विनोद जाधव एक संग्राहक

Friday 18 September 2020

#चापेकर_वाडा #चिंचवड_पुणे

 





#चापेकर_वाडा
#चिंचवड_पुणे

वासुदेव चापेकरांचा जन्म १८८० मध्ये कोकणात एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले.

१८९६ मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. त्यात अनेक लोक बळी गेले. पुण्यात प्लेगची साथ पसरल्यानंतर १८९७ चा संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू झाला होता. या कायद्यानुसार एखादी व्यक्तीला प्लेगचा आजार झाल्याची शंका आल्यास तिची इच्छा असो वा नसो, तिला सरकारी हॉस्पिटलात भरती केले जात असे. प्लेगचे रुग्ण शोधण्यासाठी ब्रिटिश अधिकारी रॅंड याचे सैनिक पुणेकरांच्या घरात घुसत होते, सामानाच्या तपासणीच्या नावाखाली लुटालूट करत होते. उगीचच संशय घेऊन बरेच सामान जाळून टाकत होते. रुग्णालयात भरती करण्यासाठी लोकांना फरफटत नेत होते. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनाही केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले.

ब्रिटिश सोल्जर हे देवघर-स्वयंपाकघरात पायातल्या जोड्यानिशी शिरत होते. देव बाहेर काढून रस्त्यावर फेकत होते. स्वयंपाकघरातील लोणच्याच्या बाटल्या रोग होईल म्हणून उकिरड्यात टाकत होते. घरातील वृद्ध तसेच स्त्रियांवर अत्याचार केले गेले. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूनी रॅंडवर गोळीबार करून त्याचा खून केला.
रॅंडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रॅंडवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅंड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.

त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेले. कित्येक दिवस ब्रिटिशांना मारेकऱ्यांचा शोध लागत नव्हता. शेवटी पंचमस्तंभि द्रविड बंधूनी या कटाची बातमी केवळ आर्थिक लाभपोटी (20,000रु च्या) सरकारला दिली. वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार केले. तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू शहीद झाले.

#अपरिचित_ऐतिहासिक_ठिकाणे
#अपरिचित_इतिहास
✍️ जिजाऊंचं स्वराज्य
भारती धोंडे पाटील

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...