विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 April 2019

छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी

२६ एप्रिल इ.स.१६८४

छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी
केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणाय्रा तहाच्या अटींना संमती दर्शवली होती.
संभाजी राजांचे केग्विनला पत्र :- "वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्याता पाठवली. तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच. तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे. आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे दिवसेदिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे.... कॅप्टन गॅरीने सिद्दीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हांला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्दी आमचा शत्रू आणि तुम्ही आमचे मित्र म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे आम्हास आवश्यक आहे. तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्यापरीने तुम्ही सिद्दीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत. तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हास सर्वतोपरीने मदत करु, आपली मैत्री वृध्दिंगत होवो. अधिक काय लिहणे."
यावेळी इंग्रज व संभाजी महाराज यांच्यात जो तह झाला त्यापैकी आरमाराविषयक कलम असे होते,
"वादळामुळे किंवा अन्य उत्पातामुळे जर एखादे जहाज गुराब, जहाज किंवा होडी माझ्या राज्यांतील बंदरात लागली तर ती जप्त करुन सरकार जमा होऊ नये हा रिवाज ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत रुढ असेल तर ती सवलत इंग्रजांसही देण्यात येईल."
मुंबईसाठी दिलेल्या कलमामध्ये एक कलम असे होते की, :- "माझे आणि मुघलांची गलबते समुद्रात वावरतात तरी मुघलांचे एखादे जहाज माझ्या लोकांनी धरले आणि त्यात जर इंग्रजांचा माल असला व त्याच्यावर त्यांच्या खुणा वगैरे असल्यास आणि त्या पटवून दिल्यास त्यांना त्यांचा माल परत मिळेल. इंग्रजांनी धरलेल्या जहाजात माझ्या प्रजेचा माल आढळल्यास तो त्यांनी परत करावा."

अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.भाग 5

अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.
लेखन – विजयश भोसले
पोस्ट सांभार :इन्फो मराठी
भाग 5
या कामगिरी बद्दल सुमारे नऊ महालांचा दिड लक्ष रुपयांचा मुलूख स्वता बाजीरावांनी पिलाजींना शाहूंकडून करवून दिला व निजाम उल्मूक याने देखिल पिलाजींचे राजकारण चातुर्य पाहून चाकण परगण्यातील गॊरेगाव व मरकळ हि दॊन गावे इनाम दिली.
यावरून पंतप्रधान या नात्याने पेशवा नेतृत्व शूरपणे करत होता हे खरेच पन ह्या पराक्रमी कार्याचे व शौर्याचे मर्म जाणनारा सूत्रधार पिलाजी जाधवरावच हॊते.इ.स.१७२२-२८ या कालखंडात पिलाजीराव बाजीराव सॊबत उत्तर हिंदूस्थानच्या अनेक आघाड्यांवर अग्रस्थानी दिसतात. तर १७२४ मध्ये पॊतृगीज – मराठा तहात दावलजी सॊमवंशी व रामचंद्रपंत यांचे नेतृत्व हि करतात. १७२६ मधे दयाबहाद्दूर बरॊबर झालेल्या युद्धात आनंदराव पवार, राणॊजी शिंदे, रघॊजी भॊसले यांसॊबत मॊठ्या पराक्रमाने शत्रूला शिकस्त पिलाजींनी दिली.
कर्नाटक स्वारी:
नॊव्हें. १७२५-२७ मधे छत्रपती शाहूंनी स्वता: कर्नाटक स्वारी काढली. चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टणमची मॊहिम म्हणूनहि ओळखली जाते. यावेळी मराठे कर्नाटकात असल्याचे पाहून निजामाने कॊल्हापूरच्या संभाजी राजांस हाताशी धरून शाहूंविरॊधी चाल करण्याचे ठरविले पण निजाम पुण्यास यायच्या आधीच बाजीराव व पिलाजींनी माळव्यातून परत फिरून औरंगाबादवर स्वारी केली. निजामास एकाकी करून कॊंडीत पकडले. त्यास पळताभूई थॊडी झाली.
बंगश – बुंदेला युद्ध:
२५ फेब्रू.१७२८ पालखेडयानंतर इतिहासातील सुप्रसिद्ध असे बंगश – बुंदेला युद्ध झाले. शाहूंच्या शब्दाखातर बाजीराव पेशवे व पिलाजीराव जाधवराव बुंदेलांच्या मदतीला गेले. बंगशने छत्रसालास जैतपूरच्या किल्ल्यात कॊंडीत ठेवले होते. मराठे येत आहेत हे समजल्यावर बंगश २०००० फौज घेऊन पिलाजींवर चालून गेले पण पिलाजींनी त्यास जेरीस आणले इतके कि त्याच्या तळावर अन्नाचा अकाल पडला. अखेर परत या वाटेवर जानार नाही असे बॊलणे लावून बंगश बुंदेलखंड सॊडून निघून गेले.
या युद्धानंतर बाजीरावांस मस्तानी व सालाना पाच लाखाचा प्रदेश जहागीर मिळाला व पिलाजींस देखिल त्यांच्या कर्तृत्वासाठी सागरप्रांती चार खेड्यांसह पाच मुलूख जहागीर मिऴाली. १७२७ साली पिलाजींविरॊधी शाहू छत्रपतींची कानभरणी व ना – ना कागाळ्या करून पिलाजीकडील पुणे प्रांताचा अंमल काढून तॊ नारॊ शंकर सचिव यांच्या कडुन बाजीराव पेशवे. असा हस्तांतरित झाला. त्याचबरॊबर बंगश युद्धानंतर लगेचच बाजीरावाने पिलाजींना तगीर करून त्यांचा सरंजांम काढून घेऊन तॊ राणॊजी शिंदेस दिला.
याचे कारण इतिहासाला माहीत नाही पन याबद्दल बाजीरावांस पिलाजींची क्षमा मागावी लागली व शाहूंकडून मे १७३० मधे पुन्हा पिलाजींना सरंजाम परत करण्यात आला. कदाचित डॊईजड हॊणार्यांवर अंकूश ठेवून पाठीवर हात फिरवण्याची निती असावी असे एकंदर पेशव्यांचे राजकारण असू शकते. असे प्रकार घडून देखिल स्वामिनिष्ठ असे पिलाजीराव अखंड स्वराज्य सेवेत दिसून येतात.
१७३२-३३ मधे पिलाजीराव पेशव्यांसॊबत माळवा, बुंदेलखंड, उत्तर हिंदूस्थान या प्रांतात राजकारण व मुलुखगिरी करताना दिसतात. १७३४ मधे भगदावर स्वारीत तर त्यानंतर जंजिर्याचा सिद्दी, गॊवळकॊट, बाणकॊट युद्धात हि प्रामुख्याने वावरताना दिसतात. १७३६ मधे पिलाजीराव व मराठी सैन्याने साष्टी बेटातील सर्व गढ्या ताब्यात घेतलेल्या दिसतात.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेत असलेल्या शाहू महाराजांची सुटका झाली व तदनंतर मराठा साम्राज्याने सुवर्णकाळ पाहिला. छत्रपती शाहूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करत स्वराज्याचे रुपांतर साम्राज्यात केले. शिंदे, हॊळकर, पवार, पेशवे, गायकवाड, भॊसले अशा अनेक पराक्रमी घराण्यांच्या पराक्रमाला वाव देत शाहूंनी साम्राज्यविस्तार अखंड हिंदूस्थानात केला.
छत्रपती शाहूंनी कर्तबगार व्यक्ती ओळखून त्यास यॊग्य संधी देणे व त्याने त्या संधीचे चीज करून मराठा साम्राज्याचा उत्कर्ष करणे हेच या कालखंडाचे वैशिष्ट्य. पिलाजी जाधवरावांची छत्रपती शाहूंवर अथांग निष्ठा हॊती व पेशवे घराण्यावर दृढ असा स्नेहभाव आपल्याला दिसून येतो.बाळाजी विश्वनाथ नंतर बाजीराव पेशवा सॊबत देखिल पिलाजीराव अनेक महत्वाच्या मॊहिमांमधे अग्रभागी हॊते. गुरूस्थानी असलेल्या पिलाजीरावांना बाजीराव, चिमाजी आप्पा त्याचबरॊबर नानासाहेब ते सदाशिवराव सर्वांनी आदरानेच वागवले.
श्रीमंत सुभेदार सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे भव्य समुहशिल्प नांदेड सिटी पुणे येथे उभारण्यात अलेले आहे. पिलाजीरावांचा अश्वारूढ़ पुतळा अणि मागे ११ मावळे. अतिशय रेखीव सुंदर असे शिल्प समस्त नांदेड़कर जाधवराव यांच्या सौजन्याने हे शिल्प उभारण्यात अले आहे. शिल्प पाहूनच त्यांच्या कर्तृत्वाचा आणि शौर्याचा अंदाज येतो.
लेखन – विजयश भोसले माहिती आवडल्यास शेयर करा आम्ही आपल्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेउन येणार आहोत. आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला इमेलद्वारे पाठवू शकता.
Comment

अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव भाग 4

अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.
लेखन – विजयश भोसले
पोस्ट सांभार :इन्फो मराठी
भाग 4
त्यात ते बाळाजी विश्वनाथ बद्दल लिहतात, “बाळाजीला शिकार येत नव्हती, गॊळी चालवता येत नव्हती एवडच काय तर घॊड्यावरही बसता येत नव्हते. घॊड्याच्या दॊन्ही बाजूस त्यांना एक एक माणूस ठेवावा लागत असे.” असे असले तरी याच कान्हॊजी आंग्रेना सल्लामसलती व वाटाघाटी करून शाहूंच्या पक्षात घेण्याचे मॊठे राजकारण बाळाजींनी यशस्वी केले होते व त्याच आंग्रेवर इ.स. १७१८ मध्ये पॊतृगीज व इंग्रजांनी संयुक्त मॊहिम काढली.
त्यावेळी शाहू आदेशावरून आपल्या दुप्पट फौजेशी रणात सामना करत पिलाजी जाधवरावांनी तलवार गाजवत ‘ समुद्रातील शिवाजी ‘ नावाने संबॊधल्या जानार्या आंग्रेंचा विजय नक्की केला. हा प्रसंग कुलाब्याची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. या दॊन गॊष्टी लक्षात घेतल्या तर पिलाजी जाधवरावांची कर्तबगारी व प्रत्यक्ष रणामधला पराक्रम या बाबी ठळकपणे उठून येतात.) १८ मे १७२४ रॊजी बाजीराव – निजाम भेट झाली. या भेटीनंतर निजामाचे त्याचाच हस्तक असलेल्या मुबारीजखान याच्याशी युद्ध झाले.
या युद्धात मराठ्यांनी निजामास मदत केली व परीणामी निजामाचे विजापूर, हैदराबाद, वर्हाड, औरंगाबाद, बिदर, खानदेश या सहाही सुभ्यांवर वर्चस्व राहिले. या युद्धानंतर निजामाने बादशहाजवळ मराठ्यांच्या पराक्रमाचा गौरव पुढिल शब्दात केला आहे. तॊ बाजीरावास शहामत पनाह (शौर्यनिधी)म्हणतॊ,सुलतानजी निंबाळकर यांस तहब्बूर दस्तगाह आणि पिलाजी जाधवरावांस जलादत्त इंतिवाह (रणशूर,शौर्य कर्माचे मर्मद्ण) म्हणतॊ.
पुढे पेशवे निजाम यांचे बिनसले औरंगाबाद प्रांत कब्जात आणण्याचा खुद्द बाजीराव पेशव्यांनी खूप प्रयत्न केला पन जमले नाही. स्वत: निजाम तिथेच राहत हॊता. शेवटी हि जॊखीम पिलाजींनी स्वताहून घेतली घॊड्याला उलटी नाल मारून दॊन-दॊन महिने घॊड्याची खॊगिर न उतरवता पिलाजींनी औरंगाबादी अंमल बसवला.

अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव भाग 3

अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.
लेखन – विजयश भोसले
पोस्ट सांभार :इन्फो मराठी
भाग 3
इरेला पेटलेल्या चंद्रसेनाच्या तडाख्यातून पिलाजीरावांनी बाळाजी विश्वनाथास त्याच्या दॊन पुत्रांसह मॊठ्या हिकमतीने वाचवले. ( या ठिकाणी पिलाजी जाधवराव नसते तर कदाचित पेशवाईची सुरवात हॊण्याआधीच अंत झाला असता ) याच पांडवगडच्या लढाईत बाजीरावास लढाईचा पहिला अनुभव आला.
पिलाजी जाधवराव हे बाजीराव व चिमाजी आप्पा यांचे युद्धशास्त्राचे गुरू हॊते. सन १७१३ च्या दरम्यान शाहूंनी चंद्रसेन जाधवाचे सेनापती पद काढून घेतले व बाळाजींस सेनाकर्ते केले .यामुळे अनेक मराठा सरदार साशंक बनले. चंद्रसेन जाधवांप्रमाणेच रंभाजी निंबाळकर, तुरूकताजखान, मुहकमसिंह यांनी खुद्द सातार्यावरच स्वारी करण्याचे यॊजले पन पिलाजींनी मॊठ्या बुद्धीकौशल्याने या सर्वांचे मतपरिवर्तन केले.
सन १७१५ मध्ये आंग्रे विरूद्ध मॊहिम काढायची म्हणून बाळाजी विश्वनाथने शाहूंकडून पेशवेपद मिळवले. पेशवा झाल्यानंतर बाळाजींनी आपला मॊर्चा दमाजी थॊरातांकडे वळवला. पन हे प्रकरण बाळाजींच्या अंगाशी आले. समॊपचाराची भाषा करून थॊराताने बाळाजीस त्यांच्या बायकामुलांसह हिंगणगावच्या गढीत कैद केले. व तॊंडात राखेचा तॊबरा भरून त्यांचा अपमान केला.
शाहूंच्या आद्णेवरून मग पिलाजींनी दमाजी थॊरातांशी बॊलणी लावून बाळाजींस सॊडवून आणले. १७१७ मध्ये स्वत: शाहूंनी दमाजी विरूद्ध मॊहिम काढली व १७१८ मधे पिलाजी व बाळाजींनी मिळून हिंगणगावच्या गढीस मॊर्चे लावून दमाजींचा बिमॊड केला. या कामी इनाम म्हणून शाहूंनी पिलाजी जाधवरावांस मौजे दिवे व मौजे नांदेड येथील स्वराज्य अंमल दिला. याचदरम्यान पिलाजी व बाळाजींनी स्वामी आद्णेवरून दिल्ली स्वारी देखिल केली.
तेथून परतल्यानंतर शाहू महाराजांनी जमखंडी, चिकॊडी, वाशी, कुंभॊज या प्रांताचा सुमारे पंचेचाळीस हजारांचा मॊकासा अंमल पिलाजींना दिला. वरील सर्व प्रसंग पाहिले तर शाहूंचा मराठी देशात जम बसवण्यात पिलाजी जाधवराव व बाळाजी विश्वनाथ या दॊन व्यक्तींचे कार्य, कर्तृत्व व मेहनत अफाट हॊती हे आपल्याला इतिहासात दिसून येते. ( मनॊहर माळगांवकर यांच्या ‘कान्हॊजी आंग्रे ‘ या पुस्तकाचा मराठी अनुवाद पु.ल.देशपांडे यांनी केला आहे.

अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.भाग 2

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग 2650
अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.
लेखन – विजयश भोसले
पोस्ट सांभार :इन्फो मराठी
भाग 2
त्यांनी जंजिऱ्याच्या मोहिमेत चांगली कामगिरी बजावली. वसईच्या मोहिमेत पोर्तुगिजांशी सामना केला. गढामंडलाच्या मोहिमेत छत्रसालाच्या मुलाने बाजीरावाबरोबर पिलाजीरावांचाही सत्कार केला होता. पिलाजीराव बंगालच्या स्वारीतही सहभागी होते. त्यांनी व्यंकटराव घोरपडे व कोल्हापूरकर छत्रपती संभाजी यांचा तंटा मिटवला. कान्होजी आंग्रे यांना इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या विरोधात मदत केली. पिलाजीरावांनी सासवड, दिवा, वाघोली, जाधववाडी या व्यापारी पेठा वसवल्या.
त्यासंबंधी शाहूमहाराज एका पत्रात म्हणतात : ‘राज्याभिषेक शके ३४ सर्वधारी नाम संवत्सरे शाहू छत्रपती महाराज यांनी पिलाजी बिन (वडिल) चांगोजी यास मौजे दिवे येथे पेठ वसवण्यास सोयीचे गाव आहे, तरी पेठ वसवावी. तिचे नाव शाहूपुरी असे ठेवावे. त्यास तुम्हास पेठेचे सेटेपण इनाम वंशपरंपरेने इतर ठिकाणचे वाणी उदमी आणावे, वतन वंशपरंपरेने खावे.’दिवेघाटातील मस्तानी तलाव म्हणून ओळखला जाणारा तलाव पिलाजीराव यांनी बांधला.
सन १७०८ साली शाहू महाराजांना दक्षिणेत आणण्याकरता काही सरदार मंडळी गेली. त्यांबरॊबर पिलाजी जाधवराव हेही हॊते. बादशहाशी ना -ना प्रकारच्या वाटाघाटी करून हे सरदार शाहूंना दक्षिणेत घेऊन आले. या कामात पिलाजींचे राजकारण कौशल्य, हुशारी व कर्तबगारी पाहून शाहूंनी येताक्षणीच पिलाजींना पुणे येथे दिवे घाटाजवळ एक चाहूर जमीन इनाम म्हणून दिली तेव्हापासून पिलाजी जाधवराव तहहयात शाहूंचे आधारवड बनून राहिले.
छत्रपती शाहूंच्या प्रारंभीच्या काळात सत्ता स्थिरस्थावर करण्यात पिलाजी जाधवराव व बाळाजी विश्वनाथ यांनी एकविचाराने, कर्तृत्वाने, पराक्रमाने राजकारणे चालविलेली दिसतात. सन १७११ मध्ये एका मॊहिमे दरम्यान बाळाजी विश्वनाथ व शाहूंचे सेनापती चंद्रसेन जाधव ( धनाजी जाधवांचे पुत्र ) यांच्यात किरकॊळ कारणाने वाद झाले.

अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.भाग १

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग 2649
अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.
लेखन – विजयश भोसले
पोस्ट सांभार :इन्फो मराठी
भाग १
सरदार पिलाजीराव जाधवराव नावाला साजेसाच पराक्रम,छत्रपती शाहूंना आणण्यात थोर राजकारण मत्सुद्दीपणा व मोलाचा सहभाग अनेक लढाया इमान घोड्याला उलटे नाल ठोकून सलग दोन महिने घोड्यावरचे घोगिर न उतरवता शाहीच्या औरंगाबादेवर अंमल बसविणारे. मध्ये जंजिर्याचा सिद्धी,बाणकोट,गोवळकोंडा या मोहिमांमध्ये अग्रस्थानी. इ.स.१७३८ मधे वसई मॊहिम घेतली.
या मोहिमेत पिलाजीराव हे सात हजार शिपाई व सातशे घॊडेस्वारांचे नेतृत्व करत होते. मराठ्यांनी युद्ध निपुणतेची एक झलक देऊन अखेर १५ मे १७३९ रॊजी वसईवर विजय साजरा करुनच मागे फिरणारे. अहो स्वराज्य तर सोडा माळवा, बुंदेलखंड, उत्तर हिंदुस्थान सुरंज, भेलसा, प्रयाग, बंगाल, नेवाई पर्यंत मजल मारली इ.स. १७४२ बंगाल प्रांताची चौथाई पिलाजींनी छत्रपती शाहूंना मिळवून दिली.
वयाच्या ६६ ६७ व्या वर्षीसुद्धा म्हणजे इ.स. १७४६ मधे पिलाजीरावांनी सदाशिवरावांसॊबत कर्नाटक मॊहिमेत आसिम कर्तृत्व दाखवले. वयाच्या ७१ व्या वर्षी १७५१ मधे पिलाजीराव काळाच्या पडद्याआड गेले. दिव्यत्वाच्या एका अग्निचा अंत झाला. ग. ह. खरे आपल्या “इतिहासकर्ते मराठे” या पुस्तकात लिहतात. “औरंगजेबाच्या कैदेतून सुटून शाहू महाराज महाराष्ट्रात येताच इतरांबरोबर पिलाजी जाधवराव त्यांस मिळाले.
बाळाजी विश्वनाथ चंद्रसेन जाधवाच्या कचाट्यातून यानी सॊडविले. यामुळे छत्रपती व पेशवे या दॊघांचाही यांच्यावर फार लॊभ जडला. बाळाजी, बाजीराव, चिमाजी, बाळाजी बाजीराव व सदाशिवराव यांनी उत्तरेत व दक्षिणेत ज्या अनेक स्वार्या केल्या त्यापैकी बहूतेकांत पिलाजीराव प्रमुखपणे वावरले. एवढेच नाही तर यांनी स्वता:हि अनेक स्वार्या काढल्या हॊत्या. पिलाजीराव हे शिंदे, हॊळकर तॊलाचा सरदार असतांही केवऴ हुजरातीत राहिल्यामुऴे संस्थानिक बनू शकले नाही.
शाहूमहाराज मोगलांच्या कैदेतून सुटून साताऱ्यास सन १७०८ मध्ये आले. त्या वेळी परतीच्या वाटेवर सरदार पिलाजीराव जाधव त्यांना सामोरे गेले. बाळाजी विश्वनाथ पेशवेपदावर आल्यावर त्यांना दमाजी थोरात यांनी हिंगणगावच्या गढीत कैद केले होते. पिलाजीरावांनी त्या थोरातास पकडून शाहूराजांपुढे आणले( १७१६). पिलाजी दिल्लीच्या स्वारीत बाळाजी विश्वनाथांबरोबर होते (१७१८). पिलाजीरावांनी निजामाचा औरंगाबादमध्ये बंदोबस्त केला (१७२४).

खंडेराव कदम

96 कुळी मराठा चे #कदम सरदार
वंश: सूर्य
गोत्र: भारद्वाज
कुल दैवत : तुलजा भवानी, शंकर (ज्योतिबा, खंडोबा)
विजय शास्त्र : तलवार

लग्नातील देवक: सोने, हळद केतकी , कळंत लाल
सिंहासन छत्र निशाण - लाल वारू ध्वजस्तंभी सूर्य सविता (सूर्य) गायत्री मंत्र
राजाचे नाव : प्रभाकर वर्मा उपपद
मुळचया गादीचे स्थान : केदार उर्फ कंदार उर्फ कंदाहार वनवासी गोवे, सातवें शतकांत तेरावा शतकात कर्नाटकात चौथे शतकात मुंगी पैठण . अकरावया शतकात ओरिसा
कदम हे ९६ कुळी मराठा आडनाव आहे.
प्रामुख्याने हे आडनाव उस्मानाबाद, नांदेड, सातारा या जिल्हात आढळते. तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हात प्रमुख आडनाव म्हणून या आडनावाकडे बघितले जाते. तसेच कदम हे आडनाव मराठ्यांच्या सुर्यवंशम कुळातील आहे.
सुर्यवंशम म्हणजे लढाई करणारे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
अहमदनगरच्या निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर यांच्या सेवेत बाजी कदमराव नावाचे देवळाली प्रवरा येथील एक सेनाधिकारी होते. साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवल्याबद्दल त्यांना साक्री आणि रुई ही गावे इ.स. १५८० साली इनाम मिळाली होती.
पुढे विजापूरकरांशी लढताना बाजी कदमांचा कर्नाटकातील बंकापूर येथे मृत्यू झाला. त्यानंतर कदम घराण्याचे वंशज शिवाजी राजांच्या सेवेत मराठा दौलतीत दाखल झाले.



खंडेराव कदम आणि तिसरे बाजी कदम शिवाजीराजांचे विश्वासू सेनाधिकारी होते. त्यांच्याकडे राजगडाची तट-सरनौबती होती. शिवाजीराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तमिळनाडू येथील वलीगंडापुरम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती.
छत्रपती राजारामराजे भोसल्यांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी योगदान दिले. पानिपतच्या तिसर्‍या लढाईतही कदम घराण्यातील योद्धे लढले होते
#खंडेराव #कदम हे मराठा सेनाधिकारी होते. त्यांच्याकडे राजगडाची तट-सरनौबती होती. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तमिळनाडू येथील वलीगंडापुरम जिंकल्यावर येथील भुईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती.
छत्रपती राजारामराजे भोसल्यांच्या जिंजी मोहिमेतही कदमांनी योगदान दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सोबत काम करण्यासाठी अत्यंत कुशल मावळ्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी खंडेराव कदम हे एक सेनापती होते. स्वराज्याप्रती निष्ठा, तंत्रकुशलता, व्यवस्थापन या सर्व बाबींना महाराजांनी खुप महत्व दिले होते.
आज च्या घडीला सुद्धा मार्गदर्शक ठरेल असे काही पराक्रम त्यांचे सेनापती करून गेले. त्यातील एक होते खंडेराव कदम.
#दोन #मोती #गळाली,#सव्वा #लाख #बांगडी #फुटली #रूपये आणि #खुर्दा #किती #गेला #त्याची #गिणती #नाही 14 जानेवारी 1761रोजी मराठे व अब्दाली यांच्यात पानीपतचे तिसरे युध्द झाले महाराष्ट्रातील मराठ्यांची एक पिढी पानिपतावर कापली गेली.
कदमांचे पण कित्येक सरदार कामी आले फक्त इतिहासात त्याची नोंद झाली नाही. शिंदे -कदम प्रत्येक युध्दात साथीने लढलेले आहेत. चिमाजीअप्पाने वसई किल्ल्याची मोहिम फत्ते केली त्यामधे कदम व शिंदे सरदार अग्रेसर होते.
कदमांच्या पुढती कदम चालले कदम सरदार || शिंद्यांचा खंदा घोडा चालला जणू की तीर || संदर्भकविता:- बेलाग दूर्ग जंजिरा वसईचा किल्ला तिथला
शिवाजीमहाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळऩाडू येथिल वलीगंडापूरम जिंकल्यावर तेथिल भूईकोट किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे दिली.
छत्रपती राजाराम महाराज जिंजी येथे झुल्पिकारखानाच्या वेढ्यात अडकले होते. खाना सोबत शिर्के होते तेव्हा शिर्क्यांसी वाटाघाटी होऊऩ दसपटकरांच्या इनामी गावांपैकी कदमांची काही गावे शिर्क्यांना देऊऩ महाराज निसटले व सिंहगडावर पोहचले.
खंडेराव कदमांचे पूर्वज बाजी कदमराव हे अहमदनगरच्या निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तजा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर यांच्या सेवेत देवळाली प्रवरा येथिल एक सेनाधिकारी होते.साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले किल्ल्यावर फितवा करून मिळवल्या बद्दल त्यांना साक्री आणि रूई ही गावे इ.स.1580 इनाम मिळाली होती.
पुढे विजापूरकरांशी लढताना कर्नाटकातील बंकापूर येथे बाजीराव मृत्यू पावले.खंडेराव कदमांचे अनेक वंशज पानीपतावरील युध्दात योध्दे म्हणून लढले.
#जय #शिवराय #जय #शंभूराजे

Thursday 25 April 2019

संताजी "घोरपडे" ... संताजी "जाधव" नाते संबंधांची अजब वीण

संताजी "घोरपडे" ... संताजी "जाधव" नाते संबंधांची अजब वीण
इतिहास अभ्यासताना एका मातबर घराण्याचा दुसऱ्या मातबर घराण्याशी असलेले नाते संबंध बऱ्याच वेळा निष्ठा आणि नाते जपण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवून जाते. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत महान पराक्रम करणारे आणि मुघलांना त्राही भगवान करून सोडणारे संताजी धनाजी यांच्या घराण्यांचा पूर्वेतिहास असाच रंजक आहे.
भोसले आणि घोरपडे एकाच सिसोदिया वंशाचे हे आपल्याला माहीत आहे. या घराण्यातील उग्रसेन नावाच्या व्यक्ती पासून ही दोन घराणी उपजली. उग्रसेनाचा थोरला पुत्र कर्णसिंह या पासून घोरपड्यांची थोरली पाती तर धाकटा पुत्र शुभकृष्ण (शुभकर्ण ? ) या पासून भोसल्यांनी धाकटी पाती सुरू झाली. थोडक्यात ही दोन्ही घराणी चुलत घराणी होती. कर्णसिंहा पासून नवव्या पिढीत बाजी घोरपडे तर शुभकृष्णा पासून दहाव्या पिढीत शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुढील काळात राजकीय आणि वैयक्तिक वैरात बाजी शिवाजी महाराजांकडून मारला गेला. तर बाजीचाच चुलतभाऊ म्हाळोजींची दोन मुले संताजी आणि बहिरजी यांचा उल्लेख शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयात सामील असल्याचा सापडतो. राजाराम महाराजांच्या काळात संताजींना सेनापतीपद मिळाले तर पुढील काळात काही वादांमुळे सेनापतीपद धनाजी जाधवांकडे गेले. म्हणजे संताजी घोरपड्यांचे घराणे शिवरायांचे चुलत घराणे होते. .
आता धनाजी जाधवांच्या पूर्वपिठीकेकडे वळू. या जाधव वंशाचे मूळ सिंदखेडकर जाधवरावांच्या म्हणजे जिजाबाईंच्या घराण्यातच आहे. जिजाबाईंच्या वडिलांच्या म्हणजेच लखुजींच्या हत्येच्या वेळी त्यांचे भाऊ अचलोजी यांचीही हत्या झाली होती. जाधवराव घराण्यावर कोसळलेल्या या संकटामूळे लखुजींचे धाकटे भाऊ जगदेवराव मुघलांना मिळाले तर अचलोजींच्या अल्पवयीन मुलाचे संताजीचे संगोपन जिजाबाईंनी केले. हे संताजी संभाजी राजांचे (शिवरायांचे जेष्ठ बंधू) समवयस्क होते आणि त्यांच्याच बरोबर कनकगिरीच्या वेढ्यात मारले गेले. या संताजींचा मुलगा शंभुसिंह जाधव शिवाजी महाराजांचे समवयस्क होते. त्यांचा सुपुत्र धनाजी प्रतापराव गुजरांच्या हाताखाली तयार झाला आणि पुढील इतिहास घडवला. म्हणजे धनाजी जाधवांचे घराणे शिवरायांचे मातुल घराणे होते.
थोडक्यात रक्ताच्या नात्याने जोडलेल्या या घराण्यांच्या नात्यांची गुंतागुंत काहीशी विस्मयात टाकते खरी पण नात्यांच्या याच ताकदीने स्वराज्याचा गोफ घट्ट विणला होता असेच म्हणावे लागेल. संताजींना "ममल्कतमदार जफ्तनमुल्क" हा किताब होता तर धनाजींना "जयसिंहराव" किताब होता. यातूनच त्यांच्या कर्तृत्वाची कल्पना येते. या कर्तृत्वाचा, रक्ताच्या नात्यांचा आणि निष्ठेचा अपूर्व संगम क्वचितच बघायला मिळतो. मुघलांचे रक्तरंजित नाते संबंध लक्षात घेता मराठे या ही बाबतीत उजवे ठरतात हे मान्य करण्या शिवाय पर्याय नाही.
संदर्भ :- मराठी रियासत खंड २
भित्तिचित्र सौजन्य :- श्री अमित राणे
©विद्याचरण भालचंद्र पुरंदरे

Monday 22 April 2019

राणोजी शिंदे व मल्हारराव होळकर

राणोजी शिंदे व मल्हारराव होळकर यांना जरब दाखविण्याकरिता दिल्ली येथील दुसर्या सैन्याचे नेतृत्व घेऊन मीरबक्षी खानडौरान दिल्लीतुन बाहेर पडला. मराठ्यांनी साबर घेतले व ते आजमिराजवळ आहेत असे समजल्यावर खानडौरानने सवाई जयसिंग, मारवाडचा अभयसिंग , महाराव कोटेवाला वगैरे राजांना सामील करून घेतले. दोन लाख स्वार व तोफखाना अशी प्रचंड मोगल सेना जमा झाली. मुकुदरा उतरून रामपुरा प्रांतात मराठ्यांच्या रोखाने मोगलांचे कुच झाले. इकडून राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर जाऊन त्यांनी युद्धास सुरुवात केली. मोगलास चारी बाजुने वेढा देऊन बुडवावे हा मराठ्याचा पहिला बेत त्या प्रमाणे आठ.दिवस लष्कराच्या चारी बाजुंनी काडी दाणा पाणी घास बंद केला. मोगलांची उंट, घोडे धरुन आणली. खानडौरान मोगल साम्राज्याचा मीरबक्षी. त्याच्या निशाणाखाली रजपूत रजवाड्याच्या फौजा जमा झालेल्या. अशा प्रचंड सैन्याशी मुकाबला करण्यापेक्षा जयपूर, बुंदी, कोटा येथील तुकड्या आघाडीवर गेल्यामुळे या उघड्या पडलेल्या प्रदेशात आपल्याला अडथळा होणार नाही हे शिंदे होळकर यांच्या ध्यानात येऊन त्यांनी वेढा उठवला. शत्रूला कळू न देता गनिमीकावा करून मराठे मुकुददरा उतरले. बुंदी कोट्यावरुन त्यांनी जयसिंगाचा मुलुख गाठला व तेथे लुटालूट करून मराठे निसटून पुढे गेले. आपल्या पिछाडीवरील मुलखाचा मराठ्यांनी नाश सुरू केला आहे ही बातमी येताच मीरबक्षी च्या हाताखालील सैन्याचा धीर सुटला. आपल्या मुलखाचा बंदोबस्त करण्यासाठी जयसिंग जयनगरकडे वळला. तोच मार्ग इतरांना करावा लागला. जयसिंग यांच्या मध्यस्थीने मीरबक्षी खानडौरान होळकर शिंदे यांची भेट होऊन तह ठरला. मराठ्यांची ब्याद टळावी या अपेक्षेने माळव्याच्या चौथाई दाखल दरसाल 22 लाख देण्याचे खानडौरानने कबूल केले. शिंदे होळकर- खानडौरान यांच्यात हा तह झाला ती तारीख होती - 22 मार्च 1735.
#khub_ladhe_marhatte
#sardar
#maratha_empire
#maratha_riyasat

दुर्गपती शिवाजी राजे ह्यांनी आग्रा भेटी नंतर राखलेले दुर्ग पुढील अंदाजपत्रात - [ भाग २ ]


दुर्गपती शिवाजी राजे ह्यांनी आग्रा भेटी नंतर राखलेले दुर्ग पुढील अंदाजपत्रात - [ भाग २ ]
शिवाजी महाराजांच्या अंदाज पत्रकांप्रमाणे भाग १ मध्ये मांडलेल्या गोष्टी घडून आल्या ते इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्डस् मधील Diary Of Thomas Niccolls 1673 , original correspondence letters received from India या नोंदीमधून रायगडाबद्दलचे जे वर्णन कळते त्यावरून महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गदुर्गांची बळकटी झाली असावी असे निश्चित समजावे. गडदुर्गाच्या डागडुजीच्या अंदाजपत्रकातील पावणेदोन लाख होनांच्या निधीपैकी पन्नास हजार होन एकट्या रायगडासाठी खर्च करण्यात आले. थॉमस निकोल्स हा इंग्रजी वकील दि. १९ मे १६७३ रोजी शिवाजीमहाराजांची भेट घेण्यासाठी मुंबईतून रायगडाकडे निघाला. त्याच्या रोजनिशीत म्हणजे नेहमी डायरीत जी नोंदणी होयची त्यात त्याने मुंबई रायगड इथपर्यंत केलेला प्रवास , रायगडावरील त्याचे वास्तव्य, शिवछत्रपतींशी त्यांची झालेली भेट याबद्दल वर्णन आहे. त्या तारीखवर दि २३ मे १६७३ रोजी लिहिलेला मजकूर रायगडाच्या डागडुजीच्या दृष्टीने महत्वाचा तो असा --
" In the morning we went up that steep hill, where in many places there are stair made, and going into the gate the staires are cut out of the firm rough rocks. Where the hill might not be naturally strong, there they build walls of about 24 foot high , and within 40 foot of the first wall there is another such wall, that if the enemy should gain one, they have an other to beat him out, so that if the hill be furnished with provision, a few men may keep it from all the world , and as for water , there are many large tanks cut in the rock , which every rainy season fill with water sufficient and to use for the whole year.On the top of the hill is a large town , though of small built houses, but on the highest peak is Sevagees Lodgings, build quadrangle,with a large house in the middle where he hears business of import. "
थॉमस निकोल्सच्या वर्णनावरून अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे तळी, गच्ची ( चुन्याचा कोबा ), किल्ले व तट यांच्या डागडुजीसाठी किंवा नव्या बांधणीसाठी जी ५०,००० होनांची तरतूद केलेली होती, त्यानुसार रायगडाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होते असेच म्हणावे लागेल. शिवाय निकोल्सच्या लिखाणाप्रमाणे त्याने जी सामान्य प्रतीची घरे पाहिली ती गडाच्या जिर्णोद्धाराच्या कामासाठी आलेल्या गरीब कामगार मंडळींची घरे ( ज्याला कोकणात आजही पाल असा शब्द वापरतात) होती. यावरून शिवाजी महाराजांच्या आज्ञेअनुसार अंदाजपत्रकात नमूद केलेल्या गडांवर देखील या कालावधीत जिर्णोद्धाराचे काम सुरू होते ही हकीकत आहे.

दुर्गपती शिवाजी राजे ह्यांनी आग्रा भेटी नंतर राखलेले दुर्ग पुढील अंदाजपत्रात - [ भाग १ ]

दुर्गपती शिवाजी राजे ह्यांनी आग्रा भेटी नंतर राखलेले दुर्ग पुढील अंदाजपत्रात - [ भाग १ ]
मुघल बादशहा आलमगीर औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटून आलेले राजे मुघलांशी सलोख्याचा तह केला आणि सतत मोहिमांमुळे स्वराज्यातील मुलुखाची नासाडी होता होता ती वाचवण्यासाठी मोगलांशी तह करण्याचे योजले .इ.स २६७० पर्यंत मुघल व मराठे यांच्यातील संघर्षाला विश्रांती मिळाली खरी पण लगेच उभयतांमधील तह मोडला आणि पुरंदरच्या तहानुसार मुघलांना दिलेले तेवीस किल्ले परत जिंकून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी अजून एक मोहीम आखलेली. विस्तारलेला प्रदश पुन्हा उभा करताना लष्करी ठाणी म्हणजे किल्ले बळकट करणे आवश्यक. ह्यामध्ये महाराजांनी अंदाजपत्रक एका बजेट वर तयार केले ते असे -
जाबिता तह इमारती करणे. सण इसन्ने करणे इमारती करावयाचा तह केला असे की गबाळ हुन्नरबंद लावून पैका पावत नाही, हुन्नरबंद गवगवा करिता काम करीत नाहीत.याबद्दल तह केला की, नेमस्तच इमारत करावी होन १,७५,०००
म।। एक लाख पंचाहत्तरी
हजार होन रास
५०,००० ------------ रायगड
३५,००० दि।।( दिम्मत)घरे
(२०,००० तळी २
१०,००० गच्ची
५,००० ) किल्ले
--------------
३५,०००
१५,००० तट
-------------
५०,०००
------- १०,००० सिंहगड
१०,००० सिंधुदुर्ग
१०,००० विजयदुर्ग
१०,००० सुवर्णदुर्ग
१०,००० प्रतापगड
१०,००० पुरंदर
१०,००० राजगड
५,००० प्रचंडगड
५,००० प्रसिद्धगड
५,००० विशाळगड
५,००० महिपतगड
५,००० सुधागड
५,००० लोहगड
३,००० राजमाची
३,००० कोरीगड
२,००० सरसगड
२,००० महिधरगड
१,००० मनोहरगड
७,००० किरकोळ इतर
___________
१,७५,०००
येणेप्रमाणे एक लाख पंचाहत्तरी हजार होन खर्च करणे.महाराजांनी गडांची डागडुजीसाठी व तिथे नव्याने इमारती उभारणीसाठी वरील तरतूद केली होती. पण त्यानुसार कामे झाली का असा प्रश्न लोकांच्या मनात येतो. गडांच्या बळकटीसाठी मोठ्या रकमेची तरतूद करून शिवाजी राजे फक्त इथवरच थांबलेले नाही आहेत , तर त्यांनी पुढचाही विचार केला. मुघलांच्या संभाव्य स्वारीची त्यांना चांगलीच जाणीव झाली होती. आज न उद्या औरंगजेब सर्वशक्तिनिशी उतरणार आणि दक्षिणेतील आदिलशाही व कुतुबशाही ह्या दोन शाह्यांबरोबर आपले स्वराज्यही काबीज करण्याचा प्रयत्न करणार, तेव्हा त्या आक्रमणाला शह देण्यासाठी आपल्याला याच गडर्गांचा आश्रय करावा लागणार. मुघल सैन्य संख्येने मोठं आहे ते एकाच वेळी अनेक किल्ल्यांना वेढा घालतील तेव्हा बाहेरून येणाऱ्या मदतीवरच किल्ला लढविला जाईल. अश्या आणीबाणीच्या प्रसंगी महालोमहली खजिना करावा आणि त्या धनातून गडाला मदत पाठवावी अशी अतिशय महत्त्वाची तरतूद देखील करून ठेवली आहे महाराजांनी आणि म्हणून दुसरा अंदाजपत्रक ते असे -
जाबिता तह. सन इसन्ने कारणे राजश्री साहेब ( शिवाजी राजे ) तह केला की -
जो आपला मुलुख आहे त्यापैकी महालोमहालीहून खजाना करावयास पैके आणावे. त्याचा खजानाच करून ठेवावा, ज्या वेळीस मुघलांशी लढाई सुरू होईल आणि मोगल येऊन गडास वेढा घालतील त्याचे मदतीस जरूर आणिकी करून ऐवज जुडेना तरीच खजानाचे पैके खर्च करावे. नाही तरी एरव्ही राज्यभागास सर्वही खर्च न करावा.ऐसा साहेब तह केला असे आणि खजाना करावयाची मोईन केली.
होन १,२५,०००
२०,००० कुडाळ
२०,००० राजापूर
२०,००० कोळे
१५,००० दाभोळ
१३,००० पुणे
१०,००० नागोजी गोविंद
५,००० जाऊली
५,००० कल्याण
५,००० भिवंडी
५,००० इंदापूर
२,००० सुपे
५,००० कृष्णाजी भास्कर
--------------
१,२५,०००
स्वराज्यातील गडांच्या बळकटीसाठी पावणेदोन लाख व मुघलांशी झुंज देण्यासाठी केलेली तरतुदीची रक्कम सव्वा लाख असे मिळून तीन लाख होनांच्या तरतुदीचे अंदाजपत्रक मांडणाऱ्या दुर्गपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील गदुर्गांबद्दल किती विश्वास वाटत होता ह्याचा हा सत्यात उतरवलेला आराखडा आहे.

#छत्रपती #राजर्षी #शाहू #महाराज

#छत्रपती #राजर्षी #शाहू #महाराज
१०० वर्षांपूर्वी कोल्हापुरात आणि पर्यायाने भारतात एक #ऐतिहासिक_घटना घडली होती.
१८९४ साली #कोल्हापूरचा_कारभार हाती घेतलेल्या छत्रपती शाहू महाराजांना आजपासून १०० वर्षांपूर्वी म्हणजेच २१ एप्रिल १९१९ रोजी कानपूरमध्ये #राजर्षी ही #पदवी बहाल करण्यात आली होती.
राजर्षी या पदवीच्या नावावरूनच महाराजांचे जीवन कसे व्यतीत झाले याचा अंदाज येऊ शकतो.
#राजा + #ऋषी असा तयार झालेला #राजर्षी हा शब्द खास महाराजांसाठीच असावा असा विचार मनात येतो.
इंग्रजांच्या काळात जेव्हा इतर संस्थानचे राजे ऐश आरामात जगत होते तेव्हा #कोल्हापूर नावाच्या आई अंबाबाईच्या नगरीत छत्रपती शाहू महाराज हे मात्र आपण #छत्रपती_शिवाजी महाराज आणि #छत्रपती_संभाजी महाराजांचे वंशज असल्याची जाणीव ठेवून जनतेसाठी झटत होते.
कोल्हापूरात असे एखादेच क्षेत्र असावे ज्यात महाराजांनी आपले #योगदान दिले नाही.
आजही साऱ्या महाराष्ट्रात #दुष्काळ पडला तरी कोल्हापूर #सुजलाम_सुफलाम असते, याला कारण म्हणजे महाराजांच्या कार्याचे पोवाडे गात उभी असणारी राधानगरी आणि काळम्मावाडीची #धरणे!
ज्या काळात फक्त मुंबई येथे औद्योगिक वसाहती होत्या त्या काळी कोल्हापूर येथे #औद्योगिक_वसाहत वसवून कोल्हापूरच्या कित्येक पिढ्यांना रोजगार देऊन आणि त्यांच्या घरच्या चुली विझू न देण्याचे पुण्यकर्म करणारे महाराज साक्षात द्रौपदीला न संपणाऱ्या अन्नाची थाळी देणाऱ्या #श्रीकृष्णाची_आठवण करून देतात.
तत्कालीन गावकुसाबाहेर शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी वसवून महाराजांनी #दूरदृष्टी कशी असावी याचा आदर्शच घालून दिला.
आजही #महाराष्ट्रात_एकमेव असणारे #कुस्तीचे_मैदान म्हणजेच #खासबाग मैदान हे अतुल्य स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून आपले पाय घट्टपणे रोवून शहराच्या मधोमध उभे आहे.
स्वतः #उत्तम_मल्ल असणाऱ्या महाराजांनी निव्वळ कोरड्या पाषाणासारखे उपदेश न देता हे मैदान बांधून कोल्हापूरसह देशभरातील कुस्तीगीरांसाठी या शहराला #कुस्तीचे_माहेरघर बनवले.
अगदी कळंबा तलावापासून शहरात पाणी पुरवठा करताना पाणी अशुद्ध होऊ नये म्हणून पाईपलाईन कमान बांधून वरून घेण्याची कल्पना लक्षात घेता आजच्या काही राजकारण्यांच्या बुद्धीची कीवही आल्याशिवाय राहत नाही.
महाराजांचे #शिक्षणावरील_प्रेम तर विख्यातच!
आजही महाराजांचे या क्षेत्रातील योगदान एखाद्यास बघायचे असल्यास #दसरा_चौकात जाऊन उभे राहावे. समाजातील जातपात लक्षात घेता प्रत्येक समाजासाठी वेगळे #बोर्डिंग उभे करणारे शाहू महाराज हे एकमेव!
त्याचसोबत शाहू महाराज हे #सक्तीचे_शिक्षण सुरू करणारे संपूर्ण देशातील #पहिले_राज्यकर्ते! त्याकाळी मुलांना शिक्षण घेऊ न देणाऱ्या पालकांना काही प्रमाणात दंडही होत, यावरून त्यांचा शिक्षणाचा आग्रह दिसून येतो.
महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज तसेच महाराणी ताराबाई यांच्यावर असणाऱ्या श्रद्धेपोटी महालक्ष्मी रथोत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवराय आणि करवीर संस्थान संस्थापिका महाराणी ताराबाई यांचा #रथोत्सव सुरू केला.
आज योगायोग म्हणजे महाराजांना राजर्षी ही पदवी मिळून ज्यादिवशी १०० वर्षे पूर्ण होत आहेत, त्याच दिवशी हा रथोत्सवाचा मुहूर्त आला आहे.
महाराजांची कार्ये किती आणि काय काय सांगावी?
कोल्हापूर अर्थात करवीर नगरी ही दक्षिण काशी! इथं मरणाऱ्याला #स्वर्ग प्राप्त होतो अशी आम्हा कोल्हापूरकरांची श्रद्धा! पण इथं जगणाराही स्वर्गात जगल्याप्रमाणे जगतो, याचे श्रेय मात्र महाराजांना!
- #प्रतिराज_मांगोलीकर
🅿®
(टीप - पोस्ट शेअर करायची असल्यास कृपया नावासह शेअर करावी.)

शाहाजीराजे आणि आरमारी शाह्यांचे संबंध....

शाहाजीराजे आणि आरमारी शाह्यांचे संबंध........
============================

मोघल आणि आदिलशहा यांनी अनेक आक्रमणे करून निजामशाही संपवत आणली असताना इ.स. १६३३ मध्ये पेमगिरी किल्यावर शाहाजीराजांनी निजामशाही घराण्यातील मुर्तुजा नावाच्या १० वर्षांच्या मुलास आपल्या मांडीवर बसवून स्वतः निजामशाहीची सूत्रे हाती घेतली. निजामशाहीतील अनेक जुन्या मराठा सरदारांना एकत्र करून निजामशाही पुनरुज्जीवित केली. खरे पाहता ही "स्वतंत्र मराठा साम्राज्याची सुरुवात"च होती.

या काळात सह्याद्रीच्या पूर्वेला लागून उत्तरेस गोदावरीच्या खोऱ्यापासून दक्षिणेस नीरेच्या खोऱ्यापर्यंत आणि कोकणात उत्तरेस कल्याणपासून ते दक्षिणेस चौलापर्यंत शाहाजीराजांची सत्ता होती.

त्यांची कोकण किनारपट्टीवरील अत्यंत महत्वाच्या अशा "कल्याण" व "चौल" प्रांतांवर देखील सत्ता होती. येथील प्रबळ अशा पोर्तुगीजांशी त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते.

पुढे शाहाजीराजे आदिलशाहीत रुजू झाल्यानंतर, इ.स. १६३७ ते १६४० या काळात आदिलशाही सरदार रनदौलाखानाच्या नेतृत्वाखाली दक्षिण भारतात काढलेल्या मोहिमांमध्ये शाहाजीराजांनी फार मोठा पराक्रम गाजविला.
याचे 'शिवभारत' मध्ये सुरेख वर्णन केलेले आहे, "बिंदूंपुरचा राजा वीरभद्र, वृषपट्टणचा राजा केंगनायक, कावेरीपट्टणचा जगदेव, श्रीरंगपट्टणचा कंठीरव, तंजावरचा विजयराघव, तंजीचा वेंकटनायक, मदुरेचा त्रिमलनायक, पिलगोंड्याचा वेंकटप्पा, विजयनगरचा श्रीरंगराज, हंसकुटचा तम्मगौडा यांना व इतरही राजांना शाहाजीने आपल्या पराक्रमाने ताब्यात आणून सेनापती रनदौलाखानास संतुष्ट केले."

दक्षिण भारतातील या राजांची सत्ता समुद्रकिनारपट्टीवर होती. पुढेही अशा शाह्यांशी शाहाजीराजांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. त्यामुळेच पुढे दक्षिण भारतातील या प्रांतांमध्ये मराठ्यांची सत्ता निर्माण होऊ शकली.

अशा 'फर्जंद' 'सरलष्कर' 'महाबाहू' शाहाजीराजांचा १६ मार्च हा जन्मदिन. शाहाजीराजे यांनी केलेल्या मर्दुमकीमुळे तत्कालीन भारतीय राजकारणात शाहाजीराजांचे फार मोठे नावलौकिक होते. मराठ्यांच्या साम्राज्याच्या पायाभरणीचे काम करणाऱ्या या थोर महापुरुषास त्रिवार वंदन......

- अनिकेत यादव

Friday 19 April 2019

वणी- दिंडोरीची लढाई

वणी- दिंडोरीची लढाई

दि. ५ ऑक्टोबरच्या दुपारी महाराजांनी सुरत सोडली. जाताना त्यांनी मुख्य मोगली अधिकारी व प्रमुख व्यापाऱ्यांकडे पत्र पाठवून दरसाल १२ लाख रुपये होन न द्याल तर पुन्हा पुढील वर्षी येऊन शहराचा राहिलेला भाग जाळून टाकीन असा इशारा दिला. सुरतेहून महाराज पेठ-बालगण मार्गे मुल्हेरकडे निघाले. यावेळी मुअज्जम - दिलेरखान वाद मिटला होता. मुअज्जम औरंगाबादला येऊन पोहोचला होता. त्याच्या कानावर सुरत लुटीची बातमी गेली आणी तो धास्तावालाच कारण हि सुरत लुटीची दुसरी वेळ होती. तेव्हा त्याने दाऊदखानला महाराजांचा मोड करण्याची कामगिरी सोपविली त्याच्या सोबत राव भाऊसिंग हाडा हाही आला. औरंगाबादेहून दाऊदखान लगेच महाराजांना रोखण्यासाठी पुढे निघाला.

पण महराजांचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक आणि त्यांच्या असंख्य डोळे असलेले त्यांचे हेर यांनी मोगल पाठीवर आहे हि बातमी मुल्हेरलाच राजेंना आणून दिली. जशा राजेंना पक्क्या बातम्या येत होत्या तशाच त्या दाऊदखानला हि जात होत्याच. मध्यरात्री सुमारे बारा वाजता दाऊदखानला खबर मिळाली की 'कंचन-मंचनचा घाट पार करून महाराज त्वरेने गुल्शनाबाद (नाशिक) च्या वाटेला लागले आहेत. त्यांचे काही सैन्य घाटमाथ्यावर जमलेले असून ते मागाहून येत असलेल्या आपल्या सैन्याची वाट पाहत उभे आहे'

हे वृत्त कळताच दाऊदखान तडक स्वार झाला. तो एवढा उतावीळ झाला होता की, त्याच्यासोबत असलेले स्वार त्याच्या मागोमाग जाऊही शकली नाही हि रात्र कार्तिक शुद्ध त्रयोदशीची होती. रात्र सरताना अंधार झाला त्यामुळे दाउदखानचे सैनिक वाट चुकले. नाइलाजास्तव सुर्योदयापर्यंत थांबावे लागले. दाऊदखानने आपल्याला गाठल्याचे राजेंच्या लक्षात आले. ताबडतोब मराठी सैन्य युद्धार्थ सज्ज झाले.

सूर्योदय झाला मराठी सैन्य घाटमाथा चढू लागले. इख्लासखान मियाना आघाडीवर होता. तो घाटमाथ्यावर पोहोचला आणि समोर पाहतो तो मराठे युद्धाचा पवित्र घेऊन शस्त्रे परजीत उभे असलेले त्याला दिसले. इख्लासने बेधडक मराठ्यांवर चाल केले आणि पहिल्याच तडाख्यात जखमी होऊन तो जमिनीवर कोसळला एवढ्यात दाऊदखान तेथे पोहोचला. त्याने ताबडतोब राय मकरंद खत्री, शेख सफी, मान पुरोहित, संग्रामखान यांना इख्लासच्या मदतीस पाठविले. विलक्षण त्वेषाने हे सरदार मराठ्यांवर तुटून पडले. पण मराठ्यांचा जोर जबरदस्त होता. मोगलांचे अनेक शाही सैनिक मोठे सरदार यात ठार झाले. मराठ्यांचा प्रचंड जोर पाहून त्यांना मागे रेटण्यासाठी अखेर राय मकरंद व भान पुरोहित यांनी तोफा डागायला सुरवात केली. पण मराठे त्यांची तमा बाळगीत नव्हते. तोफांच्या माऱ्यामुळे पन्नास मराठे ठार झाले. पण तोवर मोगलांचे नुकसान हजारोंच्या संख्येत होते.

मीर अब्दुल माबुदची, घाटमाथ्यावरील चढ-उतारांमुळे मुख्य सैन्यापासून ताटातूट झाली त्यामुळे आपल्या पुत्रांसह व थोड्या सैनिकांसह त्याने एका गुहेचा आश्रय घेतला. मराठ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले तेव्हा त्यांनी गुहेवर हल्ला चढविला. मीर अब्दुल, त्याचा एक मुलगा व काही सैनिक जखमी झाले. एका पुत्रास तर मराठ्यांनी यमसदन दाखविले, मीर अब्दुलची शस्त्रे, घोडे, व झेंडा हिसकावून मराठे निघून गेले.

राजा खासा घोड्यावर बैसून, बख्तर घुगी घालून, हाती पेटे चढवून मालमत्ता, घोडे, पाईचे लोक पुढे रवाना करून आपण दहा हाजर स्वारांनिशी सडे सडे राऊत उभे राहिले. वणी-दिंडोरी म्हणवून शहर आहे ते जागा उभे राहून सुभ्याचे लोक आले त्याशी घोरांदार युद्ध केले. प्रतापराव सरनौबत व व्यंकोजी दत्तो व आनंदराव वरकड सरदार पुढे होऊन मोठी कत्तल केलो. आणि मोगल मुरदे पाडिले . दोन प्रहर युद्ध जाले. मराठे यांणी शर्त केली. तीन हजार मोगल मारिले. तीन चार हजार घोडे पाडव केले. दोन वजीर मोगलाई सापडले. असे फत्ते करून आले.

मराठ्यांनी एक हत्ती पाडाव करून आणल्याचे जेधे शकवालीत नोंदलेले आहे.

इतिहासात वणी- दिंडोरीची म्हणून प्रसिद्ध असलेली. पण प्रत्यक्षात कंचन-मंचन घाटमाथ्यावर झालेली हि लढाई शके १५९२, साधारण नाम संवत्सराची कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर १६७० रोजी झाली.
संदर्भ - शककर्ते शिवराय

☀ दिंडोरी युद्ध आढावा…☀

दिंडोरी युद्ध आढावा…
शिवाजी राजेंच्या सुरतेवरील छाप्यामुळे मुअज्जम जागा झाला. त्याने लगेच दाऊदखान कुरेशीला शिवाजी महाराज राजगडावर पोहोचायच्या आधी त्याला अडविण्याचा आदेश दिला. दाऊदखान बऱ्हाणपुरहून निघाला व १६ ऑक्टोबर १६७० ला रात्री नऊ च्या सुमारास चांदवडला पोहोचला. तिथे त्याला पक्की बातमी मिळाली की शिवाजी महाराज चांदवडची रांग कंचना - मंचना घळीतून पार करणार आहेत.
शिवाजी महाराजांनी रात्री छावणी न टाकता अंधारातच चांदवड रांग ओलांडून नाशिककडे कूच केले. दाऊदखानला ही बातमी मध्यरात्रीनंतर कळली. तो लगेच तिथून निघाला व चादवडपासून साधारण १६ किमीवर असलेल्या कंचना घळीत पोहोचला. शिवाजीराजेंना दाऊदखानच्या हलचालींबद्दल सगळी माहिती मिळत होती. त्याने पाच हजार स्वारांनिशी सगळी लूट पुढे पाठवली. उरलेल्या दहा हजार लोकांनिशी तो वणी दिंडोरी जवळ मुघलांची वाट बघत होता. दाऊदखानने इखलासखानला पुढे पाठवल्यामुळे त्या दोघांत अंतर निर्माण झाले. पहाटेच्या सुमारास इखलासखान एका टेकाडावर पोहोचला व त्याला समोर युद्धासाठी तयार असलेले मराठ्यांचे सैन्य दिसले. दाऊदखानसाठी न थांबता त्याने मराठ्यांवर हल्ला केला..
जोरदार हल्ले व प्रतिहल्ले सुरु झाले व थोड्याच वेळात मुघलांची फळी मागे हटू लागली. इखलासखान घायाळ होऊन घोड्यावरुन खाली पडला. तोवर दाऊदखान तिथे पोहोचला व त्याने मुघलांची मोडलेली फळी सावरली. संग्रामखान घोरी नावाचा आणखी एक सरदार घायाळ झाला. दाऊद खानने त्या रणधुमाळीत घुसून इखलास खानला वाचविले पण तोवर मुघल सैन्याची वाताहात झाली होती. मराठ्यांनी जोरदार प्रत्याक्रमण करत मुघलांना टेकाडावरुन खाली ढकलून दिले. तीन हजार मुघल सैनिक मारले गेले. मुघल तोफखान्याचा मुख्य अब्दुल मबूदचा इतरांशी संपर्क तुटला. त्याची दोन मुले मारली गेली. दाऊदखानला माघारी शिवाय पर्याय उरला नाही. तो नाशिकला गेला व एक महिनाभर तिथेच होता. त्यानंतर तो अहमदनगरला गेला. ह्या युद्धात शिवाजी महाराजांनी स्वतः मराठ्यांचे नेतृत्व केले.. मराठे व मुघलांमधील समोरासमोरच्या क्वचितच होणाऱ्या लढायांपैकी ही एक होती.…
महापराक्रमी महाराजाधिराज छत्रपती शिवाजी
महाराजांचा विजय असो !!

Thursday 18 April 2019

आबाजी सोनदेव


आबाजी सोनदेव -
दादाजी कोंडदेवाप्रमाणें शहाजी राज्यांच्या पदरीं असलेल्या सोनोपंत डबीराचा हा मुलगा. हा दादोजी कोंडदेवाच्या तालमीत तयार झालेला होता. याचा भाऊ निळो सोनदेव याला १६४७ त शिवरायांनी आमात्य केलें. इ. स. १६४८ त आबाजींनें कल्याणवर अचानक हल्ला करून तेथील मुल्ला अहमद नांवाच्या सुभेदारास कैद केलें, व कल्याण आणि कल्याणच्या आसपासचे सर्व किल्ले हस्तक करून घेतले. तेव्हां शिवरायांनी खूष होऊन याची फार प्रशंसा केली व त्यास त्यानें जिंकलेल्या मुलुखाचा सुभेदार नेमिलें. मुल्ला अहमदास पकडल्यावेळी आबाजीनें त्याची सुंदर सूनहि हस्तगत केली होती. पण शिवरायांनी तिला सन्मानपूर्वक परत पाठविलें.
रायरी ( रायगड ) ला राजधानीचें स्वरूप आणण्याकरितां सरकारी कामकाजासाठी अवश्य त्या इमारती वगैरे बांधण्याचें काम इ. स. १६६२ त याच्याच देखरेखीखालीं सुरू होऊन १६६४ मध्यें तें संपविण्यांत आलें.
इ. स. १६६६ त ज्या तीन गृहस्थाकडे राज्याचा कुलअखत्यार देऊन शिवाजी अवरंगजेबाच्या दरबारी दिल्लीस गेला त्यांत आबाजी सोनदेव होता. १६७० त मोरोपंत पिंगळे याजबरोबर आबाजी माहुली किल्ला व कल्याण प्रांत सर करून आला. राजारामानें १६९२ मध्यें आबाजीस रायगड घेण्यास पाठविल्याचा उल्लेख रा. खं. त सांपडतो ( ८.४३ )
आबाजीस माधवराव व मेघ:श्यामराव हे दोन मुलगे होते. माधवरावाचा वंश भोरास व मेघ:श्यामरावाचा कोल्हापुरास आहे. आबाजीच्या वंशजाकडे हल्लीं मोठी जहागीर नाहीं. पुष्कळशी इनामी वावडेकराकडे गेली आहे. [ डफचा मराठ्यांचा इतिहास. मराठी रिसायत. किंकेडपारसनिसकृत मराठयांचा इतिहास. केळूसकर-छत्रपति शिवाजी महाराज. सभासद विरचित शिव-छत्रपतीचें चरित्र, राजवाडे खंड ८ वा. बावडेकर घराण्याचा इतिहास महाराष्ट्र-मंडळाची बखर ]

निळो सोनदेव


निळो सोनदेव-

हा हल्लींच्या वावडेकर अमात्य घराण्याचा मूळ पुरुष. याचें मूळ गांव ठाणें जिल्ह्यांत कल्याणजवळ होतें. याचा आजा नारोपंत हा मावळांत खेडेवारें येथें ठकारांच्या घरी लहानाचा मोठा झाला. त्यानें मालोजीच्या पदरी नोकरी करून लौकिक संपादिला. त्याचा पुत्र सोनोपंत, हा शहाजीचा पदरी असून कर्नाटकांत राज्यव्यवस्थेच्या कामीं त्याला उपयोगी पडला. त्याच्याकडे डबिरीचें काम असे. शिवरायांनी पुण्याची जहागीर स्वतंत्रपणे पाहावयास लावण्याच्या वेळी शहाजीनें त्याच्याबरोबर जी विश्वासाची मंडळी दिली तींत हा होता. शिवरायांनी सोनोपंतास तेंच काम सांगितलें होतें. औरंगझेब दक्षिणेचा सुभेदार असतां शिवरायांनी मोंगलांच्या ज्या आगळिकी केल्या होत्या त्याच्या परिमार्जनासाठी त्यानें सोनोपंतास औरंगझेबाच्या दरबारीं अनेकदां पाठविलें होतें व कांहीं दिवस त्याला वकील म्हणूनहि नेमलें होतें. शिवरायांनी पहिल्या मसलतींत व कार्यांत याचा त्याला पुष्कळ उपयोग झाला. हा स. १६४५ त मेल्यावर त्याचा निळोपंत या वडील मुलास शिवरायांनी सचीवगिरी दिली. निळोपंत व त्याचा धाकटा भाऊ आबाजी हे दोघेहि बापाच्या हाताखालीं व शिवरायांनी देखरेखीखालीं तयार झाले होते. कोंकण वगैरे प्रांताची व्यवस्था यानें चांगली लाविल्यामुळें याला मुजुमदारी मिळाली (१६४७). त्याचा भाऊ आबाजी (पहा) पराक्रमी होता; त्यानें कल्याण सुभा घेतला होता (१६४८) व पुढें तर कल्याणपासून थेट गोव्यापर्यंतचा मुलूख हस्तगत केला; तेव्हां त्याला या प्रांताचा सुभेदार नेमण्यांत आलें. पुढे (१६६१) शिवाजीनें स्वराज्याची जी नवीन व्यवस्था ठरविली, तींत निळोपंतानें लढाईवर न जातां मुलकी कारभार पहावा असें ठरविलें; तत्पूर्वी यालाहि पेशव्यांप्रमाणें लढायांवर जावें लागत असे. शिद्दीवरील लढायांत यानें प्रमुख भाग घेतला होता. त्यावेळची राज्याची हिशेबी पद्धत याच्याच हातची आहे. शहाजी मेल्यावर जिजाबाई सती जाती असतां यानेंच तिची समजूत घालून तिला थांबविलें. शिवरायांनी आगर्‍यास गेला असतां त्यानें मागें जें राज्य चालविण्यास कारभारी मंडळ नेमिलें त्यांत निळोपंत होता. याप्रमाणें त्यानें मराठी राज्याची अखेरपर्यंत चांगली सेवा केली व शेवटी स. १६७२ त हा मरण पावला. त्याच्या मागून त्याचा वडील मुलगा नारोपंत हा अमात्याचें काम पाहूं लागला; परंतु तो साधुवृत्तीचा असल्यानें त्याचा धाकटा भाऊ रामचंद्रपंत हाच काम करी. [सभासद; शिवदिग्विजय; वावडेकरांचा इतिहास.]

निळो मोरेश्वर


निळो मोरेश्वर-
हा मोरोपंत पिंगळे पेशवे यांचा पुत्र.शिवरायांच्या पश्चात राजारामास गादीवर बसविण्याच्या कटांत हा सामील असावा अशा समजुतीने छत्रपती संभाजीनें यास कैदेंत ठेविलें होतें. पुढें मोरोपंत वारल्यावर याला कैदेतून काढून छत्रपती संभाजीनें पेशवेपद दिलें (१६८०). नंतर कर्नाटकांतील प्रदेश संभाळण्याच्या कामीं हरजी राजे महाडीक यांच्या मदतीस यास पाठविण्यांत आलें (१६८१). त्या दोघांनीं तिकडे औरंगझेबाच्या हातून आपला गेलेला प्रांत अनेक संकटें सोसून परत मिळविला. मध्यंतरी याचा चुलता केसोपंत यानें याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीचे कान फुंकले; त्यामुळे संभाजीची याच्यावर गैरमर्जी झाली होती; परंतु ती पुढें नाहींशी झाली. छत्रपती संभाजीच्या पश्चात राजारामास जिंजी येथें जे थोड्याशा विश्रांतीनें दिवस काढतां आले, त्यास कारण हरजी व निळोपंत यांचीच तिकडील कामगिरी होय. त्यामुळें राजारामानंहि त्याच्याचकडे पेशवेपद कायम केलें(१६९०). जिंजीस असतांना मोंगलांचा प्रसिद्ध सरदार इस्माईलखान मका हा आपल्या पथकासह याच्यातर्फे राजारामाच्या पदरी होता. शाहूनें सातारा घेतला तरी हा त्याला न मिळतां ताराबाईकडेच राहिला, त्यामुळें शाहूनें त्याच्या भैरव नांवांच्या धाकट्या भावांस पेशवेपद दिलें. थोड्याच दिवसांत निळोपंत हा रांगण्यास मरण पावला(१७०८). [राजाराम व संभाजी यांच्या बखरी; जेधे शकावली.]

अमात्य

अमात्य
हा अष्ट प्रधानांतील एक अधिकारी. याचा हुद्दा पंत प्रधानाच्या खालोखाल असून शिवरायांच्या वेळेला यास बारा हजार होन वार्षिक वेतन होतें. आरंभीं या अधिकार्‍यास मुजमुदार हें फारशी नांव होतें. पण शिवरायांनी पुढें तें बदलून त्यास पंत अमात्य हें संस्कृत नांव दिलें . अमात्य या संस्कृत शब्दाचा वस्तुत: अमा म्हणजे राजाच्या सन्निध रहातो तो एवढाच आहे. अमात्य यांनीं सर्व राज्यांतील जमाखर्चावर देखरेख ठेवावी, राज्यांतील दफ्तरदार व फडणीस त्यांच्याच स्वाधीन राहतील, खालून जे हिशोब येतील ते त्यांनीं तपासून पहात जावे, फडनिसी व चिटनिसी पत्रांवर त्यांनीं आपलें निशाण करावें व युद्धप्रसंग करून प्रांत स्वाधीन होईल त्याचें रक्षण करावें, अशी शिवाजीनें आपल्या जाबत्यांत अमात्याचीं कामें सांगितलीं आहेत आरंभीं बाळकृष्णपंत हणमंते हा शहाजीचा कारकून शिवरायांच्या अमात्य म्हणून होता. इ. स. १६४७ च्या सुमारास तें काम शिवरायांनी सोनोपंत डबीर याचा पुत्र निळो सोनदेव यास सांगितलें. शिवरायांनी राज्याची हिशोबी पद्धत निळोपंताच्या हातची आहे. १६७२ त निळो सोनदेव मरण पावल्यावर तें काम त्याचा पुत्र नारोपंत याजकडे आलें. पण नारोपंत हा स्वत: साधुवृत्तीचा असल्यामुळें कच्चें काम त्याचा भाऊ रामचंद्रपंतच पहात असे. छत्रपती संभाजीच्या कारकीर्दींत रामचंद्रपंत हाच अमात्यपदावर होता. राजारामाच्या वेळीं जिंजीस घालमेली झाल्या त्यांत रामचंद्रपंतास ‘हुकमत पुन्हा’ हा हुद्दा मिळून अमात्यपद जनार्दन रघुनाथ हणमंते यांजकडे आलें. पुढें रामचंद्रपंत कोल्हापुराकडे कायमचा राहिल्यामुळें शाहूनें अमात्याची जागा अंबूराव नामक स्वत:च्या उपयोगी पडलेल्या एका हणमंते घराण्यांतील इसमास दिली. तथापि अमात्याचें काम वस्तुत: बाळाजी विश्वनाथ हाच पहात होता. पेशव्यांच्या अमदानींत अष्टप्रधानांचें महत्त्व कमी होऊन अमात्याचें पद केवळ नामधारी होऊन बसलें.
[ मराठी रिसायत; इतिहास आणि ऐतिहासिक; राजवाडे खंड ८; बावडेकर घराण्याचा इतिहास. ]

हणमंते, रघुनाथ नारायण-


हणमंते, रघुनाथ नारायण-
शहाजी व शिवरायांच्या यांच्या वेळचा एक स्वामिनिषठ मुत्सद्दी. हणमंते भोंसल्याचें पिढीजाद नोकर असून, रघुनाथ नारायण यास शहाजीनें आपल्या कर्नाटकांतील जहागिरीचा इ. स. १६५३ मध्यें दिवाण नेमिलें. त्याप्रमाणें तें काम त्यानें मरेतोंपर्यंत केलें. व्यंकोजीच्या अयोग्य वर्तनास कंटाळून मध्यंतरी हा शिवरायांकडे आला होता व यानेंच शिवरायांना कर्नाटकावर स्वारी करून येण्याबद्दल प्रोत्साहन दिलें होते. ह्या स्वारीमध्यें रघुनाथ नारायण हणमंते याचें शिवरायास अप्रतिम साहाय्य झालें, म्हणून त्यानें त्यासच नवीन जिंकलेल्या सर्व प्रांतावर आपल्या वतीनें मुख्य, कारभारी नेमिलें; आणि त्याचे बंधु जनार्दनपंत हणमंते यांस पंतसुमंत हा अधिकार देऊन त्यांची आपल्या अष्टप्रधानांमध्यें योजना केली.
शिवरायांच्या सांगण्यावरून रघुनाथपंतानें 'राजव्यवहार कोश, रचिला. शिवरायांच्या मृत्यूनंतर सर्वत्र अव्यवस्था व गोंधळ माजला, त्यावेळीं रघुनाथपंतानें आपल्या वजनानें व दरा-याने, संभाजीच्या कारकीर्दीत देखील तिकडील प्रांतांचा उत्तम बंदोबस्त करून व सुरळीत रीतीनें वसूल करून पुष्कळ द्रव्य खजिन्यांत शिल्लक ठेविलें. रघुनाथपंत हणमंते संभाजी राजाचा निरोप घेऊन कर्नाटकामध्यें परत येण्यास निघाला; परंतु वाटतें चंदी मुक्कामीं पोंचण्यापूर्वीच त्याचा मध्येंच शेवट झाला(१६८२) राजारामाच्या कारकिर्दीत रघुनाथपंताचा भाऊ जनार्दनपंत याजकडे अमात्यपद होतें. यांचें वंशज तंजावरकडे असावेत. रघुनाथपंत ह्याच्या शहाणपणाचा लौकिक कर्नाटक प्रांतीं अद्यापि देखील ऐकू येतो.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...