विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 29 December 2022

घाशीराम कोतवालची अनसुनी कहाणी भाग १

 

घाशीराम कोतवालची अनसुनी कहाणी
पोस्तसांभार ::राजेंद्र म्हात्रे

भाग १
नानासाहेब पेशव्यांच्या दोन दशकांच्या राजवटीत पुणे आपलं रंगरूप बदलू लागलं होतं. पण 1761 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर निजामाशी युद्ध सुरू झाले. पेशव्यांनी भागानगर (हैदराबाद) वर हल्ला केला आणि निजामाने, पुण्यावर! पुण्याचा जवळजवळ दोन तृतीयांश भाग त्याने जाळला आणि अनेक मंदिरांची विटंबना केली. अखेरीस, ऑगस्ट 1763 मध्ये राक्षसभुवन इथे झालेल्या अंतिम लढाईत माधवराव पेशव्यांनी निजाम अलीचा पराभव केला. त्यानंतर या तडफदार, तरुण पेशव्याने रूप हरवलेल्या मराठा साम्राज्याची पुनर्बांधणी करण्यास सुरुवात केली आणि पुढील सात वर्षांत मराठा साम्राज्य कुमाऊंपासून श्रीरंगपट्टणमपर्यंत वाढवले.
राज्यात शिस्त लागू करण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी, माधवरावांनी 1764 मध्ये पुण्यात कोतवाल कार्यालयाची स्थापना केली.
राज्यात शांतता प्रस्थापित करून गुन्हेगारांना शासन देण्यासाठी पोलिस दल आणि गुप्तचर विभाग तयार केले होते व त्याची जबाबदारी पेशव्यांच्या विश्वासपात्र नाना फडणवीस यांच्याकडे देण्यात आली. नानांनी हे कार्य अतिशय जबाबदारीने पार पाडले आणि त्याचा परिणाम म्हणून पुण्यातील लोकांची सुरक्षा सुनिश्चित झाली.
  • तथापि, 1772 मध्ये माधवरावांचा मृत्यू आणि ऑगस्ट 1773 मध्ये त्यांचे भाऊ नारायणराव यांची हत्या, यामुळे कोतवालीला अधिकच महत्व आले. इंग्रज-मराठा युद्ध, सखाराम बापूंसारख्या जवळच्या सहकाऱ्यांकडून विश्वासघात यासारख्या घटनांनी नानांना; हा अंतर्गत विरोध चिरडण्यासाठी; गुप्तचरांचे विस्तृत जाळे वापरण्यासाठी आणि सुव्यवस्था लागू करण्यासाठी सर्व मार्ग वापरण्याची मोकळीक व अधिकाधिक अधिकार कोतवालांना देण्यास भाग पाडले.
1777 मध्ये कधीतरी, इंग्रज मराठा युद्धादरम्यान, औरंगाबाद येथील घाशीराम सावलदास नावाचा एक गौड ब्राह्मण पुण्यात आला. त्याच्या नियोजनकौशल्याने प्रभावित होऊन नाना फडणवीस यांनी त्यांची कोतवाल म्हणून नियुक्ती केली होती.
घाशीरामने सुरुवातीला आपले कार्य गांभीर्याने घेतले आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था सुधारली. त्या दिवसांत पुण्यात रात्रीचा कर्फ्यू होता आणि चोरी, अराजकता तसेच महिलांवरील गुन्ह्यांना कठोर शिक्षा केली जात असे. हळूहळू सत्ताकेंद्रात घाशीरामचे महत्व वाढू लागले. पुढे पुढे, कोतवाल व त्यांचे सहाय्यक आपल्या बळाचा अतिरेक करू लागले. नाना फडणवीसांच्या निदर्शनास आणून देऊनही नानांनी कोतवालाला विरोध करणे टाळले.
घाशीरामांच्या राजवटीच्या दशकात पुण्यातील लोक भयाच्या छायेखाली राहत होते, असे म्हटले जाते, परंतु त्यांचे आश्रयदाते नाना फडणवीस त्यांच्या कार्यावर खूश होते. घाशीरामने आजच्या पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये आपले घर बांधले होते. घराचे काही अवशेष अजूनही शिल्लक आहेत.
चित्र श्री. उदय कुलकर्णी यांच्या सौजन्याने…

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...