विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 28 April 2024

#उत्तरेतील_मराठ्यांचा_दरारा

 


#उत्तरेतील_मराठ्यांचा_दरारा
पानिपतच्या युद्धानंतर उत्तरेत मराठ्यांची सत्ता थोडीशी कमकुवत झालेली होती, उत्तरेतील काही सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांचे वर्चस्व जुगारून स्वतंत्र होण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. उत्तरेत मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक होते आणि हे कार्य महादजी शिंदे यांनी केले हे प्रकर्षाने जाणवते. उत्तरेतील या मोहिमेत महादजी शिंदे यांच्याबरोबर अनेक मराठा सरदार होते पण विशेषतः महादजी शिंदे यांनी उत्तरेत आपले अस्तित्व आणि कर्तबगारी सिद्ध केलेले दिसून येते..
महादजी शिंदे यांनी उत्तरेत प्रवेश करताच प्रथम मराठा अंमलाखाली असलेल्या प्रदेशातून खंडणी वसूल करण्याचे काम केले. पानिपत युद्धानंतर काही राजांनी खंडणी दिलेली नव्हती ती महादजी शिंदे यांनी वसूल करून पहिल्यांदा मराठ्यांचा वचक निर्माण केला ( १७६९-१७७०)
पानिपतच्या युद्धानंतर नजीबखान हा दिल्लीत वजीर म्हणून काम करत होता पण काही कारणाने त्याने आपल्या मुलाला म्हणजे झबेताखान यास ही जबाबदारी सोपवून तो नजीबाबाद येथे राहण्यासाठी गेला होता. मराठ्यांनी उत्तरेत प्रवेश केलेला समजतास नजीबखान हा चिंतेत पडला, कारण त्याच्या मदतीस आता अब्दाली पुन्हा येऊ शकत नव्हता आणि त्यातच नजीबखानाचा ह्याचा मृत्यू झाला.( १७७० )
मराठ्यांनी आता दिल्लीवर आक्रमण करण्याचे ठरवले, त्याचवेळी महादजी शिंदे यांनी इटावा भाग जिंकला. मराठे वरचढ होत आहेत हे दिसताच झबेताखान याने दिल्लीतून पळ काढलेला होता आणि तो आता मराठ्यांच्यावर आक्रमण करण्याचा विचार करू लागला. दुसरीकडे महादजी शिंदे यांनी अहमदखान बंगश यास वटणीवर आणले, बंगश हा मराठयांना विरोध करू शकत नव्हता त्याने पानिपतनंतर जिंकलेला भाग मराठ्यांना परत केला. अशाप्रकारे दाओबमधील प्रदेश मराठयांनी पुन्हा काबीज केला आणि आपली सत्ता पुन्हा स्थापन केली.( १७७०- १७७१ )
१७७२ मध्ये मराठयांनी शुक्रताल काबीज केले, शुक्रताल येथे महादजी शिंदे यांचे बंधू दत्ताजी शिंदे यांचा मृत्यू झाला होता त्याचा बदला महादजी शिंदे यांनी घेतला, या युद्धातून झबेताखान याने पळ काढला. त्यानंतर महादजी शिंदे यांनी नजीबखान याच्या अंमलात असलेले शुक्रताल, फत्तरगढ व घोसगड हे बळकट किल्ले देखील काबीज केले. अशाप्रकारे मराठ्यांनी पुन्हा एकदा उत्तरेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
#पाटीलबुवा

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...