विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 49


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 49
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------15
सुर्जीअंजनगांवच्या तहामध्ये इनाम गांवांची यादी बरोबर न देतां, अदमासाने कांहीं तरी नांवें दिली होती; त्या चुकीचा परिणाम आतां भोगण्याचा प्रसंग आला. बायजाबाईसाहेब ह्यांस शिंद्यांच्या घराण्याकडे फार दिवस चालत आलेले गांव सोडून देऊन दक्षिणेतील आपला संबंध नाहींसा करणे इष्ट वाटेना. तेव्हा त्यांनीं रेसिडेंटमार्फत अनेक तडजोडी करण्याचे प्रयत्न केले. परंतु, इंग्रज सरकारास राजकीयदृष्ट्या शिंद्यांचा संबंध सातपुड्याच्या पलीकडे दक्षिणेतील गांवांवर असणे बरोबर वाटत नसल्यामुळे त्यांनी ती गांवे आपल्या ताब्यात घेण्याचा आग्रह धरला. अर्थात् सार्वभौम प्रभूचा विशेष आग्रह पडल्यामुळे बायजाबाईसाहेबांस दक्षिणेतील ८९३ गांव इंग्रजांच्या ताब्यात देणे भाग पडले. त्याप्रमाणे त्यांनी आनंदराव दत्तात्रय कमाविसदार ठाणे जामगांव ह्यांस गांवे सोडण्याबद्दल सनद पाठविली. ती येणेप्रमाणेः| राजश्री आनंदराव दत्तात्रय कमाविसदार ठाणे जामगांवः-- स्नेहांकित बायजाबाई शिंदे दंडवत सु॥ तिस्सा अशरीन मयातैन व अलफ. सुर्जेअंजनगांवचे मुक्कामीं कंपनी इंग्रजबहादूर यांचा व आपला तहनामा झाला. त्यांत आठवे कलमांत, दक्षणचे रुखेशीं श्रीमंत पेशवेसाहेब ह्यांचे मुलुकांत, आपले पिढीदरपिढीपासून कितेक परगणे व तालुके व गांव सुदामत वडिलोपार्जित चालत आले, त्याप्रमाणे चालावे असा करार ठरला असतां, तहनामा करावयाचे समयीं कागद पत्राचा दाखला, वहिवाटीस तालुके व परगणे व फुटकर देहे चालत आहेत त्यांचा न पाहतां, गैरमाहितीने जबानीवरून, परगणे व तालुके व देहे लिहिले; त्यांत सुदामतपासून वहिवाट चालत आली७२ त्याप्रमाणे तालुके व देहे लिहिले गेले नाहींत. परंतु त्यांची वहिवाट आजपर्यंत आपल्याकडे चालत आली असतां, तहनाम्याखेरीज साडेएकूणनव्वद देहे सोडून देण्याविषयीं कंपनी इंग्रजबहादूर यांचे ह्मणणे पडलें. सबब * * * * * साडेएकूणनव्वद् देहें खालसा व दुमाला मिळून आहेत ते सोडून कंपनी इंग्रजबहादूर यांजकडे द्यावयाचे ठरले. त्याजवरून ही सनद तुह्मांस सादर केली असे. तरी सदर्दू साडेएकूणनव्वद देहें कंपनी इंग्रजबहादूर यांजला लिहून, अंमलदार यांचे स्वाधीन, सरदेशमुख्या व पाटीलक्या व मोकदम्या व नावघाट वगैरे वतनबाब खेरीजकरून देणे. साहेबबहादूर यांजकडील अंमलदार सदर्दू गांवीं अंमल करतील. तुह्मीं दखलगिरी न करणे. जाणीजे. छ. २४ रबिलाखर हे विनंति. (मोर्तबसुंद) ह्याप्रमाणे दक्षिणेतील गांचे इंग्रजांच्या ताब्यात देऊन एका प्रश्नाचा निकाल लागला. परंतु दुसरा ब्रिटिश सरकारच्या कांटिंजंट फौजेच्या खर्चाचा प्रश्न तसाच राहिला. महाराज दौलतराव शिंदे मृत्यु पावल्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकाराकडून जे चार लक्ष रुपये पेनशन मिळत असे, ते बंद झाले. ते त्यांनी कांटिंजंट फौजेच्या खर्चाकरितां लावून दिले होते. अर्थात् ते कमी झाल्यामुळे बायजाबाईसाहेबांच्या दोन लक्ष पेनशनाने व रजपूत संस्थानाकडील खंडणीने ती रक्कम भरून येईना.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...