विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 29 January 2019

संभाजी आंग्र्यांची (इंग्रजी चांदी वापरून पाडलेली!) नाणी आणि कॅप्टन ॲन्सेल्मची सॅलरीस्लीप (१७३६ मधली!)

संभाजी आंग्र्यांची (इंग्रजी चांदी वापरून पाडलेली!) नाणी आणि कॅप्टन ॲन्सेल्मची सॅलरीस्लीप (१७३६ मधली!)
लेखक :- संकेत कुलकर्णी (लंडन)
=========================
१८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत ईस्ट इंडीया कंपनीच्या सागरी व्यापाराचे बस्तान चांगलेच बसले होते. व्यापारासाठी कंपनीकडे स्वत:ची जहाजे होतीच पण त्याचबरोबर बरेचदा अतिरिक्त मालाची वाहतूक करण्यासाठी कंपनी इतर जहाज मालकांकडून किंवा जहाज कंपन्यांकडूनही जहाजे भाडेतत्वावर (chartering) घेत असे. ह्या बोटावरचे कॅप्टन (त्यांना ‘शिपमास्टर’ म्हणत) आणि खलाशी त्या दुसऱ्या कंपनीचे नोकर असत पण माल मात्र ईस्ट इंडीया कंपनीचा असे. ह्या जहाजांवर देखरेख करण्यासाठी ईस्ट इंडीया कंपनीचे अधिकारीही कधीकधी ह्या दुसऱ्या जहाजांवर असत. अजून एक पध्दत त्या वेळी रूढ होती ती म्हणजे ह्या जहाजवाहतूक करणाऱ्या कंपन्या खलाश्यांचे पगार त्यांच्या हाती देत नसत. कारण खलाशी हे पैसे बाई - बाटली - जुगारात उडवून टाकत असत. असं होऊ नये म्हणून हे पगार खलाश्यांच्या बायकांना दिले जात आणि त्यांची सही त्या कागदांवर घेतली जात असे.
असेच एक जहाज होते ‘डर्बी’. ‘मेसर्स जॉन स्पेन्सर ॲंड हेन्री क्रॅब’ ह्या कंपनीचे हे जहाज ईस्ट इंडीया कंपनीने भाडेतत्वावर घेतलेले होते. ह्या जहाजाचा कॅप्टन होता अब्राहम ॲन्सेल्म. त्याला महिन्याचा पगार होता £३.५०. त्याच्या २३ जुलै १७३६ रोजी मिळालेल्या दोन महिन्याच्या पगाराची - म्हणजे £७ ची ही पावती. हा पगार त्याच्या बायकोला - मिसेस रेबेका ॲन्सेल्मला दिल्याचा उल्लेख आहे. पण त्याचा हा पगार तिला देण्याचे कारण मात्र वेगळे आहे. ह्या काळात कॅप्टन ॲन्सेल्म विजयदुर्गावर संभाजी आंग्र्यांच्या तुरूंगात खितपत पडलेला होता. त्याची ही गोष्ट.
ह्या डर्बी जहाजाने बंगाल ते इंग्लंड माल वाहतूक एकदा केलेली होती. पण दुसऱ्या गोव्याहून निघाल्यानंतर सफरीदरम्यान २६ डिसेंबर १७३५ रोजी संभाजी आंग्र्यांनी ९ जहाजे घेऊन त्याच्यावर दक्षिण कोकणात हल्ला केला आणि पकडून विजयदुर्गाकडे आणले. कॅप्टन ॲन्सेल्मसह बरेच खलाशीही पकडले गेले. डर्बीवर आंग्र्यांना ३ पेट्या भरून चांदी मिळाली. सोबत चांदीचे ३२००० स्पॅनिश डॉलर्सही होते. मालाची किंमत सुमारे वीस लाख होती. (विचार करून पहा - १७३० मध्ये फक्त सुमारे सोळा हजार रुपयांत पुण्यात शनिवारवाडा बांधून झाला होता म्हणजे त्या काळी वीस लाख रूपयांची काय किंमत असेल!) ईस्ट इंडीया कंपनीच्या इतिहासातही संपूर्ण जगात सागरी चाच्यांनी त्यांची केलेली ही सर्वात मोठी लूट होती - ह्यावरूनही लुटीचा अंदाज येईल. संभाजी आंग्र्यांना ह्या लुटीने मोठा हात दिला. त्यांची बरीचशी ह्यामुळे कर्जे फिटली.
(एक अशीही गोष्ट सांगतात की, ह्या डर्बी जहाज जिंकल्यावर त्याच्यावरील इंग्लिश तलवारी पाहून त्या केवळ ‘लोणी कापायच्या’ कामाला योग्य आहेत असे उद्गार संभाजी आंग्र्यांनी काढले होते - खरे खोटे इतिहासालाच माहीत!)
इथे विजयदुर्गावर तुरूंगात ठेवलेल्या इंग्रज खलाश्यांचे मात्र हाल झाले. त्यांना शिधा म्हणून फक्त भात आणि पाणी दिले जात असे. आंग्र्यांसमोर आणून त्यांना सतत छळाच्या धमक्या दिल्या जात असत. कॅप्टन ॲन्सेल्मबरोबर पुढे आंग्र्यांनी ओळख वाढवली. डर्बीवरच्या मालाची मोजदाद आणि त्याचा भाव निश्चित करायचे कामही ॲन्सेल्मने केले. पोर्तुगीजांना हा सगळा माल विकायचा आंग्र्यांचा मनसुबा होता. बरेचदा थोडी ‘जास्त’ झाल्यावर आंग्रे आणि त्याचे सहकारी चक्क लंडनवर हल्ला करून ते बेचिराख करायच्या ‘गप्पा’ मारत असत - हे ॲन्सेल्मने त्याच्या रिपोर्टसमध्ये लिहून ठेवलेले आहे!
७ नोव्हेंबर १७३६ रोजी मुंबईचा गव्हर्नर जॉन हॉर्नच्या सांगण्यावरून कॅप्टन इंचबर्ड विजयदुर्गावर वाटाघाटींसाठी आला. डर्बीच्या खलाश्यांना सोडवणे हे कामही त्याला सांगितले होते. इथेही त्यांचा एक डाव होता. इंग्रज कैद्यांसाठी म्हणून त्याने काही पत्रं आणली होती. प्रत्येक पत्रात सोन्याच्या पुतळ्या (व्हेनेशियन डुकाट्स) लपवलेल्या होत्या. वेळ पडताच कैद्यांनी आंग्र्यांच्या पहारेकऱ्यांना त्याची लाच द्यावी व तुरूंगातून निसटायची योजना आखावी हा इंचबर्डचा हेतू होता. पण आंग्रे त्यालाही पुरून उरले. त्यांनी ती कैद्यांसाठीची पत्रंही इंचबर्डला आधी उघडायला लावली. त्यातूनही त्यांना ९०० सोन्याच्या पुतळ्यांची ‘लूट’ मिळाली! कैद्यांनी आपले सोने परत मिळावेत म्हणून बऱ्याच विनंत्या केल्या. शेवटी आंग्रे कबूल झाले पण त्यांनी अट घातली की ते चांदीच्या रुपयांत त्या सोन्याची किंमत देतील. चांदीचे रूपये कुठले - तर डर्बीवर लुटलेल्या चांदीचेच आंग्र्यांनी रूपये पाडले आणि कैद्यांना दिले. ह्यांना ‘बंदर राजापूर नाणी’ म्हणतात. मुघल बादशाह मुहम्मदशहाच्या नावाने ही नाणी पाडली गेली. म्हणजे गंमत पहा - चांदी इंग्रजांची - नाणी पाडणार आंग्रे - मुघल बादशहाच्या नावाने - आणि देणार पुन्हा त्याच इंग्रजांना - त्यांच्याकडून जप्त केलेल्या सोन्याच्या मोबदल्यात. ह्यात आंग्र्यांचे नुकसान शून्य होते! ह्यातली काही नाणी आजही पहायला मिळतात. सोबत त्यांचे फोटो देतोय. (डॉ. शैलेन्द्र भांडारे ह्यांनी ह्या विषयावर एक पेपरही पब्लिश केलेला आहे. फोटोही त्यांच्याकडचेच आहेत.)
सुमारे १८ महिने कंपनी सरकारने पत्रव्यवहार आणि वाटाघाटी केल्यावर ॲन्सेल्म आणि बाकी खलाश्यांना सोडवण्यात त्यांना यश आले. कॅप्टन ॲन्सेल्मचे मात्र पुढे फार हाल झाले. १७३८ मध्ये इंग्लंडला परतताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. जहाज आणि त्यावरील माल गेल्याने त्याला ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आले. लढाई न करता डर्बी जहाज आंग्र्यांना दिल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. ह्या आगळीकीबद्दल त्याचे पगार आणि पेन्शनही बंद करण्यात आले. त्याने मृत्यूपूर्वी बरेच पत्रव्यवहार - कोर्टकचेऱ्या केल्या पण कसलाही उपयोग झाला नाही. ह्यातल्या एका पत्रांत कॅप्टन ॲन्सेल्म आंग्र्यांबरोबरच्या लढाईचे सखोल वर्णनही करतो. डर्बी जहाजाच्या मूळ शिपिंग लॉगसोबत आजही हे पत्रव्यवहार ब्रिटीश लायब्ररीत उपलब्ध आहेत - ते कागदही अभ्यासकांसाठी विशेष वाचनीय आहेत.
- संकेत कुलकर्णी (लंडन)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...