विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 23 April 2020

जंजीऱ्याच्या तटाला शिड्या लावणारे लायजी पाटिलांचा इतिहास…

जंजीऱ्याच्या तटाला शिड्या लावणारे लायजी पाटिलांचा इतिहास…

 

जंजीऱ्याच्या तटाला शिड्या लावणारे लायजी पाटिल

कोकण किनारपट्टीवर फिरंग्यांसोबत मराठ्यांचा अजुन एक शत्रु अजगरा सारखा विळखा घालून बसला होता. अगदी महाराजांच्या शब्दात वर्णन करायचे तर “जैसा घरास उंदीर, तैसाच राज्यास सिद्दी.”

महाराजांनी सिद्दीचा मुलुख तर काबिज केलि पण त्याचा बुलंद जंजिरा मात्र त्यांना प्रत्येक वेळेस हुलकावणी देत राहिला. १६५७ ते १६७८ पर्यंत किमान ८ वेळेस महाराजांनी जंजिरा काबिज करण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना यश आले नाही.

जंजिरा किल्ला हा कोकणातील सिध्दीचा गड,अनेक प्रयत्न करूनसुध्दा हा किल्ला मराठ्यांच्या हातात लागत नव्हता.छत्रपतींनी मोरोपंत पिंगळे वर या मोहिमेची जबाबदारी सोपविली.मोरोपंत घाटातील हशम (मावळे) घेऊन मुरूडला दाखल झाले

या सिद्दीचा अम्मल दंडाराजपुरीवर होता, तो स्वराज्यवर हल्ले करुन लूट घेउन पुन्हा आपल्या मुल्खात पसार होत असे.शिवकाळात शिवाजी महाराजांना कोकणात अनेक मानवी रत्ने मिळाली. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी , तुळाजी आंग्रे , दौलतखान , सिद्दी मिस्त्री , कान्होजी आंग्रे , दर्यासारंग इत्यादी देवमासे आपल्या प्रचंड बळाचा स्वराज्यासाठी वापर करीत होते.
 जंजिऱ्यावर हल्ला कसा करायचा हि योजना आखत असतानाच  त्यातीलच एक मासळीहून चपळ असलेला कोळी. याचं नाव होतं , लायजी सरपाटील कोळी. हा कुलाब्याचा राहणारा. विलक्षण धाडसी , शूर आणि विश्वासू.लायजी पाटलाने जंजिरा किल्याच्या तटाला समुद्रातून शिड्या लावण्याची योजना सांगितली आणि स्वतः अशा जागत्या शत्रूच्या काळजात शिरायचं तरी कसं ? मुळात समुदात शिड्या लावायच्या तरी कशा ? आवाज होणार , हबशांना चाहूल लागणार. होड्यांत शिडी उभी करून तटाला भिडवली की , दर्याच्या लाटांनी शिड्यांचे आवाज होणार , शिड्या हलणार. वर गनीम जागा असणार. तो काय गप्प बसेल ? त्यांच्या एकवट प्रतिहल्ल्याने सारे मराठे भाल्या , र्वच्या , बंदुकांखाली मारले जाणार. एकूणच हा एल्गार भयंकर अवघड , अशक्यच होता , 

तरीही लायजी पाटलानं हे धाडस एका मध्यानरात्री करायचं ठरविलं. त्याने मोरोपंतांना आपला डाव समजविला. काळजात धडकी भरावी असाच हा डाव होता. लायजीने मोरोपंतांना म्हटलं , ‘ आम्ही होड्यांतून जंजिऱ्याचे तटापाशी जाऊन होड्यांत शिड्या , तटास उभ्या करतो. तुम्ही  मागोमाग होड्यांतून आपले लष्कर घेऊन येणे. शिडीयांवर चढून , एल्गार करून आपण जंजिरा फत्ते करू. 


मोरोपंतांनी तयारीचा होकार लायजीस दिला. किनाऱ्यावर लायजीच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारातून शिड्या घेतलेल्या कोकणी सैनिकांसह किल्ल्याच्या तटाच्या रोखाने पाण्यातून निघाल्या. आवाज न होऊ देता म्हणजे अगदी वल्ह्यांचा आवाजही पाण्यात होऊ न देता मराठी होड्या निघाल्या.



 जंजिऱ्याच्या तटांवर रास्त घालणारे धिप्पाड हबशी भुतासारखे येरझाऱ्या घालीत होते.

लाय पाटील तटाच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याच्या साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता. मरणाचाच होता. तटावरच्या शत्रूला जर चाहूल लागली , तर ?  मरणच.लाय पाटील आता प्रत्येक श्वासागणिक मोरोपंतांच्या येऊ घातलेल्या कुमकेकडे डोळे लावून होता. पण मोरोपंतांच्या कुमकेची होडगी दिसेचनात. त्या भयंकर अंधारात लायपाटील क्षणक्षण मोजीत होता.
किती तरी वेळ गेला , काय झालं , कोणास ठावूक ? ते इतिहासासही माहीत नाही.

 पण मोरोपंत आलेच नाहीत. लाय पाटलाने आपल्या धाडसी कौशल्याची कमाल केली होती. पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही. का येत नाही हे कळावयासही मार्ग नव्हता. आता हळुहळू अंधार कमी होत जाणार आणि ‘ प्रभात ‘ होत जाणार. (मूळ ऐतिहासिक कागदांत ‘ प्रभात ‘ हाच शब्द वापरलेला आहे.)

 अन् मग उजेडामुळे आपला डाव हबश्यांच्या नजरेस पडणार. अन् मग घातच! पुन्हा असा प्रयत्न करण्याचीही शक्यता उरणार नाही. काय करावं ? लायजीला काही कळेचना. त्याच्या जिवाची केवढी उलघाल त्यावेळी झाली असेल , याची कल्पनाच केलेली बरी.

अखेर लाय पाटील निराश झाला. हताश झाला. त्याने तटाला लावलेल्या शिड्या काढून घेतल्या आणि आपल्या साथीदारांसह तो मुरुडच्या किनाऱ्याकडे परत निघाला. न लढताच होणाऱ्या पराभवाचं दु:ख त्याला होत होतं. मोरोपंतांची काय चूक किंवा गडबड घोटाळा झाला , योजना का फसली हे आज कोणालाच माहित नाही.

 लायजी कोळ्याचा पराक्रम वाया गेला व जंजिरा जिंकण्याची एक सुवर्णसंधी मराठ्यांनी गमावली 

पुढे संभाजीराजेंनी राजापुरीच्या खाडीत भराव टाकून किल्ल्यावर हल्ला केला.  पण त्याच सुमारास औरंगजेबाने दक्षिणेस आघाडी उघडल्याने हाती आलेला विजय संभाजीराजेंना सोडून द्यावा लागला व किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला जंजिरा किल्ला दर्यावीर लायजी पाटील कोळीचा पराक्रमाचा साक्षीदार आहे




No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...