे नदीच्या बाजूस लागून ज्या शेतीच्या जमिनी होत्या त्याचे बांध पोर्तुगीजांनी फोडून टाकले. त्यामुळे जवळील मांडवी नदीचे पात्र वाढू लागले. (पो.म.सं-१०५) त्यांच्या सोबत आता विजरई कोंदि द आल्व्होर हा देखील पळत सुटला. तिथे झालेल्या झटापटीत त्याच्या दंडाला गोळी लागली. कसाबसा जिव वाचवत तो मांडवी नदीच्या तीरावर आला. आता विजरई कोंदि द आल्व्होर पुन्हा एकदा दोन्ही बाजूने कात्रीत सापडला होता.
बांध फोडून स्वताच्याच हाताने नुकसान करून घेतले असे त्याला वाटू लागले कारण पोर्तुगीजांना आता पलीकडे काही जाता येत नव्हते आणि पाठीमागून त्याचा पाठलाग खुद्द संभाजी महाराज ससैन्य करत होते. आपण संभाजी महाराजांच्या तावडीत सापडलो तर अंत निश्चित हे त्यास चांगलेच उमगले होते. संभाजी राजे किती इरेला पेटले होते हे यावरून दिसते. विजरई कोंदि द आल्व्होर तीरावर पोहोचताच एका मचव्यात बसला आणि पळाला. संभाजी महाराज देखील तीरावर पोहचले विजरई कोंदि द आल्व्होर याला मचव्यात बसून जाताना पाहताच त्या तुडुंब भरलेल्या मांडवी नदीच्या पात्रात संभाजी महाराजांनी आपला घोडा घातला ! आपल्या जीवाचे काय बरे वाईट होईल याची पर्वा देखील संभाजी महाराजांनी केली नाही. नदीला आलेल्या भरतीमुळे संभाजी महाराजांचा घोडा पोहणीला लागला यावेळी खंडो बल्लाळ तिथे शंभूराजांसोबत सोबत होते. घोडा पोहणीला लागलेला पाहताच, त्यांनी देखील त्या नदीच्या पात्रात उडी घेतली आणि जावून संभाजी राजांचे प्राण वाचवले. दैव बलवत्तर म्हणून मोठी हानी टळली. (म.स्वा-१४४) वर्षभरापूर्वीच संभाजी राजांनी खंडो बल्लाळ यांच्या वडिलांना (बाळाजी आवजी चिटणीस) देहदंड दिला होता. मनात कुठल्याही प्रकारची द्वेष न ठेवता स्वराज्याच्या छत्रपती साठी ही स्वामीनिष्ठा आणखी कुठे पहावयास मिळणार ? हे मराठी मातीचे गुण आणि सळसळत्या मराठी रक्ताचे ऋण आहे ! खंडो बल्लाळ यांनी केलेल्या कामगिरीबद्दल संभाजी महाराजांनी त्यांचा सत्कार केला. त्याचा उल्लेख असा मिळतो – ” महाराजांनी खासा घोडीयावरून जिनास पाणी लागे तो घोडा घातला. त्याजबरोबर खंडो बल्लाळ यांनी घोडा घालून तरवार मारिली, शिपाई गिरी केली.पाणी चढले तेव्हा घोडा पोहणीला लागला, खंडो बल्लाळ यांनी उडी टाकून महाराजांचा घोडा धरून पोहून बाहेर निघाले. ते समयी संभाजी महाराजांनी बहुत संतोष होऊन पोटाशी धरिले, घोडा बक्षिस दिला, खासा उतारपोशाख दिला. मोत्याची कंठी व तुरा दिल्या. सोबत पालखीचा मान दिला. ” (म.रा.चि.ब)
विजरई कोंदि द आल्व्होर हा पुरता घाबरला होता. मांडवी नदी पार करून कसाबसा जिव वाचवत तो थेट सेंट झेविअर कडे आश्रयास गेला. त्याने झेविअरची करुणा भाकली. सर्व मशाली पेटवून तळघरात जाऊन सेंट झेविअरची शवपेटी उघडली. त्याने आपला राजदंड आणि राजचिन्हे, स्वलिखित अर्ज झेविअरच्या पायथ्याशी ठेवला आणि प्रार्थना केली – ” हे राज्य तूच निर्माण केलेस आता तूच ह्याचा सांभाळ कर”. विजरई पूर्णपणे हवालदिल झाला होता. मराठ्यांचा मोर्चा आता साष्टी आणी बारदेश कडे वळला. संभाजी महाराज २०००० शिपाई, ५००० स्वार, आणि १० हत्ती घेऊन स्वारी केली. मराठे साष्टी आणि बारदेशात शिरल्यापासून जिकडे तिकडे जाळपोळ आणि लुटालूट करत होते. साष्टी आणि बारदेश मधील आग्वाद, रेइशमागुश, रायतूर, मुरगाव हे किल्ले सोडून सर्व प्रदेश मराठ्यांनी जिंकला. रायतूरच्या किल्ल्यास मराठ्यांचा सहा दिवस वेढा सुरु होता. साष्टी आणी बारदेश मधे मराठे २६ दिवस धुमाकूळ घालत होते. यावेळी संभाजी महाराजांनी ४६ तोफा बारदेश येथील किल्ल्यातून काढून नेल्या (पो.म.सं-१०८) विजरई कोंदि द आल्व्होर हा आता मुघलांच्या मदतीची वाट बघत बसला होता..आणि चमत्कार व्हावा असेच घडले. जणू सेंट झेविअरने त्याला कौल दिला. पोर्तुगीजांच्या मदतीसाठी निघालेला शहा आलम रामघाट उतरून गोव्यानाजिक दाखल झाला. या प्रवासात त्यालाही फार कष्ट झाले होते. बरेच मुघल सैन्य मृत्युमुखी पडले होते. या भागात घनदाट अरण्ये होती. नाईलाजाने शहा आलम यास घाटाच्या तोंडाशी चार मुक्काम करावे लागले. सैन्य आणि बुणगे यास घाट ओलांडण्यास फार कष्ट पडले. (फु.आ-१८)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 8

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’



( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 8
विजरई कोंदि द आल्व्होर हा दुर्भाट बंदर सोडून गोव्यास परतला. दि.१२-११-१६८३ या दिवशी सकाळचे आठ वाजले होते. विजरई निराश होऊन जुन्या गोव्यातील ‘बों जेजूस’ (Bom Jesus Basilica) या चर्चच्या शेजारी असलेल्या मठात जाऊन ४ दिवस राहिला. या चार दिवसात त्याने कोणाचीच भेट घेतली नाही. फोंडा किल्ल्यावर पोर्तुगीजांनी केलेल्या सततच्या मा-यामुळे किल्ल्याची अवस्था जिर्ण झाली होती. परत असा काही हल्ला झाला तर अथवा परत ही वेळ नको या विचाराने संभाजी महाराजांनी फोंड्याचा कोट पाडून जवळच एक नवीन किल्ला बांधला. त्यास त्यांनी किल्ले “मर्दनगड” हे नाव दिले.(पो.म.सं-१०२) फोंड्याचा संग्राम संपला तरी चौलचा वेढा सुरु होताच. निळोपंत पेशवे चौल येथे वेढा चालवीत होते. फोंड्यावरून संभाजी महाराज परत जातील असे विजरई कोंदि द आल्व्होर याचा समज होता, पण झाले उलटेच. संभाजी महाराजांनी तर आता थेट गोव्यातच शिरून निकाली हल्ला करण्याचे ठरवले. धर्मांध पोर्तुगीजांबद्दल संभाजी महाराजांना राग किती होता हे यावरून दिसून येते. मराठ्यांचे लक्ष होते आता ‘जुवे’ बेटाकडे. यास पोर्तुगीज ‘सांत इस्तेव्हांव’ असे म्हणत असत. गोव्याच्या ईशान्येला दोन मैलावर जुवे बेट आहे. हे बेट धावजी ह्या तीसवाडीतील गावाच्या पैल तीरास आहे. त्या बेटातून ओहटीच्या वेळी पायवाटेने गोवे शहरात येणे-जाणे कठीण नसे. म्हणून या पायवाटेस पोर्तुगीज Passo Seco असे म्हणत असत. पूर्वी दि.२५ नोव्हेंबर (साल उपलब्ध नाही) या दिवशी गोवा हे शहर पोर्तुगीजांच्या ताब्यात आले होते. या विजयाच्या स्मरणार्थ त्यांनी ‘सांत इस्तेव्हांव’ येथे ‘सेंट कॅथेरीन’ नावाचे चर्च बांधले होते. या बेटावर एक छोटेखानी किल्ला देखील होता. इतर काही कारणांमुळे विजरईने तिथे सैनिक ठेवले नव्हते.(अ.हो.मो-२१९)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 7

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 7
फोंड्याच्या वेढयात येसाजी आणि कृष्णाजी कंक यांनी पराक्रमाची शर्थ केली. दोघांना ब-याच जखमा झाल्या होत्या. संभाजी महाराजांनी दोघांना घरी मावळात जाण्याची आज्ञा दिली. घरी परतल्यानंतर कृष्णाजी कंक यांचा जखमा फुटून मृत्यू झाला. त्यांच्या पराक्रमाबद्दल संभाजी महाराजांनी कृष्णाजीस बक्षिसाची मोईन करून दिली अशी – ” पत्रवतन कृष्णाजी कंक पडती नायेक राज्यामंडळ शके १२ क्रोधन नाम संवत्सर आषाढ शु २. फोंडीयाच्या कोटात फिरंगीयांनी लगट केला (,) राजश्री स्वामी राजापुरीहून फोंडीयास गेले (,) गानिमासी गाठी घालून झुंज बहुत केले (,) ते वक्ती दोघांना जखमा लागून चकचूर झाले (,) स्वामिनी घरी जावयाची आज्ञा केली (,) जखमा फुटोन कृष्णाजी मयत झाले ” सदर मोईन पत्र मोठे असून आशयास्तव हे पत्र संक्षिप्त स्वरुपात दिले आहे (शि.च.सा.ले-३९९)
विजरई कोंदि द आल्व्होर याने फोंड्यावर स्वारी का केली हे त्याने पोर्तुगीज राजाला लिहून पाठवलेल्या पत्राद्वारे समजते.
त्यात तो पुढील प्रमाणे कारणे देतो –
१) शत्रूस चौलचा वेढा उठविण्यास भाग पाडणे.
२) पोर्तुगीज अमलातील गोवा-साष्ट-बार्देश यांचे रक्षण करणे.
३) संभाजीच्या जुलमामुळे कोकणातील जनतेस आपणावर पोर्तुगीजांची सत्ता असावी असे वाटते, म्हणून त्या प्रदेशाला आपल्या अंमलाखाली आणण्याकरिता प्रयत्न.
४) कोकणाचे उत्पन्न मोठे असल्यामुळे तो प्रदेश ताब्यात घेणे.
५) मोगलांनी दक्षिण कोकण घेण्यापूर्वी ते पोर्तुगीझांनी हस्तगत करणे. (पो.म.सं-९८)
मनुचीने तर विजरई कोंदि द आल्व्होर याचे फोंड्यावर स्वारी करण्याचे कारणच वेगळे दिले आहे तो म्हणतो – ” त्याने (संभाजीने) पढवून पाठवलेले हेर गोव्याच्या विजरई कडे आले. मराठी राज्यातील फोंडा हा किल्ला गोव्याहून अगदी जवळ आहे. त्या किल्ल्यात खजिना भक्कम आहे. तो किल्ला तुम्ही घेतलात तर मुबलक खजिना तुमच्या हाती पडण्याची शक्यता आहे. अशी बातमी संभाजीने पढवून ठेवलेल्या हेरांकडून विजरई कोंदि द आल्व्होर यास समजली ” (अ.हो.मो-२१३). सदर माहिती विश्वसनीय वाटत नाही.
जेधे शकावली प्रमाणे – “रुधिरोदागरी संवत्सरे कार्तिक व ७ शके १६०५ संभाजी राजे बांदयास गेले. गाविकार फिरंगी यांनी कोतास वेढा घातला होता त्यासी लढाई करून तो वेढा उठविला तेथे येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांनी युद्धाची शर्थ केली”
तसेच फोंडा किल्ल्यात पीर अब्दुल्लाखान याचे देवस्थान आहे. किल्ल्यातील मराठा सरदारांनी त्यास नवस केला होता, जो त्यांनी नंतर संभाजी महाराजांकरवी फेडून देखील घेतला. संभाजी महाराजांनी पीर अब्दुल्लाखान या देवस्थानास बक्षिसाची मोईन दिली. संभाजी महाराजांचा प्रिय कवि कलश याने फोंड्यास पाठवलेले पत्र उपलब्ध आहे त्यात तो लिहितो – ” हजरत पीर अब्दुल्लाखान कोट फोंडा, बहुत जागृत स्थळ. फिरंगीयांनी गानिमाई करून कोटास वेढा घातला, कोट बहुत जर केला तेव्हा कोटाचा हवालदार, सरनोबत, सबनीस, लोको प्रार्थना केली, गनिमाचा पराभव करणे. छत्रपती स्वामी विनंती करून ‘उर्जा चाले सारखी पोख्ती सरंजाम करून घेऊन’ राजश्री स्वामीची फत्तेबाजी होऊ देणे. स्वामीची स्वारी कोट मजकुरी होऊन फिरंगी गनीम मारून काढिले. स्वामी आले. फत्ते झाली. ऐसी पिराची करामात म्हणून धर्मदाय देवीला “ (स.प.सा.ले-१११)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 6

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’



( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 6
एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. नारावे येथे सप्तकोटीश्वराचे मंदिर आहे. याचा जिर्णोद्धार खुद्द शिवाजी महाराजांनी केला होता. यासंबधीचा शिलालेख देखील शिवाजी महाराजांनी कोरून घेतला होता. शिवराज्याभिषेक-कल्पतरू या निश्चलपुरी गोसावी यांनी लिहलेल्या पोथीत याचा उल्लेख मिळतो तो असा – ” श्री सप्तकोटी शके किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्या सोम श्री शिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ “ (ज्व.सं-२१०)
कृष्णाजी कंक यांना देण्यात आलेली मोईन – अस्सल पत्र
परिणामी संभाजी महाराजांनी आता पोर्तुगीजांशी उघडपणे युद्ध पुकारले. मराठ्यांनी चौल आणि रेवदंड्याला वेढा घातला. चौलचा वेढा हा सहा महिने सुरु होता तर रेवदंड्याच्या वेढ्या संदर्भात आपल्याला उल्लेख मिळतो तो असा – ” जेष्ठ वद्य ११ संभाजी राजे स्वार होऊन राजापुरास गेले फिरंगी यासी बिघाड केला रेवदंडी यासी वेढा घातला “(जे.श) मराठ्यांनी चौलचा वेढा उठवावा म्हणून विजरईने फोंडा किल्ल्यावर स्वारी करण्याचे योजले व त्याप्रमाणे दि.२७-१०-१६८३ रोजी विजरई ‘आगाशी’ येथे जाऊन राहिला. त्याच्यासोबत ३२०० लढाऊ लोक, २५ घोडेस्वार व ४ तोफा होत्या. दि. २८-१०-१६८३ रोजी सर्व सैन्य घेऊन विजरई ‘दुर्भाट’ येथे जहाजातून उतरला. ‘दुर्भाट’ हे संभाजी महाराजांच्या ‘फोंडे’ महालातील एक महत्वाचे बंदर होते. फोंडे येथील देसाई दुलाबा नाईक हा फितूर झाला होता. विजरई तेथे येताच तो विजरईला जाऊन मिळाला व सोबत त्याने विजरई यास मदती करिता ७० शिपाई आणले होते. दुर्भाटहून विजरईचे सैन्य दि.१-११-१६८३ रोजी फोंड्यास पोहचले. वाटेत जात असताना ३०० मराठ्यांसोबत विजरईची चकमक उडाली. फोंड्यास यावेळी मराठा सरदार येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे तैनात होते. येसाजी तर शिवाजी महाराजांचे बालपणाचे संवगडी ! राजगड जवळील भुतोंडे हे त्यांचे गाव. स्वराज्याचा श्रीगणेशा: झाल्यापासून येसाजी इमाने-इतबारे स्वराजायची सेवा करत होते. फोंड्याच्या किल्ल्यात यावेळी मराठ्यांचे ६०० शिपाई होते आणी २०० शिपाई हे रानात योग्य त्या संधीची वाट पाहत लपून बसले होते. फोंड्यास पोहचल्यावर विजरईने तोफांचा भडीमार सुरु केला. सतत होणा-या तोफांच्या मा-यामुळे किल्ल्याच्या आतील भागास भगदाड पडले, तरीदेखील मराठे काही हटेनात. निकराने ते प्रतिकार करत होते. फोंड्यास सतत नऊ दिवस तोफांची सरबत्ती सुरु होती. विजरई पुरता हैराण झाला. अखेर त्याने दि.९-११-१६८३ रोजी शेवटचा निकाली हल्ला करण्याचे ठरवले. तो हल्ल्याला सुरुवात करणार त्याच वेळी संभाजी महाराज राजापूरहून फोंड्यास दाखल झाले. किल्ल्यातील शिपायांच्या साथीला आता आणखी ६०० शिपाई व खुद्द स्वराज्याचे छत्रपती शंभूराजे होते. सैन्याचे मनोबल अफाट वाढले. संभाजी महाराजांनी यावेळी आणखीन ८०० शिपाई किल्ल्याच्या वेढ्याच्या बाहेरील मेटावर संरक्षणाकरिता ठेवले. अश्या परिस्थितीत मराठे दोन्ही बाजूने आपल्याला कात्रीत पकडतील आणि आपण त्यांच्या तावडीत सापडू या भीतीने विजरईने वेढा दि.१०-११-१६८३ या दिवशी उठवला आणि गोव्यास परत जाण्यास निघाला. त्याच्या या निर्णयाने पोर्तुगीज सैन्यात एकच घबराट उडाली आणि ते सैन्य दुर्भाटच्या दिशेने पळत सुटले ! (पो.म.सं-९५)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 5

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’



( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 5
विजरई ‘कोंदि द आल्व्होर’ याच्या दुटप्पी धोरणाचा आणखी एक नमुना म्हणजे त्याने औरंगजेबाच्या पत्राला दिलेले उत्तर यात तो म्हणतो – “त्याचे (संभाजीचे) पत्र आपणास मिळण्यापूर्वीच आपण संभाजीच्या विनवणीकडे लक्ष न देता मोगल सैन्यास पोर्तुगीज हद्दीतून वाट देण्यास आपल्या अधिका-यास ताकीद दिली होती. ह्या व इतर मदतीबद्दल जो कोकणचा प्रदेश मोगल जिंकून घेतील तो पोर्तुगीजास बहाल करावा”. विजरईच्या आणखी काही अपेक्षा होत्या. त्यास वाटत होते मोगल-मराठा संघर्षामधे संभाजीचा पराभव हा निश्चित होईल तेव्हा वाहत्या गंगेत हात धुवून दक्षिण कोकण पोर्तुगीज अंमलाखाली आणावा हे त्याचे स्वप्न होते. विजरई इथेच थांबला नाही, तर त्याने उत्तर कोकणातून (साष्टी व वसई प्रांत) देखील मुघलांना जाण्यास वाट दिली. मोगलांच्या आरमारास प्रतिबंध करण्यासाठी संभाजी महाराजांनी कल्याण नजीक ‘पारसिक’ येथे किल्ला बांधण्याचे ठरवले आहे ही बातमी समजताच त्याने अंजदीव बेटा प्रमाणे तिथे देखील किल्ला बांधला.(पो.म.सं-९१) यावरून हे प्रत्ययास येते की ही फिरंगी मंडळी अत्यंत जागरूक होती. यांच्या चेह-यावर एक आणि मनात एक असे दुटप्पी वागणे असत. अश्या वागण्यामुळे मराठा -पोर्तुगीज संबधामधे वितुष्ट येण्यास सुरवात झालीच होती. त्यात मोगलांना केलेल्या उघड मदतीमुळे मराठा-पोर्तुगीज सलोख्याचे संबध जवळ-जवळ संपुष्टात आले होते.
कोंदि द आल्व्होर याचे साहस तर एवढे वाढले की जणू त्याची काही परिसीमाच नसावी. त्याने आता खुद्द संभाजी महाराजांनाच जिवंत पकडण्याचा मनसुबा रचला. असे करून औरंगजेबाची मर्जी संपादन करणे आणि आपल्या पदरात कोकणातील मुलुख पाडून घेणे हे प्रयोजन ! त्याने रचलेल्या कटाचा उल्लेख मिळतो तो पुढील प्रमाणे – ” प्रतिवर्षी श्रावण महिन्यात गोकुळअष्टमीस भतग्रामातील नारावे येथे जत्रा भरत असे. त्यावेळी पंचगंगा ह्या नदीत स्नान करण्यासाठी हजारो लोक जातात. ह्या नदीच्या दक्षिण तीरावर दिवाडी हे बेट आहे व उत्तर तीरावर भतग्रामातील नारावे हे गाव आहे. दिवाडी बेट पोर्तुगीजांच्या अमलाखाली होते तर नारावे हे संभाजीच्या राज्यात होते दि. १२-८-६८३ रोजी कोंदि द आल्व्होर यास बातमी आली की संभाजीराजा नारव्यास नदीत स्नान करण्यासाठी येणार आहे असे झाल्यास त्यावर अचानक छापा घालून पकडण्याचा विचार होता पण संभाजी महाराज आलेच नाही आणि कोंदि द आल्व्होर याचा बेत फसला ” (पो.म.सं-९३)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 4

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 4
यावेळी खासा औरंजेब दख्खन काबीज करावयाच्या हेतूने दिल्लीहून निघाला होता. संभाजी महाराजांना कोंडीत पकडण्यासाठी त्याने पोर्तुगीजांना हाताशी धरले आणि आपला वकील शेख महंमद यास गोव्यास पत्र घेऊन पाठवले. यात औरंगजेब लिहितो – ” मोगल बादशाहने संभाजी विरुद्ध युद्ध पुकारले आहे.पोर्तुगीजांनी देखील संभाजी विरुद्ध युद्ध करावे अशी बादशाह यांची इच्छा आहे. तसेच मोगलांच्या सैन्यास पोर्तुगीजांच्या प्रदेशातून धान्य विकत घेण्यास परवानगी असावी आणि सुरतहून मुंबईला येणा-या मोगलांच्या तारवांस व काफिलांस पोर्तुगीजांकडून उपद्रव होऊ नये “. हे पत्र गोव्यास २०-१-१६८३ रोजी पोहचले. आता मात्र विजरईची चांगलीच अडचण झाली. औरंगजेब आणि मुघल सैन्य किती बलवान होते हे त्यास माहिती होते. त्यांना विरोध करणे सोयीचे नव्हते तर इकडे मराठ्यांसोबत तहाची बोलणी सुरु असताना औरंगजेबाला साथ देणे म्हणजे दुहेरी पेचात अडकण्यासारखे होते. विजरईने औरंगजेबाची विनंती मान्य केली खरी पण संभाजी महाराजांशी युद्ध करण्याची अट नाकरली. औरंगजेबाच्या या पत्राचा मजकूर पोर्तुगीज भाषेत असल्याने त्याने ते पत्र भाषांतरित करून घेण्यासाठी हे पत्र निकोलाय मनुची याकडे पाठविले. मनुचीने ते पत्र वाचून नंतर स्वतः विजरईस सल्ला दिला की ” या नीतीने पोर्तुगीजांचे काहीही भले होणार नाही. औरंगजेबाने एकदा संभाजीचा नाश केला की मग त्यानंतर तो पोर्तुगीजांना स्वस्थ बसू देणार नाही “ आणि मग विजरईने संभाजी विरोधात युद्ध पुकारले. (अ.हो.मो-२१२) विजरईचे धोरण आता दुटप्पी पणाचे होते हे यावरून लक्षात येते. यासोबतच औरंगजेबाचे धूर्त धोरण देखील विजरईसं पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट होते. शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र या सूत्राने औरंगजेबाने विजरईस संभाजी महाराजांविरोधात युद्ध करावयास सांगितले होते.

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 3

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 3
१६८२ च्या सुरवातीस संभाजी महाराजांनी कारवार जवळील अंजदीव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची तयारी केली. विजरई याचा सेक्रेटरी ‘दोतार-लुईस-गोंसाल्व्हीस-कोत’ याने ही बातमी पत्राद्वारे कळवली त्यात तो लिहितो – ” आताच दुभाष्याने मला येऊन सांगितले, संभाजीने दगड व चुना अंजदीव बेटाकडे पाठवला असून तेथील कामास जो पैसा खर्च होईल तो खर्च करण्याची आज्ञा दिली आहे. ” या पत्राची तारीख आहे दि.२९-४-१६८२.बातमी मिळताच विजरईने त्याच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आणि लगेच अंजदीव बेट मराठ्यांच्या ताब्यात जाण्यापूर्वी आपण बेटावर सामान व माणसे पाठवून किल्ला बांधावा व तेथे सहा तोफा ठेवाव्या तसेच सदर बेटाच्या रक्षणार्थ काही लढाऊ ‘तारवे’ ठेवावी अशी आज्ञा केली. अंजदीव बेट मराठ्यांकडे जाणे ही धोक्याची घंटा होती हे विजरई चांगल्याच प्रकारे जाणून होता. कर्नाटकातून येणारी साधन-सामग्री सागरी मार्गाने अंजदीव बेटाच्या जवळून येत असे. शिवाजी महाराजांनी ‘हेंद्री-केंद्री’ येथे किल्ला बांधल्यापासून चौलला उपद्रव होऊ लागला होता हे तो जाणून होता व असा धोका परत न पत्करणे योग्यच हे ठरवून त्यांनी अंजदीव बेटाचा ताबा घेतला. दि.२-७-१६८२ रोजी आमरू सिमोंइस पेरैर याने किल्ला बांधण्यास सुरवात केली व ६ महिन्याच्या आत किल्ला बांधून काढला. संभाजी महाराजांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या वकिलामार्फत विजरईकडे विचारणा केली असता – ” हे बेट आमचे असल्यामुळे संभाजीस बोलण्याचा अधिकार नाही असे उर्मटपणे उत्तर विजरईने दिले “ (पो.म.सं-८८) संभाजी महाराजांना ही गोष्ट सहन झाली नाही, तरीदेखील संभाजी महाराजांनी अगोदर थोडे नरमाईचे धोरण स्वीकारले. मराठा पोर्तुगीज संबंध बिघडण्यास सुरवात झाली होती खरी पण यावेळी कुणीच उघडपणे शत्रुत्व घेत नव्हते. दि.२८-७-१६८२ रोजी विजरई याने संभाजी महाराजांना पुत्रप्राप्ती झाल्यामुळे अभिनंदनाचे एक पत्र पाठवले. सोबत त्याने नजराणा म्हणून एक दागिना पाठवला. पत्रास उत्तर म्हणून संभाजी महाराजांनी विजरईस आपण डिचोली आणि कुडाळ परिसरात दारूचे (तोफेची दारू) कारखाने उभारल्याची बातमी दिली. कर्नाटक येथून मराठ्यांसाठी येणा-या सामानास पोर्तुगीजांच्या आरमाराचा त्रास होऊ नये असे देखील या पत्रामधे नमूद करण्यात आले होते.(पो.म.सं-९०)

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 2



 ‘व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 2
खऱ्या अर्थाने या स्वारीची सुरवात होते ती शिवाजी महाराजांच्याच काळात. राज्याभिषेकानंतर अवघ्या एक वर्षातच शिवाजी महाराजांनी ‘वैशाख शु २ १७ एप्रिल १६७५ रोजी फोंडा किल्ला जिंकून घेतला’.(जे.श) पोर्तुगीजांचा प्रदेश असणारा व किनारपट्टी लाभलेला आणि व्यापाराला अनुकूल असणारा गोमांतक प्रदेश मराठ्यांच्या अंमलाखाली असावा ही शिवाजी महाराजांची खूप जुनी मनीषा होती. पण मुघल आणि पोर्तुगीज यांच्या सोबत एकाच वेळी लढणे शक्य नव्हते. याच काळात शिवाजी महाराजांनी दक्षिणेची मोहीम देखील हाती घेतली होती. एकाच वेळी सर्वाना तोंड देणे हे काही शक्य नव्हते यामुळे पोर्तुगीजांवर स्वारीचा विचार शिवाजी महाराजांनी तूर्तास रद्द केला असावा. या निर्णयामुळे पोर्तुगीजांच्या जीवात जीव आला व ते गोव्यात आपले हात पाय पसरू लागले. काही वर्षाच्या अंतरानी शिवाजी महाराजांचा कैलासवास झाला. यावेळी संभाजी महाराजांनी गोव्याचा विजरई अंतोनियो-पाइस-द-सांदे याला महाराजांच्या निधनाची बातमी पत्राद्वारे दिली. यावेळी मराठ्यांचा वकील हा रामजी नाईक ठाकूर होता. ५ मे १६८० रोजी रामजी नाईक सोबत विजरईने सलोख्याचे पत्र पाठवले यात पोर्तुगीज व मराठे यांच्यात मैत्रीचा तह करण्यासंदर्भात मसुदा होता, पण याबद्दल पुढे काही हालचाल झाली नाही. यानंतर बरोबर १ वर्षाच्या अंतराने मे १६८१ च्या सुमारस संभाजी महाराज डिचोलीला गेले. याच सुमारास विजरईने संभाजी महाराजांना एक पत्र लिहिले त्यात तो लिहितो – ” शिवाजी महाराजांच्या मरणानंतर ज्या काळी तुम्हास सर्व गोष्टी अनुकूल नव्हत्या त्यावेळी तुमच्याशी आम्ही कशी वर्तवणूक ठेवली ” – याची आठवण त्याने या पत्राद्वारे करून दिली. यानंतर येसाजी गंभीरराव हा गोव्यास व्यापार व तहाची बोलणी करण्यासाठी गेला. (पो.म.सं-८७)
या सुमारास ‘दो-फ्रांसिस्कू-द-ताव्हर- कोंदि- द-आल्व्होर’ हा गोव्याचा नियुक्त विजरई (Viceroy) म्हणून कारभार पाहत होता.

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग १

 ‘व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग १
पोर्तुगीज भारतात व्यवसाय करण्याच्या हेतूने आले आणि इथेच कायमचे स्थायिक झाले. या पोर्तुगीजांना ‘गोव्याचे फिरंगी’ अथवा ‘वसईचे फिरंगी’ या नावाने देखील ओळखले जात असे. मराठे आणि पोर्तुगीज यांचे संबध शिवाजी महाराजांपासूनच कधीच सलोख्याचे नव्हते. ज्यावेळी पासून ह्यांचा संबध स्वराज्यासोबत आला त्यावेळ पासून ह्यांचे धोरण एकच – ‘मुघल-मराठा संघर्षामधून फायदा घायचा’. यांची ही असली दुटप्पी निती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज चांगलीच ओळखून होते. शिवाय पोर्तुगीज मंडळी ‘धर्मांध’ वृत्तीची. इतर धर्माच्या लोकांना त्रास देणे हा त्यांचा ‘उद्योग’ सतत सुरु असे. याचा प्रत्यय खुद्द शिवाजी महाराजांना देखील १६६७ साली आला होता. अश्या दुटप्पी वागणा-या फिरंग्यांनी कधीच मराठ्यांशी सख्य ठेवले नाही. लहान मोठे खटके हे अधून-मधून कायमच उडत असत. त्यामुळे त्यांचे समूळ उच्चाटन करणे जरुरी होते आणि याच कारणास्तव श्रीशंभूछत्रपतींनी गोव्यावर एक नियोजित ‘थोरली स्वारी’ आखली. सदर प्रकरणामधे संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी, या स्वारीत केलेला पराक्रम, गोव्याचा विजरई (Viceroy ) कोंदि द आल्व्होर याची झालेली फजिती, मराठ्यांनी गोव्यात घातलेला धुमाकूळ या सर्व घटना क्रमाने पाहणार आहोत.

Monday 29 March 2021

कर्नाटक स्वारी : भाग ३



कर्नाटक स्वारी : भाग ३
या विजयानंतर लगेच जुलै १६७६ मध्ये बहलोलखानाने शिवाजी महाराजांशी तह केला. या तहाप्रमाणे शिवाजी महाराजांचे राज्य आणि आदिलशाही राज्य यांची सीमा कृष्णा नदीपर्यंत निश्चित केली. कृष्णा नदीच्या उत्तरेकडील मुलूख शिवाजी महाराजांना मिळाला. अशाप्रकारे शिवाजी महाराज आणि आदिलशाही यांच्यामध्ये सख्य निर्माण झाले.आता कुतूबशहाशी सख्य जोडून संपूर्ण दक्षिण देश मुघली वर्चस्वातून मुक्त करण्याचा शिवाजी महाराजांनी निर्धार केला.
🚩कर्नाटक स्वारीची तयारी🚩
आपल्या स्वराज्याचा विस्तार कर्नाटकापर्यंत करावा अशी महत्त्वाकांक्षा शिवाजी महाराज बाळगून होते. पूर्वी समुद्रमार्गे त्यांनी बसनूरपर्यंत स्वारी केली होती. त्यांच्या उत्तेजनामुळे मराठ्यांनी कारवारपर्यंत धडक मारली होती. महाराजांचे पिताजी शहाजी राजे यांची बंगलोर ही जहागिरी होती. त्यांच्या पश्चात महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे बंगलोरच्या जहागिरीचा मालक होता. त्यांनी तंजावरपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणून आपले मुख्य ठाणे तंजावर हेच केले. व्यंकोजी राजे विजापूरच्या आदिलशहाशी एकनिष्ठ असल्याचे भासवत होते. शिवाजी महाराजांना आपल्या सावत्र भावाचा पराक्रम माहित होता. त्याला स्वराज्यकार्यात सामील करून घेतले तर संपूर्ण दक्षिण भागात स्वराज्याचा विस्तार होईल आणि मुघल किंवा आदिलशहा नामोहरम होतील अशी महाराजांची अपेक्षा होती.
मुघल हे पहिल्या क्रमांकाचे शत्रू आहेत याची खूणगाठ महाराजांनी मनाशी बांधली होती. म्हणून बहादूरखानाविरुद्ध विजापूरचा सरदार बहलोलखान याला महाराजांनी मदत केली होती. बहलोलखानाने वरकरणी मराठ्यांशी सलोखा जरी जोडलेला होता, तरी विजापूरच्या दरबारात पठाणांचे वर्चस्व वाढविण्यास त्याने सुरुवात केली. अनेक पठाण सरदार बहलोलखानाच्या प्रेरणेने आदिलशाहीत दाखल झाले. त्यामुळे विजापूरदरबारात पठाणांचे वर्चस्व वाढू लागले. आदिलशहा काय किंवा कुतुबशहा काय यांच्या राजवटी पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून दक्षिण भारतामध्ये होत्या आणि या राजवटीत दख्खनी लोकांचाच वर्षानुवर्षे प्रभाव होता. परंतु जानेवारी १६७५ मध्ये जी रक्तरंजित क्रांती विजापुर दरबारामध्ये झाली, तेव्हापासून पठाणांचा भरणा आदिलशाहीच्या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला. विजापुर दरबारातील पठाणांचे वाढते वर्चस्व शिवाजी महाराजांना धोक्याचे वाटत होते. कुतुबशहाच्या दरबारात पठाणांचे वर्चस्व नव्हते. कुतुबशहाच्या वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशात दख्खनी मुसलमान आणि हिंदू अधिकारी यांचे वर्चस्व होते. प्रत्यक्ष कुतुबशहाच्या दरबारात हिंदूंनाही मानाच्या जागा दिल्या जात होत्या, मादण्णा आणि अकण्णा नावाचे दोन हिंदू मुत्सद्दी कुतुबशहाचे दोन प्रमुख सल्लागार होते.

क्रमशः ......!!

कर्नाटक स्वारी : भाग 2


 कर्नाटक स्वारी : भाग 2

हा वेढा चालू असताना शिवाजी महाराजांनी एक पथक कनटिक प्रदेशात आक्रमण करण्यासाठी पाठविले. त्यामुळे दोन आघाड्यांवर तोंड देण्याची पाळी आदिलशहावर आली, फोंड्याचा किल्ला दुर्गम असल्यामुळे आणि किल्ल्याचा खंदक पार करण्यास अवघड असल्यामुळे फोंड्याचा वेढा प्रदीर्घ काळ चालू ठेवावा लागला. खंदक भरून काढण्यात आला. किल्ल्याच्या तटावर चढण्यासाठी ५५०० शिड्या तयार करण्यात आल्या. अशी तयारी पूर्ण झाल्यानंतर १७ एप्रिल १६७५ रोजी किल्ल्याच्या तटबंदीला सुरुंग लावून शिवाजी महाराजांनी फोंडा जिकला. हा महत्त्वाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर कुठलीही विश्रांती न घेता शिवाजी महाराजांनी कर्नाटकात घोडदौड सुरू केली व केवळ १५ दिवसात अंकोला, शिवेश्वर इत्यादी किल्ले जिंकून घेतले.
बहलोल विरुद्ध बहादूर।
औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी बहादूरखानला दक्षिणेत पाठविले तसेच शिवाजी महाराजांना धडा शिकविण्याची प्रतिज्ञा करून विजापुरी सरदार बहलोलखान याने कोल्हापूर भागात मराठ्यांची नाकेबंदी सुरू केली. बहादूरखानाने बहलोलखानाची मदत घेऊन शिवाजी महाराजां विरुद्ध आक्रमण करावे अशी औरंगजेबाची इच्छा होती. दरम्यान जानेवारी १६७५ मध्ये विजापूर दरबारात एक रक्तरंजित क्रांती घडली. बहलोलखानाने खवासखानाला ठार मारून विजापूर दरबारची राजकीय सूत्रे आपल्या हाती घेतली. बहादूरखानाने पूर्वी शिवाजी महाराजां विरुद्ध हालचाली करण्यासाठी औरंगजेबाच्या आदेशाप्रमाणे खवासखानाशी सख्य जोडले होते त्यामुळे या दोघात मैत्रीची भावना निर्माण झाली होती. परंतु बहलोलखानाने खवासखानाला ठार मारल्याबरोबर बहादूर खानाला त्याच्याविषयी चीड निर्माण झाली. दोघांमधील वैमनस्य वाढत चालले. याचा परिणाम असा झाला की बहलोलखानाने बहादूरखानाविरुद्ध शिवाजी
महाराजांकडे मदत मागितली. शिवाजी महाराजांच्या दृष्टीने मुघलसत्ता ही पहिल्या क्रमांकाची शत्रू असून आदिलशाही आणि कुतूबशाही या शाही राजवटी दक्षिणेतील असल्यामुळे त्यांच्याशी सख्य जोडणे अधिक सोयीचे होते. म्हणून बहलोलखानाचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला. मराठ्यांची मदत घेऊन जून १६७६ मध्ये बहलोलखानाने बहादूरखानाचा पराभव केला.
क्रमशः .....!!!

कर्नाटक स्वारी : भाग १🚩

 कर्नाटक स्वारी : भाग १

६ जून १६७४ रोजी छत्रपती शि

वाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र सार्वभौम राजे झाले.महाराजांच्या या कृतीचा मुघलांना राग येणे स्वाभाविक होते. औरंगजेब तर अतिशय प्रक्षुब्ध झाला. दक्षिणेत असलेल्या आपल्या सरदाराला - बहादूरखानला छत्रपती शिवाजी महाराजां विरुद्ध आक्रमक धोरण अंगिकारण्याचा त्याने इशारा दिला. बहादूरखान पेडगाव येथे छावणी करून राहिलेला होता. तो स्वतः ऐषारामी वृत्तीचा असल्यामुळे शिवाजी महाराजां विरुद्ध मोहिम काढण्यामध्ये दिरंगाई करीत होता. औरंगजेबाकडून निर्वाणीचा इशारा मिळाल्यानंतर बहादूरखानाने आक्रमणाची जय्यत तयारी सुरू केली. परंतु ऐन पावसाळ्यात म्हणजे जुलै १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी अश्वदलाचे एक पथक पाठवून बहादूरखानाची छावणी लुटली. त्या लुटीमध्ये सुमारे १ कोटीचा खजिना मराठ्यांच्या हाती आला. या लुटीच्या प्रकारामुळे बहादूरखान चांगलाच हबकला. दरम्यान मराठ्यांनी खानदेशपर्यंत स्वारी करून धरणगाव लुटले आणि मराठ्यांचे हे पथक थेट बहाणपूरपर्यंत गेले. अशा प्रकारची दहशत मुधली प्रदेशात निर्माण होत असताना शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सुभेदाराकडे खंडणीची मागणी केली. दुस-या बाजूने शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी रामनगरपर्यंत मजल मारली आणि वसईच्या पोर्तुगिजांकडे चौथाईची मागणी केली. थोडक्यात राज्याभिषेकाचा सोहळा संपतो न संपतो तोच मराठ्यांनी मुघलांच्या प्रदेशात चांगलीच दहशत निर्माण केली.
फोंड्याची लढाई ...!!
औरंगजेबाच्या चिथावणीमुळे आदिलशाही दरबारातील सरदारही शिवाजी महाराजां विरुद्ध लहानमोठ्या कारवाया करीतच होते. फोड्याच्या सुभेदाराने शिवाजी महाराजांच्या राज्यातील एका व्यापा-याला पकडले आणि विनाकारण मराठ्यांना डिवचले. शिवाजी महाराजांनी आपला विश्वासू सरदार दत्ताजी पंडित यांना दोन हजार अश्वदळ देऊन फोंड्याकडे पाठविले.
दत्ताजी पंडित फोंड्यापर्यंत जाऊन पोहोचता न पोहोचता तोच खुद्द शिवाजी महाराज वायुगतीने निवडक सैन्यदल घेऊन फोंड्यापर्यत आले आणि त्यांनी फोंड्याला वेढा घातला.
क्रमशः ....!!!

Saturday 27 March 2021

शिवकालीन वजने (मापे)

 


शिवकालीन वजने (मापे)
* अठवे- शेराचा 1/8
* अडशेरि- अडीच शेर
* अदपाव- अर्धा पावशेर
* अदमण- अर्धा मण
* अदशेर- अर्धा शेर
* अधोली- अर्धी पायली
* अंजली- ओजळभर पानी
* आटके- अर्धा शेर
* आढक- चार शेर, पायली
* कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण
* कार्त- पाव रत्तल
* किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे
* कुडव- आठ शेर
* कुंभ- वीस खंडी
* कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी
* कोड- खंडी, वीस मण
* कोळवे- शेराचा अष्ठमांश
* खारी- 16 द्रोण, एक खंडी
* गरांव- अर्ध गूंज माप
* गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप
* गुंज- एक वजन परिमाण
* चंपा- दोन शेर धान्याचे माप
* चवाटके- छटाक
* चवाळामण- एक प्रकारचा मण
* चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण
* चाळीसा- चाळीस शेरांचे माप
* चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप
* चिपटे- पावशेराचे माप
* चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ
* चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग
* चोथवा- एक पायली
* चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके
* चौशेरी- चार शेरांचे माप
* छटाकी- छटाक
* छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन
* टवणा- पांच शेरांचे माप
* टांक- एक तोळा
* टिपरी- मापी पावशेर
* टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप
* टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा
* डवक- वस्तुवर पाचही बोटे पसरुन मारून घेतलेले परिमाण
* डोळा- 16 शेरांचे माप
* धडा- दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण
* धरण- सुमारे 24 गूंजाइतके वजन
* नकटे- अर्ध्या पावशेराचे माप,निपटे,नवटाक,10 तोळ्यांचे वजन
* नग- कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण
* नाकटी- दीड पावशेराचे माप
* नाळके- एक माप
* निउटके- शेराचा बत्तीसावा हिस्सा
* तोळा- 96 भार गुंजांचा तोळा
* पक्का शेर- 80 तोळ्यांचा शेर
* पड- मापी 2 शेर, पाउन शेर
* पल- 40 मासे वजन, 380 गुंजांचे वजन
* पल्ला- 30 पायली किंवा 120 शेर, 120 शेरांचे अडीच मणाचे पक्के वजन
* पान- पावशेर
* पाभ- एक प्रकारचे माप
* पायली- चार शेरांचे माप
* पायली- 48 शेरांची खानदेशि एक पायली
* पिक्कल- 5320 सुरती रूपये भार वजन
* पिटके- अदपाव
* फरा/फरी- धान्य मोजन्याचे साधन
* बेताळामण- 1568 सुरती रुपयांचे एक माप
* भरा- धान्याचे एक माप
* भरो- चार खंडीचे कुडाळ प्रांतातिल एक माप
* भार- आठ हजार तोळे वजन
* मणखाण- सुमारे एक मण
* मणका- एक मणाचे माप
* मापटे- अर्धा शेर
* मापारी- धान्य ई. मोजन्याचे फरां नावाचे एक माप
* माष- पांच, आठ किंवा दहा रत्तीच वजन
* मासा- आठ गुंजांचे वजन
* मुटला- सहा शेराची गुळाची ठेप
* मूठ- मुठभर धान्य
* रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन
* रोवळा- एक माप
* लिक्षा- मोहरीच्या दाण्याच्या एक षोडशांश वजनाइतके परिमाण
* वाल- तिन गूंजाभर वजन
* वैताद- एक तृतयांश तोळा
* शणपो- भात मोजन्याची मोठी ओंजळ
* शिरिद- पावशेर
* शीग- धान्याचे माप भरले असता मापाच्या वर येणारी निमुळती रास
* शिगवर- अगदी शीग लोटून सपाट केलेले माप
* शेर- पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण
* साक- एक हाताची ओंजळ
* सामाशी- सहा मासे वजनाचे
* सोट- सुमारे 20 पायली धान्य भरून तोंड शिवलेले पोते
* अठवे- शेराचा 1/8
* अडशेरि- अडीच शेर
* अदपाव- अर्धा पावशेर
* अदमण- अर्धा मण
* अदशेर- अर्धा शेर
* अधोली- अर्धी पायली
* अंजली- ओजळभर पानी
* आटके- अर्धा शेर
* आढक- चार शेर, पायली
* कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण
* कार्त- पाव रत्तल
* किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे
* कुडव- आठ शेर
* कुंभ- वीस खंडी
* कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी
* कोड- खंडी, वीस मण
* कोळवे- शेराचा अष्ठमांश
* खारी- 16 द्रोण, एक खंडी
* गरांव- अर्ध गूंज माप
* गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप
* गुंज- एक वजन परिमाण
* चंपा- दोन शेर धान्याचे माप
* चवाटके- छटाक
* चवाळामण- एक प्रकारचा मण
* चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण
* चाळीसा- चाळीस शेरांचे माप
* चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप
* चिपटे- पावशेराचे माप
* चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ
* चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग
* चोथवा- एक पायली
* चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके
* चौशेरी- चार शेरांचे माप
* छटाकी- छटाक
* छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन
* टवणा- पांच शेरांचे माप
* टांक- एक तोळा
* टिपरी- मापी पावशेर
* टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप
* टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा
* डवक- वस्तुवर पाचही बोटे पसरुन मारून घेतलेले परिमाण
* डोळा- 16 शेरांचे माप
* धडा- दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण
* धरण- सुमारे 24 गूंजाइतके वजन
* नकटे- अर्ध्या पावशेराचे माप,निपटे,नवटाक,10 तोळ्यांचे वजन
* नग- कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण
* नाकटी- दीड पावशेराचे माप
* नाळके- एक माप
* निउटके- शेराचा बत्तीसावा हिस्सा
* तोळा- 96 भार गुंजांचा तोळा
* पक्का शेर- 80 तोळ्यांचा शेर
* पड- मापी 2 शेर, पाउन शेर
* पल- 40 मासे वजन, 380 गुंजांचे वजन
* पल्ला- 30 पायली किंवा 120 शेर, 120 शेरांचे अडीच मणाचे पक्के वजन
* पान- पावशेर
* पाभ- एक प्रकारचे माप
* पायली- चार शेरांचे माप
* पायली- 48 शेरांची खानदेशि एक पायली
* पिक्कल- 5320 सुरती रूपये भार वजन
* पिटके- अदपाव
* फरा/फरी- धान्य मोजन्याचे साधन
* बेताळामण- 1568 सुरती रुपयांचे एक माप
* भरा- धान्याचे एक माप
* भरो- चार खंडीचे कुडाळ प्रांतातिल एक माप
* भार- आठ हजार तोळे वजन
* मणखाण- सुमारे एक मण
* मणका- एक मणाचे माप
* मापटे- अर्धा शेर
* मापारी- धान्य ई. मोजन्याचे फरां नावाचे एक माप
* माष- पांच, आठ किंवा दहा रत्तीच वजन
* मासा- आठ गुंजांचे वजन
* मुटला- सहा शेराची गुळाची ठेप
* मूठ- मुठभर धान्य
* रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन
* रोवळा- एक माप
* लिक्षा- मोहरीच्या दाण्याच्या एक षोडशांश वजनाइतके परिमाण
* वाल- तिन गूंजाभर वजन
* वैताद- एक तृतयांश तोळा
* शणपो- भात मोजन्याची मोठी ओंजळ
* शिरिद- पावशेर
* शीग- धान्याचे माप भरले असता मापाच्या वर येणारी निमुळती रास
* शिगवर- अगदी शीग लोटून सपाट केलेले माप
* शेर- पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण
* साक- एक हाताची ओंजळ
* सामाशी- सहा मासे वजनाचे
* सोट- सुमारे 20 पायली धान्य भरून तोंड शिवलेले पोते
* अठवे- शेराचा 1/8
* अडशेरि- अडीच शेर
* अदपाव- अर्धा पावशेर
* अदमण- अर्धा मण
* अदशेर- अर्धा शेर
* अधोली- अर्धी पायली
* अंजली- ओजळभर पानी
* आटके- अर्धा शेर
* आढक- चार शेर, पायली
* कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण
* कार्त- पाव रत्तल
* किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे
* कुडव- आठ शेर
* कुंभ- वीस खंडी
* कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी
* कोड- खंडी, वीस मण
* कोळवे- शेराचा अष्ठमांश
* खारी- 16 द्रोण, एक खंडी
* गरांव- अर्ध गूंज माप
* गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप
* गुंज- एक वजन परिमाण
* चंपा- दोन शेर धान्याचे माप
* चवाटके- छटाक
* चवाळामण- एक प्रकारचा मण
* चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण
* चाळीसा- चाळीस शेरांचे माप
* चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप
* चिपटे- पावशेराचे माप
* चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ
* चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग
* चोथवा- एक पायली
* चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके
* चौशेरी- चार शेरांचे माप
* छटाकी- छटाक
* छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन
* टवणा- पांच शेरांचे माप
* टांक- एक तोळा
* टिपरी- मापी पावशेर
* टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप
* टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा
* डवक- वस्तुवर पाचही बोटे पसरुन मारून घेतलेले परिमाण
* डोळा- 16 शेरांचे माप
* धडा- दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण
* धरण- सुमारे 24 गूंजाइतके वजन
* नकटे- अर्ध्या पावशेराचे माप,निपटे,नवटाक,10 तोळ्यांचे वजन
* नग- कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण
* नाकटी- दीड पावशेराचे माप
* नाळके- एक माप
* निउटके- शेराचा बत्तीसावा हिस्सा
* तोळा- 96 भार गुंजांचा तोळा
* पक्का शेर- 80 तोळ्यांचा शेर
* पड- मापी 2 शेर, पाउन शेर
* पल- 40 मासे वजन, 380 गुंजांचे वजन
* पल्ला- 30 पायली किंवा 120 शेर, 120 शेरांचे अडीच मणाचे पक्के वजन
* पान- पावशेर
* पाभ- एक प्रकारचे माप
* पायली- चार शेरांचे माप
* पायली- 48 शेरांची खानदेशि एक पायली
* पिक्कल- 5320 सुरती रूपये भार वजन
* पिटके- अदपाव
* फरा/फरी- धान्य मोजन्याचे साधन
* बेताळामण- 1568 सुरती रुपयांचे एक माप
* भरा- धान्याचे एक माप
* भरो- चार खंडीचे कुडाळ प्रांतातिल एक माप
* भार- आठ हजार तोळे वजन
* मणखाण- सुमारे एक मण
* मणका- एक मणाचे माप
* मापटे- अर्धा शेर
* मापारी- धान्य ई. मोजन्याचे फरां नावाचे एक माप
* माष- पांच, आठ किंवा दहा रत्तीच वजन
* मासा- आठ गुंजांचे वजन
* मुटला- सहा शेराची गुळाची ठेप
* मूठ- मुठभर धान्य
* रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन
* रोवळा- एक माप
* लिक्षा- मोहरीच्या दाण्याच्या एक षोडशांश वजनाइतके परिमाण
* वाल- तिन गूंजाभर वजन
* वैताद- एक तृतयांश तोळा
* शणपो- भात मोजन्याची मोठी ओंजळ
* शिरिद- पावशेर
* शीग- धान्याचे माप भरले असता मापाच्या वर येणारी निमुळती रास
* शिगवर- अगदी शीग लोटून सपाट केलेले माप
* शेर- पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण
* साक- एक हाताची ओंजळ
* सामाशी- सहा मासे वजनाचे
* सोट- सुमारे 20 पायली धान्य भरून तोंड शिवलेले पोते

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...