कर्तव्यकठोर, शूर मैनावती पेशवे
पोस्तसांभार :: Dr. Suvarna Naik-Nimbalkar
मैनावती या नानासाहेब पेशवे (दुसरे) यांच्या एकुलती एक कन्या. मुलीला आजीचे मैनावती हे नाव ठेवले. मैनावतीच्या मातोश्री लवकरच गेल्या व आजी तर त्यापूर्वीच गेल्या होत्या. अतिशय अल्पायुषी, पण तेजस्वी जीवन जगलेल्या आणि तेवढाच लोकोत्तर मृत्यू स्वीकारलेली मैनावती पेशवे. १८५७चा उठाव, स्वातंत्र्ययुद्ध... त्या वेळची ही घटना आहे.
मैनावतीला पेशवे घराण्याच्या रीतीप्रमाणे लिहिणे, वाचणे, पत्रे तयार करणे इत्यादी गोष्टी शिकवल्या होत्या. धार्मिक ग्रंथांची पारायणे ही गोष्ट त्यात आलीच. नानासाहेबांचे आपल्या मुलीवर जिवापाड प्रेम होते. आईविना मुलगी म्हणून तसे ते शक्य होतेच. तसेच आपल्याला परक्याच्या घरी जाणाऱ्या या मुलीला वेळ देता येत नाही या विचारामुळेही ते अधिकच अस्वस्थ होत. नानासाहेब पेशवे व इंग्रज यांचे सुरुवातीचे संबंध बरे होते. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांच्या बरोबर प्रसंगापरत्वे ऊठबस होती. मैनावतीचेही इंग्रज मुलींबरोबर मैत्रीचे संबंध होते.
पुढे १८५७च्या बंडात कानपूर लुटले गेले. बिबिका घर, सतीचौरा ही ठिकाणे जाळली गेली. इंग्रज बायका व मुले यांना कैद केले. हे कैदी नानासाहेब पेशव्यांसमोर हजर करावेत, की कानपूरच्या इतर इंग्रजांप्रमाणे त्यांनाही येशूकडे पाठवावे, असे शिपायांनी नानासाहेबांना विचारले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे इंग्रज बायका-मुलांचा निकाल लावायचा असे ठरवून शिपाई नानासाहेबांच्या आज्ञेची वाट पाहू लागले. शिपायांचा मानस कळल्यावर नानासाहेबांना वाईट वाटले.
मराठ्यांच्या इतिहासात शत्रूच्या बायका-मुलांची कत्तल कधीच झाली नव्हती. शिपायांचे असे वर्तन हे मराठ्यांना शोभणारे नाही. त्यामुळे ‘इंग्रज बायकामुलांना सन्मानाने बिठूरला पोहोचवावे व त्यांची व्यवस्था आपण जातीने करू’ असा उलटा खलिता नानासाहेब पेशव्यांनी पाठविला. ही जबाबदारी त्यांनी आपल्या लाडक्या लेकीवर सोपवली. इंग्रजांचा कुटुंबकबिला त्यांनी मैनावतीच्या स्वाधीन केला. त्या सर्वांचा दोन दिवस पाहुणचार करून त्यांना इंग्रजांच्या फौजेत परत पाठविण्याचा आपला बेत त्यांनी मैनावतीला सांगितला. इतकेच नाही, तर त्या सर्वांना सुरक्षित पोहोचण्याची जबाबदारीही मैनावतीवर सोपवली. त्याकरिता त्या कबिल्याबरोबर मैनावतीला जातीने सोबत करावयास सांगितले.
मैनावती बरोबर असल्यामुळे त्यांचा प्रवास निर्धोक पार पडेल याचा नानासाहेबांना विश्वास होता. या प्रवासात पहिला इंग्रज फौजेचा जथ्था जिथे भेटेल तिथे इंग्रज बायका-मुले त्यांच्या स्वाधीन करून मैनावतीने परत फिरावे, असा आदेश मैनावतीला होता. मैनावतीच्या सोबतीमुळे इंग्रज कुटुंबे सुखरूप प्रवास करू शकली. रस्त्यातील दंग्याधोप्यांचा त्यांना त्रास झाला नाही. आपल्याला सुखरूपपणे आपल्या लोकांच्या हवाली केल्याबद्दल त्यांना मैनावतीबद्दल कृतज्ञता वाटली तर नवल नाही. मैनावती ही नानासाहेबांची मुलगी आहे हे त्या इंग्रज बायकांना माहीत होते की नव्हते, की त्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी तिचे नाव गुप्त ठेवणे योग्य वाटले असावे हे कळायला मार्ग नाही.
मैनावती बिठूरला पोहोचण्यापूर्वी नानासाहेबांनी बिठूर सोडले होते. कारण शिपायांनी जिंकलेले कानपूर परत इंग्रजांनी हिसकावून घेतले होते व ते बिठूरच्या दिशेने निघाले होते. बिठूरला येऊन इंग्रजांनी पेशव्यांचा किल्लेवजा वाडा लुटला. पेशवे कुटुंबातील फक्त मैनावती, नोकर-चाकर व आश्रयदाते वाड्यात होते. मैनावती सोडून सर्व पळून गेले. वाडा बेचिराख करण्याकरिता त्यावर तोफा डागण्याचा हुकूम दिला. तोफांची हलवाहलव मैनावतीच्या कानी पडली. ती तडक वाड्याच्या बाहेर येऊन उभी राहिली. तिला तिथं उभी पाहताच इंग्रज सेनापती थॉमसला आश्चर्य वाटले. कारण वाडा लुटताना तिथे चिटपाखरूही आढळले नव्हते. तिला पाहताक्षणीच थॉमसने तिला ओळखले. मैनावतीने त्याला इंग्रजीत, पण नम्रपणे विचारले, ‘ज्या वाड्याला आपण बेचिराख करायला निघाला आहात त्या वाड्याने आपले काय वाकडे केले आहे? तो तर आश्रयदाता आहे. त्याने आपला असा कोणता अपराध केला आहे?’ थॉमसने उत्तर दिले, की वाडा न जाळण्याची परवानगी व्हाइसरॉयकडून तार करून मागवावी लागेल. त्यांनी परवानगी दिली तर वाडा जाळणार नाही.
तार लंडनला पोहोचली. लॉर्ड सभेत चर्चा झाली. काही लॉर्डांनी एक विचित्रच सूर लावला. थॉमसचे मैनावतीवर प्रेम बसले असावे म्हणून तो वाडा तोफांच्या साह्याने उडवायला तो मागे-पुढे करतो आहे. वाडा तर उद्ध्वस्त झालाच पाहिजे; पण थॉमसच्या समोरच मैनावतीकडून नानासाहेबांचा पत्ता विचारून मैनावतीला जिवंत जाळली पाहिजे. लॉर्ड सभेचा हा अजबच न्याय होता!
मैनावतीने विद्रोही सैनिकांपासून इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवले होते. त्यांना प्रथम वाड्यात ठेवून घेऊन सुरक्षितपणे इंग्रजांच्या गोटात पोहोचवले होते. अशा मैनावतीला ही शिक्षा? इंग्रज लॉर्डाची सभ्य संस्कृती किती बेगडी होती हे लक्षात येते. आठव्या शतकात हिंदुस्थानच्या उत्तर सीमेवर आलेल्या रानवट मुसलमानांच्या टोळ्यांनी केलेल्या कृत्याइतकेच ते भीषण होते. थॉमसची मुलगी मैनावतीची मैत्रीण होती. मैनावतीचे मोठेपण व तिने इंग्रज कुटुंबांना विद्रोही सैनिकांपासून वाचविले ही गोष्ट म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांवर असलेले उपकारच आहेत असे ती परत परत ओरडून सांगत होती.
मैनावतीच्या देखतच तिचे राहते घर तोफांच्या भक्ष्यस्थानी पडले. तिला कैद्यासारखी वागणूक देत कानपूरला इंग्रज कमिशनरसमोर उभे केले. नानासाहेबांचा ठावठिकाणा विचारण्यासाठी तिचा खूप छळ केला. मैनावतीने छळ सहन केला; पण काहीही बोलण्यासाठी तोंड उघडले नाही ते नाहीच. मैनावतीचे वय त्या वेळी १४-१५ वर्षांचे असावे. मैनावतीचा छळ करूनही ती काहीच माहिती देत नाही याचा कानपूर कमिशनरला खूप संताप आला. त्यांनी तिला झाडाला बांधून पेटवून देण्याची आज्ञा दिली.
हा भीषण प्रसंग बघण्याकरिता कानपूर शहरवासीयांना मुद्दाम हजर राहण्यास सांगितले होते. दहशत बसविण्याचा तो एक वेगळाच मार्ग होता. मैनावतीला झाडाला बांधून जिवंत पेटवून दिले. मैनावती जिवंत जळत होती. लोक अश्रू ढाळत होते; पण मैनावतीने तोंडाने जराही आवाज केला नाही आणि या देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून मैनावती पंचत्वात विलीन झाली.
मैनावतीला नानासाहेबांचे नाव न सांगितल्यामुळे जाळून मारली. तिचा आत्यंतिक छळ केला गेला. परंतु या फुलाहून कोमल आणि वज्राहून कठोर तेजस्वी अशा मैनावतीने तोंडातून चकार शब्द न काढता मृत्यूला कवेत घेतले. नानासाहेबांच्या एकुलत्या एक कन्येला जिवंत जाळल्याची व तिने शांतपणे मरणाला कवटाळल्याची बातमी दिली गेली. तिला शांतपणे जळताना पाहून हिंदुस्तानवासीयांना ती देवतास्वरूपी वाटत होती. मैनावती ही हिंदी स्वातंत्र्याच्या लढ्यात आहुती देऊन अमर झालेली स्त्री होती.
एका स्त्रीचं हे कर्तव्यकठोर रूप. त्यासाठी आगीचा दाह सहन करण्याची सोशिकता, इंग्रजांच्या बायका-मुलांना सुखरूप पोहोचवण्यामागची ममता, त्यासाठी संरक्षक कवच म्हणून त्यांच्याबरोबर जाण्यातलं साहस, पत्ता गुप्त ठेवण्यासाठीची कणखरता, मृत्यू कवटाळण्यातलं धाडस.. एका स्त्रीचं हे बहुआयामी लखलखीत रूप.. एक स्त्री काय करू शकते हे दाखवणारं हे मैनावतीचं रूप आम्हा स्त्रियांना कायमच प्रेरणादायी ठरेल. अशा या शूर व धाडसी मैनावतीला मानाचा मुजरा.
- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)
No comments:
Post a Comment