विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 9 November 2022

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ; इंदोरचे होळकर घराणे – भाग १०

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ; इंदोरचे होळकर घराणे – भाग १०

 

प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | नाणेघाट

शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा तळपता सूर्य इसवीसन 1818 मध्ये संपुष्टात आलेल्या पेशवाईच्या रुपाने मावळतीस झुकला आणि व्यापाराच्या उद्देशाने या देशात चंचूप्रवेश केलेल्या परकीय ब्रिटिशांनी अखेर एक-एक स्थानिक सत्तांना नामोहरम करत सर्वसत्ताधीश म्हणून त्यांचा युनियन जॅक सर्वत्र फडकवला होता. कालांतराने मात्र मराठेशाहीच्या आलम हिंदुस्थानात पसरलेल्या राजवटी देखील ब्रिटिशांच्या अस्ताला जाणार्‍या सत्तेसोबत स्वातंत्र्याची, लोकशाहीची नवीन पहाट उगवताना आशानिराशेच्या हिंदोळ्यात झुलताना दिसत होत्या. समृद्ध होळकरशाहीची राजवट देखील याला अपवाद नव्हती.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या कृपाशीर्वादेकरून त्यांचे नातू शाहूछत्रपति यांचे कर्तबगार, पराक्रमी, धडाडीचे, अत्यंत विश्वासू पंतप्रधान पेशवे थोरल्या बाजीरावराऊस्वामींनी मध्य हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्यविस्तारासाठी आद्य पुरुष मल्हारराव होळकर यांना इंदोर येथे जहागीर देऊन मराठेशाहीचा डंका वाजवायला अन् स्वराज्याची पाळेमुळे घट्ट करायला नेमले होते, याला आता जवळपास 140 वर्षे झाली होती. सुरुवातीला नवीनच रुजलेले होळकरशाहीचे हे रोपटे अनेक कर्तृत्ववान राज्यकर्त्यांमुळे स्वतःची विशिष्ट ओळख निर्माण करणारे ठरले होते. या कालावधीत मल्हारबाबा, पुण्यश्लोक अहिल्याबाई, यशवंतराव प्रथम, तुकोजीराव द्वितीय, शिवाजीराव असे नामवंत राज्यकर्ते गादीवर येऊन गेले. हिंदवी स्वराज्याचा चढता वाढता तळपता सूर्य बघून आता तोच सूर्य अस्ताला जाताना आणि परकीय ब्रिटिश सत्तेविरोधात लोकशाहीच्या माध्यमातून पुनःश्च स्वातंत्र्याचा नवीन सूर्य देशाच्या पूर्वांचलावर उगवताना याच सत्ताधीशांनी बघितला होता, बघत होते. स्वतःचे वर्चस्व गाजवण्यापासून आता ब्रिटिशांच्या सहमतीने अस्तित्व राखण्यासाठी सुरू असलेले एतद्देशीय सत्ताधीशांचे प्रयत्न सातत्याने सुरूच होते. इसवी सन 1908 मध्ये महाराजा शिवाजीराव निवर्तले आणि त्यांना पत्नी महाराणी सीता बाईसाहेबांपासून 26 नोव्हेंबर 1890 रोजी झालेले पुत्ररत्न तुकोजीराव तृतीय (आपल्याकडे पूर्वापार दिवंगत आजोबांचे अथवा भावाचे नाव आपल्या मुलाला पुन्हा देण्याची प्रथा आढळते) हे शिवाजीरावांच्या इच्छेनुसार खपवेीश डींरींश र्लेीपलळश्र च्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार बघू लागलेले होते. यानंतर त्यांनी आता 6 नोव्हेंबर 1911 रोजी स्वतंत्रपणे राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 1911 हे वर्ष म्हणजे आपल्यापैकी अनेकांना सुपरिचित असलेल्या ब्रिटनच्या राजाचे ॠशेीसश – 5 ’ ींह / पंचम जॉर्ज अथवा भो पंचम भूपती याचे देखील राज्यारोहणाचे प्रथम वर्ष होय. तुकोजीराव महाराज तिसरे हे देखील ब्रिटिश साम्राज्याच्या या पाचव्या जॉर्जच्या राज्याभिषेकासमयी / उेीेपरींळेप लशीशोपू इंग्लंड येथे उपस्थित होते. त्यांना ब्रिटिश साम्राज्यातर्फे ‘जीवशी ेष ींहश डींरी ेष खपवळर’ या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. तसे बघता तुकोजीराव होळकर दुसरे यांचे मूळ घराणे नाशिक जवळील ‘करंजी’ नामक गावाकडील. आजही अनेक करंजीकर ग्रामस्थ त्यांच्या गावातील होळकरांच्या वारसाने इंदोरच्या राजघराण्याची धुरा वाहिली, याचा सार्थ अभिमान बाळगतात. तुकोजीराव तिसरे यांचे पहिले लग्न महाराणी चंद्रावती बाईसाहेब यांच्याशी 1895 मध्ये झाले. नंतर 1913 मध्ये महाराणी इंदिरा बाईसाहेब यांच्यासोबत दुसरा विवाह झाला. त्यांचा तिसरा विवाह हा आंग्ल पत्नी नॅन्सी अन मिलर यांच्याशी झाला. या आंतरवांषिक प्रेमविवाहाची त्याकाळात देशभर, तसेच जगभर चर्चा होत होती. अखेर नॅन्सी यांना नासिक येथील डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांनी 13 मार्च 1928 रोजी हिंदू धर्माची दीक्षा दिली आणि होळकरांचे परिचित लंभाते कुटुंबियांनी त्यांना दत्तक घेऊन सन्मानाने धनगर समाजात आणले आणि मग लग्नानंतर त्या ‘शर्मिष्ठादेवी’ या नावाने होळकरशाहीच्या महाराणी मानल्या जाऊ लागल्या. तुकोजीरावांनी 26 फेब्रुवारी 1926 रोजी होळकरशाहीचा राज्यकारभार पुत्र सवाई यशवंतराव दुसरे यांच्या हाती सोपवला. त्यांना एक मुलगा आणि 6 मुली अशी अपत्ये होती. पुढे अनेक वर्षांनी 21 मे 1978 रोजी त्यांचा पॅरिस मुक्कामी वयाच्या 88 व्या वर्षी मृत्यू झाला. परंतु तुकोजीरावांनी त्यांच्या कारकीर्दीत कोणतीही नाणी पाडल्याची नोंद नाही, हे एक मोठेच आश्चर्य म्हणायला हवे. त्यांनी अभिषिक्त राजाच्या अधिकारात आपली नाणी का पाडली नसावीत, याची कोणतीही विश्वासपात्र कारणमीमांसा उपलब्ध होऊ शकत नाही.
सवाई यशवंतराव महाराज दुसरे यांचा जन्म 6 सप्टेंबर 1908 रोजी इंदोर येथे झाला. ते वडील तुकोजीराव तिसरे यांच्या अनुज्ञेने 26 फेब्रुवारी 1926 रोजी होळकरशाहीच्या गादीवर, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यापूर्वी होळकरशाहीचे अखेरचे महाराजा म्हणून विराजमान झाले. मात्र, अल्पवयामुळे सुरुवातीला प्रमुखमंत्री ऐतमद उद्दौला, रायबहादूर एस. एम. बाफना आणि होळकरशाहीचे मंत्रीमंडळ हेच राज्याचा कारभार बघत होते. लवकरच श्रीमंत महाराजाधिराज राजराजेश्वर श्री सवाई यशवंतराव होळकर बहादूर यांनी 9 मे 1930 रोजी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. यशवंतराव दुसरे यांनी आपल्या कारकीर्दीत फक्त दोनच, तीदेखील तांब्याची नाणी पाडलेली आढळतात. विक्रमसंवत 1992/ इसवी सन 1935 साली पाव आणा आणि अर्धा आण्याच्या या मशिनद्वारे पाडलेल्या सुबक नाण्यांवर त्यांची होळकरशाहीची पगडी घातलेली प्रतिमा छापलेली आहे. याच बाजूस प्रतिमेच्या बाजूने वर्तुळाकार पद्धतीत ‘श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर बहादूर’ आणि इंदोर ही लिखावट आहे. मागील बाजूस नाण्याच्या कडेने असलेल्या नक्षीदार डिझाइनच्या मध्यभागी तीन ओळीत “सन 1935 / अर्धा आणा / पाव आणा आणि संवत 1992” हा मजकूर छापलेला आहे. राजेशाही पेहरावात, डौलदार अशी पगडी असलेल्या यशवंतरावांची छबी या नाण्यांवर फारच उठून दिसते. अतिशय उत्कृष्ट अशी दोनच प्रकारची, मूल्याची नाणी त्यांनी पाडली होती. लवकरच इंदोरचे अन्य काही संस्थानांसोबत आधी मध्य भारतात विलिनीकरण करण्यात आले. या मध्य भारताचे उपराज्यप्रमुख म्हणून महाराजाधिराज सवाई यशवंतरावांची नेमणूक केली गेली होती. त्यांना महाराणी संयोगिताबाई, मार्गारेट आणि युफेमिया (र्एीहिशाळर) होळकर अशा तीन पत्नी होत्या. तसेच, यशवंतराव महाराजांना युवराज शिवाजीराव ऊर्फ प्रिन्स रिचर्ड होळकर हे सुपुत्र आणि उषादेवी या कन्या होत्या. पुढे अन्य संस्थानांप्रमाणेच होळकरांचे हे वैभवशाली, नामवंत इंदोर संस्थान इसवी सन 1947 मध्ये देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले.
यशवंतराव महाराज दुसरे यांचा 5 डिसेंबर 1961 रोजी मुंबई येथे मृत्यू झाला. अशा रीतीने होळकरशाहीचा, पर्यायाने मराठेशाहीचाही हा एक सुवर्णअध्याय इतिहासाच्या पानांमध्ये कायमस्वरूपी नोंदला गेला.


No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...