जोपर्यंत नर्मदा नदी बॉन्ड्री पासून म्हणजे पश्चिम बंगाल पासून ते केरळ पर्यंतच्या पसरलेल्या विस्तीर्ण अशा दक्षिणी भारतावर राजे साळुंखे राजवंशाची सत्ता होती, तोवर या भागाकडे कोण्याहि मुस्लिम शासकांची वाकड्या नजरेने पाहण्याची सुद्धा हिम्मत ना व्हावी, एवढी जरब साळुंखे राजवंशाच्या मनगटात होती. त्यापुढील काळात दक्षिणेत अनागोंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन या परिस्थितीचा फायदा घेऊन मुस्लिमांनी दक्षिणेत पाय रोवण्यास सुरुवात केली. दक्षिणेतील पहिला मुस्लिम आक्रमक अल्लाउद्दीन खिलजी ठरतो, ज्याने इसवीसन १२९४ मध्ये यादवांच्या देवगिरीवर आक्रमण केले होते.
राजे साळुंखे चाळुक्यांच्या सार्वभौम राजसत्तेच्या काळात त्यांचा दख्खणात एकछत्री अंमल होता. इसवी सन ११८९ मध्ये चाळुक्यांच्या दक्षिणेतील या एकछत्री सत्तेचा अस्त झाल्यानंतर दक्षिणेतील सत्ता राजे साळुंखे चाळुक्यांचे मांडलिक असलेल्या यादव, होयसळ, काकतीय, कदंब इत्यादी राजवंशात विभागली जाऊन दक्षिणेत अस्थिरता निर्माण होऊन अनागोंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. हे सर्व राजवंश आपापल्या साम्राज्यविस्तारासाठी एकदुसर्यात युद्धे करण्यात आपली शक्ती पणाला लावत होते.
दक्षिणेतील चाळुक्यांच्या एकछत्री राजसत्तेतील साम्राज्याचे शकले होऊन त्यातील महाराष्ट्र भागावर यादव, कर्नाटक भागावर होयसळ तर आंध्र भागावर काकतीयांचे साम्राज्य प्रस्थापित झाले. उर्वरित भागावर पाल, चेर, सिंद, निकुंभ, कदंब, चोळ-चाळुक्य इत्यादी राजे साळुंखे चाळुक्यांचे इतर मांडलिक होतेच! दक्षिणेत निर्माण झालेल्या या अनागोंदीचा फायदा उठवत दक्षिणेवर आक्रमण करण्याचे मुस्लिम शासकात धाडस वाढून शेवटी तो दुर्दैवी दिवस उगवलाच!
इसवी सन १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने यादवांच्या देवगिरीवर आक्रमण केले तेव्हा यादवांच्या मदतीला दक्षिणेतील कोणतेही इतर मराठा साम्राज्य धावून आले नाही. खुद्द यादवांच्या काही फौजा काकतीयांसोबत युद्धात गुंतलेल्या होत्या. दक्षिणेतील या सर्व अनागोंदी अस्थिरतेच्या परिस्थितीचा फायदा उठवून मुठभर सैन्याच्या जोरावर खिलजीने यादवांच्या देवगिरी साम्राज्याचा अस्त करून त्यास मांडलिक बनविले. त्यानंतरच्या काळात दक्षिणेतील अस्थिरता कमी व्हायची सोडून ती वाढत गेली आणि दक्षिणेत इसवी सन १३४७ मध्ये एका मोठ्या बहामनी साम्राज्य मुस्लीम राजसत्तेने जन्म घेतला.
पुढील काळात हळूहळू दक्षिणेतील सर्व मराठा साम्राज्य लयास जाऊन संपूर्ण दख्खनभरात मुस्लिम राजसत्तेची खुरे विखुरली गेली. दक्षिणेत चाळुक्य, होयसळ, यादव इत्यादींनी एकत्र येऊन बनवलेले विजयनगरचे साम्राज्य त्याला अपवाद असले तरी या साम्राज्याला हवा तेवढा साम्राज्यविस्तार करता आला नाही. दक्षिणेतील अशा अस्थिर काळात मोठमोठ्या मराठा साम्राज्याचे वंशज छोट्या छोट्या संस्थानीकात विभागली जाऊन सरदार, देशमुख, जहागीरदार, पाटील अशा वतनात विभागली गेली. दक्षिणेत अजून दुसरे मराठा साम्राज्य निर्माण होण्यासाठी सतराव्या शतकाची वाट पाहावी लागली. या राजसत्तेची पायाभरणी श्रीमंत सरदार शहाजीराजे भोसले यांनी करून त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी या साम्राज्यावर कळस उभा केला.
( अपूर्ण )
@........

सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड


No comments:
Post a Comment