विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 14 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 4

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग  4

इचलकरंजी संस्थानाचा इतिहास --------1

इचलकरंजी संस्थान साठी इमेज परिणाम
सातारचे महाराज व करवीरकर यांच्या दौलतींच्या इतिहासांत इचलकरंजी संस्थानाचा उध्दव, विस्तार व त्यावर आलेली नाना संकटांची परंपरा यांची गुंतागुंत झालेली असल्यामुळें इचलकरंजी संस्थानाचा इतिहास म्हणजे मराठी राज्यांतला अंतकल हाचा व विशेषेंकरून इचलकरंजी व करवीर या संस्थानां मधल्या कलहांचा इतिहास होय.

 व्यंकटराव नारायण हा नारोपंताचा पुत्र. नारोपंत मरण पावले तेव्हा त्यांचें कुटुंब बहिरेवाडी येथें रहात होतें. पंताच्या मृत्यूचें वर्तमान पिराजी घोरपडे यांस कळतांच ते बहिरेवाडीस आले. पंतांची स्त्री लक्ष्मीबाई व पुत्र व्यंकटराव यांची भेट झाल्यावर ते फार कष्टी होऊन बोलले कीं, “आमचे वडिलांनीं नारोपंतास पुत्राप्रमाणें मानून त्यांचें कल्याण केलें; तें स्मरून नारोपंतांनीं आमचे वडील वारले तेव्हां आम्ही नेणतीं मुलें होतों, तरी आमच्या दौलतीसाठीं बहुत खस्त खाल्ली. त्यांनीं भाऊपणाचें उत्तम सार्थक केलें. त्यांचे तुम्ही पुत्र आहां ते आमचेच आहां. आमचे देशमुखी सरदेशमुखीचें वतन मिरजप्रांतीं आहे तें आमचे वडिलांनीं व आम्हीं नारोपंतांकडे वहिवाटीस दिलें होतें. तेच वतन आम्ही तुम्हाकडे चालू ठेवितों.” असें म्हणून पिराजी परत गेला.
नारोपंतांच्या हृयातींत सेनापतीकडून व इतरांकडून इचलकरंजी, आजरें, आरग, मनेराजुरी, म्हापण, बहिरेवाडी व शिपूर इतकीं खेडीं त्यास इनाम मिळालेंली होतीं. शिवाय तर्फ आजरें येथील एकतर्फी खेडयांची वहिवाट व प्रांत मिरज येथील देशमुखीची वहिवाट सेनापतींकडून पंताकडे चालत होती. हें सारें उत्पन्न सालिना तीस चाळीस हजारांचे होतें. शिवाय करवीर राजमंडळांपैकीं सचिवाचें पद त्यांस मिळाले होतें (१७११) त्याचा सरंजाम ते उपभोगीत होते; व सेनापतीच्या संस्थानाचा कारभार त्यांजकडे असल्यामुळें त्यासंबंधींहि त्यांची प्राप्ति बरीच असावी. पण पंत वारल्यावर संभाजीनें सचिवाचें पद व्यंकटरावास दिलें नाहीं व सेनापतींनींहि त्यांच्या हातीं कारभार ठेविला नाहीं. कारण कीं नारोपंतांचे पुरस्कर्ते रामचंद्रपंत अमात्य हे यापूर्वीच वारले होते व व्यंकटरावांचें नीट बनत नव्हतें. अशा वेळीं व्यंकटराव यांची नजर शाहूचा आश्रय संपादण्याकडे लागली. पेशव्यांच्या द्वारें तिकडे त्यांचा वशिलाहि चांगला होता. पेशव्यांनीं त्या वेळेपासून त्यांची सोय, उत्पन्न व अधिकार वाढविण्याचा हळू हळू उपक्रम सुरू केला.
पेशव्यांच्या विनंतीस अनुसरून शाहूनें व्यंकटरावास सन १७२२ त शिरढोण हा गाव व पुढच्या वर्षी मनेराजुरी दणी, आरग व म्हापण हे गांव इनाम दिले. त्याच्या पुढच्या वर्षी उत्तूर हा गांव इनाम दिला. या सालीं (१७२४) व्यंकटराव यांच्या नांवें निराळा सरंजामजाबता करून दिला. मागलें (१७०३) सरंजामजाबत्यांत व्यंकटरावांनीं कापशीकरांच्या हाताखालीं चाकरी करावी असें ठरलें होतें. परंतु आतांच्या जाबत्यामुळें त्यांचा कापशीकर व करवीरकर यांशीं अजीबात संबंध तुटला व ते शाहू महाराजांचे स्वतंत्र सरदार झाले.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...