विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 April 2019

संताजी घोरपड्यांचा दग्याने दुर्दैवी खून

संताजी घोरपड्यांचा दग्याने दुर्दैवी खून

------------------------------------------

संताजी घोरपडे हे निःसंशय शूर होते. पन्हाळ्यावर मुघलांचा लोंढा चालून आला तेव्हा कागलकर घाटगे किल्लेदाराने संताजींकडे मदत मागितली. काही कारणास्तव संताजींकडून मदत पोहोचली नाही आणि अखेरीस घाटग्यांनी किल्ला तर मोंगलांना दिलाच पण स्वतःही मोंगलांच्या चाकरीत रुजू झाले. नागोजी माने वगैरे अनेक सरदार कधी इकडे तर कधी तिकडे करत होते. फलटणकर निंबाळकर हे खरंतर पूर्वीपासून भोसल्यांचे सोयरे होते. पूर्वी शिवाजी महाराजांसोबतच आत्ताही राजाराम महाराजांनी आपली एक कन्या फलटणच्या निंबाळकर घराण्यात दिली होती. अर्थात, निंबाळकर हे पूर्वीपासून आदिलशाही आणि त्यानंतर मुघलांच्या चाकरीत होते. निंबाळकरांच्या घराण्यातील, म्हणजे राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलतभाऊ अमृतराव हा सुद्धा मोंगल चाकरीत असून त्याची सख्खी बहीण हि म्हसवडकर नागोजी मानेची बायको होती. इ.स. १६९१ मध्ये राजाराम महाराजांनी (रामचंद्रपंतांनी, कारण राजाराम महाराज जिंजीला होते) नागोजी मानेला सरदेशमुखीचं वतन बहाल केलं. यानंतर नागोजी पुढील पाच वर्षे तरी स्वराज्यात होता. बहुदा याच सुमारास राजाराम महाराजांनी अमृतराव निंबाळकरालाही वतनाची सनद दिली. पण निंबाळकरांच्या अंतर्गत भाऊबंदकीमुळे अमृतरावाचा चुलता मुधोजी हा कर्नाटकात जाऊन राजाराम महाराजांना भेटला आणि त्याने अमृतरावाला दिलेली संवाद रद्द करवून स्वतःच्या नावे करून घेतली.

१६९३ मध्ये संताजी आणि धनाजी हे दोघेही जिंजीच्या रक्षणार्थ दक्षिणेत उतरले तेव्हा झुल्फीकारखान कचाट्यात सापडला. त्याने राजाराम महाराजांकडे तहाची बोलणी लावली. यावेळी संताजींचं मत मोंगलांना जाऊ देऊ नये, कापून काढावं असं होतं पण राजारामम महाराजांनी आपण किल्ल्यातून बाहेर पडू शकू म्हणून मोंगलांना वेढा उठवून जायला सांगितलं. या कारणामुळे राजाराम महाराज आणि संताजीमध्ये वाकडं आलं. जेधे शकवलीतही याचा उल्लेख आहे. तात्पुरतं राजाराम महाराजांनी संताजीचं काम धनाजी जाधवांना दिलं. संताजी महाराष्ट्रात आल्यानंतर रामचंद्रपंतांनी त्यांचा रुसवा काढला आणि समजूत घातली. शंकराजी नारायण राजाज्ञा यांनीही संताजींनी समजूत घातली होती. पण एकूणच संताजी आणि बहिर्जी हे दोघेही बंधू नाराजच होते. इ.स. १६९५-९६ मध्ये मोंगली फौजांनी स्वतंत्ररित्या संताजी आणि धनाजी यांचा पराभव केलेला. यापूर्वीपासूनच संताजी आणि धनाजी यांच्यात वाकडं येऊन भांडणं सुरु झाली होती. संताजी हे शिस्तीचे कडक होते तर धनाजी हे वेळप्रसंगी पाहून माणसं आपल्या बाजूला घेण्याच्या दृष्टीचे होते. अनेक कनिष्ठ सरदार हे संताजींच्या शिस्तीला कंटाळून धनाजींची बाजू घेत यामुळे या भांडणात आणखी ठिणग्या पडल्या. जेधे शकवलीत 'राजश्री स्वामींजवळ मुद्दे घालू नयेत, मर्यादेने राहावे' असं शंकराजीपंत संताजींना सांगतात यावरून ते राजाराम महाराजांचाही वेळप्रसंगी मुलाहिजा ठेवत नसत हे दिसतं. १६९६ च्या एप्रिल मध्ये आयेवारकुटीजवळ झालेल्या लढाईत संताजी फते पावले. धनाजींचा पराभव झाला आणि ते महाराष्ट्रात आले. मुघल साधनांतही अनेक प्रसंग आढळतात. अमृतराव निंबाळकर हा धनाजीच्या बाजूने असता संताजींनी त्याला हत्तीच्या पायी घातले. हा अमृतराव म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलतभाऊ. यानंतर संताजी आणि धनाजीची या दोघांनीही राजाराम महाराजांच्या समोर एकमेकांविषयीचे चुकांचे पाढे वाचले. पेशवे दफ्तरच्या खंड ३१ मध्ये लेखांक ६८ मध्ये राजाराम महाराज रामचंद्रपंतांना म्हणतात, "संताजी घोरपडे यांनी स्वामींच्या पायांशी हरामखोरी केली याकरिता त्यास सेनापतिपदाचा कार्यभाग होता तो दूर करून फौज आणविली". यानंतर संताजींनी उघडपणे बंड पुकारले असले तरी त्यांना राजाराम महाराजांशी थेट लढण्याची ताकद नसावी असं दिसतं.

आता वर म्हटल्याप्रमाणे जे सरदार पूर्वी मोंगलांकडून संताजी आणि धनाजी यांच्या फौजेत आलेले ते अनेक जण राजाराम महाराजांनी संताजींचं सेनापतिपद काढलं हे पाहून पुन्हा मोंगलाईत गेले. मार्च १६९७ च्या सुमारास धनाजी जाधवांची मोठी फौज संताजींच्या मागे धावू लागली, अखेर संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. म्हसवडच्या आसपास संताजींचा मुक्काम असताना नागोजी माने याने संताजींना दग्यानें मारलं. या नागोजींची बायको म्हणजे सान्ताज्जीनी ज्याला हत्तीच्या पायी दिलं त्या अमृतराव निम्बालकरांची सख्खी बहीण होय. नागोजीने संताजींचं मस्तक कापून ते ब्रह्मपुरीला नेऊन बादशहाला नजर केलं, यावरून संताजी आणि धनाजी यांच्यातला भांडणाचा फायदा औरंगजेबाने अप्रत्यक्ष वा प्रत्यक्ष घेतला असं नक्कीच म्हणता येईल. पूर्वी आपण बादशहाला सोडून गेलो आणि आता पुन्हा रुजू झालो याची खात्री पटवण्यासाठी नागोजीने या गोष्टीचा दुहेरी फायदा घेतल्याचं दिसतं कारण बादशहाचा सरदार लुत्फुल्लाखानाचं नागोजीला जुलै १६९७ मध्ये एक पत्रं लिहिलं त्यात तो म्हणतो, "संताजीला तुम्ही पळून जाऊ दिलं नाही. येणेंकरून सरकारची नोकरी तुम्ही एकनिष्ठतेने बजावत आहेत हे समजून तुमचे अपराध (पूर्वी सोडून गेल्याचे) क्षमा होऊन बादशहाची मेहेरनजर होईल".

यानंतर सुमारे तीन-चार वर्ष घोरपडे-जाधव वैर सुरूच होतं, पण इ.स. १७०० नंतर संताजींच्या मुलांना भेटून धनाजींनी रुसवा काढला आणि संताजींनी दोन्हीही मुलं राणोजी घोरपडे आणि पिराजी घोरपडे पुन्हा स्वराज्यात रुजू झाले. संताजींनी नारो महादेव जोशी नावाच्या एका हुशार ब्राह्मणाला आपला पुत्र मानले होते, ज्यांनी पुढे आपले जोशी हे आडनाव सोडून घोरपडे हे आडनाव घेतले. हे नारो महादेव म्हणजेच पुढे बाळाजी विश्वनाथाचे व्याही. बाळाजी विश्वनाथांची मुलगी अनुबाई हि या नारो महादेवाचं मुलगा व्यंकटराव घोरपड्यांची पत्नी, ज्यांनीही पुढे स्वराज्यसेवा कायम केली.

एकूणच अशी आहे संताजी घोरपड्यांच्या दुर्दैवी हत्येची कहाणी.

टीप: संताजींविषयी फारसी कागदात लुत्फुल्लाची पत्रे इत्यादी आहेतच, पण त्यासोबतच जेधे शकावली, म्हसवडकर माने यांची हकीकत (इतिहाससंग्रह), घोरपड्यांची हकीकत, राजवाडे खंड २०, पेशवे दफ्तर खंड ३१ इत्यादी अनेक ठिकाणी आपल्याला हि हकीकत विखुरलेली आढळेल.

- कौस्तुभ कस्तुरे

#राजारामछत्रपती
#इतिहासाच्या_पाऊलखुणा

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...