विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 21 September 2021

पंत अमात्य बावडेकर यांचा वाडा.. (गगनबावडा, कोल्हापूर महाराष्ट्र)

 



पंत अमात्य बावडेकर यांचा वाडा.. (गगनबावडा, कोल्हापूर महाराष्ट्र)
हे ठिकाण म्हणजे तब्बल पाच छत्रपतींचा पराक्रमी कार्यकाळ पाहिलेले हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांचा २५० वर्षापूर्वीचा वाडा.
आज जरी वाड्याचे अस्तीत्व संपलेले असेले तरी तिन फुट उंचीचे भव्य दगडी चौथरे बऱ्यापैकी अस्तीत्वात असलेला नगारखाना पाहीले की शिवशाहीतील कर्तुत्ववान व्यक्तीमत्व रामचंद्रपंत अमात्य यांची मुर्ती डोळ्यासमोर उभी राहते. अशा या थोर व्यक्तीमत्त्वच्या कार्यकर्तुत्वाचा इतिहास साठवून उभा असणारा १०० बाय १०० फुटांचा दुमजली भव्य वाडा भक्कम खांब,तुळया व वासे तक्तपोशी आणि मातीच्या पक्क्या विटांच्या भिंती आणि भाजक्या पन्हाळी कौलासह एखाद्या डौलदार एअरावता प्रमाणे उभा होता. समोर आपले अस्तित्व टिकून असलेल्या नगारखाना पाहिल्यावर पंतांच्या अमात्य पदाची शान लक्षात येते. दोन चौकाचा वाडा जंगली लाकूड आणि पांढरा मातीच्या विटांनी बांधला गेला असावा हे वाड्याच्या आजच्या अवशेषांच्या वरून दिसुन येते. भक्कम घडीव दगडांचे तीन फुटी उंचीचे जोते हे तत्कालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. आज जरी वाड्याचे अवशेष शिल्लक असले तरी त्यावरून वाड्याच्या भव्यतेची कल्पना येते. सुमारे एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या वाड्यात तत्कालीन काळात बावडा जहागीरीचा कारभार चालत असे. घडीव दगडांचा एका चौथऱ्यावर बसून प्रशासन दरबार न्यायदान चालत असे वाड्याच्या मध्यभागी देवघर होते. त्यात समर्थ रामदासांनी रामचंद्रपंत यांना दिलेली सोन्याची रामपंचायतन रघुवीर होती. अलीकडे इमारत धोकादायक झाल्यामुळे उतरविण्यात आली आहे.( तत्कालीन काळातील एक जुना फोटो खाली देत आहोत या वरून वाडा कसा होता हे चित्र स्पष्ट होईल)
लाल मातीच्या कच्च्या सडकेवरून दुतर्फा लावलेल्या गर्द झाडीतून वाड्याच्या मुख्य गेट जवळ येऊन पोहोचतो. हा वाडा तर सगळ्यांनाच माहीत आहे. भरत जाधव यांचा मराठी चित्रपट पछाडलेला प्रदशिर्त झालेपासुन या वाड्याला भेट देणाऱ्या लोकांची संख्याही वाढु लागली. आज हि भेट देणार्यांची संख्या गेटच्या बाहेर लावलेल्या गाड्यांवरून लक्षात येत होते. ब्रिटिश अमदानीत १९३५ साली बांधला गेलेला हा नवीन वाडा "माधवबाग कॅम्प" या नावाने ओळखला जातो. हा वाडा चुनामिश्रित बांधकामात बांधला गेला असुन लोडबेअरिंग पद्धतीचे त्याचे बांधकाम पाहिल्यावर आपण थक्क होतो. पंचवीस खोल्यांच्या या दुमजली हवेलीत दोन प्रशस्त दिवाणखाने आहेत. बंगल्याचे बांधकाम हे अतिशय मजबूत असून सागवानी लाकडाचे रिक्यू फर्निचर, शिसवी दरवाजे, खिडक्या, तक्तपोशी, काम सज्जे आणि विशेषत: त्याचे छत हे बंगलोरी कौलांचे आहे. त्याच्या रचनेचे वैशिष्ट्ये आपल्या नजरेत भरते आणि रुबाबदार खानदानी पगडीधारी विद्वतेचे तेज दाखवणाऱी बावडेकर अमात्यांची पिढी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.
बावडेकरांची सध्याच्या पिढीचे वास्तव्य इथेच आहे. या वाड्याचे सध्या संग्रहालयात रुपांतर करण्यात आलेले आहे. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकांची चौकी आहे. इथुनच संग्रहालय पाहण्याकरीता प्रति व्यक्तिस तिस रुपये देऊन तिकीट घ्यावे लागते. पंत अमात्य बावडेकरांचा इतिहास, बावडा जहागिरीची माहिती, त्यांच्या काळातील भांडी, वाड्याचं बांधकाम चालू असतानाचे फोटो, तलवारी, भाले, झुंबर, तोफा, शूटिंग झालेल्या चित्रपटांचे पोस्टर, मराठेशाहीच्या पगड्या, सारीपाटाचा डाव, भातुकलीचा खेळ, बुद्धिबळाच्या सोंगट्या, करवीर रियासातीमधील संस्थानिकांच्या मुद्रा आणि बरंच काही पाहण्यासारखं आहे. पण मधील फोटो घेण्यास मनाई आहे.
अशा या वैभवशाली इतिहास लाभलेली ऐतिहासिक वास्तू नक्कीच एकदा वेळ काढून पाहून या...!

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड"

 

























शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड"
संदीप राक्षे✍🏻
प्रवासवर्णनकार असे मी!
अपरिचित वास्तूंच्या वाटांचा!!
गडकिल्ले आणि शिल्पाकृती!
छंद असे मज पाहण्याचा!!
नैसर्गिक अविष्कारात हरपून!
आत्मानंद घेतो मी सृष्टीसौंदर्याचा!!
निसर्ग देवतेच्या साक्षीने निसर्गसृष्टीत मुक्तविहार करण्याचे भाग्य क्वचित लोकांच्या वाट्याला येत असते. तसा मी स्वत:ला मोठा भाग्यवान समजतो कारण मला मनसोक्त भटकायला मिळते. गडकिल्ले अपरिचित वास्तू, दुर्मिळ मंदिर आणि निसर्गरम्य परिसर नेहमीच मला खुणावत असतात, आकर्षित करीत असतात. माझ्या मोबाईल मध्ये फेसबुकपेजहून अनेक गडकिल्ले, अपरिचित मंदिर अशा दुर्मिळ स्थळांचे स्क्रीन शाॅट काढून ठेवलेले असतात. आज बँकेला गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने स्क्रीन शाॅट चाळत होतो. चाळत असतानाच पेडगावचा धर्मवीर गड व तेथील लक्ष्मी नारायण मंदिराचे फोटो पाहून आज त्या पवित्र भुईकोट किल्ल्याला पहायचाच असा निश्चय केला. घरातील गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून चि. गौरव, चि. संकेत, पुतण्या रितेश व पुतणी श्रद्धा यांना सोबत घेऊन भोसरीहून सकाळीच दहा वाजता निघालो. आज शुक्रवार दिनांक १० सप्टेंबर २०२१ संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या आगमनाचा म्हणजेच गणेश चतुर्थी हा दिवस.
गणाधीशा! भालचंद्रा! गजवक्रा! गणराया!!
वक्रतुंडा! धुम्रवर्णा! गणपती बाप्पा मोरया!!
प्रत्येक गावोगावी गणेश मुर्ती घेण्यासाठी गर्दी दिसत होती. कुणी पाटावरून, कोणी डोक्यावरून, कोणी दुचाकीवरून तर कोणी रिक्षातून आपला बाप्पा घरी घेऊन जाताना दिसत होते. पारंपरिक वेषातील अनवाणी पावलांची लगबग पहात, भक्तांच्या चेहर्यावरील आनंद टिपत, गणरायाचा जयघोष ऐकत आमचा प्रवास पेडगावच्या धर्मवीर गडाकडे सुरू होता. भोसरी आळंदी शिक्रापूर ही शहरी गाव सोडून न्हावरे या गावापर्यंत पोहचलो होतो. शहरीभाग संपल्याने आता मस्त निसर्गाची सप्तरंगी उधळण पहातच पुढचा प्रवास सुरू होता.
न्हावरे, मांडवगण फराटा निवळीहून श्रीगोंदा तालुक्यातील कास्टी या गावी पोहोचलो कास्टी गावातून दौड अहमदनगर या मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळण घेऊन पेडगावच्या दिशेने निघालो होतो. भोसरी ते पेडगाव असा एकशे अकरा किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पेडगावात पोहचलो होतो.
१३व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले. पांडे पेडगावचा भुईकोट असे त्याचे नाव होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा वेरूळचे बाबाजी भोसले यांच्याकडे हा भुईकोट किल्ला देखभालीसाठी होता. यादवांकडून किल्ला निजामशाहाच्या ताब्यात गेला. निजामशाहीचा पाडाव झाल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांचा सरदार बहादूरशहा हा औरंगजेबाचा भाऊ होता. दक्षिणेचा सुभेदार असतांना त्याचा तळ पेडगावला होता. त्याने पेडगावच्या किल्ल्याची डागडूजी करुन या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले होते. त्यानंतर २००८ मध्ये या किल्याचे नाव धर्मवीर गड असे ठेवण्यात आले.
इसवी सन १६७४ मध्ये बहादुरगडावर २०० अस्सल अरबी घोडे आल्याची खबर छ. शिवाजी महाराजांना मिळाली. त्यांनी गमिनी कावा या युध्दतंत्राचा सुयोग्य वापर करुन गडावर हल्ला करण्याची योजना आखली. या मोहिमेचा प्रमुखाने सैन्याचे दोन भाग केले. सैन्याची एक तुकडी भल्या सकाळी बहादूरगडावर चालून गेली. बहदूरखानाने पेडगावातले मोगल सैन्य गोळा केले आणि मराठ्यांवर चालून गेला. थोडावेळ हातघाईची लढाई झाल्यावर मराठ्यांनी अचानक माघार घेतली आणि मराठ्यांचे सैन्य पळायला लागले. मराठे पळत आहेत हे पाहून मुघल सैन्याला चेव आला आणि त्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. मराठ्यांनी मोगल सैन्याला पेडगाव पासून जवळजवळ २५ कोस लांब नेले. अशा प्रकारे किल्ल्यातल्या मोगल सैन्याचे मराठ्यांनी दोन भाग केले. मोगल सैन्य लांब गेल्याची खात्री झाल्यावर मराठ्यांच्या सैन्याच्या दुसर्या मोठ्या तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला आणि किल्ल्यातील घोडे, खजिना आणि सामान घेऊन पोबारा केला.
धर्मवीरगडाच्या वेशीवरच मारूतीरायाची भली मोठी मुर्ती एका पत्राच्या शेडमध्ये उभी करून ठेवलेली होती. त्या मुर्तीच्या पायाखाली ईडा पिडा तुडवलेली दिसत होती. मारूतीचे दर्शन घेऊन आम्ही भव्य कमानीतून गडामध्ये प्रवेश केला. उजव्या बाजूलाच भैरवनाथ मंदिर दिसले ते पहाण्यासाठी गाडीतून खाली उतरलो. भैरवनाथ मंदिराकडे जाताना अनेक देखणी शिल्प अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली दिसत होती. भैरवनाथाच्या पाय-याशी गजांतलक्ष्मी प्रथमदर्शनी उभी केलेली दिसत होती. संपूर्ण काळ्या पाषाणात उभ केलेलं हे मंदिर परंतू त्याचा कळस अलिकडच्या काळात बांधलेला दिसत होता. गर्भगृहात व सभामंडपात अनेक शिल्प कोरलेली दिसत होती..छताला कमळ कोरलेले दिसत होते. वादक, गंधर्व, लज्जागौरी, यक्ष, अशी अनेक शिल्पाकृती या मंदिराचे वैभव वाढवित होती. भैरवनाथ मंदिर पाहून आम्ही रामेश्वर मंदिराकडे निघालो होतो बाभळीच्या वनराईतून अरुंद रस्त्याने आम्ही रामेश्वर मंदिराजवळ पोहचलो..कळस विरहित कातळात बांधलेली ही शिल्पाकृती पूर्ण दुर्लक्षित आहे. रामेश्वराचे हे मंदिर त्रिदल प्रकारातील आहे. मुख्य दरवाज्यातून आम्ही मंदिरात प्रवेश केला तिथे वटवाघूळींचे साम्राज्य दिसले, आम्ही मंदिरात शिरल्यावर दहा बारा वटवाघूळ आमच्या डोक्यावरून चिर चिर करीत मंदिराबाहेर उडून गेल्या. या मंदिरात उजव्या व डाव्या बाजूला दोन मुर्ती विरहित गर्भगृह आहेत तिथे पूर्ण अंधार आणि कुबट वास येत होता. संपूर्ण सभामंडप चार मुख्य खांबावर व चार अर्ध खांबावर तोललेल आहे. मुख्य गर्भगृहात एक पिंड भग्न अवस्थेत पडलेली पाहिली. डाव्या बाजूला भिंतीला टेकून तीन फूटी गणपतीची मुर्ती व उजव्या बाजूस जैन तीर्थकरांची मुर्ती पाहून आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. तेथून आम्ही लक्ष्मी नारायण मंदिराकडे निघालो.
भीमा नदीच्या तीरावर सौंदर्यशाळा फुलून आलेली दिसत होती. रंगीबेरंगी पानेफुले बहरात आली होती. थोडा पावसाचा शिडकावा पडल्याने आकाशात सर्व रंगसंमेलनाचा उत्सव सुरू झाला होता. नदीच्या उत्तरेकडे पुसटसे इंद्रधनुष्य अवतरलेले दिसत होते, इंद्रधनुष्य जेव्हा पावसाच्या थेंबा थेंबातून जमिनीवर पसरते तेव्हा इंद्रधनुष्याचे सर्वच रंग फुलाफुलातून रंगांचा गजर करीत एकरूप होते. हे मनोहरी दृष्य पाहताना ईश्वरीय अविष्काराचे दर्शन होते. इंद्रधनुष्याचा अविष्कार पहातच मी गौरव, संकेत, रितेश आणि श्रद्धा लक्ष्मी नारायण मंदिराजवळ पोहचलो होतो. मंदिर पहाताच थोडावेळ स्तब्ध उभे रहायलो. मंदिरावर बाहेरूनच इतके अद्भुत कोरीव काम दिसत होते नेमकं काय पहाव सुचेनाच, या अद्भुत लक्ष्मी नारायण मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस अनेक सुंदर शिल्पाकृती सोबतच आठ दिशांचे पालन करणारे अष्टदिक्पाल कोरलेले आहेत. पहिले ते पहायचे आणि नंतर संपूर्ण मंदिर पहायचे असे ठरले, आम्ही सर्वांनी हे मंदिर वायव्य दिशेकडून पहायला सुरवात केली. वायव्य दिशेची पालक देवता वायूदेवांची मुर्ती त्यांचे वाहन हरिण व आयुध कोरलेली पाहून, थोडे पुढे गेल्यावर उत्तर दिशेला कुबेर देवांची मुर्ती व त्यांचे वाहन घोडा हे कोरलेले पाहिले, पुढे ईशान्य दिशेला देवाधि देव महादेवांची मुर्ती व त्यांचे वाहन नंदी कोरलेले आहे ते पाहून मंदिराच्या मागे म्हणजेच पूर्वदिशेला इंद्र देवतेची मुर्ती व त्यांचे वाहन ऐरावत कोरलेला पाहिला, आग्नेय दिशेला अग्नीदेवाची मुर्ती व त्यांचे वाहन मेंढा कोरलेला पाहिला तेथून दक्षिण दिशेला यम देवतेची मुर्ती व त्यांचे वाहन महिष कोरलेला आहे. नैऋत्य दिशेला या दिशेचे दिशापालक वेताळ देव वाहन नर हे कोरलेले असून ते पाहून मंदिराच्या पश्चिम दिशेला वरूण देवता व त्यांचे वाहन मकर कोरलेले पाहिले आयुष्यात पहिल्यांदाच असे अद्भुत मंदिर पहात होतो त्या मंदिराच्या चोहोबाजूला प्रत्येक दिशांचे पालक देवता कोरलेली दिसते तसेच बाली व सुग्रीव यांची संपूर्ण गोष्ट चित्रशिल्पाकृतीत साकारलेली आहे. गजस्तर, अश्वस्तर, सुंदर अशी बाहेरील बाजू पाहून आम्ही मंदिरात प्रवेश केला. या मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत पश्चिम उत्तर व दक्षिण आम्ही पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला. सछिद्र चौकोनी आकृती असल्यामुळे मंदिरात उजेड व वारा भरपूर येत होता. मंदिराचा सभामंडप चार खांबावर तोललेला दिसत होता. गर्भगृहाचा तलविन्यास पंचरथ प्रकारचा असून त्याच्या भद्रांना नंदिका आहेत. पीठ भागावर अलंकरणात्मक नक्षी असलेले खूर, त्यावर गजथर अश्वथर कोरलेले आहेत. विष्णूची चोवीस रूपे इथेच कोरलेली दिसतात, मंदिरात चार देवकोष्टे आहेत. गर्भगृहाचे व्दार हे हे पंचशाख पद्धतीचे असून त्या व्दारावर गंधर्व, पद्मलता,आणि व्याल कोरलेले दिसतात तसेच व्दारशाखेवर गंगा, यमुना, चौरीधारक, वैष्णव व्दारपाल कोरलेले आहेत. गर्भगृहात मुर्ती नसून तिथे एक वीरगळ आणून बसवलेली आहे. या मंदिरात कोल्हापूर प्रमाणेच २१/२२/२३ जूनला किरणोत्सव पहायला मिळतो. लक्ष्मी नारायण मंदिराची ही अद्भुत कलाकृती राहून राहून पहावीसी वाटत होती. ती पहाताना मन आपोआप ताजेतवाने प्रफुल्लित झाले होते. तसेच अशी पुरातन मंदिर आपल्यासाठी तीर्थक्षेत्र असतात. तीर्थक्षेत्र म्हणजे पवित्र जागा तिथे ऋषीमुनींनी केलेल्या तप साधनेने समाज कल्याणाच्या भावनेने त्या जागा पवित्र झालेल्या असतात अशा तीर्थक्षेत्रात त्या पाषाणाचे, शिल्पाकृतीचे भक्त संत ऋषी मुनींची स्पंदने असतात त्यामुळेच तिथे एक प्रकारची वेगळीच उर्जा निवास करीत असते. मंदिराच्या वातावरणात एक वेगळाच नाद ऐकू येत होता. इथली व्हायब्रेशन पवित्र होती, मन भक्तिभावाने भारून गेले होते. अशा वेळेस आपल्या मेंदूतून निघणा-या लहरी ते वातावरण अधिक शक्तिमय करत असतात.
भारताच्या प्राचीन कलावैभवाच्या व शिल्पाकृतीच्या पाऊलखुणा भारतात अनेक ठिकाणी पहायला मिळतात पेडगाव येथील धर्मवीर गडावरील हे लक्ष्मी नारायणाचे मंदिर यादव कालीन हेमाडपंती शैलीतील हे मंदिर फक्त मंदिर नसून भव्य दिव्य असा अष्टाकृती रथच आहे. या मंदिराची असामान्य निर्मिती भारतीय वास्तूशिल्पांची यादव साम्राज्याची वैभवशाली कथा सांगून जाते. हे सौंदर्यशिल्प पहाताना मन मोहरून जाते, सुवर्ण पाषाणांची ही चिरंजीव भाषा आपलीशी होऊन जाते या शिल्प निर्मितीतली असामान्य प्रतिभा व प्रतिभावान निर्मात्याला लक्ष लक्ष धन्यवाद द्यावेसे वाटतात. अनिमिष नेत्रांनी ही वास्तू पुन्हा पुन्हा पहात रहावेसे वाटते, हे मंदिर उभारताना अज्ञात शिल्पकारांनी त्यावर चढवलेला अनमोल कलापूर्ण साज म्हणजे सत्यम शिवम सुंदरमचा देखणा कलाविष्कार आहे. आपल्या पूर्वजांनी रक्ताच पाणी करून प्राचीन काळी अनेक मंदिरे, गुहा, लेणी, किल्ले, स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्या वारसास्थळांच संवर्धन करण, जतन करण हा आपल्या प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
अद्भुत रहस्यमयी सुंदर विलक्षण लक्ष्मी नारायण मंदिर पाहून आम्ही संपूर्ण गडावर ज्या नळयोजनेने पाणी पुरवठा करण्यात येत होता ती हत्ती मोट पाहून आम्ही या गडाचे ऐतिहासात सुवर्णाचे पान असलेल्या दिवाण ए खास या वास्तूजवळ पोहचलो इथेच औरंगजेब वास्तव्यास असायचा, तसेच छ. संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूमध्ये प्रवेश केल्यावर एक शौर्यमयी वातावरण झाले होते. समोरच औरंगजेबाचे सिंहासन जिथे होते ती चौथा-याची जागा १८६ × १५५ फूट इतक्या आकाराची आहे. दिवाण ए खासची वास्तूची प्रचंड पडझड झालेली दिसत होती. काही ठिकाण अजूनही शाबूत दिसत होती. हमाम खान्यात बाथटब सुद्धा दिसत होते. हे सारे पहात दिवाण ए खास मधल्या औरंगजेबाच्या दरबाराच्या ठिकाणी आलो होतो. ज्या चौथ-यावर औरंगजेबाचे सिंहासन होते तिथे थोडावेळ बसलो होतो, त्यावेळेस छावा कादंबरीत वाचलेले या किल्याशी संबंधित व छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी असलेले काही प्रसंग आपोआपच मनपटलावर उमटले...
संगमेश्वर गाढ झोपेत होते, सरदेसायांच्या वाड्यावर हत्यारी, गस्ती पहारे फिरत होते. वाड्याच्या सुखदालनातील मंचकावर झोपलेले छत्रपती संभाजी महाराज जुन्या आठवणीत कुस पालटत होते, झोप काही येत नव्हती. वाड्याच्या पागेतील घोडी मधेच नाकपुड्या झटकून फुरफुरत होती. काहीतरी अनुचित घडण्याचे संकेत देत होती. इतक्यात खब-याने मुकर्रबखानाने संगमेश्वरावर आक्रमण केल्याची बातमी कवी कलशांना दिली. तोपर्यंत मुकर्रब खान संगमेश्वराच्या वेशीवर पोहचला होता. धी ऽ न धी ऽ न च्या आरोळीने संगमेश्वर दणाणले होते, ती आरोळी देसाई वाड्यात असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कानावर पडताच राजे ताडकन उठले, आपल्याच माणसांनी दगाफटका केला हे जाणवले, अचानक झालेल्या हल्यांने राजे थोडेही घाबरले नाहीत. दालनातल्या तबकातील टोप मस्तकावर ठेऊन, म्यानातली तलवार बाहेर खेचून संभाजी राजे वाड्याबाहेर पडले, तिथेच शत्रूशी सामना झाला. गोफण फिरवावी तशी तलवार फिरवीत संभाजी राजे हाशम्यांना कापू लागले, लढता लढता नावडी नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहचले होते. तिथे जिकडे तिकडे हशमांची टोळीच्या टोळी उभी होती. अखेर सा-यांनी छत्रपती संभाजी महाराजांना चहूबाजूंनी घेरले आणि सिंहाचा छावा मुकर्रब खानाच्या जाळ्यात अडकला होता. छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांचे हात दोरखंडाने करकचून बांधण्यात आले, रश्यांनी दोघांना घोड्यावर जखडून बांधण्यात आले, अशा अवस्थेत दोघांना घेऊन मुकर्रब खान बहादूर गडाच्या दिशेने निघाला. १५ फेब्रवारी १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना बहादूर गडावर आणण्यात आले. बहादूर गडाच्या वेशीवर पोहचताच मुकर्रब खानाच्या हाशम्यांनी राजांना व कवी कलशांना घोड्यावर खाली खेचले, त्यांच्या गळ्यातील मोतीकंठे, कानांतील सोन चौकडे असे अनेक मौलिक डाग अक्षरशः ओरबडून काढले. राजांना व कवी कलशांना विदुषकी ढगाळ कुर्ते बळजबरीने घालण्यात आले, डोक्यावर विदुषकी टोप्या घालण्यात आल्या. हात आणि मान लाकडी इराणी पद्धतीच्या तख्ताने जखडण्यात आले, तुता-या नगारे चौघडे वाजवीत, हाशम धीऽ न धीऽ न असा घोष करीत राजांची धिंड धर्मवीर गडातील (बहादूर गड) औरंग्याच्या दिवाण इ आमचा या दरबारात आणण्यात आले. दरबारात औरंग्याचे अनेक सरदार उपस्थित होते. छत्रपती संभाजी राजांना अशा अवस्थेत पाहून औरंग्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, इतके जखडून सुद्धा संभाजी राजे ताठमानेने उभे होते. आज पहिल्यांदाच औरंग्याची आणि छत्रपती संभाजी महाराजांची नजरभेट होत होती, जसे अंगपूत पेटलेल्या ज्योतीला वादळ बघत होते, चिवट जीवनशक्तीला मौत बघत होती, माणसातल्या मर्दपणाला राजकारणी गाळीव कपट बघत होते. बघता बघताच औरंगजेब अचानक पाय-या उतरून गालीच्यावर येऊन नमाज पढू लागला, औरंगजेब बरोबरच सारेच जण नमाज पढू लागले. छत्रपती संभाजी राजेही तो नजारा बघत होते. राज्यांच मन उफाळून येत होते, अशांतच भरला दरबार थरकून जाईल अशा धारदार आवाजातचं छंदोगामात्य कवी कलश यांच्याकडे पहात त्यांना म्हणाले कवीराज या औरंग्याकडे व दरबारातील सर्वांच्याकडे पहाताना तुम्हा एखादे काव्य सुचत असेल तर म्हणा! छत्रपतींनी अशावेळेस सुद्धा काव्य म्हणायला सांगितल्यावर छंदोगामात्यांचा उर भरून आला, धमन्या स्फुरल्या आणि आपोआपच त्यांच्या ओठांतून त्वेषानेच एक काव्य प्रकटले.
यावन रावन की सभा संभू बंध्यो बजरंग!
लहू लसत सिंदूरसम खुब खेल्यो रनरंग !!
जो रवि छवि लछत ही खद्योत होत बदरंग!
त्यो तुव तेज निहारी ते तखत त्यज्यो औरंग!
कवी कवितेचा अर्थ असा की
हे राजन, ज्या प्रकारे हनुमानाला रावणाच्या सभेत आणण्यात आले तसेच तुम्हाला या सभेत आणलंय. जसा हनुमानाचा देह सिंदूरचर्चित होता तसाच तुमचा देह ही रणांगणातील रक्तानं लाल आहे. सूर्य उगवल्यावर काजव्यांचे तेज नष्ट होते, त्याच प्रमाणे पहा हे राजन तुम्हाला बघताच औरंग्याने आपल्या तख्ताचा त्याग करुन समोर गुडघे टेकले
हे काव्य ऐकताच संपूर्ण दरबार चवताळून उठला आणि इन दोनोंकी जबान काट दो असे ओरडू लागला.. रागाने लालबुंद झालेल्या औरंगजेबाने मुकर्रब खानाला दोघांनाही कोठडीत घेऊन जाण्याचा आदेश दिला. काही दिवस बहादूर गडच्या कोठडीत ठेवून छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना तशाच भयानक अवस्थेत वढू बु. येथे घेऊन जाण्यात आले. मी ही सारी दृष्य त्याच धरतीवर तोच इतिहास साक्षात पहात स्वताला हरवून गेलो होतो. धर्मवीरगडाची संपूर्ण सफर करून चौघेजण जेव्हा छत्रपती संभाजी महाराज शौर्यस्मारका जवळ पोहचलो तेव्हा गौरव, संकेत, रितेश आणि श्रद्धा या चौघांनी या स्मारकाचे दर्शन घेत छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा म्हणायला सुरूवात केली ऽऽऽ
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते!
यदं कसेविनी लेखा वर्तते कास्य नो परि!!
या राजमुद्रेचा आवाज ऐकून मी भानावर आलो मुलांना त्या अवस्थेत पाहून माझा उर भरून आला तो क्षण मी मोबाईलच्या कॅमेर्यातून टिपला मुलांची ही गर्जना ऐकून तेथील "टीम धर्मवीर गडाचे काही शिलेदार तिथे आले त्यामध्ये प्रतिक पाचपुते, लालासाहेब अवचर, रोहीत कणसे, सिद्धार्थ खेडकर हे होते त्यांनी आमची विचारपूस केली. धर्मवीर गडावरील या टीमने केलेल्या विविध कार्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली. मी त्यांचे कौतुक केले ते करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले! या युवावर्गाचे कार्य पाहून मनाला समाधान वाटले. अशा पवित्र स्थळांबद्दल जागृती होऊन युवावर्ग स्वखर्चाने गडकिल्ल्यांचे संवर्धन करीत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो आहे. इतिहास प्रेमींनी व समाज्यातील प्रत्येक घटकांनी सुद्धा अशा या तरूणांना प्रोत्साहन दिले पाहिजे, मदत केली पाहिजे. तेव्हा कुठे
आपल्या पूर्वजांनी रक्ताच पाणी करून प्राचीन काळी अनेक मंदिरे, गुहा, लेणी, किल्ले, स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्या वारसास्थळांच संवर्धन होईल. अशी ही वारसास्थळ जतन करण हा आपल्या प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे..
माझा हा लेख वाचणा-या सन्मानिय वाचकांना हात माझी जोडून विनंती आहे. आयुष्यात एकदा तरी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्यस्मृती स्थळ असलेला "धर्मवीर गड" स्वत:च्या डोळ्यांनी जावून पहा. इथले चैतन्य अनुभवा, इथल्या वास्तू पहा! जीवनाचे सार्थक होईल.
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

***सरदार विठ्ठलशिवदेव विंचूरकर यांचा विंचूर (ता.निफाड जी.नासिक) येथील वाडा

 







***सरदार विठ्ठलशिवदेव विंचूरकर यांचा विंचूर (ता.निफाड जी.नासिक) येथील वाडा
**इ.स.१७४४ साली विंचूर येथे नादाजी दरेकर या इसमाने दंगा केला होता तो मोडण्यासाठी पेशव्यांनी विठ्ठल शिवदेव यांस पाठवले असता त्यांनी विंचूर येथे जाऊन रात्री त्याच्या वर छापा घातला आणि त्यास कत्तल करून तिथे आपला अंमल चालू केला ह्या कामगिरी बद्दल पेशव्यांनी विठ्ठल शिवदेव यास जो सरंजाम दिलेला होता त्यात विंचूर हे गाव सामील करून दिले त्या वेळे पासून विठ्ठल शिवदेव हे विंचूर येथे वाडा बांधून राहू लागले त्याच कारना वरून लोक त्यांना "विंचूरकर" असे म्हणू लागले
(दरेकर यांची सध्या मालकी आहे वाडा बऱ्या पैकी वेवस्थित ठेवला आहे)
- संजय बिरार

सरसेनापती प्रतापराव गुजर वाडा- भोसरे

 





सरसेनापती प्रतापराव गुजर वाडा- भोसरे
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भोसरे गावात शूर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा भव्य वाडा आहे. भोसरे गाव कोरेगाव रहिमतपूर पासून जवळ आहे. साताऱ्यापासून साधारण ४० किलोमीटरच्या अंतरावर आहे. गावात असलेला वाडा सद्यस्थितीत खूप चांगल्या अवस्थेत नाही. वाड्यामध्ये छोट्या घरात प्रतापराव गुजर यांचे वंशज राहतात. तेथेच प्रतापरावांचा अर्धपुतळा व स्मारक आहे. जवळच प्रताप सृष्टीचे काम सुरू आहे. गुजरांची अजून एक शाखा नागपूरला आहे.
प्रतापराव यांचा जन्म घरंदाज पाटील घराण्यात झाला होता. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव "कुडतोजी" असे ठेवले होते. लहानपणापासूनच त्यांना दांडपट्टा, तलवारबाजी, कुस्ती यांची आवड होती. धिप्पाड शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, हुशारी या गुणांमुळे महाराजांनी त्यांना स्वराज्य कार्यामध्ये सामावून घेतले. जेव्हा महाराज आग्रा मध्ये अडकले होते त्यावेळी प्रतापरावांनी सरदार अष्टप्रधान या सर्वांच्या बैठका घेऊन स्वराज्य सावरले होते व संपत्ती गोळा केली होती या सर्वांमुळे कुडतोजी यांना महाराजांनी "प्रतापराव" ही पदवी दिली.
इ.स. २४ एप्रिल १६६० रोजी शाहिस्तेखानाला जाऊन मिळालेल्या मराठा सरदार संभाजी कावजी यांना प्रतापरावांनी ठार मारले. इ.स. १६६३ मध्ये सिंहगड व मावळ प्रांतात हैदोस घालणाऱ्या मोगली सैन्याचा बंदोबस्त केला. सिंहगड जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहिस्तेखानाची नाचक्की केली व तो पुण्यात येऊन बसला. इ.स. ३० सप्टे १६६४ रोजी मिर्झाराजे जयसिंग याच्या खुनाचा प्रयत्न प्रतापरावांनी केला पण तो असफल ठरला. इ.स. १७ ऑक्टोबर १६७० रोजी नाशिक दिंडोरी जवळ मोगली सैन्याचा पराभव केला. क्रूर मोगल सरदार दाऊद खान व इकलासखान यांना ठार मारले.
बहलोलखान जेव्हा पन्हाळगडावर चालून आला तेव्हा महाराजांनी विजापूर वर स्वारी करण्यासाठी प्रतापरावांना धाडले. तेव्हा खवासखान हा घाबरून गेला व त्याने बहलोलखानाला पुन्हा विजापूरला बोलावून घेतले. तो विजापूरला परतत असताना प्रतापरावांनी उमराणी जवळ त्याच्या सैन्यावर हल्ला चढविला व त्याला जेरीस आणले. अखेरीस त्याने जिवाची पर्वा करत हिरे, सोने, संपत्ती सर्व प्रतापरावांना घेऊन आपली सुटका केली. शत्रूला असेच सोडून दिले म्हणून महाराज प्रतापरावांवर रागवले तेव्हा त्यांनी शपथ घेतली की बहलोलखानाला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवायचं नाही. आणि तो असामान्य शौर्याचा दिवस उजाडला इ.स. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापराव आपले सहकारी विठोजी शिंदे, विठ्ठल अत्रे, दिवाजी राऊतराव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर, विसोजी बल्लाळ यांच्यासह गडहिंग्लजजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोल खानावर तुटून पडले. पण बहलोलखानाच्या सैन्यापुढे या सर्वांना वीरमरण प्राप्त झाले. पुढे कवी कुसुमाग्रज यांनी "वेडात मराठी वीर दौडले सात" ही अजरामर काव्यरचना केली.
प्रतापरावांची दोन मुले जगजीवन व खंडोजी हे शंभुराजे सोबत होते. जेव्हा क्रूर औरंगजेबाने शाहू राजेंना धर्मांतर करायला लावले तेव्हा आपल्या राजाचं धर्मभ्रष्ट होऊ नये म्हणून या दोघांनी आपले धर्मांतर केले. खंडोजी बनले अब्दुल रहीम व जगजीवन बनले अब्दुल रहमान. अशा या पराक्रमी गुजर कुटुंबीयांना शत शत नमन.
टीम- पुढची मोहीम

श्रीमंत राजे जयसिंगराव रामसिंगराव जाधवराव (आण्णा )

 

श्रीमंत राजे जयसिंगराव रामसिंगराव जाधवराव (आण्णा ) 
पोस्तसांभार ::
आण्णाचा कार्याचा आढावा - माझे आजोबा जयसिंगराव यांच्या जन्म पाली ( सातारा ) जवळील कुरळे ( आजोळी )झाला आणि बालपण बोरगाव ( सातारा ) येथे गेले. वयाच्या १० वर्षी वडील श्रीमंत रामसिंगराव माधवसिंग राजेजाधवराव हे वारल्यानंतर त्याचे माळेगाव संस्थान ला दत्तक गेलेले चुलते श्रीमंत शंभुसिंहमहाराज यांनी माळेगावला आणले. आण्णा आणि शंभुसिंहमहाराज यांचे व्दितीय पुत्र श्रीमंत चंद्रसेनमहाराज हे समवस्क होते त्याबरोबर त्यांचे शिक्षण झाले आण्णाचे मराठी, मोडी, भाषेव्यतीरीक्त इंग्रजी भाषा,देखील अवगत होती. शिकाराची आवड असल्याने सतत श्रीमंत चंद्रसेनमहाराज ह्याच्याबरोबर नेहमी शिकारीस जात असत.आण्णाना राजकारभाराचे बाळकडु त्याचे चुलते श्रीमंत शंभुसिंहमहाराज यांच्याकडुन मिळाले . आण्णा राजकारभारात महाराजाना,मदत करु लागले कालांतराने श्रीमंत शंभुसिंह महाराज हे जुना राजवाडा (अमररत्न निवास ) मधुन नवी बांधलेल्या (अमरबाग पॕलेस ) राजवाड्यात राहिला गेल्यानंतर आण्णा स्वतंत्र वाडा बांधुन राहु लागले . * जरी आमचे आण्णा स्वातंत्र्यसैनीक जरी नसले तरी त्या काळातील बर्याच भुमीगत स्वातंत्र्यसैनीकाना,लपून,राहण्यास सर्वोपतर मदत केली . * आण्णाचे न्यायदानातील आणि प्रशासकीय कार्य - गावातील बरेचसे तंटे मिटवत असत कुळाच्या जमीनी.बरेच वाद मिटवले तसेच गुन्हेगारीला पण आळा बसविण्याचे काम.सुध्दा केले. * आण्णाचे युवापिढीसाठीचे कार्य - आण्णानी गावात तालीम नव्हती त्यामुळे त्यांनी नविन तालीम स्वखर्चानी बांधली आणि कोल्हापुरवरुन खास कुस्ती आणि मल्लखांब शिकवण्यासाठी नामांकित नामदेववस्ताद यांना आणले मानधन स्वखर्चातुन देत असत तालिमीमुळे ,गावातील तरुणाना कुस्तीची गोडी लागली. बरेच मल्लसुध्दा घडवले ( १५ वर्षापुर्वी त्या नामदेववस्तादाचे त्यांच्या मुळगावी निधन झाले ) * आण्णाचे शिक्षण क्षेत्रातील कार्य - २१ सप्टेबर १९४२ साली त्यांचे चुलचे श्रीमंत शंभुसिंह महाराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे जेष्ठ पुत्र रत्नसिंहमहाराज हे,कारभार पाहु लागले गावात त्याकाळी शिक्षणाची सोय नव्हती जुन्या राजवाडा ( अमररत्न निवास )हा हायस्कुल दान दिला आणि हायस्कुलला " श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कुल " असे दिले ह्या,कार्यात पण आण्णानी मोलाचे योगदान होते दानपत्रावर साक्षीदार म्हणुन स्वाक्षरी आण्णाची होती आणि शिक्षण समितीवर पदाधिकारी म्हणुन.कार्य केले. त्याच शाळेत आमचे शिक्षण झाले ह्याचा देखील मला अभिमान आहे . गावात नुकतेच जुन्यावाड्यात शाळा भरु लागली पण मुलीसाठी शिक्षणाची सोय पुण्याशिवाय बिलकुल नव्हती त्यामुळे श्रीमंत रत्नसिंहमहाराजानी मुलीसाठी नवीन शाळा बांधुन,दिली आणि त्यांचे नाव ".आंनदीबाई जाधवराव,कन्या शाळा " असे ठेवले गावात,शाळा, मुलीची शाळा सुरु झाली त्याकार्यात देखील,आण्णाची मोलाचा सहभाग होता .शिक्षणाचे वारे वाहु लागले . आण्णाच्या असे निदर्शनात आले की पंचक्रोशीतील तसेच बाहेर गावातील मुलाच्या शिक्षणाची सोय नाहि मग आण्णानी स्वता पुढाकार घेऊन स्वताच्या राहत्या वाड्याचा निम्मा भाग शाळेकरीता देऊन बोर्डिग चालु केले,आणि बाहेर गावच्या मुलाची,राहणे शिक्षणाची , जेवनाची सोय *एकाच ठिकाणी करुन दिली. * आण्णाचे सहकार क्षेत्रातील कार्य- - भारत स्वंतत्र झाल्यानंतर सहकाराचे वारे,वाहु लागले सावकारी पाशातुन शेतकर्याची सुटका करण्यासाठी १९५२ साली,".माळेगाव.विवीध कार्यकारी सोसायटी ".च्या स्थापनेत सुध्दा त्यानी पुढाकार घेतला आणि स्वता पदाचीआपेक्षा ,चेअरमन न,होता फक्त खास लोकाग्रहस्तव फक्त संस्थापक संचालक झाले . माळेगाव सहकारी कारखाना " च्या उभारणीत सुध्दा आण्णानी स्वताची ८ एकर जमीन:' त्याकाळी दान देऊन योगदान दिले .आण्णाचे कार्य सर्व क्षेत्रात असले तरी राजकारणापासुन दुरच राहिले . आण्णा माळेगावला राहत असले तरी मुळगाव बोरगांवची नाळ तुटु दिली नाही ते धार्मीक होते बोरजाईमातेचे ते निस्सीम भक्त होते ते यात्रा, होळी इतर सणाचे मानकरी ह्याचे,ते मानकरी ह्या नात्याने त्यांचे जाणे येणे चालुच होते होतेच ,आण्णाच्या शब्दाला गावकरी फार मानत,होते बरचसे वादविवाद आण्णा,मिटवत,असत गाव गावकर्याना कोर्टाची पायरी कधीही चढु,दिली नाही . बोरगावातील,बरीच जमीन दानधर्म केली असे माझे दोन जिल्हातील कर्मभुमीत वावरलेले , संस्थान काळ पारतंत्र्य आणि , स्वातंत्रकाळ जवळुन पाहिलेले, दानशुर , सहकार , शिक्षण , कुस्तीक्षेत्र , शिकारीचा शौक आसलेले , धार्मीक कार्यात वाहुन घेतलेल्या आण्णाना ६४ व्या पुण्यतिथी निम्मीत विनम्र अभिवादन शब्दाकंन तुमचा नातु अमरसिंह 🙏🌹

शुरवीर श्रीमंत शंभुसिंह सुज़नसिंह जाधवराव

 

शुरवीर श्रीमंत शंभुसिंह सुज़नसिंह जाधवराव 
पोस्तसांभार ::

Raje Amarsingh Udaysingh Jadhavrao




पावन खिंडीत जाधवराव घराण्यातील पहिले शुरवीर स्वराज्य निर्मीतीसाठी धारातिर्थ पडलेले पडले त्याच्या कार्याचा आढावा
शुरवीर श॑भुसिंह जाधवराव हे श्रीमंत लखुजीराव राजेज़ाधव याचे पणतु आणि सरसेनापती धनाजीराव जाधवराव याचे वडील होते ते छत्रपती शिवाजी महाराजाचे मेहुणे होते
त्याचे वडील सुजनसिंह आणि श्रीमंत शहाजी राजेभोसले आणि जिज़ाऊचे जेष्ठ पुत्र श्रीमंत संभाज़ीराजे कर्नाटकातीलं कनकगिरी येथे १६५३ ला सरदाऱ आपाखान याच्या बरोबर तुबळ युद्धात हें दोघे श्रीमंत लखुज़ीराजेचे दोन नातु शहिद झाले
सुज़नसिंह कर्नाटक मोहिमेवर असताना त्यांच्या पत्नी मुलगा शंभुसिंह आणि मुलगी काशीबाईसाहेब हे राजामाता जिज़ाऊ जवळ राहत होते. ( छत्रपती शिवाजीमहाराज ह्यांच्या ८ एप्रिल १६६७ ला विवाह श्रीमंत काशीबाईसाहेब यांच्याशी राजगड येथे मोठ्या थाटामाटात करुन राजमाता जिजाऊसाहेबानी राजेभोसले - जाधवराव संबध परत एकदा जवळ केले )
शंभुसिंह हे छत्रपती शिवाजीमहाराज याचे बालमित्र होते. या दोघानाही शिक्षण राजमाता जिजाऊच्या हाताखाली मिळत होते
छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर ते प्रत्येक कार्यात बरोबर असत.
छत्रपती शंभुसिंह इतर मावळ्यासोबत रायरेश्वराच्या मंदीरात स्वराज्याची शपथ घेतली.
ते प्रतापगडच्या पायथ्याशी अफज़ल खान वधावेळी सुद्धा ते महाराजासोबत अंगरक्षक म्हणुन सुध्दा होते
१६६० ला छत्रपती शिवाजीमहाराज आणि शंभुसिंह जाधवराव जेथे राहत होते त्या पन्हाळा किल्यास सिद्धी जोहर याने वेढा दिला .त्यामुळे किल्यावरचे दळणवळण बंद झाले ,तेव्हा छत्रपती शिवाजीमहाराज याने किल्ला स्वाधीन करतो असा निरोप दिला,त्यामुळे शत्रुचे सैन्य बेसावध राहिले. छत्रपती शिवाजींवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी हुबेहूब छत्रपती शिवाजीराजेंसारखे दिसणारे शिवा काशीद त्यांना पोशाख घालुन शत्रुची दिशाभुल करण्यासाठी पाठविले .
पण सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वीर शिवा काशीदांला ,छत्रपती शिवाजी समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले. मात्र, हे छत्रपती शिवाजी नाही असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खुपसली
त्या पौर्णिमेच्या मध्यरात्री छत्रपती, शंभुसिंह , बाज़ी बांदल,, बाज़ीप्रभु, आणि बांदल सेना आपल्या निवडक मावळ्याना सोबत घेऊन शत्रूच्या पहार्याच्या चोक्या चुकवत खाली उतरून थेट विशालगड किल्याकडे प्रयान केले. ज्यावेळी सिद्धीच्या सैन्याला समजले मग सिद्धी जोहरचा मुलगा शिद्धी उजीज़ ह्या सैन्य घेऊन पाठलाग सुरू केला .त्यावेळी महाराज रांगणा किल्याचां घाट चढत होते शत्रु सैन्य पाठलाग करीत आहे हे समजल्यावर छत्रपती ने बाज़ीप्रभु देशपांडे शंभुसिंह जाधवराव , बाजी बांदल आणि त्यांची सेना आणि इतर मावळे खिंडीत थांबविले आपण किल्यावर सुखरूप पोहचल्याचा तोफेचा आवाज आवाज एैकूर येई पर्यंत शत्रुला थोपुन धरावे असे सांगितले
शंभूसिंह जाधवराव प्राणपणाने लढत होते.... जिजाऊसाहेबांचा विश्वास सार्थ करत होते....
शंभूसिंहांची तरबेज तलवार गनिमावर सपासप वार करत होती....शत्रूचा अक्षरशः खुर्दा होत होता.... अशातच गनिमानी शंभूसिंहांना घेरले ...पण तो सिंह होता तो... थांबणार कसा....! आपल्या धन्याला विशाळगडी सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठीच हा नरशार्दुल खिंडीत पाय रोवून उभा होता...
जसा महाभारती अभिमन्यू...त्याप्रमाणेच शंभूसिंह शत्रूच्या वेढ्यात एकाकी लढत देत होते....
शेवटी गनिमानी डाव साधला...
अभिमन्यू धारातीर्थी पडला, पण शेकडो गनिमांना मातीत मिळवून अमर झाला.... जाधवराव, बांदल घराण्यांच्या लौकीकाला साजेसा इतिहास पुन्हा एकदा रचला गेला.... शंभूसिंह जाधवराव ,
खिंडीत शत्रुचे १५००० सैन्य आणि महाराजाचे ३०० सैन्य याच्यात घनघोर युद्ध झाले यामध्ये शंभुसिंह बाजी बांदल, बांदल सेना शहिद झालें,एक गोळी बाजीप्रभुना लागली महाराज गडावर पोचले तोफेचा आवाज आला आणि बाजीप्रभुचा प्राण समाधानाने गेले
अश्या या सर्व शुरविर याच्या ३६१ व्या पुण्यतिथी निम्मित विनम्र अभिवादन
🙏 राजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव

#दगडी_वाडा (दाजी नगरकर वाडा)- तापकीर गल्ली, पुणे

 





#दगडी_वाडा
(दाजी नगरकर वाडा)-
तापकीर गल्ली, पुणे
पुण्यात एक आगळावेगळा असा उठून दिसावा याप्रमाणेच नावालाही साजेसा म्हणजे दाजी नगरकर किंवा दगडी वाडा. हा वाडा पुण्याच्या शनिवारवाडाजवळील तापकीर गल्लीत स्थित आहे. १८८० मध्ये समाज सुधारक रघुनाथ नगरकर यांनी बांधला होता. त्यांना दाजी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा हरी ४००० चौरस फूट मालमत्तेचा एकमेव पालक झाला. हरी यांच्या निधनानंतर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने (एएसआय) ने हा वाडा हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून घोषित केला. कालखंड आर्किटेक्चरवर विस्तृत संशोधन करणार्या आर्किटेक्ट आणि शहरी संरक्षक किरण कलामदानी यांनी कमी माहिती असलेल्या साइटची वैशिष्ट्ये यावर प्रकाश टाकला, "पुण्यातील दगडी वाडा एकमेव वाडा आहे जो फ्यूजन आर्किटेक्चरचे उत्कृष्ट नमुना आहे, ज्यामध्ये मराठा आणि व्हेनेशियन शैलीतील एक ज्वलंत प्रदर्शन आहे." दर्शनी भागाकडे कमानी आणि गॉथिक पुनरुज्जीवनची जोड आहे, अंतर्गत भागात मोठे अंगण आहे, एक आगळावेगळा असा वाड्याचा उत्कृष्ट असा हा नमुना आहे. . "नावाप्रमाणेच दगडी वाडा पूर्णपणे विटाच्या विरूद्ध म्हणजे दगडाने बनविला गेला आहे, जो नियमितपणे बांधकामात वापरला जातो.
वाडा पाहण्यासाठी पर्यटक नेहमी येत असतात. आता येथे काही कुटूंब राहतात. पुण्याच्या वर्दळीच्या भागात हा अनोखा वाडा पुण्याच्या उण्यात टाकणारी भरच आहे हे खरं.
विकास चौधरी-

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...