६ जून १६७४ रोजी झालेला तो शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे अखिल हिंदुस्थानच्या इतिहासातील सगळ्यात मोठा सोहळा.
★ राज्याभिषेक म्हणजे काय??? ★
राज्याभिषेक म्हणजे काय तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक.
‘आपला एक त्राता आहे, आपला एक रक्षणकर्ता आहे, आपलं एक तख्त आहे‘ याची गोरगरीब रयतेला चिरंजीव हमी देणारा तो सुवर्णक्षण म्हणजे राज्यभिषेक.
इतिहासातील एक अजरामर असा दिवस.
परकीय सत्तांचे वरवंटे महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या छाताडावर थयथया नाचत असताना सतराव्या शतकात शिवनेरीवर जन्मलेला तो एक निखारा पुढील काही वर्षात विक्राळ रूप धारण करत जणू त्या परकीय यवनी सत्तांना त्याच्या अविरत तेजाने भस्मसात करतो अन कित्येक वर्षांचे असलेले गुलामगिरीचे जोखड भिरकावून देत अखिल मराठी मातीला जणू स्वाभिमानाचे, सार्वभौमत्व असलेले हक्काचे बत्तीस मण सुवर्ण सिंहासन उभे करत गोरगरीब रयतेला हक्काचे असे तख्त निर्माण करतो.
खरे तर ही घटना म्हणजे अवर्णनीय, अतुलनीय अशीच असावी.
ह्या घटनेची तुलना इतिहासातील किंवा वर्तनामनातील कोणत्याच घटनेशी होऊ शकत नाही ऐसी घटना होती ती.
शिवरायांच्या त्या राज्याभिषेकाच्या लक्षणीय घटनेमुळे परकीय सत्तेच्या दावणीला बांधली गेलेली ती मराठी अस्मिता जणू एकप्रकारे शहारली, थरारली, चवताळून उठली अन मावळ्यांमध्ये जागवल्या गेलेल्या याच अस्मितेच्या बळावर रायगडावर बत्तीस मणाचे सुवर्ण सिंहासन सिद्ध झाले. या या पृथ्वीवरून संपूर्ण म्लेंच्छांचा पाडाव करत अखिल हिंदूंसाठी त्यांच्या हक्काचे सार्वभौम सिंहासन उभे केले.
तस बघायला गेलं तर सतराव्या शतकात मोगल साम्राज्य म्हणजेच भारत सरकार असे समीकरण होते. अन तेच हिंदुस्थानी अन परकीय पण मान्य करत. यादवांच्या देवगिरीच्या साम्राज्यानंतर अखिल हिंदुस्थानात हिंदूंचे हक्काचे असे सिंहासन नव्हतेच. काबुल ते कंदहार पर्यंत पसरलेल्या बलाढ्य साम्राज्याचा सर्वेसर्वा तो कपटी औरंगजेब स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह म्हणवून घेत असे. भारताच्या कानाकोपऱ्यात म्हणजे दक्षिणेतील केरळ अन युरोपियन लोकांच्या किनाऱ्यावर असलेल्या वसाहती सोडता अखिल हिंदुस्थानात स्वातंत्र्य म्हणता येईल असे एकही राज्य नव्हते.
काही राजपूत राज्ये व गोवळकोंडा अन विजापूर ही स्वतंत्र राज्ये होती पण ती मुघलांचीच मांडलिक म्हणून होती अन यवन होती.
राजपूत राज्ये खालावत चालली होती. जणू तेही मुघलांचे मांडलिकच होते. ना कोणता निर्णय घेण्याची मुभा ना स्वतः काही करण्याचं स्वातंत्र्य.
तसेच हिंदुस्थानातील अनेक हिंदू सरदार, उत्तरेतील राजपूत वगैरे त्यांचीच चाकरी करत त्यांच्याशी रोटी-बेटीचे व्यवहार करत सत्तेची तहान भागवण्यात मशगुल होते.
“पुरे हिंदोस्तान के आलमगिर होना चाहते है हम” अशी त्या औरंगजेबची इच्छा असताना त्याच्याच छाताडावर पाय रोवत महाराजांनी रायगडी बत्तीस मण सोनेरी सिंहासन साकारत त्याच्या कपटी महत्त्वकांक्षेला जबरदस्त हादरे दिले अन गोरगरीब रयतेचे पालनहार म्हणून शिवाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज झाले.
No comments:
Post a Comment