विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 18 August 2022

सरनोबत नेताजी पालकर

 


सरनोबत नेताजी पालकर
पोस्तसांभार :डॉ विवेक दलवे पाटील
हिंदवी स्वराज्याचे २ रे सरसेनापती नेताजीराव पालकर म्हणजेच इतिहासातील प्रतिशिवाजी हे शेवटपर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ होते हे याठिकाणी लक्षात घ्यावे.🙏 त्यांचा जन्म १६२० साली रायगड जिल्ह्यातील खालापूर या ठिकाणी झाला. त्यांचे काका बळवंतराव पालकर हे पराक्रमी सरदार शहाजी राजांच्या सेवेत सुरुवाती पासून होते. १६३५ साली नेतोजी पालकर देखील शहाजी राजांच्या सेवेत रुजू झाले. १६४० साली शहाजी राजांनी स्वराज्याचा संकल्प केला. तेव्हा त्यांच्या सोबत माणकोजी दहातोंडे, यशवंतराव उर्फ बाजी पासलकर, कान्होजी नाईक जेधे, बळवंतराव पालकर व नेतोजी पालकर देखील होते.१६४१-४२ या काळात नेताजींनी आदिलशाही फौजेला चांगलंच पिटाळून लावलं.१६४३ साली शहाजी राजांची रवानगी आदिलशहाने बंगळूर प्रांतात केली. त्यांच्या सोबत बळवंतराव पालकर देखील गेले होते.१६४३ ला स्वराज्याची सूत्रे छत्रपती शिवरायांनी हातात घेतली.१६४५ साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना नेताजी पालकर उपस्थित होते. १६४६ साली तोरणा स्वराज्यात आणताना बाजी पासलकर यांच्यासोबत नेताजीराव देखील खांद्याला खांदा लावून लढले होते. व तोरणा स्वराज्यात दाखल झाला.१६५० ला महाराजांसोबत राजगड घेताना फार मोठा पराक्रम केला. म्हणून हिंदवी स्वराज्याचे १ ले घोडदळ प्रमुख पद नेतोजी पालकर यांना शिवरायांनी दिले. १६५२ ला संपूर्ण स्वराज्याचे सरसेनापती पद देखील महाराजांनी नेताजींना दिले. १६५४ ला पुरंदरचे किल्लेदार म्हणून नेताजी पालकर यांची नेमणूक केली.त्यांनी अनेक युद्धे गाजवली. १६५६ ची जावळी मोहिम,१६५९ साली प्रतागडावरील केलेला पराक्रम,१६६० ला विजापूरला वेढा दिला,१६६१ साली उंबरखिंडीत महाराजांसोबत कार्तलाबखानाचा पराभव,१६६३ चा लाल महालातील छापा असेल,१६६४ ची सुरतेची लूट बऱ्याच मोहिमांचे नेतृत्व सरसेनापती नेताजी पालकर यांनी केले होते.
१६६५ ला फलटण प्रांत व वसंतगड जिंकून घेतला.
१६६५ ला पुरंदरचा तह झाला. त्यात छत्रपती शिवराय,नेतोजी,मिर्झाराजे जयसिंह व दिलेरखान हे विजापूरवर चालून गेले असता तेथे विजापूरचा सरदार सर्जखान याच्यासमोर सगळे पराभूत झाले. याच खापर दिलेरखान याने शिवरायांवर फोडलं. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळा घेण्यासाठी महाराज रात्री पन्हाळ्याला गेले. इकडे नेताजींनी कच खाल्ली.(शिवरायांच्या पूर्व योजनेनुसार) आणि मिर्झाराजे जयसिंह व दिलेरखान यांचा विजापूर मध्ये दारूण पराभव केला. नेतोजी विजापूर मधून पन्हाळ्याला मुद्दाम वेळेवर पोहोचले नाहीत. (हे देखील पूर्व नियोजित होते.) म्हणून आपले १००० मावळे कामी आले व शिवरायांचा पन्हाळ्यावर पराभव झाला.(ठरल्याप्रमाणे)
राजगडी आल्यावर महाराजांनी नेताजींना बोल लावले,"समयास कैसे पावला नाहीत." व स्वराज्यातून हकालपट्टी केली. नेताजीराव विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले.(शिवरायांचा राजकीय डाव) आणि दिलेरखान व मिर्झाला धरणी माय ठाव करून सोडले. १६६६ ला महाराज आग्रा भेटीला गेले असता मिर्झा नेतोजी पालकर यांना विनंती करू लागला. की आम्हास येऊन मिळा. राजांनी पत्राद्वारे नेताजींना कळविले की मिर्झाला जाऊन मिळावे. मग सरसेनापती नेताजी पालकर हे मिर्झाराजे यास जाऊन मिळाले. शिवराय आग्र्याहून सुटले म्हणून प्रतिशिवाजी सुटू नये यासाठी औरंग्याने १९ ऑगस्ट १६६६ रोजी नेताजींच्या अटकेचे फर्मान काढले. व १६६७ च्या सुमारास नेतोजी पालकर यांना दिलेरखान याने धारूर येथे कैद केले. त्यांचे काका कोंडाजी पालकर व पुत्र नरसोबा पालकर हे देखील कैद झाले. व सर्वांना आग्र्याला हलवले. तिथे नेताजींचा अतोनात छळ सुरू झाला. त्यातच कोंडाजी पालकर यांचं निधन झालं. तरीही नेतोजी नमले नाहीत. पण ही खबर महाराजांना कळाली तेव्हा त्यांनी नेताजींना पत्र लिहिले,
"काकाश्री, देह राखणे.. शरीर वाचवणे.. धर्मांतराचे दिव्य पत्करणे.. संधी मिळताच पलायन करावे..बजाजी नाईक निंबाळकराप्रमाणे तुम्हाला देखील स्वधर्मात घेऊ..! तुमचा आमचा धर्म एकच..स्वराज्य..!"
हेच पत्र बहिर्जी नाईक यांनी नेताजींना आग्र्यात दिले.आणि प्राणाहून प्रिय असा स्वधर्म नेतोजी पालकर यांना सोडावा लागला. नेताजींनी शिवरायांच्या राजाज्ञेचे पालन केले.
१६६७ साली नेताजी पालकर यांचं धर्मांतर झाले. त्यांचे नाव "महंमद कुली खान" असे बादशहाने केले. व त्यांना काबूल कंधारच्या मोहिमेवर रवाना केले. तिथून पळून येण्याचा २ दा प्रयत्न नेताजींनी केला. पण दोन्ही वेळेस अपयश आले. पुढे ९ वर्षे त्यांना स्वराज्यापासून दूर राहावे लागले.
पुढे शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. स्वराज्य विस्तार हा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. औरंग्याचा प्रत्येक सरदार हा महाराजांसमोर अपयशी ठरत होते. तेव्हा औरंग्याने महमद कुली खान म्हणजेच नेताजींना महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठविले. सोबत दिलेरखान याला पाठवले. तेव्हा मे १६७६ साली नेताजी पालकर हे दिलेरखानाच्या छावणीतून पळून रायगडावर आले. रायगडावर येताच नेताजींकडे पाहून महाराजांनी सरनौबत…असा हंबरडा फोडला..! नेताजींना कारभारी मंडळी यांनी स्वराज्यात घेण्यास खूप विरोध केला. मात्र श्री शिवछत्रपती आणि स्वराज्याचे सर्व शिलेदार हे नेताजींच्या बाजूने होते. त्यांना स्वराज्यातच नाही तर जून १६७६ साली पुनश्यः हिंदू धर्मात घेतले.
तसेच त्यांचे पुत्र नरसोबा पालकर व नातू जानोजी पालकर यांना देखील हिंदू करून घेतले. व जानोजी पालकर यांचा विवाह शिवरायांनी त्यांची कन्या कमलाबाई हिच्याशी लावून दिला.
पुढे महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेला जाताना सोबत त्यांचे जुने निष्ठावंत सहकारी होते. तेव्हा नेतोजी पालकर देखील छत्रपती शिवरायांसोबत या मोहिमेत सहभागी झाले होते.
१६७८ ला दक्षिण दिग्विजय करून महाराज व सहकारी पुन्हा महाराष्ट्रात आले. तेव्हा शिवरायांनी नेतोजी पालकर यांना चिपळूण येथील मोहिमेवर पाठविले. १६८० पर्यंत तब्बल ३ वर्षे नेताजीराव चिपळूण मध्ये राहिले. तिथे असताना नेताजींनी किनारपट्टी नजीक पोर्तुगिजांचा दारूण पराभव केला.
३ एप्रिल १६८० साली महाराजांचे रायगडावर निधन झाले. आणि रायगड फितूरांनी घेरला. राजांवर अंत्य संस्कार झाले. शंभुराजे हे तेव्हा पन्हाळ्यावरचं होते. इकडे रायगडावर राजारामराजे यांचे मंचकारोहन पार पडले. आणि अण्णाजी दत्तो व मोरोपंत पिंगळे हे तळबीड या ठिकाणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भेटीस गेले. तेव्हा हा घटनाक्रम नेतोजी पालकर यांना कळला. मग येसाजी कंक हे नेताजींना चिपळूण मध्ये येऊन मिळाले. व तिथून नेताजीराव व येसाजीराव रायगडाकडे गेले. तिथे येसाजी कंक यांनी सावंत सरदार याचा पराभव केला. तर नेताजींनी रायगडाचा किल्लेदार राहुजी सोमनाथ याचा पराभव करून त्यास जेरबंद केले. आणि रायगडाचा वेढा फोडून काढला. तळबीड मध्ये हंबीररावांनी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे यांना कैद केले. व पन्हाळ्यावर शंभुराजे यांनी जनार्दन पंत हणमंते यांना कैद केले. व हंबीरराव मोहिते शंभुराजे यांना येऊन पन्हाळ्यावर मिळाले. याच समयास हिरोजी फर्जंद हे पन्हाळ्यावरचा खजिना घेऊन पसार झाले. त्यास जोत्याजी केसरकर याने कैद करून शंभूराजे यांच्यासमोर आणले. सर्व फितुरांना घेऊन शंभूराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते रायगडावर आले. तेव्हा नेताजींच खास कौतुक शंभुराजे यांनी केले.
पुढे १६ जानेवारी १६८१ रोजी शंभूराजे यांचा रायगडी राज्याभिषेक सोहळा पार पडला. नेताजी पालकर यांचा देखील मान सन्मान पार पडला. कारण त्या समयास नेताजीरावांचे वय ६१ वर्षे इतके होते. स्वराज्यातील सगळ्यात ज्येष्ठ व जुने आणि एकनिष्ठ शिलेदार म्हणून नेतोजीरावांचा दबदबा कायम होता.
राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर शंभुराजे यांनी नेतोजीरावास बागलाणचे किल्लेदार म्हणून नेमले. १६८१ च्या सुमारास नेताजी बागलाण प्रांतात गेले. तिथे त्यांनी मोगलांना सलो की पळो करून सोडले. या पराक्रमामुळे १६८२ साली शंभुराजे यांनी नेताजींना नांदेड मधील हदगाव तालुक्यातील तामसा येथील जहागिरी दिली. तसेच नांदेडचे सुभेदार म्हणून त्यांची नेमणूक केली. त्या समयास देखील सुभेदार नेतोजीराव पालकर यांनी रायबगान या स्त्री सेनानीच्या फौजेचा धुव्वा उडवला. तसेच गोवळकोंड्यावरून येणारी कुतुबशाही परकीय आक्रमनाची वादळे महाराष्ट्राच्या सीमेवरच रोखली.
आणि तामसा येथे असतानाच सरसेनापती नेताजीराव पालकर यांचं १६८२ साली वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...