विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 13 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २१

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग २१
यशवंतराव पवार यांचे वडील आनंदराव हे वरील मोहिमेत होते. ते इसवी सन 1736 च्या जून महिन्यात उज्जैन येथे अपघात मरण पावले. तेव्हा ऑगस्ट महिन्यात बाजीराव पुण्यास आल्यावर यशवंतराव पवार यांना त्यांच्या वडिलांचे सरदारी वर नेमण्यात आले. (मध्य वि.1 पृष्ट 338 व धार दरबार दप्तर) अधिकार मिळाल्यावर लवकरच यशवंतराव पुण्याहून मोहिमेवर निघाले. त्यांचे तारीख 11 सप्टेंबर सतराशे 36 रोजीचे हिंगण्यास पत्र आहे, त्यात आम्ही मजल दर मजल पुढे जातो " हिशोब पाहणे अथवा करणे ते पुण्यास येऊ तेव्हा करू"( राजवाडे खंड 6 लेख 106) असे यशवंतरावांनी लिहिले आहे .यावरून गुदस्त साला प्रमाणे उत्तरेकडील प्रांतात पुन्हा मोहीम चालविण्याकरता ते माळव्याकडे आले असावेत. ठरल्याप्रमाणे पुढे बाजीराव ही इसवीसन 1736 च्या नोव्हेंबरात पुन्हा दिल्लीच्या स्वारीस निघाले. निरनिराळ्या मोगल सरदारांच्या फौजा एकत्र न होऊ देता त्यांना वेगवेगळे गाठुन त्यांचा पाडाव करण्याचा बाजीरावाचा विचार होता ; व त्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या कामांवर आपल्याकडील सरदारांची ही त्यांनी योजना केली होती . इसवीसन सतराशे 37 च्या मार्च महिन्यात मल्हारराव होळकरांना दुआबात सादतखानाच्या मुकाबल्याला पाठविले होते ; व पुढे स्वतः फौज घेऊन एकदम बाजीराव दिल्ली जवळ जाऊन दाखल झाले. यामुळे तेंथे फारच गोंधळ उडाला. बाजीरावांनी झिलच्या तलावा नजिक आपल्या फौजेचा तळ टाकला होता. ही स्वारी कित्येक महिने चालली होती. इसवीसन 1737 एप्रिल महिन्यात या तलावाजवळ जी लढाई झाली त्यात यशवंतराव पवार यांनी चांगलाच पराक्रम गाजवला(ब्र.च.ले .27 तारीख 5/4/ 1737) या स्वारीत देवासचे जिवाजी व तुकोजी पवार हे ही सामील होते .
याचवेळी निजामानेही मोठी फौज तोफखाना घेऊन उत्तरेत येण्याची तयारी चालवली होती. पावसाळा संपताच मोठ्या तयारीनिशी तो माळव्यात चाल करून आला.निजाम येतो असे पाहून बाजीराव ही त्यावर चाल करून जाण्यासाठी फौजांसह निघाले. बाजीराव नेमाडात खरगोन जवळ नर्मदा उतरले. बाजीरावाच्या फौजांची व निजामाची इसवीसन 1737 डिसेंबरात भोपाळ नजीक गाठ पडली. तारीख 13 डिसेंबर 1737 ते 8 जानेवारी 1738 या लढाईत निजामाचा चांगलाच कोंडमारा केला गेला. ह्या लढाईला भोपाळची लढाई म्हणतात ही मराठ्यांच्या इतिहासातील एक प्रसिद्ध लढाई आहे. या लढाईतील यशवंतराव पवारांचा पराक्रम खुप नावाजला होता.( ब्र च ले 33,34,35 व 36) भोपाळची लढाई झाल्यावर तह पुरा करून घेण्याकरिता जिंकलेल्या मुलखात अंमल बसण्याचे काम चालले होते ; ते जुलैपर्यंत आटोपून बाजीराव परत गेले. पवार,शिंदे,होळकर वगैरे सरदार मंडळी पाठीवर ठेवले होते.( मध्य वि.1 पृष्ठ 374)
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...