विनोद जाधव एक संग्राहक

Monday 31 July 2023

सयाजीराव महाराजांच्या नजरेतून छत्रपती शिवराय

 


सयाजीराव महाराजांच्या नजरेतून छत्रपती शिवराय
- बाबा भांड
(मो- 9881740604)
महाराष्ट्रातील मराठा शेतकरी कुटुंबातून बडोद्याचा राजा झालेल्या सयाजीरावांनी आयुष्यभर मातृभूमीसाठी कष्ट घेतले. महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांना, त्याबरोबर आपण ज्या समाजात जन्मलो, त्या समाजाची उन्नती होण्यासाठी आयुष्यभर मदत केली.
बडोदा संस्थानातून देशात तसेच परदेशात शिष्यवृत्ती देऊन मराठा समाजातील व इतर अनेकांना शिक्षणासाठी पाठवले. त्या शिष्यवृत्तीसाठी त्यांनी मोठ्या रकमेचा मराठा फंड उभारला. त्यामध्ये प्रांताचा विचार न करता मदत केली. महाराजांच्या या मदतीमुळे अनेक व्यक्ती उच्चविद्याविभूषित झाल्या.
बडोदा संस्थानात तसेच परदेशात शिक्षण घेतलेल्या या व्यक्तींनी महाराजांच्या सल्ल्यानुसार समाजबांधवांसाठी महाराष्ट्रात आणि इतर भागात जेथे मराठा समाज आहे तेथे शिक्षण संस्था काढल्या. यातून लाखो मराठा विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. आणि आपली उन्नती साधली.
महाराजा सयाजीरावांनी देशभरातील अनेक युगपुरुषांना, संस्थांना, विद्यार्थ्यांना आयुष्यभर सढळ हाताने कोट्यावधींची मदत केली. सुप्रशासनातून जनकल्याणाचा ध्यास देत असताना छत्रपती शिवरायांच्या कार्याचा इतिहास त्यांचा आदर्श होता. त्यांचे प्रशासन, जनकल्याणाची कामे, छत्रपतींचा आदर्श समोर ठेवूनच केलेली उभारणी होती. याची कबूली सयाजीरावांनी स्वत:च्या लेखनातून, लिहिलेल्या पत्रातून आणि वेळोवेळी केलेल्या भाषणांतून दिसून येते. छत्रपती शिवरायांच्या घराण्याबद्दल त्यांना अत्यंत आदर होता. त्यातून या राजघराण्याशी नाते संबंध पुढे आणखी घट्ट झाला. छत्रपती शाहू महाराजांचे राजपुत्र राजाराम महाराज यांचा सयाजीराव यांच्या नातीशी विवाह झाल्याने ही दोन राजघराणी जोडली गेली.
चौसष्ठ वर्षे एक सार्वभौम राजा आणि शिक्षण, प्रशासन, शेती-उद्योग, न्याय, सामाजिक सुधारणा, दातृत्त्व, राष्ट्रप्रेम या माध्यमातून आपला वेगळा ठसा निर्माण करणारे सयाजीराव गायकवाड एक दूरद्रष्टी राजा होते. हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारलेल्या छत्रपती शिवरायाबद्दल त्यांना खूप आदर होता. त्यांचे ते आदर्शस्थानच होते. सयाजीराव यांनी शिवरायासंबंधी वेगवेगळ्या प्रसंगी व्यक्त केलेले विचार आज आपण बघणार आहोत. ते म्हणाले,
- शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून पुष्कळ बोध घेण्यासारखा आहे. त्यांच्या जन्मापूर्वी इथली स्थिती कशी होती, त्यांनी अल्पवयात शिक्षण, आकलनातून समाजहितासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले.
- परमेश्वराचे म्हणा किंवा निसर्गाचे म्हणा कायदे हे नित्य व भेदातीत आहे. आपण ते नियम मोडले तर शिक्षा ठरलेलीच. आजचा दुष्काळ त्याचाच भाग आहे.
- निसर्गाचे ज्ञान हे पराक्रमावर साध्य आहे, जे शिवरायांनी ओळखले होते.
- खूप पूर्वी अकबराने शीख, हिंदू आणि मुसलमानांच्या एकीतून देशहीत साधले होते.
- तोच संदेश संत तुकाराम, नरसिंह मेहता, कबीर, तुळशीराम, मीराबाई, यांनी समता-बंधूत्वाचा दिला होता.
- शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या बाजूने लढा देताना सगळ्यांना बरोबर घेण्याचा समभावतच दाखविला होता.
- शिवाजी महाराजांचे हे धोरण आपल्या राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेचे द्योतक आहे.
- म्हणून मी शिवकाळास आपल्या राष्ट्रीयतेचा शुभप्रभात काळ समजतो.
- हिंदू या नावाची काही राष्ट्रासारखी चीज आहे, हे शिवकाळातच प्रथम समजले.
- शिवरायांचा आदर्श पुढे चालू ठेवायचा असेल तर,
- आपल्या दोषाबद्दलही थोडे बोलावेच लागेल.
- आपापल्या क्षेत्रातील कर्तव्य पालन आणि स्वार्थ त्याग या उच्च ध्येयाची सांगड घातली पाहिजे.
- अज्ञान आणि पूर्वग्रहांच्या बेड्या तोडून टाकण्याचा प्रयत्न करा.
- अज्ञानासोबत खुळ्या समजूतींना हाकलून लावा.
शिवाजी महाराजांच्या काळातली वाङ्मय निर्मिती
- जेव्हा राष्ट्रीय भावना व एक राष्ट्रीयत्वाची जाणीव जागृत असते, तेव्हाच सर्व कला प्रमाणेच वाङ्मयाचीही भरभराट होते.
- शिवाजी महाराजांच्या अमदानीचा काळ हा महाराष्ट्रीय लोकांचा परमोत्कर्षाचा काळ होता.
- युद्धशास्त्राच्या दृष्टीने अपूर्व अशी करामत मराठ्यांनी दाखवली. राजसत्ता सुसंघटित केली.
- मराठी राजकारणाचा हाच उज्ज्वल काळ होता.
- याच काळात मराठी वाङ्मयाच्या बाह्य किंवा बोध स्वरूपात मोठी प्रगती झाली.
- जातीधर्मांची तटबंदी पाडण्याचे काम संत साहित्याने याच काळात केले.
- ‘श्री छत्रपती शिवरायांचे विचार आकुंचित नव्हते.’
- ‘त्यांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. त्याप्रमाणे आपण सर्व देश बांधवांच्या कल्याणाकरिता प्रयत्न करावयास हवे. ते सर्व आपलेच बंधू आहेत.’
- ‘सर्व मनुष्यमात्र एकच आहेत. सर्वांवर दया करावी. दुसर्या विषयी विसर पडता कामा नये.’
- ‘निरनिराळ्या जाती या देशाच्या शरिराचे अवयवच आहेत.’
- ‘देशाची स्थिती सुधारायची असल्यास येथील सर्व लोकांची स्थिती सुधारली पाहिजे.’
- शिवाजी महाराजांच्या वेळेस एकाच जातीने, परिस्थिती घडवून आणली नव्हती.
- शिवरायांनी मराठे, ब्राह्मण, शिंपी, दर्जी, न्हावी, महार, चांभार वगैरे सर्व जातींच्या मदतीने स्वराज्याची पायाभरणी केली.
- सर्व जातींच्या मदतीने समाजाचा उत्कर्ष साधता येतो.
बडोदे येथे श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावरण प्रसंगी महाराजांचे विचार
- शिवाजी महाराज हे एक महाराष्ट्रीय देशभक्त होते.
- ते खडकाळ कंगाल देशात जन्मले. कणखर वृत्ती आणि डामडोल न दाखविणार्या मराठ्यांचे वंशज, झाडांच्या मुळांचा आणि मराठ्यांचा जन्मभूमीशी दृढसंबंध असतो.
- मराठ्यांना शिवप्रभूसारखा देशभक्त व कुशल सेनानायक पुढारी लाभला.
- त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देवून मराठ्यांचे संघटित राष्ट्र निर्माण केले.
- सर्वधर्म जातींच्या खंबीर मावळ्यांच्या मदतीने हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोविला.
- राजा खाजगी आयुष्यात धुतल्या तांदळा सारखा शुद्ध राहतो. हे शिवरायांनी केले.
- शिवराय जाज्ज्वल धर्म निष्ठ असूनही तितकेच परधर्म सहिष्णू आणि प्रजावत्सल होते.
- लढाय्यातून थोडी फुरसत मिळाली की प्रजाहीत आणि राज्य व्यवस्था सुयंत्रीत करायचे.
- समकालिन सत्ताधिकारी व अनुयायी वर्गापेक्षा शिवाजी महाराज कितीतरी पटीने श्रेष्ठ होते.
- इतके असूनही दीर्घकाळ टिकेल असे स्वराज्य मंदिर ते बांधू शकले नाहीत.
- मराठी सम्राज्याचा पाया त्यांनी भक्कम घातला; पण त्यांच्या पहिल्या शाहू महाराजांनी (1707-1749) यांनी राज्य इमारत उभारली.
- पण हे साम्राज्य दोनशे वर्षे टिकू शकले नाही, हाही इतिहास आहेच.
- साम्राज्य न टिकण्याचे कारण, आपसातील भांडणं, दुही, शत्रू पक्षास मदत करणे
- तरीही शिवाजी महाराज तत्कालिन नवयुगाचे व लोकप्रवृत्तीचे प्रतिनिधी होते.
- हिंदूस्थानातील त्या काळातील एक युगप्रवर्तक राजा होते, हा इतिहास आहे.
- पुणे येथील रा. गंगाराम भाऊ म्हस्के यांच्या सूचनेवरून मी मराठे लोकांकरिता पुण्यात शिष्यवृत्या (1885 ते 1939 ) दिल्या.
- त्यावेळी प्रथम आम्हास उच्चशिक्षण घेण्यासाठी मराठा विद्यार्थी मिळेनात. त्यामुळे खालच्या प्रतीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्या देवू लागले.
- पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी थोडे विद्यार्थी मिळू लागले.
- आपल्यातील मुले या करिता पुढे आले पाहिजे.
- कोणतीही नवीन गोष्टीची सुरुवात केली की लोक प्रथम टीका करतात. पण परिणाम चांगला झाला असे नजरेत आले की न्यायी माणसे चांगले म्हणू लागतात.
- आपला समाज संपत्तीने व बुद्धीने हीन झालेला आहे. समाजास शिक्षण घेण्यासाठी पैसा पाहिजे. मी मदत करेनच; आपणही गावातल्या मंडळींनी प्राथमिक शाळा काढाव्यात.
- मी सव्वा लाख रुपये देवून मराठा फंडाची सुरुवात करीत आहे. यातून शिष्यवृत्या सुरू करता येतील.
- हिंदुस्थानास जर उर्जितकाळ यावयाचा असेल तर तो शिक्षणामुळेच होऊ शकेल. त्याकरिता मी बडोदे राज्यात सक्तीचे मोफत शिक्षण सुरू केले आहे.
- प्रत्येक क्षेत्रात अडचणी येतातच. त्यातूनच मार्ग काढला पाहिजे.
- आपण शारिरीक व मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
- सुशिक्षित लोकांची शारीरिक शक्ती बरीच कमी असते.
- एका सामान्य मराठ्याने एका संबंध राष्ट्राचा भाग्यविधाता व्हावे. तत्कालिन सत्ताधिशांचा विरोध असताना आपल्या दुर्बळ, असंघटित लोकांना सुसंघटित राष्ट्राच्या पंगतीला बसविण्याचे, असामान्य कार्य छत्रपती शिवरायांनी केले.
- आज शिवचरित्राची शिकवण काय घ्यायची?
- दुर्बळांना एकत्र करा. समविचारींना सोबत घ्या. केवळ पोटार्थी लोकांना चाकरीस ठेवावे. त्या सर्वांना देशभक्ती आणि देशप्रेमाने प्रेरित करावे. आपल्या शक्तिचा उपयोग आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी करावा.
- आजही आपापल्या क्षेत्रात पराक्रम करायला खूप संधी आहे.
शिवरायांचा गमिनीकावा महाराजा सयाजीरावांनी अंगिकारला
- राज गोपालचारी, स्वतंत्र भारताचे गर्व्हनर जनरल म्हणाले, हिंदुस्थानात दोन खरे राजे झाले. ते आहेत छत्रपती शिवराय आणि सयाजीराव गायकवाड.
- शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारले, तर सयाजीराव आधुनिक भारताचे शिल्पकार ठरले.
- एक शेतकर्याचा मुलगा ते आयुष्यभर जनकल्याणातच आपला मोक्ष शोधणारा हा राजा. त्याने हिमतीने आणि शिवरायांच्या गमिनीकाव्याने ब्रिटिश सत्तेशी संघर्ष केला. ब्रिटिश सत्तेने या राजाला अडचणीत आणण्यासाठी जंगजंग पछाडले; शिवरायाचा गमिनीकावा त्यांच्या अंगी असल्याने, ब्रिटिश सत्ता हतबल झाली.
*****

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...