विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 21 September 2021

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड"

 

























शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड"
संदीप राक्षे✍🏻
प्रवासवर्णनकार असे मी!
अपरिचित वास्तूंच्या वाटांचा!!
गडकिल्ले आणि शिल्पाकृती!
छंद असे मज पाहण्याचा!!
नैसर्गिक अविष्कारात हरपून!
आत्मानंद घेतो मी सृष्टीसौंदर्याचा!!
निसर्ग देवतेच्या साक्षीने निसर्गसृष्टीत मुक्तविहार करण्याचे भाग्य क्वचित लोकांच्या वाट्याला येत असते. तसा मी स्वत:ला मोठा भाग्यवान समजतो कारण मला मनसोक्त भटकायला मिळते. गडकिल्ले अपरिचित वास्तू, दुर्मिळ मंदिर आणि निसर्गरम्य परिसर नेहमीच मला खुणावत असतात, आकर्षित करीत असतात. माझ्या मोबाईल मध्ये फेसबुकपेजहून अनेक गडकिल्ले, अपरिचित मंदिर अशा दुर्मिळ स्थळांचे स्क्रीन शाॅट काढून ठेवलेले असतात. आज बँकेला गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने स्क्रीन शाॅट चाळत होतो. चाळत असतानाच पेडगावचा धर्मवीर गड व तेथील लक्ष्मी नारायण मंदिराचे फोटो पाहून आज त्या पवित्र भुईकोट किल्ल्याला पहायचाच असा निश्चय केला. घरातील गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून चि. गौरव, चि. संकेत, पुतण्या रितेश व पुतणी श्रद्धा यांना सोबत घेऊन भोसरीहून सकाळीच दहा वाजता निघालो. आज शुक्रवार दिनांक १० सप्टेंबर २०२१ संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या आगमनाचा म्हणजेच गणेश चतुर्थी हा दिवस.
गणाधीशा! भालचंद्रा! गजवक्रा! गणराया!!
वक्रतुंडा! धुम्रवर्णा! गणपती बाप्पा मोरया!!
प्रत्येक गावोगावी गणेश मुर्ती घेण्यासाठी गर्दी दिसत होती. कुणी पाटावरून, कोणी डोक्यावरून, कोणी दुचाकीवरून तर कोणी रिक्षातून आपला बाप्पा घरी घेऊन जाताना दिसत होते. पारंपरिक वेषातील अनवाणी पावलांची लगबग पहात, भक्तांच्या चेहर्यावरील आनंद टिपत, गणरायाचा जयघोष ऐकत आमचा प्रवास पेडगावच्या धर्मवीर गडाकडे सुरू होता. भोसरी आळंदी शिक्रापूर ही शहरी गाव सोडून न्हावरे या गावापर्यंत पोहचलो होतो. शहरीभाग संपल्याने आता मस्त निसर्गाची सप्तरंगी उधळण पहातच पुढचा प्रवास सुरू होता.
न्हावरे, मांडवगण फराटा निवळीहून श्रीगोंदा तालुक्यातील कास्टी या गावी पोहोचलो कास्टी गावातून दौड अहमदनगर या मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळण घेऊन पेडगावच्या दिशेने निघालो होतो. भोसरी ते पेडगाव असा एकशे अकरा किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पेडगावात पोहचलो होतो.
१३व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले. पांडे पेडगावचा भुईकोट असे त्याचे नाव होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा वेरूळचे बाबाजी भोसले यांच्याकडे हा भुईकोट किल्ला देखभालीसाठी होता. यादवांकडून किल्ला निजामशाहाच्या ताब्यात गेला. निजामशाहीचा पाडाव झाल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांचा सरदार बहादूरशहा हा औरंगजेबाचा भाऊ होता. दक्षिणेचा सुभेदार असतांना त्याचा तळ पेडगावला होता. त्याने पेडगावच्या किल्ल्याची डागडूजी करुन या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले होते. त्यानंतर २००८ मध्ये या किल्याचे नाव धर्मवीर गड असे ठेवण्यात आले.
इसवी सन १६७४ मध्ये बहादुरगडावर २०० अस्सल अरबी घोडे आल्याची खबर छ. शिवाजी महाराजांना मिळाली. त्यांनी गमिनी कावा या युध्दतंत्राचा सुयोग्य वापर करुन गडावर हल्ला करण्याची योजना आखली. या मोहिमेचा प्रमुखाने सैन्याचे दोन भाग केले. सैन्याची एक तुकडी भल्या सकाळी बहादूरगडावर चालून गेली. बहदूरखानाने पेडगावातले मोगल सैन्य गोळा केले आणि मराठ्यांवर चालून गेला. थोडावेळ हातघाईची लढाई झाल्यावर मराठ्यांनी अचानक माघार घेतली आणि मराठ्यांचे सैन्य पळायला लागले. मराठे पळत आहेत हे पाहून मुघल सैन्याला चेव आला आणि त्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. मराठ्यांनी मोगल सैन्याला पेडगाव पासून जवळजवळ २५ कोस लांब नेले. अशा प्रकारे किल्ल्यातल्या मोगल सैन्याचे मराठ्यांनी दोन भाग केले. मोगल सैन्य लांब गेल्याची खात्री झाल्यावर मराठ्यांच्या सैन्याच्या दुसर्या मोठ्या तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला आणि किल्ल्यातील घोडे, खजिना आणि सामान घेऊन पोबारा केला.
धर्मवीरगडाच्या वेशीवरच मारूतीरायाची भली मोठी मुर्ती एका पत्राच्या शेडमध्ये उभी करून ठेवलेली होती. त्या मुर्तीच्या पायाखाली ईडा पिडा तुडवलेली दिसत होती. मारूतीचे दर्शन घेऊन आम्ही भव्य कमानीतून गडामध्ये प्रवेश केला. उजव्या बाजूलाच भैरवनाथ मंदिर दिसले ते पहाण्यासाठी गाडीतून खाली उतरलो. भैरवनाथ मंदिराकडे जाताना अनेक देखणी शिल्प अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली दिसत होती. भैरवनाथाच्या पाय-याशी गजांतलक्ष्मी प्रथमदर्शनी उभी केलेली दिसत होती. संपूर्ण काळ्या पाषाणात उभ केलेलं हे मंदिर परंतू त्याचा कळस अलिकडच्या काळात बांधलेला दिसत होता. गर्भगृहात व सभामंडपात अनेक शिल्प कोरलेली दिसत होती..छताला कमळ कोरलेले दिसत होते. वादक, गंधर्व, लज्जागौरी, यक्ष, अशी अनेक शिल्पाकृती या मंदिराचे वैभव वाढवित होती. भैरवनाथ मंदिर पाहून आम्ही रामेश्वर मंदिराकडे निघालो होतो बाभळीच्या वनराईतून अरुंद रस्त्याने आम्ही रामेश्वर मंदिराजवळ पोहचलो..कळस विरहित कातळात बांधलेली ही शिल्पाकृती पूर्ण दुर्लक्षित आहे. रामेश्वराचे हे मंदिर त्रिदल प्रकारातील आहे. मुख्य दरवाज्यातून आम्ही मंदिरात प्रवेश केला तिथे वटवाघूळींचे साम्राज्य दिसले, आम्ही मंदिरात शिरल्यावर दहा बारा वटवाघूळ आमच्या डोक्यावरून चिर चिर करीत मंदिराबाहेर उडून गेल्या. या मंदिरात उजव्या व डाव्या बाजूला दोन मुर्ती विरहित गर्भगृह आहेत तिथे पूर्ण अंधार आणि कुबट वास येत होता. संपूर्ण सभामंडप चार मुख्य खांबावर व चार अर्ध खांबावर तोललेल आहे. मुख्य गर्भगृहात एक पिंड भग्न अवस्थेत पडलेली पाहिली. डाव्या बाजूला भिंतीला टेकून तीन फूटी गणपतीची मुर्ती व उजव्या बाजूस जैन तीर्थकरांची मुर्ती पाहून आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. तेथून आम्ही लक्ष्मी नारायण मंदिराकडे निघालो.
भीमा नदीच्या तीरावर सौंदर्यशाळा फुलून आलेली दिसत होती. रंगीबेरंगी पानेफुले बहरात आली होती. थोडा पावसाचा शिडकावा पडल्याने आकाशात सर्व रंगसंमेलनाचा उत्सव सुरू झाला होता. नदीच्या उत्तरेकडे पुसटसे इंद्रधनुष्य अवतरलेले दिसत होते, इंद्रधनुष्य जेव्हा पावसाच्या थेंबा थेंबातून जमिनीवर पसरते तेव्हा इंद्रधनुष्याचे सर्वच रंग फुलाफुलातून रंगांचा गजर करीत एकरूप होते. हे मनोहरी दृष्य पाहताना ईश्वरीय अविष्काराचे दर्शन होते. इंद्रधनुष्याचा अविष्कार पहातच मी गौरव, संकेत, रितेश आणि श्रद्धा लक्ष्मी नारायण मंदिराजवळ पोहचलो होतो. मंदिर पहाताच थोडावेळ स्तब्ध उभे रहायलो. मंदिरावर बाहेरूनच इतके अद्भुत कोरीव काम दिसत होते नेमकं काय पहाव सुचेनाच, या अद्भुत लक्ष्मी नारायण मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस अनेक सुंदर शिल्पाकृती सोबतच आठ दिशांचे पालन करणारे अष्टदिक्पाल कोरलेले आहेत. पहिले ते पहायचे आणि नंतर संपूर्ण मंदिर पहायचे असे ठरले, आम्ही सर्वांनी हे मंदिर वायव्य दिशेकडून पहायला सुरवात केली. वायव्य दिशेची पालक देवता वायूदेवांची मुर्ती त्यांचे वाहन हरिण व आयुध कोरलेली पाहून, थोडे पुढे गेल्यावर उत्तर दिशेला कुबेर देवांची मुर्ती व त्यांचे वाहन घोडा हे कोरलेले पाहिले, पुढे ईशान्य दिशेला देवाधि देव महादेवांची मुर्ती व त्यांचे वाहन नंदी कोरलेले आहे ते पाहून मंदिराच्या मागे म्हणजेच पूर्वदिशेला इंद्र देवतेची मुर्ती व त्यांचे वाहन ऐरावत कोरलेला पाहिला, आग्नेय दिशेला अग्नीदेवाची मुर्ती व त्यांचे वाहन मेंढा कोरलेला पाहिला तेथून दक्षिण दिशेला यम देवतेची मुर्ती व त्यांचे वाहन महिष कोरलेला आहे. नैऋत्य दिशेला या दिशेचे दिशापालक वेताळ देव वाहन नर हे कोरलेले असून ते पाहून मंदिराच्या पश्चिम दिशेला वरूण देवता व त्यांचे वाहन मकर कोरलेले पाहिले आयुष्यात पहिल्यांदाच असे अद्भुत मंदिर पहात होतो त्या मंदिराच्या चोहोबाजूला प्रत्येक दिशांचे पालक देवता कोरलेली दिसते तसेच बाली व सुग्रीव यांची संपूर्ण गोष्ट चित्रशिल्पाकृतीत साकारलेली आहे. गजस्तर, अश्वस्तर, सुंदर अशी बाहेरील बाजू पाहून आम्ही मंदिरात प्रवेश केला. या मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत पश्चिम उत्तर व दक्षिण आम्ही पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला. सछिद्र चौकोनी आकृती असल्यामुळे मंदिरात उजेड व वारा भरपूर येत होता. मंदिराचा सभामंडप चार खांबावर तोललेला दिसत होता. गर्भगृहाचा तलविन्यास पंचरथ प्रकारचा असून त्याच्या भद्रांना नंदिका आहेत. पीठ भागावर अलंकरणात्मक नक्षी असलेले खूर, त्यावर गजथर अश्वथर कोरलेले आहेत. विष्णूची चोवीस रूपे इथेच कोरलेली दिसतात, मंदिरात चार देवकोष्टे आहेत. गर्भगृहाचे व्दार हे हे पंचशाख पद्धतीचे असून त्या व्दारावर गंधर्व, पद्मलता,आणि व्याल कोरलेले दिसतात तसेच व्दारशाखेवर गंगा, यमुना, चौरीधारक, वैष्णव व्दारपाल कोरलेले आहेत. गर्भगृहात मुर्ती नसून तिथे एक वीरगळ आणून बसवलेली आहे. या मंदिरात कोल्हापूर प्रमाणेच २१/२२/२३ जूनला किरणोत्सव पहायला मिळतो. लक्ष्मी नारायण मंदिराची ही अद्भुत कलाकृती राहून राहून पहावीसी वाटत होती. ती पहाताना मन आपोआप ताजेतवाने प्रफुल्लित झाले होते. तसेच अशी पुरातन मंदिर आपल्यासाठी तीर्थक्षेत्र असतात. तीर्थक्षेत्र म्हणजे पवित्र जागा तिथे ऋषीमुनींनी केलेल्या तप साधनेने समाज कल्याणाच्या भावनेने त्या जागा पवित्र झालेल्या असतात अशा तीर्थक्षेत्रात त्या पाषाणाचे, शिल्पाकृतीचे भक्त संत ऋषी मुनींची स्पंदने असतात त्यामुळेच तिथे एक प्रकारची वेगळीच उर्जा निवास करीत असते. मंदिराच्या वातावरणात एक वेगळाच नाद ऐकू येत होता. इथली व्हायब्रेशन पवित्र होती, मन भक्तिभावाने भारून गेले होते. अशा वेळेस आपल्या मेंदूतून निघणा-या लहरी ते वातावरण अधिक शक्तिमय करत असतात.
भारताच्या प्राचीन कलावैभवाच्या व शिल्पाकृतीच्या पाऊलखुणा भारतात अनेक ठिकाणी पहायला मिळतात पेडगाव येथील धर्मवीर गडावरील हे लक्ष्मी नारायणाचे मंदिर यादव कालीन हेमाडपंती शैलीतील हे मंदिर फक्त मंदिर नसून भव्य दिव्य असा अष्टाकृती रथच आहे. या मंदिराची असामान्य निर्मिती भारतीय वास्तूशिल्पांची यादव साम्राज्याची वैभवशाली कथा सांगून जाते. हे सौंदर्यशिल्प पहाताना मन मोहरून जाते, सुवर्ण पाषाणांची ही चिरंजीव भाषा आपलीशी होऊन जाते या शिल्प निर्मितीतली असामान्य प्रतिभा व प्रतिभावान निर्मात्याला लक्ष लक्ष धन्यवाद द्यावेसे वाटतात. अनिमिष नेत्रांनी ही वास्तू पुन्हा पुन्हा पहात रहावेसे वाटते, हे मंदिर उभारताना अज्ञात शिल्पकारांनी त्यावर चढवलेला अनमोल कलापूर्ण साज म्हणजे सत्यम शिवम सुंदरमचा देखणा कलाविष्कार आहे. आपल्या पूर्वजांनी रक्ताच पाणी करून प्राचीन काळी अनेक मंदिरे, गुहा, लेणी, किल्ले, स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्या वारसास्थळांच संवर्धन करण, जतन करण हा आपल्या प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
अद्भुत रहस्यमयी सुंदर विलक्षण लक्ष्मी नारायण मंदिर पाहून आम्ही संपूर्ण गडावर ज्या नळयोजनेने पाणी पुरवठा करण्यात येत होता ती हत्ती मोट पाहून आम्ही या गडाचे ऐतिहासात सुवर्णाचे पान असलेल्या दिवाण ए खास या वास्तूजवळ पोहचलो इथेच औरंगजेब वास्तव्यास असायचा, तसेच छ. संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूमध्ये प्रवेश केल्यावर एक शौर्यमयी वातावरण झाले होते. समोरच औरंगजेबाचे सिंहासन जिथे होते ती चौथा-याची जागा १८६ × १५५ फूट इतक्या आकाराची आहे. दिवाण ए खासची वास्तूची प्रचंड पडझड झालेली दिसत होती. काही ठिकाण अजूनही शाबूत दिसत होती. हमाम खान्यात बाथटब सुद्धा दिसत होते. हे सारे पहात दिवाण ए खास मधल्या औरंगजेबाच्या दरबाराच्या ठिकाणी आलो होतो. ज्या चौथ-यावर औरंगजेबाचे सिंहासन होते तिथे थोडावेळ बसलो होतो, त्यावेळेस छावा कादंबरीत वाचलेले या किल्याशी संबंधित व छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी असलेले काही प्रसंग आपोआपच मनपटलावर उमटले...
संगमेश्वर गाढ झोपेत होते, सरदेसायांच्या वाड्यावर हत्यारी, गस्ती पहारे फिरत होते. वाड्याच्या सुखदालनातील मंचकावर झोपलेले छत्रपती संभाजी महाराज जुन्या आठवणीत कुस पालटत होते, झोप काही येत नव्हती. वाड्याच्या पागेतील घोडी मधेच नाकपुड्या झटकून फुरफुरत होती. काहीतरी अनुचित घडण्याचे संकेत देत होती. इतक्यात खब-याने मुकर्रबखानाने संगमेश्वरावर आक्रमण केल्याची बातमी कवी कलशांना दिली. तोपर्यंत मुकर्रब खान संगमेश्वराच्या वेशीवर पोहचला होता. धी ऽ न धी ऽ न च्या आरोळीने संगमेश्वर दणाणले होते, ती आरोळी देसाई वाड्यात असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कानावर पडताच राजे ताडकन उठले, आपल्याच माणसांनी दगाफटका केला हे जाणवले, अचानक झालेल्या हल्यांने राजे थोडेही घाबरले नाहीत. दालनातल्या तबकातील टोप मस्तकावर ठेऊन, म्यानातली तलवार बाहेर खेचून संभाजी राजे वाड्याबाहेर पडले, तिथेच शत्रूशी सामना झाला. गोफण फिरवावी तशी तलवार फिरवीत संभाजी राजे हाशम्यांना कापू लागले, लढता लढता नावडी नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहचले होते. तिथे जिकडे तिकडे हशमांची टोळीच्या टोळी उभी होती. अखेर सा-यांनी छत्रपती संभाजी महाराजांना चहूबाजूंनी घेरले आणि सिंहाचा छावा मुकर्रब खानाच्या जाळ्यात अडकला होता. छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांचे हात दोरखंडाने करकचून बांधण्यात आले, रश्यांनी दोघांना घोड्यावर जखडून बांधण्यात आले, अशा अवस्थेत दोघांना घेऊन मुकर्रब खान बहादूर गडाच्या दिशेने निघाला. १५ फेब्रवारी १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना बहादूर गडावर आणण्यात आले. बहादूर गडाच्या वेशीवर पोहचताच मुकर्रब खानाच्या हाशम्यांनी राजांना व कवी कलशांना घोड्यावर खाली खेचले, त्यांच्या गळ्यातील मोतीकंठे, कानांतील सोन चौकडे असे अनेक मौलिक डाग अक्षरशः ओरबडून काढले. राजांना व कवी कलशांना विदुषकी ढगाळ कुर्ते बळजबरीने घालण्यात आले, डोक्यावर विदुषकी टोप्या घालण्यात आल्या. हात आणि मान लाकडी इराणी पद्धतीच्या तख्ताने जखडण्यात आले, तुता-या नगारे चौघडे वाजवीत, हाशम धीऽ न धीऽ न असा घोष करीत राजांची धिंड धर्मवीर गडातील (बहादूर गड) औरंग्याच्या दिवाण इ आमचा या दरबारात आणण्यात आले. दरबारात औरंग्याचे अनेक सरदार उपस्थित होते. छत्रपती संभाजी राजांना अशा अवस्थेत पाहून औरंग्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, इतके जखडून सुद्धा संभाजी राजे ताठमानेने उभे होते. आज पहिल्यांदाच औरंग्याची आणि छत्रपती संभाजी महाराजांची नजरभेट होत होती, जसे अंगपूत पेटलेल्या ज्योतीला वादळ बघत होते, चिवट जीवनशक्तीला मौत बघत होती, माणसातल्या मर्दपणाला राजकारणी गाळीव कपट बघत होते. बघता बघताच औरंगजेब अचानक पाय-या उतरून गालीच्यावर येऊन नमाज पढू लागला, औरंगजेब बरोबरच सारेच जण नमाज पढू लागले. छत्रपती संभाजी राजेही तो नजारा बघत होते. राज्यांच मन उफाळून येत होते, अशांतच भरला दरबार थरकून जाईल अशा धारदार आवाजातचं छंदोगामात्य कवी कलश यांच्याकडे पहात त्यांना म्हणाले कवीराज या औरंग्याकडे व दरबारातील सर्वांच्याकडे पहाताना तुम्हा एखादे काव्य सुचत असेल तर म्हणा! छत्रपतींनी अशावेळेस सुद्धा काव्य म्हणायला सांगितल्यावर छंदोगामात्यांचा उर भरून आला, धमन्या स्फुरल्या आणि आपोआपच त्यांच्या ओठांतून त्वेषानेच एक काव्य प्रकटले.
यावन रावन की सभा संभू बंध्यो बजरंग!
लहू लसत सिंदूरसम खुब खेल्यो रनरंग !!
जो रवि छवि लछत ही खद्योत होत बदरंग!
त्यो तुव तेज निहारी ते तखत त्यज्यो औरंग!
कवी कवितेचा अर्थ असा की
हे राजन, ज्या प्रकारे हनुमानाला रावणाच्या सभेत आणण्यात आले तसेच तुम्हाला या सभेत आणलंय. जसा हनुमानाचा देह सिंदूरचर्चित होता तसाच तुमचा देह ही रणांगणातील रक्तानं लाल आहे. सूर्य उगवल्यावर काजव्यांचे तेज नष्ट होते, त्याच प्रमाणे पहा हे राजन तुम्हाला बघताच औरंग्याने आपल्या तख्ताचा त्याग करुन समोर गुडघे टेकले
हे काव्य ऐकताच संपूर्ण दरबार चवताळून उठला आणि इन दोनोंकी जबान काट दो असे ओरडू लागला.. रागाने लालबुंद झालेल्या औरंगजेबाने मुकर्रब खानाला दोघांनाही कोठडीत घेऊन जाण्याचा आदेश दिला. काही दिवस बहादूर गडच्या कोठडीत ठेवून छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना तशाच भयानक अवस्थेत वढू बु. येथे घेऊन जाण्यात आले. मी ही सारी दृष्य त्याच धरतीवर तोच इतिहास साक्षात पहात स्वताला हरवून गेलो होतो. धर्मवीरगडाची संपूर्ण सफर करून चौघेजण जेव्हा छत्रपती संभाजी महाराज शौर्यस्मारका जवळ पोहचलो तेव्हा गौरव, संकेत, रितेश आणि श्रद्धा या चौघांनी या स्मारकाचे दर्शन घेत छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा म्हणायला सुरूवात केली ऽऽऽ
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते!
यदं कसेविनी लेखा वर्तते कास्य नो परि!!
या राजमुद्रेचा आवाज ऐकून मी भानावर आलो मुलांना त्या अवस्थेत पाहून माझा उर भरून आला तो क्षण मी मोबाईलच्या कॅमेर्यातून टिपला मुलांची ही गर्जना ऐकून तेथील "टीम धर्मवीर गडाचे काही शिलेदार तिथे आले त्यामध्ये प्रतिक पाचपुते, लालासाहेब अवचर, रोहीत कणसे, सिद्धार्थ खेडकर हे होते त्यांनी आमची विचारपूस केली. धर्मवीर गडावरील या टीमने केलेल्या विविध कार्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली. मी त्यांचे कौतुक केले ते करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले! या युवावर्गाचे कार्य पाहून मनाला समाधान वाटले. अशा पवित्र स्थळांबद्दल जागृती होऊन युवावर्ग स्वखर्चाने गडकिल्ल्यांचे संवर्धन करीत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो आहे. इतिहास प्रेमींनी व समाज्यातील प्रत्येक घटकांनी सुद्धा अशा या तरूणांना प्रोत्साहन दिले पाहिजे, मदत केली पाहिजे. तेव्हा कुठे
आपल्या पूर्वजांनी रक्ताच पाणी करून प्राचीन काळी अनेक मंदिरे, गुहा, लेणी, किल्ले, स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्या वारसास्थळांच संवर्धन होईल. अशी ही वारसास्थळ जतन करण हा आपल्या प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे..
माझा हा लेख वाचणा-या सन्मानिय वाचकांना हात माझी जोडून विनंती आहे. आयुष्यात एकदा तरी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्यस्मृती स्थळ असलेला "धर्मवीर गड" स्वत:च्या डोळ्यांनी जावून पहा. इथले चैतन्य अनुभवा, इथल्या वास्तू पहा! जीवनाचे सार्थक होईल.
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...