विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 26 October 2022

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ – इंदोरचे होळकर घराणे : २

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ – इंदोरचे होळकर घराणे : २

पोस्तसांभार :: प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर, ठाणे | मराठा नाणी संग्राहक, अभ्यासक, लेखक, व्याख्याते |  नाणेघाट


 

 

 मराठेशाहीच्या इतिहासातील एक मानाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे इंदूर संस्थानच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. राजमाता जिजाऊसाहेब, येसूबाईसाहेब, ताराराणीसाहेब, ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदेसाहेब आणि इंदूरच्या अहिल्याबाई होळकरसाहेब या मराठेशाहीतील कर्तृत्ववान राज्यकर्त्या स्त्रिया गणल्या जातात.

अहिल्याबाई होळकर !
जसे श्वशुर मल्हारराव होळकर हेदेखील मूळचे महाराष्ट्रातील तद्वत अहिल्याबाई पण मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंढी गावच्या. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला. एका आख्यायिकेनुसार मल्हारबाबांनी जे माळवा प्रांताचे सुभेदार होते, त्यांनी पुण्यास जात असताना छोट्या अहिल्याबाईंना बघितलं आणि त्यांस आपली सून करावी, या हेतूने आपले चिरंजीव खंडेराव याच्यासोबत लग्नबंधनात बांधले. मात्र अत्यंत अल्पकाळात खंडेराव होळकर 1754 मध्ये कुंभेरच्या लढाईत दुर्दैवाने मृत्यू पावले. मल्हारबाबांनी अहिल्याबाईंस तत्कालीन प्रथेनुसार पतीनिधनानंतर चितेवर सहगमन करण्यापासून महत्प्रयासाने रोखले. खंडेराव आणि अहिल्याबाईंच्या मुलाचे नाव होते मालेराव. मात्र पुढे पानिपतच्या संग्रामानंतर इसवी सन 1766 ला मल्हाररावदेखील इहलोक सोडून गेले.

मल्हारबाबांनंतर होळकरशाहीची धुरा त्यांचे नातू मालेराव बघू लागले होते. परंतु दुर्दैवाने तेदेखील अल्पायुषी ठरले आणि अत्यंत अल्पकाळ राज्यकारभार करून 5 एप्रिल 1767 ला मृत्यू पावले. मालेरावांच्या या अल्पशा कालावधीत नाणी पाडली गेली नसावीत, असाच तज्ञांचा अंदाज आहे. आता होळकरशाहीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी अहिल्याबाईंच्या खांद्यावर आली. त्याही धीरोदात्त वृत्तीने समर्थपणे माळवा प्रांतात मराठेशाहीची धुरा वाहू लागल्या. श्वशुर मल्हाररावांचे दत्तकपुत्र आणि आपले दीर तुकोजीराव पहिले यांची त्यांनी सेनापती म्हणून नेमणूक केली आणि त्या स्वतः सुयोग्यपणे प्रशासकीय भाग पाहू लागल्या. इकडे या घडामोडींमुळे होळकरांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड हे गादीला पुरुष वारस हवा म्हणून अहिल्याबाईंवर दबाव टाकू लागले; जेणेकरून गंगाधरपंतांचा राज्यकारभारातील दबदबा वाढेल. याहीपुढे जाऊन त्यांनी राघोबादादांशी संधान बांधून त्यांच्या फौजा माळव्याच्या प्रदेशात आणायला लावल्या. अहिल्याबाईंना या कारस्थानाची माहिती कळताच त्यांनी चाणाक्षपणे आजूबाजूच्या राज्यकर्त्यांकडे मदतीचा हात मागितला आणि त्यांनीही तो तातडीने देऊ केला. अहिल्याबाईंनी तातडीने उदयपूरला असलेल्या तुकोजीरावांना पण माघारी बोलावले. त्याचबरोबर अहिल्याबाईंनी एकीकडे थोरल्या माधवराव पेशव्यांशी संधान बांधताना राघोबादादांनाही चतुराईने आणि धीटपणे एका स्त्रीसोबतच्या युद्धात पराभूत झालात तर सर्वत्र छी-थू होईल, असा गर्भित इशारा दिला. आता राघोबादादांनाही आपली चूक कळली आणि त्यांनी मी सांत्वन करायला आलो होतो युद्धाकरिता नव्हे, असे उत्तर देऊन यशस्वी माघार घेतली.


अहिल्याबाईंनी आपली राजधानी महेश्वर ही केली. या महेश्वरच्या रुपयांवर, नाण्यांवर शिवलिंग आणि बिल्वपत्र छापलेलं असतं. अहिल्याबाई आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे इसवी सन 1795 पर्यंत महेश्वर येथेच राहिल्या. अहिल्याबाईंनी मल्हारनगर येथे ही स्वतःची नाणी पाडली. या मल्हारनगरच्या नाण्यांवर सूर्य छापलेला असतो. मल्हारनगर येथे हिजरी सन अ.क. 1182 – 1183 यावर्षी आणि अ.क. 1195 – 1196 यावर्षीदेखील नाणी पाडल्याचे आढळून येत नाही. त्यावर्षी नाणी का पाडली गेली नसावीत, हे सुयोग्य पुराव्यांअभावी, नोंदी अभावी कळू शकत नाही. समजा, ती त्या वर्षी पाडली गेली असतील, तरीही त्या वर्षांचे एकही नाणे आजतागायत उपलब्ध झालेले नाही. मल्हारनगर नाण्यांवरील छापलेला सूर्य म्हणजेच मार्तंड स्वरूप. मल्हारनगरचे प्रथम पाडले गेलेले/आढळून येणारे नाणे म्हणजे अ.क. 1184 या हिजरी वर्षाचे आहे. महेश्वर मिंट / टांकसाळीत प्रथम पाडले गेलेले नाणे हे हिजरी सन 1180 चे सापडते. महेश्वर आणि मल्हारनगर (इंदोर) या दोन्हीही टांकसाळींच्या तुलनेत मल्हारनगरची नाणी जास्त छापलेली आढळतात. अहिल्याबाईंनी तांब्याची नाणी पण छापली होती. मात्र ती चांदीची नाणी छापायला सुरुवात केल्यानंतर तब्बल 20 – 22 वर्षांनी. यातील काही नाण्यांवर कट्यार तसेच चवरी हे राजचिन्ह आढळून येते. महेश्वरहून राज्यकारभार करीत असताना अहिल्याबाईंजवळ एक अनमोल अशी चंदनाची चवरी होती, असे स्पष्ट उल्लेख आहेत. कदाचित तीच या नाण्यांवर छापली असावी, असा अभ्यासकांचा एक तर्क आहे.

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ - इंदोरचे होळकर घराणे : २
पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ – इंदोरचे होळकर घराणे : २

अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत माळव्याच्या जनतेला एक न्यायाचे, समृद्धीचे, भरभराटीचे राज्य अनुभवायला मिळाले. अहिल्याबाईंनी अतिशय चोखपणे, दूरदृष्टी राखून जवळजवळ 30 वर्षे राज्यकारभार केला. त्या सात्विक, धार्मिक वृत्तीच्या असल्याकारणाने त्यांनी अनेक देवालयांचा, मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पांथस्थ, प्रवाशांसाठी जागोजागी धर्मशाळा उभारल्या. नद्यांवर घाट बांधून मुबलक पाणीपुरवठा होत राहील, याकडे लक्ष दिले. मंदिरांमध्ये नित्यनेमाने पूजाअर्चा सुरू राहाव्यात यासाठी अनेक दाने दिली. माळव्यात रस्ते, किल्ले बांधले, अनेक उत्सव सुरू केले. सतीची कुप्रथा बंद करण्यासाठी सातत्याने लोकजागृती केली. यासाठी रामायण, महाभारताचे दाखलेही दिले. पुढे ब्रिटिशांच्या राजवटीत राजा राममोहन रॉय यांनी पुढाकार घेऊन ही अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केली.

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ - इंदोरचे होळकर घराणे : २
पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ – इंदोरचे होळकर घराणे : २

यावरून अहिल्यादेवींची दूरदृष्टी लक्षात येते. हस्तलिखितं लिहून घेणार्‍यांसाठी भरभक्कम पैसे मोजून त्यांच्याकरवी विविध महत्त्वपूर्ण दुर्मीळ ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात करवून घेतले. अशा जीवनातील विविध बाबींवर उत्तमोत्तम कार्य करून, करवून घेऊन, समाजातील शेवटचा घटकदेखील सुखी व्हावा, यासाठी अवघे आयुष्य घालवून या महाराष्ट्रकन्येने, होळकर राजवटीच्या सम्राज्ञीने आणि माळव्याच्या जनतेच्या मनातील अहिल्यादेवींनी अखेर 70 व्या वर्षी हा नश्वर पृथ्वीलोक त्यागला. नंदादीपाप्रमाणे आपल्या लोककल्याणकारी कार्याने त्यांनी आपले आणि सामान्यांचे जीवन उजळून टाकले. म्हणूनच आजही लोक त्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे अत्यंत आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक म्हणतात.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...