विनोद जाधव एक संग्राहक

Friday 29 May 2020

पंचावन्न दिवसांची झुंज देणारा स्वराज्यातील एक अनामिक योद्धा

छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेत पुण्यात आलेल्या मोघली सरदार शाहिस्तेखान याने महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी मोहिमा काढल्या.

पुणे- नाशिक वाटेवर चाकणचा भुईकोट किल्ला होता. हि गडी जिंकल्याशिवाय नाशिक पुणे मार्ग निर्धास्त होऊच शकत नाही याची जाणीव शाहिस्तेखानाला होती आणि म्हणूनच त्याने चाकणच्या दिशेने कूच केली. या मोहिमेसाठी खान जातीने निघाला, बरोबर प्रचंड तोफखाना आणि वीस हजाराहून अधिक सैन्य सुद्धा होते.

या सैन्यात उजबेकखान, गिरीधर कुंवर, सय्यद हसन, जाधवराव, रायसिंह असे नामवंत सरदार होते. चाकणचा मराठी किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा.

फिरंगोजींना खानाच्या या मोहिमेची आधीच माहिती मिळाली होती. त्यांनी चाकणच्या आसमंतातील शेतकऱ्यांना आधीच सावध केले आणि जमेल तेवढे धान्य घेऊन त्यांना सुरक्षित जागी हालविले. उरलेले धान्य मराठ्यांनी जाळून टाकले, जेणेकरून मोघली सैन्याला धान्याची चण-चण भासेल.

२१ जून १६६० रोजी मोघली फौज चाकणला पोचली. मोघली सैन्याने पहिलाच जोरदार हल्ला किल्ल्यावर केला पण तो हल्ला मराठ्यांनी लीलया परतवून लावला, तेव्हा खानाला कळून चुकले कि हा किल्ला जिंकणे तितके सोपे नाही. त्याने किल्ल्याला वेढा घातला जेणेकरून किल्ल्यातील दाणा- गोटा संपला कि किल्ला आपसूक ताब्यात येईल.

फिरंगोजींनी अचूक जागी बंदुकधारी आणि तिरंदाज बसविले होते, ज्यामुळे मुघली सैनिकांना किल्ल्याच्या जवळ येणेच कठीण होऊन बसले. खानाने धमधामे रचले त्यावर तोफा चढविल्या आणि किल्ल्यावर मारा केला पण त्याचा काही विशेष परिणाम झाला नाही.

रात्री मराठे किल्ल्यातून बाहेर पडीत आणि झोपलेल्या मोघली छावणीवर हल्ला करून जमेल तेवढे नुकसान करून पुन्हा किल्ल्यात पसार होत. असे कित्येक दिवस चालू राहिले.

किल्लेदार फिरंगोजी मोठ्या धीराचा माणूस. कुठलीही मदत न मिळता, यांनी खूप दिवस तग धरून होते. मोगल आणि मराठे यांच्यात सतत छोटीमोठी झुंबड होत असे. पण आता शास्ताखानाने कच खालली होती.अल्लाला दोष देण्याच्या कार्यक्रमाचा त्याचा सपाटाच चालू होता. “या अल्ला इतने दिन हो गये लेकिन ये छोटासा किला हासिल नही होता तो उस सिवाजी के पहाडी किले तो हमारी जान निकाल देंगे”.

खानाने गुप्तपणे एक सुरुंग खणायला सुरुवात केली होती. वरती बुरुजावर लढणार्या मराठी सैनिकांस याचा काहीच अंदाज नव्हता आणि अखेर वेढ्याच्या पंचावनाव्या दिवशी मुघलांनी हा सुरुंग पेटवून दिला. चाकणचा बुरुज उडाला, कित्येक तोफा, सैनिक, बंदुका हवेत उडाल्या. बुरुजावरील मराठे आकाशात उडाले.

हे पाहून शास्तेखानाला स्फुरण चढले. त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली.

किल्ल्यावर अवघे ३००-३५० मावळे होते.पावसाळा चालू होणार म्हणून किल्यावर भरपूर रसद भरली होती. शास्तेखान च्या सैनिकांनी किल्यास वेढा घातला व किल्यावर तोफांचा भडिमार चालू केला. पण किल्ला काही दाद देत नव्हता. मुघल सैनिक किल्याच्या बुरूजाजवळ आले की त्यांना गोफनगुंडे बसत.

गोफनच्या साह्याने त्यांनी मुघली सैन्यांस रक्तबंबाळ केले होते. अवघ्या ३००-३५० मावळ्यासह फिरंगोजीनी किल्ला ५५ दिवस लढविला. मुघलांना किल्यावर प्रवेश करता येईना.अखेर त्यांनी तटापर्यंत भूयार खणून किल्ल्याचा तट उडविला. किल्याची एक बाजू उघडी पडली. किल्याजवळ हातघाईची लढाई झाली.

मुघलांच्या प्रचंड सैन्यापुढे आपल्या सैन्याची वाताहत होणार ध्यानात आल्यामुळे त्यांनी माघार घ्यावयाचा निर्णय घेऊन किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला व मावळ्यांचे होणारे नुकसान टाळले. कारण महाराज म्हणत, आपण राखून गनीम घ्यावा. माणूस खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.

फिरंगोजीच्या पराक्रमावर खुष होऊन राजेंनी त्याना भूपाळगडाची किल्लेदारी,एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली. शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, स्वराज्यात येताना ते एकटेच नाही आले, तर चाकण सारखा अतिशय देखणा आणि मजबुत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला.

शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामिलच करुन घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली.

रिक्त हाताने स्वराज्यात आलेले फिरंगोजी, परत जाताना स्वराज्याचा ‘भगवा ध्वज’, किल्लेदारीची वस्त्रे, आणि प्रेमानी उचंबळुन, भरुन आलेला ऊर संगाती घेऊन चाकणकडे निघाले. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा त्यांनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...