विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 30 January 2021

बुऱ्हाणपुरची_लूट

 




बुऱ्हाणपुरची_लूट

३० जानेवारी १६८१
स्वतःच्या राज्यभिषेकानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी दस्तुरखुद्द संभाजीराजांनी स्वतः आघाडीवर जाऊन मुघलांचे ऐश्वर्यसंपन्न असे ठाणे बुऱ्हाणपूर लुटले.
तिथले सतराच्या सतरा पुरे लुटून उध्वस्त केले.
त्या मग्रूर काकरखानला तुडव तुडव तुडवले.
बुर्हाणपूर हे मोगल साम्राज्यात असणारे संपन्न ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी मराठ्यांचा खजिना भरण्यासाठी सुरतेची लूट करून औरंगेजबाने निर्माण केलेले सुरत शहर बदसुरत केले, त्याचप्रमाणे छत्रपती शंभुराजांनी बुर्हाणपूर जवळजवळ तीन दिवस लुटले.
पण तत्पूर्वी संभाजीराजांनी आपण सुरत शहर पुन्हा लुटनार अशी आवई आपल्या हेरांमार्फत मुघलांच्या गोटात पसरवली.
पण त्यांनी चाल केली मुघली सत्तेतील अत्यंत संपन्न असे शहर असणाऱ्या बुऱ्हाणपूर वरती.
आता संभाजीराजे सुरत लुटनार अशी आवई तर पसरलीच होती.
त्यात औरंगजेबचा दुधभाऊ खानजहाँ बहादूरखान कोकलताश हैबतजंग हा ९ जून १६८० पूर्वीच त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी औरंगाबादला जवळपास ३००० ची फौज जी बुऱ्हाणपूरच्या रक्षणासाठी होती ती फौज घेऊन गेला होता.
संभाजीराजांची योजना होती पायदळाची एक तुकडी अन स्वार मुघलांना हुलकावणी देण्यासाठी सुरतेकडे जाणार दुसरी बुऱ्हाणपूर तर तिसरी तुकडी बहादूरखानाला हुलकावणी देत गुंतवून ठेवणार.
खाफिखान लिहतो.
"संभाजीचा सेनापती हंबीरराव कोकणात लष्करासहित होता.
त्यास वर्तमान मिळाले की खानदेशात कोणी रक्षक नाही.
त्यावरून त्याने लष्कराच्या लहानमोठ्या टोळ्या करून उत्तरेकडे जाऊन ते सर्व लोक बुऱ्हाणपुरावर एका जागी मिळवले अन ते शहर लुटले, द्रव्य मिळवले.
परत येताना त्याने बुऱ्हाणपुरापासून नाशिकपर्यंत मुलुख लुटून जाळून टाकला.
त्यामुळे बुऱ्हाणपूरचा नायब त्यावेळी काकरखान होता. अन त्याच्याजवळ साधारणपणे पाच हजाराची फौज होती.
त्यात खानाच्या हेरगारांना सुरतेच्या जंगलात काही मराठे दिसले.
त्यामुळे शंभूराजे खरेच सुरत लुटनार अशी खानाची खात्री पटली अन तो घाबरला.
शिवरायांनी दोनदा सुरत लुटली अन आता संभाजीराजांनी सुरत लुटली तर औरंगजेब आपल्याला सोडणार नाही जा विचार करून खानाने आपल्याजवळील चार हजारांचे सैन्य अन बचमीयत सुरतेच्या रक्षणासाठी पाठवली.
ती फौज निम्म्यात पोचते तोवर मुघली हेर धावत आले-
"हुजूर गजब होगया, मराठे बुऱ्हाणपुर लुटणे आये है."
आता मात्र काकरखान पुरता हादरला.
त्याचा विश्वासच बसेना.
पंधरा दिवसांपूर्वी संभाजीराजांचा राज्यभिषेक झालाय.
अन रायगडावरून बुऱ्हाणपुरावर यायला कमीतकमी ६ दिवस तरी लागतात,
ते पण दिवसरात्र घोडी दामटली तर.
त्यामुळे मराठे बुऱ्हाणपुरावर येतील असा विचार स्वप्नातसुद्धा खानाने केला नव्हता.
पण मराठे ५ दिवसरात्र घौडदौड करून तिथं पोचले.
तिथले व्यापारी, जौहरी वगैरे खानाकडे जाऊन त्यांना वाचवण्यासाठी विनवण्या करू लागले.
खानाने तिथले लोक गोळा करून जवळपास दीड दोन हजार लोक जमवले व रात्रीच बेसावध असणाऱ्या मराठ्यांवर हल्ला करून त्यांना पराभूत करायचे अशी योजना आखली.
जसा खान सैन्य घेऊन बाहेर पडला तसे जवळपास जंगलात दडून बसलेले मराठे खानाच्या फौजेवर तुटून पडले.
हर हर महादेव ची किलकरी त्या भयाण शांततेत गर्जत होती, तलवारीचे सपासप आवाज येत होते.
छत्रपती संभाजीराजे स्वतः या तुकडीचे नेतृत्व करत होते.
मराठेशाहीचे सरसेनापती सरलष्कर हंबीरराव मोहिते तिथेच जवळपास होते.
त्यांना हेरांकरवी खबर मिळाली की काकरखान रात्रीचा मराठ्यांवर चालून गेलाय अन शंभूराजे आघाडीवर आहेत.
हे कळताच हंबीरराव तडक निघाले.
हंबीरराव सगळे सैन्य घेऊन आले अन बुऱ्हाणपुराला वेढा दिला.
मराठ्यांनी पहिलाच तडाखा बहादूरखानाच्या नावाने वसलेल्या बहादूरपुऱ्याला दिला. तिथे लाखो होनांची लूट मिळाली.
हा हल्ला इतका अचानक होता की कोणालाच हलायला सुद्धा सवड मिळाली नाही.
अन तीन दिवस मराठ्यांनी बुऱ्हाणपूर लुटले.
खोऱ्याने मराठे बुऱ्हाणपूर लुटत होते.
प्रचंड जडजवाहीर, सोने, चांदी, जिझिया कराने जमवलेली संपत्ती तसेच घोडी इत्यादी वस्तू मराठ्यांनी लुटून नेल्या.
ही लूट सुरतेपेक्षा तीनपट मोठी होती.
पण बुऱ्हाणपूर लुटताना मराठ्यानी कुठेही लहान लेकरांना अन महिलांना धक्का पोचवला नाही.
परस्त्रीकडे चुकीच्या नजरेने पाहायचे नाही हा शिरस्ता मराठे सदैव पाळत असत.
तिकडे ही खबर बहादूरखानाला औरंगाबादला मिळाली अन तो तडक निघाला.
इकडे मराठ्यांनी फौजेच्या ४ तुकड्या केल्या अन ४ दिशांनी ते साल्हेरच्या दिशेने रवाना झाले.
चोपड्याच्या मार्गे खानाला गुंगारा देत एक कोटीहून अधिक होनांची लूट मराठ्यांनी यशस्वीपणे साल्हेरच्या किल्ल्यावर सुरक्षितपणे पोचवली.
ही लूट एवढी प्रचंड होती की, मराठ्यांनी केवळ मौल्यवान वस्तू, सोने, जडजवाहीर आणि चांदीच्या वस्तू एवढेच लुटले. बुर्हाणपुरात मोगलांची काय फजिती झाली, याचे प्रत्यंतर औरंगजेबपुत्र अकबर याच्या पत्रावरून दिसते. औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात अकबर म्हणतो की, "बुर्हाणपूर म्हणजे विश्वरूपी सुंदरीच्या गालावरील तीळ आहे; पण तो आज उद्ध्वस्त झाला. यावरून आपणास छत्रपती संभाजीराजांचा पराक्रम दिसतो. म्हणूनच इंग्लंडचा दरबार त्यांचा उल्लेख वॉरलाईक प्रिन्स असा करतात."
स्वतःच्या राज्यभिषेकानंतर अवघ्या पंधरा दिवसात एवढ्या मोठ्या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या माझ्या शंभुराजांना अन मराठ्यांच्या पराक्रमाला माझा मानाचा मुजरा.
🚩❤️🙏
- सोनू बालगुडे पाटील

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...