विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा). Show all posts
Showing posts with label शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा). Show all posts

Monday, 6 June 2022

शिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले

 

शिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले

-महावीर सांगलीकर


उत्तर कोकण, दक्षिण कोकण, कोल्हापूर, गोवा, कारवार या भागावर शिलाहार घराण्यातील विविध शाखांनी अनेक शतके राज्य केले. या शिलाहारांचे मूळ स्थान आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे होते. हे शिलाहार नागवंशी, कन्नड-मराठी असे द्विभाषिक आणि धर्माने मुख्यत्वे जैन व शैव होते. मराठ्यांच्या आजच्या कुळ्यापैकी शेलार आणि सावंत या शिलाहार घराण्याशी संबंधीत आहेत, त्यामुळे शिलाहार हे मराठाही होते. या राजांची कुळदेवी कोल्हापूरची अंबाबाई, जी त्या काळात पद्मावती देवी म्हणून ओळखली जात असे, होती.

शिलाहारांच्या विविध शाखांपैकी कोल्हापूरचे शिलाहार घराणे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचे मानले पाहिजे. या घराण्याने इसवी सन ९४० ते १२१२ एवढ्या काळात राज्य केले. या घराण्यात एकूण १६ राजे सिंहासनावर बसले. त्यातील शेवटचा राजा भोज दुसरा हा होता.

त्याने ११७५ ते १२१२ या काळात राज्य केले. तो महापराक्रमी आणि धार्मिक होता. त्याने आपल्या हयातीत एकूण १५ किल्ले बांधले. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे असलेले अनेक किल्ले राजा भोज २रा याने बांधलेले आहेत. पुढे या किल्ल्यांचा उपयोग यादव राजांना, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी यांना झाला.

राजा भोज दुसरा याने डोंगरावरील किल्ल्याबरोबरच एक सागरी किल्लाही बांधला. राष्ट्रकुटांसारखेच शिलाहार राजांकडेही त्यांचे स्वत:चे आरमार होते.

येथे मी या राजाने बांधलेल्या कांही महत्वाच्या किल्ल्यांची ओझरती ओळख करून देत आहे.

पन्हाळा किल्ला: राजा भोज दुसरा याने बांधलेल्या किल्ल्यांमध्ये पन्हाळा हा किल्ला सगळ्यात महत्वाचा आहे. हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येला २० किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला इसवी सन ११७८ ते १२०९ या कालावधीत बांधण्यात आला. सामरिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी असलेला हा किल्ला ११९१ पासून राजा भोज दुसरा याची राजधानी बनला. समुद्रसपाटी पासून सुमारे ८५० मीटर उंच असणारा हा किल्ला दक्खनवरील सगळ्यात मोठा किल्ला आहे. इसवी सन १२१० मध्ये देवगिरीचा बलाढ्य यादव राजा सिंघण याने राजा भोज दुसरा याचा पराभव करून हा किल्ला ताब्यात घेतला.
अजिंक्यतारा: साता-याचा अजिंक्यतारा हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे एक हजार मीटर उंच आहे. हा किल्ला शिलाहार राजा दुसरा भोज याने इसवी सन ११९० मध्ये बांधला. पुढे या किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना फारच उपयोग झाला.


कल्याणगड उर्फ नांदगिरी:
हा किल्ला साता-यापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे. हा समुद्रसपाटी पासून सुमारे १०५० मीटर उंच आहे. राजा भोज दुसरा याने बांधलेल्या १५ किल्ल्यांपैकी हा एक आहे. या किल्ल्यावर एक जैन गुफा असून गुफेत पाण्याचे तळे आणि एक शिलाहारकालीन जैन मूर्ती आहे.

विजयदुर्ग: विजयदुर्ग हा शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधलेला समुद्री किल्ला आहे. हा किल्ला देवगड तालुक्याच्या किना-यावर आहे. या किल्ल्यापासून पुढील समुद्रात दहा मीटर खोलीवर १२२ मीटर लांब, सात मीटर जाड व तीन मीटर उंचीची दगडी भिंत आहे. शत्रूची जहाजे या भिंतीला थडकून फुटावीत यासाठी ही भिंत बांधण्यात आली होती.

याशिवाय या राजाने बांधलेले आणखी कांही किल्ले म्हणजे सज्जनगड, विशालगड, रांगणा, भुदरगड, पांडवगड, चंदन-वंदन, वासोटा वगैरे.

पूर्वी राजा भोज दुसरा याचा फारसा उल्लेख होत नसे, पण विजय दुर्ग या किल्ल्याला इ.स. २००६ मध्ये ८०० वर्षे पूर्ण झाल्यापासून या राजाची कांही प्रमाणात दखल घेतली जावू लागली आहे.

Sunday, 5 June 2022

शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा)


 शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा)

 पोस्तसांभार ::  https://vishwakosh.marathi.gov.in/28233/

भोज, दुसरा शिलाहार : (कार. सु. ११७५ – १२१२ ?). महाराष्ट्रातील शिलाहार या मध्ययुगीन वंशातील कोल्हापूर शाखेतील शेवटचा शूर राजा. त्याच्या जन्ममृत्यूंच्या सनांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. विजयादित्य राजाच्या रत्ना या राणीपासून झालेला मुलगा दुसरा भोज या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. तो पित्याच्या मृत्यूनंतर कोल्हापूरच्या शिलाहारांच्या गादीवर आला (११७५). त्याच्या सुरुवातीच्या लेखांत ‘महामंडलेश्वर’ अशी मांडलिकपदनिदर्शक पदवी आढळते. पुढे त्याच्या पराक्रमामुळे त्यास ‘वीरभोज’ असे नाव प्राप्त झाले आणि त्याने आपले स्वातंत्र्यही उद्‌घोषित केले होते. त्याचा आश्रित सोमेश्वर (सोमदेव) मुनी याने लिहिलेल्या जैनेंद्रव्याकरणावरील शब्दार्णवचन्द्रिका या टीकात्मक ग्रंथात भोज राजाचा राजाधिराज, परमभट्टारक, पश्चिमचक्रवर्ती, परमेश्वर अशा सम्राटपददर्शक पदव्यांनी उल्लेख केलेला आढळतो. त्याच्या कारकीर्दीत कोल्हापूर, वळवडे व पन्हाळा यांचा ऋतुमानानुसार राजधान्या म्हणून उपयोग केला जात असावा कारण त्यांचा ११७९ ते १२॰५ पर्यंतच्या शिलालेखांत उल्लेख आढळतो.

भोज राजाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले, तेव्हा चालुक्य (कल्याणी) साम्राज्य मोडकळीस आले होते आणि देवगिरीच्या यादवांची सत्ता दृढ होत होती. यादव राजा ⇨सिंघण (कार. १२००-१२४६) यास भोज राजाचे स्वातंत्र्य मान्य होणे शक्य नव्हते. त्याने भोज राजावर चढाई केली. खिद्रापूरजवळ कृष्णवेणी आणि कुवेणी या नद्यांच्या संगमाजवळ भोज आणि सिंघण यांच्यात धनधोर युद्ध झाले. या युद्धात बन्नेस हा भोजाचा सेनापती मोठ्या शौर्याने लढत असता धारातीर्थी पडल्याचा उल्लेख शिलालेखात आढळतो. सिंघणने पुढे प्रणालक किल्ल्याला (पन्हाळगड) वेढा धालून तो काबीज केला व भोज राजास तेथेच बंदिवासात ठेवले आणि कोल्हापूरच्या शिलाहारांचे राज्य खालसा केले. भोजाचे पुढे काय झाले, याविषयी माहिती उपलब्ध नाही.

भोज राजास गंडरादित्य नावाचा एक मुलगा होता, असे कशेळी ताम्रपटावरून ज्ञात होते परंतु त्याची अधिक माहिती मिळू शकत नाही. भोजानंतर शिलाहार राजांचे लेख आढळत नाहीत. त्यांवरून शिलाहारांच्या कोल्हापूर शाखेचा भोज हाच शेवटचा पराक्रमी राजा असावा, हे निश्चित.

भोजाच्या कारकीर्दीतील अनेक शिलालेख सापडले असून त्यांवरून त्याचे कर्तृत्व, दातृत्व, शौर्य, नीतिनैपुण्य आदींसंबंधी माहिती मिळते. त्याने विद्या व कला यांना उदार आश्रय दिला होता. हिंदू आणि जैन मंदिरांनाही देणग्या दिल्याचा निर्देश त्याच्या शिलालेखांत आढळतो. आपल्या पूर्वजांप्रमाणे हा वैदिक व पौराणिक धर्माचा अनुयायी होता. ताम्रपटांत तो आपणास कोल्हापूरच्या श्रीमहालक्ष्मीचा वरप्रसाद प्राप्त झाल्याचे सांगतो. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या त्रिकाल नैवैद्याच्या व्यवस्थेसाठी कोप्परवाड या गावाची जमीन इ. स. ११९० मध्ये इनाम दिल्याचा उल्लेख आहे. त्याने विद्वान ब्राह्मणांच्या भोजनाकरिता भूमिदाने केली होती. त्याचा जैन धर्मासही आश्रय असावा. त्याच्या दुर्दैवी पराजयामुळे खिद्रापूरचे कोप्पेश्वरनामक अत्यंत सुंदर शिवमंदिर अपूर्ण राहिले आहे.


संदर्भ : १. अळतेकर, अ. स. शिलाहारांचा इतिहास, मुंबई, १९३५.

२. मिराशी, वा. वि. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, नागपूर, १९७४.

शेख, रुक्साना

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...