विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 12 April 2020

शेतकरी आणि कष्टकरी कामगारांचा महात्मा !!

शेतकरी आणि कष्टकरी कामगारांचा महात्मा !!
१८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्याचे कार्य सुरळीत सुरू झाल्यानंतर महात्मा फुले यांचे लक्ष जनतेच्या आर्थिक प्रगतीकडे वळले. पाश्चात्य राष्ट्रांतून शेती व उद्योगधंदे यांची रोज होत असलेली वाढ आणि सुधारणा यामुळे तिकडील जनतेची आर्थिक उन्नती दिवसेंदिवस सारखी वाढत असल्याचे पाहून आपल्या देशात या धंद्याच्या सुधारणा करण्याचे प्रयत्न करण्याबद्दल त्यांनी या वेळी मनावर घेतले. आपल्या देशातील बहुजन समाजाचा उदरनिर्वाह मुख्यत्त्वे शेतीच्या धंद्यावर होत असल्याने प्रथम त्या धंद्यात सुधारणा व्हावी म्हणून समाजाच्या मंडळीने ठिकठिकाणी सभा घेऊन व दिनबंधूमधून ही चळवळ सुरू केली. शेतकरी लोकांनी चांगले बी, चांगले खत व चांगली मशागत करून नवी सुधारलेली पिके काढावीत आणि सरकारने तलाव विहिरी आणि पाटबंधारे बांधून शेतकऱ्याला नवीन झाडांचा, बी-बियाणे व शेतीच्या मशागतीसाठी लागणारी मदत सढळ हाताने करावी, तसेच ठिकठिकाणी सरकारने कालवे व पाटबांधारे बांधून शेतकऱ्यांना बागाईतास भरपूर पाणी पुरवावे असा त्यांच्या बोलण्याचा व लिहिण्याचा कल असे.
१८७६ च्या सुमारास मुंबई सरकारने पुण्याजवळ मुठा नदीवर धरण बांधण्याचे काम हाती घेतले तेव्हा समाजाच्या मंडळीने आपल्या सभांतून व पत्रांतून सरकाचे अभिनंदन केले. सन १८७८ साली जेव्हा हे धरण बांधून पुरे झाले, तेव्हा पाटावे पाणी जमीनीला दिल्याने ती निकस व निकाम होते असा भलताच गैरसमज शेतकरी समाजात पसरला होता त्यामुळे या धरणाचे पाणी कोणीच शेतकरी आपल्या शेतीसाठी घेईना अशा अडचणीच्या प्रसंगी लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी मांजरी येथील दोनशे एकर जमिनीत त्याच साली पाटाच्या पाण्यावर मोठे बागाईत पेरले. या बागाईतांत पाश्चात्य राष्ट्रांतून पिकणारी कोबी, फुलकोबी, बटाटे, संत्रे, मोसंबी इत्यादी नवी पिके प्रथमतः ज्योतिरावांनी लावली. या पूर्वी पुणे भागात ही पिके मुळीच नव्हती. या जमिनीत ऊसाचे मोठे पिक काढून त्यांनी गूळ तयार केला. पाटाच्या पाण्याने ऊसाचे पीक चांगले येते याचे प्रत्यंतर लौकरच सर्वांना येऊन चुकले आणि नंतर हळू हळू शेतकरी लोक हे पाटाचे पाणी घेऊ लागले. पुण्याजवळील मांजरीच्या जंगलात फुल्यांची नळी अजूनही सुप्रसिद्ध आहे आणि त्याच जमिनीत महात्मा फुले यांनी लावलेली आंबराई अजूनही कायम आहे. यावरून महात्मा फुले हे किती उमदे शेतकरी होते याची चांगली कल्पना होते. ही शेती करीत असताना महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या नावाचे दोन निबंध लिहून ते त्यावेळच्या दीनबंधूतून प्रसिद्ध केले. धार्मिक बाबीत जसे महात्मा फुले यांना वर्गवैशिष्ट्य नको होते तसेच ते त्यांना आर्थिक बाबतीतही नको होते. मुठभर सावकारांच्या घरात हजारो लोकांची धनदौलत अथवा जमीन-जुमला जाणे त्यांना पसंत नसे. शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे जाऊ नयेत म्हणून त्यांनी पुणे प्रांतात शेतकऱ्यांची मोठी चळवळ उभी केली...
शेतकऱ्यांप्रमाणेच मजुरांच्या सुधारणेकडे व संघटनेकडेही महात्मा फुले यांचे लक्ष होते. रा. भालेकर व रामचंद्र हरी शिंदे या दोघांना आपले भागीदार करून " पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनी" हि कंपनी स्थापन करून त्यामार्फत त्यांनी खडकवासला बँक, मुठा नदीच्या पाटाचे बांधकाम, येरवडा पुलाचे बांधकामाचा दगड आणि चुना, पुणे सातारा रस्त्यावरील डोंगरांतील बोगदा कोरणे इत्यादी अनेक लहानमोठ्या कामाची कंत्राटे घेऊन त्यांनी ती कामे पुरी केलीत. त्यावेळी महात्मा फुले यांच्या या कामावर रोज तीन तीन हजार मजूर असत. त्यामुळे महात्मा फुले यांना मजुरांच्या अडीअडचणींची चांगली कल्पना आली. महात्मा फुले आपल्या कामावरील मजुरांना पुष्कळ सवलती देत असत. काम संपताच चांगल्या कारागिरांना बक्षिसे व सर्व मजुरांना जेवण तर ज्योतिराव नेहमीच देत असत. सन १८७९ साली महात्मा फुले व त्यांचे स्नेही नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नाने मुंबईस गिरणी कामगारांचा पहिला संघ स्थापन झाला त्यावेळी त्यांनी मजूर चळवळ केल्यामुळेच सरकारने १८८५ साली मजूर चौकशीचे एक कमिशन नेमून त्यावर महात्मा फुले आणि त्यांचे मित्र दीनबंधूचे संपादक नारायण मेघाजी लोखंडे यांना सभासद घेतले. या कमिशनने हिंदुस्थानभर फिरून सरकारकडे एक रिपोर्ट सादर केला. त्यात लोखंडे यांनी चांगले काम केले आणि म्हणूनच त्यावेळेपासून मजुरांचे पगार निश्चित झाले. स्त्रिया, पुरुष व मुले यांचे तास ठरले. स्त्रियांची रात्रपाळी बंद झाली व मजुरांना सुटीचे दिवस मिळाले. अशा प्रकारे गिरणी मालकांच्या नियंत्रणाचा पहिला कायदा महात्मा फुले आणि नारायण लोखंडे यांच्या प्रयत्नानेच जारी झाला. यावरून महात्मा फुले यांचे मजूर चळवळीचे कार्य किती मोलाचे आणि कसे अजरामर राहणारे आहे याची कोणासही कल्पना येईल..
संदर्भ - महात्मा ज्योतिराव फुले - पं. सि. पाटील

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...