विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 25 April 2024

मुधोळ संस्थान: मुधोळकर घोरपडे


 मुधोळ संस्थान: मुधोळकर घोरपडे

येथील संस्थानिक घोरपडे हे कौशिक गोत्री क्षत्रिय असून, त्यांचें मूळचें आडनांव भोंसले होय. त्यांच्या एक पूर्वजानें घोरपडीनें किलज सर केल्यानें हें नांव त्यांनां मिळालें . मुधोळकर घोरपडे हे अद्याप घोरपडीस पवित्र मानतात. यांच्यांतील एका पुरुषास २ बायका होत्या, एकीस ७ मुलगे झाले; तिच्या वंशजास सातकस म्हणतात. दुसरीस ९ मुलें झालीं, त्या वंशास नऊकस म्हणतात. मुधोळकराचा मूळ पुरुष चोलराव हा आदिलशाहींत सरदार होता, आदिलशहानें त्याला मुधोळची जहागीर, राजा किताब व मोरचेलाचा मान दिला. मुधोळकर हे सातकसवंशी होत. चोलराव व त्याचा मुलगा नावजी यांची हकीकत सांपडत नाहीं. नावजीचा मुलगा बाजी हा शहाजीराजे भोंसले यांच्या वेळीं प्रसिद्ध होता. शहाजीस पकडण्याचें काम विजापूर दरबारनें आपला सरदार मुस्तफाखान यास सांगितलें. त्यांच्या हाताखालीं बाजी होता. खानानें बाजीस हें काम सांगितलें व बाजीने शहाजीस पकडून विजापूरी पाठविलें. बखरीतून बाजीनें शहाजीस मेजवानीस बोलावून विश्वासघातानें कैद केल्याचा उल्लेख आहे. कांही मंडळीचें म्हणणें त्यानें लढाई करून पकडलें असें आहे. त्यावर शहाजीनें शिवरायास याचें उसनें घेण्यास सांगितलें व त्याप्रमाणें शिवरायांनी पुढें सावंताशीं युद्ध चालू असतां बाजी हा सावंतास मिळून लढाईची तयारी करीत असतां तो बेसावध आहे असें ऐकून, एकदम मुधोळवर चालून जाऊन व छापा घालून त्यानें बाजीस ठार केलें व मुधोळ जाळलें (१६६१). बाजीनंतर त्याचा पुत्र मालोजी गादीवर बसला. बहलोल पठाण यानें आदिलशहास कैदेंत ठेवून विजापूर बळकावलें, तेव्हां शिवरायांनी याच मालोजीस एक महत्त्वाचें पत्र लिहून आदिलशहास सोडून आपल्याकडे येण्यास व आपल्या कार्यास मदत करण्यास, आणि बाजीचा घेतलेला सूड विसरून जाण्यास लिहिलें (सरस्वतीमंदिर वर्ष ५, अं. ५). परंतु मालोजी शिवरायास मिळाला नाहीं. औरंगजेबानें विजापूर घेतल्यावर हा त्याचा नोकर बनला व त्यानें याला मुधोळजहागिरीची सनद पुन्हां करून दिली. याचा पुत्र अकोजी, त्याचा पिराजी व त्याचा मालोजी (दुसरा) होय. या मालोजीनें बहुतेक पेशवाई पाहिली व तींत घडलेल्या बर्याचशा महत्त्वाच्या गोष्टींत यानें भाग घेतला. तो पेशव्यांची चाकरी नियमितपणें करी, त्यामुळें पेशव्यांनीं त्याला आणखी सरंजाम तोडून दिले होते. हैदर-टिप्पू-मोहिमा, वडगांवलढाई, खर्डेलढाई, पुणें-होळकर-लढाई वगैरे लढायांत हा पेशव्यांतर्फे होता. हा १८०५ त वारल्यावर. त्याचा मुलगा नारायणराव गादीवर आला. तो स. १८१६ त निवर्तला. त्याला गोविंद, व्यंकट व लक्ष्मण असे तीन पुत्र होते. पैकीं व्यंकटरावास गादी मिळालीं (हा नारायणरावाच्या थोरल्या बायकोचा होता) व गोविंदरावास (हा धाकटया बायकोचा होता) बापूगोखल्याच्या पथकांत सरदारी मिळाली व तो बापूबरोबरच इंग्रजांशीं लढत असतां अष्टी येथें लढाईंत ठार झाला. लक्ष्मणराव गायकवाडींत नौकरीस गेला. इंग्रजांचा व व्यंकटरावाचा तह होऊन त्यांत २० स्वारांनिशीं इंग्रजांची चाकरी करण्याचें ठरलें व जहागीर त्याच्याकडे कायम झाली. पण १८४८ त या नोकरीऐवजी सालीना २६७२ रुपये खंडणी देण्याचें ठरलें. मध्यंतरी गोविंदरावाचा तोतया निघाला. व्यंकटराव स. १८५६ त वारला, तेव्हां त्याचा पुत्र बळवंतराव हा अज्ञान असल्यानें पो. एजंटी कारभार होऊन संस्थानांत सुधारणा झ्ज्ञाल्या व कर्ज फिरलें. बळवंतरवास स. १८६१ त अधिकार मिळाला, परंतु तो १८६२ त वारला. त्याचा पुत्र (दुसरा) व्यंकटराव त्या वेळीं १ वर्षाचा होता. पुन्हां कारभार एजंटी झाला. त्यावेळीं जमिनीची तरमबंदी, विद्याप्रसार, लोकोपयोगी कामें वगैरे झालीं. व्यंकटरावास १८८२ त अधिकार दिला. त्यांचे चिरंजीव श्री. मालोजीराव (तिसरे) हे सांप्रत येथील गादीवर विद्यमान आहेत.

No comments:

Post a Comment

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...