विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 April 2021

गुढीपाडवा आणि वस्तुस्थिती - एक निरीक्षण ......

 


गुढीपाडवा आणि वस्तुस्थिती - एक निरीक्षण ........
पोस्टसांभार : © राज कुलकर्णी.
( छायाचित्र: आनंद कोकरे)
पहीला गुढी पाडवा साजरा झाला ई.स.78 साली मराठवाड्यातील पैठण या शहरात! गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाने शकांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून हा सण सुऱू झाला. सातवाहनांचा उल्लेख आंध्रभृत्य म्हणून होत असला तरीही, पैठण मधील जनमान्यतेनुसार सातवाहन राजाचे पालनपोषण कुंभार कुळात झाले होते, स्वाभिविकपणे घडा किंवा कलश हे त्याचे कुलचिन्ह म्हणून रेश्मी वस्त्रासोवत घडा काठीवर ठेऊन खारीक खोब-याच्या हारासह गुढी उभारली गेली. पुर्वी विजयाचे प्रतिक म्हणून सम्राट राजधानीत व कुलदैवतेसमोर दगडी विजयस्तंभ निर्माण करत असतं! गुढी या अशा विजयस्तंभाचं लोकप्रिय प्रतिक म्हणावे लागेल आणि यावरून सातवाहनांच्या लोकप्रियतेचाही अंदाज येतो.
कांही संशोधकांनी असेही एक मत मांडले आहे की, शक ही कालगणना सातवाहनापुर्वी उजैनच्या कुशान सम्राट कनिष्कने किंवा चष्टनाने सुरू केली होती आणि महाराष्ट्रात ती सन 78 मधे सातवाहनांनी सुरू केली. अर्थात ती सातवाहनाऐवजी कनिष्क राजांनी सुरू केली असल्याचे खरे असेल तर पाडवा हा सण सातवाहन पूर्व कालखंडातही होता म्हणावे लागेल , पण आज ज्या स्वरुपात पाडवा हा सण साजरा होतो, त्याची सुरुवात सातवाहन राजांनी केली आहे . यावरून एक महत्वपूर्ण बाब सिद्ध होते की, ही कालगणना इ.स. 1689 च्या फार पुर्वीपासून वापरात असून यादवकाळात देखील गुढी असल्याचे संदर्भ आहेत. अनेक संताच्या रचनेत देखील 12 व्या शतकापासून गुढीचा उल्लेख आढळतो.
पहिली गुढी उभारण्याच्या घटनेला आज 1937 वर्ष झाली. या कालखंडात ईतिहासात बरीच स्थित्यंतरे झाली. दररोजच्या वापराच्या वस्तु बदलल्या, तशी गुढीही बदलली. मातीच्या घड्याऐवजी धातुचे तांबे आले. माझ्या लहानपणी तर पितळी तांबे असायचे, अगदी स्टीलचा ग्लाससुद्धा मी गुढीवर पाह्यला आहे. आता पितळी तांबे जसे वापरातून नाहीसे झाले, तसे गुढीवरूनही नाहीसे झाले . त्यातल्यात्यात सधन कुटूंबात तांबे धातुचा कलश आणि अतिश्रीमंत कुटूंबाच्या गुढीला चांदीचा तांब्या कांही क्वचित प्रसंगी पहायला मिळतो. हे बदल त्यामुळेच होऊ शकले की, अमुक एक धातुचा, आकाराचा, यात आग्रह नाही. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे कलश वापरता य़ेईल.
विजयाचे प्रतिक म्हणून ध्वज हा रेशमी वस्त्र या स्वरूपात होता. पैठण ही रेश्मी वस्त्रांसाठी प्रसिद्ध असणारी नगरी ! पैठणची पैठणी आज हजारो वर्षानंतरही लोकांना भुरळ पाडते आहे. घरात वापरायच्या भांड्याचा जसा आपण विचार केला तसा वस्त्रांचा विचार केला तर, सर्वसामान्यांना पैठणी घेण्याचा योग निदान लग्नात तरी यायचा! म्हणजे घरात पैठणी हेच, एकमेव रेश्मी वस्त्र. दुसरे रेशमी वस्त्र घरात असण्याची शक्यता तशी कमीच. तेच गुढीला घातलं जाऊ लागल्यानं विजयाचे प्रतिक असणारा हा पुल्लींगी ध्वज स्रीलंगी होऊन गुढी झाला असावी. परंतु कलश हा गर्भाशयाचे प्रतिक म्हणून , गुढी ही शाक्त पंथीय उपासनेचे प्रतिक असल्याचेही कांही संशोधकांनी मांडले आहे, आणि ते संयुक्तिक देखील आहे . पण लोक मात्र , गुढीसाठी रेशमी वस्त्राचा आग्रह धरताना दिसत नाहीत, नवीन असणारे कोणतेही वस्त्र चालू शकते ! कारण गरीब कुटूंबतील कांही गुढ्या साध्या छापील साड्याच्या सुद्धा आढळतात. जे कलशाचे आणि साड्याचे तेच खारीक खोबरे या गोड पदार्थांचे! तेही बदलले आणि साखरेचे हार आले. हे बदल टप्याटप्याने होत गेले, हे आपल्याला निरीक्षणावरून समजु शकते. यावरून गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि जनाधार असणारा सण असल्याची खात्री पटते. कर्नाटक, आंध्र या प्रदेशातही हा सण नव संवत्सर , उगादी या नावाने साजरा केला जातो .
एखादी कालगणना सुरू करणे, हे एखादे बटन दाबून यंत्र सुरू करण्यासारखे नसते. शिवाय एखाद्या राजाने नवीन शक सुरू केला तरीही तो प्रचारात येईलच असे नव्हे! शिवाय तो व्यवहारात वापरता येण्याजोगा असायला हवा. क्वचितच एखाद्या राजघराण्याला ते शक्य होते. कारण त्यासाठी लागते प्रदिर्घ अशी कारकीर्द! सातवाहन घराण्याने ई.स.पुर्व 240 ते ई.स.260 एवढे प्रदिर्घ काळ राज्य केले. श्री सातवाहन, पुळुमावी, गौतमीपुत्र, वशिष्ठीपुत्र, शिवस्वाती, हाल असे अनेक पराक्रमी व विद्वान पुरूष या घराण्यास लाभले. गौतमीपुत्राने सन 78 मधे सुरू केलेला शालीवाहन शक सातवाहनांच्या अस्तापर्यंत म्हणजे ई.स.260 पर्यंत म्हणजेच स्थापनेपासून निदान 182 वर्ष तरी अविरतपणे वापरात होता. 182 वर्ष म्हणजे जवळपास 6 पिढ्या चाललेली प्रथा, रीत, समाजात तळागाळापर्यंत प्रसृत होणे स्वाभाविक आहे. सातवाहनानंतर शिलहार, वाकाटक, राष्ट्रकुट, चालुक्य,यादव यांनी देखील राज्य केले, पण स्वत: चा नवीन शक कोणीही निर्माण करू शकले नाही. सातवाहन राजघराणे संपूनही शालीवाहन शक केवळ लोकाश्रयावर टिकून राहीला. लोकाश्रय आहे म्हणून सातवाहनोत्तर राजांनीही तो तसाच स्विकारला. स्वतंत्र शक त्यानंतर निर्माण केला तो थेट जेष्ठ वद्य प्रतिपदा शालीवाहन शके 1596 अर्थात 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनीच !
शालीवाहन शकानंतर 1596 वर्षांनी येणारी जेष्ठ वद्य प्रतिपदा हा शिवशकाचा पहीला दिवस. खरेतर पौर्णिमेपासून अमावास्ये पर्यंतचा कालखंड म्हणजे वद्य पक्ष ! वद्य पक्षापासून अमावश्येपर्यंत चंद्र हळु हळु कमी होत जातो. पण तरीही शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत मात्र शुद्ध पक्षातील प्रतिपदेचा आवर्जून उल्लेख आढळतो. जोस्त्ना म्हणजे चंद्रकोर ती वर्धिष्णु होते - वाढते तसे हे राज्य वाढावे, असा त्यात उल्लेख आहे. त्यामुळे शिवाजी महाराजाच्या काळातसुद्धा शुद्ध पक्षाने सुरूवात होणा-या शालीवाहन कालगणनेचे महत्व होते हे स्पष्ट होते. महत्वपुर्ण बाब अशी की स्वतंत्र भारतात मेघनाथ सहा यांच्या सल्ल्याने 22 मार्च 1956 रोजी सुरू झालेल्या भारतीय सौर कालगणना पद्धतीत शालीवाहन शक आणि त्यातील महीऩे जसेच्या तसे स्विकारले आहेत.फक्त मार्गशीर्ष महीण्याला अग्रहायन असे नाव दिले आहे. सहाजीकच सौर कालगणना असल्यामुळे त्यात शुद्ध वा वद्य पक्ष नाही. यात थेटपणे १ ते ३१ तारखा आहेत . आकाशवाणी ,दूरदर्शन वर आवर्जून भारतीय सौर दिनांक सांगितला जातो !
आता महत्वाचा प्रश्न असा कि सातवाहन राज्यांच्या या सणाचा आणि ब्रह्माचा, विष्णूचा , रामाचा संबंध आला कुठून ? राजकारणात नेहमी एक पहायला मिळते. एखादा व्यक्ती लोकप्रिय असला की त्याला आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे स्वबळावर जनाधार मिळविण्यापेक्षा, जनाधार असलेल्या लोकप्रिय नेत्याला जवळ करणे. गेल्यावर्षी केंद्रात आणि राज्यात झालेल्या निवडणुकीत हे आपण सर्वांनी पाह्यले आहे. धर्मकारणही असेच आहे.महाराष्ट्राचा विचार करता महादेव, खंडोबा, भैरोबा, अंबाबाई, येडाई ई. दैवते ईथली लोकप्रिय दैवते. ब्रह्मा, विष्णु, राम ई. दैवतांना जनाधारच नव्हता. यामुळे घडले असे की, शालीवाहनाच्या विजयाचा हा सण समाजात गेल्या हजारो वर्षाच्या सातत्यामुळे प्रचंड लोकप्रिय झालेला होता. पुराणातल्या काल्पनिक देवतांना समाजात लोकप्रिय करू पाहणाऱ्या धर्मपंडितीनी, लोकप्रिय सणाची महती त्यांच्या काल्पनिक देवतांच्या कर्तृत्वाच्या आधारे सांगणे चालु केले. ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, राम रावणाला मारून अयोध्येत आले, अशा निरर्थक बाबी पसरवून या सातवाहनांच्या त्या विजयी दिनाच्या कर्तृत्वावर, लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला. राजकारणात जे आपण पाह्यले तेच त्यांनी सातवाहनांतर सतत 1936 वर्ष केले. सहाजीकच एवढा अवधि मिळाल्यावर मुळ ईतिहासापेक्षा काल्पनिक पुराणकथांना जास्त प्रमाणात लोक वास्तव मानू लागले. आजही सातवाहन राज्यांचे कर्तृत्व परांपरावादी लोकांना सांगायला नको वाटते आणि विद्रोही लोकही सातवाहनांचे श्रेय नाकारून सबंध नसलेल्या घटनेच्या आधारे विरोध करताना दिसतात.
परांपरावाद्यांनी काल्पनिक दैवतांना लोकप्रिय करण्यासाठी गुढीचा वापर केला आणि मध्ययुगीन कालखंडातील राजकीय घटनेच्या विष्लेषणासाठी विद्रोह लोकप्रिय व्हावा म्हणून कोणी वापर करत आहे. गुढीपाडवा या सणाला विरोध करण्यासाठी संभाजी महाराजाच्या हत्येचा संदर्भ कांही जण देतात. याबाबत पाहीले तर, ग्रेगरीयन कँलेंडर मधील 11 मार्च 1689 रोजी संभाजी महारांजांची हत्या झाली. शालीवाहन शक कालगणनेप्रमाणे त्या दिवशी फाल्गुन वद्य त्रयोदशी / फाल्गुन अमावश्या शके 1610 ही तिथी होती. म्हणजे हत्येच्या दुस-या दिवशी 12 मार्च 1689 म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1611 अर्थात गुढी पाडवा, हा नववर्षारंभ दिन होता. संभाजी महाराजांची हत्या 1689 सालातील पाडव्याच्या अादल्यादिवशी झाली, हे वास्तव आहे. पण त्या दिवसापासूनच पाडवा हा सण सुरू झाला,असे कसे म्हणता येईल ? संभाजी महाराजांच्या हत्येपुर्वी सबंध महाराष्ट्राने 1610 वेळा गुढी उभारली होती! त्यांच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा सणाचा कांहींही सबंध नाही.
धर्मीक प्रथा परंपरेतील शोषणाला विरोध करणे हे योग्यच आहे, पण त्यासाठी वास्तवाचे विपर्यस्त चित्रण नसावे. नाहीतर व्हँलेटाईन डेला विरोध करण्यासाठी कांही वेडे भक्त 14 फेब्रुवारीला भगत सिंगला फाशी दिल्याची धादांत खोटी माहीती मध्यंतरी पसरवत होते. हा तसाच कांहीसा प्रयत्न म्हणावा लागेल.सन 1689 पुर्वीही गुढी उभारली जात असल्याचे अनेक संदर्भ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या लेखनात आढळतात. त्यावर जेष्ठ संशोधक डॉ.आ.ह.साळूंखे यांचे पुस्तक ही प्रकाशित झाले आहे.
ईतिहास हजारों वर्षांचा आहे. प्रत्येक दिवशी ईतिहासात कांहीना कांही घडले आहे. अशा लाखो घटना आहेत लाखो प्रसंग आहेत,पण कोणत्याही कँलेंडर मधे दिवस साधारणपणे 355 ते 365 च आहेत.त्यामुळे विविध वर्षातील एकाच दिवशी,तिथीला,तारखेला एखादी आनंदी आणि एखादी दु:खद घटना असू शकते. पण दोन घटनांचा निरर्थक संबध लावणे चुकीचे आहे.
जगातील प्रत्येक धर्मातील प्रत्येक सणाला एक धार्मिक कथा, आख्यायिका जोडली जाते आणि सांगितलीही जाते . मग तो सण दिवाळी ,दसरा ,पाडवा , रमजान ईद , बकरी ईद , नवरोज , पास ओवर , पतेती , गुड फ्रायडे, इस्टर संडे इ असु. शकतो . यापैकी कोणत्याही सणाचे महत्व सांगणारी आख्यायिका वैज्ञानिक आधारवर टिकत नाही . पण पाडव्याचे निरीक्षण केले तर पाडव्या दिवशीचे पूजाविधी आणि वैदिक परंपरेतील वर्णाश्रम धर्मातील पूजाविधी यात कमालीची विसंगती आहे.कलशाचा आकार,धातू ,वस्त्र याबाबत आग्रही नियम नाहीत,हे तर पूर्वी सांगितलेच पण महत्वपूर्ण बाब अशी कि, पाडव्याला घरात गुढी यजमान उभा करू शकतो,नव्हे तर यजमानच उभी करतो. ती उभी करण्यासाठी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहिताची आवश्यकता नाही. दिवसभर गुढी उभा करून रात्री उतरताना उत्तरपुजेसारखा विधी नाही ,त्यालाही ब्राह्मण बोलावण्याची गरज नाही .
तसेही पहिले तर वेदानुसार मार्गशीर्ष म्हणजेच अग्रहायण या महिन्यापासून वैदिक नववर्ष सुरु होते.गुढी पाडव्या पासून सुरु होणारे नववर्ष वैदिक नव्हे ! वैदिक प्रथा, परंपरांना,अगदी दैवतांना सुद्धा लढा देत ,गुढी आजही दिमाखाने विजयाचे प्रतिक म्हणून उभी आहे आणि दरवर्षी सर्व स्तरातून साजरी केली जाते. उलट वैदिक देवतांना लोकप्रिय होण्यासाठी तिच्या आश्रयाला यावे लागले ही बाब गौरवाची आहे.सर्वाना या गुढी पाडव्याच्या विजय दिनाच्या शुभेच्छा!!!!!!!!!!
© राज कुलकर्णी.
( छायाचित्र: आनंद कोकरे)

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...