विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 25 July 2019

” मराठ्यांची मोगलांवर झडप ” [ कोकणप्रांतावरील विजय ]

” मराठ्यांची मोगलांवर झडप ” [ कोकणप्रांतावरील विजय ]

|| छत्रपती संभाजी महाराजांचा विजय आहे ||
” मराठ्यांची मोगलांवर झडप “
[ कोकणप्रांतावरील विजय ]
छत्रपती संभाजी महाराजांच्या उत्तम रणनीती
– मुळे , सर्व आघाड्यांवर मराठे विजयी होत होते . मराठी जरीपटका अभिमानाने फडकत होता . इकडे संभाजीनगर मध्ये ( औरंगाबादेत ) , शाही छावणीत औरंगजेब त्याच्या विश्वासू सरदारांसोबत , संभाजीराजांविरुद्ध नव्या मोहिमा , तसेच विजयासाठी व्यूहरचना आखत होते , अशातच कोकणप्रांत जिंकण्याकरिता औरंगजेबाने रणमस्तखानाची निवड केली , आणि त्याची मनसब वाढवून पंचहजारी केली , तसेच बादशहाने खिल्लत , सोन्याच्या साज्याचा घोडा व हत्ती दिला .
■ रणमस्तखानाबद्दल माहिती : –
रणमस्तखान हा विशेष नामांकित तथा पराक्रमी सरदार होता . रणमस्तखान आणि त्याचा वालीद खिजरखान हे पहिले विजापूरच्या आदिलशाहीत खिदमतीला होते , खिजरखान हा बहलोलखान पठाणाचा प्रमुख विश्वासू सहाय्यक होता . पुढे खानजहानने , ह्यांना फोडून मोगलाई मध्ये आणले . रणमस्तखानाचा भाऊ दाऊदखान हा देखील शूर होता . रणमस्तखानाने एकदा तर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना जालनापूर लुटून परत येत असताना संगमनेरजवळ लढाई करून ३ दिवस अडवून धरले होते , त्यावेळी विजयश्री रणमस्तखानाच्या पारड्यात पडत होता ; परंतु गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक ह्यांनी ऐन लढाईच्या धामधुमीत डोंगरातील आड मार्गे राजांना दुर्ग पट्टा येथे सुरक्षित नेऊन पोहचविले होते , ह्या बहादुरीमुळे ‘ बहादूरखान ‘ ह्या बादशहाच्या किताबास सार्थ ठरत होता . रणमस्तखान हा आधी बादशहाचा ४ हजारी मनसबदार होता ; मात्र ह्या मोहमेचं नेतृत्व बादशहा औरंगजेबाने त्याची मनसबदारी वाढवून ५ हजारी केली .
शहजादा तसेच हसनअलीखान ह्यांची कोकणातून पीछेहाट झाल्यावर , दि. २८ सप्टेंबर १६८२ रोजी , बादशहाने बहादूरखानाला ( रणमस्तखान ) ह्याला , मोठ्या फौझेनिशी कोकणात रवाना केले .
■ रणमस्तखान आणि कोकण : –
खान आपल्या संपूर्ण लवाजम्यासह कोकणात आला , त्याने मोठ्या वेगाने कल्याण काबीज केले ; मराठे सुद्धा खानाला जोरदार प्रतिकार करत होते . राजधानी रायगडावर हि खबर मिळताच , तात्काळ छत्रपती संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले , केसोपंत आणि पेशवा निळो – मोरेश्वर यांना कोकणात धाडले .
वेळोवेळी रणमस्तखान मराठ्यांवर लहान –
– मोठे हल्ले करत होता . दि. ३ जानेवारी १६८३ रोजी , खानाने बादशहाला पत्र पाठविले कि , ‘ सध्या आणखी दोन वेळा शत्रूच्या लोकांनी बादशाही लष्करावर अचानक हल्ला केला , बादशाही सुदैवाने शत्रूच्या लोकांना ठार मारले , व जखमी केले [ नोंद : – मराठ्यांनीच हशमाना ठार केले होते . ]
मराठे गनिमी काव्याने खानावर छुपे हल्ले करतच होते , पुढे दि. ८ जानेवारी १६८३ रोजी , सरदार तुकोजी हा मोठ्या सैन्यासह खानावर चालून आला , कल्याण – भिवंडीपासून ४ कोसांवर येऊन तो मोर्चे लावीत असता , खानाने आपल्या फौझेच्या तीन तुकड्या करून त्याच्यावर आक्रमण केले . प्रथम बाणांची व बंदुकीची लढाई झाली , नंतर जोरदार हातघाईचा सामना झाला , ह्या युद्धात सरदार तुकोजी हे धारातीर्थी पडले , आता मराठे पळू लागले , रणमस्तखानाने त्यांचा ५ कोस पाठलाग केला , त्याचा मुळात काही फायदा झाला नाही .
पुढे मराठ्यांनी खानाची रसद मारली , आणि खानाला रसदेचा पुरवठा होणार नाही ह्याची काळजी घेतली , औरंगजेबाला हि खबर कळताच , त्याने मोगली आरमाराला सुरतेहून रणमस्तखानाला रसद पुरविण्याचा आदेश दिला , हि धान्याची जहाजे ठाणा खाडीतून पोर्तुगीज खानाकडे जाऊ देत असत ; परिणामी शंभूराजे पोर्तुगीजांवर भयंकर चिडले होते .
रणमस्तखानाने बादशहास दि. ८ फेब्रुवारी १६८३ रोजी पत्र पाठविले कि , ‘ फिरंग्यांचे दोन किल्ले संभाने घेतले , त्याचा विचार आहे कि , तोफखानाच्या जोरावर सुरतेहून माझ्याकडे येणाऱ्या जहाजांना अडवावे , म्हणून मी सिद्दी याकूतखानास जमेतीसह तिकडे पाठविले , खानाने जाऊन एक किल्ला पाडण्याचा प्रयत्न केला तसेच बहुतेक लोकांना मारले ; परंतु किल्ला हाती आला नाही , म्हणून मी मोहरमच्या २७ तारखेस स्वारी केली , जोरदार लढाई झाली , अनेकांना मारले , किल्ला घेऊन पाडून टाकला , नंतर कल्याण – भिवंडीस आलो . माझ्या कडे जहाजांची ये_जा चालू आहे ‘ . रणमस्तखानास जंजिऱ्याहूनही रसद येई , सुरतेहून येणारी किंवा जंजिऱ्याहून येणारी जहाजे ठाणे बंदरातून जाण्यास पोर्तुगीजांची परवानगी लागे , ती धूर्त पोर्तुगीजांनी दिली . इतकेच नव्हे , तर कल्याण – भिवंडीकडे जाणाऱ्या सिद्दीच्या तारवांस प्रतिकार करण्यासाठी संभाजीराजांनी मुंबऱ्याजवळ जो पारसिकचा किल्ला नुकताच बांधला होता , तो हि ह्या हल्ल्यात पोर्तुगीज यांनी जिंकून घेतला . तसेच पोर्तुगीज ह्याबद्दल मोठी रक्कम मागणार होते . पोर्तुगीजांचं असं वागणं पाहून शंभूराजांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी दमनपासून वसईपर्यंत , तारापूर , डहाणू , असेरी , सैनाना हा पोर्तुगीजांच मुलुख जाळून बेचिराख केला , शंभराजांचे रौद्र रूप पाहून पोर्तुगीज खूप घाबरले , त्यांनी लगेचच शंभूराजांची माफी मागितली आणि ठाणे बंदरातून खानाला रसद पोह्चविणारी जहाजे जाणे थांबली , मराठ्यांचा सततचा गनिमी काव्याचा हल्ला आणि रसदेच्या टंचाईमुळे खान अगदी जेरीस आला , ह्या तपशीलवार बातम्या औरंगजेबा – स कळत होत्या , पुढे दि. २३ फेब्रुवारीला बादशहाने रहुल्लाखान ( औरंगजेबाच्या मावस बहिणीचा मुलगा व मोगल सैन्याचा बक्षी ) याला खानाच्या मदतीकरिता कोकणात रवाना केले . रहुल्लाखान कोकणात उतरला खरा , पण उतरल्या उतरल्या मराठ्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला , त्याच्यावर जोरदार हल्ले चढवून त्याला सळो कि पळो करून सोडले . दि. १५ मार्च १६८३ रोजी
रहुल्लाखान याने बादशहाला पत्र लिहून कळविले कि , ‘ संभाचा सरदार विठोजी ४ हजार घोडदळ व पायदळा सह त्याच्यावर चालून आला , मराठे आणि मोगल यांच्यात जोरदार लढाई झाली , मराठ्यांचे ४०० लोक कापले गेले व जखमी केले , बाकी पळून गेले ‘ . मोगल विजयी झाले .
पुढे , दि. २७ मार्च ला रहुल्लाखान रणस्तखानाला कल्याण – भिवंडी येथे मिळाला . त्यावेळी
ही मराठ्यांनी हल्ले चढविले होते , मात्र त्याआधी १७ मार्चला मराठ्यांनी खानावर जबर हमला केला होता , त्यात बरेच मोगली सैन्य कापले गेले होते . मार्च महिन्याच्या शेवटी हंबीररावांनी २० हजार घोडदळ आणि १० हजार पायदळानिशी मोगलांवर हमला केला , हमला एवढा जोरदार होता कि त्या युद्धात , भगवंतसिंह दखणी , रामसिंग राठोड , माधोराम सिसोदिया , राजा दुर्गासिंग , हरिसिंग बुंदेला ( ह्याचे अंत्यसंस्कार मराठ्यांनी केले ) , पदमसिंग राठोड ( बिकानेरचा युवराज , युद्धभूमीत ३५ जखमा अंगावर झेलून धारातीर्थी पडला ) , दिलेरखान , अक्रमखान व इब्राहिम बेग हे मोगल सरदार मारले गेले , तसेच बऱ्याच प्रमाणात मोगल सैन्य कापले गेले . ” ह्या महत्वपूर्ण युद्धात मराठ्यांची सरशी झाली , परिणामी मोगल खूपच वाईटरित्या पराजित झाले ” .
अशाप्रकारे रणमस्तखानआणि रहुल्लाखान
यांनी मोहीम आवरती घेतली , औरंगजेबाची कोकणावर
चांदतारा फडकविण्याचा मनसुभा शंभूराजांच्या मार्गदर्शना ने मराठ्यांनी धुळीत मिळविला . आणि ” मोगल कोकणात येतात , आणि मरतात ” , हि म्हण झाली .
मराठा – मोगल कोकण प्रांतावरील संघर्षाबद्दल टोपीकर इंग्रज म्हणतात कि , ” बादशहा औरंगजेब स्वराज्याचा कोकण प्रदेश जिंकण्यासाठी मोठ – मोठ्या फौजा पाठवीत आहे ; परंतु छत्रपती संभाजी राजांच्या बेजोड रणनीतीमुळे , मोगलांना नुसती हार मिळत आहे .
● विशेष नोंद : –
युद्धाला गेलेले मुघल सरदार आणि
बादशहा औरंगजेब ह्यांच्यात जो पत्रव्यवहार चाले , त्यात सत्यता नावापूर्तीच असे , वास्तविक मराठे प्रबळ होते आणि मोगल सल्तनत त्यांपुढे हतबल होती .
संदर्भ : –
छत्रपती संभाजी महाराज ( श्री. वा.सी.बेंद्रे ) ,
शिवपुत्र संभाजी ( सौ. कमल गोखले ) , जेधे शकावली , संभाजी (श्री. विश्वास पाटील ) , ज्वलनज्वलनज्वतेजस संभाजी राजा ( डॉ. सदाशिव शिवदे ) , मराठ्यांचे स्वातंत्र्य समर ( श्री. पुराणिक ) , मराठी बखर , शिवकाल १६३० – १७०७ ( डॉ. वि.गो.खोबरेकर ) , इंग्लिश रेकॉर्डस् …..
” अखंड भारताचा विजय आहे ” .
|| जय हिंद ||

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...