विनोद जाधव एक संग्राहक

Monday 28 November 2022

महाराष्ट्रावर शकांचे राज्य

 

महाराष्ट्रावर शकांचे राज्य

आपण काही गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या म्हणजे प्राचीन भारत हा आज जसा आपल्याला माहित आहे तसा नव्हता. भारत हे नाव, हिंदू तसेच इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शिख हे सगठित धर्म म्हणून अस्तितवात नव्हते. प्राचीन इतिहास समजून घेतांना या गोष्टी लक्षात ठेवल्या की इतिहास समजायला सोपा जातो.
आता तुमचा पहिला प्रश्न की शक कोण होते? कुठुन आले होते?
शक ही मध्य आशियातील (इराण) एक भटकी जमात होती. ते स्वतःला श्कूदत म्हणत, शक भाषेत याचा अर्थ धनुर्धारी असा होतो. शक अतिशय तरबेज असे धनुर्धारी होते. विषारी आणि काटेरी बाणांचा उपयोग सर्वप्रथम यांनी केला. ग्रीक लोकं यांना स्कायताई म्हणायचे, इंग्लिशमध्ये यांना स्किथीयन तर संस्कतमध्ये यांना शक म्हणत. दळणवळणासाठी घोडे हे त्यांचे प्रमुख साधन होते.
भारताचा उत्तर पश्चिम भाग (वायव्य) जेथून भारतात सर्वाधिक आक्रमणं झाली.हा खुष्कीचा मार्ग असल्याने ग्रीस, इराण, तुर्की, अफगाण, मध्यपूर्व या भागातील टोळ्या यामार्गाने वेळोवेळी भारताच्या उत्तर पश्चिम भागात आल्या आणि तिथे स्थिरावल्या. या सर्व टोळ्यांना आपल्या राहत्या भागातून पळ काढावा लागला किंवा युद्धात पराभव झाल्याने आपला राहता भाग सोडावा लागला. कारण या सर्व भागात टोळ्यांचे आपापासात वर्चस्वासाठी युद्ध व्हायचे प्रकार वारंवार होत असत.
मौर्य साम्राज्य लयाला गेल्यानंतर भारताच्या उत्तर पश्चिम भागात मध्य आणि पश्चिम आशियातील लोकांचे राज्य होते. ख्रिस्तपूर्व १८०बीसी ते ५५बीसी या काळात इंडोग्रीक यांचे राज्य या भागात होते. ख्रिस्तपूर्व १ल्या शतकात इंडो स्किथीयन अर्थात शकांनी या भागावर ताबा मिळवला आणि शक साम्राज्याची सुरुवात झाली.
  • मॉइस वा मोगा हा त्यांचा पहिला शासक, तो गांधारचा राजा होता. त्याची राजधानी सिरकप होती (आजचे पंजाब, पाकिस्तान). त्याने आजूबाजुचा इंडोग्रीक परिसर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा यशस्वी झाला नाही. याने पाडलेल्या अनेक नाण्यांवर बौद्ध आणि हिंदू चिन्हं होती. तसेच ग्रीक आणि खरोश्ती भाषेचा वापर केलेला होता.
  • याचाच वंशज चास्तना किंवा चेस्तनने शकांचे राज्य उजैनपर्यंत वाढवले. यालाच पश्चिम क्षत्रप म्हणूनही ओळखले जाते. ख्रिस्ताच्या अंतानंतर ७८व्या शतकापासून शक कालगणना सुरु झाली असावी असा अंदाज आहे. चास्तनाने भद्रमुख म्हणून शक क्षत्रप साम्राज्याची उभारणी केली.
  • शक साम्राज्याची दुसरी शाखा क्षहरता म्हणून ओळखली जाते, जिचा शासक नहापना हा होता. याचाच पुढे सातवाहन राजा गौतमीपुत्र सत्करणीने पराभव केला.
  • रुद्रदमन हा श्रेष्ठ शक शासक म्हणून ओळखला जातो. हा चास्तनाचा नातू होता. याने आपल्या काळात कोकण, नर्मदेचं खोरं, काठियावाड, माळवा आणि गुजरातच्या इतर भागात आपले राज्य वाढवले. काठियावाडमधील सुदर्शन तळ्याची डागडुजी केली. याने हिंदु मुलीशी लग्न केलं आणि तो हिंदु धर्म मानू लागला. संस्कृत भाषेचं संवर्धन करण्यातही याचा सहभाग होता. तो स्वतःला महाक्षत्रप म्हणत असे. आपली मुलगी याने सातवाहन कुळात दिली होती. याच्या काळात ग्रीक लेखक यवनेश्वर भारतात राहिला होता, त्याने यवनजातक या ग्रंथाचे ग्रीकमधून संस्कृतमध्ये भाषांतर केले.
  • कालांतराने सातवाहन राजा गौतमीपुत्र सत्करणी याने शक साम्राज्याचा पराभव केला. ख्रिस्ताच्या अंतानंतर ४थ्या शतकात शक राजा रुद्रसिंह तिसरा याचा चंद्रगुप्त दुसरा याने पराभव केला आणि भारतातील मध्य आणि पश्चिमेतील शक साम्राज्य संपुष्टात आले.
वर सांगितल्याप्रमाणे प्राचीन काळात आजच्यासारखे धर्म संगठित नव्हते. नवीन शासक आपल्या नवीन कल्पना, परंपरा घेऊन यायचे. इथल्या आधीपासून अस्तितवात असलेल्या परंपरा, चालीरीती यात आपल्या चालीरीती परंपरा मिसळून टाकायचे. इथल्या स्थानिक लोकांशी लग्न झाल्याने त्यांची वंशपरपरा नक्कीच सुरु राहिली असेल. पण त्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचं आहे.
पश्चिम आणि मध्य भारतात शकांचे राज्य असल्याने त्यांचा प्रभाव नक्कीच होता. शक कालगणना आपण आजही मानतो. प्राचीन भारतातील ज्योतिष ग्रंथात शक संवतचा उपयोग केलेला आहे. शक संवतलाच शालिवाहन शक म्हणूनही ओळखले जाते.
पोस्त सांभार :वैशाली भिडे


No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...