विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 31 October 2021

दौलताबाद (जुने नाव देवगिरी)

 

*⛳ स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य⛳*
*

दौलताबाद (जुने नाव देवगिरी)* हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव असून येथे यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे.
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला देवगिरीचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला, बुलडाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. हा पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.[२]
विशेष म्हणजे त्या गडावरील मेंढातोफ आहे. ती तोफ अतिशय अद्भुत आहे, त्या तोफेचे खासियत म्हणजे तो तोफ एक माऱ्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्या मध्ये आहे. ती तोफ पंच धात़ूंनी निर्माण केली आहे..
जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वास्तू आहेत. यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला हा त्यापैकीच एक आहे. रामदेवराव यादवांपासून निझामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला औरंगाबादची शान आहे. औरंगाबादपासून सुमारे 15 किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. देवगिरी या नावामागेही एक दंतकथा आहे.
एकदा शंकर-पार्वती सारिपाट खेळत होते. त्यात शंकर पराभूत झाले आणि रागारागाने वेरूळच्या अरण्यात निघून गेले. पार्वती भिल्लिणीच्या वेशात म्हैसमाळच्या डोंगरात राहू लागली. या भिल्लिणीवर शंकर अनुरक्त झाले आणि त्यांनी देवांना वेरूळ परिसरात येण्यास मनाई केली आणि जवळच असलेल्या ज्या डोंगरावर देव राहू लागले तो देवगिरीचा डोंगर होय. या डोंगरावर बांधलेला किल्ला म्हणून यास देवगिरीचा किल्ला म्हणतात.
राष्ट्रकुट राज्यातील र्शीवल्लभ याने इ.स. 756 ते 772 या काळात हा किल्ला उभारला. भारताच्या इतर कोणत्याही राज्यात दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीच उभा असल्यामुळे दक्षिणेच्या इतिहासात त्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचा डोंगर 600 फूट उंचीचा असून त्याच्या भोवती 50 फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून 150 ते 200 फूट उंचीचा कडा इतका तासून काढलेला आहे की सापालाही वर चढून जाता येणे शक्य नाही.
महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूस ‘चांदमिनार’ नावाचा मनोरा दिसतो. 21व्या शतकात मुस्लिम राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनोर्याची उंची 210 फूट असून बुंध्याचा परीघ 70 फूट आहे. याला एकूण चार मजले आहेत. याच भागात ‘किल्ले शिकन’ नावाची एक तोफ ठेवलेली आहे. ही तोफ पंचधातूंची आहे. या तोफेला ‘मेंढा तोफ’ असेही म्हणतात. जवळच एक 180 स्तंभाचे हेमाडपंती मंदिर आहे. 1950 मध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने येथे भारतमातेची मूर्ती स्थापन केली. या मंदिरासमोरच हत्ती हौद नावाचा 150 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 23 फूट खोल असा विस्तीर्ण जलाशय आहे.
राजा रामदेव धान्य व दारूगोळा ठेवत असलेला काळाकोट पाहण्यासारखा आहे. याच धान्य गोदामामध्ये फितुरी झाली होती. तेथे धान्याऐवजी मिठाची पोती रचली गेली आणि भुकेल्यापोटी मराठी फौजेचा पराभव झाला. तसेच अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेतील पहिले पाऊल दौलताबाद किल्ल्यावरच टाकले. यादव साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला इ. स. 1318 मध्ये हरपाळदेवाला ठार मारून अल्लाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतला. या किल्ल्याने खिलजी, तुघलक, बहामनी, मुगल, निझाम या घराण्यांचे स्वामित्त्व स्वीकारले होते. महंमद तुघलकाने तर इ. स. 1327 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणली. त्यानंतर देवगिरीला दौलताबाद हे नाव दिले. 1950 मध्ये निझामाचे राज्य खालसा केल्यानंतर देवगिरीला स्वातंत्र्याचा प्रकाश लाभला. शिवलिंगाच्या आकाराचा हा गड म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. 1500 वर्णांच्या सुखद व दु:खद घटनांनी न्हालेला, शेकडो पिढय़ांच्या हृदयांचे स्पंदन अनुभवलेला देवगिरीचा हा दुर्ग आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा साक्षीदार आहे. अनंत प्रगट-अप्रगट तत्थ्यांचा संग्रह आपल्या उराशी बाळगून असलेला हा दुर्ग देशाची अनमोल संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, हे विसरून चालणार नाही...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...