विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 March 2026

“बसरूर स्वारी”

 २२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी १६६५...

बखरीतील जळपती सर्जा शिवछत्रपतींची,

“बसरूर स्वारी”....
🚩

इ.स.१६६५ च्या फेब्रुवारी महिन्यात शिवाजी महाराजांनी जो बेदनुरकरांच्या बार्सिलोर (बसरूर) बंदरावर आरमारी हल्ला चढवला, त्या मोहिमेची हकीकत सभासद नोंदणी करतो, पुढे बिदनुरी शिवाप्पा नाईक जगम होता, त्याचे शहर बसनुर (बसरूर) म्हणून थोर नामांकित चालले. दर्या किनारा, तिथे पाळती पाठवून पाळती आणून वरघाटे जाता मार्ग नाही म्हणून पाणियातील आपली जहाजे आणून सिद्ध करून, आपण राजा खास जहाजांत बसून जाऊन बसनुरास एकाएकी दिवस उगवतीला गेले. शहराचे लोक बेहुशार होते, एकाएकी जहाजातून उतरले, शहर मारिले. एक दिवस शहर लुटून फन्ना केला. जैसी सुरत मारून मालमत्ता आणली, त्याप्रमाणे बसनुरची मत्ता, अगणित माल, जडजवाहीर, कापड, जिन्नस घेऊन देशास आले. मत्ता सर्व पाहता दोन कोटी होनांची आणली...!

बसनुरची मोहीम फत्ते करून छत्रपती शिवाजी महाराज प्रथम गोकर्ण महाबळेश्वर येथे पोहचले, ४००० पायदळ आणि वाटेत लागणाऱ्या नद्या ओलांडण्यासाठी १२ छोट्या तरांडी सोबत घेत महाराज अंकोल्यास आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः हे ४००० पायदळ घेऊन कारवारकडे कूच केली. मराठा आरमार हे बसनुर मोहिमेत मिळालेली संपत्ती घेऊन २१ फेब्रुवारीच्या आधीच कारवार ओलांडून पुढे गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज कारवारकडे निघाल्याची बातमी कळताच इंग्रज धास्तावले, काही व्यापाऱ्यांनी आपला माल, रोकड इतर चीजवस्तू मस्कतच्या इमामाच्या जहाजावर भरले. त्याच दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारी १६६५ रोजी इंग्रजांच्या नशिबाने शेरखान हा बहलोलखानाच्या आईला मक्केच्या यात्रेला जाण्यासाठी गलबताची सोय करण्यासाठी कारवारला आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी २१ फेब्रुवारीला काळी नदी पार करून सदाशिवगड काबीज केला. अचानक कामा निमित्त आलेल्या शेरखानास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाची माहिती समजतास खानाने इंग्रजांना निरोप पाठवून खाडीचे रक्षण करण्यास सांगितले, आपल्या आत्मरक्षणाची व्यवस्था लावून शेरखानाने आपण कारवारला आलो आहोत आपण कारवार शहरातून जाऊ नये असा महाराजांना निरोप पाठवला...

छत्रपती शिवाजी महाराजांना काळी नदीच्या जवळच इंग्रजांची व कंगोदेशाची अशी दोन गलबते नांगरून पडलेली दिसली, ही गलबते आपल्या ताब्यात द्यावीत असा निरोप महाराजांनी शेरखान यास पाठवला. शेरखानाने महाराजांचा गलबत ताब्यात देण्याचा निरोप इंग्रजांकडे पाठवला असता इंग्रजांनी उद्दामपणे निरोप पाठवुन गलबते देण्यास नकार कळवला. इंग्रजांचा उर्मट निरोप पोहचात, त्यांनी कारवार भाग सोडण्यापूर्वी या इंग्रजांची गुर्मी उतरवण्याची ठरवले, महाराज आपले पुढे गेलेले आरमार बोलवतात की काय अशी भीती इंग्रज आणि शेरखानास वाटू लागली. शेरखानाने इंग्रजांची समजुत घातली आणि कारवारच्या व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा अर्पण करत १२२ पौंड खर्च म्हणून महाराजांकडे पाठवण्यात आला. या सगळ्या घटना घडलेल्या इतिहासात नोंद असलेल्या तारीख आहेत २१ आणि २२ फेब्रुवारी १६६५...

स्वराज्यावर मिर्जाराजे जयसिंग हा चालून येत आहे. हे समजतास छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ फेब्रुवारी १६६५ रोजी कारवार सोडले...

―――――――――――――
#इतिहासकर्ते_मरहाट्टे #बसरुर_स्वारी
#छत्रपतीशिवाजीमहाराज #आरमार
#गडवाट #रणमार्तंड_मरहट्टे 

No comments:

Post a Comment

“बसरूर स्वारी”

  २२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी १६६५... बखरीतील जळपती सर्जा शिवछत्रपतींची, “बसरूर स्वारी”.... इ.स.१६६५ च्या फेब्रुवारी महिन्यात शिवाजी महार...