विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 January 2024

बांडे निशाण.!

 

  बांडे निशाण.!
 
 
आपल्यापैकी अनेकांना अजूनही हे माहित नाही की, संपूर्ण जगाच्या इतिहासात अभिमान बाळगावा अशी राजवट ज्या इंदौरच्या होळकर घराण्याची होती, त्या होळकरांचा "ध्वज" कोणता होता ?
अज्ञानाने आणि अनावधानाने आपण 'पिवळा ध्वज' हाच होळकरांचा किंवा धनगरांचा म्हणून स्विकारतो.
परंतु , इतिहास काही वेगळेच सांगतो.
काय आहे इतिहासातील खरे सत्य ???
💁‍♂💁‍♂💁‍♂💁‍♂💁‍♂💁‍♂💁‍♂💁‍♂
होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर लहानपणी पित्याच्या मृत्युनंतर आपले होळ गांव ( ता.फलटण जि. सातारा) सोडून आई जिवाईसह आपले मामा बारगळ यांचे आश्रयास तळोदे येथे खानदेशात गेले.
भोजराज बारगळ हे पेशव्यांचे सरदार कदमबांडे यांचे सैन्यांत ५० स्वारांसह शिलेदार होते.मल्हारराव यांनी काही वर्षे मेंढपाळ, शेतीमधील कामे करत करत,
घोडेस्वारी व हत्यार (तलवार, बाण, भाला, इत्यादी) चालविण्याचे शिक्षण घेतले. त्यात वाकबगार झाल्यानंतर मामांबरोबर सरदार कदमबांडे यांचे सैन्यांत चाकरी सुरू केली.
उत्तरेकडील एका मोहिमेत मल्हाररावांचा युध्दपराक्रम, चपळाई, साहस, संघटनकौशल्य पाहून थोरले बाजीराव पेशवे खूश झाले. त्यांनी बारगळांकडून 'स्वतंत्र सरदार करतो' म्हणून मल्हारराव यांना आपल्याकडे मागून घेतले.भाच्याचे हित पाहून बारगळांनी त्यास संमती दिली.
सरदार कदमबांडे यांचेकडून पेशव्यांकडे जाण्यापूर्वी मल्हारराव अनुमती घेण्यासाठी कदमबांडे यांचेकडे गेले असता, त्यांचा गौरव करून कदमबांडे म्हणाले, " तुमच्या शौर्यावर आणि गुणांवर आम्ही बेहद्द खुष आहोत. तुमच्या गौरवार्थ तुम्हांस काही भेट द्यावे, असे फार वाटते. आपणांस काही हवे असेल तर नि:संकोच मागा."
यावर मल्हारराव यांनी विनम्रपणे परंतु पराक्रमी व स्वाभिमानी पुरूषास साजेल असे उत्तर दिले.ते म्हणाले, "आपले आशिर्वादच आमच्याठी लाखमोलाची भेटवस्तू आहे. पण याऊपरही स्वामींच्या मनात काही द्यावयाचेच असेल तर, ज्या निशाणा खाली आम्हांस प्रथम तरवार गाजविण्याची आणि शौर्य दाखविण्याची संधी मिळाली,ते आपले निशाण वापरण्याची आम्हांस अनुमती द्यावी.श्री मल्हारी मार्तंड यांना साक्ष ठेवून सांगतो की, या निशाणाचा सन्मान आम्ही कायम उंचावत ठेवू. त्यास कधीही कमीपणा येवू देणार नाही."
मल्हाररावांच्या या उत्तराने अतिशय प्रसन्न मनाने सरदार कदमबांडे यांनी आपल्या देवघरातील चांदीच्या दंडावर असलेले लालपांढरे बांडे निशाण ( बांडे = कदमबांडे यांचे ) ढाल- तलवार, शेला-पागोटे यांसह देवून मल्हारराव यांचा यथोचित सत्कार करून आशिर्वादपूर्वक सन्मानाने रवानगी केली.(इ.स. १७२५)
पुढचा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. आपल्या आयुष्यात बावन्न युध्दे करून ती सर्व जिंकण्याचा विश्वपराक्रम सुभेदार मल्हाररावांनी केला तो याच बांडे निशाणा खाली.! थोरल्या बाजीराव पेशव्यांनी उत्तर भारतात केलेल्या प्रत्येक स्वारीच्या वेळी आघाडीवर होते ते मल्हारराव होळकर आणि त्यांचे हेच बांडे निशाण.!! एवढेच नव्हे तर रघुनाथराव पेशव्यांच्या
उत्तर भारतावरील स्वारीत अटकेवर विजय मिळवला तेंव्हाही आघाडीवर होते ते मल्हारराव होळकर आणि हेच बांडे निशाण.!!!
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरानंतर राजकारण, धर्मकारण, न्यायकारण, अर्थकारण, जलसंवर्धन, पशु-पक्षी-वृक्ष संवर्धन आणि मानवता यांमध्ये विश्ववंद्य कार्य करणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रजाहितदक्ष गौरवशाली इतिहासाचा (इ.स.१७६७-१७९५)साक्षी होता हाच बांडा ध्वज.!!!
छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर राज्याभिषेक करून घेवून छत्रपती बनलेले (इ.स.१७९७-१८११) एकमेव सिंहासनाधिश्वर महाराज श्रीमंत यशवंतराव होळकरांनी संपूर्ण जगावर राज्य करणा-या ब्रिटीशांना पळता भूई थोडी करून नऊ युध्दांमध्ये नामोहरम केले ते याच लाल-पांढ-या बांड्या निशाणाच्या साक्षीने.!!!
पुढे महाराज यशवंतराव यांची कन्या पहिली भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी भिमाबाई होळकर यांनी ब्रिटीशांना आव्हान दिले, तेंव्हा त्यांच्या सैन्याच्या अग्रभागी होते ते हेच बांडे निशाण.!!!
होळकर घराण्यातील चौदा राजांच्या जनहितैषी राज्यकारभाराचे २२२वर्षे (इ.स.१७२५-१९९४७) साक्षीदार असणारे हे बांडे निशाण.!
भारत स्वतंत्र झाल्यावर महाराजा यशवंतराव होळकर (द्वितीय) यांनी इंदौर संस्थान भारतीय संघराज्यात सम्मिलीत करून हे बांडे निशाण भारत सरकारच्या स्वाधीन केले.भारतीय संघराज्यामध्ये प्रमुख संस्थानांच्या काही प्रतिकात्मक बाबींचा समावेश करण्यात आला. होळकर संस्थानच्या जागेवर ( रायसीना भाग ) उभ्या असलेल्या राष्ट्रपती भवनातील भारताच्या तिन्ही सैन्यददलांचे प्रमुख असणा-या राष्ट्रपतीं पथकाचा ध्वज म्हणून बांडे निशाण स्विकारण्यात आले.!!!
१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिना निमित्त किंवा २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या संचलनामध्ये राष्ट्रपती पथकाबरोबर तुमच्या-माझ्या अभिमानाचा विषय असणारे हे बांडे निशाण दिमाखाने फडकत असते.!
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणारे संचलन अवश्य पहा आणि त्या ध्वजामागील गौरवशाली इतिहास जाणून घ्या व इतरांनाही समजावून सांगा.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...