विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 July 2019

भारतातील इंग्रजांच्या उदयास आणि विस्तारास कारणीभूत पेशवा भाग 6

भारतातील इंग्रजांच्या उदयास आणि विस्तारास कारणीभूत पेशवा
भाग 6
दुसरा बाजीराव पेशवा (ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्याच्या विस्तारास कारणीभूत पेशवा)
विठोजी होळकरांच्या ( डिसेंबर १८०१ साली), दुसऱ्या बाजीराव पेशव्याने केलेल्या अमानुष हत्येमुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला करायचा निर्णय केला व पुण्याच्या दिशेने चाल केली. दिनांक ८ ऑक्टोबर १८०२ रोजी पेशव्याच्या फौजेचा बारामतीजवळ त्यांच्या फौजेने पराभव केला. होळकरांचा फौजफाटा पाहून घाबरलेल्या दुसऱ्या बाजीरावाने दिनांक १४ ऑक्टोबर, १८०२ रोजी पुणे येथील तत्कालिन रेसिडेंट कर्नल बॅरी क्लोज याच्याशी बोलणी करण्यासाठी आपला दुत पाठविला.पण बोलणी पुर्ण होण्याअगोदरच परत पुण्याजवळ हडपसर येथे होळकर आणि पेशव्यांच्या सेनेचे २५ ऑक्टोबर, १८०२ रोजी युद्ध झाले ज्यात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीराव २६ ऑक्टोबरला पळून महाडला गेला. व तेथुन सुवर्णदुर्गच्या आश्रयास गेला. तेथून त्याने मुंबईच्या गव्हर्नरशी आश्रयासाठी निरोप पाठविला. डिसेंबरमध्ये होळकरांची तुकडी सुवर्णदुर्गला पोहचली पण तत्पुर्वी तो १७ डिसेंबर १८०२ रोजी ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजातून वसईला पोहचला. यशवंतराव होळकरांनी त्यास समजाविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तरीही तो इंग्रजांना जाऊन मिळालाच.कर्नल क्लोजने त्याचे स्वागत करून ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने ३१ डिसेंबर १८०२ रोजी वसईचा तह दुसऱ्या बाजीरावाबरोबर केला. या तहामुळे मराठ्यांच्या हालचालीवर मोठी बंधने आली. इंग्रजाचा भारतातील सर्वात मोठा शत्रू स्वतःहून मांडलिक झाल्यामुळे इतर राजसत्तांनी पण घाबरून हेच धोरण स्विकारले व काही वर्षातच संपुर्ण भारतात इंग्रजाचे साम्राज्य विस्तारले.
-या तहाद्वारे पेशव्याने सहा बटालियनची (६००० लढवय्ये) फौज स्विकारली. यात कायमस्वरूपी देशी पायदळाचा समावेश होता आणि त्याला युरोपियन तोफखान्याची व इतर शस्त्रास्त्रांची जोड होती. हे सारे सैन्य पेशव्याच्या मुलुखात कायमस्वरूपी राहणार होते.
-या फौजेच्या खर्चासाठी वार्षिक सव्वीस लाख रूपये उत्पन्नाचे जिल्हे कंपनीला तोडून देण्यात आले होते.
-या तहाद्वारे पेशव्याने त्याचे सुरतवरील सर्व अधिकार सोडून दिले.
-कंपनी व बडोद्याचे गायकवाड यांच्यात जे करारमदार झाले त्यांना पेशव्याने मान्यता दिली.
-पेशव्याचे गायकवाड व निजामाशी जे वाद होते ते सर्व मध्यस्थीसाठी कंपनीकडे सोपविले.
-इतर सत्तांशी भविष्यात ब्रिटिशांच्या पूर्वपरवानगीशिवाय युद्ध किंवा तह न करण्याचे पेशव्याने मान्य केले.
नानासाहेब पेशव्याच्या घोडचुकीमुळे उदयास आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्याच्या विस्तारास परत एक पेशवाच कारणीभूत ठरला. थोरले बाजीराव पेशवे आणि माधवराव पेशवे सोडले तर इतरांचे कर्तुत्व मराठेशाहीला बुडविण्यास साह्यभुत ठरले.

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...