ऐतिहासिक वास्तू , { कोल्हापूर संस्थान.}
मेन राजाराम हाईस्कूल ईमारत कोल्हापूर.
२० वर्षे वयाच्या छत्रपतींनी दिडशे वर्षांपूर्वी शिक्षणाचे महत्त्व ओळखून या इमारतीचा पाया रचला होता...
सन १८६६ साली राजाराम महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी कोल्हापूरच्या राजगादीवर 'छत्रपति' म्हणून अभिषिक्त झाले. शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनंतर याच नावाचे ते दुसरे छत्रपती ! राजाराम महाराज हे सुरुवातीपासूनच हुशार व तल्लख बुद्धीचे व शिक्षणाविषयी प्रचंड जागरूक वृत्तीचे होते. राजाराम महाराज गादीवर येण्यापूर्वी कोल्हापूर राज्यात काही प्राथमिक सरकारी शाळा अस्तित्वात होत्या मात्र त्यानंतरच्या शिक्षणाची सोय नव्हती. यामुळे प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबायचे. हि परिस्थिती बदलण्यासाठी महाराजांनी राजधानी कोल्हापूरातच सुसज्ज हायस्कूल उभारण्याचा निर्णय घेतला. लागलीच महाराजांनी सर्व यंत्रणा राबवून वास्तूचा आराखडा तयार केला व दि. १५ फेब्रुवारी १८७० रोजी म्हणजेच आजपासून सुमारे दिडशे वर्षांपूर्वी छत्रपतींच्या राजवाड्यालगतच हायस्कूलच्या इमारतीची पायाभरणी केली. तीच इमारत म्हणजे आजची जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यालगत उभी असणारी 'मेन राजाराम हायस्कूल'ची भव्य व रुबाबदार वास्तू !
या इमारतीच्या पायाभरणी समारंभावेळी महाराजांनी केलेले भाषण हे महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. त्याप्रसंगी महाराज म्हणाले, "ज्या इमारतीचा शिलान्यास मी करीत आहे, त्या इमारतीने कोल्हापूर शहराला मोठी शोभा प्राप्त होणार आहे. अशी सुंदर इमारत विद्यादानाच्या कार्यात उपयोगी पडणार याबद्दल मला विशेष आनंद वाटतो. सध्या विद्येस किती मान मिळत आहे, याची हि सुंदर वास्तू कायमची साक्ष राहिल. विद्यावृद्धी हे किती महत्त्वाचे काम आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे. मला अशी खात्री आहे की शिक्षणप्रसाराला अलिकडे जे प्रोत्साहन देण्यात येत आहे, ते अल्पकालीन ठरणार नाही. लोकांच्या जुन्या समजुती नाहीशा होत जातील व विद्येचा प्रकाश सगळीकडे पडत जाईल." दिडशे वर्षांपूर्वी महाराजांनी व्यक्त केलेल्या या मनोगतातून महाराजांची दूरदृष्टी प्रतीत होते.
या वास्तूची उभारणी सुरू असतानाच छत्रपती राजाराम महाराजांचे वयाच्या केवळ २१ व्या वर्षी अकाली निधन झाले. मात्र इमारतीचे बांधकाम पुढे सुरू राहिले. चार वर्षांमध्ये हि इमारत बांधून पूर्ण झाली. शिक्षणाला प्रतिष्ठेचा दर्जा मिळावा, यासाठी ज्ञानदानाचे कार्य करणारी हि वास्तू भव्य व दिमाखदार असावी अशी महाराजांची इच्छा होती. त्यामुळे काळ्या घोटीव दगडांत अत्यंत कसबी कारागीरांनी बांधलेली हि वास्तू हि प्रत्यक्ष छत्रपतींचे निवासस्थान असणाऱ्या जुन्या राजवाड्यापेक्षाही अधिक भव्य, दिमाखदार व शाही थाटाची झाली होती. राजाच्या राजवाड्यालाही लाजवेल अशी एखाद्या शिक्षणसंस्थेची इतकी देखणी इमारत कदाचित आजही कुठे नसेल. छत्रपती राजाराम महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या हायस्कूलला महाराजांचे नाव देण्याचा ठराव कोल्हापूरच्या जनतेने केला व या हायस्कूलला 'राजाराम हायस्कूल' असे नाव देण्यात आले. नंतरच्या काळात छत्रपती शाहू महाराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी या हायस्कूलमध्ये कॉलेजचे वर्ग जोडून आर्टस् व सायन्सचा अभ्यासक्रम समाविष्ट केला व राजाराम हायस्कूलचे 'राजाराम कॉलेज' झाले. अलिकडच्या काळात शिवाजी विद्यापीठाच्या जवळ राजाराम कॉलेजची नवीन इमारत बांधण्यात आली, तेव्हापासून या ऐतिहासिक वास्तूला 'मेन राजाराम' म्हणून ओळखले जाते. गेल्या दिडशे वर्षांपासून या वास्तूमध्ये विद्यादानाचे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे.
या वास्तू म्हणजे सदैव आपल्या रयतेच्या उद्धाराचे स्वप्न बाळगणाऱ्या छत्रपतींची जीवंत स्मारक आहेत. ती आपण जपली पाहिजेत. आपल्या इतिहासाचे आपण स्मरण ठेवले पाहिजे.
__________________________________________
.........ज्ञानसूर्य फेसबुक पेज.
No comments:
Post a Comment