विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 2 May 2024

छत्रपती शिवाजी महाराज -२०

 


छत्रपती शिवाजी महाराज -२०
--------------------------
जंजीरा अपराजित -
दंड्याचा सुभेदार सिद्दी अंबर याने आदिलशहाच्या विरोधात केलेल्या बंडाचा 1640 नोव्हेंबर मध्ये बिमोड केला. 1642 फेब्रुवारी मध्ये मुस्तफा खानाचा मुलगा असतखान दंडा-राजपुरी जिंकून घेण्यासाठी पुन्हा गेला. बंडखोर सिद्धी फातखानाने बालाघाट मधील काही प्रदेश बळकावले होते. अखेरीस फातखानाला आपला जहागीरदार आणि दंड्याचा राजा म्हणून मान्यता देऊन त्याच्याशी तह केला.
अफजलखानाने शिवाजीराजांवर चाल केली आहे हे समजताच फातखानाने शिवाजी राजांनी आपले जिंकलेले कुलाब्यातील मुलुख परत घेण्यासाठी मोहीम सुरू केली. परंतु अफजलखानाचा फडशा पडला आणि फातखान परत फिरला. पुढील वर्षी आदिलशहाने शिवाजी महाराजांना विरोधात मोहीम उघडली तेव्हा फातखानानेही कोकणात मोहीम उघडली. शिवाजी महाराजांचा सेनापती बाजीराव पासलकर आणि विजापूरचा जहागीरदार काय सावंत दोघे कामी आले. मग रघुनाथ बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली राजांनी फौज पाठवून सिद्धीचा पराभव केला व तळे घोसाळे तसेच दीर्घ वेढा घालून दंड्याचा किल्लाही जिंकून घेतला. परंतु जंजिऱ्याच्या मोहिमेत अपयश आले. विजापूरहून मदत मिळत नाही असे पाहून सिद्धीने दंडाराज पुरी राजांच्या ताब्यात देऊन तह केला.
जंजिऱ्या भोवतालचा सर्व मुलुख शिवाजी राजांच्या ताब्यात असल्याने सिद्धी कायमच कुरापती काढत असे आणि भोवतालचा मुलुख ताब्यात घेत असे. व्यंकोजी दत्तो यांना कायमस्वरूपी फौज देऊन मुख्य मुलखातून सिद्धीला हाकले आणि दंडा- राजपुरी इथे गड बांधून बेरवडी, लिंगाणा अशी गडांची साखळी तयार केली.
सिद्धी विरोधात लढण्यासाठी शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी आणि पेण इथे गलबते बांधून रुय लिटाओ व्हिगास याला आरमारी तांड्याचे प्रमुख नेमले. तथापि पोर्तुगीज मात्र या दांड्याला समुद्रात जाण्याकरिता परवानगी नाकारित असत. शिवाजी महाराजांच्या ताब्यात 7 00 उत्तम जहाजे असल्याचे शकावलीत सांगितले असले तरी इंग्रजांनी मात्र 160 जहाजे मराठा आरमाराकडे असल्याचे म्हटले आहे. इंग्रजांनी हेही नमूद केले आहे की इराण बसरा मोच्छा इत्यादी ठिकाणी व्यापारासाठी आपल्या बंदरांचा मराठ्यांनी वापर करून व्यापारी जहाजे पाठवली आहेत. परंतु ही जहाजे अद्यावत नसल्यामुळे खूप नुकसान होत असे. 26 जून 64 रोजी लढाऊ गलबते भटकळला पाठवून तिकडे लूट केली असल्याचे इंग्रजांनी नमूद केले आहे. तसेच फेब्रुवारी 1665 मध्ये 85 युद्धनौका आणि तीन मोठ्या जहाजामधून त्यांचं लष्कर बसनूरला रवाना झालं आणि त्यांनी कानडी मुलखात लूट केली असेही नमूद केले आहे. त्याचप्रमाणे सुरत हून मक्केला जाणारी मुघलांची जहाजेही मराठे लुटत असत.
शिवाजी राजांनी 1669 मध्ये जंजिऱ्यावर पुन्हा एकदा हल्ला केला. सोळाशे 70 मध्ये महाराजांनी जंजिरा हस्तगत करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली. अखेरीस फातखनाने मोठी रक्कम आणि समृद्ध जहागीर घेऊन जंजिरा राजांना देण्याची तयारी दाखवली. परंतु इतर तीन सिद्दींनी फातखानाला तुरुंगात टाकून सत्ता हस्तगत केली व आदिलशाही आणि मुघलांकडे मदत मागितली. मुघलांनी ती लगेच मान्य केली. सिद्धी संभळला मनसब देऊन तीन लाख रुपये महसुलाची जाहीर दिली तसेच सिद्दी कासिम व सिद्दी खैरीयत यांना जंजिरा व जमिनीवर अधिकार देण्यात आले. आरमार प्रमुखाला याकूतखान हा किताब दिला.
शूर आणि हुशार सिद्दी काशीमने फेब्रुवारी 1671 मध्ये मराठी होळीच्या सणात दंग असताना गुप्तपणे 40 जहाजाने व सिद्धी खैरीयत याच्यासोबत 500 सैन्याने हल्ला करून दंडा किल्ला ताब्यात घेतला. शिवाजी महाराज बागलांच्या मुलखात सैन्य गुंतलेले असल्याने काही करू शकले नाहीत. त्याचा फायदा घेऊन सिद्धीने आणखी सात किल्ले जिंकून घेतले. मराठे आणि क्रूर सिद्दी यांचे शत्रुत्व कायमच राहिले. यात सामान्य जनता कायमच भरडली गेली.
औरंगजेबाने 1672 मध्ये सुरतेवरून 36 लहान मोठ्या जहाजांचा तांडा पाठवला. आता सिद्दीने राजांची सर्व बंदरे आणि शहरे लुटून नष्ट केली व 500 व्यापारी जहाजे पकडून बुडवली. परत एकदा 1673 च्या मे मध्ये सुरतेहून मुघल आरमारी तांडा घेऊन सिद्धी संभळ दंडा राजपुरीला गेला व किनारपट्टीवर धुमाकूळ घालून चाचेगिरी केली. मराठ्यांची अनेक व्यापारी जहाजे व युद्धनौकाही ताब्यात घेतल्या. आसपासची मराठी खेडी लुटून उध्वस्त केली.
एकदा मात्र अशी लुटमार सुरू असताना राजगडावरून आलेल्या मराठ्यांच्या सैनिकांनी सिद्धीच्या सैनिकांना पकडून कापून काढले आणि त्यांच्या प्रमुखांची डोकी शिवाजी राजांकडे पाठवून दिली.
अखेरीस सततच्या युद्धाने कंटाळलेल्या सिद्धीने 1674 च्या फेब्रुवारी इंग्रजांना तह घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनंती केली. तथापि पुढील महिन्यातच सिद्दी संबळने आरमार प्रमुख दौलत खानावर सातवळी नदीत हल्ला केला. त्यात सिद्दीचा पराजय झाला. राजपुरी पासून गोव्याच्या बारदेश पर्यंतचा सर्व भाग मराठ्यांच्या ताब्यात आला तथापि दंडा किल्ला घेऊ शकले नाही.
1675 मध्ये सिद्दीने वेंगुर्ल्यावर हल्ला करून शहर लुटले व जाळून टाकले. महाराजांच्या फौजा तिथे पोहोचेपर्यंत सिद्दी जंजिऱ्याला पळाला आणि जंजिऱ्या ला मराठ्यांनी घातलेला वेढा उठवला.
एप्रिल 1676 मध्ये सिद्दी संबळला आरमार प्रमुख पदावरून कमी करून सुभेदार सिद्दी कासिम कडे ते पद दिले. तरीही सिद्धी संबळकडे मुघलांचे आरमार होते. ते घेऊन त्याने ऑक्टोबर मध्ये जैतापूर बेचिराख केले.
1676 ऑगस्टमध्ये शिवाजी महाराजांनी मोरोपंत आणि आरमाराने पुन्हा एकदा मोठ्या तयारीनिशी जंजिऱ्याला वेढा घातला होता. सिद्दी कासिम आपले आरमार घेऊन आला आणि मराठ्यांच्या तोफा बुडवून टाकल्या. त्यामुळे मराठ्यांना डिसेंबर अखेरीस जंजिऱ्याचा हाही वेढा उठवावा लागला.
1677 च्या सुरुवातीला बादशहाचे सैन्य कासिम कडे सोपवावे अशी ताकीद दिल्लीवरून येऊनही संबळने तो आदेश मानला नाही. ऑक्टोबर मध्ये कासिम आणि संबळ यांचे नौदल समोरासमोर आले आणि युद्ध झाले. तथापि इंग्रजांनी मध्यस्थी करून ऑक्टोबर मध्ये हे भांडण मिटवले व कासिमला नौदल प्रमुख ठेवले. त्यामुळे सिद्धी संबळ शिवाजीराजांकडे आपल्या कुटुंबासह व मित्रांसह सेवेत आला. त्याचा अत्यंत पराक्रमी पुतण्या सिद्धी मिस्त्री हा ही मराठ्यांच्या आश्रयाला आला.
नोव्हेंबर 1677 - मार्च 78 कासिमने कोकण किनारपट्टीवर मराठी मुलखात शिरून धुमाकूळ घालत होता. अलिबाग किनारपट्टीवर लूट केली. तर 1680 घ्या फेब्रुवारी त्याने पेण नदीकाठी ची अनेक खेडी जाळली आणि हजारो लोकांना पकडून नेले.
कासिमचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी सेनाधिकारी दौलत खानाला आणि दर्यासारंगाला जुलै 1678 मध्ये 400 लोकांसह पनवेलला पाठवले. परंतु पोर्तुगीजांनी अडवल्यामुळे आणि पावसामुळे त्यांना काही करता आले नाही. ऑक्टोबर मध्ये दौलत खानाला पूर्वीपेक्षाही मोठे लष्कर आणि प्रचंड तोफांसह जंजिऱ्यावर मारा करण्यासाठी पाठवले. परंतु मोहीम यशस्वी झाली नाही. मार्चमध्ये शिवरायांनी इंग्रजांशी एक करार केला की सिद्दीन उदासीन राहण्याचे मान्य करेपर्यंत त्याच्या आरमाराला मुंबईत प्रवेश करू देऊ नये. इंग्रजांनी ते मान्य केले व शिवाजी राजे हयात असेपर्यंत हा करार टिकला.
जंजिऱ्यावर कब्जा करणे अशक्य असल्याचे दिसताच शिवरायांनी खांदेरी बेटावर आपला तळ उभा करण्याचे निश्चित केले. याला सिद्दी आणि इंग्रज दोन्ही आरमारांनी विरोध केला. ऑगस्ट 1679 मध्ये परत एकदा खांदेरीला तटबंदी करण्याचे काम हाती घेतले. अंधेरी मुंबई अंतर्गत येत असल्यामुळे त्या बेटावर आमची मालकी आहे त्यामुळे मराठ्यांनी तेथून निघून जावे असे मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नर ने कळवले. मराठ्यांनी ते नाकारले आणि बेटावर कब्जा केला. इंग्रज व मराठे यांच्यातील पहिली आरमारी चकमक 19 सप्टेंबर रोजी घडली. लेफ्टनंट थॉर्पने शिबाडांच्या साह्याने हल्ला करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मराठ्यांनी तुफान मधून इंग्रजांवर हल्ले केले. ठार झाला व अनेक इंग्रजांना मराठ्यांनी बेटावर कैद करून ठेवले. 25 ऑक्टोबरला इंग्रजांनी सन्मानाने माघार घेण्याचा निर्णय घेऊन मध्यस्थ मार्फत प्रकरण मिटवावे असा निर्णय घेतला. तोपर्यंत शिवाजीराजांनी आपले 4000 सैन्य मुंबई त पाठवले. परंतु पोर्तुगीज गव्हर्नर ने त्यांच्या भागातून जाण्यास परवानगी देणे नाकारले म्हणून हे सैन्य पनवेल कडे गेले. सोळाशे 80 च्या जानेवारीत इंग्रजांना खांदेरीतून आपली जहाजे मागे घ्यावी लागली. खांदेरी आता शिवाजी महाराजांच्या कब्जात राहिले.
सिद्धीने खांदेरी पासून एक मैल अंतरावरील उंडेरीवर 300 सैनिक आणि दहा मोठ्या तोफांच्या सहाय्याने कब्जा केला आणि 9 जानेवारी 1680 रोजी त्याला तटबंदी केली. मराठ्यांच्या ताब्यातील खांदेरी आणि सिद्धीच्या ताब्यातील उंदेरी या दोन्ही ठिकाणावरून सतत एकमेकांवर तोफांचा भडीमार होऊ लागला.
अशाप्रकारे जंजिरा शिवरायांच्या हयातीत अपराजित राहिला.
दिलीप गायकवाड.
१९-०४-२०२४.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...