विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 29 October 2020

जिवाजी महाले अर्थातच जिवा महाला.

 जिवाजी महाले अर्थातच जिवा महाला.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात अनेक जाती,धर्माचे लोक सहभागी झाले होते.हे लोक स्वराज्याचे होते आणि स्वराज्य यांचे होते.आपल्या अद्वितीय पराक्रमाने आणि साहसाने यांनी इतिहासाची रक्तरंजित पाने लिहिली.प्रसंगी स्वतःचा जीवही धोक्यात घातला.यातलेच एक जिवाजी महाले अर्थातच जिवा महाला.

                 जिवाचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक तालुका वाई हे आहे.मात्र आता धोम धरणामुळे ते स्थलांतरित झाले आहे.जिवा जातीने न्हावी समाजाचा होता.त्याचे वडील पैलवान होते.त्यांनीच त्याला पैलवनकीचे धडे दिले.जिवाचे वडील शहाजीराज्यांच्या सेवेत होते. निजामशाहीच्या युद्धात त्यांना त्यांचा उजवा पाय गमवावा लागला.महाले फार पूर्वीपासून दानपट्टा फिरवण्यात पटाईत होते.त्यांनी त्यात स्वतःची शैली निर्माण केली होती आणि जिवामहाला सुद्धा दानपट्टा फिरवण्यात तरबेज होता.
                 तानाजी मालुसरे यांच्या उमरठ गावी यात्रे निमित्त कुस्त्यांची दंगल होती.भिकाजी ढेरे या नावाजलेल्या पैलवनासोबत लखु बेर्डे याची कुस्ती होती.पण वाघासोबत झालेल्या हाणामारीत लखुच्या पायाला जखम झाली होती म्हणून तो कुस्तीखेळू शकत नव्हता.मैदानात कोणीच प्रतिस्पर्धी नव्हता. तेवढ्यात जिवा मैदानात आला आणि त्याने असा डाव टाकला कि भिकाजी ५-६ फूट उडून पालथा पडला. त्या कुस्तीच्या दंगलीचा खुद्द शिवाजी महाराज आले होते.त्यांनी जिवाला बोलावले आणि विचारले, ''पोटापाण्यासाठी काय करतोस?'' जिवा म्हणाला, ''दानपट्टा फिरवतो आणि कुस्त्या खेळतो.'' यावर महाराज म्हणाले,''आमच्या सोबत येशील पट्टा फिरवायला आणि कुस्त्या खेळायला पण गनिमासोबत.'' आणि जिवा महाला स्वराज्य सेवेत दाखल झाला.
                   गुरुवार दि. १० नोव्हेंबर १६५९ प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरली होती.खानाबरोबर सैय्यद बंडा नावाचा अंगरक्षक होता.तो दानपट्टा फिरविण्यात पटाईत होता.त्याच्याशी मुकाबला करायचा तर आपल्याकडे जिवामहालाच हवा हे महाराजांना माहित होते.म्हणून त्यांनी अंगरक्षक म्हणून जिवा महाला आणि आजून ९ जणांची निवड केली.आणि महाराज खानाच्या भेटीस निघाले.
                    इकडे शामियान्यात खान आधीच आला होता.महाराज आत आले त्यांनी खानाला आणि खानाने त्यांना पाहिलं जणू सिंह हत्तीला आणि हत्ती सिंहाला पाहत आहे असेच भासत होते.खान आपल्या कपाटाच्या स्वरात महाराजांना म्हणाला,''आओ शिवाजी हमारे गले लग जावो.'' आलिंगन देताच खानाने दगाबाजी करून महाराजांच्या पाठीत कट्यार मारली पण चिलखतामुळे त्यांना काहीच झाले नाही. तेवढ्यात महाराजांनी खानाच्या पोटात वाघनखांचा मारा केला आणि बिचव्याने फाडल पोटाला.खानाचे आतडे बाहेर आले ते पोटाला दाबून ठेवत तो बाहेर पळाला.
                तेवढ्यात खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याने महाराजांवर तलवारीने वर केला.तो महाराजांनी हुकवला. दुसरा वार त्याने केला तो तलवारीवर घेत महाराज म्हणाले,''नाही कृष्णाजी, आम्ही ब्राह्मणास ठार मारणार नाही.   शहाजी महाराजांची आम्हला आन आहे.आमच्या हातून हे पाप होऊ देऊ नका.आम्ही तुम्हाला क्षमा करू.'' तरीही तो महाराजांवर चालून आला आणि महाराजांनी क्षणभरही विचार न करता त्यास तलवारीच्या एका सापट्यात ठार केले.
                       हे सर्व सुरु होते तेवढ्यातच बाहेरच्या दंगलीतून सैय्यद बंडा दानपट्टा घेऊन महाराजांच्या दिशेने पळत आला.तो महाराजांच्या मस्तकावर वार करणार एवढ्यातच जिवा महालाने तो वार स्वतःवर घेत दानपट्टयाचा सपकन घाव घातला आणि बंडाचा हात हवेत उडवला.अन त्याचे दोन तुकडे केले.
                    शिवाजी महाराज जातीपाती मानत नव्हते याचे हे आजून एक उदाहरण.न्हावी समाजाच्या  जिवाला त्यांनी आपले अंगरक्षक केले आणि जिवाने  सुद्धा आपल्या पराक्रमाने आपले कर्तव्य पूर्ण केले. शेवटी इतिहासाला सुद्धा आपल्या पानांवर लिहावे लागले  ''होता जिवा म्हणून वाचला शिवा...''

(संदर्भ:- राजा शिवछत्रपती पृ.क्र.३१४)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...