छत्रपती शिवाजी महाराजांचा कौलनामा ( राज मेमाणे )
आज शिवजयंती निमित्त श्री शिवाजी महाराजांच्या पत्राविषयी थोडसं. मागील वर्षी जून महिन्यात मला शिवाजी महाराजांचे अप्रकाशित पत्र पेशवे दप्तरात सापडले. हे पत्र कौलनामा या ऐतिहासिक पत्र प्रकारात मोडते. कौलनामा म्हणजे आश्वासनपत्र . या पत्रातील मजकुरात जी हकीकत आहे तिचा सारांश पुढीलप्रमाणे : हा कौलनामा शिवाजी महाराजांनी जेजुरीचा पाटील सूर्याजी माळवदकर याला दिलेला आहे. दौंडज गावचा पाटील मालजी माळवदकर हा सुर्याजीच्या भाऊबंदापैकी एक होता. त्याने लावणी आणि खंडणीचे 300 पातशाही होन सरकारात भरले नव्हते. म्हणून महाराजांच्या सैनिकांनी त्याला मौजे परींचे येथील कोतवालीत कैदेत ठेवले. त्याला सोडविण्यासाठी सूर्याजी हा जामीन राहिला होता. परंतु मालजी कैदेतून सुटून आल्यावर पळून गेला. त्याला शोधण्यासाठी महाराजांचे हुजरे आणि सूर्याजी त्याच्या मागावर पडतुर प्रांत येथे गेले. तिथे मालजीने महाराजांच्या हुजऱ्यावर आणि सुर्याजीवर मारेकरी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.
आज शिवजयंती निमित्त श्री शिवाजी महाराजांच्या पत्राविषयी थोडसं. मागील वर्षी जून महिन्यात मला शिवाजी महाराजांचे अप्रकाशित पत्र पेशवे दप्तरात सापडले. हे पत्र कौलनामा या ऐतिहासिक पत्र प्रकारात मोडते. कौलनामा म्हणजे आश्वासनपत्र . या पत्रातील मजकुरात जी हकीकत आहे तिचा सारांश पुढीलप्रमाणे : हा कौलनामा शिवाजी महाराजांनी जेजुरीचा पाटील सूर्याजी माळवदकर याला दिलेला आहे. दौंडज गावचा पाटील मालजी माळवदकर हा सुर्याजीच्या भाऊबंदापैकी एक होता. त्याने लावणी आणि खंडणीचे 300 पातशाही होन सरकारात भरले नव्हते. म्हणून महाराजांच्या सैनिकांनी त्याला मौजे परींचे येथील कोतवालीत कैदेत ठेवले. त्याला सोडविण्यासाठी सूर्याजी हा जामीन राहिला होता. परंतु मालजी कैदेतून सुटून आल्यावर पळून गेला. त्याला शोधण्यासाठी महाराजांचे हुजरे आणि सूर्याजी त्याच्या मागावर पडतुर प्रांत येथे गेले. तिथे मालजीने महाराजांच्या हुजऱ्यावर आणि सुर्याजीवर मारेकरी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.
सूर्याजी आणि हुजरे कसेबसे जीव वाचवून पळून आले. परंतु आल्यावर हुजऱ्यांनी
सुर्याजीकडे पैसे भरण्याचा तगादा लावला. कारण तो जामीन राहीला होता. शेवटी
सूर्याजी पाटील याने आपले पाटीलकीचे वतन गहाण ठेऊन ३०० होनांचे कर्ज भरले.
परंतु आपले मूळ वतन बुडत आहे त्यामुळे आपल्या जीविकेचा प्रश्न निर्माण
होईल म्हणून सूर्याजी शिवाजी महाराजांकडे आला. आणि त्याने महाराजांना आपली
व्यथा सांगितली. ही सर्व कहाणी ऐकून महाराजांचे मन द्रवले. महाराजांनी
तात्काळ दौंडजची निमी मोकदमी म्हणजेच निमी पाटीलकी हिरोजी इंदलकर ( रायगड
बांधणारे नव्हे ) यांना २७५ होनांना दिली. ते २७५ होन आणि वर स्वतःच्या
खजिन्यातील २५ होन असे सूर्याजी पाटील यास देऊन कर्ज फेडण्यास सांगितले.
आता हे जे तीनशे होन महाराजांनी सुर्याजीला दिले ते ३०० हो सुर्याजीने
मालजी पाटील याच्याकडून वसूल करून घेण्यास महाराजांनी फर्माविले. आणि जर ते
मालजी पाटील याने न दिल्यास दौंडजची राहिलेली निमी पाटीलकी सुर्याजीने
सुखरूप उपभोग घेत राहावे असा कौलनामा महाराजांनी सूर्याजी पाटील याला दिला.
सदरहू पत्राचा बारकाईने अभ्यास केला असता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा प्रजाहितदक्ष राजा हा आधीही झाला नाही आणि पुढेही होणार नाही. आपल्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकारी चुकला तर त्याला तात्काळ शासन केले. परंतु तोही आपल्याच प्रजेचा एक भाग आहे हेही लक्षात ठेवून , त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न निदान झाल्यावर तोही महाराजांनी सोडविला. म्हणून समर्थांनी शिवरायांचा 'जाणता राजा ' म्हणून जो गौरव केला आहे त्याची साक्ष पुन्हा एकदा या पत्रातून पटते.
छत्रपती श्रीशिवाजी महाराज चरणारविंदार्पणमस्तू ।।
राज मेमाणे ( इतिहास संशोधक आणि मोडी तज्ञ )
9604069862
सदरहू पत्राचा बारकाईने अभ्यास केला असता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा प्रजाहितदक्ष राजा हा आधीही झाला नाही आणि पुढेही होणार नाही. आपल्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकारी चुकला तर त्याला तात्काळ शासन केले. परंतु तोही आपल्याच प्रजेचा एक भाग आहे हेही लक्षात ठेवून , त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न निदान झाल्यावर तोही महाराजांनी सोडविला. म्हणून समर्थांनी शिवरायांचा 'जाणता राजा ' म्हणून जो गौरव केला आहे त्याची साक्ष पुन्हा एकदा या पत्रातून पटते.
छत्रपती श्रीशिवाजी महाराज चरणारविंदार्पणमस्तू ।।
राज मेमाणे ( इतिहास संशोधक आणि मोडी तज्ञ )
9604069862
No comments:
Post a Comment