विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 8 July 2020

१० जुन सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा रणसंग्राम #प्रतापगडचादुसरारणसंग्राम


१० जुन सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचा रणसंग्राम #प्रतापगडचादुसरारणसंग्राम

हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील प्रतापगडची 10 जून 1689 ची घनघोर लढाई,

शिवछत्र हरपले होते, थोरले बंधू अन स्वराज्याचे धाकल धनींना दगाफटका करून पकडून क्रूरपणे ठार केल होते, स्वराज्यावर फार मोठे संकट आले होते, अनेक मातब्बर घराणी लालसेपोटी शत्रूला मिळाली होती ,स्वराज्यावर काळे कुट्ट ढग पसरले होते,

स्वराज्यात हाहाकार माजला होता, दिल्लीचा औरंगजेब आता अजून मोकाट सुटला होता, छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूरपणे ठार करून त्याने हे हिंदवी स्वराज्य बुडवण्याचे जणू विडाच उचलला होता, अनेक सरदारांना ईनाम, वतने, देशमुखी,भीती एक ना अनेक प्रलोभने दाखवून मोगली राज्यात समाविष्ट करत होता,

छत्रपती संभाजी महाराज यांनी जी दिल्लीच्या तख्त विरोधात जी मोहीम आखली होती त्या मोहिमेत महान सेनानी, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं 1687 साली वाई येथील घनघोर लढाईत सर्जखान याबरोबर लढताना हंबीरराव यांना वीरमरण आले होते,

स्वराज्यात हाहाकार माजत असताना तिकडे रायगडावर अंत्यत गोपनीय असे, स्वराज्याच्या हिताचे निर्णय प्रक्रिया सुरू होती,महाराणी येसूबाई व एकनिष्ठ सेनानी येसाजी कंक, स्वामिनिष्ठ प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ ,मानाजी मोरे ,रायगडचे गडकरी चांगोजी काटकर आदी प्रमुख सरदार, अष्टप्रधान मंडळींनी स्वराज्याचे ,छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुसरे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचा मंचकरोहन करून 9 फेब्रुवारी 1689  त्यांना हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून गादीवर बसवले,

स्वराज्याला छत्रपती मिळाले पण ही काय सोपी गोष्ट नव्हती शत्रू पार रायगडच्या पायथ्याशी होता, लाखोंच्या शत्रूपासून काही हजारो मावळे रात्र न दिवस झुंजत होते,
अनेक स्वाभिमानी घराण्यात लढाई करून करून पुरुष राहिला नव्हता, तर त्या घराण्यातील स्रिया सुद्धा लढत होत्या,

पण मावळे काय हटत नव्हते,
12 मावळात तर धुमश्चक्री सुरू होती, कोकणात, घाटावर सगळीकडे जमेल तसे, आहे त्या परिस्थितीत सगळे झुंझ देत होते,
रायगडावर त्याच वेळी 19 वर्ष वयाचा सुकुमार छत्रपती राजाराम महाराज हे आराखडे बांधत होते,
झुल्फिकारखान हा रायगडावर चालून आला होता,
लाखांच्या शत्रूला टक्कर देणं आता शक्य नव्हते, महाराज,अष्टप्रधान मंडळी अन इतर सल्लागार मंडळींनी निर्णय घेतला की रायगड सोडून थेट जिंजी गाठायची अन तेथून स्वराज्याची धुरा सांभाळून औरंगजेब ला टक्कर द्यायची,,,

आता निर्णय घेतला तर इथून रायगड वरून सुद्धा शत्रूला न समजता त्याच्या वेढ्यातून निसटने हे काही सोपं नव्हतं,

झुल्फिकारखान अन त्याचा क्रूर सरदार काकरखान व लोधिखान हा फार धूर्त, कपटी मोगली सरदार होता,
त्यात त्याला सूर्याजी पिसाळ सारखी,जावळीचे आबाजी चंद्रराव सह त्याचा नातेवाईक हिरोजी दरेकर सह अनेक फितूर मंडळी भेटली होती,

तरी स्वराज्यसाठी छत्रपती राजाराम महाराज अन ताराराणी अन निवडक जीवाचं सहकारी यांनी वाघ दरवाजा मधून रायगड सोडायच अन प्रतापगड गाठायचं ठरलं,
आता रायगड ते प्रतापगड हे अंतर बरेच शिवाय घनदाट जंगल, जावळी खोरे आहे शेवटी !!!!!!

त्यात जावळीचे मोरे हे काकरखान ला मिळाले होते(अंबाजी चंद्रराव), त्यामुळे हे सर्व आव्हान पार पाडण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांना या मधून सुखरूप तिथपर्यंत पोहचवण्यासाठी अनुभवी,जाणकार, एकनिष्ठ व्यक्ती पाहिजे होता, मग अशा संकटात पुन्हा एकदा पिरंगुटच्या एका अशा धुरंदर व्यक्तीला गुप्तचर यंत्रणा मार्फत निरोप देण्यात आला

ती व्यक्ती काय साधीसुधी नव्हती ते होते 49 वर्ष वयाचे पायदळ प्रमुख ,1656 पासून जावळीची स्वारीत मातब्बर कामगिरी बजवलेले, स्वराज्याची एकनिष्ठ सेवा करणारे , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत ,(प्रतापगड अफजलखान वध, शाहिस्तेखान छापा,केंजळगडची सर्जाखानची लढाई,
 तत्कालीन तर 1663 पर्यंत महान सेनानी कान्होजी जेधे यांचे सेनापती होते,,)
 त्यांनी दिलेल्या मोहिम पार पाडलेले, छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या अनेक मोहिमा पूर्ण करणारे ,बुऱ्हाणपूर लुटीत सोबत होते (वाईची सर्जखानच्या विरोधात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या बरोबरीने पराक्रम गाजवला)  अनेक वेळा विविध कामगिरी बजावली, संकटात सुद्धा स्वराज्याची साथ सोडली नाही असे मातब्बर सेनानी पायदळ प्रमुख सरनौबत पिलाजी गोळे ,

पिलाजी गोळे याना निरोप मिळाला, फार मोठी जबाबदारी मिळाली होती, त्यावेळी पिलाजी, व त्याचे सहकारी अन गायकवाड सरदार मंडळी ही कांगोरी गड, ताम्हिणी, पौड पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी झुंझ देत होते,

पिरंगुटला निरोप मिळताच ताबडतोब निघायची तयारी सुरू केली, अजून रसद(मावळे) मागवली अन जराही विलंब न करता रायगड कडे कूच केली,

छत्रपती राजाराम महाराज व राणीवसा वाघ दरवाजा उतरून खाली येतो न येतो त्या अगोदर पिलाजी गोळे ,गायकवाड मंडळी,1000 मावळे सज्ज होतेच,,

कमरेला तलवारी, ढाली, भाले, कुऱ्हाडी, सगळी हत्यारे घेऊन आता या मावळ्यांना स्वराज्याचा नवा छत्रपती ला प्रतापगड पर्यंत सुखरूप पोहचवाचे होते अन त्याठिकाणी वरून कारभार चालवायचा होता,

आता रायगड ते  प्रतापगड अंतर शत्रू पासून वाचवत प्रसंगी दोन हात करत पार पडायचे होते,

कडक उन्ह होते, रणरणत्या उन्हात सगळा फौजफाटा निघाला होता

तोपर्यंत काकरखान ला टीप मिळाली (फितूर मंडळी काय कमी आहेत का ? ) होती त्याने रायगड चा मोर्चा थेट प्रतापगडावर वळवला, 30 हजारांची कडवी फौज त्यात अनेक बेईमानी सरदार घेऊन काकरखान ,लोधी नावाचं संकट स्वराज्याचा घोट घेण्यासाठी प्रतापगड कडे दरमजल करीत होता,

त्याच धामधुमीत एक ,दोन चकमकी उडाल्या, पण मावळ्यांनी त्याना यामनसदनी पाठवत वाटचाल सुरू ठेवली याच गडबडीत महाराजांच्या पालखीतून अत्यंत महत्त्वाचे असे शिक्के खाली पडले होते,
ते शिक्के घेऊन एखादा सरदार पाहिजे ते करू शकत होता पण स्वाभिमानी मावळे अन त्यांचा प्रमुख,,,

पिलाजी गोळे यांनी सहीसलामत जसेच्या तसे शिक्के महाराजांच्या हवाली करत प्रवास सुरू ठेवला अन सुखरूप महाराज व सर्व राणीवसा प्रतापगडावर पोहचवला,

एक फार मोठी कामगिरी बजावली होती निश्चित समाधान मिळत होते

आनंद झाला होता पण हा आनंद काही फार दिवस टिकेल असा नव्हता कारण काकरखान हजारोंच्या संख्येने प्रतापगड कडे चालून आला होता,,,,

संकटाचे ढग दाटून आले होते,,

काकरखान ला रायगड वरून प्रतापगड कडे येताना काय सोपं नव्हतं त्यालाही स्वाभिमानी मावळ्यांचा सामना करत यावं लागत होतं,
गावोगावी त्याला झुझ देण्यासाठी शिवबाचे हजारो मावळे त्याला अन त्याच्या फौजेला सलोके पळोखे करत होते

काकरखानला हे अंतर पार करण्यासाठी किंवा प्रतापगड गाठण्यासाठी तब्बल एक महिना लागला होता,

आता पावसाने सुरुवात केली होती कोकणात, घाटावर पावसाने जोरात हजेरी केली होती,

तिकडे औरंगजेब ने फर्मान बाजवले होते की छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारस जिवंत राहिला नाय पाहिजे,
वाटेल तेवढा पैसा फौज वापरा पण तो राजाराम महाराज सापडला पाहिजे,

काकरखानला झुल्फिकारखान मार्फत निरोप मिळाला होता,
आता त्याने निकराची लढाई करून प्रतापगड वर चालून राजाराम महाराज याला अटक करून बादशहा कडून कौतुक इनाम घेण्याचे मनसुबे बांधले होते,

इकडे गडावर छत्रपती राजाराम महाराज, अष्टप्रधान मंडळी नि ठरल्याप्रमाणे पुढचा आराखडा आखला होता,

गडाच्या पायथ्याशी काकरखानला पराभूत करून त्याला त्याची जागा दाखवायची होती,

पण काकरखान ची अफाट फौज आपल्याकडे तुटपुंज्या फौजेनिशी लढा देणे, त्यात सतत ची धावपळ ,दगदग होतीच,

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेतला तर त्या पद्धतीने काम करणे आवश्यक होते,

त्यात काकरखान ने प्रतापगड ला जवळपास वेढा घातला होता,

आता मात्र निकराची लढाई होणार होती

पिलाजी गोळे या मातब्बर, अनुभवी सेनानी वर फार मोठी जबाबदारी आली होती,

स्वराज्याचे छत्रपती सुखरूप पुन्हा एकदा ठेवणे हे महान कार्य होते,

अखेर ठरलं , 10 जून 1689 या दिवशी पहाटे लढाईला तोंड फुटले, छत्रपती राजाराम महाराज यांच्या बाजूने सेनानी सरनौबत नरवीर पिलाजी गोळे, एकनिष्ठ सरदार रुमाजी येरूनकर, पराक्रमी सरदार जावजी पराठे असे एक ना अनेक शिवबाने निवडलेले सरदार होते काही अनुभवी तर काही नवखे होते,छत्रपती संभाजी महाराज यांनी निवडलेले सहकारी सर्व होते,

 तर शत्रू पक्षत कपटी काकरखान, तुडील गावचा देशमुख लोधिखान,अंबाजी चंद्रराव(जावळी वंशज) फितूर गद्दार हिरोजी दरेकर आणि जवळपास 30 हजारांची कडवी फौज होती, हत्ती घोडे, अनेक अत्याधुनिक शस्रे घेऊन तयार होते,

रणसंग्राम चालू झाला, हर हर महादेव म्हणत  पार  या गावात कोयना नदीच्या तीरावर रक्ताच्या धारा उडत होत्या,

पिलाजी गोळे यांची तलवार तर अस्मानी ताकद दाखवत होती, थरकाप उडाला होता, काकरखानच्या फौजेला आपण भारी पडत होतो,
रुमाजी, जावजी मंडळी शत्रूवर तुटून पडली होती ,

पिलाजी गोळे हे छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुढे होते, कपाकप शत्रूला मारत होते,

काकरखान स्वतः पिलाजी गोळे यांचं पराक्रम पाहत होता, विचार करत होता की असे पराक्रमी सरदार जर माझ्याकडे असते तर आम्ही कधीच लढाई जिंकली असती,

पिलाजी गोळे यांच्या तलवारी पुढे शत्रू सेकंद भर सुद्धा टिकत नव्हता
शेकडो मोगली शत्रू कापून पिलाजीराव जरा सुद्धा थकले नव्हते, वय 49 होत, अन 19 वयाच्या छत्रपती ना सुखरूप ठेवायचं होत,

जीवाची पर्वा न करता कोयनेच्या नदीच्या काठावर रणसंग्राम चालू होता, अनेक गोळे ,पराठे, गायकवाड, हरूनकर मंडळी कामी आले, पण माघार घेत नव्हते,
ते 30 हजार तर आपण शेकडो होतो,

पण एक एक मावळा हा लाख बराबर होता,
स्वतः छत्रपती राजाराम महाराज हे अंबारी मधून तिरंदाजी करीत शत्रू ला टिपत होते
समोर आबाजी चंद्रराव दिसतच छत्रपतीची तळपायाची आग मस्तकाला भिडली त्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी
ऐन रणधुमाळीत छत्रपतीच्या रानु नामक माहुताने छत्रपतीच्या आदेशानुसार हत्ती लढाईत घुसवला,

त्या फितूर आबाजीचा नरडीचा घोट हत्तीने घेतला, छत्रपती राजाराम महाराज यांचा हा वेष पाहून तर मोगल सैन्यत एकच खळबळ उडाली,
आता मात्र आपले काही खरे नाही असेच त्याना वाटू लागले अन ते खरंच होता
छत्रपती सोबत एक एक मावळा हा शत्रू वर तुटून पडत होता
सरनौबत यांची तलवार तर शत्रूला यमसदणी पाठवत होते,
याच धुमाळीत फितूर हिरोजी दरेकर यांनी स्वतःच्या अंगावर जेव्हा हत्ती चालून आला त्यावेळी ( महाराज ज्या हत्तीवर बसले होते तो हत्ती )  त्या हत्तीची सोंड तोडली त्यामुळे एकच खळबळ माजली,
हत्ती सैरावरा झाल्याने जरा आपली धांदल उडाली तोपर्यंत आपण काकरखानला भारी होतो तो माघार घ्यायचा तयारीत होताच पण हत्ती मुळे धावपळ उडाली त्यामुळे आपण ही दोन पावले मागे झालो,पण रणसंग्राम चालुच होता,

मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली, युद्धत विजय मिळवला

 तोपर्यंत काकरखान तर पार नदीच्या पलीकडच्या तीरावर गेला अतोनात नुकसान झाले त्याचे , हजारो मोगली सैनिक मरण पावले,

कित्येक कायमचे जायबंदी झाले,अतोनात नुकसान झाले,त्याला चांगली अद्दल घडली आता तो झुल्फिकारखान कडे पळून गेला,

त्याचे अनेक सरदार हत्यारे टाकून पळाले, घोडे सोडून दिले , तोपर्यंत आपणही मागे येऊन प्रतापगडावर गेलो, एकच जयघोष झाला

जय भवानी जय शिवाजी

ही लढाई एक आगळी वेगळी होती , छत्रपती शिवाजी महाराज नाही त्यानंतर लाखोंच्या संख्येने दिल्लीचा बादशहा दक्षिणेत हिंदुत्वव संपवण्यासाठी दाखल होतोय तर त्याला छत्रपती संभाजी महाराज यांनी झुंज दिली अखेर त्यांचाही अंत झाला,
अशा प्रसंगी एक 19 वर्षाचा सुकुमार छत्रपती होतो अन बलाढ्य शत्रूला लढत देतो हे अंत्यत महत्त्वाचे आहे,
छत्रपती राजाराम महाराज यांची ही पहिली लढाई होती, स्वतःचे मामा सरसेनापती हंबीरराव मोहिते नव्हते तेव्हा संपूर्ण जबाबदारी अनुभवी पायदळ प्रमुख पिलाजी गोळे यांनी सांभाळून घेतली होती याबद्दल छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना पदातसेनाधर म्हणजे पायदळ प्रमुख 'किताब दिला अन कोंढवी कुडाळ सह तब्बल 56 गावची देशमुखी दिली सर्वत मोठा इनाम होता हा गोळे घरण्यासाठी,
 तसेच जावजी पराठे याना आटेगाव ची देशमुखी दिली,मान सन्मान दिला,

या लढाई बद्दल मोगल इतिहासकार छत्रपती राजाराम महाराज यांच्याबद्दल लिहतात की भोसल्यांचे रक्त हे जबरदस्त पराक्रमी आहे,
ते छत्रपती राजाराम महाराज यांना कारोफर हा शब्द लिहतात

त्यानंतर 10 जून ते 10 ऑगस्ट म्हणजे तब्बल 2 महिने (60 दिवस) छत्रपती राजाराम महाराज प्रतापगडवर होते,

जोपर्यंत गडावर होते तोपर्यंत प्रतापगड कडे कोणताच शत्रू फिरकला नाही कारण 10 जून ला त्यांना जी धूळ चारली त्यामुळे झुल्फिकारखान सारखा मोगली सेनानी सुद्धा प्रतापगड कडे फिरकला नाही हे वैशिष्ट्य आहे

अन फिरकला असता तर त्याला पाणी पाजायला पुन्हा सरनौबत नरवीर पिलाजी गोळे समशेर घेऊन तयार होतेच!!!!!!!!!

नंतर छत्रपती राजाराम महाराज अन इतर सर्वांनी निर्णय घेऊन 10 ऑगस्ट ला प्रतापगड ते वासोटा ते सातारा ते सज्जनगड ते पन्हाळा हा प्रवास केला तसच पुढं जिंजी कडे गेले

अशा एका ऐतिहासिक लढाईचे साक्षीदार ,स्वतः लढलेले पिलाजी गोळे याना स्मरण करून मी शब्द थांबतो

सरनौबत पिलाजी गोळे यांची जयंती सुद्धा 10 जूनला असते
10 जून 1640 , यावर्षी 380 वि जयंती भोसे महाबळेश्वर येथे रक्तदान शिबीर आयोजित करून, अन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेऊन साजरी करण्यात येणार आहे

शब्दांकन : अँड मारुती आबा बबनराव गोळे (सरनौबत वंशज)

संदर्भ:::1) रामदास & रामदासी वर्ष 11 वे
2) ऐतिहासिक साधने
3) मोगल मराठा संघर्ष
4) शिवपुत्र राजाराम महाराज :
लेखक डॉ जयसिंग पवार
5) सभासद बखर
6) शाहू दप्तर कोल्हापूर

🚩🙏सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान ...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...